महाराष्ट्राचे आणि समुद्राचे एक अनोखे भौगोलिक नाते आहे. मुंबईचे तर याच समुद्राशी आणखीनच जवळचे नाते आहे, कारण मुंबई फक्त समुद्राच्या किनाऱ्याचे एक महानगर नाही, तर बेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या शहर जिल्ह्यालाही समुद्राने वेढले आहे. समुद्रकिनाऱ्याच्या सुंदर वळणांवरचा रात्रीचा झगमगाट प्रत्येकालाच भुरळ घालतो, म्हणूनच मरीन ड्राईव्हचा राणीचा रत्नजडित कंठहार हे देश-विदेशातील पर्यटकांचे आणि पोटापाण्यासाठी मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचे पहिले आकर्षण असते. उत्तर भारतातून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईवर आदळणाऱ्या लोंढ्यांनी कधी समुद्र पाहिलेलाच नसतो. म्हणूनच मुंबईत पाऊल ठेवणाऱ्या उत्तर भारतीयांचे कान समुद्राची गाज ऐकण्यासाठी आसुसलेले असतात आणि नोकरीधंद्यात जम बसला नाही, तर याच समुद्राच्या सुंदर चौपाट्या त्यांना चाट आणि भेलपुरी किंवा अगदीच काही नाही, तर शेंगदाणे विकून गुजराण करण्याचाही मार्ग दाखवतात. मग जुन्या मुंबईकरांबरोबरच, या नवख्यांचेही समुद्राशी नाते जडून जाते.... आद्य मुंबईकर म्हणून ओळखला जाणारा कोळी समाज याच समुद्राच्या विश्वासावर इथे स्थिरावला आणि मुंबईची लहान लहान गावठाणे बघता बघता इतिहासजमा होत महानगरात सामावत गेली. म्हणून समुद्र हे मुंबईचे सौंदर्य आहे आणि साधनही आहे.
.... आता या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. मरीन ड्राईव्हच्या क्वीन्स नेकलेसपेक्षाही झगमगणारा, मुंबईचा इतिहास आणि भविष्य यांना जोडणारा एक आगळा सेतू येत्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून मुंबईच्या वैभवात भर घालणार आहे. मुंबई आणि समुद्राचे नाते आता आणखी घट्ट होणार आहे. आजवर मुंबईला केवळ किनाऱ्यापलीकडून न्याहाळणारा समुद्र आता आपल्या अंगाखांद्यावरही खेळवणार आहे. अभियांत्रिकीचे एक नवे आश्चर्य मानले जावे, असा वरळी-वांद्रे सागरी सेतू तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे नाते जोडायला सज्ज झाला आहे आणि मुंबईच्या सर्वांत भीषण समस्येवरचा- वाहतूक कोंडीवरचा तोडगाही ठरणार आहे.
येत्या 30 जूनला या सागरी सेतूचे उद्घाटन होईल आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरांना जोडणारा एकमेव माहीम कॉजवेचा रस्ता दिलासा मिळाल्याने काहीसा सुखावेल. दररोज जवळपास सव्वा लाख वाहनांची अहोरात्र ये-जा पाहणारा हा एकमेव रस्ता वांद्य्राच्या समुद्रावरून किनाऱ्यावर आदळणाऱ्या एखाद्या लाटेनं दिलेल्या सागरी सेतूच्या प्रगतीच्या बातम्यांनी दिवसागणिक सुखावत गेला असेल... आता हा सेतू साकारलाय, हे "ऑफिशियल' सत्य सगळीकडेच झालेय... म्हणून, मुंबईच्या इतिहासातून वर्तमानापर्यंतच्या बदलांचा साक्षीदार असलेल्या या स्वामी विवेकानंद मार्गालाही त्या दिवसाची ओढ लागली असेल.... येत्या दोन-चार दिवसांत या मार्गाच्या दुतर्फा बांबूंचे बॅरिकेड्स लागतील... पोलिसांची वर्दळ वाढेल.... रस्त्यावरून अहोरात्र धावणाऱ्या काही वाहनांच्या वर्षानुवर्षांच्या सहवासालाला आता आपण मुकणार, या जाणिवेने हा रस्ता मूकपणे व्याकूळदेखील होईल, पण दुसऱ्याच क्षणाला तो सुखावूनही जाईल. कारण त्याने मुंबईच्या प्रगतीच्या प्रत्येक पावलाच्या साक्षीदाराची भूमिका निभावलेली आहे. उपनगरातल्या वांद्य्राचं शहरातल्या वरळीशी आणखी जवळचे नाते जोडणाऱ्या या सेतूचा मग त्यालाही अभिमान वाटेल... जवळपास प्रत्येक मुंबईकराला केवळ वासाने ओळखीची असलेली माहीमची खाडीदेखील या नव्या आश्चर्याच्या सहवासाने आनंदून जाईल....
