Skip to main content

प्राकृत ते मराठी

लेखक बॅटमॅन यांनी सोमवार, 11/02/2013 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी आपली खूप जूनी. आता दोन हजारवर्षापूर्वीची म्हणू.
मराठीला क्लासिकल भाषा म्हणून घोषित करणारा तो पठारे अहवाल हेच म्हणतोय, पण माझ्यासारखा नॉन-स्पेशलिस्ट देखील सांगू शकेल सहज की हे असे नाहीय. महाराष्ट्री प्राकृतला मराठी म्हणायचे असेल तर मग प्रश्नच मिटला. :( *एक दक्खनी कविता - कुतुबमिनार या धाग्यावरील विषयांतर झालेल्या आणि हलवलेल्या प्रतिसादांचा हा चर्चेसाठी नवा धागा : संपादक मंडळ *

वाचने 27035
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

>>>> महाराष्ट्री प्राकृतला मराठी म्हणायचे असेल तर मग प्रश्नच मिटला. का म्हणू नये ? महाराष्ट्री, प्राकृत या भाषांमधून लिहिलेल्या गाथासप्तशती चा संबंध मराठी भाषेशी आहे, आता हे सिद्ध झालं आहे. आणि हे सिद्ध करणारी या क्षेत्रातील तज्ञ मंडळी आहे. गाथा सप्तशती'तील मराठीचे दर्शन हा लेख वाचावा. आपल्या जयंत कुलकर्णी काकांचा हालसातवाहनाची गाथासप्तशती - महाराष्ट्राचे आद्य लोकसाहित्य हाही लेख मराठी भाषेशी गाथासप्तशतीचं नातं कसं आहे ते समजावयाला मदत करतो. विसूनाना क्षमा करा हं....आपण लिहिलेल्या कवितेच्या निमित्तानं कोणाचा नवीन प्रतिसाद आला आहे हे बघायला येत असाल आणि आमचे अवांतर पाहून कपाळावर हात मारुन घेत असाल. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्री, प्राकृत या भाषांमधून लिहिलेल्या गाथासप्तशती चा संबंध मराठी भाषेशी आहे, आता हे सिद्ध झालं आहे
मराठी भाषा महाराष्ट्री प्राकृतातूनच उत्क्रांत झाली आहे हे कोणी नाकारत नाहीच. पण ती मराठी भाषा मात्र नव्हे. महाराष्ट्री प्राकृत संस्कृतला खूप जवळची. मराठीचा विकास संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही भाषांतून झाला आणि पुढे तिला चालुक्य, शिलाहार आणि यादव काळात बरेच कन्नड शब्द येऊन चिकटले. मराठीतील पहिला ज्ञात शिलालेख (शं. गो. तुळपुळ्यांच्या मते) शके. ९३४ चा अक्षीचा गधेगाळ. अर्थात यातही काही शब्द संस्कृतातले आहेत. राष्ट्रकूट कालखंडात संस्कृत राजभाषा होती तर चालुक्य, कोल्हापूर शिलाहार तसेच सुरुवातीच्या यादवांचे (सेऊणचंद्र यादव, पहिला व दुसरा सिंघण यादव) ताम्रपट आणि शिलालेख हे मुख्यतः कन्नडमध्ये (भाषा मात्र संस्कृत) आहेत. सामान्य लोकांची भाषा बहुधा प्राकृत असावी. शिलाहारांच्या काळात मराठी हळूहळू विकसित व्हायला सुरुवात झाली आणि देवगिरीचा यादव सम्राट रामदेवरायाच्या दरबारात तिला खर्‍या अर्थाने आजचे स्वरूप प्राप्त झाले. ज्ञानेश्वर याच काळातले. रामदेवरायाच्या काळात राजभाषा मराठी होती. बेडसे लेणीतील हा सुमारे २००० वर्षापूर्वीचा शिलालेख पहा. भाषा -प्राकृत सिधं धेनुकाकडे वायवस हालकियस कुडुबिकस उसभ णकस कुडुबिणिय सिअगुत णिकाय देयधमं लेणं सह पुते ण णंद गहपतिणा सहो याचेच संस्कृत रूप सिद्धम्| धेनुकाकटे वास्तव्यस्य हालिकीयस्य कुटाम्बकस्य ऋषभ- णकस्य कुटुम्बिन्या: श्रीयगुप्ति - निकाया देयधर्मो लयनम् सह पुत्रे ण नंद गृहपतिना सहो|| मराठी अर्थ सिद्धी असो, धेनुकाकट इथे वास्तव्य करणारी उषभणकाची पत्नी श्रीयगुप्ती हिने घरमालक असलेल्या पुत्र नंदासह दिलेले दान दिलेले हे लेणे. उपरोक्त शिलालेख हा संस्कृत भाषेला खूप जवळचा आहे हे तर दिसतेच आहे. गाथासप्तशतीतील जवळपास सर्वच श्लोक संस्कृताशी खूपच मिळतेजुळते आहेत तथापि महाराष्ट्री प्राकृतालाच मराठी समजणे धार्ष्ट्र्याचेच ठरावे.

