Skip to main content

डॉ.अक्षयकुमार काळे : एक ओळख. (अ.भा.मराठी साहित्य संमेलन उमेदवार)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मंगळवार, 01/11/2016 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. डोंबिवली येथे नियोजित ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची रणधुमाळी सुरु झाली आहे. आमच्या मराठवाडा साहित्य परिषद शाखेत डॉ.अक्षयकुमार काळे यांनी नुकताच आपला अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. आम्ही त्यांचे पाठीराखे, आणि मतदार असल्यामुळे आम्हीही त्यांच्या सोबत होतोच. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्य समाज आणि संस्कृतीच्या चिंतनाचं एक व्यासपीठ आहे, असे आम्ही समजतो. मराठी समाज, भाषा आणि संस्कृतीचा विचार त्या विचारपीठावरुन मांडल्या जातो हे अनेकांना माहिती आहेच. मागील वेळी पुण्यातील साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या रसिकांना त्याची आठवण असेलच.संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. अक्षयकुमार काळे, प्रवीण दवणे, यांच्यासह मदन कुळकर्णी व डॉ. जयप्रकाश घुमटकर हे उमेदवार रिंगणात आहेत. डॉ.अक्षयकुमार काळे यांचा मिपाकरांना परिचय व्हावा म्हणून हा प्रपंच.
Screenshot_20161101-210528
डॉ.अक्षयकुमार काळे
डॉ.अक्षयकुमार काळे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या वरुड गावचा. एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या डॉ.काळेंना सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन कार्याचा वारसा परंपरेने लाभला. १९७४ साली ते एम.ए.मराठी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. वयाच्या सत्तावीसव्या वर्षी पीएच.डी पदवी त्यांनी मिळवली. तर वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी डी.लिट पदवी प्राप्त केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठीत ते मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. २०१५ मधे ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारा विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. विद्यापीठातील विविध पदं आणि स्पृहणीय कार्याबद्दल त्यांचा कुलगुरुंचे सन्मानचिन्ह आणि महाराष्ट्र शासनाचा राज्यशिक्षक पुरस्क्रारही मिळाला आहे. मराठी प्राध्यापक परिषदाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. चर्चासत्रांचे आयोजन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरील साहित्य संमेलनाचे आयोजन, विविध परिसंवाद, विविध साहित्य साहित्यिक- सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले आहे. डॉ.अक्षयकुमार काळे यांचा आवडीचा विषय कविता आहे. काव्यसमीक्षा हा त्याचा आपला एक खास प्रांत आहे. समीक्षा आणि आस्वाद हा त्यांचा पींड. गेली चाळीस वर्ष काव्यसमीक्षेवर ते लिहित आहेत . विविध चर्चासत्र आणि परिसंवादात त्यांनी या विषयावर विवेचन केले आहे. १९८५ साली 'सूक्तसंदर्भ' हा पहिला लेखसंग्रह त्यांचा प्रकाशित झाला. पुढे गोविंदाग्रज-समीक्षा, कविता कुसुमाग्रजांची या सर्व ग्रंथात त्यांनी सविस्तर विवेचन केले आहे. अर्वाचीन मराठी काव्यदर्शन या त्यांच्या काव्यग्रंथात १८८५ ते १९९५ या कालखंडातील आकारास आलेल्या काव्याची संयत, साधार चिकित्सा केली आहे. डी.लीट. साठीच्या अभ्यासाच्या विषयात 'अत्याधुनिक काव्यप्रवाह आणि काव्यप्रकारांचे' चिकित्सक आकलन त्यांनी केले आहे. मर्ढेकरांची कविता आकलन आस्वाद आणी चिकित्सा या पूर्वार्ध आणि उत्तारार्ध अशा दोन ग्रंथात मर्ढेकरांच्या कवितेची साधार चिकित्सा त्यांनी केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यक्ती आणि वाङमय या ग्रंथाचे संपादनही केले आहे. ग्रेसविषयी हे एक त्यांचे आगळे वेगळे पुस्तक आहे. ग्रेस यांची प्रदीर्घ मुलाखत घेवून ग्रेस यांच्या अनुभूतीविश्वाचे घटक त्यांची गुंतागुंत , निर्मितीप्रक्रिया, रचनेतील तर्कबंध, वास्तव आणि अद्भूतता , कवितेतील गेयता सुभिषितं, यासंबंधीचे आकलन या ग्रंथात आहे. प्रतीतिविभ्रम या संग्रहात कवींच्या काव्यावरील परीक्षणात्मक लेखन त्यांनी संपादीत केले आहे.
Screenshot_20161009-122122
आमचं कौतुक
नारायण सुर्वे आणि सुरेश भट यांच्या प्रदीर्घ मुलाखतीत त्याच्या वा़डमयीन व्यक्तिमत्वाची सुक्ष्म मांडणी केली आहे. गालीबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य हा एक त्यांचा गाजलेला ग्रंथ यात काव्याभिरुची आणि समीक्षा सामर्थ्यांचे वेगळे परिणाम यात दिसून येतात. या ग्रंथास मराठवाडा साहित्य परिषदेचा म.भि.चिटणीस पुरस्कार, महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सेतुमाधवराव पगडी पुरस्काराने त्यांचा गौरव केला आहे. ६४ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचा सन्मानही त्यांना मिळाला आहे. डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या काव्यसमीक्षेचा गौरव व्हावा म्हणून 'अर्वाचीन मराठी काव्यसमीक्षा' हा ग्रंथ त्यांच्या लेखनासंबंधी लिहिला गेला आहे. त्यांच्या काव्यसमीक्षेचा हा मोठा गौरव आहे. डॉ.अक्षयकुमार काळे यांच्या काव्यसमीक्षेचा चिकित्सक अभ्यास या विषयावर नागपूर विद्यापीठात पीएच.डी संशोधक विद्यार्थ्याने त्यांच्यावर पि.एच.डीही मिळवली आहे. डॉ. अक्षयकुमार काळे यांना आपल्या सर्व मिपाकर यांच्या वतीने निवडून येण्यासाठी शुभेच्छा देतो. काहीं मिपाकरांनी इतर उमेदवारांना पाठींबा दिला तरी माझी काही हरकत असणार नाही. :) (डॉ. अक्षयकुमार यांच्याशी झालेल्या गप्पातून आणि त्यांच्या ओळखपत्रामधून मधून मिळालेली माहिती)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9295
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

