राजा येतो
सगळे उठतात
राजा बसतो
सगळे बसतात
राजाचे स्वागत होते
सगळे टाळ्या पिटतात
राजा सभोवार बघतो
सगळे नजर फिरवतात
राजाची बडबड सुरू होते
सगळे शून्यात बघू लागतात
राजा मधूनच जोरात बरळतो
सगळयांच्या मुद्रा त्रासिक होतात
राजा विजयी मुद्रेने सभोवार पाहतो
सगळे सुटका होण्याची वाट बघतात
राजाने अधिकार प्रदर्शित केलेला असतो
सगळ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असतो.
----------------------------–--------
प्रतिक्रिया
21 Nov 2018 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोदीबद्दल आहे वाटतं कविता.
छान आहे. ;)
-दिलीप बिरुटे
21 Nov 2018 - 1:07 pm | माहितगार
बायसकडे निर्देश करुन निसटती बाजू मांडावी की नाही या बद्दल द्विधा मनस्थितित आहे.
@ कवि महोदय, कविता विदाऊट बायस चांगली आहे पोचली.
21 Nov 2018 - 12:33 pm | कुमार१
मला वाटते की ही व्यक्तिशः न घेता एकंदरीत नेतेगिरीशी निगडित असावी.
21 Nov 2018 - 1:51 pm | वन
कविता व्यक्तिगत घेऊ नकाच. तथाकथित लोकशाही व्यवस्थेत कुठलाही ‘मालक’ कसा असतो याचे हे चित्रण आहे.
अर्थात वाचकांनी आपापला अर्थ जरुर काढावा !
21 Nov 2018 - 2:36 pm | चांदणे संदीप
कवितेच्या शब्दांनी छान त्रिकोणी आकार आलेला आहे तो आवडला.
Sandy
21 Nov 2018 - 2:42 pm | आशु जोग
पुढच्या वेळेस वेगळा आकार द्या
21 Nov 2018 - 4:49 pm | वन
कवितेच्या ‘आकाराची’ दखल घेतल्या बद्दल धन्यवाद.
पुढच्या वेळेस वेगळ्या आकाराचा प्रयत्न करेन.
21 Nov 2018 - 10:42 pm | सतिश गावडे
*
**
***
****
*****
for n in range(0,5):
n +=1
print ("*" *(0+n))
असा काही प्रोग्राम वापरलात का? :)
रच्याकने, कविता अगदी नेमकेपणाने बरंच काही सांगते :)
22 Nov 2018 - 8:11 am | वन
नाही हो ! प्रोग्रॅम वगैरे मला नाही कळत. प्रत्येक कडव्यागणिक ओळींतील एक शब्द वाढवत न्यायचा एवढे च ठरवले होते.
तुमची कल्पना आवडली.
22 Nov 2018 - 3:14 pm | मुक्त विहारि
कविता आवडली...
बरेच युवराज आणि राजे मंडळी, घराण्यासकट, डोळ्यासमोर आली.
23 Nov 2018 - 9:47 am | नाखु
सगळेच स्व :कर्तृत्वाने नेतेपदी व शीर्षस्थानी आहेत.
किंबहुना ते घराणेच राज्य करण्यास जन्मले आहे.
याची महारथींनी नोंद घ्यावी.
चूकभूलीतील किरकोळ सदस्य नाखु बिनसुपारीवाला
22 Nov 2018 - 6:14 pm | गामा पैलवान
वन,
हा राजा वाटंत नाही. राजा कसा शिवाजीसारखा हवा.
आ.न.,
-गा.पै.
22 Nov 2018 - 6:23 pm | विशुमित
हा राजा वाटंत नाही...
...
मग सवेक??
22 Nov 2018 - 7:02 pm | कुमार१
राजाची वस्त्रे पांघरलेला सेवक !
23 Nov 2018 - 1:33 pm | वामन देशमुख
मला तर ही कवीता अशी आहे असं वाटलं होतं -
रागाची सभा
रागा येतो
सगळे उठतात
रागा बसतो
सगळे बसतात
रागाचे स्वागत होते
सगळे टाळ्या पिटतात
रागा सभोवार बघतो
सगळे नजर फिरवतात
रागाची बडबड सुरू होते
सगळे शून्यात बघू लागतात
रागा मधूनच जोरात बरळतो
सगळयांच्या मुद्रा त्रासिक होतात
रागा विजयी मुद्रेने सभोवार पाहतो
सगळे सुटका होण्याची वाट बघतात
रागाने अधिकार प्रदर्शित केलेला असतो
सगळ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असतो.
23 Nov 2018 - 1:58 pm | वन
मित्रहो,
मी ही कविता इथे लिहून मोकळा झालो आहे. आता ती सर्वस्वी तुमची आहे. तुम्ही त्यातून जे विविध अर्थ काढत आहात ते पाहून मला समाधान वाटले आहे.
धन्यवाद !
23 Nov 2018 - 1:48 pm | मार्मिक गोडसे
खरा राजा मनमोहनसिंग , असला दिखाऊपणा कधीच जमला नाही त्यांना.
23 Nov 2018 - 1:55 pm | माहितगार
23 Nov 2018 - 4:48 pm | मार्मिक गोडसे
गूड जोक
असेलही, नोटाबंदी सारखा खुळचट पणा करून एकाच वेळी लोकांची आर्थिक आणि जीवितहानी नाही करता आली त्यांना.
23 Nov 2018 - 6:06 pm | माहितगार
बाकी गोष्टी वेगळ्या अवलंबित्व असलेला राजा मांडलीक म्हणवला जातो 'खरा राजा नव्हे.
परिवारावर अवलंबित्व असलेली व्य्क्ती होती अ ते ज्ञ घराणेशाहींची आम्ही सातत्यपुर्व्क निंदा करतो.