In reply to by प्रचेतस

वल्लीशेठ, प्रतिसादाबद्दल धन्स. प्राकृत मराठीचे संबंध आणि प्राकृत संस्कृत संबंध यावर विद्वानांनी अनेकदा लिहिले आहे, त्यामुळे तुमचा प्रतिसाद माहितीपूर्ण असला तरी दूर्दैवाने आता या मुद्द्यात राम राहीलेला नाही. प्राकृत मधून पुढे संस्कृतचा विकास झाला आणि प्राकृत आणि प्राकृतोद्भव अशा मागधी, पाली, महाराष्ट्री,शौरसेनी, पैशाची, अपभ्रंश या भाषांमधून मराठी ही कणाकणात भरलेली आहे, हे आता नव्याने सिद्ध होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे अभिजात भाषेच्या दर्जानिमित्त सादर होणारा अहवाल त्यात भाषेच्या विद्वानांनी सादर केलेले पुरावे अभ्यास याने मराठी ही खूप जूनी आहे, हे सिद्धही होत आहे, तेव्हा आपण तुर्तास थांबनेच इष्ट. एक गाथासप्तशती नव्हे तर अनेक समकालीन ग्रंथाचे पुरावे तुम्हा आम्हा वाचकांना रोचक ठरणार आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

+११११११११११११११११. टंकनश्रम वाचवल्याबद्दल बहुत धन्यवाद वल्ली. बिरुटेसरांनी दिलेला लेखही रोचक आहे. मी स्वतः गाथासप्तशती अगदी क्रिटिकली नसली तरी वरवर का होईना, एकदा पूर्ण वाचली आहे. बरेचसे शब्द खूप सारखे असले तरी ती भाषा मराठी म्हणवत नाही. त्या हिशेबाने तर मग हिंदीसुद्धा २००० वर्षे मागे जाईल. शौरसेनी प्राकृताला हिंदी आणि मागधी प्राकृताला बंगाली म्हटले तर प्रश्नच मिटला. प्राकृत कुठे संपते आणि मराठी कुठे सुरू होते याचे निकष अगदी गणिती निकषांसारखे नाहीत हे मान्य आहे. पण, अर्थ पूर्णतः समजला नाही तरी मराठीच चाललेय हे समजण्याइतपत तरी साधर्म्य पाहिजे. "केले-करियले-करवियले" एकवेळ समजू शकते, पण "कीरमुच्छह्संघेहि व पलाशकुसुमेहि | बुद्धस्स चलनवलनपंडितेहि व भिख्खुसंघेहि||" वगैरे वाचले की सरळ कळते, ही संस्कृत आणि मराठीच्या मधली फेज आहे. "पोट्टं भरन्ति" सारखे काही शब्दप्रयोग आहेत, पण विरळाच. आणि भाषाशास्त्रापेक्षासुद्धा, काही लोकांचे हितसंबंध यात गुंतलेत म्हणूनच हा घाट घातलाय हे उघडच आहे. आधी तमिऴ, मग कन्नड आणि आता मराठी. भाषेच्या नावावर राजकारण करणार्‍यांमुळे किती फायदा होईल हाही एक प्रश्नच आहे. काही प्रोफेसरशिप्स तयार होतील इतकेच. त्याचा काही फायदा होईल असे चित्र सध्या तरी दिसत नाही.

In reply to by बॅटमॅन

गाथासप्तशती किंवा त्यावरील लेखन मग ते कुणीही प्रकाशीत किंवा संपादित केलेले असो, खुपच महाग असते. काय कारण असू शकेल?

प्राडॉंच्या प्रतिसादातील
प्राकृत मधून पुढे संस्कृतचा विकास झाला
ह्या वाक्याने माझा गोंधळ उडाला आहे. कोणी जाणकार अधिक उलगडून सांगेल का? संस्कृतमधून इतर भाषा उगम पावल्या, असे मत आजवर जे काही थोडे वाचले आहे त्यावरुन बनले होते, मग प्राकृतमधून संस्कृतचा विकास कस झाला, हे समजले नाही.

