".....हे विधी, या परंपरा, रूढी, श्रद्धा यांनी तर रानटी माणसाला सुसंस्कृत बनवलं. या जोखड नसून, यांच्यात सांकेतीक अर्थ आहेत. भावनिक पातळीवर साधलेला संवाद आहे मनामनांचा".....
आपल्यातील काही परंपरांचे काळाच्या ओघात अर्थ आणि औचित्य या दोन्ही अंगांनी नव्याने परिशीलन होणे गरजचे आहे. विशेषत: आताच्या माहितीच्या प्रचंड विस्फोटापुढे असे प्रश्न वा विचार एकमेकासमोर विचारार्थ ठेवणे काहीच वावगे नसून किंबहुना या आदान प्रदानामुळे का होईना विविध विचारांचे लोक एकत्र येऊन यातून सुवर्णमध्य काढू शकल्यास अंतिमत: समाजाच्या स्वास्थ्यासाठी तो एक स्वागतार्ह बदल होईल अशी माझ्याप्रमाणे कित्येकांची भावना आहे. त्या अनुषंगाने दोनेक दिवसापूर्वी इथे दिलेल्या "पिंड विधी आणि कावळा" या धाग्याला जो प्रतिसाद मिळाला तो पाहून हे तर निश्चितच झाले कि सदस्यांचा कल हा बराचसा वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारून नव्याने अशा परंपरकडे पाहिले पाहिजे असाच आहे.
अर्थात काहींचे म्हणणे असेही दिसले की, "हे विधी, या परंपरा, रूढी, श्रद्धा यांनी तर रानटी माणसाला सुसंस्कृत बनवलं. या जोखड नसून, यांच्यात सांकेतीक अर्थ आहेत. भावनिक पातळीवर साधलेला संवाद आहे मनामनांचा." या मतावर खरे तर त्या ठिकाणी माझे उत्तर दिले गेले पाहिजे, पण ज्यावेळी उत्तर लिहायला मी संगणकासमोर बसलो, त्यावेळी असे जाणवले की याच विषयावर एक नवा धागा होऊ शकतो, ज्याचे वाचन सर्वजण करतील आणि नव्याने हा विषय पुढे चालू राहील.
मुळात "रानटी आणि सुसंस्कृत" या दोन संकल्पना या मानवाने स्व:ताच्या सोयीने करून घेतलेली मोरपिसे आहेत. आपण आता ज्या ऐहिक सुखात, सुविधात, सुव्यवस्थेत आहोत त्याच्या तुलनेने या पृथ्वीवरील मूळ पुरुष नसल्याने आपण ते राहणीमान "रानटी" म्हणतो. सुसंस्कृत माणूस ज्यावेळी जनावरासारखे वागतो (विशेषत: कौटुंबिक पातळीवर...) त्यावेळी त्याचा अवतार हा कोणत्या युगातील हा प्रश्न आजुबाजुन्च्यावर नक्कीच पडतो. आता न चुकता सत्यनारायणाची पूजा घालून साधू वाण्याला होडीत बसवून दुनियेत फिरवायचे आणि पुण्य मिळवायचे ही रूढी सांभाळायची आणि दुस-या दिवशीच कार्यालयात जाऊन टेबलखालून हातमिळवणी करून नको असलेले व्यवहार कलमात बसवायचे, व वरिष्ठांच्या सह्या झाल्यावर तोच कालचाच शिरा प्रसाद म्हणून समोरच्याला द्यायचा (ही घटना मी प्रत्यक्ष बघितली आहे, आणि त्या सो-कॉल्ड साहेबाकडून त्याच्या सत्यनारायणाचा तो शिळा प्रसाद त्या व्यापा-याने खाल्लादेखील....). रानटी अवस्थेत असे प्रकार होते कि नाही याचे संशोधन मानववंशशास्त्रीय अभ्यासक करू शकतील, मात्र सुसंस्कृतपणाने माणसाला माणुसकी विसरायला लावली हे कटू वाटले तरी सत्य आहे हे नाकारता येणार नाही. बंगला, कार, सीसी, पाल्यांचे इंग्रजी माध्यम शाळेतील प्रवेश, एनआरआय दर्जा मिळविण्यासाठी चाललेली धडपड ! या आणि कितीतरी तत्सम बाबी हल्ली सुसंस्कृतच्या व्याख्येत बसविण्याचा यत्न चालू असतो. अशावेळी त्रयस्थ नजरेने पाहिले असता प्रगत आणि सुसंस्कृत ही विशेषणे लाऊन घेताना आपल्या परंपरा, रूढी, श्रद्धा यांचा विसर पडतो तिकडेही लक्ष दिले जाते का?
"विधी, या परंपरा, रूढी, श्रद्धा यांनी तर रानटी माणसाला सुसंस्कृत बनवलं. या जोखड नसून, यांच्यात सांकेतीक अर्थ आहे" हे मत आपल्या एका सदस्य भगिनीचे असल्याने मी इथे त्यांना विचारू इच्छितो की "स्त्री" वर याच परंपरा/रूढी/श्रद्धा यांनी खरोखरी जोखड नावाची जी काही कठोर बंधने घातली होती तिचा स्वीकार आजच्या युगात आपणास मान्य होईल का? त्याही सुसंस्कृत आणि सांकेतिक अर्थाच्याच होत्या ना? एक काळ असा होता की आम्ही (आमचे पूर्वज म्हणा हवे तर....) "मनुस्मृती" ला डोक्यावर घेऊन नाचत होतो व त्याचप्रमाणे समाज रचना करून घेतली व त्याची अत्यंत कठोर पद्धतीने (रानटी म्हणा हवे तर...) अंमलबजावणीही करीत होतो. २० व्या शतकातही मनुस्मृतीची व्यवस्था या देशात पुन्हा यावी, म्हणून एक जबरदस्त मोहीम चालू होती, ती अशावेळी की महिलांनी देशाच्या आणि एकूणच समाजाच्या वृद्धीसाठी आपले बहुमोल असे योगदान देणे चालू केले होते. आणि एका विशिष्ट भूमिकेचा आग्रह धरणा-या गटाला "स्त्री" ही आता डोईजड होईल अशी भीती वाटू लागली होती (आजही... आत्ता, संसदेत महिला आरक्षणावरून जे वादळ चालू आहे त्याची जातकुळी हीच आहे.)
मनुस्मृतीत भृगु आचारधर्म सांगतो तो असा की, "विवाहविधी हाच स्त्रियांचा उपनयानाख्या संस्कार मन्वादिकानी मानलेला आहे. केवळ पतीची सेवा हेच त्यांचे गुरुकुल व गृहकृत्ये हाच एकमेव जन्म उद्देश होय ." यावरून या सुसंस्कृत माणसाने स्त्रीला किती गौण स्थान दिले आहे याची जाणीव होते. आता या मुद्द्यावर मी जर मनुस्मृतीचा हा आचार धर्म मानु नका असे सांगितले तर "हे जोखड नसून यात सांकेतिक अर्थ आहे" असे म्हणता येईल का? काळाच्या कसोटीवर आपण स्त्रीचे समाजातील प्रमुख स्थान तसेच बरोबरीचे मान्य करू नये का?
मनुस्मृतीच्या तिस-या अध्यायात "ब्राह्मण स्त्रीने स्वजातीतच विवाह करावा" असे म्हटले आहे. इतरत्र केल्यास ते हिणकस असल्याचे सूचित केले आहे. म्हणजे इ. स. २०१० मध्ये एखाद्या ब्राह्मण मुलीने असा एखादा प्रेमविवाह केल्यास तिने सुसंस्कृत परंपरेचा संकेत मोडला असे मानने ठीक होईल काय? सातव्या अध्यायात तर असे म्हटले आहे की राजाने ब्राह्मणांना दान द्यावे व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे "कर" आकारू नयेत. आता चालू युगात ही परंपरा कितपत योग्य मानावी? अध्ययन आणि अध्यापन तर ब्राह्मण जातीनेच करावे, क्षत्रिय व वैश्य यांनी करू नये, तर शूद्रांचा या बाबतीत उल्लेख देखील केलेला नाही. ही कोणत्या प्रकारची परंपरा? हे एक प्रकारचे काही वर्गांवर असह्य असे जोखड नव्हे का?
स्त्रीच्या बाबतीत तर अशा प्रकारच्या आज्ञा आहेत की त्या वाचल्यानंतर, त्या मांडणीचा विचार केल्यावर, 'त्या काळात ते ठीक होते' अशा प्रकारचे समर्थन आजची एक ब्राह्मण स्त्री देखील करण्यास धजावणार नाही. १. वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पाळून विद्येची उपासना करावी, हे एकवेळ ठीक मानू या, पण हा अधिकार सर्व जातीच्या स्त्रियांना नाकारलेला होता. २. मुलीचे लग्न वयाच्या ८ व्या (आठव्या) वर्षी झाले पाहिजे (म्हणजे तिचा "पाय" घसरणार नाही....); तर वराचे वय त्यावेळी १८ असायला हरकत नाही. २४ वर्षाच्या युवकाला १२ वर्षाची मुलगी करावी. ३. पुत्राला पुत्र झाल्यानंतर आजोबा आजीनी वानप्रस्थास निघून जावे. ४. सगळ्यात अविश्वसनीय आणि भयावह तरतूद अशी आहे की, नवरा वेडा , व्यसनी, वा नपुंसक असला तरी स्त्रीला घटस्फोट घेण्याचा अधिकार नव्हता. पती मेल्यानंतर दुसरा विवाह करण्याला तिला मुभा नव्हती.
सतीच्या चालीबाबत लिहायचे म्हणजे आणखीन एक नवा धागा करावा लागेल.
आता सध्याच्या या युगात जर कुणी म्हटले की "मनुस्मृती" प्रमाणे आचरण करणे गरजेचे आहे, तर आजची युवती पेटून उठेल की नाही? ज्या काळात या परंपरा मागे पडल्या त्यावेळी देखील याच्या योग्यते बाबत बराचसा उहापोह झाला असणारच, विरोधही स्वाभाविकपणे ! तरीही काळाच्या ओघात यातील जोखड स्त्रीने टाकून दिलेच ना? मग ते कोणत्याही समाज सुधारकच्या प्रयत्नाने असो, वा सरकार दरबारी योग्य ते मांडणे झाल्यानंतर अंमलात आले असेल, तो मुद्दा महत्वाचा नाही. महत्वाचे आहे ते हे की, विज्ञान युगाच्या कसोटीवर परंपरेच्या पुस्तिकेतील त्याज्य वाटणारी प्रकरणे समाज धुरंधारणी लोकांनी योग्य त्या कारणासाठी टाकून फेकून दिली आणि त्यामुळेच या देशातील "स्त्री" ही ख-या अर्थाने मोकळा श्वास घेण्यास समर्थ झाली आहे. त्याच अनुषंगाने धर्मातील ज्या अतार्किक तसेच फोलपणा सिद्ध झालेल्या बाबींना "राम राम" म्हणणे म्हणजे परंपरेचा -हास केला असे मानने चुकीचे होईल.
कृपया मत प्रदर्शन करावे.... धन्यवाद !!
प्रतिक्रिया
23 Apr 2010 - 12:02 am | विसोबा खेचर
??
आपण फोरास रोड, फॉकलंड रोड, कामाठीपुराच्या गल्ल्या इत्यादी ठिकाणांवरील स्त्रिया पाहिल्या आहेत का? कसला मोकळा श्वास नी कसलं काय!
बरं त्या बायकांचं एक जाऊ द्या..
आमच्या मिलिंदा जोशी नावाच्या मित्राची बायको, तिने साधं आइसक्रीमही कोणतं खावं तो चॉइस मिलिंदा ठरवणार!
आमच्या दिलीप रानड्याची बायको, (जी माझीही चांगली मैत्रीण आहे,) नवर्याला आवडत नाही म्हणून आंतरिक हौस असूनही बिनबाह्यांचं पोलकं घालत नाही!
एल आय सी तल्या पल्लवी शिरोडकरला मी एकदा संध्याकाळी तिचं कार्यालय सुटल्यावर सहज रस्त्यात भेटली म्हणून माझ्या स्कूटरवर डब्बलशीट बसवून तिच्या घरी सोडली होती, तेही मिष्टर शिरोडकरांना आवडलं नव्हतं असं मला दुसर्या दिवशी पल्लवीनेच चेहरा पाडून सांगितलं होतं!
