न्यायशास्त्रभ्यासासंबंधी एक प्रश्न.
नमस्कार,
श्री. अमर्त्य सेन ह्यांनी अलिकडेच 'ऐडिआ आफ् जस्टिस्' नामक एक पुस्तक लिहिले आहे. त्यासंबंधीची मराठीभाषिक वृत्तपत्रांतील परीक्षणे अभ्यासतांना एका वृत्तपत्रांत श्री. अमर्त्य ह्यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेचा वृत्तांत वाचनांत आला. ह्या पत्रकार परिषदेमध्ये श्री. अमर्त्यांनी पत्रकारमित्रांस एक प्रश्न केला, आणि त्याची सकारण समर्पक उत्तरे मागविली. त्या प्रश्नासंबंधी चर्चा होणे मला येथे अपेक्षित आहे.
श्री. अमर्त्य ह्यांचा प्रश्न असा :
अ, ब, क ह्या तीन स्वतंत्र व्यक्ती आहेत. ह्या तिघांमध्ये आत्ता ह्या क्षणी काही वाद-तंटा चालू आहे. तो तंटा त्यांच्यासमोर खाली पडलेल्या एका बासरीविषयी आहे.
- अ चे म्हणणे असे आहे : बांबूपासून बासरी कशी तयार करतांत ह्या गोष्टीचे ज्ञान केवळ आणि केवळ मलांच आहे, हे ज्ञान इतरांस नाही. ही बासरी मी स्वत: बनविलेली आहे आणि त्यामुळे ही बासरी मलाच मिळावी. ती इतर कोणासही मिळाल्यास माझ्यावर घोर अन्याय होईल.
- ब चे म्हणणे असे आहे : बासरीचे वादन कसे करतांत ह्या गोष्टीचे ज्ञान केवळ आणि केवळ मलांच आहे. मी सोडून अन्य कोणांसही ती सुमधुररीत्या अथवा कशीही वाजवितां येतच नाही, त्यामुळे ही बासरी मलाच मिळावी. ती इतर कोणासही मिळाल्यास माझ्यावर घोर अन्याय होईल.
- क चे म्हणणे असे आहे : मला माझ्या बालपणापासून कधीही कोणतीही गोष्ट खेळावयांस मिळाली नाही. मला बासरी मिळाल्यास मला तिचा खेळणे म्हणून उपयोग होईल. माझ्याकरिता तिचे अत्यंत महत्त्व आहे, आणि माझ्याशिवाय ते इतर कोणीही जाणू शकत नाही, त्यामुळे ही बासरी मलाच मिळावी. ती इतर कोणासही मिळाल्यास माझ्यावर घोर अन्याय होईल.
चर्चेपूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो ती अशी स्वत: श्री. अमर्त्यांस ह्या प्रश्नाचे उत्तर समाजशास्त्रीय दृष्टीकोणातून देणे अपेक्षित आहे. पूर्वी समाजशास्त्रीय सिद्धांतानुसार विचार करून ते उत्तर न्यायशास्त्राभ्यासाच्या कार्यकक्षेमध्ये बसवावे असे श्री. अमर्त्यांचे मत आहे. ह्या मतांस ग्राह्य धरून त्याअनुषंगाने ह्या प्रश्नाचा विचार करावा. इतर प्रकारे विचार करता येत असल्यास तोही सकारण समर्पक आणि शक्य झाल्यास सोदाहरण मांडावा.
आतां
- वाचकांनी न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरून बासरी कोणास द्यावी हे ठरवावे.
- असे करतांना त्यातल्यात्यांत सर्वमान्य न्याय होणे आवश्यक आहे हे ध्यानांत घ्यावे.
- तिघांनीही आपापली विधाने पुराव्याने सिद्ध केलेली आहेत. तथापि दिलेली माहिती ही सत्य आहे हे समजून न्याय करावा.
- दिलेल्या माहितीव्यतिरिक्त अन्य माहिती नाही हे जाणावे.
- आपण केलेला निर्णय हा न्याय कसा ठरतो ह्याचे सकारण समर्पक आणि शक्य झाल्यास सोदाहरण स्पष्टीकरण थोडक्यात करावे.
- ह्यासर्वांउपर एक गोष्ट ध्यानांत घ्यावी ती अशी की श्री. अमर्त्यांस ह्या प्रश्नाचे उत्तर समाजशास्त्रीय दृष्टीकोणातून देणे अपेक्षित असल्यामुळे अमुक एक उत्तर तेवढेच सत्य आणि इतर सारी उत्तरे असत्य असे कदापि म्हणतां येणार नाही. त्यामुळे इतरांनी दिलेल्या उत्तरांचे शक्यतो खंडन करू नये.