गेल्या काही वर्षांपासून स्वामी विवेकानंद मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाचे डोळे समुद्रात आकार घेणाऱ्या त्या अवाढव्य सेतूच्या प्रगतीकडे लागलेले होते. जवळपास 50 हजार आफ्रिकन हत्तीच्या वजनाएवढा अवाढव्य आणि केबलच्या ताणामुळे कित्येक टन वजन सहज पेलविण्याची क्षमता असलेल्या या सेतूच्या उदरात, अवघ्या पृथ्वीला विळखा घालू शकेल इतक्या लांबीच्या लोखंडी तारांचे जाळे सामावलेले आहे, असं सांगतात, कुतुबमिनारच्या 63 पट उंचीच्या या पुलाच्या उभारणीसाठी 90 हजार टन सिमेंटचा वापर झाला आहे.
माहीम कॉजवेवर सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळात रहदारीची कोंडी अगदी ठरलेलीच असल्याने वरळी आणि वांद्रे हे आठ किलोमीटरचे अंतर कापायला सव्वातासाचा वेळही ठरलेलाच. पण आता, या सागरी सेतूने हे समीकरण संपवलेय. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे मुंबईला अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते आहे. वाहनांमधून सोडल्या जाणाऱ्या कार्बनयुक्त धुराचा विळखा मुंबईला पडला आहे आणि प्रदूषणामुळे आरोग्याच्याही समस्यांनी मुंबईला वेढले आहे. सव्वातासाची वाहतूक सात मिनिटांपर्यंत खाली आणणारा हा सेतू मुंबईच्या आरोग्यासाठीही एक वरदान ठरू शकेल. कारण एकाच गतीने समुद्रावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, या वाहतूक कोंडीमुळे होणारी मौल्यवान इंधनाची हकनाक नासाडीही संपुष्टात येणार आहे. प्रवासाचा वेळ एक दशांशाइतका खाली आणणाऱ्या या सागरी सेतूमुळे दर वर्षी 100 कोटी रुपयांची इंधनबचत होईल, असा अंदाज या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्त करतात. खरे तर, ठरल्या वेळात या सेतूची उभारणी पूर्ण असती, तर सुमारे 350 कोटी रुपयांची बचतही झाली असती. पण वेगवेगळ्या पर्यावरणविषयात समस्या आणि त्यावर न्याय मिळवण्यासाठी पर्यावरणाचा आग्रह धरणाऱ्यांनी केलेला पाठपुरावा यांमुळे या सेतूचे कामही अपेक्षेपेक्षा सुमारे पाच वर्षांनी लांबले आणि मुळापासून कराव्या लागलेल्या रचनात्मक बदलांमुळे खर्चदेखील वाढला.... मुळात 1306 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प या बदलांमुळे 1650 कोटींवर गेला. पण या सगळ्या समस्यांवर मात करून हा सेतू आता साकारलाय...
