अंधेर नगरीत एका महान योगीराजांचे आगमन झाले .
चौपट राजाने त्यांचे अगत्याने स्वागत केले .
योगीराजांना भूत , वर्तमान , भविष्य त्रिकालात सर्वकाही बघू शकण्याची सिद्धी प्राप्त होती .
राजाने त्यांना सन्मानपूर्वक दरबारात विराजित करून आपले भविष्य विचारले .
योगीराज क्षणात समाधिस्थ झाले .
जागृत होऊन त्यांनी राजाच्या कानात सांगितले " हे राजा लवकरच तुझा सर्वनाश अटळ आहे , प्रजा तुझ्या कुशासनाला कंटाळली आहे . तुझ्या दरबारातसुद्धा षडयंत्र शिजत आहे , अनेक लोक तुझे सिंहासन उलथून पाडण्याची स्वप्ने बघत आहेत ."
राजा हादरला .
यथोचित बिदागी घेऊन योगीराज मार्गस्थ झाले .
राजाने त्वरीत सर्व संशयितांना जेरबंद केले , आणि वरुन प्रजेत कुणीही स्वप्ने बघू नये असा हुकुम काढला .
सर्वत्र एकच कल्लोळ माजला .
लहान मुले सगळ्यात जास्त अस्वस्थ झालीत . आभ्यासाचा ताण आणि मोठया लोकांच्या रागवण्या कडे दुर्लक्ष करून सुखस्वप्नात रंगून जाणे हाच मुलांचा एकमात्र विरंगुळा होता .
आता त्यांची सतत चीडचीड अन रडारड सुरु झाली .
त्यांच्या आई बापांना आपली कारटी मोठी होऊन उतारवयात आपला संभाळ करतील अशी स्वप्ने दिसेनात ,
तेही निराश झाले .
म्हाता-या , कोता-यांची आयुष्यात एकदा तरी तीर्थयात्रा ( काशी , रामेश्वर अथवा युरोप , अमेरिका काळानुरूप ) घडण्याचे स्वप्न नष्टं झाले .
ती आता नवीन पिढीच्या नावाने कडाकडा बोटे मोडून उरलेले दिवस कंठू लागली .
निम्नवर्गीयांचे मध्यमवर्गीय होण्याचे मध्यमवर्गीयांचे उच्चवर्गीय होण्याचे आणि उच्चवर्गीयांचे निरंकुश सत्ता प्राप्त करण्याचे स्वप्न भंगले .
सर्वात खालची बहुसंख्य निर्धन प्रजा तर अनादीकाळा पासून आपल्याला नाही तर आपल्या मुलाबाळांना तरी कधी पोटभर जेवण मिळेल ह्या स्वप्नाच्या भरवश्यावर पिढयानपिढया अर्धपोटी जगुन मरून जात होती .
त्यांचा तर शेवटचा आधारही खुंटला .
सर्वत्र हाहाकार उडाला .
विदेशी शक्ती तर असल्या संधीची वाट पहात टपून बसलेल्या होत्याच .
प्रजेच्या असंतोषाचा फायदा घेउन शत्रु राष्ट्राने आक्रमण केले .
चौपट राजाचा पाडाव करून त्याला कठोर शासन करण्यात आले .
नवीन राजाने राज्यरोहणा नंतर लगेच स्वप्ने बघण्या वरची बंदी उठवली .
तो तर स्वत:च पुढाकार घेउन प्रजेला मोठमोठी स्वप्ने दाखवू लागला .
लवकरच सर्वकाही सुरळीत झाले .
दाहक वास्तवाची जाणीव कमी कमी होउ लागली .
प्रजा पुन्हा स्वप्नात तरंगू लागली .
नवीन राजानेच नव्हे तर त्याच्या घराण्यानेही चिरकाल सुखनैव राज्य केले .
( समाप्त )
प्रतिक्रिया
12 Oct 2011 - 5:25 pm | किसन शिंदे
काइ सुदिक कळ्ळं नाय ब्वा.! नाय म्हटलं मिसळपाववर अशा लेखनाला बराच अर्थ प्राप्त असतो ना म्हणून.
12 Oct 2011 - 7:08 pm | ५० फक्त
खास जयनीत स्टाईलचे लिखांणं, काही वर्षानी इसापनिती सारखं मिपावर जयनिती असं एक पुस्तक छापलं जावं ही सदिच्छा.
12 Oct 2011 - 7:19 pm | शाहिर
मला काय बॉ निर्वाण प्राप्त होइना...
असला कळायला आय आय टी ची एंट्रंस द्यावी लागेल बहुतेक
12 Oct 2011 - 7:23 pm | आत्मशून्य
बघूद्यात.... न्हवे त्यांना त्या स्वप्नामधेच जगू द्यात..... :) मस्त तात्पर्य.
12 Oct 2011 - 7:56 pm | गणेशा
तो योगीराज हा शत्रुपक्षाचा माणुस असतो, आणि राज्याला हरवण्यासाठी तो आलेला असतो..
परंतु स्वप्न पाहु नका असे म्हंटल्याने इतरांचे स्वप्ने पाहणे थोडेच थांबते..
12 Oct 2011 - 8:21 pm | जयनीत
फॅन्टसी प्रकारातील कथा आहे .
12 Oct 2011 - 8:21 pm | जयनीत
फॅन्टसी प्रकारातील कथा आहे .
12 Oct 2011 - 9:37 pm | अत्रुप्त आत्मा
@-नवीन राजानेच नव्हे तर त्याच्या घराण्यानेही चिरकाल सुखनैव राज्य केले .>>> हा निष्कर्ष अवडला,,, आपणा भारतवासीयांचा प्रव्रुत्ती धर्मच बोलुन दाखवलाय तुम्ही....
12 Oct 2011 - 10:39 pm | सूड
थोडंसं जरी कळलं म्हणावं तर "काय कळलं रे तुला यातलं, कुणी कळवलं, कधी कळवलं, कुठे कळवलं ??" असं म्हणून शंभर भुवया उंचावतील. असो.
मला काहीच म्हणजे काहीच्च कळलं नै. ;)
13 Oct 2011 - 12:38 am | निनाद मुक्काम प...
काही कळले नाही किंवा अर्धवट कळले तरी सर्व कळल्याचा भाव आपल्या प्रतिसादातून व्यक्त करायचा .असे आमचे धोरण आहे
साने गुरुजी आणी लखू रिसबूड हे दोघे लेखक माझा आदर्श आहेत .
पु ले शु