- उत्तरे खरडवही/व्यनि इत्यादिने न देता येथेच द्यावीत.
अवांतर : अन्य एका ठिकाणी हीच चर्चा करू घातली आहे, परंतु येथील वाचकवर्ग अंमळ अधिक असल्याने येथेही तशीच घालतो आहे.
धन्यवाद.
-
प्रतिक्रिया
26 Sep 2009 - 11:53 am | अवलिया
ती बासरी क ला मिळावी.
परंतु ती त्याला वाजवता येत नाही हे समजावुन सांगुन ती ब ला भाड्याने देण्याची सुचना करावी.
ब ने बासरी वादन करुन अ व क चे मन रिझवावे त्याबदल्यात पैसे घ्यावे.
ब ने अ ला त्यातील काही वाटा रायल्टीस्वरुपात द्यावा.
अशा रितीने अ ला त्याच्या ज्ञानाचे पैसे मिळतील, बासरी ऐकण्यासाठी पैसे द्यावे लागतील.
ब ला बासरी वाजवुन पैसे मिळतील, बासरीच्या भाड्याचे पैसे द्यावे लागतील.
क ला बासरीच्या भाड्याचे पैसे मिळतील, बासरी ऐकण्यासाठी पैसे द्यावे लागतील.
जाणकारांनी चुकले असल्यास संभाळुन घ्यावे.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
26 Sep 2009 - 12:28 pm | योगी९००
मा.ज. अवलियाजी, (मा. ज. म्हणजे माननिय जज्जसाहेब असे म्हणायचे आहे मला)
कोठल्या कोर्टात आपण होता..?
खादाडमाऊ
26 Sep 2009 - 5:29 pm | युयुत्सु
न्यायाधीश न्याय देताना कायद्याचा 'अर्थ' लावतात. तसेच काही मार्गदर्शक तत्त्वे वापरतात. त्यांचा इथे उल्लेख नाही. त्यामुळे निवाडा कोणत्या चवकटीत करायचा हे ठरवता येत नाही. असो.
पण माझी भूमिका अशी -
(तयार) बासरीतून संपत्ती फक्त वादन करणारा कलाकार निर्माण करू शकतो. त्यामुळे ती कलाकराकडे गेली तर तो कार्यक्रम करून अधि़क बास-यांसाठी अ कडे मागणी नोंदवू शकेल. 'अ' आणि 'ब'ला पुरेसा व्यवसाय निर्माण झाला तर 'क'चा हट्ट पुरवण्याची क्षमता निर्माण होते.
पण स्वस्थ समाज तिघांच्या गरजा पूर्ण झाल्या तरच निर्माण होतो.
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
------
26 Sep 2009 - 12:27 pm | अवलिया
तिथे पाहिले. याक्षणापर्यत तरी अजुन काही प्रतिसाद नाही.
यापुढे इथेच लिहित चला. कसे ?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
26 Sep 2009 - 12:19 pm | मराठमोळा
बासरी "अ" व्यक्तीला मिळावी.
जर ती वस्तू त्याने स्वतः बनविली आहे त्याच्या मालकीची आहे तर मग दुसरा कुणी त्यावर कसा हक्क दाखवु शकतो? जर दुसर्या कुणाला ती बासरी हवी असेल तर त्याची किंमत "अ" ला द्यावी. जुन्या काळची बारा बलुतेदार पद्धती अशीच निर्माण झाली होती.
"क" ने एखाद्या सामाजिक संघटनेकडे जावे व बासरीचा हट्ट धरावा. व्यवहारात फुकट काही मिळत नसते, कितीही गरज असली तरी.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
26 Sep 2009 - 12:22 pm | युयुत्सु
अ ने ती बनवली असे प्लेन विधान करून ती बासरी त्याने बनवली हे सिद्ध होत नाही. ती बासरी त्याच्या कडे होती याचा कोणताही पुरावा त्याने अ ने दिलेला नाही.
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
------
26 Sep 2009 - 12:29 pm | मराठमोळा
युयुत्सु राव,
तुम्ही धागा पुर्णपणे वाचलेला दिसत नाही.
तिघांनीही आपापली विधाने पुराव्याने सिद्ध केलेली आहेत. तथापि दिलेली माहिती ही सत्य आहे हे समजून न्याय करावा.
दिलेल्या माहितीव्यतिरिक्त अन्य माहिती नाही हे जाणावे.
हे डिस्क्लेमर आहे.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
26 Sep 2009 - 12:35 pm | पार्टनर
तंटा त्यांच्यासमोर खाली पडलेल्या एका बासरीविषयी आहे.
१. 'अ' ला बासरी बनवण्याचं ज्ञान असेलही, पण त्याने हे सिद्ध होत नाही की "ती" बासरी त्याने बनवलेली आहे. सबब त्याचा त्या बासरीवरचा अधिकार शून्य.
