मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गडकरींनी पुण्यात केले 'हे' वक्तव्य... खड्ड्यात वाहन गेले की...

पाषाणभेद · · जनातलं, मनातलं
पुणे वार्ताहर: दि. १४ सप्टेंबर. रस्त्यातील असलेले खड्डे दुरुस्ती करणे किंवा त्या जागी नवे रस्ते करणे सरकारला लगेचच अशक्य आहे. भारतावर चीन ने राज्य केले तरच ते शक्य आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांत असलेले खड्डेच वाहनचालकांच्या मदतीस येतील, कारण असल्या खड्ड्यांतूनच वीजनिर्मिती भविष्यात करू अशी घोषणा रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांनी काल पुण्यात केली. गणपती विसर्जन झाल्यानंतर आलेल्या पावसाच्या पुराची पाहणी पुण्यात केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ही परिषद रात्री ११ वाजता शासकीय विश्रामगृहात झाली. गडकरी पुढे म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे हे आपले मित्रच आहेत. त्यांना वैरी संबोधू नका. असल्या खड्ड्यांतून वाहने गेली की खड्यांत बसवलेल्या सेंसर्स व इलेक्ट्रॉनिक सर्कीटमुळे विद्यूतजनित्र चालू होईल व त्याद्वारे वीजनिर्मिती होईल. ही निर्माण होणारी वीज त्याच रस्त्याच्या वरती असलेल्या ग्रीडमध्ये जाईल व त्या ग्रीडमधली वीज वाहने खेचतील व त्यावर वाहने चालतील ही घोषणा तर आधीच केली आहे, याची आठवण त्यांनी पत्रकारांना करून दिली. पुणे शहरात हा पायलट प्रोजेट सध्या कात्रज, भोसरी, तळेगाव व पंढरपूर रोड येथे उभारण्यात येईल. त्यानंतर असले प्रकल्प गुजरात व उत्तर प्रदेश येथे राबविण्यात येईल. गडकरी पुढे असेही म्हणाले की, खड्यांत जनित्र व इलेक्ट्रॉनिक सर्कीट बसवण्यासाठी ते खड्डे पुरेसे मोठे व योग्य आकारात पाडण्याची जबाबदारी तेथील स्थानिक नागरीक, महानगरपालिका व कंत्राटदारांची असेल. केंद्र शासन खड्डे निर्माण करणार्या अशा महानगरपालिकांना योग्य ते अनुदानही देणार आहे. अशी विजनिर्मीती झाली तर वीज महामंडळांवरील भारही काहीसा हलका होईल अशी आशा गडकरींनी व्यक्त केली. 'पुण्यात बसेस हवेत उडतील' या आधीच्या घोषणेबाबत पत्रकारांनी गडकरींना छेडले असता त्यांनी हसून तो प्रश्न उडवला. उडत्या बस ऐवजी उडते ड्रोन मात्र चाकणच्या कंपनीने आधीच तयार केले आहे व त्याद्वारे एक व्यक्ती प्रवास करू शकतो हे त्यांनी सुचीत केले. असले ड्रोन पुण्याच्या पीएमपीएमएल द्वारे हडपसर गाडीतळावरून उडतील असे ते म्हणाले. हे वक्तव्य करतांना गडकरी जास्त उत्साहात दिसले. पत्रकारांबरोबर रात्रीचे जेवण घेतांना अनौपचारिक गप्पांमध्ये गडकरी असेही बोलले की, आताच्या भाजपाच्या केंद्रसरकारने रस्ते कोंडी व पडणारे खड्डे यावर सखोल विचार केला आहे. आगामी काळात भारतात लोह व जस्त युक्त रस्ते निर्मीण्याचा विचारही बोलून दाखवला. या विषयीचे व खड्ड्यांतून वीजनिर्मिती असले दोन शंशोधने व स्वतंत्र पेटंट भारतीय रोड काँग्रेसने २०१९ सालीच घेतलेले आहे. या आधीच्या सरकारने जर सरकारी अधिकार्यांना कामाला लावले असते तर हे संशोधन व पेटंट आधीच घेतले गेले असते, पण आधीच्या सरकारची काम करण्याची इच्छाच नव्हती, असे ताशेरे त्यांनी आधीच्या काँग्रेस सरकारवर वाजवले. टोलमुक्त रस्त्यांबाबत ते काहीसे नाराज दिसले. सरकार रस्ते निर्मीतीतून पैसे निर्माण करत असते. टोल टाळले तर नवे रस्ते कसे तयार होतील असा उलट प्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला. नवे वाहन घेतांनाच पूर्ण आयुष्याचा टोल आधीच घ्यायचा असला विचार चालू असल्याचे ते बोलले. त्यात वाहनाच्या किंमतीत केवळ ५०% मामूली किरकोळ वाढ अपेक्षित असल्याचे ते बोलले. चालकांच्या कमरेचा पट्टा हाच सिटबेल्ट म्हणून वापरता येईल का या बाबत संशोधन पुण्यातील शासकीय एआरएआय भोसरी, या संस्थेत चालू असल्याचे त्यांनी सांगितले. महीलांच्या कमरेच्या साखळ्या सीटबेल्ट मानावा असा कायदा संसदेच्या पटलावर असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. रिक्षातून शाळेत जाणारी मुले, जेष्ठ नागरीकांना व जेष्ठ महीलांना सिटबेल्ट वापरण्यात त्यांनी सुट दिल्याचे सांगितले. जे चालक सीटबेल्ट लावणार नाहीत त्यांना दंड तर केला जाईलच पण त्यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांचे वाहन रस्ते निर्मीती करण्यात कामाला लावावे, प्रसंगी त्यातून सिमेंट वाहतूक करावी अशी सुचना त्यांनी पोलीसांना केली.