In reply to by यशोधरा

मिपाकर प्रास यांनी या विषयावर लिहिलेली लेखमाला रोचक आहे. अथातो प्राकृत जिज्ञासा।

In reply to by प्रचेतस

संस्कृत-प्राकृत बद्दल प्रासभौंचा लेख लैच भारी आहे. भाग-४ वाला.

In reply to by बॅटमॅन

प्रासने हा लेख विकीपीडीया उर्ध्वस्थापीत करायला हरकत नाही. विकीपंडीतांची खुप छान सोय होईल. रच्याकने, वैदयबुवा आहेत कुठे? मुंबई कटटयाच्या फोटोत दिसले होते, मिपावर मात्र गायबलेत.

In reply to by Er.rohit

...हे शिक्षण मंडळाला सांगा रे कोणीतरी....आम्हा मानवाला कॉप्या करून पास व्हावं लागतंय !

In reply to by मालोजीराव

तुमचा बुद्धयांक लईच गंडलेला दिसतो. थोडी खोलात जाऊन चवकशी केलीत तर आठवी ते दहावी या तीन ईयत्तांमध्ये पोरं संस्कृत हा विषय "स्कोअरींग सब्जेक्ट" म्हणूण घेतात हे ध्यानात येईल तुमच्या. घोकंपटटीला फुल्ल स्कोप असतो या विषयात. देवः देवौ देवः प्रथमा...

In reply to by सूड

देव शब्द आठवीत असताना घोकंपटटी तंत्र वापरुन लक्षात ठेवला होता. इतक्या वर्षानंतर त्याचा उल्लेख करताना चुक होणे शक्य आहे.

In reply to by सूड

>>> आकार हुकलाय असं नाय वाटत? आयटीमधल्या जॉबचा परिणाम :) धन्याशेठ, कृपया 'हलके' घेणे ;)

हा स्वतंत्र काकू सुरू केल्याबद्दल संमंचे आभार. जनरली, संस्कृत म्हंजे पाणिनीच्या व्याकरणाने बद्ध असलेली भाषा आणि प्राकृत म्हंजे गाथासप्तशती वगैरे ग्रंथांची भाषा असे समीकरण डोक्यात असते. आणि या व्याख्येनुसार संस्कृत ही प्राकृत पेक्षा जुनी ठरते. म्हणून प्राकृत पासून संस्कृत कशी जन्मली वगैरे प्रश्न डोक्यात येतात. पण अशी सरळ धोपट व्याख्या न ठेवता हे लक्षात ठेवले पाहिजे, की रफलि प्रवास असा आहे. आधी प्रोटो-इंडो-युरोपियन. तिच्या अनेक ब्रँचेस झाल्या: १. हेलेनिक २.बाल्टो-स्लाव्हिक ३.लॅटिन इ. ४. जर्मानिक ५ इंडो-इरानियन ६ तोखारियन ७ मेबी अ‍ॅनातोलियन, हिट्टाईट इ.इ.इ. पैकी, इंडो-इरानियन ही भाषा म्हंजे भारतातील संस्कृतची आणि इराणातील फारसीची पूर्वज आहे. हिचा प्रवास बघू: प्रोटो-इंडो-इरानियन पासूनः १. वैदिक संस्कृत २. अवेस्तन. आता वैदिक संस्कृत हे एक सोयीस्कर नाव आहे इतकेच. ती भाषा वेदांत वापरलेली आहे, पाणिनीय संस्कृतला अतिशय जवळची आहे. हजारो वर्षे ब्राह्मणांनी एका कानामात्रेचाही फरक न होऊ देता वेद जतन केले. आता, ऋग्वेद वगैरे वाङ्मय जेव्हा रचले गेले, तेव्हा ती "वैदिक संस्कृत" ही एक बोलीभाषा होती इतके तरी निश्चित आहे. शिवाय, वेदवाङ्मयाच्या अभ्यासकांचे म्हणणे असेही आहे, की उपबोलींसारखा प्रकार या ठिकाणी कधीकधी दिसून येतो. म्हणजेच, वैदिक काळात या भाषेच्या अनेक बोली प्रचलित होत्या, आणि त्यांपैकी काही बोलीच आज वेदांमार्फत आपल्या समोर आलेल्या आहेत-उरलेल्या कालौघात गडप झाल्या. नंतर वैदिक काळ संपताक्षणी येते ते पाणिनीचे व्याकरण. तिथेही तोच प्रकार. त्याच्या काळी संस्कृत ही बोलीभाषा म्हणून प्रचलित होती. त्याने काही बोलींची वैशिष्ट्ये सांगितली, इतर बोली त्याच्या कव्हरेज मध्ये आल्या नाहीत. शिवाय त्याच्या व्याकरणाची पॉप्युलॅरिटी इतकी दांडगी, की नंतर नंतर लोकांचा संस्कृत म्हंजे पाणिनीपेक्षा काही वेगळे असेल असे वाटणे बंदच झाले. तसेच, नंतर नंतर हळूहळू संस्कृत ही बोलीभाषा म्हणून लुप्त झाली, ग्रांथिक भाषा म्हणूनच तिचे अस्तित्व उरले, सबब बोलीभाषा हा प्रकार तिथूनही लुप्त झाला. यावरून काय दिसते? तर कालौघात, एका भाषेची विशिष्ट व्हर्जनच ग्रंथांत स्टोअर केली गेली. आणि तीच व्हर्जन प्रमाण आणि जुनी म्हणून लोकांसमोर आली. पण अ‍ॅट द सेम टाईम, प्रत्यक्ष बोलली जाणारी भाषा ही कणाकणाने बदलत होती. बोलीभाषेत काही बदल झाले, तर काही शब्द, व्याकरणाची फीचर्स, इ. कायम राहिले. त्यामुळे, प्राकृत म्हणजे महाराष्ट्री वगैरे भाषांत काही शब्दप्रयोग हे संस्कृतपेक्षाही जुने दिसतात. पण यांची संस्कृतपूर्व लिखित नोंद नसल्याने, "ही फीचर्स जुनी आणि ही नवी" हे विविध भाषांचा तौलनिक अभ्यास करूनच कळते. थोडक्यात, जी जण्रल भाषा बोलली जात होती तिला प्राकृत, तर तिची एक विशिष्ट, स्टोअर करून जपलेली व्हर्जन म्हणजे संस्कृत हे ध्यानी घेतले तर प्राकृत वरून संस्कृत कशी तयार झाली हे कळायला अडचण येऊ नये. पण बरेचजण, सुरुवातीची डेफिनिशन घेऊन, संस्कृत ही कृत्रिम आहे वगैरे वगैरे मुक्ताफळे उधळतात. त्यामुळे त्यांचे कयासही चुकतात. असो. हे झाले संस्कृत-प्राकृत बद्दल. नंतर लिहितो थोडेसे प्राकृत-मराठी बद्दल.

