लिंगाणा

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
28 Aug 2020 - 7:14 pm

हिमालयात शिवशंभोचे वास्तव्य आहे, कैलासावर आणि सह्यादीमध्ये शिवशक्ती वास्तव्य करते दुर्गदुर्गेश्वर रायगडावर! याच रुद्राचे प्रतिक म्हणून निसर्गानेच जणु एक शिवलिंग निर्माण करुन रायगडाच्या पायथ्याशी ठेवले आहे. हे नैसर्गिक शिवलिंग म्हणजेच "लिंगाणा".

लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. मानगड, सोनगड, महिन्द्रगड, लिंगाणा, कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात. कावळ्या, बोचेघोळ, निसनी, बोराटा,सिंगापूर, फडताड, शेवत्या, मढ्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते. बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका भेदक वाटतो. त्याच्या जवळच असलेला धो-धो कोसळणारा धबधबा पर्यटकांना मनसोक्त भिजायला भाग पाडतो.

सध्या लिंगाणा किल्ला सर करण्यासाठी दोन वाटा प्रामुख्याने वापरात आहेत.
१) यातील पहिली वाट तळ कोकणातील पाने गावातुन लिंगणमाचीवर येथे व तेथुन गडावर चढते तर दुसरी वाट घाटमाथ्यावरील मोहरी गावातुन बोराट्याच्या नाळीतुन खाली उतरते व रायलिंग पठार व लिंगाणा दरम्यान असलेल्या खिंडीत येते. या दोन्ही वाटांनी गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे तसेच गिर्यारोहणाचे साहित्य सोबत असणे अत्यावश्यक आहे. फक्त सुळका चढायचा असल्यास एक दिवस व संपुर्ण किल्ला फिरण्यासाठी अजून एक दिवस किल्ल्यावरील गुहेत मुक्काम करण्याची तयारी असायला हवी. पाने गावमार्गे गडावर जाण्यास प्रथम आपणास महाडला यावे लागते. इथून पाने गावाला जाण्यास सकाळी ६.६० वाजता आणि दुपारी १२.३० वाजता गाड्या आहेत.पाने गावात जाणारी बस महाड-बिरवाडी-मांगरून-वाळणकोंड-पाने अश्या मार्गाने जाते. या प्रवासात सह्याद्रीच्या रौद्र रांगाचे दर्शन होते. पावसाळ्यात तर हा प्रवास न संपु नये असाच आहे. पाने गावातून एक तासाच्या चढणीनंतर आपण लिंगाणा माचीवर पोहोचते.

लिंगाणामाची गाव

तिथे पाणी भरून पुन्हा पाऊण तास चढल्यावर पुढे घसरड्या वाटेवरून आपण अर्ध्या तासात लिंगाणा सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेपाशी येतो. लिंगाणा माचीवरून सुळक्याखाली असलेल्या गडाच्या अवशेषांपर्यंत जाण्यासाठी १ तास व सुळका सर करायचा असल्यास सुळक्याला वळसा मारून सुळका व रायलिंग पठार यामधील खिंडीत जाण्यासाठी अजून एक तास लागतो. पायथ्यापासुन सुळक्याच्या या टप्प्यापर्यंत येण्यासाठी साधारण तीन ते साडेतीन तास लागतात.
२) पुणे जिल्ह्याच्या नैऋत्येला असलेला वेल्हे तालुका दुर्गम म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या कुशीत छोटी छोटी गावे अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेली आहेत. उंच सखल डोंगर दऱ्या, मुसळधार पाउस, सोसाट्याचा वारा, अभावानेच असणारे गाडी रस्ते, शिक्षण, आरोग्य आदी मुलाभूत सोयींचा अभाव अशा परिस्थितीत येथील गावकरी राहत असतात. भात, वरई , नाचणी हि येथील प्रमुख पिके पण त्यासाठी देखील भरपूर मेहनत आणि निसर्गाची लहर हे घटक आहेतच. परिस्थिती आता बदलत आहे पण अजूनही येथील जीवन खडतर आहेच.वेल्ह्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेले घिसर, खानू, चांदर, मोहरी या वेल्हे तालुक्यातील गावातून अवघ्या चार तासात पायी चालत रायगड जिल्ह्यातील हा किल्ला सर करता येतो.