( ज्ञान आहे ना, मग "त्या"च बासरीबद्दल हट्ट कशाकरता ? )
२. 'ब' या व्यक्तीला वरील माहितीवरून सर्वात जास्त "सामाजिक" उपयोग आहे. त्याचा 'क' या व्यक्तीला बालपणापासून कधीही कोणतीही गोष्ट खेळावयांस मिळाली नाही, या (खर्या (?)) गोष्टीशी संबंध नाही.
३. समजा मिळालीच, तरी 'क' ही व्यक्ती त्याचा किती वेळ सदुपयोग ( किंवा सामाजिक उपयोग ) करू शकेल ? खेळणे ही त्याची "वैयक्तिक" गरज नाही का ?
बासरी च्या मालकी बद्दल : ती सरकारच्या मालकीची असावी. :)
बासरी च्या वापरा बद्दल : ती 'ब' ला मिळावी. वर अवलियांनी म्हटल्याप्रमाणे 'ब' ने तिचा वापर भाडे तत्त्वावर करून सरकारला उत्पन्ना चा काही भाग द्यावा.
बांधिलकी वगैरे ( गरज असेलच अगदी, तर ) :
'ब' च्या उत्पन्नातील रकमेतून सरकारने 'अ' ला बासरी बनवण्याचा छोटा धंदा उभारायला मदत द्यावी. 'क' ने 'अ' ला बनवण्याच्या कामात मोबदला घेऊन मदत
करावी. आणि त्याच पैशांत स्वतःची खेळणी विकत घ्यावीत. 'ब' ने सल्लागार म्हणून गरज पडेल तेव्हा त्यांना मदत करावी.
बाकी 'क' ला मोठा व्हायची गरज आहे.
-- 'क'
26 Sep 2009 - 5:26 pm | युयुत्सु
अ ची पुराव्यानीशी सिद्ध केलेली विधाने अशी
१. बांबूपासून बासरी कशी तयार करतांत ह्या गोष्टीचे ज्ञान केवळ आणि केवळ मलांच आहे, हे ज्ञान इतरांस नाही.
२. ही बासरी मी स्वत: बनविलेली आहे आणि त्यामुळे ही बासरी मलाच मिळावी.
३. ती इतर कोणासही मिळाल्यास माझ्यावर घोर अन्याय होईल.
या विधानातून बासरी अ ने बनविली हे सिद्ध होईल पण ती त्याच्या possession मध्ये होती आणि त्याने ती कुणालाही विकली नव्हती किंवा भेट दिली नव्हती हे सिद्ध होत नाही.
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
------
26 Sep 2009 - 12:53 pm | पार्टनर
एक करता येईल, 'क' ने मध्यस्ती करून 'अ' ची बासरी 'ब' ला विकावी आणि दोघांकडून या कामाचे थोडे पैसे घ्यावेत.
:)
26 Sep 2009 - 3:55 pm | हैयो हैयैयो
मूळ प्रश्न.
अनेक मान्यवर सदस्यांनी अर्थकारणामुळे प्रश्न सुटेल असे सुचविले आहे, तथापि अर्थकारणांस मध्ये आणल्यांस मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होण्याचा धोका आहे. अर्थात ही सुचविलेली उत्तरे सर्वथा चुकीची आहेत असे सर्वस्वी म्हणतां येणार नाही कारण मुळात स्वतः श्री. अमर्त्य ह्यांचे ह्याविषयीचे मत आपणांस ठावूक नाही.
तरीही येथील मान्यवरांनी सुचविलेली उत्तरे पाहता न्याय कसा होतो ह्याचे आकलन होत नाही.
बासरी हारविली होती असे प्रश्नांत स्पष्ट केलेले नाही त्यामुळे ती हारविली नाही असे गृहित धरणे आवश्यक आहे. ही बासरी पूर्वी कोणाच्या ताब्यात होती आणि त्याने तिचे काय केले / काय करावयास हवे होते / काय करावे ह्याविषयीचा विचार अपेक्षित नाही. कोणी कशाचा काय उपयोग करावा हे न्यायाधीशाकडून सुचविले जाणे सर्वथा अपेक्षित नाही.
मूळ प्रश्न न्याय कसा करता येईल हा आहे.
धन्यवाद.
हैयो हैयैयो!
26 Sep 2009 - 5:24 pm | युयुत्सु
न्याय करणे यात तुम्हाला काय अभिप्रेत आहे? '"न्याय" ही कल्पना एक myth आहे असे मी कुठेतरी वाचल्याचे स्मरते. बासरीच्या मालकीचा/ताब्याचा वाद मिटवणे या भूमिकेतून वरील पर्याय सूचविले आहेत.