वाचने 13747 वाचनखूण प्रतिक्रिया 27

विनोदपुनेकर Wed, 09/14/2022 - 16:38
वाफेवर चहा, हवेत गाडि हे असले काहि बाहि विपरित एक्न्याचि सवय झालि आहे गुरुपासुन २०१४ ला आलेत तेव्हापासुन त्यात गड्करि साहेब आपन पन सामिल व्हा गरिब बिचारि प्रजा

विवेकपटाईत Wed, 09/14/2022 - 17:17
माझ्या सरकारी नोकरीचा शेवटचा काळ परिवहन मंत्रालयात गेला. माननीय गडकरी साहेब कितीही विनोद आणि कोट्या करत असले तरी कामाच्या बाबतीत अत्यंत शिस्तबध्द आहे. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झालेच पाहिजे. कुठलाही बहाणा त्यांना चालतं नाही.

श्रीगुरुजी Wed, 09/14/2022 - 17:28
गडकरी साहेब कितीही विनोद आणि कोट्या करत असले तरी कामाच्या बाबतीत अत्यंत शिस्तबध्द आहे. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झालेच पाहिजे. कुठलाही बहाणा त्यांना चालतं नाही. पुणे-सातारा महामार्ग लवकरच व्यवस्थित होईल असे गडकरींनी अनेकदा आश्वासन दिले आहे. परंतु प्रत्येक वर्षी या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे व टोल प्रचंड वाढत चाललाय. पुणे-मुंबई महामार्गावरील चांदणी चौकात पूर्ण राडा झाला आहे. हे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि भविष्यात किमान ५ वर्षे हा रस्ता व्यवस्थित होण्याची सुतराम शक्यता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अभिजीत अवलिया Sat, 09/17/2022 - 13:41
पुणे सातारा रस्त्याबद्दल सहमत. गडकरी खूप वेळा अतिशय अतिशयोक्तीपूर्ण बोलतात. पुणे बंगलोर अंतर अवघ्या ४ तासात कापता येईल, रस्त्यांची कामे नीट न केल्यास कंत्राटदाराला बुलडोझरखाली चिरडू, २०२४ च्या निवडणूकीपूर्वी भारतातील रस्ते अमेरीकेतल्या रस्त्यांसारखे असतील, उडणारी बस वगैरे वगैरे त्यांची काही अतिशयोक्तीपूर्ण वक्तव्ये. पुणे सातारा अथवा मुंबई गोवा महामार्गाची कामे ईतकी रखडलीत व दर्जाहीन होत असून सुध्दा कुणा कंत्राटदारावर काही मोठी कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. नुसतीच तोंडाची वाफ दवडणे चालू आहे.