घाटमाथ्यावरील मोहरी गावातुन गडावर जाण्यासाठी पुणे– नसरापूर-मार्गासनी-विंझर-वेल्हे-वारोतीफाटा असा गाडीमार्ग असुन वारोतीफाटा पार केल्यावर एक छोटा घाट चढून आपण खिंडीत पोचतो. खिंडीपासून पुढील रस्ता कच्चा मातीचा असल्याने मोहरी गावात जाण्यासाठी जीपसारखे वाहन असल्यास उत्तम अन्यथा येथे गाडी लावून चालत तासाभरात आपण मोहरीस पोह्चतो. मोहरी गावाची पदयात्रा करताना रायलिंग पठाराआडुन डोकावणारा लिंगाणा सुळका व त्यामागील रायगड किल्ला आपले लक्ष वेधुन घेतो. मोहरी गावाच्या थोडे अलीकडे डोंगर उतारावर सिंगापुर गाव वसले आहे. ह्या गावातुन सिंगापुर नाळीने कोकणातील दापोली गावात उतरणाऱ्या वाटेने देखील लिंगाणा माचीवर जाता येते. मोहरी गाव म्हणजे १०-१२ घरांची लहानशी वस्ती. गावातुन बाहेर पडताना खडकात खोदलेली एक मोठी विहीर असुन या विहिरीकडूनच रायलिंग पठारावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. येथुन लिंगाणा सुळक्याच्या अर्ध्या उंचीवर जाईपर्यंत पाण्याची कुठेही सोय नसल्याने या विहिरीवरूनच पुरेसे पाणी भरून घ्यावे. मोहरी गाव ते रायलिंग पठार हे अंतर साधारण ३ कि.मी असुन मोहरी गावातुन बाहेर पडल्यावर पठार-जंगल –पठार अशी पायपीट करत साधारण तासाभरात आपण रायलिंग पठारावर पोहचतो. कोकणात उतरणारी बोराट्याची नाळ रायलिंग पठारावरुन सुरु होते व रायलिंग डोंगराला वळसा घालुन रायलिंग पठार व लिंगाणा ह्यांमधील लहान खिंडीत खाली उतरत जाते. रायलिंग पठाराच्या टोकाला जाताना थोडसे अलीकडे डाव्या बाजुला बोराट्याच्या नाळीत उतरत जाणारी लहानशी पायवाट आहे.

या वाटेने खाली उतरण्याआधी थोडेसे पुढे रायलिंग पठाराच्या टोकावर जाऊन लिंगाण्याचे दर्शन घ्यायचे व तेथुन मागे फिरून या वाटेने बोराट्याची नाळ उतरण्यास सुरवात करायची.

 

बोराट्याच्या नाळेची खडी उतरण

प्रचंड मोठ्या पथ्थरांमुळे बोराट्याच्या नाळेची उतराई देखील अवघड आहे.

बोराट्याच्या नाळेतील लिंगाण्याच्या चढाईमार्गाशी पायथ्याशी जाणारा थरारक रॉक पॅच

या वाटेने सांभाळून खाली उतरल्यावर पुढे कड्यात ठोकलेल्या खिळ्याला दोर बांधुन या दोराच्या आधारे २० फुटाचा टप्पा कड्याला चिटकुन पार करावा लागतो. तेथुन १५ मिनिटाची पायपीट करून आपण खाली रायलिंग पठार व लिंगाणा यामधील लहान खिंडीत पोहोचतो.