यात आणखी एक पर्याय सूचविता येतो. अ, ब, आणि क यांनी एकत्र बसून तोडगा काढणे. तो न निघाल्यास वर सूचविलेला पर्याय आहेच.
बासरी हरवली नसली तरी ती योग्य व्यक्ती कडे जाण्यासाठी बासरीची उपयुक्तता अधिक कुणाला याचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे.
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
------
26 Sep 2009 - 7:44 pm | हैयो हैयैयो
येथील प्रश्नासंदर्भात
येथील प्रश्नासंदर्भामध्ये अशा निर्णयास न्याय म्हणता येईल, जो निर्णय अ ब क ह्या तिघांसही जसाच्या तसा मान्य होईल. अर्थात, दिलेल्या परिस्थितीमध्ये बासरीची मालकी/ताबा हा कोणा एका व्यक्तिकडेच राहणार. तरीही तो निर्णय तिघांस जसाच्या तसा मान्य व्हावयास हवा.
ह्यासह, आपण दिलेल्या निर्णयानुसार 'न्याय कसा होतो' हे आपण स्पष्ट करणे अपेक्षित आहे, ते आपण केलेले आहेच.
धन्यवाद.
- हैयो हैयैयो!
26 Sep 2009 - 3:53 pm | पर्नल नेने मराठे
ब ला ति बासरी मिळावी कारण तिला तयार जरी अ ने केले असले तरी तिचा उपयोग फक्त ब च नीट करु शकतो.
क आणी अ ने फक्त श्रोतेगिरी करावी.
चुचु
26 Sep 2009 - 6:56 pm | वेताळ
सर्व प्रथम वेळुच्या बनाच्या मालकाचा शोध घ्यावा.त्याच्या परवानगी शिवाय वेळु तोडुन त्याची बासरी बनवल्याबद्दल अ ला तुरुंगाची हवा खायला पाठवावे.
तसेच ब आपली कला दुसर्याला न शिकवता त्याची मक्तेदारी निर्माण करत असल्याबद्दल त्याला कायद्याने काही शिक्षा होते का बघितले पाहिजे.
राहिला क त्याने सापडलेली बासरी सरकार जमा न करता जवळ बाळगल्या बद्दल अ च्या सोबत तुरुंगात पाठवावे. व ती बासरी सरकार दरबारी जमा करावी.
वेताळ
26 Sep 2009 - 10:01 pm | अविनाशकुलकर्णी
अ ने त्याला ज्ञान असल्याने २ नविन बास~या तयार कराव्यात.....त्या पैकि एक ब ला देवुन म्हणावे बस वाजवत.....व दुसरी क ला देवुन म्हणावे बस खेळत...
26 Sep 2009 - 10:11 pm | नितिन थत्ते
बासरीचे तीन (उभे) तुकडे करून तिघांना वाटावे. म्हणजे ती तिघांनाही सारखीच निरुपयोगी असेल. (तरी क चा यात थोडा फायदा आहे. कारण त्याच्यासाठी ती आख्खी बासरी हे ही एक खेळणेच होते. त्या एक तृतीयांश तुकड्याचा त्याला खेळणे म्हणून उपयोग होईलच). =))
असो. गंमत सोडून द्या. तिघांना मान्य होईल असा न्याय करणे अवघडच आहे.
गीता कामाला येईल. :?
बासरी ब ला द्यावी. <:P
अ ला सांगावे, कर्म करणे (बासरी बनवणे) इतकाच तुझा अधिकार. फळाची आशा (बासरी वापरायला मिळेल) करू नको. >:P
क ला सांगावे. प्रत्येकाचे भोग हे त्याच्या (पूर्वजन्मातील) कर्मांचा परिपाक असल्याने तुझ्या पूर्वजन्मातील कर्मांमुळे तुला ती बासरी (किंवा कुठलेच खेळणे) मिळत नाही. :(
गीतेचा दाखला दिल्यावर बहुधा अ आणि क ते मान्य करतील. ब चा प्रश्नच नाही कारण बासरी त्याला मिळालीच आहे.
=D>
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
27 Sep 2009 - 12:52 pm | हैयो हैयैयो
होय.
हा सामाजिक न्यायाशी संबंधित असा प्रश्न आहे. अनेक सुज्ञ वाचकांनी असेच मत नोंदविले आहे. खरे पाहतां, श्री. अमर्त्यांनी हे उदाहरण एक उपमाअलंकार ह्या अर्थाने वापरले आहे. त्यांच्या मताप्रमाणे, कोणत्याही सामाजि़क प्रश्नामागची मूळ पार्श्वभूमि अशी क्लिष्ट असते. उदाहरणार्थ :
हे एक उदाहरण हे केवळ सुज्ञ वाचकांस श्री. अमर्त्यांचा मूळ प्रश्न अधिक सोप्यारीतिने कळावा म्हणून घेतले आहे. अशी अनेक उदाहरणे ह्यात बसविता येतील.
