निधर्मीपणाचे अनपेक्षित फायदे?

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
11 Sep 2010 - 4:52 pm
गाभा: 

नुकत्याच झालेल्या 'हिंदुत्व आणि भारतीयत्व' या चर्चेच्या ऐन भरात दोन रोचक दुवे मिळाले. त्या धाग्यावर ते हरवून गेले असते असं वाटलं म्हणून हा एक नवीन धागा. निधर्मी असण्याचे काही फायदे-तोटे हे अगदीच उघड असतात. पण सहसा लक्षात न येणारे असे काही परिणाम असतील का? उदा: एकदा एका मित्रानं सांगितलं होतं की निधर्मी माणसांना नैराश्य येण्याचं प्रमाण अधिक असतं (कारण जर देवच मानत नाही, तर मग आधार कुणाचा?) याविषयी माझ्याकडे विदा नाहीत, पण या दुव्यांवरनं कदाचित काही रोचक निष्कर्ष निघू शकतील म्हणून ते देत आहे.

पहिल्या दुव्याचा संबंध उपरोल्लेखित चर्चेत अदिती आणि मी यांनी सांगितलेल्या, आम्हाला इंग्लंडमध्ये आलेल्या (अमेरिकेच्या मानानं) सुखद अनुभवाशी जोडला जाऊ शकेल असं वाटलं. भारतीय उपखंडात ज्यांचं मूळ आहे अशा व्यक्तींविषयी सर्वसाधारण ब्रिटिश मनुष्याला बर्‍यापैकी ज्ञान असण्याशी हा सुखद अनुभव निगडित होता. आज ब्रिटनमध्ये धार्मिक असणं हे एक अल्पसंख्य वर्तन आहे असं दिलेल्या दुव्यात म्हटलेलं आहे. त्या देशात ठामपणे धार्मिक असलेले लोक लोकसंख्येच्या सुमारे १/३ आहेत; धर्माविषयी ठामपणे साशंक (deeply sceptical) असलेलेही सुमारे १/३ आहेत; तर उरलेले १/३ हे धर्माविषयी ठाम भूमिका न घेणारे आहेत. आजच्या ब्रिटनमधला मुख्य धार्मिक प्रवाह हा अज्ञेयवादी (Agnostic) आहे, असंही यात म्हटलेलं आहे.

यावरून असा प्रश्न मनात आला: धार्मिकतेचं प्रस्थ/स्तोम जिथे कमी आहे अशा देशांत ज्यांचा धर्म आपल्याहून वेगळा आहे अशा 'इतरां'विषयी ('The other' अशा अर्थानं) समंजसपणा, ज्ञान असण्याची शक्यता अधिक असेल का? हाच गुणधर्म पुढे नेऊन 'अस्मितेचा (Identity अशा अर्थानं) दुरभिमान सोडला तर आपल्याहून वेगळी माणसं समजायला सोपं जात असेल' असं म्हणता येईल का?

दुसरा दुवा हा थोडा गमतीशीर आहे. एका लोकप्रिय 'डेटिंग' संकेतस्थळानं आपल्यापाशी असलेल्या लाखो लोकांच्या माहितीचं वेगवेगळ्या पध्दतीनं पृथक्करण केलं. त्यात प्रामुख्यानं वांशिक पृथक्करण होतं. म्हणजे गोर्‍या पुरुषांनी आणि काळ्या पुरुषांनी स्वतःविषयी दिलेल्या माहितीत काय साम्य/फरक असतो, वगैरे. हा सर्व विदा मुळातून वाचण्यासारखा आहेच. पण या धाग्याच्या विषयाच्या अनुषंगानं मला रोचक वाटलेला त्यातला भाग हा "लिहावे नेटके" याविषयी आहे. आपापल्या 'डेटिंग प्रोफाईल'मध्ये प्रत्येकानं दिलेली माहिती ही समजायला किती सोपी/कठीण होती आणि त्याचा लेखकाच्या धर्माशी आणि धार्मिकतेशी कसा संबंध लागतो, असा हा भाग आहे. देव न मानणारे लोक सर्वात नेटकं लिहू शकतात असा निष्कर्ष यातून निघाला. हा आलेख पाहा:

Reading Level By Religion

खरी गंमत मात्र पुढेच आहे. विविध धर्माचे लोक आपापल्या धर्माबद्दल किती ठाम/गंभीर आहेत याच्याशीही त्यांचं नेटकं लिखाण जोडलेलं आहे. म्हणजे विशिष्ट धर्मातल्या कडव्या माणसापेक्षा त्या धर्माचं तितक्याश्या गांभीर्यानं वा ठामपणानं पालन न करणारा माणूस अधिक नेटकं लिहू शकतो! हा आलेख पाहा:
Reading Level By Religion Seriousness

आहे की नाही रोचक? याविषयी आपली मतं जाणून घ्यायला आवडतील.

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

11 Sep 2010 - 6:27 pm | बहुगुणी

(वेळ मिळाला नाही म्हणून) या आधीची चर्चा वाचलेली नाही, तसंच इथे दिलेले दुवेही मुळातून वाचलेले नाहीत, वेळ काढून वाचेनच, पण "निधर्मी माणसांना नैराश्य येण्याचं प्रमाण अधिक असतं (कारण जर देवच मानत नाही, तर मग आधार कुणाचा?)" या एका मुद्याविषयी काय वाटलं ते माझं (इतर माहिती वाचलीच नाही म्हणून unbiased :-)) मत व्यक्त करतो आहे:

मला असं वाटतं निधर्मी (नास्तिक?) माणसांना नैराश्य येण्याचं प्रमाण खरं तर कमी असावं, कारण देव (किंवा धर्म किंवा इतर काही शक्ती) जर मानत नाही तर आधार फक्त स्वतःचा, त्यामुळे आस्तिक लोकांना देव (वा इतर शक्ती) वेळेवर मदतीला येतील की नाही याविषयीची जी अनिश्चितता असू शकते ती नास्तिक लोकांना नसावी, कारण आपली मदत आपणच करू शकणार आहोत, तेंव्हा ती करणं ही क्रिया (देवाची वाट पहात passively होण्यापेक्षा) आधिक actively होऊ शकते, असं नाही वाटत?.

रोचक माहीती. इतर दुवे पहातो.

मला असं वाटतं निधर्मी (नास्तिक?) माणसांना नैराश्य येण्याचं प्रमाण खरं तर कमी असावं,

असेच वाटते.(पुन्हा माझे मत) कठिण परिस्थितीत कुणाचा तरी धावा करावा असे मनातच येत नाही, हा प्रसंग आपल्यालाच निस्तरायचा आहे हाच विचार मनात असल्याने कुणाचा आधार नाही अशी स्थिती निराशा आणण्याची शक्यता कमी व्हावी.

ह्यावरुन माझ्या एका भोळ्या रुममेटचे उदाहरण आठवले. परवा वर्कशॉप्चा पेपर होता म्हणुन आम्ही सगळे अभ्यास करत होतो. ह्या मित्राला पास होउ की नाही अशी चिंता लागुन राहिली होती. (त्याला ठराविक गोष्टी कर, नक्की पास होशील असे सांगुनही झाले होते) पण त्याचे काही मग लागेना. गडी ३०-४० किमीवर असलेल्या कल्की अन अम्मा भगवानयांच्या आश्रमात, मद्रासच्या भर दुपारी बसने गेला. तिथले "पवित्र पाणी" शंभर दिड्शे रुपड्यांना विकत घेउन आला अन शेवटी नापासच झाला. जाउन येउन अर्धा दिवस वाचवला असता तर कदाचित पास झाला असता, असो.

शुचि's picture

11 Sep 2010 - 6:56 pm | शुचि

गृहीतक १ - लिहीणं म्हणजे काय तर एक्स्टेन्शन ऑफ सेल्फ. स्वतःला दुसर्‍यापर्यंत पोचवणं.
गृहीतक २ - ईश्वरवादी लोक हे प्रत्येकामधे ईश्वराचा अंश आहे असं मानतात किंवा सर्वजण हे एकाच प्रभूची लेकरं आहेत असं मानतात तर नीरीश्वरवादी लोक असं काही मानत नाहीत.

सिद्धान्त - दुवा २

प्रूफ -

गृहीतक २ मुळे "लिहीणं अर्थात स्वतःला दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पोचवणं" हे ईश्वरवादी लोकांना सोपं वाटतं त्यामुळे ते या कृती मधे जास्त उर्जा, शक्ती दवडत नाहीत तर तीच शक्ती अन्य महत्त्वाच्या कामांत वापरतात.

याऊलट नीरीश्वरवादी लोक हे प्रत्येक व्यक्ती हा एक वेगळा, स्वयंसंपूर्ण घटक मानत असल्याने , स्वतःला त्या व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी (गृहीतक १ पहावे) ते कसोशीने (इन्टेन्सली) प्रयत्न करतात. आणि हेच त्यांच्या लेखनकौशल्याचे गमक.

निवांत पोपट's picture

11 Sep 2010 - 7:31 pm | निवांत पोपट

ईश्वरवादी लोकांचे माहीत नाही,पण नीरीश्वरवादी लोकांना नीरीश्वरवादापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या तर्कशुध्द्तेची गरज असते.तीच तर्कशुध्द्ता त्यांच्या लिखाणात उतरत असेल.असे असणे शक्य आहे.

अमिता "तर्कशुद्धता" हे झालं १ अंग. तुम्ही म्हणता ते खरं असेल या बाबतीत.
पण इतर अंगांचं काय?
"लेखनातील नेटकेपणा" हा अनेक अंगांनी, पैलूंनी तपासता, जोखता येतो जसं - (१) लिखाणात मुद्द व्यवथित मांडला आहे का? की वाचकांना मुद्दा कळत नाही आहे? (२) मांडलेल्या मुद्द्यास धरून ( supporting) काही उदाहरणे दिली आहेत का
(३) लिखाणात वाचकास धरून ठेवण्याची क्षमता किती आहे? (४) स्वतःच्या विस्तृत/व्यापक ज्ञानाचा उपयोग केलेला आहे का जसं म्हणी, Quotes, काव्यपंक्ती यांचा उल्लेख केलेला आहे का ज्यायोगे लिखाण अधिक रम्य, वाचनीय ठरेल (४) आणि शेवटी लेखनकर्त्याचा प्रामाणिकपणा

निवांत पोपट's picture

11 Sep 2010 - 9:27 pm | निवांत पोपट

होय. इतर ही अनेक पैलू असतील.पण मूळ मुद्दा "लेखनातील नेटकेपणा" नसून " नीरीश्वरवादी लोकांच्या लेखनातील नेटकेपणा" असा आहे. त्या मूळॆ लेखनातील नेटकेपणाचे कारण विशिष्ट मनोवृत्तीत,प्रवृत्तीत आहे असा एकंदर धागाकर्त्या लेखकाचा सूर आहे.त्याला अनुसूरून मी एक मला जाणवलेली शक्यता सांगितली. बाकी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे इतरही पैलू (लेखनातील नेटकेपणाचे नव्हे,लेखकाच्या प्रवृतीचे ) असतीलच.

बबु's picture

11 Sep 2010 - 8:50 pm | बबु

देव मोठा की दैव ? दैव या अक्षरामध्ये एक मात्रा जास्त आहे,पण आपण दैववादी होण्यापेक्षा प्रयत्नवादाची कास धरुन यत्नदेवाची उपासना केली तर आपण दैवावर नक्की मात करु.
उत्तर द्या.

युयुत्सु's picture

11 Sep 2010 - 9:10 pm | युयुत्सु

साहित्यातलं नोबेल प्राईज ज्यानी मिळवल ते धार्मिक होते की अधार्मिक ?

कवितानागेश's picture

11 Sep 2010 - 10:44 pm | कवितानागेश

खरोखरच कुणाला अभ्यास करायचा असेल तर फक्त 'डेटिंग' चा अभ्यास पुरेसा नाही....
कारण ''डेटिंग' जुगार खेळ्ल्यासारखे वाटते...
ती माहिती किती गंभीरपणे घ्यायची?
त्यापेक्षा,अगदी फक्त 'नोबेल प्राईस विनर्स' नाहीत,
पण बेस्ट्सेलर्स लिहिणार्यांचा डाटा मिळवून तपासता येइल.