मोहरी गावातुन या खिंडीपर्यंत येण्यास साधारण २ तास लागतात व येथुनच खऱ्या अर्थाने लिंगाण्याची चढाईला सुरवात होते.
लिंगाण्याच्या इतिहासात डोकावल्यास मोऱ्यांचा पराभव केल्यावर शिवाजी महाराजांनी रायगडाजवळ हा किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यावर युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी मानगड, सोनगड, चांभारगड, लिंगाणा या उपदुर्गांची साखळी तयार केली. सह्याद्रीच्या डोंगररांगांवरील राजगड, तोरणा या किल्ल्यांकडुन बोराट्याची नाळ,सिंगापुर नाळ, बोचेघळ अशा अनेक घाटवाटा खाली कोकणात रायगडच्या दिशेने उतरतात या वाटांवर नजर ठेवण्यासाठी प्रामुख्याने लिंगाणा किल्ल्याची पुनर्बांधणी करण्यात आली असावी. लिंगाणा किल्ल्याची निर्मिती ही राजधानीचा उपदुर्ग म्हणूनच झाली असली तरी गडावरील गुहा व खांबटाकी त्याच्या प्राचीनतेची साक्ष देतात. शिवलिंगाच्या आकाराचा म्हणुन लिंगाणा या नावाने ओळखला. रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी त्यासाठी अतिशय अनुकूल आहेत. या अशा अवघड दुर्गावर स्वराज्याच्या शत्रूंना कैदेत ठेवत असत. इथल्या गुहेत, जे जुने कारागृह होते, त्यात एका वेळेस ५० कैदी ठेवत. वर अतिअवघड असा वाट नसलेला सुळका आणि खाली घसरड्या वाटा, त्यामुळे येथे कैद्यांना ठेवल्यावर त्यांच्या मनावर या अवघड स्थितीचा परिणाम होऊन कैदी अगदी खचून जात असत. पळून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे. जर कोणी कैद्याने पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमवावाच लागे. गडावरचे दोर आणि शिडा काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद.
हा किल्ला रायगडच्या घेऱ्यामध्ये असल्याने रायगडाच्या दुरुस्तीबरोबर लिंगाण्याचीही दुरुस्ती केल्याचे उल्लेख कागदपत्रात आढळतात. रायगडच्या पहाऱ्यात लिंगाण्याचे पहारे व तेथे लागणारे साहित्य यांचे वर्णन येते. रायगड राजगृह व लिंगाणा हे कारागृह म्हणुन ओळखले जात असले तरी शिवकाळात लिंगाण्याचे कारागृह म्हणुन कोणतेच उल्लेख येत नाहीत. लिंगाण्याचे कारागृह म्हणुन सतत उल्लेख येतात ते पेशवेकाळातच. या काळात रायगडचे देखील कारागृह म्हणुन उल्लेख येतात.
१६६५ सालच्या पुरंदर तहामध्ये रायगड आणि त्या परिसरातले किल्ले लिंगाणा व बाणकोट महाराजांकडेच राहिले. लिंगाण्याच्या गिर्दनवाहीचे जननी व सोमजाई हे देव होते. त्यांच्या नवरात्राच्या उत्सवाची रायगडाच्या जमाखर्चातून तरतूद होत असे. लिंगाणा किल्ला रायगडचा पूरक होता. त्याच्या डागडुजीचे काम रायगडाबरोबरच चालत असे. लिंगाण्यावरच्या देवतांना बकरे बळी देण्याची प्रथा होती.
छत्रपती शाहु महाराजांचे वारस रामराजा यांनी दिलेल्या ३० ऑगस्ट १७७२च्या आदेशानुसार पोतनिंसाकडून रायगड माधवराव पेशव्यांच्या मृत्युनंतर इ.स. १७७३ साली पेशव्याकडे आला त्यावेळी लिंगाण्यावर २ तोफा,२ जंबुरे हे युद्ध साहित्य तर १२ खंडी भात व १९ खंडी नागली धान्यसाठा असल्याचे उल्लेख येतात. यावेळी पेशव्यांनी संभाजी दौंड,चिमणाजी गोविंद व खंडोजी शेळके यांना लिंगाण्याची जबाबदारी देत १५० रुपये पगारावर देवजी गोपाळ यांना लिंगाण्याचे सबनीस नेमले तर धोंडो नारायण मोने यांना कारकून नेमले. पुढे झाले. इ.स.१७७३-७४ साली संताजी नागोजी शेलार गडाचे सरनौबत होते. त्यांच्या काळात लिंगाण्याच्या माचीवरील कोठी दुरुस्त करण्यास ३० रुपये खर्च झाला तसेच पावसामुळे कोसळलेला दरवाजाजवळील टप्प्याचा बुरुज व पहाऱ्याचा बुरुज यांची दुरुस्ती करून दरवाजास नवी लाकडी दारे बसवली. पावसाळ्यात या दरवाजांना साधारण २ किलो म्हणजे १ रुपये किमतीचे मेण लावले जाई. इ.स.१७७४ मध्ये लिंगाण्यावर एक नवीन बुरुज बांधला गेला. इ.स.१७७५ मध्ये लिंगाण्याचा कडा कोसळुन वाटेवर प्रचंड मोठा दगड आला. बिगारी व पाथरवट यांच्या मदतीने दगड फोडुन वाट मोकळी केली तसेच हौदाजवळील बुरुजाचे काम पुर्ण केले. इ.