घरोघरी नवर्याला/सासूला दबलेली अशी कित्येक उदाहरणं देता येतील..असं असताना 'या देशातील "स्त्री" ही ख-या अर्थाने मोकळा श्वास घेण्यास समर्थ झाली आहे.' या विधानास सहजासहजी सहमती दर्शवता येत नाही..
असो,
लेख बाकी विचारांना चालना देणारा..
धन्यवाद,
तात्या.
(सर्व नावे मुद्दाम बदलली आहेत)
23 Apr 2010 - 12:14 am | शुचि
+१
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
23 Apr 2010 - 12:31 am | स्वाती२
+२
23 Apr 2010 - 9:33 am | विंजिनेर
बायकोला आवडत नाही म्हणून करत नाही असे पडेल चेहेर्याने सांगणारे पुरूषसुद्धा शेकड्याने सापडतील.
त्यालाच 'सहजीवन' म्हणत असावेत ;)
(आठवा "एक रविवारची सकाळ" मधले मामा - मामींना किती दडपून असतात?)
असो. थोडे अवांतर झाले असेल. बाकी चालू द्या.
स्वगतः मिसळपाव वर ६-६ पानी चर्चा करून मराठी मनात स्त्रीत्वाची भूमिका कशी काय बदलणारे कुणास ठाऊक ? :?
23 Apr 2010 - 10:53 am | विसोबा खेचर
हा हा हा! जबरा.. :)
तात्या.
29 Apr 2010 - 6:19 am | सन्जोप राव
बायकोला आवडत नाही म्हणून करत नाही असे पडेल चेहेर्याने सांगणारे पुरूषसुद्धा शेकड्याने सापडतील.
सहमत आहे. बायकोला आवडत नाही म्हणून मरणाचा उन्हाळा असतानाही बिनबाह्याचा बनियन न घालू शकणारे किती याची गणना या वार्षिक जनगणनेत व्हायलाच पाहिजे! (इश्श्,काय मेलं ते रानटी माणसासारखं जंजाळ दाखवत फिरायचं! जनाची नाहीतर मनाची तरी लाज आहे की नाही तुम्हाला? वगैरे!)
सन्जोप राव
किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है
जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है
30 Apr 2010 - 11:51 am | II विकास II
सहमत आहे. बायकोला आवडत नाही म्हणून मरणाचा उन्हाळा असतानाही बिनबाह्याचा बनियन न घालू शकणारे किती याची गणना या वार्षिक जनगणनेत व्हायलाच पाहिजे! (इश्श्,काय मेलं ते रानटी माणसासारखं जंजाळ दाखवत फिरायचं! जनाची नाहीतर मनाची तरी लाज आहे की नाही तुम्हाला? वगैरे!)
==
+१
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
23 Apr 2010 - 11:00 am | इन्द्र्राज पवार
नमस्कार ... सध्या इथे (कोल्हापुरात) विजेचा लपंडाव चालु आहे, तेंव्हा उत्तराला थोडा विलम्ब लागेल, कृपया तेवढा वेळ द्या. धन्यवाद !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
23 Apr 2010 - 2:30 pm | इन्द्र्राज पवार
"....आपण फोरास रोड, फॉकलंड रोड, कामाठीपुराच्या गल्ल्या इत्यादी ठिकाणांवरील स्त्रिया पाहिल्या आहेत का? कसला मोकळा श्वास नी कसलं काय!..."
तात्यासाहेब....नाही.... मी विनातक्रार मान्य करतो की या रेड लाईट एरिया बद्दल जितके मिळाले तितके वाचले आहे.... कधी गेलो नाही, जाण्याचा प्रसंग येणारही नाही .... आणि अर्थातच तेथील परिस्थितीची जाणीव व्हायला नेमके तिथे गेलेच पाहिजे असा आग्रह असू नये. कारले कडू असते ही बाब सत्य आहे की नाही यासाठी कारले खाल्लेच पाहिजे असा काही नियम नाही. मनुस्मृतीच्या माझ्या त्या विधानांचा परामर्श कृपया या रीतीने घेऊ नका, कारण त्याचा संबंध फक्त स्त्रियांना त्या ठिकाणी कोणते स्थान दिले आहे आणि त्या परंपरा सध्याच्या युगात आपण स्वीकारू शकत नाही, स्वीकारुही नयेत हे माझे म्हणणे होते/आहे . असे जर असेल, तर मग काळाच्या कसोटीवर कुचकामी ठरलेल्या आपल्या धर्मातील आणखीन काही बाबींना फाटा दिला तर चालणार नाही का? की केवळ शास्त्रात सांगितले आहे, का भीतीपोटी त्या अथक पाने करतच राह्याच्या का, हा निव्वळ मुद्दा होता, आहे !
"स्त्री मोकळा श्वास घेऊ लागली"..... हे वाक्य केवळ प्रातिनिधिक आहे, ती योजना शब्दश: समाजातील सर्वच स्त्रियांना लागू होईल असे नाही. परंतु एका विशिष्ट गटातील स्त्रीची (दयनीय, शोचनीय) अवस्था पाहून जर आपण ती केमिस्ट्री सर्वच स्त्रीयांन लाऊ लागलो तर मला वाटते आपण कुठतरी चुकत आहोत. खुद्द स्त्री चळवळीशी संबंधित असणा-या कोणत्याही सुजाण कार्यकर्तीला ते पटणारे नाही. धन्यवाद !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
29 Apr 2010 - 6:21 am | सन्जोप राव
मी विनातक्रार मान्य करतो की या रेड लाईट एरिया बद्दल जितके मिळाले तितके वाचले आहे.... कधी गेलो नाही, जाण्याचा प्रसंग येणारही नाही ..
या आत्मविश्वासाबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत!
सन्जोप राव
किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है
जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है
30 Apr 2010 - 11:53 am | II विकास II
सहमत आहे. बायकोला आवडत नाही म्हणून मरणाचा उन्हाळा असतानाही बिनबाह्याचा बनियन न घालू शकणारे किती याची गणना या वार्षिक जनगणनेत व्हायलाच पाहिजे! (इश्श्,काय मेलं ते रानटी माणसासारखं जंजाळ दाखवत फिरायचं! जनाची नाहीतर मनाची तरी लाज आहे की नाही तुम्हाला? वगैरे!)
==
+१
-
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
23 Apr 2010 - 12:30 am | अक्षय पुर्णपात्रे
स्त्रिया पूर्णपणे मुक्त झालेल्या नाहीत हे खरे पण परिस्थिती पुर्वीच्या तुलनेत सुधारली आहे.
रुढी, परंपरा यांच्या आधाराने मनामनांचा संवाद कसा होतो? हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.
23 Apr 2010 - 11:03 am | इन्द्र्राज पवार
नमस्कार ... सध्या इथे (कोल्हापुरात) विजेचा लपंडाव चालु आहे, तेंव्हा उत्तराला थोडा विलम्ब लागेल, कृपया तेवढा वेळ द्या. धन्यवाद !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
23 Apr 2010 - 12:41 am | हुप्प्या
आपण मध्यपूर्वेतील रानटी, हजारो वर्षे जुनी संस्कृती पाळणारे देश बघितले तर त्यांच्या स्त्रियांपेक्षा आपल्या स्त्रिया कितीतरी चांगल्या स्थितीत आहेत. तोंडी तलाक देणे, एकाच वेळी अनेक बायका करण्याची मुभा असणे अशा काही कालबाह्य प्रथा आजही आपल्या देशात काही विशिष्ट धर्माच्या लोकांना पाळू दिल्या जातात. त्यात बदल करू दिला जात नाही. त्या विशिष्ट धर्माच्या स्त्रियांपेक्षा बाकी भारतीय स्त्रियांची स्थिती खूपच चांगली आहे. युरोपात वा अमेरिकेत स्त्रियांना जास्त स्वातंत्र्य असते हे खरे. पण अगदी अमेरिकेतही आजवर कुणी स्त्री राष्ट्रप्रमुख बनू शकलेली नाही.
अजून बर्याच सुधारणा व्ह्यायच्या आहेत पण ५० वर्षापूर्वी जी स्थिती होती त्यात बर्याच सुधारणा आहेत हे नाकारून चालणार नाही. ज्या समाजधुरीणांनी स्त्रियांकरता कार्य केले, जसे धोंडो केशव कर्वे, फुले ह्यांना समाज हिरो मानतो व्हिलन नाही हेही विचारात घेतले पाहिजे.
23 Apr 2010 - 12:53 am | राजेश घासकडवी
हे पटत नाही. आदिम काळापासून जुलुम, अत्याचार, वर्णद्वेष हे कमी होत आलेले आहेत. आजकालचा सुसंस्कृत माणूस खूप कमी वेळा पशूप्रमाणे वागतो. तुम्ही दिलेलं उदाहरण जर पाशवी वृत्तीचं वाटत असेल तर एकंदरीतच आपले मानदंड बदलले (सुधारले) आहेत असं म्हणावं लागेल.
तुम्ही ज्या समृद्धीला काहीसं वाईट म्हणता आहात तिच्याचमुळे आजकाल गरिबीपायी, दुष्काळापायी, रोगराईपायी लक्षावधी, कोट्यवधी लोक अन्नान्न होऊन संस्कृतिहीन वर्तणुकीला बळी पडत नाहीत.
मनुस्मृती वाईट याला खूप थोड्यांचा विरोध असावा. आपण तीपासून खूप दूर आलो आहोत. तात्यांनी म्हटल्याप्रमाणे अजून खूप अंतर कापायचं आहे.
23 Apr 2010 - 11:04 am | इन्द्र्राज पवार
नमस्कार ... सध्या इथे (कोल्हापुरात) विजेचा लपंडाव चालु आहे, तेंव्हा उत्तराला थोडा विलम्ब लागेल, कृपया तेवढा वेळ द्या. धन्यवाद !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
29 Apr 2010 - 6:25 am | सन्जोप राव
आजकालचा सुसंस्कृत माणूस खूप कमी वेळा पशूप्रमाणे वागतो.
पशूप्रमाणे वागणे हे अत्यंत नैसर्गिक आहे. मानवी वर्तन अनैसर्गिक आहे. माणसाचे सोडा, ह्यूमन रेस इज नॉट इम्मॉर्टल. पशूंना का बदनाम करता?
सन्जोप राव
किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है
जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है
23 Apr 2010 - 2:31 am | शुचि
पवारसाहेब स्त्रीला गौण स्थान देऊन तिचा कोंडमारा केला गेला होता. काकबळी देऊन कसला कोंडमारा होतोय? उलट मनातील शोकाला एक वाटच मिळतेय. आणि त्या कावळ्याला खाणं. नाही शिवला तर दर्भाचा करतातच की. जी रूढी कोणाच्या हक्काची पायमल्ली करत नाही ती कशाला बदलायची? इफ इट आन्ट ब्रोक डोन्ट फिक्स इट.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
23 Apr 2010 - 11:01 am | इन्द्र्राज पवार
नमस्कार ... सध्या इथे (कोल्हापुरात) विजेचा लपंडाव चालु आहे, तेंव्हा उत्तराला थोडा विलम्ब लागेल, कृपया तेवढा वेळ द्या. धन्यवाद !
बाय द वे >> शुचि जी ~ हे पवारसाहेब कोण? नाव ऐकल्यासारखे वाटते ! मला उद्देशून म्हणाला असेल तर असा उल्लेख शेवटचा माना. येथून पुढे केवळ "इंद्र" किंवा "इंद्रा" असेच आपणाकडून टंकित व्हावे ही अपेक्षा !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
23 Apr 2010 - 6:26 pm | टारझन
=)) =)) =)) इद्रुल्या , इंदुटल्या , इं .. किंवा आणखिन काही म्हणु शकतो काह ओ .. आम्ही ?
(हलकेच घ्या हौ)
- छायागीत पावर
23 Apr 2010 - 11:00 pm | इन्द्र्राज पवार
यु आर वेलकम टारझन साब !!! हव्या त्या नावाने, हवा तो दर्जा देऊन मला बोलाविण्याची वा संबोधण्याची तुम्हाला फुल परवानगी आहे. विचारू देखील नका ~~ direct action !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
23 Apr 2010 - 2:49 am | Pain
सातव्या अध्यायात तर असे म्हटले आहे की राजाने ब्राह्मणांना दान द्यावे व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे "कर" आकारू नयेत. आता चालू युगात ही परंपरा कितपत योग्य मानावी?