In reply to by अभिजीत अवलिया

श्रीगुरुजी Sat, 09/17/2022 - 14:02
गडकरींनी ४-५ महिन्यांपूर्वी लोकसभेत दिलेले अजून एक आश्वासन म्हणजे पुढील १२ महिन्यांच्या आत भारतातील सर्व टोलनाके बंद होऊन सर्वत्र fast tag वापर सुरू होईल. तसे होण्याची शक्यता अजून तरी दिसते नाही.

स्वधर्म Wed, 09/14/2022 - 17:29
पण खरोखरच हा विषय अत्यंत महत्वाचा आणि तितक्याच चुकीच्या पध्दतीने हाताळला जात आहे, असे वाटते. सरकार कोणतेही असो, परिवहन धोरण हे जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीस प्राधान्य देणारे असण्याच्या ऐवजी जास्तीत जास्त कंत्राटे, जास्तीत जास्त प्रकल्प, त्यातून जास्तीत जास्त मलई, जास्तीत जास्त वाहनांचा खप, टोल कंपन्या यांच्यासाठीच काम करते असे वाटते. एसटी चा संप आणि तिची सध्याची अवस्था हा याचा ढळढळीत पुरावाच.

In reply to by स्वधर्म

टर्मीनेटर Wed, 09/14/2022 - 18:06
+१००० शब्दा शब्दाशी सहमत आहे! तसेच महामार्गांचे रुंदीकरण करण्यासाठी जमीन संपादन करताना सरकारी भावापेक्षा कितीतरी अधिक दर देउन त्या मार्गांवरच्या जमीनींचे भाव अव्वाच्या साव्वा वाढवण्यातुन फार मोठ्या घोटाळ्याचा संशय येतो आहे. ह्या आणि अशा अनेक उपदव्यापांमुळे भविष्यात कधीतरी (चुकुन माकुन सत्तापालट झाल्यास) गडकरींना ईडी चौकशीला सामोरे जावे लागल्यास मला तरी अजिबात आश्चर्य वाटणार नाही. असो, गंभीर विषय विनोदी पद्धतीने चांगला हाताळला आहेत पाभे 👍

In reply to by टर्मीनेटर

मनो गुरुवार, 09/15/2022 - 08:18
आता पुणे-बंगळूर द्रुतगती महामार्ग होणार, तो आपल्याच जमिनीतून जावा यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आलेली आहे. पावसाचे निमित्त करून महामार्ग फलटण, खटाव या अविकसित दुष्काळी भागातून जावा असे प्रयत्न चालू आहेत. पुढच्या निवडणुकीची सोय नाहीतर कशी होणार?

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत Fri, 09/16/2022 - 09:54
गेल्या आठ वर्षांतील बदल डोळ्यांनी स्पष्ट दिसतो. मध्य प्रदेश गुजरात राजस्थान हिमाचल उत्तराखंड इथल्या रस्त्यांचा अनुभव हेच सांगतो. पूर्वी नागपुर चंद्रपूर पूर्वी बसला सहा ते सात तास लगायचे आता तीन तास बस घेते. बाकी महाराष्ट्रात काम करणे कठीण आहे, हे ही खरे. (एक अभियंताने मला सहज म्हंटले होते, महाराष्ट्रातील लोक सर्वात इमानदार असतात आणि तिथले स्थानीय नेते देशात सर्वात भ्रष्ट).