इन्द्र्राज पवार's picture

12 Sep 2010 - 2:02 am | इन्द्र्राज पवार

निधर्मी असण्यामुळे फायदा काय असतो किंवा असू शकतो हा जरी काहीसा वादाचा मुद्दा (दोन्ही पक्षी) असला तरी समाजाच्या दृष्टीने काही तोटे मात्र निश्चितच होऊ शकतात. उदा. 'अ' माझा मित्र असून तो धर्म पाळत नाही. ठीक आहे, त्यामुळे माझी त्याच्याबरोबरची मैत्री अन्य मित्रासमच राहील. पण ज्यावेळी 'अ' ला मी घरी कोणत्यातरी कौटुंबिक कार्यक्रमासाठी बोलाविण त्यावेळी त्याच्या वर्तनामुळे त्याचे नसले तरी माझे काही तरी तोटे होतातच. समजा आजच 'गणेशा'च आगमन झाले म्हणून त्याला (एकट्यालाच) भोजनाला बोलाविले आणि तो आलादेखील. पण भोजनापूर्वी आमच्या ज्येष्ठांनी आरोळी दिली, "चला रे, गणपतीच्या आरतीला...." तर इतरांसमवेत हा उठणार नाही, कारण आरतीला तो उभारला तर याच्या 'निधर्मी' तत्वाला नक्कीच ढाळ लागणार...आणि असला कसला मित्र म्हणून मी ज्येष्ठांचे (नंतर) बोलणी खाणार. म्हणजे गणपतीच्या निमित्ताने गोडधोड खायाला हा येणार मात्र त्याचवेळी निधर्मीपणाची ढाल पुढे उभा करून त्याच गणपतीला नमस्कार करणार नाही. इथे त्याचा काहीच तोटा होत नाही, कारण तो म्हणू शकतो, 'मी काही जेवायला बोलाव असे इन्द्राला म्हटले नव्हते, त्याने बोलाविले मी मानले, कारण विचारले नाही, गेलो, पण तत्व म्हणून आरतीला उभा राहिलो नाही." त्यामुळे या लक्षणाचे फायदेतोटे हे सापेक्षच राहणार.

तुमच्या मित्राने सांगितले की, निधर्मी माणसांना नैराश्य येण्याचं प्रमाण अधिक असते. माझा असा (आजपर्यंत तरी,,,) असा अनुभव नाही. कारण ही मंडळी मानसिकदृष्ट्या कणखर असतात. त्यांच्या भूमिकेचे 'प्रोज अँड कॉन्स' त्यानी वेळीच अधोरेखित करून ठेवले असल्याने समाजात त्या निमित्ताने वावरताना किमान पक्षी आपल्याला कोणत्या परिस्थितीतून वेळोवेळी जायला लागेल यांचे डेबिट्/क्रेडिट तक्ते असतात यांच्याकडे. राहता राहिला 'देव मानत नसेल तर मग आधार कोणाचा?" हा मुद्दा. तर आधारासाठी ते म्हणतात आमची श्रद्धा आमच्या विचारावर आहे आणि हा विचारच आम्हाला वेळप्रसंगी धीर देतो. म्हणजे यांच्याकडून एखाद्या कर्मात एखादी चूक झाली तर त्या चुकीचे खापर ते देवाच्या नावाने अन्य कुणाच्या डोक्यावर आपटत नाहीत तर 'आपलेच करताना काहीतरी चुकले आणि त्यामुळे त्याचे परिमार्जन आपणच केले पाहिजे' या निर्णयाप्रत ते येतात. निधर्मी वर्तन करीत आयुष्यक्रम अगदी आनंदाने व्यतीत करणारे माझे काही निकटचे मित्र आहेत (जे व्यवसाय/नोकरीत अगदी वेल सेटल्ड आहेत...) जे 'जियो और जीने दो |' या तत्वाचा पुरस्कार करतात. नैराश्याचे प्रमाण (मलातरी) अगदी नगण्य म्हणण्याइतपतदेखील यांच्यात दिसलेले नाही.

"भारतीय उपखंडात ज्यांचं मूळ आहे अशा व्यक्तींविषयी सर्वसाधारण ब्रिटिश मनुष्याला बर्‍यापैकी ज्ञान असण्याशी हा सुखद अनुभव निगडित होता."

~~ हा अनुभव मला आलेला आहे आणि तोही ब्रिटीशच नव्हे तर अगदी स्वीडनसारख्या सातत्याने अलिप्ततेचे धोरण स्वीकारलेल्या देशातून. दिल्लीतील स्वीडन एम्बेसी संबंधित असलेल्या आणि 'कार्लस्टॅड' या शहरात राहणार्‍या एका जोडप्याची माझी (अन्य लोकांच्यासमवेत 'स्वीडन-इंडिया कल्चरल प्रोग्राम' निमित्ताने) ओळख झाली. एकदोन मीटिंगनंतर 'एकेरी' वर येण्यापर्यंत संबंध आल्यानंतर त्या जोडप्याला मी दिल्लीचा नसून मूळचा कोल्हापूरचा आहे हे समजले आणि एका आठवड्याच्या आतच त्यातील मिसेसने माझ्या 'कोल्हापूर' वर अशा काही पद्धतीने माहितीचा मारा सुरू केला की मला हे कळेना की ही पॉलिटिक्समधील डॉक्टरेट मॅडम मूळचीच कोल्हापूरची की स्टॉकहोमची (तोपर्यंत 'स्वीडन म्हणजे स्टॉकहोम' इतपतच माहिती) याचा पत्ता लागेना. म्हणजेच याचा अर्थ असा की, आपल्या सर्कलमध्ये एक व्यक्ती अशी आहे की जी मूळची दिल्लीची नाही पण दोन संस्कृतीशी संबंध वाढविण्यासंदर्भात याचा जर पुढे कुठे उपयोग होणार असेल तर त्याच्याविषयी आणि त्याच्या गावाविषयी आपल्याला अगोदरच माहिती असणे आवश्यक आहे, हे त्या स्वीडिश स्त्रीच्या मनी इतके ठसले होते की, मला थोडासाही सुगावा न लागू देता कोल्हापुरी परंपरेचा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा सगळा पौराणिक धांडोळा तिने आपल्या संग्रही ठेवला. माहितीचा उपयोग होवो ना होवो, ज्ञानलालसा आणि ती संपादन करण्याची त्यांची विलक्षण हातोटी याबद्दल त्यांना सलाम केलाच पाहिजे. पारंपारिक व्याख्येने हे जोडपे कट्टर धार्मिक नव्हतेच. वर्षापेक्षा जास्त काळ मी त्यांच्या सान्निध्यात होतो त्यामुळे त्यांचा कामाचा वेळ सोडता, सुट्टीच्या दिवशी ते काय करीत हे पाहिले होते, म्हणजे कधीमधी रविवारी चर्चला जात असले तरी हिंदूंच्या देवळात, शिखांच्या गुरुद्वारात आणि जामा मशिदीतदेखील जात. हा प्रकार ते सर्वधर्मसमभाव या हेतूने करीत की, त्यांच्या नजरेत तसे करणे म्हणजे विविध 'कल्चर'चा अभ्यास करणे हा विचार होता की काय असेही मला वाटत असे.

त्यामुळे धागाकर्ते श्री.चिंजं यांच्या मनात जो प्रश्न रुंजन घालत आहे, (धार्मिकतेचं प्रस्थ/स्तोम जिथे कमी आहे अशा देशांत ज्यांचा धर्म आपल्याहून वेगळा आहे अशा 'इतरां'विषयी ('The other' अशा अर्थानं) समंजसपणा, ज्ञान असण्याची शक्यता अधिक असेल का?) त्याचे उत्तर होय असेच म्हणेन. कारण हा समंजसपणा मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. जोपर्यंत दिल्लीत हे जोडपे होते तो पर्यंन्त त्यांनी माझ्या गटाशी सांस्कृतिक देवाणघेवाण मुद्द्यावरून संबंध ठेवणे, ही बाब 'नोकरीचा एक हिस्सा' म्हणून त्यांनी करणे हे मी समजू शकत होतो. पण कार्लस्टॅडला गेल्यानंतरही ते ओळखीचे नाते तितक्याच आपुलकीने जिव्हाळ्याने जपून ठेवले आहे आणि दोन भिन्न संस्कृतीमधून एकमेकासाठी कोणत्या चांगल्या बाबीविषयी लिहिताबोलता येईल हेही प्रकर्षाने पाहिले जात आहे. मला वाटते 'दुराभिमान' त्यांच्या गावीही नसेल...त्यामुळेच माणसं समजावून घेणं म्हणजे काय ते धार्मिकतेचं प्रस्थ जिथे कमी आहे अशा देशात फार समजते.

इन्द्रा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Sep 2010 - 3:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इंद्रा, तुझ्या प्रतिसादात तू जे गणपतीला आरत्या न म्हणणार्‍या नास्तिकाचं उदाहरण दिलं आहेस ते माझ्या मते "भडक नास्तिकवादा"चं उदाहरण आहे. मी स्वतः निरीश्वरवादी असले तरी चारचौघात टाळ्या वाजवत, किंवा झांजा-टाळ वाजवत मोकळ्या (पक्षी: मोठ्या) आवाजात आरत्या म्हणायला माझी ना नसते; त्यात मला आनंद मिळतो. जर 'खुदा जाने के मै फिदा हूं' गाण्याला माझी ना नाही तर 'सुखकर्ता दु:खहर्ता'ला मी का आक्षेप घ्यावा? 'भडक नास्तिक' (भडक भगव्याच्या चालीवर) कदाचित पहिल्या गाण्याला हरकत घेणार नाहीत पण दुसर्‍याला घेतील. पण गाडं अडतं ते प्रत्येकाने फुलं वाहून, नमस्कार करण्याच्या वेळेस! तेव्हा मी 'धोरणी'पणाने त्या घरातून सटकते, किंवा लहान पोरांशी खेळायला सुरूवात करते आणि शक्यतोवर हा 'चुकार'पणा लोकांच्या लक्षात येणार नाही याची काळजी घेते.

मूळ धाग्यात चिंतातुर जंतूंनी म्हटल्याप्रमाणे माझाही अनुभव आहेत. माझ्या माहितीतली बरीचशी ब्रिटीश लोकं निधर्मी आणि/किंवा निरिश्वरवादी आहेत. माझ्या माहितीतल्या सगळ्या ब्रिटीश माणसांची नावं ख्रिश्चन आहेत, पण त्यातली एकही व्यक्ती रविवारी चर्चमधे जात नाही. डच लोकांबद्दल मी साधारण हेच ऐकून आहे.

धमाल मुलगा's picture

13 Sep 2010 - 9:23 pm | धमाल मुलगा

प्रकाटाआ.

मी स्वतः निरीश्वरवादी असले तरी चारचौघात टाळ्या वाजवत, किंवा झांजा-टाळ वाजवत मोकळ्या (पक्षी: मोठ्या) आवाजात आरत्या म्हणायला माझी ना नसते; त्यात मला आनंद मिळतो.

व्हेन इन रोम... प्रमाणेच असे वागणे आहे आणि इतकीच अपेक्षा असते. केवळ आरतीच कशाला अगदी कधी हिंदू व्यतिरीक्त धर्मियांच्या धार्मिक समारंभांना जावे लागले अथवा निधर्मींबरोबर राहणे असले तरी...

मात्र आपले विचार वाचून आपल्याच भाषेत जर भडक नास्तिकवादी आपल्या विरुद्ध बोलायला लागले तर केवळ आयडी मधील ३.१४ दाखवा - irrational number ;)

माझ्या माहितीतल्या सगळ्या ब्रिटीश माणसांची नावं ख्रिश्चन आहेत, पण त्यातली एकही व्यक्ती रविवारी चर्चमधे जात नाही. डच लोकांबद्दल मी साधारण हेच ऐकून आहे.

येथे अनेक भाविक हिंदू हे १ जानेवारीस देवळात जाताना पाहीले आहेत आणि टोटल कन्फ्युजन म्हणजे काय (माझ्यासारख्यांचे का त्यांच्यासारख्यांचे हा वेगळा भाग ;) ) हे समजले.

नंदन's picture

12 Sep 2010 - 2:12 am | नंदन

दुसरा दुवा आधी वाचनात आला होता, तेव्हा रोचक वाटला होता. अमेरिकेन विद्यापीठांतील प्राध्यापकांचा राजकीय कल एका विशिष्ट पक्षाकडेच झुकणारा का असतो, याचे मागे विश्लेषण वाचले होते त्याची आठवण झाली. मला वाटतं, इथे निधर्मी असणं आणि त्याचे फायदे असा कारण-परिणाम संबंध असण्याऐवजी हे केवळ दोन निरनिराळे परिणाम असावेत. बाकी या निरीक्षणाला अपवाद म्हणून ज्यांची सार्वकालिक श्रेष्ठ कादंबरीकारांत गणना होते अशा गेल्या शतकातल्या दोन रशियन लेखकांचं देता येईल (ग्रॅंड इन्क्विझिटर इ.)

राजेश घासकडवी's picture

12 Sep 2010 - 5:17 am | राजेश घासकडवी

हम्म्म्म....
आठ वेगवेगळे समूह - त्यांच्या सामूहिक सरासरींमध्ये ७.६ ते ८.८ इतका फरक. मुळात हा फरक 'सिग्निफिकंट' आहे का? कदाचित प्रत्येकच समूहात डायव्हर्जन्स इतका प्रचंड असेल की हा फरक नगण्य वाटावा.

त्यांना चढत्या क्रमाने लावल्यामुळे साहजिकच एक पॅटर्न असल्यासारखा वाटतो. पण त्याला काही अर्थ आहे का? मी एक कल्पना-प्रयोग सांगतो. समजा अजय, अभय, अमित, अजित अशी चार कॉमन नावं घेतली. त्या नावांच्या सगळ्यांच्या उंची मोजल्या व सरासरी काढली, तर काही ना काही फरक (एक-दोन सेंटीमीटरचा) दिसेलच. मग त्या नावांना चढत्या उंचीच्या अनुक्रमे लावलं तर कदाचित अभय नावाची मुलं सर्वात उंच, तर अमित सगळ्यात बुटके असं दिसून येईल.