या सागरी सेतूने मुंबापुरीला एक नवे वैभव आणि आगळे महत्त्व मिळवून दिले आहे, हे खरे असले, तरी काही समस्यादेखील उद्भवण्याची शंका व्यक्त केली जाते. मुळात, हा सागरी सेतू आठ पदरी आहे. म्हणजे, या सेतूवरून एका वेळी ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या स्वामी विवेकानंद मार्ग किंवा वरळीच्या रस्त्यापेक्षा कितीतरी जास्त असेल, हे स्पष्ट आहे. पण एकाच वेळी या सेतूवर प्रवेश करणारी वाहने जेव्हा कोणत्याही बाजूने बाहेर पडतील आणि पुन्हा रस्त्यावर मिळतील, तेव्हा हे रस्ते मात्र, जुनेच तीन-चार पदरी असतील. त्यातही वांद्रे आणि वरळी या दोन्ही ठिकाणी या सेतूच्या मुखाशीच असलेल्या वस्तीमुळे, अनेक जागी रस्त्यांवरच वाहने उभी केली जात असल्याने हे रस्ते आणखीनच चिंचोळे झाले आहेत. एकदम आठ पदरी रस्त्यावरून या चिंचोळ्या रस्त्यांवर थडकणाऱ्या वाहनांना सामावून घेण्याची या रस्त्यांची क्षमता तोकडी पडेल आणि सागरी सेतूच्या तोंडाशीच वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळेल, अशीही भीती काही जण व्यक्त करतात.
पण ही समस्या काही फारशी गंभीर नाही, कारण मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उत्तरे शोधण्यात गेल्या काही वर्षांपासून इथले वाहतूकतज्ज्ञ वाकबगार आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फ्लायओव्हर उभारले गेले. वाहतुकीची समस्या सुटेल. प्रवासाला लागणारा वेळ वाचेल आणि इंधनातही बचत होईल, असा त्यामागचा प्रामाणिक तिहेरी हेतू होता. पण उड्डाणपूल झाले आणि मुंबईतील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. साहजिकच, रस्ते अपुरे पडू लागले आणि कोंडीची समस्या कायमच राहिली. आता सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीतल्या नॅनो गाड्या रस्त्यावर येतील, आणि पुन्हा एकदा हीच समस्या निर्माण होईल. तेव्हा वरळी-वांद्रे सागरी सेतू या समस्येवरचा तोडगा ठरू शकेल का, हाही शंकास्पद मुद्दा आहे. कारण, या सेतूच्या उभारणीसाठी झालेला कोट्यवधींचा खर्च वसूल करण्यासाठी या सेतूचा वापर करणाऱ्या वाहनधारकांवरच टोल बसविला जाणार आहे. टोल प्रत्येकालाच परवडेल अशी स्थिती नाही. टोलचे दर निश्चित झालेले नाहीत. पण एका खेपेसाठी 50 ते 75 रुपये टोल आकारला जाईल, असे सांगितले जाते. साहजिकच, ज्यांच्या खिशाला हा आकार परवडेल आणि ज्यांना वरळी-वांद्रे प्रवासातील नऊ दशांश वेळ वाचवायची खरी आवश्यकता असेल अशा लोकांकरिताच हा सेतू वापरात राहील आणि सर्वसामान्य वाहनचालक मात्र, जुन्याच स्वामी विवेकानंद मार्गावरून ये-जा करत या सेतूचे वैभव न्याहाळत राहतील.
पण ही स्थिती काही फार काळ राहणार नाही. कारण अशा समस्यांवरही तोडगा काढणे ही वाढत्या आणि वाहत्या मुंबईची गरजच असेल. काही वर्षानंतर, याच सेतूवरून सगळी मुंबई सागराशी लगट करत धावू लागेल...
माहीमच्या खाडीवरून जाणाऱ्या स्वामी विवेकानंद मार्गाला कदाचित हा भविष्यकाळदेखील पाहावा लागेल....
http://beta.esakal.com/2009/06/26234047/editorial-mumbai-bandra-varli.html
http://zulelal.blogspot.com
प्रतिक्रिया
27 Jun 2009 - 9:47 am | अमोल केळकर
वरळी - बांद्रे सेतू बद्दल उत्सूकता लागून राहिली आहे.
अर्थात बघुया आमच्या सारखे चार चाकी गाडी नसणारे कधी या सेतूवरुन मार्गक्रमण करतात ते.
(आमचा सारख्यांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाने लवकरात लवकर या मार्गावरुन एक बस चालू करावी ही विनंती )
जालावरुन मिळवलेली या सेतूची काही चित्रे


--------------------------------------------------
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
27 Jun 2009 - 11:01 am | पर्नल नेने मराठे
पण एका खेपेसाठी 50 ते 75 रुपये टोल आकारला जाईल, असे सांगितले जाते. :O :SS
चुचु
27 Jun 2009 - 7:53 pm | रेवती
चांगली माहिती.
