१३ जून १९९१
आदरणीय (की प्रिय?)__,
संबोधन काहीही वापरले तरी पुढे नाव काय लिहू? कारण, "अस्तित्व" हे एखाद्या माणसाचं नाव असतं ह्यावर अजूनही विश्वास बसत नाही.
असो.
हे पत्र सदर तारखेला लिहीलं असलं तरी, ते तुमच्या पर्यंत कधी पोहोचेल किंबहुना पोहोचेल का, असा प्रश्न आहे, आणि समजा पोहोचलेच तर एक प्रसिद्ध लेखक, हे पत्र वाचून किमान पोचपावती तरी देतील का, हा त्याहून मोठा प्रश्न आहे.
तुमच्या लिखाणाने कधी मला आपलसं केलं, कळालं नाही, मात्र तुमचं प्रसिद्ध झालेलं प्रत्येक पुस्तक माझ्या संग्रही आहे- प्रत्येक! तुमचं हर एक पुस्तक वाचल्यावर मला त्याबद्दल जे वाटलं ते मी एका डायरीत लिहीत आलेय... तुमच्या एका पुस्तकावर माझी २ पानं! आता ती डायरी पूर्ण भरलीये, ह्या पत्रासोबत पाठवतेय- निदान डायरीची पोहोच कळवावी.
गम्मत अशी आहे, इतकं प्रगल्भ लिहिणार्या आपला कुठल्याही पुस्तकावर ना पत्ता आहे, ना खरं नाव माहिती आहे - हे कळत असूनही माझी डायरी मी पाठवत आहे- सारंच अगम्य!!
शक्कल अशी लढवली- की तुम्ही तुमची पुस्तकं फक्त एकाच प्रकाशनामार्फत प्रसिद्ध करवता, त्यांचे एक ऑफिस इथे जालन्यात आहे,
आमच्या घरात एक घरगडी आहे, 'काका" म्हणतो त्याला आम्ही, खुप जुना, म्हातारा माणूस, त्याला विश्वासात घेऊन हे पत्र नि डायरी त्या प्रकाशन ऑफिसमधे पाठवत आहे....! प्रकाशक तुमच्या पर्यंत हे (न उघडता) पोहोचवतील अशी आशा आहे, त्यांना तसे विनंती वजा पत्रही काकांच्या हाती पाठवत आहे.
पुढील पत्रव्यवहार तुमच्या उत्तरावर विसंबलेला....
-आपली विनम्र वाचक
निर्मयी
(माझा पत्ता एन्व्हलोपच्या मागे नमूद केला आहे)
------------------------------------------------------------------------------
२५ ऑगस्ट १९९१
नमस्कार निर्मयी,
तुमचे पत्र, डायरी मिळून बरेच दिवस झाले. डायरी खरोखर "एका वाचकाची भेट" म्हणून कायम जपून ठेवावी अशी आहे.
आभार...
-अस्तित्त्व.
------------------------------------------------------------------------------
१ सप्टेंबर १९९१
नमस्कार सर,
आपण उत्तर पाठवलत, मी धन्य झाले.
फारच मोजून शब्द लिहिलेत पत्रात... पुस्तकं जशी भरभरून असतात तसं नव्हतं, पण आलं हे ही नसे थोडके!
कमाल वाटली, तुमच्या आलेल्या एन्व्हलोपवर ना तुमचा पत्ता आहे, ना जेथून ते आलंय त्या गावचा ठप्पा!! म्हणजे तुम्हीही त्या प्रकाशकांमार्फतच ते माझ्या घरी पाठवलं असावं असा कयास आहे. मी घरी नसल्यामुळे काकांनीच ते घेतलं आणि माझ्यापर्यंत पोहोचवलं...
"नाते- संबध" ह्या विषयावर गहन लेखन करणारे आपण, साध्या वाचकाशी पत्रव्यवहार करताना, इतके सजग कसे? हे मनात घोळत राहिलं.
तुमचं असं अगम्य वागणं तुमच्याबद्दलची ओढ वाढविणारं आहे- "प्रत्येक ओढीने नातं साकारलं जरी गेलं तरी ते टिकतं किती, हे वेळच ठरवितो" हे तुमच्याच "उन्मत्त" पुस्तकातील माझं आवडीचं वाक्य!!