संक्षिप्त परिचय आवडला. बहुसंख्य मराठी साहित्यिकांबद्दल मराठी विकिपीडियावर फारशी माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे शक्य असल्यास या वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या उमेदवारांवर विकीवर लेख यायला हवेत असे वाटते.

धन्यवाद सर. यांच्या कारकीर्दीबाबत काहीच माहिती नव्हती.

च्यायला आपलंच माहितीविश्व छोटंय बहुतेक.. ह्यांचं नाव ऐकलं नव्हतं... श्रीपाल सबनीस हे नाव पण त्यांच्या कॉंट्रोव्हर्सी मुळे कळालं होतं... या वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या उमेदवारांवर विकीवर लेख यायला हवेत असे वाटते.>> सहमत... निदान सर्वांची एकत्रित अशी माहिती तरी मिळेल... शुभेच्छा...

चांगला परिचय. आम्ही मिपाकर मात्र वाट पाहू तुमच्या उमेदवारीची...!

काळे सरांचा परिचय आवडला. फोटोत सारे लोक कॅमेरामनकडे पाहत असताना तुम्ही मात्र नजर समोर ठेवली आहे. किती तो विनयी स्वभाव.

गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उत्सुक असलेले जवळपास सर्वजण अनोळखी असतात. मागील वर्षी श्रीपाल सबनीस अध्यक्षपदासाठी निवडून आल्यावर कोण हे सबनीस असा प्रश्न पडला होता, कारण तोपर्यंत ते नावच कधी ऐकलेले नव्हते. अर्थात नंतर त्यांनी अत्यंत आचरटपणा करून पदाची शान घालविली हे नक्की. यावर्षी उत्सुक असणार्‍या चार जणांपैकी फक्त प्रवीण दवणे हे एकमेव लेखक माहिती आहेत. त्यांचे काही लेख, कथा वाचनात आलेल्या आहेत. इतरांबद्दल कणभरही माहिती नाही.

९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या ओळख धाग्याचं कौतुक केल्याबद्दल एस, प्रचेतस, वटवट, खेडूत, कवी संदीप, यशोधरा, धन्या आणि श्रीगुरूजी यांचे आणि मिपावाचकांचे मन:पूर्वक आभार. असाच लोभ असू द्या...!! खेडूत यांच्या कमेंट्सने गोड़ गुदगुल्या झाल्या तर धन्याने माझ्या विनयतेच्याबद्दल केलेल्या कमेंट्सने गदगदून आलं ! ;) -दिलीप बिरुटे

तुमचं उमेदवार जिकलं की वो डॉक्टर ! तुमचे आणि डॉ.अक्षयकुमार काळे यांचे अभिनंदन !