बाकी नोटबंदी विषयक संबंधीत धाग्यात मागेच लेखन केले होते त्यात बदल करण्यास काही कारण नाही. सम अॅक्शन इज अल्वेज बेटर दॅन नो अॅक्शन. नो अॅक्शनचा राजा आहे काय नाही काय एकही बात तर राजा शब्द नव्हे त्याच्या सोबतचे खरा हे विशेषण विनोद निर्मितीकारक असण्याची शक्यता असू शकावी किंवा कसे.
23 Nov 2018 - 6:24 pm | मार्मिक गोडसे
नो अॅक्शनचा राजा आहे काय नाही काय एकही बात
अणुकरार विसरून कसा चालेल,तेही चावणाऱ्यांच्या धमकीला भीक न घालता केलेला.
23 Nov 2018 - 6:50 pm | विशुमित
बाकी गोष्टी वेगळ्या अवलंबित्व असलेला राजा मांडलीक म्हणवला जातो 'खरा राजा नव्हे...
https://www.loksatta.com/desh-videsh-news/madhya-pradesh-assembly-electi...
...
माझे सरकार कोणत्याही रिमोट कंट्रोलवर चालत नव्हते. मी पंतप्रधानपदी असताना सरकार आणि काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नव्हते- मा. मनमोहन सिंग
23 Nov 2018 - 8:50 pm | माहितगार
विशुमितजी, मोदी आणि परिवाराचे जावई या दोन्हीवरील सारखेच कौतुक (?) काव्य मी मिपावर लिहिले आहे सांगण्याचा उद्देश्य मी सारखाच पक्षपात करत असेन. मी स्वतः मनमोहनसिंग आणि चिदबरमांची अर्थ मंत्री असतानाची बरीच भाषणे त्यांच्या बद्दलच्या कौतुकाने तन्मयतेने ऐकलीपण आहेत. नरसिंहराव पंतप्रधान असतानाच्या काळात मनमोहनसिंगांच्या बजेट मधून कोट्यावधी परिवार नियंत्रीत ट्रस्टला अलोकेट केल्याचे ऐकल्याचे वाचल्याचे आणि पैसे असे का वाटले गेले याची प्रश्नचिन्हे मनात पडल्याचे अजूनही व्यवस्थित आठवते,
मनमोहनसिंगांचे अर्थमंत्री काळातले स्वतंत्रपणे आकलन करायचे झाले तरी या अर्थमंत्र्याने आयातकर अत्यंत वेगाने कमी केले पण त्याच वेगाने स्वदेशी उत्पादनांवरील उत्पादन शुल्क (एक्साईज ) कमी केले नाही, इंदिराजींनी मोठ्या कष्टाने केलेल्या औद्योगिक उत्पादनांच्या भारतीय करणाची पिछेहाटही मनमोहनसिंगांपासूनच झाली.
त्यांनी आणि पि चिदंबरमांच्या बजेट मधून सॉफ्टवेअरला सवलती दिल्या जात असताना हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या उत्पादनास तेवढ्या सवलती पुरवल्या गेल्या नाहीत आणि महत्वाच्या रोजगारक्षम क्षेत्रात भारत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मागे पडला हे स्वतः पुरेसे जवळून अनुभवले आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर बाबत दिरंगाई झाल्याची कबुली स्वतः चिदंबरमांनी २०१४च्या आसपास दिली. कौतुक करण्यास हरकत नाही पण व्यक्तीपुजेच्या भरीस न पडता ज्याचे त्याचे मापही ज्याच्या त्याच्या पदरात टाकले पाहीजे.
मनमोहन सिंग मोदींप्रमाणे स्वसिद्ध लोकप्रीयता असलेले नेतृत्व असते आणि परिवाराच्या घराणेशाहीला घरी बसवून काँग्रेसचे सर्वेसर्वा झाले असते तरीही ओढून ताणूनचे कौतुक करण्याची वेळ आली नसती. जो टिव्ही रिमोट शिवाय चालूच झाला नाही त्याने मी रिमोटवर नव्हतो म्हणून किती सांगितले तरी बुंदसे गई हौदसे नही आती.
23 Nov 2018 - 9:10 pm | mrcoolguynice
_/\_ सर्वपक्षिय जाणत्या राजमान्य मान्यवरहो,
कृपया मी दोन दोन धागे काढलेत , तिकडे थोड़ी पायधूल झाड़ून ,
मुद्देसुद अभ्यसू प्रतिसाद दयाहों ....
23 Nov 2018 - 11:27 pm | विशुमित
<<नरसिंहराव पंतप्रधान असतानाच्या काळात मनमोहनसिंगांच्या बजेट मधून कोट्यावधी परिवार नियंत्रीत ट्रस्टला अलोकेट केल्याचे ऐकल्याचे वाचल्याचे आणि पैसे असे का वाटले गेले याची प्रश्नचिन्हे मनात पडल्याचे अजूनही व्यवस्थित आठवते,>>
==>> कृपया थोडे विस्कटून सांगाल का? माहितीमध्ये भर पडेल.
<<<इंदिराजींनी मोठ्या कष्टाने केलेल्या औद्योगिक उत्पादनांच्या भारतीय करणाची पिछेहाटही मनमोहनसिंगांपासूनच झाली. >>>
==>> यात गांधी घराण्याचा आणि मनमोहन सिंगांचा कसा संबंध समजू शकेल का?
<<< त्यांनी आणि पि चिदंबरमांच्या बजेट मधून सॉफ्टवेअरला सवलती दिल्या जात असताना हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या उत्पादनास तेवढ्या सवलती पुरवल्या गेल्या नाहीत आणि महत्वाच्या रोजगारक्षम क्षेत्रात भारत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मागे पडला हे स्वतः पुरेसे जवळून अनुभवले आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर बाबत दिरंगाई झाल्याची कबुली स्वतः चिदंबरमांनी २०१४च्या आसपास दिली.
