साद मागची; साद नसे रे,
हा तर सारा भुलावा.
क्षणभर भुलवी; धरा सोडवी,
भवसागर कैसा तरावा?
चुकार मनाच्या बसे कोनाडी;
हळुवार शिळ जशी विरावी,
हवेत जरी ती नसे कुठेही,
ठोका हृदयाचा चूकवी.
असतील जर पाश कुठे रे
जखडाया मना; तना सोबती,
ऐवज सारा गहाण घालीन
सात जन्म वरती.
सोडव मजला मनापासुनी
नको वेदना; नको भिरभिरणे,
थांबव माझे बंजारेपण,
घाल पदरी स्थिर जगणे.
अपर्णा
प्रतिक्रिया
27 May 2010 - 7:49 am | निरन्जन वहालेकर
चुकार मनाच्या वसे (कोनाडी) अन्तरी वाचण्यास बरे वाटेल का ? शेवटच्या दोन ओळीचा अर्थ विरुध्ध वाटतो. बंजारेपण, थांबउन स्थिर जगणे अपेक्षित म्हणून
बान्ध पदरी आता असे म्हणणे योग्य वाटते.
मात्र कविता सुंदर ! आवडली !
27 May 2010 - 8:59 am | स्पंदना
"कोनाडा" अंधारेपण दाखवतो. "कोनाडा" फारसा न उघडता एका बाजुला असतो...
शेवटच्या दोन ओळी....याचक होउन " स्थीर जगणे पदरात घाल" अशी विनवणी आहे.
आभार..
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
27 May 2010 - 8:49 am | फटू
मनाच्या चंचलतेला लगाम घालण्याची साधने शोधण्याची कल्पना आवडली.
सकळ इंद्रियांचा राजा मन । मनःकल्पना जीवशिवपण ।
श्लोकपदें ’मनसीश्वर’ पूर्ण । मनशींच जाण हरि बोले ॥
- एकनाथी भागवत
- फटू