अमोल केळकर यांनी दिलेले फोटोही छान.
५० ते ७५ टोल? तोही एकदा जायला?
आजकाल भाववाढीची सगळीच समिकरणं बदललेली आहेत.
वेळ वाचवायला पैसे मोजायला लागण्यालाच 'टाइम इज मनी' म्हणतात की काय? ;)
रेवती
28 Jun 2009 - 11:13 am | नितिन थत्ते
शिवाय १००० किलोवॅटची रोषणाई. (१ मेगावॅट)
खराटा
(रंग माझा वेगळा)
30 Jun 2009 - 12:42 pm | विशाल कुलकर्णी
हा मार्ग सर्वसामान्य बसेससाठी उपलब्ध नसेल. या मार्गासाठी एकेरी ५० रुपये तर दुहेरी ७५ रुपये टोल आकारण्यात येइल. महापालिका सर्वसामान्यांच्यासाठी या मार्गावर काही नाममात्र आकार आकारुन एक टप नसलेली डबल डेकर चालु करण्याच्या विचारात आहे, जेणेकरुन लोकांना या सेतुवरुन मुंबईचे तथाकथित सौंदर्य अवलोकीता येइल. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
30 Jun 2009 - 1:00 pm | चिरोटा
मस्त बांधलाय.मुंबईच्या स्काय लाईनमध्ये ह्याची भर पडणार तर!
खरोखरच अभियांत्रिकीचे आश्चर्य आहे? असेल बुवा.!आजकाल काहीच सांगता येत नाही.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
30 Jun 2009 - 5:58 pm | पाषाणभेद
१० वर्षात चीन ने ७ नवीन पुल बांधले. सामना ची बातमी बघा.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
30 Jun 2009 - 1:49 pm | कपिल काळे
५० रु देणारया कार रोज १,२५,००० एवढ्या धावणार, रोज्चे कलेक्षन ६२,५०,००० रु. वार्षिक साधारण २२५ कोटी रु.
सेतूचा खर्च १७०० कोटी रु. दरवर्षी १०% ट्रॅफिक वाढ धरली तरी
७-८ वर्षात व्याजासकट पैसे वसूल होण्यास हरकत नाही.
हे गणित मांडले आहे ते एकवेळच्या टोलावर आधारित, दोनवेळचा ७५ रु टोल धरल्यास परतावा कालावधी अजून कमी होइल.
खाजगीकरणातून उभरले जाणारे प्रकल्प, त्यावरील टोल वसूली ह्यासाठी एक समिती स्थापन केली आहे असे वाचनात आले.
30 Jun 2009 - 2:12 pm | घाशीराम कोतवाल १.२
सेतूचा खर्च १७०० कोटी रु. दरवर्षी १०% ट्रॅफिक वाढ धरली तरी
७-८ वर्षात व्याजासकट पैसे वसूल होण्यास हरकत नाही.
आपल्याशी सहमत पण राज्य शासन ३० वर्षासाठी देणार हा सेतु टोल
वसुल करायला मग हिशोब केला तर ६७५० कोटी ३० वर्षात जनतेच्या खिशातुन ढापणार हे लोक :O :O :O :O :O :O
किति चोरी करणार आज महाराष्ट्रातील प्रत्येक मोठा हायवे हा IRB construction ला आंदण दिला आहे राज्य शासनाने बघा !!!
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
30 Jun 2009 - 2:46 pm | कपिल काळे
कोतवाल
तुम्ही १०% वाढ धरली नाहीत. ती धरली तर ३० वर्षात ३७,००० कोटी रु टोल वसूल होइल.
२००० साली पुणे- मुंबइ एक्स्प्रेस हायवे ची टोल वसूली सुरु झाली, दोन वर्षांनी जुन्या हायवेवर सुद्धा टोल आकारला जाउ लागला, तो आजतागायत.
ह्यात किती खर्च आणि किती टोल ह्याची आकडेवारी कधीच प्रसिद्ध झालेली नाही.