स.१७७७ साली लिंगाण्यावर राजबंदीसाठी नवी कोठडी, धान्याचे कोठार,दरवाजाखाली पहाऱ्याची जागा,वाटेची दुरुस्ती यासारखी अनेक कामे करण्यात आली. इ.स.१७८० साली मोडकळीस आलेली किल्ल्याची सदर नव्याने बांधली त्यासाठी १२ रुपये खर्च आला. इ.स.१७७९ व १७८१ साली लिंगाणा शाकारणीचा खर्च पावणे दोन रुपये होता. लिंगाण्यावर जननीचे देवालय,सदर, सरकारवाडा,हवालदाराचे घर, हणमंत बुरुज,जीभीचा पहारा,निगडीचा पहारा या सात ठिकाणी शाकारणी केली जात असे. इ.स.१७८५ साली किल्याच्या माचीवर नव्याने कोठी बांधताना ३२ रुपये खर्च आला. इ.स.१७८६ साली कोसळलेला हनुमंत बुरुज नव्याने बांधण्यात आला. इ.स.१७८६ सालापर्यंत लिंगाण्याची सदर, बुरूज, दरवाजे आणि धान्यकोठार या वास्तूंची देखभाल केली जात असल्याचे उल्लेख आढळतात. लिंगाण्याच्या (गडदेवता) गिर्दनवाहीचे देव श्रीजननी व सोमजाई या देवतांना नवरात्राच्या उत्सवात बकरे बळी देण्याची प्रथा होती व यासाठी रायगडाच्या जमाखर्चातून तरतूद होत असे. यावेळी देवीस (प्रत्येकी) १ रुपयाचे पातळ व चोळी सरकारतर्फे अर्पण केली जाई. कोळी भगत कडु याच्याकडे या देवतांचे भगतपण होते. लिंगाण्यावर काही उपद्रव झाल्यास वाळणकोंड येथील देवाची यात्रा केली जाई. इ.स.१७८४ मध्ये लिंगाण्यावर उपद्रव झाल्याने वाळणकोंड येथील देवाची यात्रा केली गेली. या यात्रेत नारळ,शेंदुर,पंचखाने व देवास पानसुपारी यासाठी आठ आणे सरकारी खर्च आला. लिंगाण्यावर पांजीसाठी दर तिसऱ्या वर्षी बकरे बळी देत. यात एक बकरा श्रीजननी व सोमजाई या देवतांसाठी तर एक गडाच्या दरवाजासाठी असे. इ.स.१७८७-८८ मध्ये तेथे टोणगा बळी दिल्याचे उल्लेख येतो. लिंगाण्यावर दसरा व चंद्रदर्शन प्रसंगी पानसुपारी वाटण्याची पद्धत होती तसेच चंद्रदर्शनाच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला तोफ डागली जाई. पावसाळ्यापुर्वी गडावरील इमारतींची शाकारणी करण्यापुर्वी गडावर शाकारजत्रा केली जाई व त्याचा खर्च सरकारातून केला जाई. या सर्व खर्चाचे कागद पेशवे दफ्तरात आढळतात. लिंगाण्यावरील शिबंदीत १७७५-७६साली ६१ माणसे,१७८०-८१साली ७३ माणसे, १७८१-८२साली ५१ माणसे,१७८३-८४ साली ४२ माणसे तर १८०८-०९ साली फक्त ६ माणसे होती. इ.स.१७८१-८२ साली ५१ माणसाना पगारासाठी एकुण २८३३ रुपये व इतर खर्च ३५ रुपये झाला तर इ.स.१७८३-८४ साली ४२ माणसाना पगारासाठी एकुण २०४२ रुपये खर्च झाला. राजकीय कैदी, राजद्रोह, मनुष्यवध या गुन्ह्यातील कैद्यांना लिंगाण्याच्या गुहेत ठेवल्याच्या नोंदी पेशवे दफ्तरात आढळतात. इ.स.१७७५ ते इ.स. १७९५ दरम्यान गोपाळशेठ सोनार (१७७५-१७७६),गणेशभट परांजपे (१७७९-१७८१), मानसिंग खलाटे (१७८३-१७८५),मोरोजी नाईक संकपाळ (१७८५),मेस्तरजमा फरसिसिण(१७९२),ठकी कोंढरकरीण (१७९५-९६),आनंदराव रामचंद्र अभ्यंकर(१७९८) या मान्यवरांना लिंगाण्याची कैद नशिबी आली. इ.स.१७८०-८१ मध्ये येसाजी नाईक चांदळेकर किल्लेदार व गणोजी नाईक हे सरनौबत तर महादजी निळाजी व रामजी नारायण हे सबनीस होते. इ.स.१७८६-८७ साली रंभाजी दौंड किल्लेदार झाले पण कामात चूक झाल्याने त्यांना कैद करून बाळकृष्ण पांडुरंग यांची नेमणूक करण्यात आली. हि नेमणूक इ.स.१७९५ पर्यंत कायम होती. त्यांच्या मृत्युनंतर इ.स.१७९५ साली हबाजीराव राणे किल्लेदार झाले. . इ.स.१८०८-०९ साली दौलतराव कुंजीर लिंगाण्याचे किल्लेदार होते. इ.स.१७९५-९६ साली लिंगाण्याचा वार्षिक खर्च ३४२०/- रुपये तर इ.स.१८१३-१४ मध्ये ३१५०/- रुपये होता. ९ मे १८१८ रोजी रायगडच्या पाडावानंतर कर्नल प्रौर्थरच्या नेतृत्वाखाली लिंगाणा किल्ला जिंकण्यात आला व रायगडाच्या खोऱ्यात विश्रांती घेऊन इंग्रजांचे सैन्य २३ मे १८१८ रोजी पालीकडील मार्गास लागले.
लिंगाण्याच्या सुळक्यावर जाण्याआधी आपण गडाच्या माचीवर जाउन दुर्गदर्शन करुया. अर्थात जीभेच्या आकाराच्या माचीवर लिंगाणा गडाचे थोडेफार अवशेष आहेत.