मला म्हणायचंय की धार्मिक लेबलं ही तशी निरर्थक असतील. त्यातल्या त्यात स्वतःला निधर्मी/नास्तिक म्हणवणारे इतरांपेक्षा अचूक लेखन करतात असं म्हणता येईल. पण तेसुद्धा त्यांच्या अधिक शिक्षणापोटी असणं शक्य आहे. तितक्याच शिक्षणाचे इतरधर्मीय व ते यांमध्ये काहीच फरक नसू शकेल. हे सगळं जर तर आहे, निधर्मी = अधिक अचूक लेखन हा वरवर दिसणारा निष्कर्ष कसा पोकळ असू शकेल हे दाखवण्यासाठी.

दुसरं तसंच उदाहरण सांगतो. अमेरिकेत गोरे व काळे सुमारे ९०:१० या प्रमाणात आहेत. मात्र तुरुंगामध्ये असलेल्यात हेच प्रमाण ४०:६० आहे (मला अगदी अचूक आकडे आठवत नाहीत, पण साधारण युक्तीवादासाठी...) म्हणजे गोरे लोक कमी (सुमारे १३ पटीने) गुन्हे करतात असा निष्कर्ष सहज काढता येतो. पण ते गोरेपणामुळे का? तर ते बरोबर नाही. जर खोलात शिरून कमी शिक्षण व गरिबी हे समान घटक असलेले गोरे व काळे बघितले तर ही तेरा पट निघून जाते. याचाच अर्थ गरीब व कमी शिक्षण (यामुळे पुन्हा समाजात प्रतिष्ठित नोकऱ्या करून पैसा मिळवण्याची कमी शक्यता) असलेले हे गुन्हे करतात, मग ते गोरे असोत अथवा काळे.

हे आक्षेप अर्थातच दुसऱ्या आलेखाकडे बघितलं की कमी तीव्र होतात. त्यात थोडी व्हेरियन्सची झलक मिळते. सीरियस असणे व नसणे यात पहिल्या आलेखात दाखवलेल्या निधर्मी = अधिक अचूक लेखन या निष्कर्षाच्या जवळ जायला होतं. तरीही त्यामागे दुसराच लपलेला व्हेरिएबल नाही, अशी खात्री पटत नाही.

असो. विचारांना चालना देणारा लेख, हे सांगणे नलगे.

श्रावण मोडक's picture

12 Sep 2010 - 11:08 am | श्रावण मोडक

यालाच स्टॅटिस्टिकल फॅलसी म्हणतात का?
हा लेख वाचल्यावर पहिल्यांदा तोच विचार डोक्यात आला. माझ्या डोक्यात आला, त्यापेक्षा अधिक नेमक्या शब्दांत इथं तुम्ही मांडला आहे.

सहज's picture

12 Sep 2010 - 11:15 am | सहज

गुर्जींशी सहमत.

विसुनाना's picture

12 Sep 2010 - 12:28 pm | विसुनाना

त्यातल्या त्यात स्वतःला निधर्मी/नास्तिक म्हणवणारे इतरांपेक्षा अचूक लेखन करतात असं म्हणता येईल. पण तेसुद्धा त्यांच्या अधिक शिक्षणापोटी असणं शक्य आहे.

-माणूस जितका जास्त बुद्धीमान तितका तो जास्त बुद्धीवादी बनत असावा. कारण आपल्या मतांचा एकांगी विचार न करता विरोधी अथवा इतर मतांचे सम्यक विष्लेषण करून त्यातून योग्य निष्कर्ष काढण्याची कुवत वाचनामुळे वाढत असावी.
त्याबरोबरच बुद्धीमान असल्याने चुकीचे निर्णय घेऊन जीवनात अयशस्वी / कमी यशस्वी होण्याची शक्यता कमी होत असावी. त्यामुळे त्यांना अनिश्चिततेतून निर्माण होणार्‍या श्रद्धेच्या संकल्पनेला (किंवा पूर्वासुरीनी सांगितलेल्या पण स्वतःस न पटणार्‍या मार्गाला) महत्त्व देणे गरजेचे ठरत नसावे.

यापुढे जाऊन असेही म्हणतो की इतरांचे मत अयोग्य वाटले तरी त्यास एक जीवनविषयक दृष्टीकोन म्हणून मान देणे हे जास्त बुद्धीमत्तेचे लक्षण नव्हे काय?

धनंजय's picture

12 Sep 2010 - 8:31 pm | धनंजय

सर्वेक्षणाचा एकूण सँपल साइझ ५,२६,००० इतका आहे.
दुसर्‍या आलेखात ८*३=२४ इतके वेगवेगळे उपप्रकार आहेत. प्रत्येक उपप्रकारातल्या लोकांची संख्या किती आहे, ते आपल्याला माहीत नाही. प्रत्येक उपप्रकारात एक तरी व्यक्ती आहेच. मात्र जर उपसंख्या
५२५,९७७; १; १;....; १ अशी असल्यास सर्व आकड्यांपैकी एकच तितका आकडा बरा म्हणता येईल.

डेटिंग संकेतस्थळावर जनगणनेतल्या टक्केवारीने जर उपप्रकार असतील तर सँपल साइझ निष्कर्षांसाठी पुरेसा आहे. मात्र असे मानता येणार नाही. वेगवेगळ्या गटातले लोक डेटिंग संकेतस्थळांवर कमीअधिक प्रमाणात जात असतील.

माझा कयास आहे एकापेक्षा अधिक उपप्रकारांच्या अ‍ॅव्हरेज संख्या बर्‍यापैकी निश्चित आहेत.

@ श्रा मो :
"स्टॅटिस्टिकल फॅलसी" हा शब्द प्रयोग मी आधी कधी ऐकलेला नाही. (१) "सँपल पुरेसे नसणे" यातून संख्याशास्त्रात फॅलसी निघत नाही. "फरक दिसतात, त्यांच्याबाबत निश्चिती नाही" असा निष्कर्ष सांगितला जातो, तो फॅलेशियस नसतो. (२) दुसर्‍या प्रकाराला - खोलात वेगळे कारण असण्याला - "कन्फाउंडिंग" किंवा त्याचा उपप्रकार "रिव्हर्स कॉझॅलिटी" म्हणतात. यात फॅलसी असते. मात्र याला "स्टॅटिस्टिकल फॅलसी" म्हटल्याचे माहीत नाही.
कन्फाउंडिंगमध्ये साधारणपणे स्टॅस्टिस्टिक्सबाहेरील संकल्पनेतली चूक असते. श्री. घासकडवी यांचे उदाहरण आहे :

अमेरिकेत गोरे व काळे सुमारे ९०:१० या प्रमाणात आहेत. मात्र तुरुंगामध्ये असलेल्यात हेच प्रमाण ४०:६० आहे (मला अगदी अचूक आकडे आठवत नाहीत, पण साधारण युक्तीवादासाठी...) म्हणजे गोरे लोक कमी (सुमारे १३ पटीने) गुन्हे करतात असा निष्कर्ष सहज काढता येतो. पण ते गोरेपणामुळे का? तर ते बरोबर नाही.

येथे "मुळे" संकल्पना स्टॅटिस्टिक्समधील नाही. स्टॅटिस्टिक्समधून अमुक तमुकमुळे आहे किंवा नाही, असा काहीच निष्कर्ष मिळत नाही. "काळेगोरेपणा आणि तुरंगात असणे या दोन गोष्टी स्वतंत्र नाहीत, परस्परसंबंधित आहेत" इथपर्यंतच निष्कर्षासाठी संख्याशास्त्रातून पुष्टी मिळते. यात "काळ्या वंशीयांत खर्‍या कारणाचे - दारिद्र्य, अशिक्षितपणा यांचे - बाहुल्य अधिक आहे" या "खर्‍या" निष्कर्षाचा काहीएक बाध होत नाही. म्हणजे फॅलसी स्टॅटिस्टिक्समधील नाहीच. स्टॅटिस्टिक्सच्या बाहेर असलेल्या "मुळे" संकल्पनेच्या वापरातून आलेली आहे. आता श्री. चिंतातुर जंतु यांच्या "-चे फायदे"="-मुळे होणारे फायदे" असा अर्थ असावा. तर श्री. घासकडवी यांच्या उदाहरणात "मुळे" संकल्पना घालणे ठीकच आहे. मात्र दुव्यावरील लेखात "मुळे"बद्दल असा कुठलाही निष्कर्ष नाही.

@राजेश घासकडवी :

तरीही त्यामागे दुसराच लपलेला व्हेरिएबल नाही, अशी खात्री पटत नाही.

कुठल्याही बाबतीत दुसराच लपलेला व्हेरिएबल नाही याची कधीच खात्री होऊ शकत नाही. हे सार्वत्रिक सत्य येते सांगत आहात काय? तसे नसावे. या सार्वत्रिक सत्याचा या संदर्भात उल्लेख तुम्हाला करावासा वाटला : "या विवक्षित संदर्भात हिडन व्हेरियबल विचार करण्यालायक असण्याचा संशय बलवान आहे" असा तुमचा मथितार्थ असावा. हा संशय अधिक बलवान का आहे, ते थेट सांगितले पाहिजे.

राजेश घासकडवी's picture

13 Sep 2010 - 2:12 am | राजेश घासकडवी

'मुळे' हा शब्द संख्याशास्त्रात नाही, पण तो लेखात येतो. निधर्मीपणाचे फायदे यातच निधर्मी असल्यामुळे होणारे फायदे हे अध्याहृत आहे. पण संख्याशास्त्रात नाहीत म्हणून ते वापरून कार्यकारणाचे निष्कर्ष काढणं चुकीचं नाही. (रसेल काही का म्हणे ना!)

"या विवक्षित संदर्भात हिडन व्हेरियबल विचार करण्यालायक असण्याचा संशय बलवान आहे" असा तुमचा मथितार्थ असावा. हा संशय अधिक बलवान का आहे, ते थेट सांगितले पाहिजे

कुठचंच लपलेलं व्हेरिएबल नाही याबाबतीत खात्री पटण्यासाठीचे माझे निकष अतिरेकी कठोर नाहीत. काळे व गोरे यांच्या उदाहरणातलं शिक्षण व गरीबी यांची सांगड बाहेर आल्यावर आणखीन छुप्या व्हेरिएबलसाठी शोध घेण्याचा त्रास मी घेणार नाही. पण धर्म व लेखन-नेटकेपणा यांचं नातं काहीसं वर्ण व गुन्हेगारी यांसारखं वरवरचं असावं असं वाटलं. म्हणूनच संशय आहे अशा जातीची विधानं करण्याचा प्रयत्न होता.

संशयाला पुष्टी देतो त्याच लेखातला अजून एक आलेख. यात भारतीय, आशियाई (ज्यांतल्या बहुतेकांची इंग्रजी ही मातृभाषा नसावी) यांचं लेखन गोऱ्यांपेक्षा उजवं ठरलेलं दिसल्यावर कदाचित हा शिक्षणाचा परिणाम असावा अशी शंका दाट होते.

श्री. चिंतातुरजंतु यांच्या लेखात "-मुळे" अध्याहृत असावा, आणि त्यामुळे तुम्ही उदाहरणात "-मुळे" वापरावा हे ठीक असल्याचे माझ्या वरील प्रतिसादात सांगितलेलेच आहे. त्याचा काहीतरी ढोबळ अर्थ मी लावूनही घेतला होता.

- - -
परंतु तुमच्या एका वाक्यामुळे आता ढोबळ अर्थ मला लावणे कठिण झाले आहे :

"रसेल काही का म्हणेना!"

म्हण समाजातला ढोबळ अर्थ न-घेता रसेलला अमान्य असलेला कुठलासा नेमका अर्थ येथे घ्यायचा आहे की काय? रसेलचे विश्लेषण अमान्य असेल तर ते त्यागणे योग्यच आहे. पण मग संवादासाठी सांगा : तुमची "कार्यकारणभाव"ची व्याख्या काय आहे? "अमुक हे कारण आहे आणि तमुक हे कार्य आहे" हे ठरवण्यापूर्वी काय निरीक्षणे, निरीक्षणांचे गणित अपेक्षित आहे.
संख्याशास्त्रातून ते कळत नाही, हे तुम्ही म्हणतात. संख्याशास्त्रातून जे काय कळते त्यात काही भर घातली, तर त्यातून तुमच्या व्याख्येला पुरेसे विश्लेषण होते, इतके मला समजून येते. परंतु तेवढ्यावरून संख्याशास्त्राच्या निष्कर्षानंतर काय भर घातली, ते कळत नाही. निकष समजून येत नाहीत.
- - -

समाजामधील ढोबळ वावरानुसार काही व्हेरिएबले हिडन असूनही कारणत्व नकारलेले दिसत नाही.
उदाहरणार्थ :
एखाद्या अप्रशिक्षित दरिद्री सैन्यातील सैनिकांकडे (उदाहरणार्थ हुतू इर्रेग्युलर सैनिक) नेमबाजीचे प्रशिक्षण निकृष्ट असते, आणि नेम अचूक धरणार्‍या महागड्या बंदुकी कमी असतात. स्नायपर प्रशिक्षण (उदाहरणार्थ भारतीय सैन्यातले स्पेशल फोर्सेस) झालेल्या सैनिकाकडे कित्येकदा उत्तम तंत्रज्ञानावी बंदूकही असते.
हुतू सैनिकांनी मारलेल्या गोळ्यांत निशाणाला लागून शत्रू मरण्याचे प्रमाण तसे कमी असते.
त्या मानाने स्पेशल फोर्स सैनिकाने मारलेल्या गोळ्यांत निशाणाला लागून शत्रू मरण्याचे प्रमाण अधिक असते.