In reply to by बॅटमॅन

ऐनस्थेशिया म्हणुन तुमच्या असल्या पोश्टी लै उपयोगी हायत बघा... कोणत्या हास्पिटलात कामाला लागताय मग..

In reply to by Er.rohit

काय संबंध? नाही म्हणजे मला सरळ बोललेले कळते, दिमाग अंमळ कमी आहे म्हणून विचारले.

In reply to by बॅटमॅन

आपले एवढे जड आणि मौलिक विचार वाचून आपण भूलतज्ञ आहात असा माझा पामराचा समज झाला ....मला माफ करा ब्यॅटम्यान

In reply to by Er.rohit

ब्याटम्याना, स्वाक्षरी लिही आता "झेपत नसेल तर वाचू नये. उगाच उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका घेतल्या सारखे करू नये" अशी.

In reply to by बॅटमॅन

प्रोटो इंडो-इरानियन पासून १)वेदिक संस्कृत २)अवेस्तन इथे इंडो-इरानियन म्हणायचे असावे,प्रोटो शब्द चुकून लिहिला गेला असावा असे वाटते. कारण प्रोटो इंडो युरोपियन पासून इंडो-इरानियन बनली हे तुम्ही स्पष्ट केलेलेच आहे.

In reply to by राही

नाही. प्रोटो शब्द मुद्दाम आहे. पहिल्यांदा ब्रँचेस दिल्या त्यात तो राहून गेला. बारीक निरीक्षणाकरिता धन्यवाद. http://en.wikipedia.org/wiki/Proto-Indo-Iranian_language

In reply to by बॅटमॅन

असे विकीपिडीयाचे दुवे देत जाऊ नका. त्याने पंडीताच्या प्रतिष्ठेला बाधा येते. नव्हे, असे विकीवरील दुवे देणार्‍यांची/चोप्यपस्ते करणार्‍यांची विकीपिडीत अशी हेटाळणी केली जाते बरें.