==>> असे म्हणायचे आहे का गांधी घराण्याचा/काँग्रेस पार्टीचा दोघांवर दबाव होता. त्याची काय करणे असावीत ?
<<<मनमोहन सिंग मोदींप्रमाणे स्वसिद्ध लोकप्रीयता असलेले नेतृत्व असते आणि परिवाराच्या घराणेशाहीला घरी बसवून काँग्रेसचे सर्वेसर्वा झाले असते तरीही ओढून ताणूनचे कौतुक करण्याची वेळ आली नसती>>
==>> पंतप्रधानाचे पहिले काम देश चालवणे आहे ना कि लोकांना घरी बसवणे. "काँग्रेसमुक्त भारत" ह्या घोषणे पासून प्रधानसेवाकाच्या स्वसिद्ध लोकप्रीयतेला उतरती कळा लागली आहे. बाकी बरे चालले होते. असो ..
24 Nov 2018 - 9:16 am | माहितगार
लोकशाहीतील राजकारणात घराणेशाहीचे अस्तीत्व हा मुदलात लोकशाहीचा आधार असलेल्या लोकांचा अपमान आहे. घराणेशाही बाबत मोदींनी अकालीदल आणि मनेका गांधींबाबत जरी तडजोड केली तरी माझ्या लेखी मी जेवढी नकारात्मकपणे मोजतो तेवढेच काश्मिरातील अब्दुल्ला आणि मुफ्ती असो यादव-पटनायक- पवार- गौडा असो वा करुणानिधी असो वा नेहरु-गांधी घराणे असो हि सगळी घराणी आणि त्यांना साथ देणारी मंडळी एकतर सव्वाशे कोटी जनतेचा अपमान करताहेत किंवा सव्वाशे कोटी जन घराणेशाही शिवाय नेतृत्व निवडू शकत नसतील तर ते लोकशाहीसाठी अपात्र आहेत ह्या भारतवासीयांना लोकशाहीची गरज नाही . ज्या गोष्टीची गरज नसते तिची वाट लागण्याची बर्यापैकी शक्यता असू शकते.
राजकीय घराणेशाहीशी तडजोड हे डोके खाली वर पाय करुन सांगितले तरीही लोकशाहीस स्पृहणिय ठरत नसावे किंवा कसे.
23 Nov 2018 - 9:04 pm | मामाजी
विशुमित साहेब,
पंतप्रधानांच्या अध्यक्षते खाली केंद्रिय मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वसंमतीने घतलेला व तथाकथीत राष्ट्रीय सल्लागार समिती ने सुद्धा सहमती दर्शवलेला एक अध्यादेश स्वीकृती साठी राष्ट्रपतिंकडे पाठवण्यात आला होता. परंतू साधे खासदार असलेले राहूल गांधी यांनी भर पत्रकार परिषदेत "अत्यंत मूर्खपणाचा व केराची टोपली दाखवण्याच्या लायकीचा निर्णय " अशी हेटाळणी करत राणा भीमदेवी थाटात फाडून टाकला व राज्यघटनेनुसार सर्वोच्च पदी असलेल्या माननीय पंतप्रधानांनी तो अध्यादेश निमुटपणे मागे घेउन आपली आगतीकता दर्शवली होती. आता तीच व्यक्ति निर्लज्जपणे तोंड वर करून सांगते की माझे सरकार रिमोट कंट्रोल वर चालणारे नव्हते.
यावर आपल्या सारखे मोदीद्वेष्टे व गांधी घराण्याचे अंधभक्त नुसता विश्वासच ठेवत नाहीत तर त्याचे समर्थन करून इतरांच्या सुद्धा गळी उतरवण्याचा मनापासुन प्रयत्न करतात. मी आपल्या मोदीद्वेषाला व गांधीघराण्यावर असलेल्या अंधभक्तिला मनापासुन दाद देत आहे. निष्ठा असावी तर अशी नाहीतर आमच्या सारखे मोदीभक्त, सरकारने एखादा जरी निर्णय न पटणारा घेतला की लगेच मोदींवर टीकास्त्र सोडणार. पण मनमोहन सिंगांपासुन ते एखाद्या नगरसेवका पर्यंत सर्वांसाठी राहुल गांधींनी उच्चारलेला शब्द म्हणजे वेदवाक्य आणि मग कोणत्याही परिस्थितीत आपला आत्मसन्मान, आपले ज्ञान, आपले पद, प्रतिष्ठा याचे जनमानसात हसे होईल याची तमा न बाळगता त्याचे समर्थन करणे हा धर्म. तेव्हा या मानसिक गुलामगिरी साठी लगे रहो मुन्ना भाई..
23 Nov 2018 - 9:20 pm | माहितगार
:))
23 Nov 2018 - 10:51 pm | विशुमित
१. <<<पंतप्रधानांच्या अध्यक्षते खाली केंद्रिय मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वसंमतीने घतलेला व तथाकथीत राष्ट्रीय सल्लागार समिती ने सुद्धा सहमती दर्शवलेला एक अध्यादेश स्वीकृती साठी राष्ट्रपतिंकडे पाठवण्यात आला होता. परंतू साधे खासदार असलेले राहूल गांधी यांनी भर पत्रकार परिषदेत "अत्यंत मूर्खपणाचा व केराची टोपली दाखवण्याच्या लायकीचा निर्णय " अशी हेटाळणी करत राणा भीमदेवी थाटात फाडून टाकला व राज्यघटनेनुसार सर्वोच्च पदी असलेल्या माननीय पंतप्रधानांनी तो अध्यादेश निमुटपणे मागे घेउन आपली आगतीकता दर्शवली होती. >>>
== >> मी पंतप्रधानपदी असताना सरकार आणि काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नव्हते- मा. मनमोहन सिंग... हे तुमच्या विधानासाठी पुरेसे आहे. तो कथित अध्यादेश कसा क्लियर करण्याचा प्रयत्न झाला हे उगाळून उगाळून त्याचा पार गोटा झाला आहे. आता फक्त त्यातून तेलच यायचं बाकी आहे. बायदिवे मनमोहन सिंग जी खूप कमी शब्दामध्ये बऱ्यापैकी अचूकतेने आपले म्हणणे मांड्यांन्यात वाकबगार आहेत. बोल-बचनगिरी पेक्षा बरेच म्हणायचे.