मनुस्म्रुतिमधे ब्राह्मणांना त्यांच्या कामाचे पैसे घेण्यास मनाई केली आहे. अशावेळी चरितार्थ चालणार कसा ? म्हणून दान द्यावे असा विचार असु शकतो. अर्थात ते बंधनकारक नाहीच. शिवाय आता राजेशाही नसल्याने अशा गोष्टी ऑबसोलीट झाल्या आहेत
अध्ययन आणि अध्यापन तर ब्राह्मण जातीनेच करावे, क्षत्रिय व वैश्य यांनी करू नये, तर शूद्रांचा या बाबतीत उल्लेख देखील केलेला नाही. ही कोणत्या प्रकारची परंपरा? हे एक प्रकारचे काही वर्गांवर असह्य असे जोखड नव्हे का?
पुर्वी सगळी कामे जातीनिहाय वाटून दिली गेली होती. क्षत्रियांवर संरक्षण तर वैश्यांवर व्यापाराची जबाबदारी होती. त्यांना जसे अध्यापन प्रतिबंधित होते तसेच ब्राह्मणांना त्या दोन गोष्टी प्रतिबंधित होत्या. (आठवा: कर्णाची गोष्ट)
ब्रिटीशांच्या राजवटिमुळे आणि सध्या जग ज्या प्रकारे चालते त्यामुळे मध्यमवर्गात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आले आहे.
23 Apr 2010 - 7:09 am | हुप्प्या
मनुस्मृती हा ग्रंथ कालबाह्य आहे हे खरे. पण त्याच्या नावाने किती शंख करणार? आज किती लोक हा ग्रंथ वाचून तोच खरा हिंदू धर्म असे मानतात? अगदी ब्राह्मण लोक ज्यांना ह्या ग्रंथात अवाजवी महत्त्व दिले आहे ते तरी हा ग्रंथ वाचतात का? पूर्वी आंबेडकर वगैरे लोकांनी मनुस्मृतीचे जाहीर दहन केले त्या वेळी एका ब्राह्मणानेच त्यांना मोलाचे सहाय्य केले होते असा इतिहास आहे.
आता हा ग्रंथ धार्मिक ग्रंथ नसून एक ऐतिहासिक ग्रंथ मानायला हरकत नसावी.
जुनाट, रानटी, कालबाह्य रुढींना विरोध व्हायलाच हवा. पण मेलेल्याला आणखी किती वेळा मारायचे?
23 Apr 2010 - 9:23 am | जयंत कुलकर्णी
पवारांनी लिहीले आहे ते योग्य आहे. पण मला वाटते ब्राम्हणांची समाजाला गरज असावी. कारण जे ब्राम्हण होते म्हणजे माझ्यासारखे, त्यांनी ते ब्राम्हण्य केव्हाच सोडले आहे. आता ते वैश्य, आणि क्षत्रिय झाले आहेत. मी व माझे बरेचशे नातेवाईक सैन्यात आहोत व होते. आम्ही ब्राम्हणी रुढी परंपरा पाळत नाही कारण आम्ही जर त्या पाळत बसलो तर तुमचे संरक्षण कोण करणार ? मला एक गोष्ट मात्र सारखी खटकते ती म्हणजे ब्राम्हणेतर वर्गात मात्र यांचे स्तोम माजवले जात आहे. मला वाटते एक नवीन ब्राम्हण वर्ग जन्माला येऊ घातला आहे. हे मी माझ्या अनुभवावरुन सांगतोय. पुण्यातले नवीन देवळांचे मॉल हे ब्राम्हणांचे नाहीत. मनुस्मृती ब्राम्हणांनी कावेबाजपणे केव्हाच सोडली, त्यांनी सगळा हिंदूधर्म त्यांच्यापुरता modify केला आहे. दुर्दैवाने/सुदैवाने त्यांनी नवीन ब्राम्हणांना जागा करून दिली आहे. माझे एक मित्र आहेत, OBC आहेत त्यांच्याकडे सगळी कर्मकांडे अगदी हिरिहीरीने पार पाडली जातात. मी त्यांना कितीही समजावून सांगायचा प्रयत्न केला पण छे !
उरला प्रश्न मनुस्मृतीला किती काळ झोडपायचे ते ! तो आपल्या राजकारणाचा परिपाक असावा असे मला वाटते. म्हणजे जी soft targets आहेत त्यांना झोडपत बसायचे. परवा जीतेंद्र आव्हाड यांनी एका चर्चेत भाग घेतांना एक बिनडोकपणाचे प्रतिवादन केले. त्यांच्यासमोर भा. ज. प.चे चव्हाण होते. ( नशीब ) काही उत्तर न देता आल्यामुळे आव्हाडांनी आपल्या अकलेचे तारे तोडत असे म्हट्ले की शिवाजी महाराजांवर अफजलखानाच्या वेळेस पहिला वार भास्करराव कुलकर्ण्यांनी केला ( ब्राम्हणांनी ) ही वृत्ती खालपर्यंत समाजात झिरपली आहे. माझे एक ९६ कुळी मराठा मित्र माझ्याशी या विषयावर वाद घालत होते. ( माझे सगळेच मित्र त्या समाजाचे आहेत ) मी त्यांना जेव्हा शिवाजी महाराजांच्या विरुध्द कारवाया करणार्या मराठा सरदारांची यादीच सादर केली तेव्हा त्यांचा चेहरा पडला. पण मी त्यांना समजावून सांगितले की त्याचे त्यांनी वाईट वाटून घ्यायचे कारण नाही, कारण त्या काळात आपापली वतनदारी सांभाळायचा सर्व मराठा सरदारांना पुर्ण अधिकार होता. याचा अर्थ ते देशद्रोही होते असा होत नाही. उदा. जावळीच्या मोर्यांच्या दृष्टीने महाराज हे परकीयच होते. इतिहासातील गोष्टींचा सध्याच्या काळाशी विकृत संबंध जोडण्याने समाजाची प्रगती खुंटते. दुर्गाबाईंनी
बाबासाहेबांच्या रिडल्सला रामकृष्णांचे कोडे या पुस्तिकेतून चांगले उत्तर दिले आहे.
पवारांनी हे लक्षात घ्यावं की ही त्यांच्यावर टीका नाही. राजकारणी इतिहासाचा कसा फायदा घेतात, आणि प्राचीन गोष्टींचा relevance सध्याच्या काळात घेण्याने कसा तोटा होतो हे सांगण्याचा आहे.
अजून एक उदा. य. दि. फडके ज्यांना ब्राम्हणेतर समाज मानतो ( असे मला वाटते) त्यांनी एका पुस्तकात (विसाव्या शतकातील महाराष्ट्र) असे दाखवून दिले आहे की शाहू महाराज इंग्रजांना क्रांतीकारकांना अट्क करा अशी सारखी पत्रे लिहीत असत. म्हणजे त्यांना राष्ट्र्दोही म्हणायचे का ? असे आपण म्हणू शकत नाही कारण त्या काळात सर्व संस्थनिक ( मला वाटते पेशवे सोडून कारण १८५७ मुळे त्यांना ते शक्यही नव्हते) आपापला फायदा जपण्यास इंग्रजांशी दोस्ती राखून होते.
असो. खरे सांगायचे तर आपला समाज इतिहास पचवण्याइतका अजून प्रगल्भ झालेला नाही हेच खरे आहे. कारण आपल्या इतिहासात माणसे नाहीत, देव वावरतात.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
23 Apr 2010 - 9:48 am | Nile
वा! कुलकर्णीसाहेब संपुर्ण प्रतिसाद आवडला! चर्चा वाचतो आहे.
25 Apr 2010 - 7:28 pm | नीधप
असो. खरे सांगायचे तर आपला समाज इतिहास पचवण्याइतका अजून प्रगल्भ झालेला नाही हेच खरे आहे. कारण आपल्या इतिहासात माणसे नाहीत, देव वावरतात.<<<
वा परफेक्ट प्रतिसाद आणि हे वाक्य तर खासच.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
28 Apr 2010 - 8:11 pm | संदीप चित्रे
>> वा परफेक्ट प्रतिसाद आणि हे वाक्य तर खासच.
असंच म्हणतो
30 Apr 2010 - 1:09 pm | आंबोळी
सुंदर प्रतिसाद.....
>>खरे सांगायचे तर आपला समाज इतिहास पचवण्याइतका अजून प्रगल्भ झालेला नाही हेच खरे आहे. कारण आपल्या इतिहासात माणसे नाहीत, देव वावरतात.
हे वाक्य तर जबरदस्तच.....
आंबोळी
22 Jun 2010 - 8:22 pm | VarKari
इतिहासात माण्साचे देव कोणी केले ?
23 Apr 2010 - 10:49 am | इन्द्र्राज पवार
नमस्कार ... सध्या इथे (कोल्हापुरात) विजेचा लपंडाव चालु आहे, तेंव्हा उत्तराला थोडा विलम्ब लागेल, कृपया तेवढा वेळ द्या. धन्यवाद !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
23 Apr 2010 - 6:40 pm | वेताळ
हे लिहण्याची गरज आहे का इंद्रा.
सगळीकडेच विजेची बोंबाबोब आहे.
वेताळ
23 Apr 2010 - 11:10 am | इन्द्र्राज पवार
सॉरी.... दोन वेळा मेसेज आला.
23 Apr 2010 - 9:49 am | Pain
हुप्प्या आणि जयंत कुलकर्णी यान्च्याशी सहमत.
23 Apr 2010 - 11:21 am | नितिन थत्ते
दुसरीकडे एका चर्चेत मनुस्मृती आणि स्त्रिया याविषयी मी दिलेला प्रतिसाद. मनू*ची स्त्रियांविषयीची भूमिका यातून बर्यापैकी स्पष्ट होते.
यात अनेकांनी गौरवलेल्या 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' या श्लोकाचेही स्पष्टीकरण आहे.
* मनूची भूमिका म्हणजे तत्कालीन (इ स -२०० ते +२००) समाजाची स्त्रीविषयक भूमिका. येथे मनू म्हणजे चौदा पैकी कोणता.....मनू नावाचा कोणी होता की नव्हता.....वगैरे चर्चा अनाठायी होईल.
(स्वगतः हे फक्त स्त्रियांबाबत झाले. ब्राह्मण ब्राह्मणेतर संबंधासाठी अजून एक प्रतिसाद लिहावा लागणार) :(
नितिन थत्ते
23 Apr 2010 - 5:40 pm | इन्द्र्राज पवार
श्री जयंत जी, शुचि, नितिन, अक्षय, पेन, आणि हुप्प्या यांना एकत्रित प्रतिसाद देत आहे, तो कृपया मान्य करावा, कारण सर्वान्च्या निवेदात चागलेच साम्य आहे.
प्रथमच एक बाब इथे स्पष्ट करणे गरजेचे आहे की, मनुस्मृतीचा माझ्याकडून झालेला उल्लेख तो केवळ हिंदू धर्मातील परंपरेतील एका महत्वाच्या ग्रंथातील उदाहरणे या अर्थाने झाला होता. त्याचा उल्लेख हा ग्रन्थ ना तर त्यातील शब्द न शब्द मला प्रमाण आहे किंवा मी एका विशिष्ट जातील दूषण देत आहे किंवा दुस-या जातीचे वकीलपत्र घेतले आहे. मी अगदी मराठा समाजातील प्रमुख गटाचा प्रतिनिधी असून सुद्धा व कोल्हापुरातील शिवाजी पेठे सारख्या अत्यंत कड्व्या इतिहासाभिमानी भागात राहूनदेखील "शिव जयंती" ची वर्गणी देत नाही, कधी देणार नाही. कारण महाराजांच्या नावावर आम्ही मराठे लोक जो काही जातीवादाचा गोंधळ घालत आलो आहोत, तसेच ही विषमुळी नष्ट करण्याचा प्रयत्न करण-याला आमच्याच लोकांकडून होणा-या त्रासाची जाणीव म्हणा, याची चीड अन्य कोणत्या प्रकारे व्यक्त करायची याचे आकलन न झाल्याने माझ्यापुरता तरी मी तो वर्गणी न देण्याचा निर्णय घेतला आहे, त्याबद्द्ल घरातील थोरांच्या शिव्यादेखील खाल्ल्या आहेत. सांगायचा मुद्दा इतकाच की, एखाद्या ग्रंथाचा एखाद्या लेखात उल्लेख आला म्हणजे ते देणारी व्यक्ती पूर्णपणे त्या ग्रंथाला डोक्यावर घेते वा निरर्थक मानते असे नसते. ज्ञानेश्वरी पारायाणे करतो, वाचतो पण त्याचवेळी ज्ञानेश्वराने भिंत चालविली, आणि रेड्याकडून मंत्र म्हणवून घेतले, या बाबी सत्य मानणा-यांची संख्या का कमी आहे का ही बाब देखील पाहतोच ना? त्याच न्यायानुसार त्या दोन्ही बाबी थोतांड आहे असे मानणारे देखील आहेतच. पण हा दुसरा गट ज्ञानेश्वरीचे महत्व कमी करा असे कधी म्हणणार नाही.