येथे "प्रशिक्षण", "प्रगत बंदुकींची उपलब्धता" तुमच्या निकषात "हिडन व्हेरिएबल" आहे काय? मग हुतू सैनिकाने बंदूक झाडली, समोरचा व्यक्ती मेला तर मरणाचे कारण "हुतू सैनिकाने गोळी झाडली" असे समाजात म्हणतात, ते चूक आहे काय?

(१) चूक असल्यास ठीक. पण असे दिसते, की समाजातल्या वावरातून "कारण-कार्य" यांचा जो काय ढोबळ अर्थ मी समजतो, तो तुमच्या व्याख्येत बसत नाही. व्याख्या सांगितलीच पाहिजे.

(२) समाजातील ढोबळ वापर चूक नसल्यास, हिडन व्हेरियेबल कधी सुसंदर्भ असते, आणि कधी असंदर्भ असते, त्याबद्दल निकष तुम्ही सांगितले पाहिजेत. (समाजात हिडन व्हेरिएबल बद्दल ढोबळ चर्चा नसते. त्यामुळे तुमचे निकष समाजातील वावरातून मला कळून येत नाहीत.)
- - -

कदाचित ही उपचर्चा मूळ चर्चेच्या मधून निसटत आहे. येथील मर्यादित विषयापेक्षा अधिक सर्वसामान्य (जनरल) आहे. वाटल्यास वेगळी चर्चा करूया.

राजेश घासकडवी's picture

13 Sep 2010 - 5:44 am | राजेश घासकडवी

असं म्हणायला हवं होतं. मुळात कार्यकारणभाव या संकल्पनेचीच गरज नाही असं रसेलने जे मांडलं, त्याला उद्देशून होतं. याचं कारण मला ढोबळ अर्थाचा कार्य-कारण भावच मला वापरायचा होता. ते वाक्य पूर्णपणे काढून टाकायला माझी ना नाही.

एका विशिष्ट उदाहरणात अर्थातच सैनिकाने गोळी मारल्यामुळे माणूस मेला हे पुरेसं कारण आहे. त्यात त्याचं प्रशिक्षण, बंदुकीचा दर्जा, अंतर या सगळ्या गोष्टी अंतर्भूत असतातच. (अगदी तळाला जाऊन इलेक्ट्रॉन, प्रोटॉन वगैरेंच्या स्वरूपात वर्णन करून कारकत्व न आणता हुतूने गोळी झाडलेला समोरचा माणूस का मेला हे सांगता येईल यावर विश्वास आहे, पण तसं करत गेलं तर जगण्याची मजाच जाईल)

हिडन व्हेरिएबल हे मी 'वरवर दिसणारं कारण हे खरं कारण नसून दुसरंच असावं' या तर्कासाठी वापरलं. कदाचित त्यासाठी 'ऑब्व्हियसली ओव्हरलुक्ड व्हेरिएबल' वापरणं अधिक योग्य झालं असतं. हुतूंनी किंवा भारतीयांनी मारलेल्या गोळ्यांमुळे माणसं मेली - ही त्यांच्या मरणाची कारणं पुरेशी होतात. हुतूंच्या गोळ्यांनी जितकी मेली त्यांपेक्षा तितक्याच गोळ्यांनी कितीतरी अधिक माणसं भारतीयांच्या गोळ्यांनी मेली या निरीक्षणांवरून जर (सर्वसाधारण) भारतीय हे (सर्वसाधारण) हुतूंपेक्षा अधिक चांगले नेमबाज असतात असा कोणी निष्कर्ष काढला तर त्यावर माझी प्रतिक्रिया तशी होईल. व मी ही तुलना संत्री व सफरचंदांची आहे का हे तपासून पाहीन. पण प्रशिक्षण व बंदुकीची क्षमता ही दोन मुख्य कारणं सापडल्यावर आफ्रिकेतलं हवामान वा रेखांश ही कारणंदेखील तपासण्याच्या भानगडीत पडणार नाही.

शेवटी नक्की दोन्ही बाजूला संत्रीच आहेत ही खात्री मी कशी करून घेतो हे मला माहीत नाही. पण ढोबळपणे एखाद्या विशिष्ट क्षमतेसाठी जनुकं व संस्कार या दोन्हींचा सहभाग असतो हे तत्व मी वापरतो असं दिसतं. त्यामुळे एकावर भर दिला असेल तर दुसरीकडे देखील खोदून पाहातो.

हे स्पष्टीकरण पुरेसं आहे की नाही माहीत नाही. अधिक चर्चा अवांतर होईल बहुधा. स्वतंत्रपणेच करू.

श्रावण मोडक's picture

13 Sep 2010 - 3:51 pm | श्रावण मोडक

स्टॅटिस्टिकल फॅलसी म्हणजे काय हेच मुळात मला माहिती नाही. या शब्दद्वयाचा मी कुठं तरी वापर झालेला पाहिला होता. तुम्ही जे लिहिलं त्यानंतर थोडं गुगल केलं. तेव्हा विकीपीडीयाचा एक दुवा मिळाला, इतरही दुवे आहेत. अर्थात, त्याचा मी काही अभ्यास केला नाहीये. तेव्हा ते इथं लागू होतं की नाही माहिती नाही.
हे लिहिताना धनंजय अभ्यास करून ज्ञानात भर टाकेल असा एक अंतस्थ हेतू आहेच हे इथंच कबूल करून टाकतो.

विकास's picture

13 Sep 2010 - 9:20 pm | विकास

"स्टॅटिस्टिकल फॅलसी" म्हणजे इंग्रजीत मी statistical fallacy असे गृहीत धरले आहे. हा शब्द प्रचलीत असावा कारण थोडेसे "हुषार गुगल" गुगलल्यावर अनेक संशोधनात्मक निबंधांचे दुवे मिळतात ज्यामध्ये हा शब्द वापरला गेलेला आहे.

त्याव्यतिरीक्त रोजच्या वापरातील विकीमध्ये, "When the statistical reason involved is false or misapplied, this constitutes a statistical fallacy." असे म्हणलेले आहे.

बाकी मूळ चर्चेसंदर्भातः आलेखांवर आधारीत (त्यातील माहीती किती पूर्ण/अपूर्ण वगैरे वाद सोडून) जर विचार केला तर असे म्हणता येईल की चांगले लेखन करणार्‍यांची संख्या ही निधर्मी समजणार्‍यांच्या मधे तुलनात्मकरीत्या जास्त आहे. मात्र याचा उलट अर्थ (१) प्रत्येक निधर्मी हा चांगले लेखन करू शकतो अथवा (२) प्रत्येक चांगले लेखन हे निधर्मी व्यक्तीचेच असते असा होऊ शकत नाही. म्हणून चर्चेचे शिर्षक, "निधर्मीपणाचे अनपेक्षित फायदे?" हे विशेष पटत नाही.

उद्या असा फायदा आहे असे गृहीत धरून जर कोणी धार्मिक, निधर्मी बनला तर त्यामुळे तो चांगला लेखक होऊ शकणार नाही. फक्त अंधश्रद्धाळूच ठरेल. ;)

काही लोक हा शब्दप्रयोग वापरतात, खरे. पण हा उपयोग गोंधळात पाडणारा आहे.

तुम्ही दिलेल्या गूगल स्कॉलर दुव्यावरचे काही लेख तपासले. लेखांमध्ये स्टॅटिस्टिक्स वापरायच्या आधी किंवा नंतर "लॉजिकल फॅलसी"चीच उदाहरणे आहेत.

अर्थात कधीकधी असे घिसाडघाईने केलेले प्रयोग रूढ होतात, आणि मूळ अर्थच विसरला जातो. ऑक्सिजन म्हणजे मूळ अर्थाने "आम्ल बनवणारा". आता तो अर्थ नाहिसा होऊन "एक विवक्षित वायू" हाच अर्थ रूढ झालेला आहे. रूढ झाल्यानंतर मीसुद्धा "ऑक्सिजन" या नव्या अर्थानेच वापरतो. "ऑक्सी" हा शब्दच इंग्रजीमधून नाहिसा झाल्यामुळे हे सोपे आहे.

पण "लॉजिकल", "स्टॅटिस्टिकल" आणि "फॅलसी" हे तीन्ही शब्द इंग्रजीत उपयोगात आहेत. म्हणून स्टॅटिस्टिक्सच्या गणिताच्या आगेमागे झालेल्या "लॉजिकल फॅलसी" ऐवजी "स्टॅटिस्टिकल फॅलसी" म्हटले, तर गोंधळच होणार. जमल्यास गोंधळ टाळावा, असे माझे मत आहे. आगेमागे "लॉजिकल", "स्टॅटिस्टिकल" आणि "फॅलसी" हे तीन्ही शब्द इंग्रजीतून नाहिसे झाले ("ऑक्सी"सारखे) आणि "स्टॅटिस्टिकल फॅलसी"ला काहीतरी रूढार्थ प्राप्त झाला, तर मी तो शब्दप्रयोग त्या रूढार्थाने जरूर वापरेन.

मी वापरतो, त्या स्टॅटिस्टिक्सच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हा शब्दप्रयोग सापडत नाही.

विकीवरचा दुवा तपासला. त्याचे शीर्षकही "संख्याशास्त्राचा दुरुपयोग" (Misuse of Statistics) असे आहे.

दुव्यावरून असे दिसते, की काही लोक याला "संख्याशास्त्रातील तर्केदुष्टता" (statistical fallacy) असेही म्हणतात. हा शब्दप्रयोग मला नाहक गोंधळात पाडणारा वाटतो. "दुरुपयोग" आणि "तर्कदुष्टता" यांच्या अर्थात जो फरक आहे, तो दुर्लक्ष करण्यालायक नाही.

- - -
एक उदाहरण घेऊया :
द्रोण युधिष्टिराला विचारतो : "अश्वत्थामा मेला काय?"
युधिष्टिर उत्तर देतो : (मोठ्याने) मेला, (अस्पष्टपणे) तो मनुष्य असेल किंवा हत्ती असेल.
या लबाडीचे संस्कृत भाषेतले वाक्य प्रसिद्ध आहे : "नरो वा कुंजरो वा"

आता येथे लबाडी झाली हे सर्वमान्य आहे. लबाडीने संस्कृत भाषेचा वापर केला (misuse of संस्कृत) असे आपण म्हणू शकतो. वाटल्यास "किंवा" शब्दाचा लबाड उपयोग केला असे म्हणू शकतो (misuse of logic). वाटल्यास आवाज कमीजास्त करू शकतो त्या घशातील स्वरयंत्राचा लबाड उपयोग केला, असे म्हणू शकतो (misuse of larynx). मात्र या प्रकाराला "संस्कृताची तर्कदुष्टता"/"संस्कृताचा खोटेपणा"; "तर्कशास्त्राची तर्कदुष्टता"/"तर्कशास्त्राचा खोटेपणा" ; "स्वरयंत्राची तर्कदुष्टता"/"स्वरयंत्राचा खोटेपणा" म्हणू नये, असे मला वाटते. असे म्हटल्यामुळे गोंधळ होईल, तथ्य काय ते समजणार नाही.

- - -
आता दुव्यावरील उदाहरणे बघूया :
१. Discarding unfavorable data: (आपल्याला आवडत नाही ती सामग्री टाकून देणे) आता यात संख्याशास्त्राचे काय देणेघेणे? जर दुकानदाराने मोडकी खेळणी मोजली नाहीत, आणि मग म्हटले - दुकानातली सगळी खेळणी सुस्थितीत आहेत, तर "मोजणे"/"बेरीज"/"अंकगणित" यांपैकी कुणाचाच दोष नाही.
२. Loaded questions: (भावनेला साद घालून विशिष्ट उत्तरे मिळवणारे प्रश्न) आता याचा संख्याशास्त्राशी काय संबंध आहे?
३. Overgeneralization: अती सामान्यीकरण : याचाही संख्याशास्त्राशी संबंध नाही. समजा मी संत्र्यांचे निरीक्षण करून बघितले ५०% शेंदरी होती, ५०% पिवळी होती. आणि मी अती-सामान्यीकरण करून म्हटले सफरचंदेसुद्धा ५०% शेंदरी, ५०% पिवळी. तर चूक झाली, खरी. संख्याशास्त्रात "संत्र्याच्या ठिकाणी सफरचंदांचे सामान्यीकरण करा" असे काहीच नसते. मग ही चूक संख्याशास्त्रातली कशी म्हणावी?
...वगैरे, वगैरे...

- - -
सारांश : वरील उदाहरणांत जो खोटेपणा येतो, तो संख्याशास्त्राच्या बाहेरचा आहे. खोटेपणाची पायरी थेट सांगता आली तर बरेच. पण खोटी पायरी संख्याशास्त्रात नसताना काही लोक घिसाडघाईने "संख्याशास्त्रातला खोटेपणा किंवा तर्कदुष्टता" म्हणतात. यातून नाहक गोंधळ होऊ शकतो - वाटू शकते की संख्याशास्त्रातले गणित चुकले. म्हणून हा शब्दप्रयोग टाळावा.