एक बातमी चिटकवतो (त्या सर्व सर्वेला जास्त महत्व नाही माझ्या लेखी). अध्यादेश मागे घेण्याला 34 % श्रेय राहुल गांधींना दिले गेले होते आणि 66% वाचकांचे म्हणणे होते की सरकारवर लोकांचा (त्यावेळेसच्या कथित INTELECTUALS पुरोगामी, डावे आणि इतर विरोधी पक्ष) दवाब होता.
https://hindi.oneindia.com/news/india/rahul-gandhi-deserves-no-credit-fo...
२. आता तीच व्यक्ति निर्लज्जपणे तोंड वर करून सांगते की माझे सरकार रिमोट कंट्रोल वर चालणारे नव्हते.
--- क्षमा असावी पण भारत देशातील एका हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाबद्दल वापरलेले हे वाक्य मला वयक्तिक खूप निर्लज आणि किळसवाणे वाटले. तुम्ही याला भक्तीची लेबले चिटकवणार यात काही नवीन नसणार आहे.
३. यावर आपल्या सारखे मोदीद्वेष्टे व गांधी घराण्याचे अंधभक्त नुसता विश्वासच ठेवत नाहीत तर त्याचे समर्थन करून इतरांच्या सुद्धा गळी उतरवण्याचा मनापासुन प्रयत्न करतात.
==>> हा कुठून शोध लावला मामा ? का आपलं असाच खुन्नस काढायची?
४. मी आपल्या मोदीद्वेषाला व गांधीघराण्यावर असलेल्या अंधभक्तिला मनापासुन दाद देत आहे.
==>> आम्ही २ पैश्याची किंमत असणाऱ्या लोकांची दाद मिळावी म्हणून मिपावर लिहीत नाही. तुम्ही तुमची किंमत स्वतः ठरवाल ही अपेक्षा .
५. निष्ठा असावी तर अशी नाहीतर आमच्या सारखे मोदीभक्त, सरकारने एखादा जरी निर्णय न पटणारा घेतला की लगेच मोदींवर टीकास्त्र सोडणार.
==>> तुम्ही तिकडे म्हशी का राखानात, मला काय करायचंय ?
६. तेव्हा या मानसिक गुलामगिरी साठी लगे रहो मुन्ना भाई..
==>> तुमचा संपूर्ण प्रतिसाद "बिरुटे" सरांच्या "क्लास" ला दाद दिल्या कारणाने वचपा काढण्याच्या प्रतीचा वाटला, हे खेदाने नमूद करू इच्छितो.
पण भक्तांचा (तुम्ही स्वतः भक्त म्हणून घेतले म्हणून बोललो) प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्या "फेकोबा"ला कोणी काय बोलले की गांधी घराण्याची करणी झाली असे लगेच जाहीर करून टाकतात.
----
सुभा हो गयी मामू..
डॉ. अस्थानाचा हास्ययोग डोळ्यासमोर तरारला...
25 Nov 2018 - 4:36 pm | मामाजी
आपण नकळत माझ्या या मुद्द्याचे समर्थन केलेत त्याबद्दल धन्यवाद..
मी पंतप्रधानपदी असताना सरकार आणि काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नव्हते- मा. मनमोहन सिंग... हे तुमच्या विधानासाठी पुरेसे आहे. १) यावरून आपल्याला हे सूचित करायचे आहे का की वस्तुस्थिती काहीही असो मनमोहन सिंगांनी पत्रकार परिषदेत केलेले खुलासेच सत्य म्हणून स्विकारण्यात यावेत. २) अध्यादेश फाडला याचाच अर्थ हा की सरकार आणि काँग्रेसमध्ये मतभेद होते अन्यथा तो फाडायचे काहीच औचित्य नव्हते. ३) अध्यादेश मागे घेण्याला 34 % श्रेय राहुल गांधींना दिले गेले होते आणि 66% वाचकांचे म्हणणे होते की सरकारवर लोकांचा (त्यावेळेसच्या कथित INTELECTUALS पुरोगामी, डावे आणि इतर विरोधी पक्ष) दवाब होता. या विधानाचा सरळ अर्थ हाआहे की सरकारवर ३४% राहुल गांधीचा व ६६% कथित INTELECTUALS पुरोगामी, डावे आणि इतर विरोधी पक्षांचा दबाव होता. . याचाच सरळ अर्थ हा की मनमोहन सिंगांचे सरकार हे दबावा खाली काम करणारे सरकार होते.
या वरून मी असा निष्कर्ष काढतो की सर्वसामान्यांनी वस्तुस्थिती कडे दुर्लक्ष करावे व माध्यमांसमोर केलली विधानेच सत्य म्हणून स्विकारावीत ही आपली विचारसरणी आहे.
तो कथित अध्यादेश कसा क्लियर करण्याचा प्रयत्न झाला हे उगाळून उगाळून त्याचा पार गोटा झाला आहे. आता फक्त त्यातून तेलच यायचं बाकी आहे. पुढे जेव्हा आपण नोटाबंदीवर प्रतिक्रीया द्याल तेह्वा याचे स्मरण ठेवाल अशी आपल्याकडून माफक अपेक्षा..