श्री जयंतराव म्हणतात त्यानुसार मनुस्मृतीला झोडपणे हा एक राजकारणीय समाज नीतीचा आणि रचनेचा परिपाक आहे, त्याशिवाय सभेला आलेल्या समुदायाकडून टाळ्या मिळत नाही. अर्थात भारतातील राजकारण हा एक स्वतंत्र धाग्याचा विषय आहे, आणि जर संधी मिळाली तर आपण तो एक वेगळा धागा करू. इतिहास पचवायला आपला समाज अजून प्रगल्भ झालेला नाही ही बाब खरीच आहे, कारण आपले मन हे फार भाबडे आहे आणि इतिहासातील व्यक्तींना आपण कधी देवपण देऊ याची घाई झालेली असते. भवानी तलवार हा एकच विषय घेतला तर ही बाब प्रकर्षाने जाणवते. मराठा समाज राहू दे, ब्राह्मण समाजातील किती लोक पुढे येतील आणि महाराजांच्या आयुष्यात अशी कोणी "भवानी माता" प्रकट होऊन त्यांना तलवार दिली असल्याचे शक्य नाही असे म्हणेल? फार कमी. कारण समाज हा आक्रस्ताळी असतो व त्याला चमत्काराचा सोस असतो. आज दगडूशेट गणपती असो, वा लालबागचा राजा असो, शिर्डी असो वा आमच्याकडील जोतीबा असो. त्यामारुतीच्या शेपटीसारख्या त्या रांका पाहिल्यानंतर असेच वाटेल की भारतामध्ये प्रमुख धंद्याची ठिकाणे ही धर्मस्थळे आहेत. (माझे दिल्ली व लखनौ येथील दोन हिंदी भाषिक ब्राह्मण मित्र असे म्हणतात की "तुम्ही महाराष्ट्रातील लोक जगावेगळे आहात. आम्हाला नेहमी आश्चर्य वाटते की तुम्ही प्रमुख देवता सोडून देवांच्या नोकर वर्गाची इतक्या भक्ती भावाने कशी काय पूजा करीत असता?" त्यांच्या दृष्टीने गणपती व हनुमान (तसेच दत्त) हे देव नसून देवांच्या दारातील नोकर आहेत. यावर आपण काय युक्तिवाद घालणार? असो. प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
23 Apr 2010 - 6:59 pm | sagarparadkar
इन्द्रा यान्चे उत्तर फारच समर्पक वाट्ले. श्री जयन्त कुलकर्णी यान्चे पन विचार पटले.
हल्लीच्या काळात कोण मनुस्म्रुति मानतोय? हिन्दु लोक कालानुसार बद्लत आहेत, म्हनुनच आप्ला धर्म "एक पुस्तक, एक मसीहा" या तत्वापासून दूर आहे, जे सर्वात उत्तम आहे.
महिला वर्ग तर आता नक्कीच प्रगती कर्तोय, व करत राहील. माझ्या पहाण्यात कित्येक महिला अशा आहेत, कि त्या एकटीच्या जिवावर अक्ख कुटुम्ब चालव्ताहेत.
23 Apr 2010 - 6:35 pm | जयंत कुलकर्णी
मी जे लिहीले होते ते हुप्प्या यांच्या प्रतिक्रियेवर माझी प्रतिक्रिया म्हणून. मला कोणी तरी हे सांगेल का की मुळ लेखावर कशी प्रतिक्रिया द्यायची ?
पवारांसार्खी रॅशनल माणसे त्यांच्या समाजात निपजली तर त्यांचाच फायदा आहे. मी बाकीची उदा. दिली ती त्या विचाराच्या ओघात (soft targets) च्या संधर्भात. मला वाटते तसे मी स्पष्ट केलेच होते.
बाकीची माझी मते नसून निरिक्षणे आहेत. यातला फरक समजवून घेतला पाहिजे.माझा विचार या वाक्यात आहेत.
१ इतिहासातील गोष्टींचा सध्याच्या काळाशी विकृत संबंध जोडण्याने समाजाची प्रगती खुंटते.
२ खरे सांगायचे तर आपला समाज इतिहास पचवण्याइतका अजून प्रगल्भ झालेला नाही हेच खरे आहे. कारण आपल्या इतिहासात माणसे नाहीत, देव वावरतात.
तुम्ही कुठल्याही जातीला दुषणे देता किंवा कोणाचे तरी वकीलपत्र घेतले आहे हे मला तेव्हाही वाटले नव्हते आणि आत्ताही वाटत नाही. खरंतर माझ्या मित्रांमधे असा विचार करणारे नाहीत याचा मला प्रथमच खेद झाला.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
23 Apr 2010 - 6:54 pm | वेताळ
माझे दिल्ली व लखनौ येथील दोन हिंदी भाषिक ब्राह्मण मित्र असे म्हणतात की "तुम्ही महाराष्ट्रातील लोक जगावेगळे आहात. आम्हाला नेहमी आश्चर्य वाटते की तुम्ही प्रमुख देवता सोडून देवांच्या नोकर वर्गाची इतक्या भक्ती भावाने कशी काय पूजा करीत असता?
बाकी महत्वाच्या देव देवताची पुजा करुन हिंदी भाषिक पट्ट्यातील लोकानी काय दिवे लावलेत ते तुम्ही त्याना कधी विचारलेत काय?
जवळ जवळ हजार वर्षे ते गुलामगिरीतच रहात होते ना?
तसेच
कारण महाराजांच्या नावावर आम्ही मराठे लोक जो काही जातीवादाचा गोंधळ घालत आलो आहोत,
कोल्हापुरात कधीच शिवाजी महाराजांवरुन जातीय दंगल किंवा वाद झालेचे एकिवात नाही. झाल्या असल्यास संदर्भ द्या.
वेताळ
23 Apr 2010 - 8:00 pm | जयंत कुलकर्णी
मला वाटते पवारांना जे म्हणायचे आहे ते आपणास कळलेले दिसत नाही. मी दिलेल्या आव्हाडांच्या उदा. बद्दल बोलताएत ते.
मला वाटते, प्रतिक्रियांचा रस्ता बदललाय.त्यामुळे मी आता थांबतो.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
23 Apr 2010 - 7:25 pm | शेखर जोग
कुठल्याही स्त्रीला प्रत्येक व्यक्तीने स्वतः एवढाच मान द्यावा.
स्त्री ला कमी लेखून अवमान करू नये तसेच देवी म्हणून डोक्यावरही चढवू नये. याबाबतीत मी नुकत्याच 'कुमुमाग्रज एक पुर्नभेट' या लेखात दिलेल्या त्यांच्याच कवितेतील दोन ओळी परत देतो.
समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडु नका !
दासी म्हणूनी पिटु नका व देवी म्हणूनी भजू नका !!
'कुसुमाग्रज' स्वातंत्रदेवीची विनवणी
23 Apr 2010 - 9:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सुंदर ओळी निवडल्यात तुम्ही!
इंद्र, अतिशय संतुलित आणि विचारपूर्ण लेख! जयंतराव, तुमचे प्रतिसादही आवडले.
(एक व्यक्ती) अदिती
23 Apr 2010 - 10:05 pm | नितिन थत्ते
मनुस्मृती कोण पाळतोय हल्ली असा सूर अनेकांनी इथे लावला आहे. हे म्हणणे बरोबर अस्ले तरी मनुस्मृती मनातून गेली आहे असे वाटत नाही. आजही अनेकदा जालावर धागे निघत असतात आणि त्यावर प्रतिसाद देणारे बर्याचदा "असतील काही अन्यायकारक वचने मनुस्मृतीत पण तशीच ही ही वचने ही आहेत.... अगदीच टाकाऊ म्हणता येणार नाही" अशा स्वरूपाचे प्रतिसाद देत असतात.
म्हणून प्रत्येकवेळी मनुस्मृतीचे खंडन करावे लागते.
याला कारण जुन्याचे प्रेम हे असते. मी अनेक आधुनिक मॅनेजमेंटच्या (भारतीय लेखकांनी लिहिलेल्या) पुस्तकांत "या विषयावर मनूने...... असे म्हटले आहे" असे लिहिलेले पाहिले आहे.
नितिन थत्ते
25 Apr 2010 - 7:27 am | हुप्प्या
मनुस्मृती ग्रंथ हा परमेश्वराचा अखेरचा शब्द आहे. त्यात काडीचाही बदल, सुधारणा संभवत नाही असे कुणी म्हटल्याचे मला आठवत नाही. अन्य काही पंथात ह्या प्रकारचा विचार त्यांच्या ग्रंथाच्य संबंधात वारंवार आळवला जातो. त्या पार्श्वभूमीवर मनुस्मृतीचे तितकेसे प्रस्थ आजिबात नाही. त्यात दोन चार उपयुक्त विचार आहेत का नाहीत यापेक्षा त्या ग्रंथात कालबाह्य, चुकीचे आढळल्यास ते तसे आहे हे कबूल करण्याचा प्रगल्भपणा हिंदू धर्मीयात आहे का नाही? का मनुस्मृतीतील दोष काढल्यास हिंदूत्व खतरेमें अशा आरोळ्या ठोकत बाँबस्फोट, आत्मघातकी हल्ले, मनुच्या काळातले हिंदूत्व पुन्हा एकदा पुनर्जिवित केले पाहिजे असे विचार ठासून मांडणारे महात्मे अशा घटना /घडामोडी घडताना दिसतात का?
तसे नसेल तर मनुस्मृतीचा प्रभाव जनमानसावर नाही असेच म्हटले पाहिजे.
गेल्या दोनचार पिढ्यात उच्चवर्णीयात ह्या जुनाट प्रथा मोडून काढायची वृत्ती वाढत असताना मनुस्मृतीत आहे म्हणून आज तमाम उच्चवर्णीयांना वाटेल तसे झोडपूण काढायची वृत्ती समाजातील काही घटकात आजही आहे. स्वस्तात टाळ्या मिळवायचा वक्त्यांचा हा एक हमखास डायलॉग आहे. पण तो तसा असता कामा नये.
25 Apr 2010 - 9:51 am | नितिन थत्ते
दोनचार पिढ्यांत उच्चवर्णीयांत या प्रथा मोडून काढायची प्रवृत्ती वाढत आहे हे मान्य. 'तमाम उच्चवर्णीयांना वाटेल तसे झोडपून' हे अमान्य.
मनुस्मृतीचा प्रभाव ९६.५ टक्के लोकांवर नाही यात काही संशय नाही. उरलेल्या ३.५ टक्के लोकांपैकी काही लोकांमध्ये अजून जुन्याचे प्रेम आहे.
मी वर ज्या उपक्रमावरील चर्चेचा संदर्भ दिला आहे त्याची सुरुवात खालील प्रमाणे होती.
मनूने स्त्रियांना गुलाम करा असे म्हटले आहे, हा मनुस्मृती कधीही न वाचताच ऐकीव हिंदुविरोधी कम्युनिस्ट प्रचाराला बळी पडलेल्यांचा समज आहे. 'न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति' असे मनुस्मृतीत म्हटले आहे. काही पुरोगामी स्त्रिया, तर मनुस्मृती न वाचता पाच हजार वर्षांपूर्वी आम्हाला व्यक्तिस्वातंत्र्य नव्हते असा आक्रोश करत असतात. प्रत्यक्षात मनू हा अतिशय समतावादी होता असे म्हणतात. उदाहरणार्थ मनूने म्हटले आहे :
•अनुरूप वर मिळत नसल्यास मुलीचे लग्नच करू नये.
•ज्या घरात स्त्री सुखी असते ते घरही सुखी असते.
•स्त्री आणि लक्ष्मीत भेद नाही.
प्रस्तावकाने मनुस्मृती लागू करावी असे म्हटले नसले तरी मनुस्मृतीवर अकारण टीका केली जाते असे म्हटले.
अशा लोकांना मग शब्दांनी - दाखले देऊन झोडपून काढावे लागते.
या प्रस्तावावरील प्रतिसादात सुद्धा कुणीकुणी ब्राह्मणांना कसली कसली बंदी होती असे म्हटले आहे. काहीतरी चांगले आणि सर्वांना समानतेने वागवणारे लेखन (त्यांना जशी बंधने तशीच यांनाही बंधने) मनुस्मृतीत आहे असे दाखवण्याचा हा प्रयत्न.