तर, मूळ प्रश्नांविषयी विस्तारीत दृष्टीकोनातून चर्चा व्हावी. मूळ प्रश्न न्याय कसा करता येईल हा आहे.
धन्यवाद.
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
28 Sep 2009 - 12:35 am | प्रभाकर पेठकर
मुळ समस्येतील बासरी खाली पडलेली आहे.
'मुंबई' तशी खाली (पक्षी: रस्त्यात) पडलेली नाही.
बासरी 'अ'ने तयार केली आहे.
मुंबई कोणी एकाने (अगदी राज ठाकरेंनीही) तयार केलेली नाही.
'क'ला बासरी 'खेळणे' म्हणून पाहिजे आहे.
अन्य भाषिकांना (किंवा कोणालाही) मुंबई 'खेळणे' म्हणून देता येणार नाही.
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
28 Sep 2009 - 7:59 am | विसोबा खेचर
पेठकरांशी सहमत..
तात्या चौरसिया.
27 Sep 2009 - 2:34 pm | सुनिल पाटकर
अ बासरिचा मालक असल्याने बासरीवर त्याच हक्क रहील. ब व क ला बासरीची गरज आहे. बासरी वाद्य असल्याने ते वाजवू शकणार्या ब ला
त्याचे खरे महत्व कळू शकेल.बासरी हे खेळणे नाही याची जाणीव क ला करुन द्यावी .अ -मालक राहील .ब्-वापरकर्ता राहील ,क- वापरुन झाल्यावर क ला खेळायला द्यावी.
27 Sep 2009 - 3:32 pm | ऋषिकेश
माझ्या न्यायालयाला या बाबतीत बहुदा "निकाल" देता येईल.. मात्र "न्याय" होईल की नाहि हे सांगणे अवघड आहे.
निकाल १:
गृहितक: जर ती बासरी एकमेव आहे. दुसरी तशी बासरी बनविता येणे अशक्य आहे (कारण ती पुन्हा निर्माण करण्यासारखी सामग्री अस्तित्वातच नाहि वगैरे)
निकालः त्या बासरीवर "अ" चा पहिला अधिकार असावा असे वाटते. कारण ती बासरी गेल्यावर "अ" कडे काहिच रहात नाहि. त्यालाच जर ती विकायची असेल / वापरायला / खेळायला कायमची / तात्पुरती/ भाड्याने द्यायची असेल तर तो त्याचा निर्णय असावा.
निकाल २:
गृहितकः बासरी पुनःपुन्हा बनविता येऊ शकते
निकालः बासरीवर ब चा अधिकार असावा. कारण अ ती/तशी बासरी पुन्हा करू शकत असेल तर तो स्वतःसाठी बासरी करून घेऊ शकेल. ब ला मात्र स्वतः बासरी बनविता येत नसल्याने मात्र ती वाजविण्याचे ज्ञान असल्याने ती ब ला देणे योग्य वाटते
निकाल३:
गृहितकः बासरी पुनःपुन्हा बनविता येऊ शकते
निकालः बासरीवर ब चा अधिकार राहिले (कारण वरील प्रमाणे). मात्र अ ने बनविलेली पुढील बासरी ब ने विकत घेऊन क ला भेट देणे अनिवार्य आहे. शिवाय क ला एकदाच ही भेट मिळेल. ही भेट मिळाल्यावर त्या बासरीचा अभ्यास करून ती बनवायला / वाजवायला शिकवणे ही त्या क ची जबाबदारी
या तीन निकालांसाठी उदाहरणे द्यायची तर निकाल १ भारताच्या बासमतीवरील हक्काला दिला गेला. निकाल २ आपण एखाद्या गरीब/गुणवान विद्यार्थ्याला किंवा एखाद्या गुणवान आपद्ग्रस्ताला आर्थिक(किंवा इतर) मदत करताना करतो आणि निकाल ३ अमेरिकेत आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तींच्या आरक्षणावेळी केला गेला होता.
ऋषिकेश
------------------
दूपारची ३ वाजून २९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "ये अंधाऽऽऽ कानूऽन है...."
27 Sep 2009 - 6:55 pm | चेतन
अगदी मनातलं लिहलसं
यावर जर वेगळि तुलना केली तर कदाचित उत्तर सोपं होइलं
बासरी: भारत
अ = भारतीय नागरीक
ब =अंतरराष्ट्रीय कंपन्या
क = बांग्लादेशी घुसखोर
हे एक उदाहरण कदाचीत सुज्ञ वाचकांस सुज्ञ उत्तर सुचवेलं. (कारण बासरी आणि मुंबई मध्ये खुपच फरक आहे)
चेतन
27 Sep 2009 - 11:07 pm | हरकाम्या
चेतनभाउ तुझा तर्क एकदम रास्त आहे. आपण त्याच्याशी १००
टक्के सहमत.