क्षमा असावी पण भारत देशातील एका हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाबद्दल वापरलेले हे वाक्य मला वयक्तिक खूप निर्लज आणि किळसवाणे वाटले. आपल्या वैयक्तिक मताचा मी आदर करतो. पण व्यक्तिचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग एखाद्या कृतीत आहे हे सिद्ध झाल्यानंतर सुद्धा ती व्यक्ति ठामपणे आपला सहभाग नाकारते या कृती ला निर्लज्जपणे तोंड वर करून सांगणे असे सर्वसधारणपणे मराठीत म्हणतात. ज्या हुशार आणि अभ्यासू असलेल्या मनमोहन सिंगांनी अर्थमंत्री म्हणून नरसिंह रावांच्या नेतृत्वाखाली नेत्रदिपक कामगीरी करून दाखवली त्यांनीच नंतर च्या कालावधीत त्याच्यावर स्वत: बोळा फिरवला. ज्या क्षणी त्यांना जाणवले की आपण आपल्या विद्वत्तेचा उपयोग करून स्वायत्तपणे राज्यकारभार करू शकत नाही त्याक्षणी त्यांनी राजीनामा देउन बाहेर पडावयास हवे होते. परंतू त्यांनी नुसती कळसूत्री बाहुले बनून रहाण्यातच धन्यता मानली नाही तर त्या भूमिकेचे समर्थन पण केले म्हणून मी माझ्या दृष्टीने योग्य अशी शब्द योजना केली.. असो माझे स्पष्टीकरण येण्या आधीच तुम्ही याला भक्तीची लेबले चिटकवणार यात काही नवीन नसणार आहे. असा अभिप्राय देऊन दुसर्यांच्या मतांची आपल्या लेखी काय किंमत आहे हे दाखऊन दिलेलेच आहे..
३. यावर आपल्या सारखे मोदीद्वेष्टे व गांधी घराण्याचे अंधभक्त नुसता विश्वासच ठेवत नाहीत तर त्याचे समर्थन करून इतरांच्या सुद्धा गळी उतरवण्याचा मनापासुन प्रयत्न करतात. ==>> हा कुठून शोध लावला मामा ? का आपलं असाच खुन्नस काढायची? यात शोध लावण्या सारखे काय आहे.. ऊदाहरणार्थ नोटाबंदी पूर्णपणे फसली हे मान्य करा हे सर्वांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न आजतागायत चालू आहे. तसेच यात आपल्याला खुन्नस कशी जाणवली हे देवजाणे..
४. मी आपल्या मोदीद्वेषाला व गांधीघराण्यावर असलेल्या अंधभक्तिला मनापासुन दाद देत आहे. हा माझा मुद्दा मनावर घेऊन आपण ==>> आम्ही २ पैश्याची किंमत असणाऱ्या लोकांची दाद मिळावी म्हणून मिपावर लिहीत नाही. तुम्ही तुमची किंमत स्वतः ठरवाल ही अपेक्षा ही दाद दिलीत यावरूनच माझा मुद्दा किती योग्य होता याची खात्री पटली.
६. तेव्हा या मानसिक गुलामगिरी साठी लगे रहो मुन्ना भाई..
==>> तुमचा संपूर्ण प्रतिसाद "बिरुटे" सरांच्या "क्लास" ला दाद दिल्या कारणाने वचपा काढण्याच्या प्रतीचा वाटला, हे खेदाने नमूद करू इच्छितो.
हा प्रतिसाद लिहीण्याच्या आगोदरच मी तुमच्या "बिरुटे" सरांच्या "क्लास" बद्दल ची माझी प्रतिक्रीया त्यांच्या धाग्यावर पाठवली होती.. जो मुद्दा मला पटत नाही त्याच्यावरच मी प्रतिसाद देतो..कोणावर तरी वचपा काढावा या उद्देशाने मी प्रतिसाद देत नाही. आपल्या बद्दल मला महित नाही..
पण भक्तांचा (तुम्ही स्वतः भक्त म्हणून घेतले म्हणून बोललो) प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्या "फेकोबा"ला कोणी काय बोलले की गांधी घराण्याची करणी झाली असे लगेच जाहीर करून टाकतात. हे वाचुन तर मला हसुच आले कारण मीच स्वत: लिहीले आहे की
५. निष्ठा असावी तर अशी नाहीतर आमच्या सारखे मोदीभक्त, सरकारने एखादा जरी निर्णय न पटणारा घेतला की लगेच मोदींवर टीकास्त्र सोडणार. सरकारच्या न पटणार्या निर्णयावर टीका तर आम्ही स्वत:हूनच करतो त्यासाठी आपल्याला पूजनीय असणार्या गांधी घराण्याने आमच्यावर करणी वगैरे करण्यची तसदी घेण्याची काहीही गरज नाही.
स्पष्ट शब्दांत विचार मांडल्यामुळे आपणास नकळत दुखावले असल्यास आपला माफी मागतो..
26 Nov 2018 - 10:21 am | विशुमित
१. यावरून आपल्याला हे सूचित करायचे आहे का की वस्तुस्थिती काहीही असो मनमोहन सिंगांनी पत्रकार परिषदेत केलेले खुलासेच सत्य म्हणून स्विकारण्यात यावेत-- तो ज्याचा त्याचा प्रश्न. या देश्यात तुम्हाला विचार स्वतंत्र आहे. सद्सद्विवेकबुद्धी वापरून त्याचा अवलंब करू शकता.
२) अध्यादेश फाडला याचाच अर्थ हा की सरकार आणि काँग्रेसमध्ये मतभेद होते अन्यथा तो फाडायचे काहीच औचित्य नव्हते.--
==>> मतभेद असू ही शकतील पण तो काढायच्या आधी! पुन्हा सहमती झाली असावी. सरकारची प्रतिमा मलीन होण्या ऐवजी राहुल गांधींचा मोहरा म्हणून वापर केला असावा. सरकार पण सेफ आणि झाला फायदा राहुल गांधींचा तर झाला (जो काय झाला नाही). शक्यता काहीही असू शकतात.