In reply to by धन्या

एक लहानशी सुधारणा. असे दुवे देणारे विकी डोनर आणि दुव्यांवर दुवे पाहून वैतागलेले ते विकीपीडित. =))

In reply to by बॅटमॅन

>>असे दुवे देणारे विकी डोनर दुवे देणारे नव्हे, दुव्यातल्या गोष्टी मातृभाषेत (पक्षी: मराठीत) अनुवादित करुन ते आपणच लिहीलं आहे अशा आविर्भावात छापणारे ते विकी डोनर आणि ते गिगाबायटी ट्रान्सलेटेड प्रतिसाद वाचून डोके खाजवणारे विकीपीडित !! ;)

In reply to by यशोधरा

आम्ही एक असंच वाचून बिचून कच्चं बच्चं लेखन केलं होतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुव्याबद्दल धन्यवाद. चांगला लेख आहे, वाचला. :) ह्या विषयावरची पुस्तकेही सुचवा वाचायला वल्ली,प्राडॉ आणि सर्वच जाणकार. अवांतरः प्राडॉ, मनोगतावर शुद्धलेखनाची चूक (कशी काय आणि चक्क) खपून गेली? ;)

In reply to by यशोधरा

मर्‍हाठी संस्कृती काही समस्या - हे शं. बा. जोशी यांचे पुस्तक उल्लेखनीय आहे. यात राष्ट्रकूट, शिलाहार ते यादव काळापर्यंत मराठीत (मुख्यतः मराठी संस्कृतीत) होत असलेल्या बदलांचा ऐतिहासिक, सामाजिक, साहित्यिक अंगाने परामर्श घेतला आहे. प्रस्तुत पुस्तक मुख्यतः मराठी आणि कन्न्डमधल्या साम्यांचा जास्त विचार करते. भाषाशास्त्र, दख्खनी भाषा-काही विचार ही इतरही काही पुस्तके आहेत. सुदैवाने ही दुर्मिळ पुस्तके सध्या पुण्यातल्या अक्षरधारामध्ये उपलब्ध आहेत.

अगदी हाच तर्क सध्याच्या हिंदी भाषेलाही लागू पडतो.व्रज,मैथिली ह्या बोलीभाषा प्रचारात होत्याच पण एका ठराविक कालखंडात काही कारणांमुळे खडी-ड नुक्तायुक्त-(खरी?)बोली ह्या एका वर्जनलाच प्रमाण हिंदी म्हणून मान्यता मिळाली आणि ती अभिजनांची भाषा बनली.व्रज मात्र बहुजनांची भाषा असूनही होती तिथेच राहिली.