हवे असल्यास 'आपद्धर्म म्हणून' असे निषेध मोडण्याचा सल्ला (फक्त ब्राह्मणांसाठी) देणारी मनुस्मृतीतली वचने देतो.
झोडण्याचे कारण मनुस्मृती वाईट हे नसून आम्हाला अजून मनूचे प्रेम सुटत नाही हे आहे.
नितिन थत्ते
27 Apr 2010 - 3:14 pm | मृगनयनी
इथे मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, की "मनुस्मृती" लिहिणारा "मनु" हा जन्माने ब्राह्मण नसून "क्षत्रिय" होता. :-? :-? =)) =))
अर्थात "हे" सत्य खूप कमी लोकांना माहित असावे!.. :-?
मनुस्मृती'वर विश्वास कितपत ठेवायचा, किन्वा ठेवायचा की नाही.. हा अर्थातच प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे..
पण आम्बेडकरांनी "मनुस्मृती" चे दहन केले.. म्हणजे ती ब्राह्मणांनीच लिहिलेली असावी.. असा "गैर"समज बहुधा समाजात रुढ झालेला दिसतोय.. :(
इन्द्रजित'जी आपण जर तत्कालीन ब्राह्मणांनी लिहिलेल्या "ऋग्वेद", "यजुर्वेद" यांचा अभ्यास केला तर इतरही अनेक "पॉझिटीव्ह" गोष्टी आपल्या लक्षात येतील. कारण या "वेदां"मध्ये स्त्रियांना आपापला जोडीदार निवडायचा पूर्ण अधिकार दिलेला आहे. वर्णाश्रमावर आधारित लोकसंस्कृतीमुळे त्या काळी ब्राह्मण मुलीने ब्राह्मण मुलाबरोबर विवाह करणे अधिक उचित मानले जायचे. परन्तु त्याच काळात"ब्राह्मण - क्षत्रिय " यांची "अरेंज-मॅरेजेस"ही झाल्याचे आढळते उदा. माता रेणुका(राजकन्या)- जमदग्निऋषी (हो-- हेच ते भगवानविष्णुचे परशुरामाच्या अवतारातील माता-पिता!!!!!!) , ययातिराजा-देवयानी(ऋषीकन्या), अगस्तिऋषी-लोपामुद्रा(राजकन्या), च्यवनऋषी-सुकन्या(राजकन्या), दुष्यंतराजा- शकुन्तला( ब्राह्मण-मानसकन्या) इ.इ..
वेदांनी स्त्रियांना शिक्षणाचे, स्वातंत्र्य उपभोगण्याचे परिपूर्ण अधिकार दिलेले आहेत. (अर्थात स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे- हे स्त्रियांनीही लक्षात ठेवणे तितकेच महत्वाचे आहे. कारण सुसंस्कृत ,सद्विचारी स्त्री-- मग भले ती कोणत्याही जाति-धर्मातील, समाजाच्या कोणत्याही स्तरावरची असो.. ती लक्ष्मी'चेच रुप असते.)
त्या काळी तत्कालीन परिस्थितीनुसार स्त्रिया अर्थार्जन करीत नसत!
परन्तु, इंग्रजांमुळे ही परिस्थिती बदलली.. आणि महर्षि कर्वे, रघुनाथ कर्वे, म. फुले, सावित्रीबाई फुले, आगरकर इ. समाजसुधारकांमुळे स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली.
आणि आजही संपुर्ण समाजाचा जर आढावा घेतला, तर जास्तीत जास्त ब्राह्मण कुटुम्बांमध्येच स्त्रियांना स्वातंत्र्य असल्याचे आढळुन येइल. त्याचप्रमाणे शिक्षणाच्या आणि करियर'च्या बाबतीतही .. अगदी कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ न घेता ब्राह्मण मुलीच पुढे असल्याचे दिसेल.
पण सद्यस्थितीनुसार समाजात कारण नसताना ब्राह्मण समाजाला बदनाम करण्याचे काम काही विद्रोही 'सी-ग्रेडी ब्रिगेड्स' करत आहेत. ब्राह्मण समाजातील -"शिवाजीमहाराजांचे गुरु"- स्वामी रामदासांपासून ते न्यायमूर्ती रानड्यांपर्यंत .... शिवाजीमहाराजांचे माननीय मार्गदर्शक- दादोजी कोन्डदेवांपासून ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्यांपर्यंत कोणीही या बदनामी पासून सुटलेले नाहीत. :(
असो... सांगण्याचा उद्देश इतकाच की, पूर्वीच्या ऋषी- मुनींनी लिहिलेली अमूल्य ग्रन्थसंपदा -आज सुदैवाने आपल्यापर्यंत सुस्थितीत पोचलेली आहे.. हे खरोखर आपले भाग्यच म्हणावे लागेल. :) केवळ "ब्राह्मणांनी" लिहिलय म्हणुन त्याला प्रत्यक्षपणे किन्वा अप्रत्यक्षपणे नावे ठेवण्यापेक्षा त्याचा डोळसपणे विचार आणि वापर केला तर सर्वच समाजाला अधिक फायदा होईल.
|| जय परशुराम ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
27 Apr 2010 - 5:55 pm | इन्द्र्राज पवार
".......तत्कालीन ब्राह्मणांनी लिहिलेल्या "ऋग्वेद", "यजुर्वेद" यांचा अभ्यास केला तर इतरही अनेक "पॉझिटीव्ह" गोष्टी आपल्या लक्षात येतील..."
मृगनयनी जी...... असा अभ्यास जरूर करेन, पण यांचा अभ्यास केलेला नसला तरी याचे वाचन या ना त्या निमित्ताने झाले आहे, (अर्थात "अभ्यासक" दृष्टीने अशा ग्रंथाकडे पाहणे ही सर्वस्वी वेगळी बाब आहे, आणि ती वरवरची नाही हे नक्कीच !). प्रश्न असा आहे की, ज्या "पॉझिटीव्ह" गोष्टींचा विचार आपल्या मनात आहे त्या व तशा मनुस्मृती असो, गीता असो, बायबल असो वा कुराण असो, अशा धार्मिक ग्रंथात प्रकर्षाने आढळतातच. मुद्दा असा आहे की कोणताही (अशा प्रकारचा) ग्रंथ निव्वळ "पॉझिटीव्ह" व "निगेटिव्ह" कधीच असू शकत नाही. प्रत्येकाची सांगण्याची, मांडण्याची धाटणी स्वतंत्र म्हणून "मान्य" "अमान्य" यांची भूते प्रत्येक पिढीत नाचत असतातच, किंबहुना आपली संकृती, परंपरा वा नीतीनियम यांची घोंगडी अशा मान्य-अमान्य धाग्यातूनच तयार झालेली आहे..... होत राहील.
धर्म जात भेद पोटभेद या पलीकडे जाऊन अगदी वादातीत निरपेक्ष वृत्तीने काही वेळा समाज जीवनात घडत असणा-या बाबींकडे पाहिले असता कित्येक वेळा आपणास असे दिसून येईल की, आजही "अमुक अमुक ग्रंथात तसे सांगितले आहे म्हणून तमुक तमुक उपचार केले" मग त्याचे परिणाम "सु" असो वा "दु" असो तिथे याची पर्वा नसते. मग इथे परत आपण म्हणता त्याप्रमाणे "पॉझिटीव्ह" वा निगेटिव्ह" यांचे मंथन सुरू होते....वाद घडतात....एकमेकांच्या प्रथेंची उणीदुणी काढली जातात....आणि अपरिहार्यातामुळे परत नदीच्या उगमाकडील प्रवास.....हे एक दुष्ट चक्र आहे, जे विज्ञान युगात शाप ठरू शकते.
ब्राह्मणांनी लिहिले म्हणून ते ग्रंथ टाकाऊ असे कुणी ब्राह्मणेतर मानत असेल तर तो शुद्ध वेडेपणा होईल....नव्हे आहेच. मी मराठा जातीचा असलो तरी या ग्रंथांची शिकवण मला (आणि माझ्यासारख्याच विचारांच्या तीन चार विद्यार्थ्यांना....) एका "जेरे" नावाच्या ब्राह्मण अभ्यासकानेच दिली व त्यातील सौंदर्याचे मर्म उलगडून दाखविले होते. मला पंचगंगा नदीत व रंकाळा तलावात पोहायला शिकविणारे "परांजपे सर" हे ब्राह्मणच, तर "इंग्लिश" विषय घेऊनच पदवी, पदव्युत्तर शिक्षण घे असे सांगणारे "कुलकर्णी सर" देखील ब्राह्मणच.... इतकेच काय इथे आज या "मिसळपाव" संस्थळावर मला आग्रहाने आणणारे सदस्य हे देखील ब्राह्मणच आहेत. ना त्यांना एका "मराठ्याला" मार्गदर्शन करण्यात अडचण वाटली, ना मला त्यांच्याकडून ते घेण्यासाठी संकोच वाटला ! अशा घटना समंजसपानाचे लक्षण असते, तिथे केवळ एक व्यक्ती हा एकाच घटक महत्वाचा मानला तर "तेढ" नावाचे एलेमेंट आपल्या संधिसाधू राजकारण्यानी आपल्या भूमीत पेरले आहे तिचा निश्चितच नाश होईल.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! (वास्तविक तुमचे विवेचन हा एक स्वतंत्र धागा होऊ शकला असता.... पुन्हा कधीतरी !)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
27 Apr 2010 - 6:20 pm | नितिन थत्ते
मनू ब्राह्मण होता की क्षत्रिय हे सत्य गैरलागू आहे. कारण सध्या असलेली मनुस्मृती हे भृगुकुलाने इ स च्या मागेपुढे केलेले संकलन आहे.
मी वर ३.५ टक्क्यांच्या मनातून जुन्याचे प्रेम जात नाही हे जे म्हटले आहे त्याला साजेसाच मृगनयनीचा प्रतिसाद आहे.
मनुस्मृती ऐतिहासिक ठेवा म्हणून त्याकडे पहायला हरकत नाही. त्याकाळची विचारसरणी म्हणून अभ्यासायलाही हरकत नाही.
पण कुठल्याही प्रकारे मनुस्मृतीत उदार/उच्च/उदात्त विचारसरणी होती हे म्हणणे मान्य नाही. तसे कोणी म्हणू पहात असेल तर त्या व्यक्तीस (शब्दांनी) झोडल्याशिवाय चालणार नाही.
नितिन थत्ते
28 Apr 2010 - 5:27 pm | मृगनयनी
नितिन थत्ते..., मनू हा ब्राह्मण नसून क्षत्रिय होता!.. हे सत्य बर्याच जणांना माहित नसते. (मला काहींचे तसे व्य. नि. देखील आले.) :)
त्याचप्रमाणे इन्द्रराज' यांनी मनुस्मृती'चा संदर्भ देताना "ब्राह्मण" जातीचा बर्याचदा उल्लेख केल्याचे आढळले.
तसेच आम्बेडकरांनी "मनुस्मृती" जाळली.. म्हणजे... ती ब्राह्मणांनीच लिहिलेली असावी.. असे मानणारा समाज हा ९८% आहे. :-? =))
त्यामुळे मनू'च्या क्षत्रियत्वाचा उल्लेख करणं मला भाग पडलं..
आणि मनुस्मृती'चे संकलन भृगू-वंशजांनी केलंय... तर ते नक्कीच कौतुकास्पद आहे.. जर ते केलं नसतं... तर आज तुमच्यासारख्या अभ्यासू लोकांना तो अमूल्य "ऐतिहासिक ठेवा"मिळण्यापासून वंचित रहावं लागलं असतं! ;)
मला मनुस्मृती'चं उदात्तीकरण वगैरे करायची बिल्कूल इच्छा नाही. कारण तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जमीन-अस्मानाचं अन्तर आहे.
परन्तु ऋषी-मुनींनी लिहिलेल्या वेदांची, उपनिषदांची चेष्टा करणार्यांना मात्र खरोखरच्या खराट्याचे फटके मारले पाहिजेत.
कारण वेदांनीच स्त्री'ला लक्ष्मी, सरस्वती, गौरी, गायत्री, काली या देवीच्या रूपात प्रथम पाहिले आहे. तिला योग्य तो मान्-सन्मान, शिक्षणाचा अधिकार , जोडीदार निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. तत्कालीन परिस्थितीनुसार स्त्रियांनी अर्थाजन करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नव्हता... कारण तेव्हाची समाज व्यवस्था ही कागदी नोटांवर नाचत नव्हती!