28 Sep 2009 - 2:41 am | विकास
उपक्रमावर दिलेले उत्तर तसेच येथे चिकटवतो:
चांगला चर्चा प्रस्ताव...
येथे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्तर अपेक्षित असल्याने एका अर्थी तीन उत्तरे ढोबळमानाने देता येतीलः
1. जर भांडवलवादी विचारसरणी असेल तरः तत्वतः "अ" जेंव्हा बासरी तयार करतो तेंव्हा त्याला ती विकणे अपेक्षित असते. अर्थात त्याला ज्याच्याकडून पैसे मिळतील त्याला तो विकेल. या अर्थी त्याचा जास्त अधिकार आहे.
2. जर साम्यवादी विचारसरणी असेल तरः तत्वतः "अ" आणि "ब" हे "आहेरे" मधले असून "क" हा "नाहीरे" प्रकारात मोडतो. म्हणून ती बासरी जप्त करून "क" ला देण्यात येईल.
3. जर समाजवादी विचारसरणी असेल तर" तत्वतः बासरी सगळ्यांमधे वाटली पाहीजे. अर्थात न्यायाधिश (अर्थात सरकार) ती बासरी स्वतःकडेच ठेवून कुणाला कधी त्याची गरज आहे हे ठरवणार आणि तेंव्हा सरकारला जसे योग्य वाटेल तसे ते देणार.
आता यात अजून एक प्रश्न येतो ज्याचे उत्तर हे सेन यांनी त्यांच्या प्रश्नात दिलेले दिसत नाही: "अ" ने बांबू वापरला तो कुणाकडून? स्वतःचे बांबूचे बन आहे, की कुणाकडून विकत घेऊन का कुणाकडून तसाच घेऊन. यातील दुसर्या/तिसर्या शक्यतेमधे अजून एक गोम आहे, त्या बांबूचे स्थानीक लोकांसाठी काही जिवनावश्यक उपयोग होते का ज्यांच्यावर बासरी करण्यामुळे कमी पडून एका अर्थी राहणीमानावर परीणाम झाला आहे. तसे असल्यास त्या बासरीचे आता काय करायचे?
थोडे वेगळे उदाहरण दोन आठवड्यांपुर्वीच ऐकले होते (थोडेफार चर्चेसाठी विस्तार करून, पण मूळ गाभा तसाच): (मला वाटते) चांदा/भंडारा भागातील वनविभागातील स्थानीक जमातींना पोटाचे तसेच इतर अनेक रोग होऊ लागले आणि त्याचे परीणाम संपुर्ण जमातींवर होऊ लागले. अर्थात त्यांना औषधे देण्याची गरज आहे. मात्र त्यांच्याकडे पैसे नाहीत. मग व्यवस्था कशी करायची? बरं औषधांच्या कंपन्यांनी स्वस्तात अथवा मोफत औषधे का वाटायची? सरकारने करदात्यांचे पैसे का वापरायचे? वगैरे प्रश्न पडतात... पण आता उलट विचार केल्यावर असे देखील समजते की या समाजात नैसर्गिक राहत असताना असे विकार कमी होते. पण जंगलतोड, जमिनीची धूप वगैरे (जी या लोकांनी केली नाही), त्यांचे राहणीमानावर अनावश्यक परीणाम होऊ लागले आहेत. मग यांना सामाजीक न्याय कसा मिळणार?
पर्यावरण व्यवस्थापनशास्त्रात, पर्यावरणीय न्याय (environmental justice) हा एक वापरातील शब्द आहे. बर्याचदा प्रदुषण करणार्या कारखान्यांपासून ते कचराडेपो पर्यंतच्या गोष्टी या अमेरिकेसारख्या नेहमी गरीब आणि वर्ण आणि वंशाने अल्पसंख्य असलेल्या वस्त्यांमधे होतात. त्यामुळे तेथे अनेक सामाजीक प्रश्न तयार होतात. म्हणून समतोल समाजव्यवस्था तयार करून कुणावरच अन्याय कसा होणार नाही या संबधात या विषयाखाली विचार केला जातो. आता मॅसॅच्युसेट्स राज्यात या वर (नुसते) धोरण आहे (कायदा नाही). त्याप्रमाणे, (इतर अनेक निकषांप्रमाणे) जेथे अल्पसंख्य एका विशिष्ठ टक्केवारीपेक्षा जास्त असतील त्या भागाला पर्यावर्णीय अन्याय असलेला भाग म्हणून घोषित करून विशेष अनुदान (पर्यावरणीय भागात( देण्याची सोय केली आहे. आता यात गंमत अशी आहे की, वेस्टन नावाचे एक गाव येथील सर्वात श्रीमंतांचे गाव आहे. मोठमोठे बंगले आणि देखणा निसर्ग...पण तेथे अनेक चिनी आणि भारतीय उद्योजकपण रहात असल्याने या भागाला पण पर्यावरणीय अन्याय असलेला विभाग म्हणून जाहीर केले गेले आणि तो इतर विभागांशी स्पर्धा करायला मोकळा केला. अर्थात सरकारकडे पैसेच नसल्याने कुणालाच काही मिळाले नाही हा प्रश्न वेगळा! पण सामाजीक न्याय हा प्रकार कधीच सर्वव्यापी असू शकत नाही याचे हे एक उदाहरण आहे असे म्हणावेसे वाटते....