आता, या ठिकाणी आपला विषय आहे इंडो-आर्यन भाषेबद्दल. तिच्या तीन अवस्था आहेत. १. ओल्ड इंडो-आर्यन भाषा म्हणजे वैदिक संस्कृत. २. मिडल इंडो-आर्यन म्हंजे पाणिनीय संस्कृत आणि प्राकृत वगैरे. अपभ्रंशाचा समावेश देखील यातच करतात, पण ती एक ट्रांझिशनल अवस्था आहे असेही मानणारे बरेचजण आहेत. ३. न्यू इंडो-आर्यन म्हंजे मराठी, गुजराती, हिंदी, पंजाबी, बंगाली, वगैरे. मिडल इंडो आर्यनचे मुख्य ४ भाग करतातः १. शौरसेनी प्राकृत- आजच्या हिंदीची आई. २. मागधी प्राकृत- आजची बंगाली, मैथिली, इ. ची आई. ३. महाराष्ट्री प्राकृत- मराठी, कोंकणी, गुजराती, सिंहली, इ. ची आई. जुन्या साहित्यकारांच्या मते, सर्व प्राकृतांत महाराष्ट्री प्राकृत सर्वोत्तम आहे. मोस्टलि हीच प्राकृत ष्ट्यांडर्ड मानली गेली. हेमचंद्र नामक गुर्जरदेशस्थ पंडिताने महाराष्ट्रीचे व्याकरण लिहिलेले आहे. तर आता, महाराष्ट्री प्राकृत कुठे संपते आणि मराठी कुठे सुरू होते? सर्वांत आधी एक गावठी चेक लावू. महानुभाव वाङ्मयाचे एक उदाहरण पहा. "नरींद्रबासां भेटि: अनुसरणः नरेंद्र कवि: साल कवि: नृसिंह कवि" हे तिघे भाऊ: नृसिंह कविन नलोपाख्यान केले: साल कविन रामायण केले: ते आपुलाले रामदेवरायापुढां म्हणितले: तेथ नरेंद्र कवि बैसले होते: (ते त्यांना म्हणाले) यैसा द्वारकेचा रामहाठु वर्णितेती तरी तुमचेया पापा पुरश्चरण होते: ऐसे रायांदेखतां निभर्षिले:" इ.इ.इ. सर्व शब्दांचा अर्थ नक्कीच कळत नाही. पण मराठीच बोलतोय इतपत तरी नक्कीच समजते. तीच गोष्ट वल्लीने उद्धृत केलेल्या आक्षीच्या शिलालेखाची. कुवलयमालेत मराठी बोलल्याचा उल्लेख "दिण्हले, गहिल्ले" असा आहे, तोही एकवेळ समजू शकतो. पण महाराष्ट्री प्राकृताला हे इतके लागू पडत नाही. तो लेण्यांतील शिलालेख असो किंवा गाथासप्तशतीतील कविता असो. बिरुटेसरांनी दिलेल्या लिंकप्रमाणे गाथासप्तशतीत बरेच शब्द आहेत, जे फक्त मराठीत वापरले जातात. मीही गाथासप्तशती वाचली आहे, तेव्हा या मुद्द्याशी सहमत आहे. पण निव्वळ शब्दसाधर्म्याने ती भाषा मराठी होते का? वाक्यरचना, व्याकरण, इ. चे काय? तो पठारे समितीचा अहवाल एकदा उपलब्ध झाला की मग कळेल काय ते. विशेषतः त्या समितीत लिंग्विस्ट कोण आहेत आणि त्यांची मते काय हे पाहणे सर्वांत रोचक ठरेल. शंका येण्याचे अजून एक कारण म्हंजे इतकी वर्षे हे लोक गप्प बसले आणि आत्ता एकदमच त्यांना साक्षात्कार कसा काय झाला की मराठी २००० वर्षे जुनी आहे? तमिऴ आणि कन्नड या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला, तसाच मराठीला मिळावा यासाठीचा हा खटाटोप आहे, इतकंच. समजा या मंडळींचं संशोधन खरोखरच इतकं मोलाचं असतं तर जगातल्या भाषाशास्त्रज्ञांसमोर त्यांनी पेपर लिहिला पाहिजे, भाषाशास्त्रज्ञांसमोर खडसावून आपले म्हण्णे डिफेंड करता आले पाहिजे. शासन काय, समितीचा अहवाल वाचणार आणि त्याबरहुकूम कार्यवाही करणार. त्याला काय कळतंय? सारांश इतकाच, की कन्नड आणि तमिळनंतर हे लोक एकदम जागे झालेत आणि अभिजात भाषा असे घोषित केल्यानंतरचा निधी त्यांना पाहिजे झालाय, बाकी काही नाही. यांच्या संशोधनात खरेच दम असेल तर यांनी कॉन्फरन्स भरवून याचे नीट प्रतिपादन केले पाहिजे. जोपर्यंत जगभरातले लिंग्विस्ट लोक या दाव्याला मान्यता देणार नाहीत, तोपर्यंत यावर विश्वास ठेवणे मला तरी शक्य नाही. क्लासिकल भाषा घोषित केल्याने काय फायदा होतो किंवा झाला, हेही पाहणे रोचक ठरेल. कन्नडला जेव्हा क्लासिकल दर्जा द्यायचे चालले होते, तेव्हाचा शेल्डन पोलॉकचा हा लेख बघा. http://www.hindu.com/2008/11/27/stories/2008112753100900.htm तो सरळच सांगतोय, की क्लासिकल दर्जा देऊनदेखील, या भाषेच्या संवर्धनासाठी, अभिवृद्धीसाठी सरकारने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. आणि तसेही, कोणी क्लासिकल म्हणो अथवा न म्हणो, ज्ञानेश्वरी, तुकोबांचे अभंग, दासबोध, पंडित कवी, तंत कवी आदींच्या वाङ्मयाची गोडी आणि महत्ता आहे तशीच अवीट राहील यात शंका नाही. जोपर्यंत मराठीचे सच्चे प्रेमी हे वाङ्मय वाचत राहून त्यात स्वत:ची भर घालत राहतील, तोपर्यंत मराठीची काळजी करण्याचे काहीएक कारण मला दिसत नाही. जय मराठी आणि जय महाराष्ट्र!

In reply to by बॅटमॅन

मस्त रे प्रतिसाद रे.
३. महाराष्ट्री प्राकृत- मराठी, कोंकणी, गुजराती, सिंहली, इ. ची आई.
सिंहलीबद्दल हे मत पटत नाही. अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांनी श्रीलंकेत बौद्ध धर्म नेल्यानंतर प्राकृतातून सिंहली उत्क्रांत झाली हे उघड आहे. पण ती नेमकी महाराष्ट्री प्राकृत कशावरून? अशोकाच्या साम्राज्यातले मगध, पाटलीपुत्र हे मुख्य प्रदेश हे शौरसेनी अथवा मागधी प्राकृताला फार जवळचे.