त्याचप्रमाणे पूर्वी ऋषी-मुनींनी शेती-विज्ञानाबद्दल, वैद्यक शास्त्राबद्दल , तंत्रज्ञानासंदर्भात, आयुर्वेदाबद्दल जे काही लिहून ठेवलेले होते.. .त्याचा फायदा आता आपल्याला होतो आहे. सध्या आपण "मॉडर्न टेक्नॉलॉजी" म्हणून जे काही शोध लावले... ते कित्येक वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी यशस्वीरीत्या लावलेले होते.उदा- पुष्पक विमान.. अर्थात.. त्यांची मांडणी करायची पद्धत थोडी वेगळी होती.
तसेच नृत्यकला, संगीतसाधना, वादन-कला इ. कला आणि त्यांची विविधता आपल्याला वेदांमुळेच मिळाली (सामवेद)
मनाच्या तेजस्वितेसाठी असलेला पवित्र "गायत्री मंत्र", पर्जन्यवृष्टीसाठी "वरूण मन्त्र", अग्नि-मंत्र , सूर्य-मंत्र .. इ. आणि अजून काही असंख्य मंत्र अथर्ववेद, वेदांमधील ऋचा, उपनिषदे यांच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत.. आणि आजच्या जमान्यातही हे मंत्र विलक्षण प्रभावी आहेत.
उदा. रोज सकाळी सूर्य उगवताना त्यास अर्घ्य देऊन १२ वेळा श्रद्धापूर्वक सूर्यमंत्र म्हटला असता... डोळ्यांचे आरोग्य उत्तम रहाते. तसेच चष्मा असणार्यांचा नंबर, हा उपाय नियमित केला असता झपाट्याने कमी होतो.
______________
परन्तु, इंग्रजांच्या राजवटीपासून आणि नंतर काही समाजविघातक शक्तींमुळे पवित्र -मन्त्र शक्तीची हेटाळणी होऊ लागली. तसेच संपूर्ण समाजाची वृत्ती ही पूर्णपणे "मनी-ओरिएंटेड" झाल्यामुळे मंत्र-तंत्र हे फक्त "काला जादू" म्हणूनच वापरले जातात.. असा गैरसमजही रूढ झाला.
पण गंमत अशी, की इन्डोनेशिया,मलेशिया इ. पौर्वात्य देशांनी आणि अमेरिका, युरोप येथील अनेक संस्थांनी या मंत्रांच महत्व पर्यायाने ऋषी-मुनींनी भारताला बहाल केलेल्या अमोलिक देणगीचं महत्व ओळखलेलं आहे. आणि त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी विविध प्रोजेक्ट्स वरती काम चालू आहे.
ज्याप्रमाणे मूळच्या भारतीय संस्कृतीत असलेलं "योगा" पाश्चात्यांनी आपलंसं केल्यावर मग आपल्याकडे त्याचं महत्व वाढू लगलं... त्याप्रमाणे कदाचित या पूर्वापार चालत असलेल्या महान वेदोपनिषदांचं महत्व तेव्हा सिद्ध होईल, जेव्हा "बाहेरची" लोकं आपल्याला आपल्याकडे असलेल्या अमोलिक ठेव्याची जाणीव करून देतील आणि मग मात्र हे बहु-संख्य - तथाकथित पुढारलेले लोक - द्राविडी प्राणायाम(आधी शिकून घेऊन आणि मग) करून पुन्हा नव्याने "जुन्याचे प्रेम" आपलेसे करतील!
काहीही म्हणा... पण पाश्चात्यांनी भारतीय झाडू फिरवल्याशिवाय काही लोकांच्या बुद्धीला लागलेली जळमटं झटकली जात नाही.. हेच खरं! :)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
28 Apr 2010 - 6:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बरं झालं हे डच आणि इटालियन लोकांना माहित नव्हतं नाहीतर पहिला टेलिस्कोप बनवायला फार काळ लागला असता.
दुर्बीण होती का या जुन्या पुस्तकांमधे? माझा या विषयाचा अभ्यास नाही म्हणून विचारलं.
:B अदिती
28 Apr 2010 - 5:52 pm | शैलेन्द्र
"सध्या आपण "मॉडर्न टेक्नॉलॉजी" म्हणून जे काही शोध लावले... ते कित्येक वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी यशस्वीरीत्या लावलेले होते.उदा- पुष्पक विमान.. अर्थात.. त्यांची मांडणी करायची पद्धत थोडी वेगळी होती. "
हो हो .. अगदी, पुष्पक विमनाला जोड्ण्यासाठी गरुडांची एक खास जातही विकसीत केली गेली होती, काळाच्या ओघात ते सगळे जंगलात निघुन गेले.
"रोज सकाळी सूर्य उगवताना त्यास अर्घ्य देऊन १२ वेळा श्रद्धापूर्वक सूर्यमंत्र म्हटला असता... डोळ्यांचे आरोग्य उत्तम रहाते. तसेच चष्मा असणार्यांचा नंबर, हा उपाय नियमित केला असता झपाट्याने कमी होतो."
जर झाला नाही तर श्रध्दा कमी पडली असेच ना?
28 Apr 2010 - 6:05 pm | मृगनयनी
शैलेन्द्र, पुष्पक विमानाला गरुड जोडायची आवश्यकता नसते. त्यामुळे जंगलात निघून गेलेले "गरूड" हे "ते" नसतील! :)
कदाचित माणसाने माणूसपण सोडल्यामुळे गरूड त्यांचे गरूड-पण टिकवण्यासाठी दूर निघून गेले असतील! आपण त्यांना डिस्कव्हरी' वर बघू शकता!
आणि तुम्हाला चष्म्याचा नम्बर कमी करायचा असेल तर हा उपाय करून पहा... अगदी ६० व्या वर्षी देखील चष्मा कायमस्वरूपी जाऊ शकतो!..
आणि हो... 'श्रद्धा' ही तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. काही कुचकामी शंकासूरांमुळे "श्रद्धा" डळमळीत झाली, तरी.. सूर्याची तेजस्वी किरणं त्यांचं काम व्यवस्थित करतील.... त्यामुळे मनात शंका न आणू देता सूर्योपासना नियमित चालू ठेवणे केव्हाही उचित ठरेल!
डोळे नक्की उघडतील!.....
अं.. अं....
म्हणजे.... नक्की सुधारतील!!! :)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
28 Apr 2010 - 6:19 pm | शैलेन्द्र
"शैलेन्द्र, पुष्पक विमानाला गरुड जोडायची आवश्यकता नसते. त्यामुळे जंगलात निघून गेलेले "गरूड" हे "ते" नसतील!"
वा, तुम्हांला अगदी खत्रीशीर माहीती दिसते, कशावर चालायच हो हे विमान मग? म्हणजे त्याकाळीही खनीज तेल नव्हत, ऊद्याही नसेल.. तुम्ही त्या इंधनाच पेटंट घेवुन ठेवा.
"आणि तुम्हाला चष्म्याचा नम्बर कमी करायचा असेल तर हा उपाय करून पहा..."
मी सुर्य नाही पण रोज बरेच चंद्र पाहतो, डोळे निवतात. त्यामुळे चष्मा नाही.
"काही कुचकामी शंकासूरांमुळे "श्रद्धा" डळमळीत झाली, तरी.."
शंकासुरांना कुचकामी म्हणु नका, जगात जी थोडीफार सुधारणा व विकास होतो तो या कुचकामी लोकांमुळेच...
29 Apr 2010 - 12:10 am | इन्द्र्राज पवार
शंकासुरांना कुचकामी म्हणु नका, जगात जी थोडीफार सुधारणा व विकास होतो तो या कुचकामी लोकांमुळेच...
ग्रेट !! खरं तर हे प्रकटन एका नविन धाग्याचा विषय होऊ शकतो.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
30 Apr 2010 - 2:12 pm | चक्रमवेताळ
माझे आजोबा शतायुषी होते व माझ्या देखत मी चाललो रे असे म्हणत त्यानी प्राणत्याग केला. त्यांची नजर खूप कमजोर होती जन्मापासून च ११-१२ नंबर होता. (अर्थात हे नंतर कळले कारण त्याकाळी त्यांना चष्माच १४ व्या वर्षी मिळाला) जवळपास सारे उच्च शिक्षण त्यांनी केवळ श्रवण आणि स्मरण या आधारे केले. मला त्यांचा २५ वर्षांचा अखंड सहवास मिळाला आहे.
मोतिबिंदूच्या ऑपरेशन नंतर दे़खील फार सुधारणा होईना म्हणून त्यांनी १९८५ मधे चांदी ची सूर्य प्रतिमा करुन रोज सकाळी ७-७.३० वा. अंगणात पूर्वेकडे अभिमुख आसना मधे चाक्षुषोपनिषदाचा व सौर सूक्ताचा पाठ आमच्या गुरुजींच्या सल्याने केला. मी समक्ष त्यांच्या नजरे मधली सुधारणा अनुभवली आहे.
28 Apr 2010 - 6:08 pm | नितिन थत्ते
>>तसेच आम्बेडकरांनी "मनुस्मृती" जाळली.. म्हणजे... ती ब्राह्मणांनीच लिहिलेली असावी.. असे मानणारा समाज हा ९८% आहे.
९८% टक्के (हा आकडा तुम्हीच दिला आहे) लोकांना वाटते ते खरेच आहे. कारण आज उपलब्ध असलेली मनुस्मृती (इ. स. ६०० पासून जशीच्या तशी उपलब्ध असलेली) ब्राह्मणांनीच संकलित केलेली आहे. संकलित करताना स्वतःची महती आणि स्वतःला सोयीची वचने घुसडली आहेत. मूळ मनू क्षत्रिय होता की शूद्र होता हे गैरलागू मुद्दे आहेत. आणि बिनमहत्त्वाचे आहेत.
>>कारण वेदांनीच स्त्री'ला लक्ष्मी, सरस्वती, गौरी, गायत्री, काली या देवीच्या रूपात प्रथम पाहिले आहे.
>>मनाच्या तेजस्वितेसाठी असलेला पवित्र "गायत्री मंत्र", पर्जन्यवृष्टीसाठी "वरूण मन्त्र", अग्नि-मंत्र , सूर्य-मंत्र .. इ. आणि अजून काही असंख्य मंत्र अथर्ववेद, वेदांमधील ऋचा, उपनिषदे यांच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत.. आणि आजच्या जमान्यातही हे मंत्र विलक्षण प्रभावी आहेत.
उदा. रोज सकाळी सूर्य उगवताना त्यास अर्घ्य देऊन १२ वेळा श्रद्धापूर्वक सूर्यमंत्र म्हटला असता... डोळ्यांचे आरोग्य उत्तम रहाते. तसेच चष्मा असणार्यांचा नंबर, हा उपाय नियमित केला असता झपाट्याने कमी होतो.
>>सध्या आपण "मॉडर्न टेक्नॉलॉजी" म्हणून जे काही शोध लावले... ते कित्येक वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी यशस्वीरीत्या लावलेले होते.उदा- पुष्पक विमान.. अर्थात.. त्यांची मांडणी करायची पद्धत थोडी वेगळी होती.
=)) =)) चालू द्या. असो. लवकरच पश्चिमेतले (की इंडोनिशिया मलेशियातले?) चष्म्यांचे कारखाने बंद पडणार आहेत अशी इन्सायडर टिप दिल्याबद्दल धन्यवाद. कुणा मिपाकरांकडे त्या कंपण्यांचे शेअर असतील तर ते विकून टाकावे.
गेल्यावर्षी वरुणमंत्र म्हणून पाहिला होता का? नाही...पाऊस पडला नाही म्हणून विचारतोय.
>>पण गंमत अशी, की इन्डोनेशिया,मलेशिया इ. पौर्वात्य देशांनी आणि अमेरिका, युरोप येथील अनेक संस्थांनी या मंत्रांच महत्व पर्यायाने ऋषी-मुनींनी भारताला बहाल केलेल्या अमोलिक देणगीचं महत्व ओळखलेलं आहे. आणि त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी विविध प्रोजेक्ट्स वरती काम चालू आहे.
पुन्हा तेच. चालू द्या.
>>मूळच्या भारतीय संस्कृतीत असलेलं "योगा" पाश्चात्यांनी आपलंसं केल्यावर मग आपल्याकडे त्याचं महत्व वाढू लगलं.