In reply to by विवेकपटाईत

चौथा कोनाडा Sat, 09/17/2022 - 13:10
"महाराष्ट्रातील लोक सर्वात इमानदार असतात आणि तिथले स्थानीय नेते देशात सर्वात भ्रष्ट" +१ - आवडलेले वाक्य

तिता Wed, 09/14/2022 - 17:54
मला हा लेख उपरोधिक आहे का खरेच गडकरी असे बोलले हे समजले नाही. विनोदी असेल तर अतिशयोक्ती फार आहे. खरे असेल तर .... माझी समज कमी आहे.

विजुभाऊ Wed, 09/14/2022 - 18:45
मिस्त्री ंच्या निधनानंतर गडकरींनी मागच्या सीटवरील लोकाम्ना सीट बेल्ट सक्तीचा केला . .सीट बेल्ट कम्पल्सरी म्हणजे पोलीसांना वसुलीचा नवा मार्ग दाखवून दिला आहे. पण त्या अगोदर चुकीचा डिव्हायडर , खड्डे असलेले रस्ते यांना जबाबदार लोकांना काहीच केले नाही. रस्त्यावर ओसंडून वाहणारे ट्रक चालक आणि मालक यांना काहीच करणार नाहीत , हायवेवरून उजव्या लेन मधला रस्ता आडवून अवजड ट्रक चालवणारे इंडीकेटर नसलेले , बांधकामाच्या सळ्या चारचार फूट बाहेर आणत वाहुन नेणारे ट्रक जुने, खिळखिळे झालेले तरीही वाहतूक करणारे ट्रक याना कोण शासन करणार?

सामान्य माणसाला या खड्डेयुक्त रस्त्यावरुन गाडी चालविल्याशिवाय पर्याय आहे का? १.रस्ते अपघातात "खड्डे चुकविण्यामधे अपघाती मृत्यु " या कारणामुळे यावर्षी ८ जण मरण पावले आहेत. शेवटचा मृत्यु कल्याण जवळील शहाड पुलावर झाला आहे. नोंदले न गेलेले कितीतरी असतील. २. गणपती जाउन आठवडा होत आला तरी गल्लोगल्ली मंडप रस्ते अडवुन उभेच आहेत. आधीच लहान असलेल्या गल्ल्यांमध्ये शाळा भरण्या सुटण्याच्या वेळी जी काही गर्दी आणि ट्रॅफिक जॅम होते ते बघुन हताश व्हायला होते. ३. पुण्यात चांदणी चौक म्हणजे तर भलताच विनोदी विषय झालाय. ऑफिसमधुन घरी येताना किमान २ कि. मी. अलीकडेपासुन बंपर टु बंपर गाडी चालवायला लागते. मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांना त्याचा फटका बसल्याने आता मात्र तिकडे अरुंद पूल पाडण्याची जोरदार तयारी चालु आहे. ४. पुणे-सातारा मार्ग-- आपण फक्त टोल भरण्यासाठीच जन्मलो आहोत, त्याबदल्यात काही सुविधा वगैरे मिळाव्यात अशी अपेक्षाच करणे चुक आहे. ५. पुणे-नगर मार्ग म्हणजे मृत्युचा सापळा बनला आहे असा धागा मिपावर आल्याच्या दुसर्‍याच दिवशी तिथे एक मोठा अपघात होउन एकाच कुटुंबातील ४ जण गेले. ६. सायरस मिस्त्रींचा अपघात झाल्याने मुंबई वलसाड महामार्ग लवकरच सुधारेल असे वाटते. ७. कायप्पावरील विनोद- एखादा नेता किवा मोठा माणुस मेल्याशिवाय रस्त्यांचे भाग्य उजळत नाही, त्यामुळे आता कोकणवासी लोकांनी मुंबई-गोवा महामार्ग लवकर नीट व्हावा म्हणुन नेते मंडळींना "येवा कोकण आपलाच असा" अशी हाक मारली आहे. :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