In reply to by प्रचेतस

आक्षेप लॉजिकल. पण काही वेस्टर्न प्राकृत फीचर्स सिंहली मध्ये आहेत असे वाचलेले आहे. परत बघून सांगतो.

In reply to by मन१

वरचा प्रतिसाद देण्यापूर्वी वाघूळशास्त्रींचा प्रतिसाद वाचला होता. परंतू त्यातला "... आणि अभिजात भाषा असे घोषित केल्यानंतरचा निधी त्यांना पाहिजे झालाय, बाकी काही नाही." हा भाग नजरेखालून निसटला होता. तुमच्या या प्रतिसादामुळे वाघूळशास्त्रींचा प्रतिसाद पुन्हा वाचला.

In reply to by बॅटमॅन

भाषाशास्त्रासारख्या गहन विषयावर चर्चा चालू असता काय अवांतर करायलात रे उगा.

In reply to by बॅटमॅन

थुहि बहसा पउनि मन थ्रुफ्त जाले. . हे वरचं मराठित आहे काय रे? . प्रतिसाद आवडला. हे वे सां न ल

In reply to by पैसा

छान रे बॅट्या. हा धागा वेगळा काढलास ते उत्तम. असेच काही वाचायला मिळू दे. अभिनंदन. उत्तम चर्चेच्या आणि निष्कर्षाच्या अपेक्षेत.

प्रा.डॉ.दिलिप बिरुटे यांनी दिलेल्या दुव्यातले काही शब्द कोंकणीत आजही त्याच रूपात प्रचलित आहेत. उदा.वच्चल=जाणे [माकां वच्चेलें आसा-मला जायचे आहे,जाणे(भाग )आहे,उल्लाव=बोल,सांग,वचा=जा,पावणे=पोचणे,मिळणे (मराठीतले धाव पाव सावळे विठाई आणि पावती),वई=कुंपण,तवसी=काकडी(तवशें-तवसें) किंवा काकडीची वेल. कोंकणीची उत्पत्ती माहाराष्ट्री प्राकृतापासूनच झाली आहे असे सर्वसाधारणपणे मानले जाते. पण विकीपीडिया वरच्या कोंकणीतज्ज्ञांना मात्र कोंकणीचे मागधी,शौरसेनी,द्राविडी भाषांशी(खरे तर माय्क्रोस्कोपिक्)साधर्म्य आणि त्यांचा कोंकणीवरील(खरे तर अत्यल्प) प्रभावच वाधवून दाखवण्यात स्वारस्य आहे. http://en.wikipedia.org/wiki/Konkani_language माहाराष्ट्रीप्राकृतला पैशाची आणि प्राचीन कोंकणी म्हणायला त्यांना आवडते. या लेखाचा मोठा भाग हा कोंकणी ही गुजराती, कन्नड आणि इतर काही भाषा यांना कशी जवळची आणि मराठीहून कशी-किती भिन्न हे सिद्ध करण्याच्या आटापिट्यातच खर्ची पडला आहे.इतकेच नव्हे तर 'करवियले' हे रूप कोंकणीच आहे असाही दावा मूळ लेखात होता.त्यामुळे 'श्री चामुण्डरायें करवियलें' हे वाक्य विकीवर कोंकणी भाषेतले ठरले आहे. याचा प्रतिवाद काही जणांनी केला पण मूळ लेखात फारच थोडा बदल झाला आहे. एकंदरीत मराठी,माहाराष्ट्री यांच्या वार्‍यालाही उभे रहायला या तज्ज्ञांना आवडत नसावे असे हा लेख वाचल्यावर वाटते.