>>पण पाश्चात्यांनी भारतीय झाडू फिरवल्याशिवाय काही लोकांच्या बुद्धीला लागलेली जळमटं झटकली जात नाही
असेल. पण त्यांनी सांगितले म्हणून आम्ही ते मान्य करतो असे तुम्हाला वाटत असेल तर तसे काही नाही. मी तरी अजून योगाच्या सहाय्याने रोग बरे करता येतात यावर विश्वास ठेवत नाही. एकूण 'व्यायाम करण्याने' जेवढे फायदे लाइफस्टाईल आजार वगैरेमध्ये होतात त्याहून काही खास फायदे योगासने करण्याने होत नाहीत असेच मी मानतो. (कुंकुमादितैलम वापरल्याने गोरेपणा वाढतो असे युनिलिव्हरने सांगितले तरी मी त्यावर विश्वास ठेवत नाही). ;)
तसेच तुमच्या दयाळू माहितीसाठी : मनुस्मृतीवर टीका मी बुह्लरचे भाषांतर वाचून करीत नाही. भारतीयांची पुस्तके वाचूनच करतो.
नितिन थत्ते
28 Apr 2010 - 6:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चालू द्यात थत्तेसेठ ...
१. "दयाळू माहिती" यातलं मूळ इंग्लिशच चुकीचं आहे.
२. सूर्याकडे योग्य फिल्टरशिवाय बघू नका, नंबर कमी होऊन चष्मा जाण्यापेक्षा डोळे जाण्याचीच शक्यता जास्त आहे.
अदिती
28 Apr 2010 - 8:27 pm | नितिन थत्ते
>>नंबर कमी होऊन चष्मा जाण्यापेक्षा डोळे जाण्याचीच शक्यता जास्त आहे
ओ.... तुम्ही अंतिम परिणामाकडे लक्ष द्या. डोळे गेले की चष्मा आपोआपच जाईल ना !!!! अंतिम उद्देश काय? चष्मा जाणे. मग मंत्राचा फायदा होणारच की. मधल्या डोळे जातील वगैरे तपशीलाकडे लक्ष देऊ नका.
=))
नितिन थत्ते
30 Apr 2010 - 12:51 pm | मृगनयनी
असेल. पण त्यांनी सांगितले म्हणून आम्ही ते मान्य करतो असे तुम्हाला वाटत असेल तर तसे काही नाही. मी तरी अजून योगाच्या सहाय्याने रोग बरे करता येतात यावर विश्वास ठेवत नाही. एकूण 'व्यायाम करण्याने' जेवढे फायदे लाइफस्टाईल आजार वगैरेमध्ये होतात त्याहून काही खास फायदे योगासने करण्याने होत नाहीत असेच मी मानतो. (कुंकुमादितैलम वापरल्याने गोरेपणा वाढतो असे युनिलिव्हरने सांगितले तरी मी त्यावर विश्वास ठेवत नाही).
अं.. हं.... ह्म्म्म्म्म... SOOOOOOO CHILDISHHHH!!!! =))
नितीन थत्ते!... इथे तुमच्या मानण्याने किन्वा न मानण्याने काहीच फरक पडत नाही! :) कारण "योगा"चं महत्च जगातले ९०% लोक मानतात! (अर्थात त्याच्यातले खूप कमी लोक प्रत्यक्ष योगा करतात!... पण बाकीचे योगा न करणारे लोकही "योगा" चं महत्व कधीच अमान्य करत नाही!)
नितीन थत्ते ... बहुधा आपण योगा न मानणार्या ०.००१ % लोकांपैकी दिसता! =)) (बाकीचे % लोक न्युट्रल असू शकतात!)
असो... ""एकूण 'व्यायाम करण्याने' जेवढे फायदे लाइफस्टाईल आजार वगैरेमध्ये होतात त्याहून काही खास फायदे योगासने करण्याने होत नाहीत असेच मी मानतो.
""
याचा अर्थ तुम्हाला स्वतःला कळला असेल.. तर कृपया विस्ताराने सांगा! :) =)) =)) =))
कदाचित ,सर्व व्यायाम-प्रकारांचे मूळ "योगा" आहे, अनेक छोट्या-मोठ्या रोगांच्या उच्चाटनासाठी मोठमोठे डॉक्टर देखील काही योगासने करण्यास सांगतात.... याचे ज्ञान बहुधा तुम्हाला नसावे!
:( :-?
तुमचे ते "शाहू- महाराज" देखील योगा करायचे बरं!
आणि.. हे "शाहू-महाराज" देखील वेद-ग्रंथांना मानणारे होते हं!!! :) .... :) :) :)
असू दे!... पण ओव्हरऑल... नितीन थत्ते... तुमचा योगा, आयुर्वेद (कुम्कुमादितैलम).. यान्च्याबद्दलचा "व्ह्यु" बर्यापैकी अपरिपक्व, आणि तकलादू दिसतोय... त्यामुळे अश्या बाळबोध प्रतिक्रिया देण्याआधी सखोल अभ्यास करा!... कारण "युनिलिव्हर"मधला नुसता "यु" बनण्यासाठी पण खूप मेहनत करावी लागते! :)
तसेच तुमच्या दयाळू माहितीसाठी : मनुस्मृतीवर टीका मी बुह्लरचे भाषांतर वाचून करीत नाही. भारतीयांची पुस्तके वाचूनच करतो.
=)) =)) =)) =)) =))
नितीन थत्ते, तुम्हाला असलेली माहितीच फारच दयनीय आहे हो! :)
म्हणजे अजून तुम्ही स्वतः मनुस्मृती वाचलेलीच नाही! :-?
उगीच इकडची - तिकडची पुस्तके वाचून मत बनवणार्या "कॅटॅगिरी" मधले तुम्ही दिसता!...
असो, १ दयाळू सल्ला: अशी इतरांची पुस्तके वाचून मते बनवण्यापेक्षा प्रत्यक्ष "ऋग्वेद", "यजुर्वेद ", "उपनिषदे" इ. अमूल्य ग्रंथसम्पदा एकदा निर्मळ मनाने वाचा!
अहो! पूर्वी मंत्रोच्चारांमुळे दगडालाही पाझर फुटायचा! :-? ... तुम्ही तर माणूस :/ आहात!
अर्थात.. पूर्वीचे ऋषी-मुनी ही तेवढे तेजस्वी आणि "पॉवरफूल" होते!
पण दुर्दैवाने आज त्याच ऋषी-मुनींचे -- "कुलदीपक आणि कुलकन्यका" यांना मात्र मंत्रोच्चारांचे महत्व पटेनासे झालेले आहे. त्यामुळे मंत्रांची हेटाळणी करुन 'आपण किती मॉडर्न आहोत'.. याचा आभास निर्माण करण्यातच त्यांना धन्यता वाटत आहे! :|
असो... कालाय तस्मै नम: |
आणि हो, काही लोकांनी त्यांचं आडनाव बदललं, तरी पण त्यांची मूळ मानसिकता मात्र "जात" नाही!.... कुठेतरी "तो" वेदांबद्दलचा द्वेष उफाळून येतोच्च!
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
30 Apr 2010 - 1:40 pm | नितिन थत्ते
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
नितिन थत्ते
30 Apr 2010 - 2:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नितीन थत्त्यांशी २००% टक्के सहमत. पण उगाच का येवढ्या वेळा लोळायचं?
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
अदिती
22 Jun 2010 - 8:38 pm | अडगळ
म्हणजे उडण्यासाठी विमाने होती ,
पण पाणी भरण्यासाठी नळ नव्हते. प्रगत पूर्व़ज.
28 Apr 2010 - 8:30 pm | शैलेन्द्र
"परन्तु, इंग्रजांच्या राजवटीपासून आणि नंतर काही समाजविघातक शक्तींमुळे पवित्र -मन्त्र शक्तीची हेटाळणी होऊ लागली. तसेच संपूर्ण समाजाची वृत्ती ही पूर्णपणे "मनी-ओरिएंटेड" झाल्यामुळे मंत्र-तंत्र हे फक्त "काला जादू" म्हणूनच वापरले जातात.. असा गैरसमजही रूढ झाला. "
बापरे, हा मात्र बंपर आहे.
हे सगळे मंत्र असताना ते शिंचे इंग्रज आलेच कसे इथे?
28 Apr 2010 - 10:49 pm | II विकास II
>>हे सगळे मंत्र असताना ते शिंचे इंग्रज आलेच कसे इथे?
तुमच्या अज्ञानाची मला किव वाटते. इंग्रज हे हनुमानाचे वंशज होते/आहेत. रामाने हनुमानाला, भविष्यात तुमचे राज्य येईल असा वर दिला होता. त्यामुळे, ते राज्य येणारच होते. तुम्ही मत्रांना नाहक बदनाम करत आहात. आपले पुर्वज महान होते. त्यावर तुम्ही शंकाच कशी घेउ शकता?
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
30 Apr 2010 - 11:28 am | मृगनयनी
तुमच्या अज्ञानाची मला किव वाटते. इंग्रज हे हनुमानाचे वंशज होते/आहेत. रामाने हनुमानाला, भविष्यात तुमचे राज्य येईल असा वर दिला होता. त्यामुळे, ते राज्य येणारच होते. तुम्ही मत्रांना नाहक बदनाम करत आहात. आपले पुर्वज महान होते. त्यावर तुम्ही शंकाच कशी घेउ शकता?
महारूद्र चिरंजीवी "हनुमान" हे हिंदूंचे परमदैवत आहे. कृपया हिन्दूंच्या कोणत्याही दैवताची चेष्टा, हेटाळणी करू नये! :|
किमान हिन्दवी-स्वराज्य-संस्थापकांना मानणार्या "१२ x ८" कुळीं कडून तरी अशी अपेक्षा नाही!
अन्यथा सूर्योपासनेबरोबर सूर्याजीं'चाही इतिहास इथे नमूद करावा लागेल!
|| जय हनुमान || ||जय परशुराम|| || जय जय रघुवीर समर्थ ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
2 May 2010 - 1:50 am | शैलेन्द्र
"किमान हिन्दवी-स्वराज्य-संस्थापकांना मानणार्या "१२ x ८" कुळीं कडून तरी अशी अपेक्षा नाही!"
बर्यापैकी व्यक्तीगत व जातियवादी विधान
"अन्यथा सूर्योपासनेबरोबर सूर्याजीं'चाही इतिहास इथे नमूद करावा लागेल!"
सुर्याजी ही व्यक्ती नसुन एक प्रवृत्ती आहे असे मला वाटते.
(जातीबाहेरचा) शैलेन्द्र.
22 Jun 2010 - 8:52 pm | VarKari
किमान हिन्दवी-स्वराज्य-संस्थापकांना मानणार्या "१२ x ८" कुळीं कडून तरी अशी अपेक्षा नाही!
हिन्दवी स्वराज्य नव्हे, "स्वराज्य संस्थापक"
22 Jun 2010 - 9:05 pm | VarKari
अन्यथा सूर्योपासनेबरोबर सूर्याजीं'चाही इतिहास इथे नमूद करावा लागेल!
सूर्याजी चा काय इतिहास सांगता ? आम्हालाहि परशूराम आणि रामदासाचा इतिहास नमुद करावा लागेल !
चातुर्वर्णा बाहेरचा VarKari
30 Jun 2010 - 10:06 am | मृगनयनी
सूर्याजी चा काय इतिहास सांगता ? आम्हालाहि परशूराम आणि रामदासाचा इतिहास नमुद करावा लागेल !
अरे बापरे! :( :-? खरंच की काय ? :-?
सांगा सांगा..... आमी परचंड उस्सुक आहोत त्यांचा इतिहास जानुन घेन्यासाठी! ;)
पंढरपुर'ला निळ्या -गुलाबी फुलाफुलांचा सैटीन्'चा शर्ट घालून जानारे आदर्नीय "रामदास आठवले" आनि कुठल्याश्या ब्रिगेड की सी-ग्रेड'च्या बोपोडी शाखेचे परमुख माणणीय"परशुराम वाडेकर" यांचा इतिहास जानुन घ्यायला आमाला बी आवडेल! ;) =)) =)) =)) =)) =))
टीप : माणणीय परशुराम वाडेकर यांची वयैक्तिक मालमत्ता केवळ ६०० रुपये आहे... कालच पेप्रात वाचुण डोळे पानावले! ;) =)) =))
बोपोडीमदे पर्यायाणे देशामदे किती गरीबी आली आहे... याची मणस्वी जानीव होऊण डोळ्यातले पानी वाहयाला पन लागले! ;)
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
असो! लई कौतिक जालं ! :|
________________________
वारकरी... आपल्या एकंदर "अॅप्रोच" वरून आपण एखाद्या- शिवरायांच्या, संभाजींच्या नावाचा तथाकथित उदोउदो करून जातीयवाद पसरवणार्या आणि स्वतःच स्वतःला "शिवश्री" म्हणवून घेणार्या अतिरेकी संघटनेचे सदस्य वाटता! ;)
असो!
