आज तर नक्कीच विमान चुकणार असा विचार करत कसाबसा अहमदाबादच्या विमानतळावर पोहोचलो तर विमान दोन तास ऊशीराने असल्याचे फळकावर झळकत होते. हुश्श करुन चेक इन सोपस्कार आटोपले आणि वेळ घालवायला म्ह्णून पुस्तकाच्या दुकाना कडे वळलो. मुखपॄष्ठावर उलटी अक्षरे बघून कुतूहलाने साहाजिकच पुस्तक उचलले. Connect the Dots - रश्मी बंसलचे. त्यांच्या Stay Hungry Stay Foolish बद्दल कुठेतरी ऐकले होते. लेटेस्ट २०१० चे प्रकाशन व २०० रु किंमत पाहुन वेळ घालवायला बरे असेल म्हणून लगेच घेतले.
"अचानक धनलाभ" माझ्या राशी भविष्यात होते की काय कोण जाणे. वाचायला सुरवात केल्या पासूनच काहीतरी वेगळे आहे असे जाणवू लागले.
सामान्य लोकांच्या असामान्य कथा असे थोडक्यात सांगता येईल. २० वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या व्यक्तींच्या जगावेगळ्या व्यावसायीक प्रवासाच्या ह्या २० गोष्टी. ह्यात चेन्नईहून मुंबईला येवून बश्या धुण्यापासून सुरवात करून भारतभर "डोसा प्लाझा" ची साखळी ऊभी करणारा प्रेम गणपती आहे. पुण्यात १० X १० च्या खोलीत राहून बसच्या तिकीटाची मारामार असलेल्या हणमंत गायकवाडांचा ३०० कोटींची उलाढाल असलेल्या भारत विकास ग्रुप पर्यंत केलेल्या प्रवासाची गोष्ट आहे. फक्त Rags to Riches अशाच गोष्टी नाहीत. तर अत्यंत सुखवस्तू घरातल्या गृहिणी सूनिता रामनाथकरांच्या डोक्यातल्या किड्याने त्यांना करायला लावलेल्या व्यवसायीक धाडसा पासून तर आय आय टी मुंबई वाल्या व्यास - राठोड द्वयींच्या "पोलिटीकल एज" ची अफलातून कहाण्या आहेत. ह्या २० गोष्टीं मधे आपले मराठी लोक पण आहे. वर सांगीतलेल्या व्यतिरीक्त हरिश्चंद्राची फ्याक्टरी वाले परेश मोकाशी आणि प्रॉडक्ट डिझायनर अभिजीत बनसोड यांच्या गोष्टीही आहेत. आपल्या रोजच्या पाहण्यातल्या Crossword , Tantra T Shirts, Reva electric car co. ई. कंपन्यांच्या गोष्टी आहेत.
सगळ्या गोष्टींमधे काही समान बाबी आहेत. ह्या सर्व मंडळींनी फॉरमल एम. बी. ए. शिक्षण घेतलेले नाही. प्रत्येक जण त्याच्या "वेडा" ने झपाटलेला होता - काहीतरी करून पाहण्या साठी. ही सर्व मंडळी तसे पाहीले तर अगदी तुमच्या - आमच्यातली वाटतात पण जे हवे ते घडवण्या साठी त्यांनी काही घडण्याची वाट पाहीली नाही. स्वतःची बुद्धी, मन आणि कर्तुत्वावर विश्वास ठेवला आणि धाडसाने पुढे जात राहीले.
पुर्ण पुस्तक वाचतांना मला तरी खूप पॉझीटीव्ह वाटत राहीले. अरे ! असे तर आपल्यालाही करता येईल हेच विचार मनात येत होते. हा खरा स्वतंत्र भारत आणि भारतीय आहेत आणि अशा व्यक्तींमुळेच समाज , देश पूढे जात असावा असे वाटत राहीले. म्ह्णूनच मुळीच लेखन कौशल्य नसतांनाही मिपावर हा समिक्षा लेख टाकावासा वाटला.
चु. भु. द्या. घ्या.
मोहन
Connect the Dots by Rashmi Bansal
Publisher - Eklavya Education Foundation
Pages - 305
Price - 200
प्रतिक्रिया
31 Jul 2010 - 11:12 pm | निखिल देशपांडे
काही कारणास्तव हे पुस्तक वाचायचे राहुनच गेले...
आता परिचय वाचुन वाचावेच म्हणतो..
स्टे हंग्री स्टे फुलिश बद्दल मी पुस्तकविश्व वर लिहिले होते.
31 Jul 2010 - 11:15 pm | utkarsh shah
छानच माहिती दिलीत. नक्की आवडेल हे पुस्तक वाचायला.
1 Aug 2010 - 12:03 am | विलासराव
म्ह्णूनच मुळीच लेखन कौशल्य नसतांनाही मिपावर हा समिक्षा लेख
चांगले केलेत. हे पुस्तक वाचणार.
हे पुस्तकही जमल्यास वाचावे.
नवि क्षितीजे- सुरेन्द्रनाथ कांबळी
1 Aug 2010 - 12:20 am | राजेश घासकडवी
ही झपाटलेली अवस्था असली की बाकी सगळ्या (शिक्षण, कौशल्य) गोष्टी दुय्यम ठरतात. तुम्ही देखील या पुस्तकाने अतिशय प्रभावी झालात हे दिसून येतंच. त्या आत्मीयतेने, सच्चेपणाने लेखन केलं तर 'कौशल्य' हेही दुय्यम. अनुभव तितका भिडलेला नसताना तसं भासवणं यासाठी बरंच कौशल्य लागतं.
लिहीत राहा.
1 Aug 2010 - 9:03 am | स्पंदना
लक्षात ठेवुन शोधेन . वाचायला नक्किच आवडेल . जे मनापासुन येते त्या लिखाणाला बाकिचे कोणतेही निकष लागु होत नाहीत . अस जेंव्हा मनापासुन उमटेल ते लिहित रहा.
2 Aug 2010 - 10:26 am | मोहन
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांचे मनापासून आभार.
मोहन