असो, उगाच भरकटत जात नाही, कामाच्या पसार्यात वेळ मिळालाच तर उत्तर द्यावे.
ह्या पत्राचा प्रवास सुरू-- काका, प्रकाशक आणि शेवटी अस्तित्व!!
-आपली विनम्र वाचक
निर्मयी
------------------------------------------------------------------------------
२९ सप्टेंबर १९९१
नमस्कार निर्मयी
उत्तर द्यावे की न द्यावे ह्या द्विधेत महिना गेला उगाच माणस जोडत सुटायचा स्वभाव नाही माझा.
माणसं ओळखण्यात अनेकदा चुकलोय, आता सावध असतो. माझी ओळख देणे न देणे हा माझा प्रश्न आहे, सर्वस्वी!!
हे पत्रही मी प्रकाशकांमार्फतच पाठवत आहे, माझा पत्ता कुणालाही देऊ नये असा त्यांना स्पष्ट निरोप आहेच.
नाते संबंधांवर लिहीतो, कारण खूप जवळून डोळसपणे सारं पाहतो... नात्यांना जोडायला, क्षण पुरतो -तोडायला क्षणाचा हजारावा हिस्सा, टिकवायला मात्र जन्माचा ध्यास!!
आणि, मी निर्मयीला उद्देशून लिहितो, पत्र मात्र "सायली जगतापे" हया नावाने जातात... हे ही अगम्य, नाही का??
-अस्तित्व
------------------------------------------------------------------------------
-क्रमशः
प्रतिक्रिया
16 May 2012 - 2:03 pm | मी-सौरभ
सुरवात छान झालीय.
पु.ले.प्र.
16 May 2012 - 2:16 pm | मुक्त विहारि
ही दोन वाक्ये आवडली.
१. "प्रत्येक ओढीने नातं साकारलं जरी गेलं तरी ते टिकतं किती, हे वेळच ठरवितो"
२. नात्यांना जोडायला, क्षण पुरतो -तोडायला क्षणाचा हजारावा हिस्सा, टिकवायला मात्र जन्माचा ध्यास!!
पण ऊर्वरीत लेख मात्र डोक्यावरून गेला.
16 May 2012 - 2:23 pm | पैसा
कथेचा वेगळा फॉर्मेट आवडला. कथा कशी पुढे सरकतेय पहाणं रोचक ठरेल!
16 May 2012 - 3:05 pm | अमृत
पुभाशु
अमृत
16 May 2012 - 3:27 pm | मनराव
वाचत आहे......
16 May 2012 - 3:32 pm | परिकथेतील राजकुमार
मी घाईघाईत 'चित्रकथा' असे वाचून धागा उघडला.
असो..
16 May 2012 - 3:37 pm | ५० फक्त
उत्तम प्रकार आहे लेखनाचा. धन्यवाद. खुप छान झालेलं आहे सारं.
16 May 2012 - 4:29 pm | सानिकास्वप्निल
पत्रकथाची सुरुवात आवडली
आता पुढचा भाग लवकर येऊ द्या :)
16 May 2012 - 4:56 pm | वेणू
आभारी आहे प्रतिसादकांची,
पुढील भाग, उद्याच :)
16 May 2012 - 6:03 pm | शुचि
क्या बात है!!! मस्त मस्त मस्त!!! लवकर येऊ दे. सुरेख सुरुवात झाली आहे.
16 May 2012 - 7:26 pm | मन१
वाचतोय
16 May 2012 - 8:16 pm | रेवती
वाचतीये.
17 May 2012 - 12:43 am | मोदक
वाचतोय...
17 May 2012 - 4:56 am | स्पंदना
रेवती तू, मोदक अन मनराव कुठल्या संकटात होतात का? वाचलात ते?
बाकि मी पण वाचल हो.
नव्या बाजाचा लेखन प्रकार आवडला. थोडस सुनिता बाईंच्या 'प्रिय जी ए स' सारख वाटतय. पण छानच.
17 May 2012 - 8:13 am | टुकुल
सुरुवात मस्तच.
--टुकुल