गडाची माची रायगडाच्या दिशेने म्हणजे नैऋत्य दिशेला पसरली आहे. गडाचे म्हणजेच माचीचे क्षेत्रफळ सुद्धा कमी, म्हणजे जवळ-जवळ 250 चौरस मीटर इतकेच आहे.

ईथे जायचे म्हणजे आधी लिंगाणामाची हे गाव गाठायचे. एकेकाळी गडाची माची म्हणून नांदती असलेली हि वस्ती आज भकास झाली आहे.बहुतेक गावकर्‍यांनी स्थंलातर केलेले आहे. बबन कडूसारखे अजुनही गडाची निष्ठा असणारे सह्यपुत्र सोडले तर ईथे फार कोणी रहात नाही. आधी लिंगणमाचीवरच्या जननीचे आणि सोमजाईचे दर्शन घेऊन मग लिंगाण्याकडे निघुया. लिंगाणामाचीतून गडाची चढण सुरु होते. जवळपास सत्तर अंशाची हि चढण छातीवरची आहे. खड्या वाटेमुळे मध्ये थांबायचाही प्रश्न येत नाही. सुरवातीला दक्षीणेकडे जाणारी पायवाट वळून पुन्हा उत्तरेकडे वर सरकते. वाटेत एका ठिकाणी सपाटी दिसते. ईथे बहुधा पहार्‍याचे मेट असेल असे वाटते. साधारण तासाभरात आपण गडाच्या साधारण शंभर फुटी कातळकड्याच्या खाली येतो.

ईथे वाट वाळलेल्या गवतामुळे अधिक बिकट होते. तर पाठिशी दरी भयाभया भिती दाखवत असते. कसेबसे वाळक्या गवताचे पुंजके धरुन शरीर घसटत लिंगाण्याच्या कड्याला भिडायचे. उजवीकडे पाण्याचे एक टाके आहे. पुढील वाट कड्याच्या अगदी टोकावरून जाते. येथे खालून येणारी पायऱ्या ढासळलेली एक वाट आहे.

उजव्या बाजूस 15-20 फुटांचा कडा आहे, तिथे एक उंबराचे झाड कडा फोडून बाहेर आले आहे. त्याचाच आधार घेऊन कडा पार करावा लागतो.बरोबर कोणी प्रस्तरारोहण करणारा असेल तर चढून दोर लावतो. कड्याला शरीर घासत रेटत वर चढायचे .

पुढे थोड्या ढासळलेल्या पायर्‍या लागतात, त्याने अंतिम चढाई करुन एकदाचे लिंगाणा माचीवर पोहचतो. ईतका व्याप असल्याने बहुतेक जण लिंगाण्यावर फिरकत नाही, बहुतेकजण लिंगाण्याच्या सुळक्यावर आरोहण करतात. गडाची मुळ वाट सध्या पार तुटून गेली आहे. गडावर गावकर्‍यांचा राबताही संपला आहे.