28 Sep 2009 - 6:47 am | धनंजय
(उपक्रम संकेतस्थळावर लिहिलेला प्रतिसाद येथे चिकटवत आहे.)
अमर्त्य सेन यांच्या पुस्तकाबद्दल परीक्षण मागे वाचले होते. तेव्हा सामाजिक न्यायाबद्दल मूलभूत सिद्धांत किंवा गृहीतके आहेत का? या प्रश्नाच्या शोधात हे कोडे त्यांनी स्वतःला, आणि वाचकांना, घालून घेतले होते.
मला वाटते, की यातले निष्कर्ष थोडेफार पूर्व-आशियाई बौद्धांच्या "कोआन" कोड्यांसारखे आहेत. उत्तर असे आहे, की उत्तर नाही. मानवांना वेगवेगळी मूल्ये प्रिय असतात. पण कधीकधी मूल्ये एकमेकांशी सुसंगत नसतात. त्यामुळे सामाजिक न्यायाच्या बाबतीत "मूलभूत तत्त्वे" अशी चरमार्थाने काढता येत नाहीत.
समाजाच्या साधनसंपत्तीचा उपभोग कोणी घ्यावा? हा शतकानुशतके चर्चिलेला, भांडलेला, रक्त सांडलेला प्रश्न आहे. मात्र जोवर आपल्याला वाटते, की प्रश्न मूलभूत हक्काचा निर्णय केला तर "न्याय्य दृष्टिकोनातून" सुटणार आहे, तोवर आपले प्रयत्न एका मृगजळाकडे जात आहेत.
जेव्हा आपल्याला उमगेल की आपली मूल्ये एकमेकांशी सुसंगत नाहीत, तेव्हा आपल्याला जाणवेल की समास्या केवळ तडजोडीनेच सुटेल. प्रत्येक मूल्य जमेल तितके जपायचे, अन्य मूल्यावर कमीतकमी कुरघोडी करावी. इतपत तडजोड जमत असेल, तर ते समस्येचे व्यवहार्य समाधान होय.
श्री हैयो हैयय्यो यांनी एक राजकीय उदाहरण दिलेलेच आहे. अन्य प्रसिद्ध उदाहरण "कसेल त्याची जमीन" वादाचे आहे.
१. 'अ' जमीनदार सांगतो की पूर्वापारपासून मशागत करून योग्य व्यवस्थापन करून त्याच्या वंशाने जमीन कसण्यालायक केली/राखली आहे. जमीन-व्यवस्थापनाची कागदपत्रे, शेकडो वर्षांपूर्वीचा ताम्रपट त्याच्या कुटुंबात पुरावा म्हणून आहे.
२. 'ब' कूळ (शेतकरी) म्हणतो, की आज जमीन कसायचे ज्ञान त्याच्याकडेच आहे. त्याची उत्तम कामगिरी शेतात पिकणार्या धान्यात दिसते - तो पुरावा.
३. 'क' हा पारधी गेल्या कित्येक पिढ्या वणवण भटकणार्या जातीतला आहे. कसायला जमीन नाही, आणि बहुतेक जंगले संपल्यामुळे, उरलेली अभयारण्ये झाल्यामुळे शिकारही करता येत नाही. याचेही पुरावे आहेत. तो म्हणतो आता समाजाने काहीही करून त्याला कसण्यालायक जमीन द्यायला पाहिजे. (उगाच खडकाळ नापीक जमिनीच्या भूदानाने काही समाधान होणार नाही.)
'अ'ला सर्वाधिकार देणारी राज्ये (उदाहरणार्थ पाकिस्तान) गेल्या शतकात "न्याय्य" म्हणून फारशी लौकिक पावलेली नाहीत. कुळांवर काहीतरी अन्याय होतो आहे, अनेक लोक खितपत पडले आहेत, असे राहूनराहून खूप लोकांना वाटते.