३. याचाच सरळ अर्थ हा की मनमोहन सिंगांचे सरकार हे दबावा खाली काम करणारे सरकार होते.>>
==>> दवबाखाली काम करत होते तर त्यात काय वाईट आहे. इनफॅक्ट मी म्हणतोय ६६% वाचकांच्या मते राहुल गांधी मुळे नव्हे इतर दबावाच्या कारणाने अध्यादेश मागे घेतला. उलट लोकांच्या (विरोधीपक्षाच्या ही) दबावामुळे चुकीच्या गोष्टी टाळल्या हे उत्तमच झाले की. तुम्हाला काय वाटते अधयदेश काढायला पाहिजे होता की नव्हता?
४. या वरून मी असा निष्कर्ष काढतो की सर्वसामान्यांनी वस्तुस्थिती कडे दुर्लक्ष करावे व माध्यमांसमोर केलली विधानेच सत्य म्हणून स्विकारावीत ही आपली विचारसरणी आहे.
==>> मी तर माध्यमांवर सरसकट विश्वास ठेवणे कधीच सोडून दिले आहे. मी तुम्हाला हे कुठे म्हणालो "वस्तुस्थिती कडे दुर्लक्ष करावे व माध्यमांसमोर केलली विधानेच सत्य म्हणून स्विकारावीत" हे दाखवून द्यावे. मी माझे ते शब्द मागे घेईन नाहीतर तुम्ही तुमचे हे वाक्य मागे घायचे औदार्य दाखवावे.
५. असा अभिप्राय देऊन दुसर्यांच्या मतांची आपल्या लेखी काय किंमत आहे हे दाखऊन दिलेलेच आहे..>>>
==>> अरे देवा काय च्या काय आणि फाटक्यात पाय!
६. जेव्हा आपण नोटाबंदीवर प्रतिक्रीया द्याल तेह्वा याचे स्मरण ठेवाल अशी आपल्याकडून माफक अपेक्षा..>>
==>> माझ्या लेखी नोटबंदी वरील चर्चेचा उगाळून उगाळून गोटाच होण्याच्या लायकीचा झाला आहे आणि त्यातून तेल येतंय हे सुद्धा समर्थक छाती बडवू बडवू सांगत आहेत. त्यांच्या मताचा आदर आहे. आमचे त्या बद्दलचे ठोकताळे वेगळे आहेत, त्याचा ही आदर राखावा. (कोणाकडून अपेक्षा करतोय मी !)
७. ऊदाहरणार्थ नोटाबंदी पूर्णपणे फसली हे मान्य करा हे सर्वांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न आजतागायत चालू आहे.
==>> मी "हे मान्य करा" असे लिहलेले कुठे वाचण्यात आले हे दाखवून द्या. नाहीतर आपले शब्द मागे घ्या. जनता हुशार आहे हो, एकदा फसेल दोनदा फसेल, तिसऱ्यांदा विचारपूर्वक निर्णय घेईन. गळी उतरायला ते काय कुकुले बाळ राहिले नाहीत. १८ + चे घोडमे झालेत ते.!
८. ही दाद दिलीत यावरूनच माझा मुद्दा किती योग्य होता याची खात्री पटली.
==>> काय खात्री पटली? म्हणजे तुम्ही २ पैश्याचे आहेत ? उगाच स्वतःच्या अंगावर ओढून घेताय.
९. तेव्हा या मानसिक गुलामगिरी साठी लगे रहो मुन्ना भाई..
==>> मामू ... एवढी मुभा काय म्हणून घेतली ? कसली गुलामगिरी ? उगाच हिंगुळ रंगवायचा!
१०. आपल्याला पूजनीय असणार्या गांधी घराण्याने >>
==> कुठे मी लिहले आहे "गांधी घराणे" पूजनीय आहे ते ? नाहीतर शब्द मागे घ्या.
तुमचं संतुलन बिघडले आहे, त्यामुळे काहींच्या काही बरळत लिहीत सुटला आहात. आवरा स्वतःला.
११. स्पष्ट शब्दांत विचार मांडल्यामुळे आपणास नकळत दुखावले असल्यास आपला माफी मागतो..
==>> हे स्पष् शब्द नसून तुम्ही पुरते गोंधळला आहात. तुम्हाला नक्की हसावे की रडावे हे काहीच सुचत नाही आहे. तुमचा मामू. डॉ अस्थाना झाला आहे.
26 Nov 2018 - 11:25 am | माहितगार
विशुमितजी इथे तुमचे उत्तर राजकीय चष्म्यांच्या दलदलीतून जरासे बाहेर येऊ पहाते आहे आणि आपण अधिक शक्यतांचा विचार करु शकता म्हणून काही वेगळ्या शक्यतां तपासाव्या वाटल्यास पहावे.
मनमोहन सिंगांनी सरकारातील राजकीय कारकीर्द चाणक्य म्हणवल्या जाणार्या नरसिंहरावांसोबत केली ज्या चाणक्याच्या हिशेबी सरकार लोकसभेत अल्पमतात असले तरी स्टॅबिलीटी ऑफ गव्हर्नमेंट इज पॅरामाऊंट आणि त्यासाठी साम सोबत दाम हा ग्राह्य मार्ग होता (उदाहरण संदर्भ झारखंडमधील नेत्यांसोबतचे आर्थिक व्यवहार) . काम झाले की राजकीय नेत्यांवर धाडी टाकण्याचे कामही नरसिंहरावांनीच केले.