In reply to by धर्मराजमुटके

वा वा! प्रा. डॉ. सर अभिनंदन! भेटूया सा.स. मध्ये! :) Sandy

In reply to by चांदणे संदीप

धर्मराजमुटके अन् संदीपसेठ, धन्यवाद. काल डॉ.काळेंशी फोनवर बोलणं झालं खूश होते. बाकी, संदीपसेठ आता भेटूया डोंबिवलीला. ऐकतो तुमची कविता तिथे 'बसून'. कोण कोण भेटतंय डोंबिवलीत ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

प्रचू सॉरी प्रचेतस. येणार का डोंबिवलीला ? मागच्या वेळी तुमच्या बरोबर पुण्यात साहित्य संमेलन एन्जॉय करता आलं आणि सोबत परिसर भटकंतीही सुरेख झाली. धन्याने पण मस्त वेळ दिला. आता धन्यासेठ कसले येतात. भोगा फळं :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जमल्यास येईन. ह्यावेळी अंबरनाथचे शिवमंदिर पाहूयात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी येणार आहे. भेटूयात जमलं तर! ते एक कट्टा की काय म्हणतात ते जमवा की! आम्ही इकडे सातासमुद्रापार विदर्भप्रांती वास्तव्यास असल्याने तुमचे ते कट्टेवृत्तांत नुसतेच वाचून आहोत. काय म्हणता?

समीक्षा ह्या एक अत्यंत खालच्या लेव्हलचा साहित्यप्रकार आहे , रादर समीक्षा हा साहित्यप्रकार नाहीच . ह्या डॉक्टरांचे कोणतेच लेखन वाचल्याचे आठवत नाही. त्यांचे अन्य काही लेखन प्रसिध्द असेल तर आधीच विनम्रपणे माफी मागतो पण समीक्षा हेच एकमेव त्यांचे योगदान असेल अ.भा.सा.म कडुन घोर निराशा झाली असे म्हणावे लागेल . हे म्हणजे हर्षा भोगलेला क्रिकेटर ऑफ द ईयर अ‍ॅवार्ड देण्यासारखे झाले किंव्वा त्या कपिल शर्माच्या शो मध्ये समोर बसुन हसणार्‍या सिध्दुला फिदीफिदी हसतो म्हणुन कॉमेडियन ऑफ द ईयर म्हणण्यासारखे झाले मुळातच समीक्षा ह्या प्रकाराची गरजच काय हेच लक्षात येत नाही . जे साहित्य मुळातच सुंदर आहे त्याला कोणी समीक्षा केली काय किंव्वा नाही केली काय , काहीही फरक पडत नाही . समीक्षा इज अ‍ॅबसोल्युटली रीडंडंट ! Anything in any way beautiful derives its beauty from itself and asks nothing beyond itself. Praise is no part of it, for nothing is made worse or better by praise. -Marcus Aurelius ह्या साहित्य समेंलनाच्या अध्क्षपदाच्या निवडणुक पध्दतीचा सर्वांनी पुनरेकवार विचार करायला हवा आणि दुसरे म्हणजे मराठी लोकांना जर समीक्षा हा अभिजात साहित्य प्रकार वाटत असेल तर दुर्दैवाने आमचीच गल्ली चुकली असे म्हणावे लागेल. महत्वाचे : डॉक्टरांचे काहीही वरिजिनल लेखन वाचनात आलेले नाही (दवणेंचे किमान वरीजिनल दवणीय लेखन तरी वाचलेले आहे लहानपणी.) डॉक्टरांचे काहीही अभिजात आणि स्वयंभु लेखन प्रसिध्द असेल तर आमच्या अडाणीपणाची लाज वाटुन घेवुन आणि बेशर्त माफी मागुन प्रतिसाद मागे घेत आहे. अतिमहत्वाचे : आजकाल महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीला जातीय रंग द्यायची फॅशन चालु आहे म्हणुन हा स्पेशल खुलासा की मला डॉ.काळेंची जात माहीत नाही , दवणेंची नाही आणि घुमटकरांचीही नाही. आणि हे कुळकर्णी जरी निव्वळ समीक्षा लिहुन अध्यक्ष झाले असते तरीही मी हाच प्रतिसाद दिला असता ! समीक्षा इज अ‍ॅबसोल्युटली रीडंडंट ! कृपया ह्या प्रतिसादाला कोणीही जातीय रंग देवु नये ही अतिनम्र विनंती !

In reply to by प्रसाद गोडबोले

आपला प्रतिसाद भाषेचा प्राध्यापक म्हणून मला कुठेच पटणारा नाही. सध्या व्यस्त आहे. जरा निवांत झालो की शांततेत प्रतिसाद लिहीन. समीक्षा साहित्याचा एक भाग आहे, समीक्षा हे शास्त्र आहे..... -दिलीप बिरुटे

मार्कस जी माझ्या अत्यल्प बुद्धी नुसार, ज्ञानदेवांनी गीतेवर केलेल्या, समीक्षेला, भावार्थ दीपिका म्हणतात न ? व टिळकांनी केलेल्या समीक्षेला गीतारहस्य म्हणतात ना ? तुमच्या मता प्रमाणे, मग ज्ञानदेव व सुहास शिरवळकर, यांच्यात, तुम्ही शिर्वालकारांना संमेलनाध्यक्ष कराल, कारण काय तर सुशी ची प्रकाशित पुस्तके जास्त माऊलींपेक्षा, माऊलीने तर समीक्षा लिहिलेली फक्त.

