निपुत्रिक कुंतीभोजला शुरसेनाची दत्तक मिळालेली कन्या एक वरदानच होतं. तिच्या साऱ्या इच्छा पुर्ण करत, संस्कारांचे बाळकडूही तिला त्याने दिले होते. कुंती भोज राजाची लाडकी कन्या म्हणून त्याच्याच नावावरून सगळे तिला कुंती म्हणू लागले. राजमहालात खेळत बागडत ती मोठी होऊ लागली.
एके दिवशी राजा कुंतीभोज चिंतेत बसलेले तिने पाहिले.
"काय झालं पिताश्री?"
"काही नाही, कुंती. अगं दुर्वासा ऋषींकरता एक सेवक पाठवयचा आहे."
"का?"
"ते तपश्चर्येला बसणार आहेत."
"मग त्यात काय चिंताकारक आहे? पाठवून द्या."
"त्यांनी तुझ्या करता विचारले आहे."
"मी जाईन की मग."
"खरचं जाशील? त्यांच्या कुटीत? सेवक म्हणून?"
"हो." अगदी सहज म्हणल्या सारखी कुंती म्हणाली.
इतरांकडून सेवा करून घेणाऱ्या राजकन्येला कुटीत जाऊन ऋषींची सेवा करायला लावणं राजाच्या जिवावर आलं होतं. पण तो शब्द देऊन बसला होता.
कुंतीला राजाने कुटीत रवाना केले.
दुर्वासा ऋषी तपश्चर्येला बसले. कुंतीने त्यांची मनोभावे सेवा केली. कुटी साफ करणे, रोज देवपुजेसाठी फुले तोडून आणणे, जलाशयातून शितल पाणी भरून आणणे वगैरे वगैरे... असे बघितले असते तर कोणालाही आश्चर्य वाटले असते की ही राजकन्या आहे. तपश्चर्या संपवून दुर्वासा ऋषींनी तिला समाधानाने आशीर्वाद दिला आणि तिच्या कडे बघत तिचे भविष्य बघताना पतीपासून तिला पुत्र प्राप्ती नसल्याचे त्यांना कळाले. "कुंती, तुला मी एक मंत्र देतो. त्याने तुला कोणत्याही पाच देवतांकडून गर्भधारणे विना पुत्र प्राप्त होतील."त्यांनी तिच्या मस्तकावर हात ठेवला. कुंती आज्ञा घेऊन राजमहाली परतली.
नदीच्या तिरावर नुकताच सुर्यदेवांचा प्रकाश पसरला होता. कुंती अर्घ्यदान करायला नदी तिरावर आली. सुर्यदेवांचे ते सोनेरी रुप पाहून तिचा चेहरा प्रसन्न झाला. दुर्वासा ऋषींनी दिलेला मंत्र तिला आठवला. 'बघू तरी काय होते....' ती मंत्रांचे उच्चारण करू लागली. हवेतली उष्णता वाढल्या सारखी जाणवली तसी ती घाबरली. बघता बघता सुर्याचा एक भाग निखळून जमिनीवर आदळला. तिच्याच समोर! त्यातून एक मानवी भासणारी आकृती दिसू लागली. तेजोपुंज!
"सुर्यदेव.... तुम्ही खरचं आलात!" तिने नमस्कार केला.
"हो. सांग. कसा पुत्र हवा आहे तुला?" त्या आकृतीने विचारले.
"पुत्र? मला नकोय...." कुंती घाबरली, " म्हणजे आत्ता नकोय."
"मग? आवाहन का केलेस मला?"
"मी? असच! तुम्ही परत जा देवा."
सुर्यदेव विचारात पडले.
आता काय करावे? ही तर अजून लहान दिसते. बालकाची जवाबदारी घेण्या योग्यही नाही ती अजून. पण ऋषी दुर्वासा....!
"कुंती, हा मंत्र ऋषी दुर्वासांची आज्ञा आहे. मी ती डावलू शकत नाही."
"पण माझ्या प्रतिष्ठेचे काय होईल? मी अविवाहित आहे, सुर्यनारायण!"
"हा विचार आता करू नकोस. मी दुर्वासांची आज्ञा नाकरली तर मी निस्तेज होईन.... आणि समस्त सृष्टीला धोक्यात घालणे अयोग्य आहे."
कुंती रडकुंडीला आली होती.
"कुंती, तुला या बालकाची काळजी करावी लागणार नाही. मी त्याला अभेद्य कवच देईन. कुठलेही अस्त्र शस्त्र कवच भेदून त्याला इजा करू शकणार नाही."