अप्पा जोगळेकर's picture

12 Sep 2010 - 1:29 pm | अप्पा जोगळेकर

अमुक लिखाण नेटकं आहे आणि अमुक लिखाण नेटकं नाही यासाठीचे निकष ज्यांनी ठरवले ते धार्मिक होते की निधर्मी होते यावर हा सर्वे अवलंबून आहे. कोणतं लिखाण नेटकं आहे आणि कोणतं नाही याचे कोणते निकष लावले गेले यावर कोणी प्रकाश टाकू शकेल का ?

चिंतातुर जंतू's picture

12 Sep 2010 - 11:54 pm | चिंतातुर जंतू

अमुक लिखाण नेटकं आहे आणि अमुक लिखाण नेटकं नाही यासाठीचे निकष ज्यांनी ठरवले ते धार्मिक होते की निधर्मी होते यावर हा सर्वे अवलंबून आहे. कोणतं लिखाण नेटकं आहे आणि कोणतं नाही याचे कोणते निकष लावले गेले यावर कोणी प्रकाश टाकू शकेल का ?

नेटक्या लिखाणासाठी जे निकष डेटिंग संकेतस्थळाच्या पृथक्करणासाठी वापरलेले आहेत ते प्रमाण निकषांपैकी एक आहेत. मी दिलेल्या दुव्यावर त्या निकषांविषयीच्या माहितीचा (बहुधा विकीपिडीआवरचा) दुवा दिलेला आहे. निकष प्रमाण असल्यामुळे त्यांचा धार्मिकतेशी मूलतः संबंध अजिबात नाही.

इन्द्र्राज पवार's picture

12 Sep 2010 - 2:30 pm | इन्द्र्राज पवार

"त्यातल्या त्यात स्वतःला निधर्मी/नास्तिक म्हणवणारे इतरांपेक्षा अचूक लेखन करतात असं म्हणता येईल."

~~ या मुद्द्याला अनुसरून मानवाने केलेल्या (काळा/गोरा फरक बाजूला ठेवून) शैक्षणिक आणि भौतिक प्रगतीचा आलेख जर कुणी काढला तर हे निश्चितच दिसून येईल की निधर्मी/नास्तिक म्हणविणार्‍यांनीदेखील विलक्षण बुद्धिमत्तेचा आविष्कार आपापल्या क्षेत्रात दाखविला आहे/दाखवित आहेत.

निधर्मी/नास्तिक म्हणूनच आयुष्य जगलेली/जगत असलेल्या काही व्यक्ती.
उदा. : (ही उदाहरणे फक्त 'लेखन' क्षेत्रातीलच नाहीत तर जीवनाच्या अनेक घटकांना स्पर्श करणारी आहेत.) अ‍ॅण्ड्र्यू कार्नेजी (जगप्रसिद्ध पोलाद व्यावसायिक), इव्हान पाव्हलोव (१९०४ चे मेडिसिनचे नोबेल विजेते), सिग्मंड फ्राईड (मानसशास्त्रज्ञ), रिचर्ड स्ट्रॉस (जर्मन संगीतकार), सर बर्ट्रान्ड रसेल (सुप्रसिद्ध तत्वज्ञानी), लिनस पॉलिंग (केमिस्ट, दोनवेळा नोबेल विजेतेपदाचा सन्मान), अईन रॅन्ड ('अ‍ॅट्लास श्रग्ड' या जगप्रसिद्ध कादंबरीची लेखिका), कॅथरिन हेपबर्न (४ वेळा 'बेस्ट अ‍ॅक्ट्रेस' चे ऑस्कर पटकाविणारी एकमेव अभिनेत्री), पद्मविभूषण डॉ.सुब्रह्मण्यम चन्द्रशेखर (फिजिक्समधील नोबेल विजेते), जेम्स वॅटसन (फिजिओलॉजी व मेडिसिनमध्ये नोबेल), वॉरेन बुफेट (फोर्ब्सने गौरविलेली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती), कार्ल सेगन (अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान विषय लेखणी व टीव्हीमाध्यमाद्वारे सर्वसामान्यामध्ये लोकप्रिय करणारी एक सुप्रसिद्ध व्यक्ती), ब्रुस ली (कूंग फू खेळाडू, अभिनेता), स्टीफन हॉकिंग (अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम चे लेखक, गणितज्ज्ञ), जोडी फॉस्टर (हॉलीवूड अभिनेत्री, दोन ऑस्कर्स), ~~ शिवाय या यादीत बसणारे सर्वात तरूण आणि कॉम्प्युटर इंटरनेट नात्यात अविश्वसनीय क्रांती घडवून आणणारे नाव : मार्क झुकरबर्ग "फेसबुक" चा कर्ता, वय २६. (ही यादी तशी खूप मोठी आहे, पण विविधता दर्शविण्यासाठी इतकी उदाहरणे पुरेशी ठरावित.)

अर्थात याचा अर्थ असा बिलकुल नाही की जे धार्मिक/आस्तिक आहेत त्यांनी जगाच्या प्रगतीत भर टाकलेली नाही (त्यांची यादीही हनुमानाच्या शेपटीप्रमाणे लांब असेल). वरील उदाहरणे फक्त वानगीदाखल आहेत आणि ती एवढ्यासाठीच की अमुक एक व्यक्ती नास्तिक आहे म्हणजे मानवी प्रगतीला खीळ आहे की काय असा समज कुठे पसरू नये.

इन्द्रा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Sep 2010 - 12:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इंटरेस्टींग धागा आणि चर्चा! वाचत आहे.

चिंतातुर जंतू's picture

13 Sep 2010 - 2:42 pm | चिंतातुर जंतू

निधर्मीपणा आणि नैराश्यः बहुगुणी, Nile, इंद्रा वगैरेंप्रमाणे माझाही अनुभव असं सांगतो की निधर्मींमध्ये नैराश्याचं प्रमाण कमी असतं. पण अधिकृत विदा मात्र नाही. मीही माझ्या मित्राशी इंद्रा म्हणतात त्यानुसार वाद घातला होता.

इंद्रा यांच्या दुसर्‍या उदाहरणात दिलेले सापेक्ष फायदे-तोटे (गणपतीला पुख्खा झोडायला मिळालेलं आमंत्रण स्वीकारून आरतीला उभा न राहणारा निधर्मी): हे एखाद्या गटात/जनसमूहात वेगळा पडणारा कुणीही अल्पसंख्य आणि तो (बहुसंख्य) गट/जनसमूह यांच्या वाट्याला येतात. उदा: जेवायला घरी आलेले सर्व मित्र दारूपान/मांसाहार करत असतील पण एकजण ते करत नसेल, तर ज्या सहजतेनं त्या वेगळ्या, अल्पसंख्य माणसासाठी सरबत किंवा शाकाहारी पदार्थ बनवला जाईल, तितक्याच सहजतेनं निधर्मी माणसाचं आरती न करणं समजून घेतलं तर काही प्रश्न येणार नाही. जिथं 'तू इतरांसारखंच वागलं पाहिजेस' असा दुराग्रह येतो, तिथं क्लेश सुरू होतात. घरी येणार्‍या एखाद्याचं शाकाहारी असणं आपण जसं घेऊ तितक्याच मोकळेपणानं हे घेतलं जावं असं वाटतं. एकंदरीत, इंद्रा यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा धर्माशी संबंधित नाही असं वाटतं.

माणसं समजून घेणं: मला पडलेला प्रश्न - धार्मिकतेचं प्रस्थ/स्तोम जिथे कमी आहे अशा देशांत ज्यांचा धर्म आपल्याहून वेगळा आहे अशा 'इतरां'विषयी ('The other' अशा अर्थानं) समंजसपणा, ज्ञान असण्याची शक्यता अधिक असेल का? आणि इंद्रा यांचं स्वानुभवावरून त्या प्रश्नाला येणारं 'हो' असं उत्तर पाहता मला पुढे असा प्रश्न पडला:

जगातल्या अनेक प्रमुख धर्मविचारांमध्ये एक मानवतावाद अंतर्भूत आहे (शेजार्‍यावर प्रेम करा; सद्वर्तनी माणसाला मोक्ष/स्वर्गप्राप्ती होते, वगैरे). याउलट धार्मिक लोकांकडून विज्ञानावर अशी टीका होते की विज्ञान हे मूल्यहीन (Amoral) आहे. हे पाहाता, अधिक समंजसपणाचा, माणसाला समजून घेण्याचा निधर्मीपणाशी जर असा संबंध असेल, तर हे जगभरातल्या धर्मविचारांचं एक मोठं अपयश नव्हे का?

इथे माझा प्रश्न हा अदिती आणि मी यांच्या स्वानुभवांवर आधारित होता; इंद्रा यांचं उत्तर हेही त्यांच्या स्वानुभवावर आधारित आहे. कोणताही विदा देण्यात आलेला नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठी थोडं खोदलं तर मी आधी दिलेल्या दुवा क्र. १ च्याच सर्वेक्षणाच्या आधारानं काढलेले इतर निष्कर्षही सापडले: उदा: समलैंगिकता, विभक्त कुटुंबं, 'लिव्ह-इन' नातेसंबंध इत्यादिंविषयी ब्रिटिश लोक पूर्वीहून आज अधिक समंजस आहेत असा हा विदा सापडला.

अर्थात, धनंजय आणि घासकडवी यांची चर्चा वाचलीत तर हे लक्षात येईल की या दोन गोष्टींमध्ये (अधिक समंजसपणा आणि कमी धार्मिकता) परस्परसंबंध आहे असं सिध्द करणं शक्य असेल, पण निधर्मीपणा हे कारण आणि अधिक समंजसपणा हा परिणाम हे सिध्द करता येणार नाही (म्हणूनच मी लेखाच्या शीर्षकात प्रश्नचिन्ह वापरलं होतं).

इन्द्र्राज पवार's picture

13 Sep 2010 - 4:37 pm | इन्द्र्राज पवार

"इंद्रा यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा धर्माशी संबंधित नाही असं वाटतं."

~~ हे मान्यच; कारण तसा माझाही हेतू नव्हता, नाही. प्रश्न आहे तो व्यक्तीने कंठावयाच्या सामाजिक जीवनशैलीचा ! म्हणजे असे की, एखाद्याच्या मनातील निधर्मीपणाच्या/निरिश्वरवादी प्रणालीला ढाळ लावण्यासाठी दुसरा त्याला/तिला घरी आमंत्रित करीत नसतो (किंबहुना अशा आमंत्रणाच्यावेळी एखाददुसर्‍या मित्राला पंगतीला सणानिमित्य जेवायला बोलवावे असा आपला पायंडा असतोच. हा रूमवर एकटाच होता आणि एरव्ही खानावळीत जावून जेवणार त्यापेक्षा 'मोरया' निमित्ताने आमच्याकडेच जेवेल इतपतच निमंत्रणामागील भावना. शिवाय मुसलमानाच्या घरी ईदला 'गणपा' स्टाईलचा शीरखुर्मा खाल्ला म्हणून मोहनलालचा मिय्यालाल होतो असेही मानण्याचे काही कारण नसते); अशावेळ ही निधर्मी व्यक्ती 'निधर्मी' आहे हे ज्येष्ठांना सांगण्यात काहीच हशील नसते, त्यामुळे आरतीला ज्यावेळी पुकार दिली जाते त्यावेळी हे गृहितच धरले जाते की, हजर असणारी प्रत्येक व्यक्ती (आरती म्हणणार नसली तरी....) साथ देणारच. [मी परत लिहितो की, ही अपेक्षा 'धार्मिक' नसून समाजात राहण्यासाठी अंगीकारलेली एक नाळ आहे जी कधीच तुटली जात नाही.]

~~ इथे अदितीने वरील प्रतिसादात दिलेली "स्ट्रॅटेजी" मला भावते. बस्स दोनतीन मिनिटात आटोपणार्‍या आरतीत पुटपुटणे केले तर ना तिच्या निरिश्वरवादी संकल्पनेवर आकाश कोसळेल, ना दुसरीकडे त्या परंपरावादी यजमानाच्या भृकुट्या वर जातील. हा एक खुष्कीचा मार्ग आहे जो दोन्ही घटकांना सोयीचा (आणि समाधानाचा) वाटू शकतो. अदितीने फुले वाहणे, नमस्कार करणे या गोष्टी खुबीने टाळल्या, मग हेच काम माझा मित्रही (जो समाजशास्त्रातील एम.ए. आहे) करू शकला असता. इतपत लवचिकता त्याने दाखविली असती तर त्याच्यावर कुणी तत्वच्युतीचा आरोप नक्कीच केला नसता. त्याने ते केले नाही म्हणजे मग नेमके याने कुठल्या समाजशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यास केला?

इन्द्रा

ज्ञानेश...'s picture

13 Sep 2010 - 6:28 pm | ज्ञानेश...

इथे अदितीने वरील प्रतिसादात दिलेली "स्ट्रॅटेजी" मला भावते. बस्स दोनतीन मिनिटात आटोपणार्‍या आरतीत पुटपुटणे केले तर ना तिच्या निरिश्वरवादी संकल्पनेवर आकाश कोसळेल, ना दुसरीकडे त्या परंपरावादी यजमानाच्या भृकुट्या वर जातील...