अगदी गडावर असणारी देवीही गावकर्‍यांनी खाली माचीवर नेउन ठेवली आहे. सध्या अनेक किल्ल्यावर दुर्गसंवर्धनाची काम सुरु आहेत. कोणत्या तरी संस्थेने मनावर घेउन ईथे शिडीची व्यवस्था केली तर या प्राचीन दुर्गावर पुन्हा गडप्रेमींची आणि शिवभक्तांची वर्दळ वाढेल. गडाच्या माचीचे आकारमान जेमतेम असल्याने सहाजिकच अवशेष फार नाहीत. मात्र ईथला मानवी वावर संपल्याने माचीवर फिरताना थोडी खबरदारी बाळगलेली चांगली. साप, विंचु यांचा ईथे मुक्त वावर आहे.

गिर्यारोहण तंत्राचा वापर करत २० फुट उंचीचा हा कातळटप्पा चढुन आल्यावर वाटेतच गडाच्या माचीवरील दरवाजाची तुटलेली व अर्धवट गाडलेली चौकट व त्याशेजारी बुरुजाचे अवशेष पहायला मिळतात.

येथुन ३०-४० फुट उंच घसरड्या वाटेने वर चढुन आल्यावर डावीकडे एका बुरुजाचे व त्यावर एका चौकीचे अवशेष पहायला मिळतात. लिंगाण्याची माची समुद्रसपाटीपासुन २०३२ फुट उंचावर असुन दक्षिणोत्तर साधारण २ एकरवर पसरलेली आहे. माचीवर मोठया प्रमाणात अवशेष विखुरलेले आहेत.

वाटेच्या सुरवातीस लिंगाणा सुळक्याच्या पोटात कोरलेल्या दोन गुहा असुन यातील पहिल्या गुहेस कातळात कोरलेला एक दरवाजा व चार खिडक्या आहेत.

कैदखाना किंवा किल्ल्याची सदर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या गुहेबाहेर एक दगडी पाटा पहायला मिळतो. या गुहेशेजारी अजून एक गुहा कोरलेली असुन हि गुहा धान्यकोठार म्हणुन ओळखली जाते.

येथुन पुढे जाणारी वाट बऱ्यापैकी असुन या वाटेवर आपल्याला कातळात कोरलेले पाण्याचे मोठे टाके पहायला मिळते.

टाक्यातील पाणी स्वच्छ असुन चव सुंदर आहे. या टाक्याजवळ दगडात कोरलेले एक शिवलिंग आहे. या टाक्याकडून पुढे निघाल्यावर कातळात कोरलेले अजून एक कोरडे टाके पहायला मिळते.

या टाक्याकडून पुढे जाणारी वाट नष्ट झाली असुन या टाक्यात उतरुन कड्याला चिटकत पुढे आल्यावर आपण एका प्रशस्त गुहेच्या आवारात पोहोचतो.

या गुहेच्या आतील बाजुस भिंतीला लागुन कठडा कोरलेला आहे. गुहेच्या पुढील भागात कडयाच्या काठाला लागुन लहान मोठे वास्तुंचे चौथरे आहेत. या वास्तुमध्ये मातीने बुजलेले पाण्याचे एक लहान बांधीव टाके आहे.
गुहेचे खोदकाम जमिनीच्या खालील पातळीत केलेले असुन या गुहेत ३० ते ४० माणसे सहज राहु शकतात.

हे अवशेष पाहुन पुढे आल्यावर डावीकडे लिंगाण्याच्या सुळक्याच्या पोटात पाण्याचे एक टाके कोरलेले आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