सुर्यदेव अंतर्धान पावले आणि कुंतीला हात जड झाल्याचे जाणवले. तिने बघितले तर हातात एक लहान सुवर्ण कांती असलेले बालक होते. कानात सुवर्णाहून तेजस्वी कर्णडूल होते. अंगभर सोनेरी कवच होते. क्षणभर ती त्या लोभस रुपाकडे बघत बसली. तितक्यात दासी आली.
"हे कोणाचे बालक आहे राजकुमारी?"
तिला काय उत्तर द्यावे कळेना.
"अगं... तुला सांगितले होते ना. मला मंत्र दिला होता... तो.... हा... सुर्यदेव" जमले तसे तिने सांगाण्याचा प्रयत्न केला.
"म्हणजे तुम्ही तो मंत्र आत्ताच वापरलात?"
"नाही... म्हणजे... हो... पण..."
थोडावेळ विचार करून दासी म्हणाली, "त्याला इथेच सोडून द्या राजकुमारी."
"काय? काय बोलतेस अगं तू! निदान विचार करून तरी बोल."
"तुम्ही विचार करा राजकुमारी.... कोण एका पुत्र असलेल्या राजकुमारीशी विवाह करेल? राजघराण्याचा काय मान राहिल? लोकांना हे पटेल, की हा मंत्रोच्चाराने झालेला पुत्र आहे? तुमच्या पिता महाराजांची काय दशा होईल हे कळाल्यावर, याचा एकदा विचार करा राजकुमारी!'
तिला डोळ्यांसमोर पितामहाराजांची दैन्यावस्था दिसू लागली.
दासीने एक लाकडी गोलाकार अर्ध पेटिका मागवली. बाळाला त्यात ठेवायला हात पुढे केला तसे कुंतीने बाळाला घट्ट पकडून ठेवले.
"राजकुमारी हा नक्की सुर्यदेवांचा पुत्र आहे ना." कुंतीने दासीकडे रागाने पाहिले.
"तुला शंका वाटते?"
"नाही. आणि तुम्हालाही विश्वास असेल तर ठेवा त्याला यात."
"अगं पण हे काही पाप आहे का त्याला असं गंगेत सोडून द्यायला?"
"नक्कीच नाही राजकुमारी. आणि म्हणूनच मला विश्वास आहे की हे दैवी बाळं सुरक्षित राहील."कुंतीने रडत रडत बाळाला त्यात ठेवले. अंगावरचे दागिनेही काढून त्याच्या जवळ ठेवले. पेटिका प्रवाहात पुढे पुढे जाऊ लागली तसा कुंतीने जोरात टाहो फोडला. दासीने तिला सावरत महालात परत आणले.
नदीप्रवाहात वाहत पाण्याने त्या बालकाला त्याच किनारी आणले, ज्या किनारी गंगेने स्वतःची सात मुले प्रवाहात बुडवून प्राणहिन बनवली होती.
©मधुरा
वाचने
4976
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहिलंय. .
:)
In reply to छान लिहिलंय. . by मुक्त विहारि
चांगलं लिहिलं आहे ... एक
महाभारत....
In reply to चांगलं लिहिलं आहे ... एक by nishapari
ऍक्चुली कुंतीच्या बाबतीत
महाभारत हा प्रकारच
In reply to ऍक्चुली कुंतीच्या बाबतीत by nishapari
उथळ नाही वाटत. ..
In reply to महाभारत हा प्रकारच by जॉनविक्क
खरं तर महाभारत हे "भगवत
In reply to उथळ नाही वाटत. .. by मुक्त विहारि
हो. ...
In reply to खरं तर महाभारत हे "भगवत by जॉनविक्क
मी फक्त समजण्या विषयी भाष्य केले
In reply to हो. ... by मुक्त विहारि
तुमच्या लिंक बद्दल धन्यवाद. ...
In reply to मी फक्त समजण्या विषयी भाष्य केले by जॉनविक्क
खिक्क :D असे घाबरु नका हो
In reply to तुमच्या लिंक बद्दल धन्यवाद. ... by मुक्त विहारि
अहो. ...
In reply to खिक्क :D असे घाबरु नका हो by जॉनविक्क
विचारमंथन टाळून घाम गाळु नका
In reply to अहो. ... by मुक्त विहारि
मृत्युंजय नि:संशय एक महान
In reply to ऍक्चुली कुंतीच्या बाबतीत by nishapari