आमचे परमदैवत 'रेणुका-जमदग्नि-सुत चिरंजीवी परशुराम' तुम्हाला सुबुद्धी देवो! :)
चातुर्वर्णा बाहेरचा VarKari
चारी वेदांना पूजनीय मानणारी,
मृगनयनी . :)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
29 Apr 2010 - 12:31 am | Nile
याविषयी कृपया विस्तृत लिहावे ही विनंती. नवा धागा काढल्यास उत्तम! धन्यवाद.
-विमान अभियंता.
27 Apr 2010 - 7:55 pm | स्वाती राजेश
http://www.youtube.com/watch?v=n9Z_pccScW0&feature=youtube_gdata
मला आवडलेली...
28 Apr 2010 - 10:49 pm | इन्द्र्राज पवार
प्रयत्न केला .... पण बहुधा काही तांत्रिक बिघाडामुळे तु नलीका उघडली जात नाही. तरीदेखील नंतर प्रयत्न करीन.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
28 Apr 2010 - 10:00 pm | इन्द्र्राज पवार
मृगनयनी जीं चे असे म्हणणे दिसले की मूळ लेखात मी मनुस्मृतीचा उल्लेख करताना ब-याच वेळा ब्राह्मणाना त्यात ओढले आहे. एखाद्या विषयावर काही लिखाण वा मत मांडावे लागले व त्यासाठी इतिहासाचे दाखले द्यावे लागले किंवा काही विशेष नोंदी घ्याव्या लागल्या तर ती बाब अपरिहार्य मानली पाहिजे, भले मग ती पुराव्याने सिद्ध करा किंवा त्या बाबतीत समाजात असलेला विश्वास मानाने असो. एखादा "पवार" किंवा "पाटील" असे काही लिहितो त्यावेळी त्याच्या नजरेसमोर एकच विशिष्ट आणि पारंपारिक हेतू असतो असे मानने केवळ चुकीचे नसून त्याच्या या बाबतीतील त्याने केलेल्या अभ्यासावर अन्याय करणारे असते. उथळपणाने जर अशा नाजूक/भावनिक विषयावर एखाद्याने लेखन केले असेल तर वाचणा-याला त्यातील फोलपणा चटकन जाणवतोदेखील. येथे काही गंभीर विषयावर प्रतिबिम्बित झालेल्या एक दोन ओळींच्या सैलसर टिपण्या पाहिल्या तर ही बाब प्रकर्षाने जाणवते की या सुंदर संस्थाळाचा वापर काही लोक केवळ "To Kill the free time" अशा समजुतीनेच करतात. (हे माझे अत्यंत वैयक्तिक निरीक्षण/मत आहे, तक्रार नव्हे हे कृपया ध्यानात घ्यावे .... !) अर्थात अशा नोंदीना दुर्लक्षीत करणे एवढेच आपल्या हातात असते. असो.
मुद्दा असा कि, "ब्राह्मणाना त्यात ओढले आहे".... याला कायदेशीर आधार आहे. १८५६ साली ब्रिटीशांनी एक कायदा केला होता, तो "Hindu Widow's Remarriage Act" या नावाने अमलात आणला गेला. मनुस्मृतीप्रमाणे हिंदू स्त्रीचे लग्न फक्त एकदाच होते. पती निधना नंतर तिने पुन्हा लग्न करू नये, असे बंधन स्मृतीत आहे. तीवर त्यावेळच्या ब-याच समाज सुधारकांनी आवाज उठविला व आपल्या उदारमतवादी धोरणानुसार ब्रिटीशांनी तो कायदा केला व विधवा स्त्रीस (तिची इच्छा असल्यास...) पुनर्विवाहाचा हक्क प्रदान केला. अर्थात सनातन्यांना हे मान्य होणे शक्यच नव्हते, आणि १८५७ च्या उठावाची जी काही कारणे होती ती मध्ये "स्मृती कायद्यात ढवळाढवळ" हे देखील एक प्रमुख कारण होते. उठाव अयशस्वी झाल्यानंतर १८५८ च्या राणीच्या जाहीरनाम्यात "हिंदू कायद्यात" रीतसर आणि सुसंगत मांडणी करण्याचा प्रयत्न त्या वेळच्या काही कायदेपंडितांनी केला; त्यातील प्रमुख म्हणजे सर दिनशा मुल्ला व सर जे. डी. मेन. या दोघांचे या विषयावरील "Hindu Law and Usage" हे आजही कायदे शिक्षण घेणा-यांच्या अभ्यास क्रमात (संदर्भ म्हणून) समाविष्ट आहेत.
येथे सर मेन यांनी काय निरीक्षण केले आहे ते वाचणे रोचक आहे. त्यांनी नोंदले कि, "Manusmriti's law does not as a whole represent a set of rules ever actually administered in Hindustan. It is, in great part, an ideal picture of that, which, in the view of the BRAHMINS, ought to be the law." यावर काय भाष्य करायचे? जर कायदे पंडीतानीच असे नोंदविले आहे की, "ब्राह्मण म्हणेल तोच आदर्श कायदा अशी स्थिती होती..." तर मग आमच्यासारख्या बोळातल्या ब्रॅडमनची काय कथा ?
असे असले तरी आपण सर्वांचे (श्रीमती मृग नयनी , श्री. नितीन थत्ते , अदिती, श्री. जयंत कुलकर्णी, श्री. शैलेन्द्र इत्यादींचे) या निमित्ताने एका अभ्यासपूर्ण चर्चेबद्दल मन:पूर्वक आभार ! प्लीज कंटीन्यु !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
30 Apr 2010 - 12:19 pm | Dhananjay Borgaonkar
यावर काय भाष्य करायचे? जर कायदे पंडीतानीच असे नोंदविले आहे की, "ब्राह्मण म्हणेल तोच आदर्श कायदा अशी स्थिती होती..." तर मग आमच्यासारख्या बोळातल्या ब्रॅडमनची काय कथा ?
पवार साहेब आहो तेव्हाचा काळ वेगळा होता.चाली, रीती, परंपरा सर्व काही वेगळच होत. चालु काळाशी तुम्ही या गोष्टीची तुलना करु नका.
किती काळ आपण याच गोष्टीला कवटाळुन बसणार आहोत??
मनुस्म्रुती मी अजुन वाचला नाही.त्यामुळे त्यात नक्की काय लिहिल आहे याचा अंदाज मला नाही. परंतु त्या ग्रंथात जे काही लिहिल असेल ते सर्व त्याच काळाशी निगडीत असेल.
त्यात जे काही कथन केले असेल ते सर्वच ग्राह्य कसे मानुन चालेल?
काळाप्रमाणे समाजही बदललो आणि समाज व्यवस्था सुद्धा.
29 Apr 2010 - 12:04 am | अर्धवटराव
काय खमंग चर्चा चालली आहे. मला वाटते,
१) कुठलाहि काळ त्याच्या मागच्या काळापेक्षा पुढारलेला होता आणि पुढच्या काळापेक्षा मागासलेला होता
२) सर्वकाळी लोक जुने कायदे आवश्यकतेनुसार बदलत होते, नवीन निर्माण करत होते. (कायद्याचा सोईनुसार अर्थ लावणे म्हणजे कायदा बदलणेच होय)
३) सर्वकाळी समाजात कायदा नि:पक्षपाती होता. कायद्याचा वापर करणारे विवेकी आहेत कि अविवेकी, लोक वत्सल आहेत कि स्वार्थी, यावर कायद्याची उपयोगीता ठरत आली आहे.
४) आजच्या वैज्ञानीक प्रगतीचा आणि मानवाच्या विवेकाधिष्टीत विचारसरणीचा अर्थाअर्थी काही संबंध नाहि. ज्ञान हे गरजेतुन, चिकित्सक दृष्टीकोनातुन तयार होते. "कार्यकारण भाव सम़जावुन घ्यायची ईच्छा असणे आणि त्यावरुन परीक्षा करणे" याला वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणतात. हा दृष्टीकोन आज सो कॉल्ड २१ व्या शतकात, वैज्ञानिक युगात जास्त आहे हे म्हणणे भाभडेपणाचे ठरेल.
५) कुठल्याहि शक्तीचा माणसच्या "माणुसकी"शी संबंध नाहि. (रामायण इतिहास मानला तर) वाल्या कोळि कुठलिही अतींद्रिय शक्ती नसताना एक सहृदय कवी-महर्शी बनला तर रावण एक ब्राह्मण असुनही शक्तीच्या उन्मत्तपणातुन खलनायक बनला.
६) पुढे चालताना मागे वळुन का बघावे ? तर आपण कठुन आलो, सोबत काय आणलय, त्याचा पुढच्या प्रवसाला त्याचा काय उपयोग आहे, आपली दिशा कुठली हे ठरवुन पुढे चालत जायचे आहे. हा पुढला प्रवास नसेल तर मागे वळुन बघण्यात काहि अर्थ नाहि. आणि हा प्रवास असेल तर मागच्या प्रवासाचं भान आवश्यक आहे... नाहि तर चुक हमखास होणारच होणार.
७) वेदांमधे मंत्रशक्तीचे प्रयोग खरच आहेत कि उगाच गप्पा आहेत, योगशास्त्र मनुष्याला खरच अतींद्रिय शक्ती देतात कि नाहि हा विषय वेगळा. मी वैयक्तीकरित्या या शक्ती असाव्या असं मानतो. मध्यंतरी "एका योग्याचे आत्मचरित्र" हे स्वामी योगानंदाचं चरित्र वाचण्यात आलं. त्यात योगीक चमत्काराच्या बर्याच गोष्टी आहेत. शिवाय ज्ञानेश्वर माउली, समर्थ रामदासस्वामी, विवेकानंद इ. मंडळींच्या योगीक चमत्काराच्या गोष्टी ऐकुन आहे. कबीर, मीराबाई यांच्या भक्ती कथा ऐकुन आहे. आता हे सर्वच्या सर्व खोटं आहे, हे लोकं वा त्यांच्या गोष्टी सांगणारे मानसीकरित्या 'डिफेक्टीव' होते, बंडलबाज होते, हे मला तरी पटत नाहि. पण पुन्हा, या योगशक्तींचा समाजात माणुसकी वाढवायला काहि उपयोग उपयोग नाहि. या सर्वांनीही योगशक्तीचा प्रचार न करता प्रेमाचाच संदेश दिला आहे.
८) समाजीक उतरंड टाळता येणे शक्य नाहि. या उतरंडीत वरच्या पातळीला खालच्या पातळीबद्दल किती कणव, प्रेम, आपुलकी आणि त्यांच्या उत्थानाचि तळ्मळ आहे यावर सामजीक स्वास्थ्य अवलंबुन आहे. वैज्ञानिक प्रगती, योगशक्ती, रुढी, परंपरा, या सर्व गोष्टी माणसाचि नियत कशी आहे यावरुन चांगला वा वाईट परिणाम करत असतात.
९) माणसाचि नियत सुधारण्याच्या बाबतीत (किमान आजचं) विज्ञान काहिच करु शकत नाहि.
हुश्श्श्..... विषयाला धरुन आणि सोडुन बरच लिहीणं झालं. वाचक मायबाप योग्य सल्ले देतिलच :)
(पुढे बघुन चालणारा) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
30 Apr 2010 - 2:19 pm | इन्द्र्राज पवार
"....विषयाला धरुन आणि सोडुन बरच लिहीणं झालं...."
नाही, व्यक्तिशः एक वाचक या नात्याने तर मी असे म्हणेन की, आपण मांडलेले सर्वच मुद्दे स्वतंत्र धाग्याचे विषय आहेत.
विशेषतः "सामाजीक उतरंड टाळता येणे शक्य नाहि." हे प्रकटन तर जळजळीत निखा-याइतके सत्य आहे
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
22 Jun 2010 - 8:43 pm | VarKari
उदा. रोज सकाळी सूर्य उगवताना त्यास अर्घ्य देऊन १२ वेळा श्रद्धापूर्वक सूर्यमंत्र म्हटला असता... डोळ्यांचे आरोग्य उत्तम रहाते. तसेच चष्मा असणार्यांचा नंबर, हा उपाय नियमित केला असता झपाट्याने कमी होतो.
बरं झालं सांगितलं ! मी आता रोज सकाळी सुर्य उग्वताना त्यास २४ वेळा "अर्ध्य" का ? पुर्ण श्रध्दापुर्वक सुर्यमंत्र म्हणेल !