अदितीने (हे फक्त उदाहरणार्थ, बरंका) समजा नमस्कार करून फुले वाहिली असती, तर तिच्या निरिश्वरवादी संकल्पनेवर आकाश कोसळले असते का?
आरतीला उभे न राहणे= भडक नास्तिकवाद
आरती म्हणणे+ फुले न वाहणे= मध्यम/मानवतावादी/स्वीकारार्ह नास्तिकवाद
आरती म्हणणे+फुले वाहणे+प्रसाद टाळणे= सौम्य नास्तिकवाद
आरती म्हणणे+फुले वाहणे+प्रसाद खाणे+......=............
या गोष्टीला अंत नाही.

आपल्या श्रद्धांच्या/निष्ठांच्या/विश्वासांच्या सामाजिक प्रकटीकरणाचे निकष व्यक्तीपरत्वे बदलत राहतील, आणि कुठल्या पायरीवर कोणी थांबावे हे आपण ठरवू शकत नाही.

याठिकाणी 'आहे मनोहर तरी'मधला एक किस्सा आठवतो.

भाई आणि सुनीताबाई- दोघेही कट्टर निरिश्वरवादी. सुनीताबाईंच्या आईने घरी सत्यनारायणाची पूजा घातली. (आपला विवेक माळ्यावर ठेऊन) पूजेला बसण्यासाठी सुनीताबाईंनी स्वच्छ नकार दिला. याउलट भाई 'त्यांना वाईट वाटू नये म्हणून' पूजेला बसले, आणि शेवटी सुपारीच्या जोडीने पूजा संपन्न झाली !

मला नाही वाटत या कृतीने पुलंच्या निरिश्वरवादाला (किंवा सुनीताबाईंच्या सह्रदयतेला !) कुठलीही बाधा आली असेल म्हणून !

चिंतातुर जंतू's picture

13 Sep 2010 - 5:52 pm | चिंतातुर जंतू

बस्स दोनतीन मिनिटात आटोपणार्‍या आरतीत पुटपुटणे केले तर ना तिच्या निरिश्वरवादी संकल्पनेवर आकाश कोसळेल, ना दुसरीकडे त्या परंपरावादी यजमानाच्या भृकुट्या वर जातील. हा एक खुष्कीचा मार्ग आहे जो दोन्ही घटकांना सोयीचा (आणि समाधानाचा) वाटू शकतो.

पण मग हाच निकष लावून तुम्ही असंही म्हणाल का, की तुमच्या घरी आलेल्या शाकाहारी माणसानं मटणाच्या रश्श्यातल्या मांसाच्या तुकड्यांना वगळून फक्त रस्सा पोळीशी खावा, म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी वेगळं जेवण बनवावं लागणार नाही आणि त्याच्या शाकाहारीपणावर आभाळही कोसळणार नाही?

थोडक्यात, अदिती स्वतःच्या तत्त्वांना मुरड घालून थोडी तडजोड करत असतील तर तो त्यांच्या मनाचा मोठेपणा (आणि निधर्मी माणसाचा समंजसपणा) आहे. पण मला वाटतं यात मुद्दा असा आहे की बहुसंख्यांहून वेगळ्या अशा माणसांना समजून घेणं हा जो प्रगत युरोपिअन समाजाचा गुण आपण उल्लेखनीय म्हणून मान्य करतो आहोत, तो ते आपल्याला एक 'भारतीय वंशाचे', म्हणून त्यांच्या देशात आपण अल्पसंख्य असे असूनही समंजस वागणूक देत आहेत असा आहे. म्हणून, हाच मुद्दा उलट करून तुमच्या आरतीच्या उदाहरणाला लावता येईल. म्हणजे तुमच्या घरातल्या सर्व लोकांहून वेगळा माणूस तुमच्याकडे येईल तेव्हा त्याला समजून घेण्यासाठी तुम्ही अधिक कष्ट घ्याल, की त्यानं त्याच्या तत्त्व-विचारांना आणि व्यक्तिमत्वाला मुरड घालून आपल्यासारखं वागावं अशी अपेक्षा ठेवाल? म्हणजे एक उल्लेखनीय गुण हा अनुकरणीयही होईल का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Sep 2010 - 6:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि निधर्मी माणसाचा समंजसपणा

माझ्या एका अज्ञेयवादी मित्राचा 'ड्वायलॉक' आठवला, "'धर्म' कोणताही असो, नवा बाटगा जास्त कडवा असतो!"
(या वाक्याचा संदर्भ, दोनेक वर्षांपूर्वी कांदा-लसूण न खाणार्‍या, रोज देवपूजा करून टिळा लावून फिरणार्‍या मुलाने आता टॅक्सीतल्या सहप्रवाश्याशी 'देव नाहीच्चे' या बाजूने जोरदार वाद घालण्याबद्दल होता.)
माझ्या मित्राच्या निरीक्षणाशी मी सहमत आहे.

आणखी एक मित्र: स्वतः शाळेत प्रार्थना सुरू असताना भिंतीकडे तोंड उभं करून र्‍हायचा, स्वतःच्या बायकोचं निरीश्वरवादी व्यक्तीत 'धर्मांतर' केलं, तोच आता त्याच्या स्वतःच्या मुलाला, आजी-आजोबा (मित्राचे आईवडील) 'देवबाप्पा काय' हे सांगतात तेव्हा शांतपणे हसत उभा असतो. मित्राच्या मुलाची लक्षणं (वय वर्ष तीन, सव्वातीन) आत्ताही अज्ञेयवादाकडे जातील अशीच (आम्हालातरी) वाटतात.

शुचि's picture

14 Sep 2010 - 4:46 am | शुचि

माझ्या नवर्‍याच्या युनिव्हर्सिटीमधे एक तरुण चीनी मुलगा नुकताच ख्रिश्चन झाला होता आणि तो काळ-वेळ, स्थळ न पाहता त्याच विषयावर बोलत असे.

त्यावेळी मी देखील हे वाक्य ऐकलेले होते की नवधर्मांतरीत लोक हे जास्त कडवे असतात.

मला वाटतं त्यामागचं कारण हे असू शकतं की - नवीन धर्मांतरीत व्यक्ती ही नव्याने स्वतःचा शोध घेत असते. दुसर्‍याला स्वतःची मतं पटवून देणं हा स्वतःच्या निर्णयावर ती शिक्का-मोर्तबच करत असते. स्वतःचा निर्णय बरोबर कसा हे स्वतःला पटवणं कमालीचं महत्त्वपूर्ण होऊन बसतं त्यांच्याकरता. कारण धर्म बदलणं ही मामुली गोष्ट नाही, झपाटल्याशिवाय ती शक्य नाही.

विकास's picture

14 Sep 2010 - 8:25 am | विकास

मला वाटते मूळ इंग्रजी म्हण, "converts are more catholic than Pope" अशी आहे. मराठीतील त्याचे मला माहीत असलेले, वृत्तपत्रांत वाचलेले (अंमळ कडवट) रूप, "बाटगे हे जास्त कडवे आणि कोडगे असतात", असे आहे.

बाकी वरील अदितीच्या आणि शुचिंच्या प्रतिसादाशी सहमत. कुठल्याही अर्थाने आणि कारणाने बाटलेली व्यक्ती आपला निर्णयच कसा बरोबर हे दाखवण्यासाठी धडपड करत असते. ते केवळ एका धार्मिक पद्धतीतून दुसर्‍या धार्मिक पद्धतीत जाणार्‍यांचेच होते अशातला भाग नाही तर अचानक निधर्मी होणार्‍यांचे पण होऊ शकते. (कदाचीत म्हणूनच हिंदू धर्मात मुळात धर्मांतराची प्रथा नसावी).

अर्थात हे देखील खरे आहे की काही वेळेस प्रामाणिकपणे खूप विचारांती स्वतःला पटून माणसे बदलतात. हे केवळ निधर्मी होणार्‍यांसाठीच नाही तर धर्मांच्या संदर्भात पण लागू आहे.

इन्द्र्राज पवार's picture

14 Sep 2010 - 9:47 am | इन्द्र्राज पवार

"वृत्तपत्रांत वाचलेले (अंमळ कडवट) रूप, "बाटगे हे जास्त कडवे आणि कोडगे असतात", असे आहे."

~~ याच्याहीपेक्षा दाहक आहे दुसरे रूप, जे सहसा वृत्तपत्रांत येत नाही : "बाटग्याची बांग आणि उंडगीचं कुंकु ढळढळीत असते".

त्याचबरोबर अदितीच्या आणि शुचिंच्या प्रतिसादाशी सहमती व्यक्त करता करता मी म्हणतो की अशाही काही धर्मांतरीत व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी निव्वळ आकाशातील बाप काय सांगतो ते पुस्तकात वाचायचे आणि परत पोटपुजेला लागायचे असे न करता आपल्या आजुबाजूला असलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी, त्यातून, काय चांगले कार्य करता येईल, हे प्रकर्षाने पाहिले. ठळक उदाहरण पंडिता रमाबाई. मिशनमधील बायकांनी स्वयंभू बनावे यासाठी त्यांनी स्वत: इंग्लंडमध्ये छ्पाईच्या कामाचे शिक्षण घेतले (सन १८८०) आणि केडगावला परतल्यावर स्वत:चा छापखाना त्या काळात सुरू करून मिशन इनमेट्सना त्या संदर्भातील सर्व तांत्रिक शिक्षण दिले. त्या सर्व स्त्रिया इतक्या तरबेज झाल्या की, खुद्द ज्ञानकोशकार केतकरांनी "आपल्याकडील छपाईच्या कामासाठी मिशनच्या ट्रेनींना पाठवा" असे पत्र रमाबाईंना पाठविले होते.

अशा धर्मांतराला काहीतरी अर्थ.....नाहीतर 'खीर मिळते म्हणून खराट्याची खरखर' करणारेच जास्त !

इन्द्रा

नितिन थत्ते's picture

14 Sep 2010 - 9:41 am | नितिन थत्ते

उलट कॅटेगरी पण असते. निधर्मी असून नंतर अध्यात्माकडे वळलेल्यांची.

शिवाय एक कॅटॅगरी असते तरुणपणी समतावादी (समाजवादी, कम्युनिस्ट इत्यादि) विचारसरणीचे लोक प्रौढपणी (स्वत: सिस्टिममध्ये एस्टॅब्लिश झाल्यावर) मार्केटवादी/गुणवत्ताधारित भेदवादी होतात त्यांची.

कोणत्याही एका विचारसरणीचा, ती धार्मिक/ अधार्मिक असो की आर्थिक विचारसरणी संदर्भात असो. बाटगा जास्त कडवा असतो हे खरेच.

आपले परिवर्तन हे फॅड नसून 'विचारपूर्वक' झाले आहे हे सिद्ध करणे ही त्यांची गरज असते.

विकास's picture

14 Sep 2010 - 6:49 pm | विकास

समतावादी (समाजवादी, कम्युनिस्ट इत्यादि) विचारसरणीचे लोक प्रौढपणी (स्वत: सिस्टिममध्ये एस्टॅब्लिश झाल्यावर) मार्केटवादी/गुणवत्ताधारित भेदवादी होतात

स्वतः सिस्टीममध्ये एस्टॅब्लीश झाल्यानंतर टोकाचे बदलणारे भरपूर माहीत आहेत. पण कदाचीत सिस्टीम मध्ये एस्टॅब्लीश होण्याआधी बदलले एक मोठे उदाहरण म्हणजे नारायण मुर्तींचे आहे असे वाटते.

ऐकीव माहीतीप्रमाणे विदर्भातील प्राध्यापक एम जी बोकारे हे कधीकाळी पॉलीटब्युरोचे सदस्य होते, अर्थातच कम्युनिस्ट होते. तरी देखील रा.स्व. संघाच्या दत्तोपंत ठेंगडींबरोबर काम करून भारतीय अर्थशास्त्रावर पुस्तक लिहीलेच आणि त्याला स्वहट्टाने हिंदू इकॉनॉमिक्स असे नाव दिले. अर्थात यात ते काही निधर्मीचे धार्मिक झाले नव्हते पण कदाचीत स्वतःचे मूळ तात्विक विचार पूर्ण न सोडता अथवा सोडून खुल्या मनाने दुसरी बाजू बघितली असावी. (हिंदू इ़कॉनॉमिक्स मी वाचले नसल्याने त्यावर कुठल्याच बाजूने भाष्य करत नाही आहे). लहानपणी संघात जाऊन मोठेपणी कम्युनिस्ट झालेले देखील आहेतच.