श्रीगुरुजी Wed, 09/14/2022 - 20:28
परवा पुण्यातून कात्रजमार्गे लवळेला जाताना चांदणी चौकाच्या अलिकडे १ किमी पासून वाहतूक खोळंबा सुरू झाला. ते १ किमी अंतर काटण्यास २० मिनिटे लागली. त्यामुळे लवळेतून पुण्यात येतान महामार्ग टाळण्यासाठी सूसवरून पाषाण-सुतारवाडीकडे जाण्यासाठी महामार्गाच्या वरून जाणाऱ्या उड्डाणपुलावरून गेललो. दिशेचा अंदाज घेत पाषाण, सुतारवाडी, NCL, ARDE वरून अभिमानश्री सोसायटीतून बाणेर रस्त्यावर येऊन विद्यापीठाच्या चौकात आल्यावर पहिला सिग्नल लागला. येथपर्यंत सर्व.रस्ते चांगले रूंद असून अत्यंत तुरळक गर्दी होती. नंतर विद्यापीठ चौक, सेनापती बापट रस्ता येथेही तुरळक गर्दी होती (रविवार असल्याने गर्दी कमी असावी). लवळेहून येताना परत महामार्ग पकडून चांदणी चौकातून आलो असतो तर दुप्पट वेळ लागला असता. आता लवळेला जाताना व येताना पाषाणमार्गेच जाणार आहे ज्यामुळे महामार्ग टाळता येईल. ५ वर्षांनंतर सुद्धा चांदणी चौकातील काम अपूर्ण आहे व पुढील ५ वर्षे तरी ते पूर्ण होणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पाषाणभेद Wed, 09/14/2022 - 23:12
आणि फलंदाजाने मिड ऑन मधल्या क्षेत्ररक्षणात असलेले अंतर पाहून चेंडू जोरदार टोलवला व सरळ चार धावा. पुणेरी पलटण विजयाच्या टप्यात.

In reply to by श्रीगुरुजी

सतिश गावडे गुरुवार, 09/15/2022 - 21:07
तुमचा परतीचा मार्ग या भागात दिवसा फिरायचे झाल्यास मी नेहमी वापरतो. विना रहदारी, विना सिग्नल रस्ता. मात्र रात्री हा रस्ता निर्मनुष्य होत असावा त्यामुळे सुरक्षित नसावा.

आनन्दा गुरुवार, 09/15/2022 - 18:53
लेख आवडला.. भारी जमला आहे. बाकी गडकरी मला आवडतात, पण म्हणून या लेखातल्या गोष्टी खोट्या आहेत असे मी म्हणणार नाही.. यावर्षी गणपतीत मी पुणे कोल्हापूर प्रवास केला, सातारा रोड चे खड्डे मला तरी कुठे मिळाले नाहीत. गुरुजींना कुठे दिसतायत देव जाणे. चांदणी चौकबद्दल ना बोलणे चांगले.. मी एकवेळ मुळशी पानशेत खेडशिवापुर मार्गे येईन, त्याला पण चांदणीचौक पेक्षा कमी वेळ लागेल.. बऱ्याच वेळा तिथे एक दीड तास अडकलेला आहे.. 40 मिनीटापेक्षा कमी वेळ लागला तर मी त्याला फाऊल मानतो

In reply to by आनन्दा

सतिश गावडे गुरुवार, 09/15/2022 - 21:04
मी एकवेळ मुळशी पानशेत खेडशिवापुर मार्गे येईन
या रस्त्यात उजव्या निळकंठेश्र्वर मंदिराची टेकडी लागेल का?

धर्मराजमुटके गुरुवार, 09/15/2022 - 23:46
पुढच्या टप्यात पोटातून निर्माण होणार्‍या गॅस वर चालणार्‍या गाडया पण आणण्याची घोषणा केली गेली तर नवल वाटणार नाही.