हिच स्ट्रॅटेजी युपिएमधील घटकपक्षांना सोबत नेण्यासाठी आधीच्या अनुभवावरुन मनमोहन सिंगानी वापरली ते वापरताहेत आणि सरकार किंवा स्वतःला वाचवण्यासाठी युपिए घटकपक्षातून अध्यादेशाची टूम निघाली असू शकते किंवा एकीकडे घटकपक्षांसोबत नाटक करायचे आणि कॉमनवेल्थ प्रकरणातील नाकर्तेपणा नंतर - दुसरीकडे विशेषतः परिवारातील जावयाने राजस्थानातील जमिनींबाबत जे इंटर्नल ट्रेडींग विरोधी कायदाच अस्तीत्वात नसल्याने चालून जात होते तरी नैतिक दृष्ट्या परिवाराची प्रतिमा साशंकीत झालेली होती - काँग्रेस सोबत अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेतृत्वाची प्रतिमा डागाळली ती सावरणे राहुल गांधीची प्रतिमा सावरणे या साठी अध्यादेश आधी मंत्रिमंडळाकडून मंजूर होऊ देणे आणि मग पत्रकारपरिषदेत जाऊन फाडणे जेणे करुन राहुल गांधींची व्यक्तिगत प्रतिमा उजळून निघाली.
अर्थात भष्टाचार विरोधी प्रतिमा ठसवण्याचा प्रयत्न (आता त्यास राफेल विरोधी भूमिकेची जोड) ठसवण्याचा पुरेपूर प्रयत्न असूनही राजकुमारांनी मेव्हण्याच्या (बहिणीच्या नवर्याच्या ) राजस्थानी जमिनींच्या व्यवहारातील नैतिकतेबाबत आजतागायत अवाक्षर काढल्याचे ऐकीवात नाही.
आपल्या स्वल्प संदर्भासाठी राजस्थान जमिन प्रकरणाबाबत (माझे जे इंप्रेशन आहे ते असे की) काही जमिनीवर एक इंडस्ट्रीयल कॉरीडॉर बनवण्याचा राजस्थान सरकारचा निर्णय झालेला होता . त्यामुळे अधिग्रहीत करावयाच्या जमिनींचे भाव वाढणार होते. वाढलेल्या भावांचा फायदा सर्वसाधारणपणे थेट जमिन मालकांना पोहोचावयास हवा, पण राजस्थाप्रकरणात नेमक्या ह्या जमिनींचे आर्थिक व्यवहारात नाक खुपसून जावई महोदयांच्या फर्मने वाढीव किमतींचा फायदा संबंधीत जमिन मालकांएवजी आपल्याकडे वळता केला. असलाच व्यवहार पब्लिकली लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सच्या बाबतीत झाला असता तर सामान्य शेअर होल्डर्सचे नुकसान करणारा म्हणून बेकायदेशीर ठरला नसता का ? शेअर मार्केटमधील शेअर होल्डर्स बाबतीत जे कायद्याचे संरक्षण आहे ते शेतकर्यांच्या जमिनी बाबतीत सरकारी गोपनीय निर्णय सलेक्टीव्हली फोडून कुणि व्यवहार केल्यास सद्य स्थितीत कायदे विषय संरक्षणाचा अभाव आहे. आता हे सगळे सामान्य नागरीकाला समजतही नसेल. पण भले सुयोग्य कायदा अस्तीत्वात नसो,तरीही शेकडा कोटी नफा कमवणार्या व्यवहारातील अनैतिकता भ्रष्टाचाराच्या विरोधात स्वतःची प्रतिमा उजळवून घेणार्या राजकुमारांना समजली नसेल का ?
माझ्या आठवणीनुसार जमिनीबाबत सरकार अंतर्गत माहितीचा उपयोग स्व फायद्यासाठी केल्याच्या आक्षेपावरुन एका महाराष्ट्र भाजपा मंत्र्याने चौकशी काळासाठी खुर्ची सोडली होती पुढे काय झाले माहित नाही पण बहुधा या केस मध्ये ही तांत्रिक दृष्ट्या कायदाच अस्तित्वात नसल्याने शपथभंगा पलिकडे कायदेबाह्यही काही नाही पण तरीही व्यवहाराच्या नैतिकतेबाबत चे प्रश्नचिन्ह शिल्लक रहातेच . उद्देश भाजपा अथवा संबंधीत राजकारण्यावर टिका करण्याचा म्हणून नाही परिवाराच्या जावईकृत्याकडे दुर्लक्ष करण्याबाबत टिकाकरताना ती एकतर्फी केली जात नाहीए हे लक्षात घ्याल हि अपेक्षा. बरे राजकीय कुरघोडीसाठी लघु आणि मध्यम उद्योग वाढवण्याच्या गप्पा मारताना जमिनी व्यवहारातून काही शे कोटींचा फायदा कमवणार्या मेव्हण्याला बाबा एक मध्यम उद्योगतरी टाक आणि दे शंभर जणांना काम असे तरी सांगितले का ?
क्षणभर समजूया आपचे केजरीवालही स्वच्छ नसतील भाजपाचे मोदी स्वच्छ नसतील किंवा बाकीचे लाखभर भारतीय राजकारणी स्वच्छ नसतील. पण दुसर्यां च्या भ्रष्टाचाराने परिवारातील जावईव्यवहाराकडे केलेले दुर्लक्ष कसे झाकले जाते ? आणि हा सर्व जावईव्यवहार अध्यादेश फाडण्यापुर्वीचा नव्हता किंवा कसे ? याचाच अर्थ पत्रकार परिषदेतील अद्यादेश फाडणे प्रतिमा उजळण्यासाठीचे एक नाटक मात्र होते . प्रतिपक्षाप्रमाणे राजकुमाराचे पायही मातीचेच आहेत असे कुणी समजले तर वावगे ठरावे किंवा कसे ?
इंग्रजीत म्हण आहे , सर्वांना काही काळासाठी फसवता येते, काही जणां सर्वकाळासाठी फसवता येते पण सर्वांना सर्व काळासाठी फसवता येत नाही.