<आज महाराष्ट्रातील प्रत्येक मोठा हायवे हा IRB construction ला आंदण दिला आहे राज्य शासनाने बघा !!>
एक तुलना--
पुण्याहून कोल्हापूरला जायचे तर १७५रु. टोल द्यावा लागतो कारसाठी. आणि पेट्रोलचा खर्च येतो ६००- ७०० रु.
30 Jun 2009 - 2:47 pm | कपिल काळे
कोतवाल
तुम्ही १०% वाढ धरली नाहीत. ती धरली तर ३० वर्षात ३७,००० कोटी रु टोल वसूल होइल.
२००० साली पुणे- मुंबइ एक्स्प्रेस हायवे ची टोल वसूली सुरु झाली, दोन वर्षांनी जुन्या हायवेवर सुद्धा टोल आकारला जाउ लागला, तो आजतागायत.
ह्यात किती खर्च आणि किती टोल ह्याची आकडेवारी कधीच प्रसिद्ध झालेली नाही.
<आज महाराष्ट्रातील प्रत्येक मोठा हायवे हा IRB construction ला आंदण दिला आहे राज्य शासनाने बघा !!>
एक तुलना--
पुण्याहून कोल्हापूरला जायचे तर १७५रु. टोल द्यावा लागतो कारसाठी. आणि पेट्रोलचा खर्च येतो ६००- ७०० रु.
1 Jul 2009 - 11:49 am | घाशीराम कोतवाल १.२
अहो वाढ धरली काय आणी नाहि धरली काय
पण राजानेच राज्य चोरांना आदंण दिले त्याचे काय !!!
हे वाचा हे काय म्हणतात
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
30 Jun 2009 - 2:20 pm | विसोबा खेचर
आनंद जाहला..! :)
आपला,
(मुंबैवर विलक्षण प्रेम असणारा) तात्या.
30 Jun 2009 - 2:35 pm | सहज
सचित्र माहीतीपूर्ण लेख आवडला.
30 Jun 2009 - 4:08 pm | मराठी_माणूस
कितीहि कौतुकास्पद गोष्ट असली तरी , ह्या पुलावरुन भुर्रकन जाणार्या गाड्या आणि अविकसीत भागात उन्हा तान्हात प्यायच्या पाण्यासाठी वणवण हींडणार्या बायाबापड्या हा विरोधाभास विसरता येईल का ?
30 Jun 2009 - 4:51 pm | निखिल देशपांडे
हा विरोधाभास नक्कीच विसरता येनार नाही, पण पुतळ्यांवर ईतका ख्रच केल्या पेक्षा पुलावरुन जाणार्या गाड्या नक्कीच चांगल्या असे वाटते.
==निखिल
30 Jun 2009 - 4:47 pm | नितिन थत्ते
रोज सव्वालाख गाड्या ही अतिशयोक्ती आहे.
अर्थात प्रकल्प फायदेशीर आहे असे भासवण्याच्या नादात अशा अतिशयोक्त्या नेहमीच केल्या जातात.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
30 Jun 2009 - 5:37 pm | अवलिया
वा! मस्त !!
--अवलिया
30 Jun 2009 - 9:29 pm | दिनेश५७
मुंबईच्या पश्चिम उपनगरांना जोडणारा एकमेव माहीम कॉजवेचा रस्ता दिलासा मिळाल्याने काहीसा सुखावेल. दररोज जवळपास सव्वा लाख वाहनांची अहोरात्र ये-जा पाहणारा हा एकमेव रस्ता वांद्य्राच्या समुद्रावरून किनाऱ्यावर आदळणाऱ्या एखाद्या लाटेनं दिलेल्या सागरी सेतूच्या प्रगतीच्या बातम्यांनी दिवसागणिक सुखावत गेला असेल...
..... दररोज सव्वा ला़ख गाड्या ह्या पुलावरून नव्हे... माहीम कॉजवेवरून ये-जा करतात, असे सर्वेक्षण आहे. ह्या रस्त्यावरून गर्दीच्या वेळात आणि दिवसभरात होणारी वाहतूक पाहता, ही अतिशयोक्ती आहे असे म्हणणे खरे वाटत नाही.
1 Jul 2009 - 9:33 am | १.५ शहाणा
मुंबई चा विकास बाकी भकास