रायगडच्या दिशेने निमुळते होत गेलेल्या माचीच्या या टोकावर एका रेषेत बांधलेले ४-५ वास्तुंचे अवशेष आहेत. पेशवेकाळात हे ठिकाण जीभीचा पहारा म्हणुन ओळखले जात असे. या भागात लिंगाण्याच्या गिर्दनवाहीचे देव (गडदेवता) श्रीजननी व सोमजाई यांची मंदीरे होती असे वाचनात येते पण आता त्यांचे नेमके स्थान स्पष्ट होत नाही. या देवता सध्या गडाखाली लिंगाणा माचीवर स्थापन करण्यात आल्या आहेत. माचीच्या या भागात तटबंदी तसेच एका बुरुजाचे अवशेष पहायला मिळतात. या माचीवर असलेल्या अवशेषांचे हणमंत बुरुज,पहाऱ्याचा बुरुज, सरकारवाडा, प्रवेशद्वार असे उल्लेख कागदपत्रात येतात पण आज मात्र त्याची स्थाननिश्चिती करता येत नाही. माची पाहुन गुहेत परतल्यावर आपले लिंगाणा दर्शन पुर्ण होते. गुहेतून निघाल्यापासून माची पाहुन परत येण्यास साधारण दीड तास लागतो.
पुढच्या भागात आपण लिंगाण्याच्या सुळक्यावर कशी चढाई केली जाते , त्याचे वर्णन बघुया.

तळटिपः- सर्व प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार

संदर्भः-
१) रायगड जिल्हा गॅझेटीयर
२) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
३) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४) सांगाती सह्याद्रिचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
५) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६) www.durgbharari.com हि वेबसाईट

प्रतिक्रिया

पहिल्या फोटोत जो सुळका आहे त्यावर चढून जायचे? तोच लिंगाणा?

दुर्गविहारी's picture

28 Aug 2020 - 7:58 pm | दुर्गविहारी

बरोबर ! हा सुळका लिंगाण्याचाच आहे.

फोटो छान आणि खूप माहितीपूर्ण लेखन आहे हे राहिलंच. पण हा ट्रेक फार अवघड वाटतोय.

दुर्गविहारी's picture

28 Aug 2020 - 8:00 pm | दुर्गविहारी

धन्यवाद ! फोटो माझे नाहीत. ट्रेक मात्र खुप अवघड आहे.सहसा कोणी लिंगाणा माचीवर जात नाही.बहुतेक जण सुळका चढतात.पुढच्या भागात आपण सुळक्यावर केल्या जाणार्‍या प्रस्तरारोहणाची माहिती घेणार आहोत.

सिरुसेरि's picture

28 Aug 2020 - 9:25 pm | सिरुसेरि

सुरेख माहिती आणी फोटो . "लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला " असे "जैत रे जैत" मधे का म्हणले आहे त्याची हे फोटो बघुन कल्पना आली .

खांबटाकी हा शब्द वाचुन एक शंका अशी -- पुणे - सातारा रोडवरील "खंबाटकी" घाटाचे मुळ नाव "खांबटाकी" घाट असे असेल का ?

दुर्गविहारी's picture

28 Aug 2020 - 9:46 pm | दुर्गविहारी

प्रतिसादाबध्द्दल धन्यवाद ! जैत रे जैतचा संदर्भ कर्नाळ्याशी आह,, लिंगाण्याशी नाही.
बाकी खंबाटकी घाटाच्या नावाची तुम्ही सांगितलेली उत्पत्ती विचार करण्यासारखी आहे.

प्रचेतस's picture

29 Aug 2020 - 9:02 am | प्रचेतस

खंबाटकी घाट हा घाटाच्या वरच्या बाजूस असलेल्या खांबटाक्यांमुळेच ओळखला जातो. खंबाटकी हा नंतर अपभ्रंश झाला.

Bhakti's picture

28 Aug 2020 - 11:30 pm | Bhakti

मस्त लिखाण!वाह!

गणेशा's picture

29 Aug 2020 - 12:16 am | गणेशा

निव्वळ अप्रतिम..
तुमचे लिखान आणि माहिती वाचतच रहावी अशी असते..

प्रचेतस's picture

29 Aug 2020 - 9:01 am | प्रचेतस

जबरदस्त लेख. लिंगाणा सुळका आणि त्याच्या चढाईबद्द्ल बरेच काही वाचलेले आहे पण लिंगाणामाची आणि त्यावरील अवशेषांबाबत अभावानेच काही वाचायला मिळते. तुमच्या लेखनाने ते तपशीलवार अनुभवता आले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Aug 2020 - 9:38 am | ज्ञानोबाचे पैजार

जबरदस्त किल्ला आहे हा, बरीच नवीन माहिती समजली या लेखातून

आमच्या नशिबी हा किल्ला आता पुढच्या जन्मीच घडेल,

पैजारबुवा,

नेहमीप्रमाणेच छान माहीतीपुर्ण लेख!

नीलस्वप्निल's picture

30 Aug 2020 - 3:06 pm | नीलस्वप्निल

फोटो छान