आता लक्षात घ्या की आक्षेप मोदी किंवा भाजपा विरोधाला नाही , एका बाजूची व्यक्तीपुजा टाळण्यासाठी दुसर्याबाजूची व्यक्त्पुजा करुन बेवकुफ बनवून जनतेला आगीतून फोफाट्यात नेले जात आहे का ? यात केवळ एका परिवाराचा फायदा नाही महागठबंधन जेवढे मोठे असेल तेवढ्या सगळ्या राजकीय पक्षातील परिवारांचा मोठा फायदा असेल.
विरुद्ध बाजुच्या चौकशा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विरोधीबाजूच्या पक्षाला आठ आठवर्षे सरकार चालवण्यास मिळाल्यास , आणि आठवर्षांपेक्षा जास्त काळ राजकारणात रहाण्यावर मर्यादा घातली आणि परिवारांवर खाल्लेल्या पैशातून उद्योग उभारुन राजकारणातून बाहेर होणे कंपलसरी केल्या शिवाय भरकटलेल्या भारतीय राजकारणावर वचक निर्माण होण्याची सुतराम शक्यता नसावी किंवा कसे.
26 Nov 2018 - 1:37 pm | विशुमित
मला तुमचं सगळं 100% पटतय.
म्हणून मी एवढंच म्हणालो की मनमोहन सिंग म्हणत आहेत की सरकार आणि काँग्रेस यात मतभेद नव्हते.
...
ते मामांनी विनाकारण आमच्यावर गुलामगिरी वगैरे शेरे मारले म्हणून लेखप्रपंच.
23 Nov 2018 - 3:57 pm | खिलजि
माझ्या मित्राने आयुष्यात किमान दोन पंतप्रधानांना तरी पद्धतशीरपणे धुताना बघितले आहे .. यावर कुणाचे काही मत असल्यास ते मांडावे .. व्यवस्थित तपशीलवार खुलासा दिला जाईल ..
24 Nov 2018 - 6:38 pm | वन
येथील लेखनाचा हा माझा पहिला प्रयत्न होता. कवितेचे सर्व वाचक, प्रतिसादक आणि काथ्याकूटक या सर्वांचा मी आभारी आहे.
असं म्हणतात की कवीने त्याच्या कवितेत पूर्णपणे उतरावे; मागून कुठलेही स्पष्टीकरण देत बसू नये. तरीपण जरा लिहितोच.
ही कविता मी सन 2000 पूर्वी च केलेली आहे. तेव्हा त्यातला ‘राजा’ म्हणजे कुठल्याही समुदायापुढे मालकी हक्क गाजवणारी व्यक्ती इतकेच माझ्या मनात होते. अमुक तमुक देशाचा सर्वोच्च नेता असा काही विचार मनात नव्हता.
आता वरील काही प्रतिसादांत दोन मोठ्या नेत्यांची तुलना वाचून मला अंमळ मजा वाटली.
नंतर मी ही कविता एका संमेलनात वाचली. तेव्हा अध्यक्षीय भाषणात ते महोदय म्हणाले की यात ‘लोकशाहीचे विदारक चित्रण’ वगैरे आहे. तेव्हा माझ्याही डोक्यात वेगळा प्रकाश पडला !
कवीच्या मनात काय आहे आणि रसिक काय अर्थ काढतो यात बरेचदा फरक पडतो; कित्येकदा महदंतर असू शकते. हीच तर कवितेच्या रसग्रहणाची मजा आहे. वरील चर्चेने मला ती घेता आली हे कबूल.
अजून थोडी मजा आहे….
ही कविता इथे लिहिताना मी परगावी होतो व स्मरणशक्तीला ताण देत ती लिहिली. आज घरी येऊन वहीत पाहतो तर काय ? काही ओळी मी बदलल्यात असे दिसले !
आता त्या मोजक्या मूळ ओळी लिहितो. हा झालेला बदल योग्य की अयोग्य हे सर्वस्वी तुम्हीच ठरवायचे आहे.
कडवे २: ओळी ३-४:
राजाची स्तुती होते
सगळे अनिच्छेने ऐकतात
…..
कडवे ४: ओळी १-२:
राजाचा उन्माद पसरवीत शब्द विरतात
सगळे उठण्यासाठी वाट बघू लागतात
……………...
माझं संपलं आता , लोभ असावा .
24 Nov 2018 - 7:38 pm | विशुमित
+1
26 Nov 2018 - 11:14 am | श्वेता२४
2000 साली लिहलेली ही कविता आजही लागू होते यातच कवितेचे क्षेष्ठत्व दडलेले आहे. तुम्ही तुमचा या कवितेसह एक काव्यसंग्रह प्रसिद्ध करुनच टाका. या कवितेसाठी तुम्हाला पुरस्कार मिळण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात तुमची ही कविता कालातीत असून आजही कशी लागू होतो आणि कवी किती द्रष्टा होता यावर प्रबंध, चर्चा व लेख पडतील अशी खात्री वाटते. कविता साधी सरळ आणि आशयघन वाटली. आवडली.
(मी हा प्रतिसाद गंभीरपणे लिहीला आहे. कृ.ह.घे.न.)
26 Nov 2018 - 12:34 pm | वन
तुमचा प्रामाणिक प्रतिसाद, वापरलेली विशेषणे आणि तुम्ही केलेली सूचना याबद्दल मनापासून आभार !
..
ही कविता विशिष्ट व्यक्तिगत न घेतल्यास त्याचा आस्वाद अधिक चांगला असेल, एवढेच म्हणतो.
26 Nov 2018 - 2:13 pm | अथांग आकाश
कविता आवडली!
26 Nov 2018 - 3:37 pm | वन
आकाशजी, किती छान असतात तुमची चित्रे आणि विषयाला अनुरूप.
या चित्रामुळे कवितेपेक्षा कमी जागेत व्यक्त होता येते !
धन्यवाद.