In reply to by पगला गजोधर

स्कोर सेटलींग अन्यत्र करूयात का ? ज्ञानदेव किंवा टिळक ह्यांचे विकी पेज पहा , त्यांनी समीक्षा सोडून लिहिलेल्या अन्य अभिजात साहित्याची यादी मिळेल . आणि हो , बहुतेक समीक्षा आणि टीका मध्ये काहीतरी फरक असतो बुवा .

In reply to by प्रसाद गोडबोले

स्कोर सेटलींग अन्यत्र करूयात का ?
कृपया आरोप करू नका, कसलं स्कोर सेटलींग,म्हणताय ?
समीक्षा आणि टीका मध्ये काहीतरी फरक असतो बुवा .
समजावून सांगा जरा प्लिज, ज्ञानदेव टीकाकार की समीक्षाकार ?

In reply to by पगला गजोधर

समीक्षा आणि टीका ह्या मधील सर्वात सोप्पा आणि अगदी सहज लक्षात येण्याजोगा फरक म्हणजे समीक्षा संपुर्णपणे मुळ कलाकृतीवर अवलंबुन असते जर मुळ साहित्य मुळ कलाकृती काढुन टाकली तर समीक्षा निव्वळ चोथा ठरते कारण समीक्षेत स्वतःचे असे समीक्षकाचे काहीच कलात्मक कर्तृत्व नसते साहित्यिक व्यॅल्यु अ‍ॅड नसते ! पण टीका तशी नसते . टीका ग्रंथातुन, लेखातुन , मुळ साहित्याचे , मुळ कलाकृतीचे सर्वच्या सर्व संदर्भ काढुन टाकले तरीही टीका एक स्वतंत्र पणे साहित्यकृती ठरते. तुम्ही मुळ ज्ञानेश्वरी मधील गीतेचे सर्वच्या सर्व श्लोक काढुन टाकलेत अन ज्ञानेश्वरी वाचलीत तरी ती एक अप्रतिम कलाकृती आहे हेच तुम्हाला जाणवेल. (मला तर ज्ञानेश्वरीतील काही श्लोक हे भगवंताला गीतेत , युध्दभुमीवर , अपेक्षित अर्थाचा अनर्थ करणारे वाटतात ) . गीतारहस्याची तर गोष्टच और आहे . गीतारहस्य वाचायला घेतल्यावर तर डोक्याला हातच लावला होता , आजवर कोणत्याही धार्मिक वातावरणात आपल्याला गीतेचा जो सारांश अर्थ सांगितला जातो त्याला लोकमान्यांनी अक्षरशः फाट्यावर मारले आहे असे वाटते . इथेही परत मुळ गीतेचा सर्वच्या सर्व संदर्भ काढुन टाकला तरीही एक तत्वज्ञानाचे पुस्तक म्हणुन गीतारहस्य स्वयंभुपणे , ठामपणे उभे रहाते . ( उपासनेचा दणकट पाया असल्याशिवाय साधकांनी गीतारहस्याला हात लावु नये , ज्ञानेश्वरीचाच आधार घ्यावा , असे माझे वैयक्तिक मत आहे ). सारांश इतकाच की टीका ही एक स्वयंपुर्ण कलाकृती असते , समीक्षा नसते.

कुणीही अध्यक्ष झाले तरी काही फरक पडत नाही, पण एका वर्षाच्या कालावधीत मराठी साहित्यासाठी त्याने कार्य केले पाहिजे. मग तो साहित्यकार नसला तरी चालेल.

आयबीएन चॅनेलवर रोकठोक कार्यक्रमात डॉ. काळे आले आहेत. कुणाला त्यांची बाजू ऐकायची असेल तर लाईव्ह बघता येईल.

थोडक्यात आणि चांगला परीचय. तुमचा पाठींबा असला तर आमचा देखील पाठींबा असेल! :) काळेसरांना आणि त्यांच्या समर्थकांना मनःपूर्वक शुभेच्छा!

डॉ. काळे यांचा परीचय आवडला. पण इच्छूकांच्या यादीत डॉ. जयप्रकाश घुमटकर हे नाव ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. काही बूक कीपींगवरची पुस्तके सोडता यांनी काही लीहीले असेल असे वाटत नाही. तरी कोणाला यांच्या लेखन कारकीर्दीबद्दल माहीती असल्यास सांगावे.