चतुरंग's picture

13 Sep 2010 - 10:55 pm | चतुरंग

मी मदिरापान करीत नाही त्यामुळे मला नेहेमी अनुभवास येणारी एक गोष्ट - कोणत्याही ओल्या पार्टीत गेलो की मला हमखास आग्रह होतो घे, घे असा. मग मी दारु पीत नाही असे सांगतो. मग पिण्यात काहीही वाईट नाही, माफक प्रमाणात दारु शरीराला कशी चांगली असते, रोज थोडी घेणार्‍याला हृदयविकारापासून कसे संरक्षण मिळते, तू घेऊन बघ म्हणजे कळेल इ.इ. उपदेश आणि ब्रेनवॉशिंग सुरु होते! :)
मी म्हणतो की तुम्ही घेता त्याबद्दल मला काहीच म्हणायचे नाहीये फक्त मी घेत नाही एवढेच माझे म्हणणे आहे तर तुम्ही समर्थन कशाला देताय? (माझ्या मते तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल न्यूनगंड असेल/काही कमीपणाची/अयोग्य असल्याची भावना असेल तर नकळतच त्याचे समर्थन दिले जाते.) तर हे सगळे झाल्यावर मी हसतो आणि माझा ज्यूसचा ग्लास पुन्हा भरुन घेतो! :)

(ज्यूसटोटलर)चतुरंग

विकास's picture

14 Sep 2010 - 8:26 am | विकास

तर हे सगळे झाल्यावर मी हसतो आणि माझा ज्यूसचा ग्लास पुन्हा भरुन घेतो!

म्हणूनच तुम्हाला विडंबन करणे जमत असावे. :-)

इन्द्र्राज पवार's picture

13 Sep 2010 - 11:07 pm | इन्द्र्राज पवार

"तुमच्या घरी आलेल्या शाकाहारी माणसानं....."

(१) ~~ श्री.चिंजं, इथं तुम्ही दोन विधानांच्या सत्यतेबाबत एकमेकाशी सांगड घालून 'विचार' आणि 'व्यवहार' यांची गल्लत करीत आहात असे मला प्रामाणिकपणे वाटते. आरती म्हणणे (वा ना म्हणणे..) हा एक विचार आहे, जो मानलाच पाहिजे असे नाही. मी आरती म्हणतो म्हणजे मी कट्टर धार्मिक असून हिंदू धर्माच्या उद्धरणासाठी प्रसंगी शूळावर देखील जाईन असा बिलकुल अर्थ होत नाही, तद्वतच एखाद्या निधर्मी व्यक्तीने (आपण ज्यांच्या घरी पाहुणा म्हणून गेलो आहे) त्या ठिकाणी दहा व्यक्ती वागतात त्यासारखे 'टेम्पररी' वर्तन केले म्हणून त्याचे अनुयायी वा समानधर्मीय त्याला वाळीत टाकतील असे नाही.... शेवटी हा एक 'समाजसमजुती'चा भाग आहे.

आमच्या कोल्हापुरात मध्यंतरी पिण्याच्या पाण्याची प्रचंड वानवा निर्माण झाली होती (आजही आहेच, पण बर्‍यापैकी सुधारणा झाली आहे). माझी बहिण जिथे राहते त्या एका कॉलनीमधील स्थानिक नगरसेवकाने बर्‍याच खटपटी-लटपटी करून तिथल्या लोकांसाठी पाण्याचे एक जादाचे कनेक्शन मिळविले व त्या ठिकाणी चांगला पाणी पुरवठा सुरू झाला. साहजिकच त्या नगरसेवकाच्या हस्ते कॉलनीतील लोकांनी वॉटर सप्लाय कनेक्शनची, मोटरची पूजा करून गोडधोड वाटप केले. हा प्रकार नाही म्हटले तरी हिंदू धर्मातील एका चालिरितीप्रमाणे झाला. लोक म्हणाले 'देव पावला...', पाणीही सुरू झाले. या ठिकाणी प्रश्न असा की, इथेही निधर्मी/नास्तिक म्हणविणारे एक जोडपे राहते. कट्टर आहेत मताबाबत, असेही म्हणू या. आता ज्या नळाची इतकी वाजतगाजत धार्मिक कर्मकांडानिशी पूजा घातली, गोड प्रसाद वाटण्यात आला, त्या नळातून यांच्या फ्लॅटमध्ये येणारी पाण्याची धार हे जोडपे थांबविणार काय?

अर्थातच नाही...कारण पाण्याने लोकांची कशी तंतरवली होती याचे साक्षीदार अनेकाप्रमाणे हे दोघेही होते आणि पाण्याच्या दुर्भिक्षतेच्या झळा त्यांनाही लागल्याच होत्या. म्हणजे "त्या" पूजाअर्चना झालेल्या नळातून आलेले पाणी त्यांनी अगदी आनंदाने स्वीकारले होते, मग इथे मी म्हणू का, 'राधा सुता तुझा धर्म....."? नाही म्हणणार मी, कारण मी जाणतो की मतातील तितपत 'फ्लेक्झिबिलिटी' मान्य होणारी आहे. हीच केमिस्ट्री मी मग आरतीलादेखील लावू इच्छितो.

(२) मटणाच्या जेवणाबाबत...... नाही, तो प्रकार मी कधी स्वप्नातही करणार नाही. कारण इथे 'विचारा'ला महत्व नसून 'व्यवहारा'ला आहे. एक लिंगायत मित्र जर शाकाहारी असूनसुद्धा अगदी आनंदाने आम्हा मराठ्यांच्या सामीष पार्ट्यांना (कोल्हापुरात "रस्सा मंडळ'' म्हणतात...) हजेरी लावतो, खरंतर त्याला गप्पांचा मनमुराद आनंद लुटायचा असतो, तर त्याला 'मटण खा रे...' असा आग्रह कदापिही होत नाही. त्याला पार्टीला आमंत्रण म्हणजे 'इट इज टेकन फॉर ग्रांटेड' की त्याच्यासाठी आम्हाला खास शाकाहारी ताटाची सोय करणे 'कंपल्सरी' आहे; कारण भोजनातील ती एक 'पाळणूक' आहे. उद्या त्याच्या घरी मी जेवायला गेलो (आणि जातोही..) तर मी त्याला 'मला मांसाहारी जेवणच करून घाल' असे म्हणणार नाही, कारण त्यांच्या घरातील परंपरेचा आदर करणे हे माझे कर्तव्यच आहे. दोन्ही गोष्टी या सर्व बाबी व्यवहारात येण्याच्या अगोदरच निश्चितच असल्यामुळे ना त्याला 'रस्सा पोळीशी खावा' असे सांगण्याची वेळ येते ना त्याच्या शाकाहारीपणावर आभाळ कोसळण्याचा प्रसंग येतो. सर्व व्यवहार निर्लेप मनाने चालू असतात.

"तुमच्या घरातल्या सर्व लोकांहून वेगळा माणूस तुमच्याकडे येईल तेव्हा त्याला समजून घेण्यासाठी तुम्ही अधिक कष्ट घ्याल, की त्यानं त्याच्या तत्त्व-विचारांना आणि व्यक्तिमत्वाला मुरड घालून आपल्यासारखं वागावं अशी अपेक्षा ठेवाल?"

~~ इथे थोडे वैयक्तिक पातळीवर येणे गरजेचे आहे. म्हणजे असं की, ज्या मित्राला, त्याची मते माहित असूनही, मी निमंत्रण दिले आहे तर त्याने त्यावेळी घेतलेल्या भूमिकेचा आदर करणे मला भागच आहे किंवा तुम्ही म्हणता तसे त्याला समजून घेण्यासाठी अधिक कष्ट घेईन. पण त्याचवेळी त्याच्या तत्वामुळे (त्याच्या परोक्ष) ज्येष्ठांबरोबर झालेल्या चर्चेत त्याची बाजू कशी बरोबर हेही सांगणार नाही कारण माझ्या लोकांच्या धार्मिक भावनांचा आदर करणे हेही मला पाहिलेच पाहिजे.

हा थोडासा 'पलायनवाद' झाला, पण प्राप्त परिस्थितीत याहून वेगळे वर्तन काय होईल माझ्याकडून ?

इन्द्रा

सुहास..'s picture

13 Sep 2010 - 11:33 pm | सुहास..

छातीत ' धस्स ' झाल ना प्रतिसाद वाचुन .....

'पलायनवाद' या शब्दाची व्याख्या आणी अनुभव वेगळे असतात बर का !! अर्थात 'मान्य ' करायला ......मध्ये दम असावा लागतो

चिंतातुर जंतू's picture

14 Sep 2010 - 12:13 am | चिंतातुर जंतू

इथं तुम्ही दोन विधानांच्या सत्यतेबाबत एकमेकाशी सांगड घालून 'विचार' आणि 'व्यवहार' यांची गल्लत करीत आहात असे मला प्रामाणिकपणे वाटते.

त्या ठिकाणी दहा व्यक्ती वागतात त्यासारखे 'टेम्पररी' वर्तन केले म्हणून त्याचे अनुयायी वा समानधर्मीय त्याला वाळीत टाकतील असे नाही.... शेवटी हा एक 'समाजसमजुती'चा भाग आहे.

मी मांसाहार आणि आरती या दोन गोष्टींची सांगड घातली कारण या दोन्ही प्रकारच्या उदाहरणांत तुम्हाला योग्य वाटणार नाही असं वागणारी माणसं मी पाहिली आहेत. म्हणजे संघर्ष/कटकट टाळण्यासाठी अदितीसारखी वेळप्रसंगी थोडी तडजोड करून न आवडणार्‍या वा न पटणार्‍या अन्नपदार्थांनी आपलं पोट भरणारी माणसं मी पाहिली आहेत - उदा: पुण्यात कधीही मांसाहार न करणारी, काठापदराचं लुगडं नेसणारी ब्राह्मण स्त्री युरोपात काही वर्षं राहायला गेली (हा १९५०-६० चा काळ होता). अनेक ठिकाणी जवळजवळ आश्रित म्हणून राहिली. प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या शाकाहारीपणाचं स्तोम माजवण्याऐवजी जे पानात पडलं ते खाल्लं (गोमांसदेखील). काही वर्षांनी पुण्यात परत आल्यावर मात्र कधीही मांसाहार केला नाही. हे सर्व अगदी शांतपणे, कसलीही तक्रार न करता किंवा हातून काही पाप घडलं आहे अशा विचारानं अपराधीही न वाटून घेता, अगदी सहज घडलं. तुम्ही वर म्हणता तशा समाजसमजुतीचा इथं प्रश्नच नव्हता, पण व्यक्तिगत नैतिकतेचा मात्र प्रश्न होता म्हणजे खरं तर ही स्त्री स्वतःला न पटणारं वर्तन करत होती; ते पाहायला तिथं तिचा समाज नव्हता. पण तिनं स्वतःवर जे लादून घेतलं ते तुम्ही तुमच्या शाकाहारी मित्रावर लादणार नाहीत हे उघड आहे.

याउलटः ज्यांना स्वतःवर न पटणार्‍या गोष्टी (विचार किंवा व्यवहार) लादल्या गेल्यावर चक्क शारिरीक त्रास होतो अशी माणसंही पाहिलेली आहेत - उदा: घरी गणेशोत्सवाची वर्गणी मागायला लोक आलेले आहेत, पण ते पटतही नाही आणि त्यांना नाही म्हणून त्यांच्या दमदाटीला सामोरं जाण्याची हिंमतही नाही. अशा प्रसंगी अस्वस्थ होणारी, दरदरून घाम फुटणारी किंवा पोटात ढवळाढवळ होऊ लागणारी माणसं. अशी प्रतिक्रिया एखाद्या शाकाहार्‍याच्या तोंडात मांसाचे तुकडे कोंबायला गेलं तर येऊ शकते हे मला वाटतं तुम्ही मान्य कराल. तसंच एखादा विचार लादूनही होऊ शकतं. नाझींच्या छळछावणीपासून योगायोगानं वाचलेला आणि अमेरिकेत स्थायिक झालेला एक ज्यू भेटला होता. नंतर तो सर्व युरोप हिंडला पण जर्मनीत जाऊ शकला नाही कारण कानावर जर्मन भाषा आली की त्याला अंगभर खाज सुटे आणि काही मिनिटांत अंगभर पुरळ येई. अशा वर्तनाचं विश्लेषण करता येईलही, पण समजून घेणं अधिक महत्त्वाचं वाटतं.

त्याच्या तत्वामुळे (त्याच्या परोक्ष) ज्येष्ठांबरोबर झालेल्या चर्चेत त्याची बाजू कशी बरोबर हेही सांगणार नाही कारण माझ्या लोकांच्या धार्मिक भावनांचा आदर करणे हेही मला पाहिलेच पाहिजे. हा थोडासा 'पलायनवाद' झाला, पण प्राप्त परिस्थितीत याहून वेगळे वर्तन काय होईल माझ्याकडून ?

आपण ज्या समंजस युरोपिअन लोकांच्या उल्लेखनीय वर्तनाविषयी बोलत होतो, अशातली माझ्या परिचयातली माणसं अशा वेळी आपल्या आप्तांना काय सांगतात? तर दोन संस्कृतींमधले फरक आणि त्यामुळे एकच गोष्ट एका संस्कृतीत योग्य पण दुसर्‍या संस्कृतीत अयोग्य कशी असू शकते हे समजावून देतात. त्यामुळे तुमच्या मित्राची बाजू बरोबर म्हणजे घरच्या ज्येष्ठांची चूक असं होत नाही, आणि तेच सर्वात महत्त्वाचं आहे. यालाच बहुसांस्कृतिकता (Multiculturalism) असं म्हणतात.