In reply to by राही

कोंकणीचे द्राविडी भाषांशी अजिबात साधर्म्य नाही. जो काही प्रभाव आहे तो कर्नाटकाशी असलेल्या संबंधांमुळे. म्हणजे शेजारच्या प्रदेशातील बोलीचा जितपत प्रभाव असतो तितपतच. तसे पाहिले तर मराठी आणि बांगला भाषेत कोणी साधर्म्य दाखवू शकेल. हे मुद्दाम का घडते? कोंकणीचे खंदे पुरस्कर्ते गोंयबाब शणै आयुष्यभर मुंबईत राहिले पण त्यांनी मराठीचा आत्यंतिक द्वेष केला. तेच बाकीबाब बोरकर काय किंवा इतर कवी लेखक काय यांना कोंकणी मराठी यात फारसे डावे उजवे वाटत नव्हते. गोव्यात असलेली कॅथॉलिक ख्रिश्चन जनता कोंकणीसाठी रोमी लिपी वापरते आणि कर्नाटकातील लोक कन्नड लिपी वापरतात. कोंकणीची चळवळ या कर्नाटकातल्या धनंतर अशा गौड सारस्वत ब्राह्मण समाजाने मुख्यतः चालवली. गोवा महाराष्ट्रापासून वेगळा कसा हे दाखवण्यासाठी कोंकणी ही स्वतंत्र भाषा आहे आणि मराठीची बोली नाही हे त्यांना कसेही सिद्ध करायचे होते. त्यातूनच हा अट्टाहास जन्माला आला. कारण गोव्यात त्यांचे अनेक प्रकारचे हितसंबंध होते. या सगळ्यामागे राजकारण आहे दुसरे काही नाही! या लोकांची मजल तर ज्ञानेश्वरी कोंकणी भाषेत आहे म्हणण्यापर्यंत गेली आहे! कोंकणी मला खूप आवडते. आता ती स्वतंत्र भाषा आहे तर तिचा स्वतंत्रपणे विकास व्हायला हवा. पण हे होताना दिसत नाही तेव्हा वाईट वाटते.

In reply to by राही

वच्चल=जाणे [माकां वच्चेलें आसा-मला जायचे आहे,जाणे(भाग )आहे - माकां वचचें आसा/ वचच्याक जाय - कारवारी को़कणी आणि वचपाचें जाय/ वचपाक जाय - गोव्याकडे. वच्चल हे कधी ऐकलेले/ बोललेले पाहिले नाही. उल्लाव=बोल,सांग,>> उलय - कारवारी, उलवपांक - गोव्याकडची. उल्लाव कधी ऐकलेले वा बोललेले पाहिले नाही. वचा=जा, वच. वचा नव्हे. पावणे=पोचणे,मिळणे - हे बरोबर.

In reply to by यशोधरा

इथे बरोबर चूकचा प्रश्न नाही. गाथा सप्तशतीतील उपरोल्लेखित माहाराष्ट्री प्राकृत शब्द हे सध्याच्या मराठीत नाहीत पण कोंकणीत मात्र किंचितचश्या रूपबदलाने अजूनही आहेत हे दाखवण्याचा तो एक प्रयत्न होता. कोंकणीची निर्मिती ही ठामपणे माहाराष्ट्री प्राकृतापासूनच झालेली आहे, मग कोंकणीतज्ज्ञ तिला प्राचीन कोंकणी म्हणोत अथवा पैशाची. मराठी,माहाराष्ट्री या शब्दांचे या तज्ज्ञांना वावडे आहे हे मुख्यतः सांगायचे होते. जा.जा.- 'वच'चे अनेकवचन काय होते? 'वचा' होत नाही का? आणि वच्चेलें हा शब्द वयस्क लोकांच्या बोलण्यात ऐकलेला आहेच आहे. उल्लाव हा शब्द कोंकणीत जसाच्या तसा वापरात नसला तरी त्याला जवळचा उलय मात्र प्रचलित आणि रूढ आहे.

In reply to by राही

तुमचे बरोबर वा चूक हे सांगत नाहीये. तुम्ही जे शब्द सांगत आहात ते कसे वापरतात वा वापरताना ऐकले/ पाहिले आहे ते सांगायचा प्रयत्न होता. असो.

In reply to by यशोधरा

हे शब्द जवळचे आहेत हे खरे. पण आताच्या बोलीभाषेत त्यांची रूपे यशोधराने सांगितल्यासारखी येतात. याशिवाय आणखी काही रूपे म्हणजे "वचू जाय" "वचूक जाय" (गोवा) "वचका" (मंगलोर) असे जवळचे वाटणारे शब्द हिंदी-मराठी बंगाली-मराठी यातही दाखवता येतील कारण शेवट या सर्व भाषांचे कूळ एकच आहे.

प्रा.हरी नरके यांचा अभिजात मराठी लेखाचा दुवा इथे डकवून ठेवतो. मराठी अभिजात कशी मी मराठीवरची मला आवडलेली चर्चाही डकवतो. काही असेच दुवे मिपाकरांना सापडले तर डकवून ठेवा. आपल्यालाच कधीतरी माहिती वाचायला बरे राहील. -दिलीप बिरुटे

In reply to by पिशी अबोली

+१०००००००००००००००००००००००००. हेच म्हणायचं आहे,