इन्द्र्राज पवार's picture

14 Sep 2010 - 12:03 pm | इन्द्र्राज पवार

श्री.चिंजं यानी वरील प्रतिसादात उल्लेख केलेला बहुसांस्कृतिकता (मल्टीकल्चरॅलिझम) हा धागा अभ्यासला. खूपच रोचनीय अशी माहिती मिळाली, जी मी अद्यापि वाचीत आहेच. यातील 'इंडोनेशीया' या देशाची बहुसांस्कृतिकता तर विशेष नोंदविण्यासारखी आहे. प्रामुख्याने मुस्लिमधर्मीय असलेल्या (व भारताच्या मानाने छोट्या) या देशात विविध प्रकारच्या ७०० (सातशे) भाषा बोलल्या जातात, ही बाब उल्लेखनीय अशीच आहे. राष्ट्रीय घोषवाक्य "MANY, YET ONE" हे त्या मल्टीकल्चरॅलिझमशी सुसंगतच आहे.

इन्द्रा

चित्रा's picture

14 Sep 2010 - 12:38 am | चित्रा

लिहीण्या-वाचण्यात धर्माप्रमाणे प्रोटेस्टंट अगदी कमी आणि बौद्ध, नास्तिक अशी चढण दिसते. यात हिंदू- आणि नास्तिक यांत फारसा फरक दिसत नाही. (मी फरक म्हणजे १ ग्रेड लेव्हलचा अदमासे करते).

डेटिंगला आलेल्यांची लिहीण्यावाचण्याची ग्रेड लेव्हल ९वी पर्यंतचीच म्हणजे जरा कठीण दिसते :)

धार्मिकतेचं प्रस्थ/स्तोम जिथे कमी आहे अशा देशांत ज्यांचा धर्म आपल्याहून वेगळा आहे अशा 'इतरां'विषयी ('The other' अशा अर्थानं) समंजसपणा, ज्ञान असण्याची शक्यता अधिक असेल का?

बहुदा चिं. जं. हे स्वत:वरून दुसर्‍याला ओळखत असावेत!

लिहीण्यावाचण्यात निधर्मी व्यक्ती अधिक पारंगत असणे- शक्य आहे. निधर्मी व्यक्ती बहुतांशी उच्चशिक्षित असतात, आणि लिहीण्यावाचण्याचे ज्ञान त्यांना असावे.

ज्ञानेश...'s picture

14 Sep 2010 - 9:51 am | ज्ञानेश...

लिहीण्यावाचण्यात निधर्मी व्यक्ती अधिक पारंगत असणे- शक्य आहे. निधर्मी व्यक्ती बहुतांशी उच्चशिक्षित असतात, आणि लिहीण्यावाचण्याचे ज्ञान त्यांना असावे.

सहमत आहे.
त्यामुळे या लेखाचे शीर्षक 'निधर्मीपणाचे अनपेक्षित फायदे' ऐवजी 'निधर्मीपणाचे स्वाभाविक परिणाम' असे असायला हवे होते किंवा कसे असा विचार मनात आला. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2010 - 9:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

टाळ्या वाजवत आरती म्हणायला माझी ना नसते कारण त्यातून मला आनंद मिळतो. देवाची आरती आहे म्हणून आनंद नव्हे तर जे गाणं, संगीत आवडतं ते म्हणून आनंद मिळतो म्हणून मी तिथपर्यंत आस्तिकांमधे सामील होते. ते गाणं देवाबद्दलचं आहे का नाही याने मला काहीही फरक पडत नाही. माझ्या लेखी "देव काय" याचं उत्तर मला माहित नाही, त्यामुळे गाणं कुठल्या देवाबद्दल असो वा काहीतरी 'खुदा जाने के मै फिदा हूं'बद्दल असो, दोन्ही गोष्टी माझ्यासाठी एकसारख्याच अगम्य आहेत.
मला गाणं, संगीत यांची आवड नसती तर मी तेवढंही केलं नसतं आणि अशा परिस्थितीत 'धोरणी'पणे आरती संपल्याची खात्री करूनच जेवायला गेले असते. माझ्या नवर्‍याच्या घरचा गणपती त्याच्या काकांकडे असतो. ("किमान सुट्टी आहे म्हणूनतरी ठाण्याला या" या भावनात्मक आवाहनाला प्रतिसाद देऊन, तसं स्पष्ट सांगूनच) एक वर्ष आम्ही दोघे तिकडे गेलो होतो तेव्हा आरत्या, प्रसाद संपल्याची फोनवरून खात्री केली आणि मगच तिथे पोहोचलो.

दुसरं एक उदाहरण: मला झोळी वापरायला आवडते आणि तशी एक शेवटी मला मिळाली. नेमकं तिच्यावर 'हरे कृष्ण हरे राम' लिहीलेलं आहे. मला हवं तेवढं, म्हणजे झोळी, मी वापरते आणि जे कळत/पटत/समजत नाही त्याकडे दुर्लक्ष करते.

इंद्रा: तुझ्या प्रतिसादातलं नळाचं उदाहरण. नास्तिकांनी नमस्कार केला नाही म्हणून आस्तिकांचा देवावरचा विश्वास उडत नाही का आस्तिकांच्या लेखी देवाचं देवपण कमी होत नाही. असं असेल तर आस्तिकांनी नळाची पूजा केली तर नास्तिकांचं का काही बिघडावं?
मला माझं व्यक्तीगत मत विचारशील तर, देव काय, कोण हे न समजता देवाची पूजा करण्यापेक्षा पाण्याचं महत्त्व ओळखून नळाची पूजा करणं जास्त डोळसपणाचं लक्षण आहे. मी हिंदू घरात जन्माला आल्यामुळे मी ओवाळून नळाला महत्त्व देईल तर कोणी त्याच्या धर्माप्रमाणे नळाला महत्त्व देईल.

हिंदू धर्मात सूर्याला देव मानलं आहे. निरीश्वरवादीही सूर्याचं महत्त्व मान्य करतीलच; काही निरीश्वरवादी व्यायाम म्हणून सूर्यनमस्कारही घालतील. सूर्यामुळे पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे, सूर्य हाच आपल्याला ऊर्जा पुरवतो, इ.इ. गोष्टी मान्य केल्या म्हणून निरीश्वरवाद्यांना आस्तिक किंवा हिंदू असं लेबल लावता येईल का?

प्रकाश घाटपांडे's picture

14 Sep 2010 - 10:30 am | प्रकाश घाटपांडे

चर्चा वाचुन अंनिसतील सुरवातीचे दिवस आठवले.
असो तुर्तास इतकेच.

इन्द्र्राज पवार's picture

14 Sep 2010 - 12:46 pm | इन्द्र्राज पवार

"देव काय, कोण हे न समजता देवाची पूजा करण्यापेक्षा पाण्याचं महत्त्व ओळखून नळाची पूजा करणं जास्त डोळसपणाचं लक्षण आहे."

~~ अदिती....हा विचार जास्त व्यवहारी आणि विज्ञानाची कास धरणारा आहेच आहे, जो मान्य करायला काहीच हरकत नाही. फक्त वर काही प्रतिसादांतून प्रतिबिंबीत झालेल्या चित्रणावरून (तसेच धागाकर्ते श्री.चिंजं यांनीही दुजोरा दिल्याप्रमाणे) समाजाचा एक घटक म्हणून वावरताना एखाद्याच्या मताला दुजोरा देताना दुसर्‍याच्या (धर्म संदर्भातील) भावनेला धक्का लागणार नाही इतपत बलॅन्स राखला तरी मला वाटते दोन्ही पक्षातून फारसा मतभेदाचा धुरळा उडणार नाही. त्या कॉलनीच्या चेअरमननी दोनदा निरोप पाठवूनही ते श्री. वा सौ. समारंभस्थळी आले नाहीत, ही नंतर अर्थातच चर्चेची बाब झाली आणि मग त्या "पूजा केलेल्या नळातील पाणी तुम्हाला कसे बरे चालत हो?" या टोमण्यासदृश्य तीरांची फेकाफेका झालीच. असो....(म्हणून त्यांना त्या नळाचे पाणी वापरण्यास कुणी अटकाव केला नाही.,.. आणि तो विषयही नंतर संपला.)

परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल (वा रूपाबाबत...) जे काही उलटसुलट प्रवाद आहेत त्याची पोतडी खोलण्यापेक्षा निदान तो "आनंदघन" आहे ही संकल्पना वादी आणि प्रतिवादी या दोघांना मान्य होण्यासारखीच आहे. म्हणजे धर्मात असलेल्या कोणत्याही एका देवाचे/देवीचे नाव घेतले म्हणजे जर एखाद्याचा मस्तकशूऴ उठत नसेल तर ते नाव किमानपक्षी किंचित आनंद तरी देते इतपतच त्या आनंदघनाची व्याख्या आहे. माणसाने मग तो आनंद कशाप्रकारे मिळवावा, ही त्याची/तिची व्यक्तिगत बाब आहे.

'मी आज मल्लिकार्जुन मन्सूरांचा मालकंस ऐकला आणि देवळाच्या गाभार्‍यात उभे असल्याची भावना झाली....", 'बिस्मिल्ला खाँसाहेबांची सनई डोळे बंद करून ऐकणे म्हणजे माझ्या दृष्टीने साक्षात कृष्णभक्ती...", "भीमसेनांचा देसकार....!!! अहाहा ! काय सांगू, अहो शंकराच्या पिंडीसमोर हात जोडले..!" "लताच्या 'अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम...!' पुढे मान विनम्रतेने झुकतेच !!"

~~ हे आणि यासदृश्य उदगार ज्यावेळी आपण ऐकतो, वाचतो, त्यावेळी त्या वाक्यांचा कोणत्याही अर्थाने धार्मिकतेशी थेट संबंध जोडला जात नाही (तू त्या मैफिलीत असशील तर तुझी दाद त्या कलाकारांच्या स्वर्गीय कलेला जाणारच, फक्त भाषा सादरीकरणाची धाटणी वेगळी असेल)....संबंध आहे तो त्यामुळे मिळणार्‍या निखळ आनंदाचा, ज्याची तुलना झालीच तर फक्त झर्‍याच्या मुखाशी असलेल्या शुद्ध जलाचा !

इन्द्रा

चिंतातुर जंतू's picture

14 Sep 2010 - 1:42 pm | चिंतातुर जंतू

आता ज्या नळाची इतकी वाजतगाजत धार्मिक कर्मकांडानिशी पूजा घातली, गोड प्रसाद वाटण्यात आला, त्या नळातून यांच्या फ्लॅटमध्ये येणारी पाण्याची धार हे जोडपे थांबविणार काय?

त्या कॉलनीच्या चेअरमननी दोनदा निरोप पाठवूनही ते श्री. वा सौ. समारंभस्थळी आले नाहीत, ही नंतर अर्थातच चर्चेची बाब झाली आणि मग त्या "पूजा केलेल्या नळातील पाणी तुम्हाला कसे बरे चालत हो?" या टोमण्यासदृश्य तीरांची फेकाफेका झालीच.

सर्वप्रथम, समारंभाला तोंडही न दाखवणं ही तुमच्या निधर्मी जोडप्याची फारच टोकाची प्रतिक्रिया झाली हे मान्य करूयात. त्यापेक्षा पूजा-प्रसाद झाल्याची शहानिशा करून मगच तिथं पाय ठेवणं हे धोरणी माणसाचं लक्षण होईल, हेही मान्य करूयात. पण तशीच कॉलनीतल्या लोकांच्या वागण्यातही थोडी तर्कदुष्टता/अतिरेक आढळतात असं वाटतं. एक म्हणजे ज्यानं मदत केली तो नगरसेवक आणि त्यानं राबवलेली नगरपालिकेची यंत्रणा हे घरी पाणी येण्यासाठी खर्‍या अर्थानं कारणीभूत होते. ज्याची पूजा झाली तो नळ एक प्रतीक म्हणून पुजला गेला. खरे आभार नगरसेवकाचे मानायला हवे म्हणून त्याच्या हस्ते पूजा केली गेली. यात नळ हा निमित्तमात्र नव्हे का? पूजा करावी की न करावी याविषयी बहुमतानं विचार घेतला गेला असता तरी त्या निधर्मी जोडप्याला हारच पत्करावी लागली असती. त्यामुळे पूजा केलेल्या नळातलं पाणी नको असं म्हणण्याचा पर्याय त्यांना नाहीच आणि म्हणूनच एका खोचकपणातून असा प्रश्न उपस्थित केला गेला. तसंच दुसरं म्हणजे अख्खी कॉलनी पूजेला गेली असेल, तर एका जोडप्याच्या अनुपस्थितीनं असा काय फरक पडणार होता? त्यांनी पूजेत काही अडथळा आणला नाही की सार्वजनिक कार्यक्रमात काही अनुचित वर्तन केलं नाही. फक्त व्यक्तिगत पातळीवर एक निर्णय (अनुपस्थित राहण्याचा) घेतला. यावरून त्यांना टोचून बोलणं हेही जरा टोकाचंच वर्तन नव्हे का? एकंदरीत या प्रकारात एका बाजूला अख्खी कॉलनी आणि दुसर्‍या बाजूला एक जोडपं असल्यामुळे ही एक प्रकारची झुंडशाहीच होत नाही का?

प्रकाश घाटपांडे's picture

14 Sep 2010 - 2:06 pm | प्रकाश घाटपांडे

संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे ...
या डॉन्याच्या लेखावरील चर्चा आठवली.