'ब'ला सर्वाधिकार देणारी राज्ये - यात काही साम्यवादी देश आलेत. यांच्यातही जमीनदाराकडून जमिनी काढून घेण्यात काही जुलूम झाला, अन्याय झाला, असे कित्येकांना वाटते.
'क'ला "सर्व"-अधिकार देणारी आजवर कुठलीच राज्ये नाहीत. पण फ्रेंच राज्यक्रांती अशी होती - असंस्कृत नंग्या/भिकार्यांचा दंगा होता - अशी वर्णने त्या क्रांतीच्या विरोधकांकडून ऐकायला मिळते. या वर्णनांमध्ये अन्याय झाल्याची भावना सांगितली जाते.
अशा प्रकारे या तीन्हीपैकी कुठलेही तत्त्व पूर्ण समाजाच्या "न्याय"व्यवस्थेसाठी सर्वमान्य होणारे नाही. बहुसंखांनी मान्य केलेल्या तडजोडीतच काही व्यवहार्य शक्यता आहे.
(श्री. हैयो हैयय्यो समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यास सांगतात - वरील प्रतिसाद त्यांना अपेक्षित समाजशास्त्रीय चर्चा आहे काय?)
(विकास वर म्हणतात की साम्यवादी मतानुसार बासरी 'क'ला दिली जाईल कारण 'क' "नाहीरे" आहे. असे बहुधा नसावे - "विळा चालवणार्या शेतकर्याला जमीन आणि हतोडा वापरणार्या कामगाराला कारखाने" असे काही साम्यवादी तत्त्व असावे - म्हणजे 'ब'ला बासरी देणे. काम न करणार्या व्यक्तीला बहुधा साम्यवादात काहीच स्थान नाही - त्यांना सक्तीने काम करायला लावले जाते, अशी काही साम्यवादी सरकारांबद्दल कुप्रसिद्धी होती. 'क'ला - केवळ कौशल्य नसलेल्या नाहीरेंना - मालमत्ता देणारे कुठलेही अर्थतंत्र नसावे. म्हणून माझ्या प्रतिसादात "फ्रेंच राज्यक्रांतीच्या विरोधकांच्या मते फ्रेंच राज्यक्रांतीचे तत्त्व" असे उदाहरण दिलेले आहे.)
28 Sep 2009 - 4:01 pm | युयुत्सु
कूळवाड्याच्या जागी जर बिल्डर आला तर बरेच गंभीर प्रश्न निर्माण होतात.
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
------
28 Sep 2009 - 7:26 am | सुनील
एक अत्यंत अभ्यासू चर्चा वाचल्याचे समाधान मिळाले.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Sep 2009 - 8:07 am | विसोबा खेचर
आमचं उत्तर -
गृहितक - १) 'तिघांनीही आपापली विधाने पुराव्याने सिद्ध केलेली आहेत. तथापि दिलेली माहिती ही सत्य आहे हे समजून न्याय करावा.'
गृहितक - २) तूर्तास ती बासरी रस्त्यावर वा अन्य सार्वजनिक ठिकाणी बेवारस पडली आहे.
वादी अ -
अ चे म्हणणे असे आहे : बांबूपासून बासरी कशी तयार करतांत ह्या गोष्टीचे ज्ञान केवळ आणि केवळ मलांच आहे, हे ज्ञान इतरांस नाही. ही बासरी मी स्वत: बनविलेली आहे
न्यायमूर्तींचा युक्तिवाद -
मग स्वत: बनवलेली ती बासरी अ ने स्वत:कडेच का नाही ठेवली? अ ने जी वस्तू स्वत: बनवली आहे तिचा नीट सांभाळ करण्याची जबाबदारी अ चीच नाही का? अ ने जर स्वत: बनवलेल्या वस्तूचा ताबा स्वत:कडेच ठेवला असता तर ती बासरी अशी बेवारश्यासारखी पडलीच नसती आणि हा प्रश्नच उद्भवला नसता. बरं, अ ने स्वत: तयार केलेली बासरी गहाळ झाल्याबद्दलची वा कुणी चोरल्याबद्दलची तक्रारही केलेली नाही/तशी कुठलीही माहिती न्यायालयापाशी नाही.
उप-न्यायनिवाडा १ - वरील युक्तिवादानुसार बासरीचा ताबा आता अ कडे देण्यात येणार नाही..
वादी क -
क चे म्हणणे असे आहे : मला माझ्या बालपणापासून कधीही कोणतीही गोष्ट खेळावयांस मिळाली नाही.
न्यायमूर्तींचे खंडन - बर्याच जणांना त्यांच्या बालपणापासून सर्वच किंवा बर्याच गोष्टी खेळावयांस मिळत नाहीत/मिळतातच असे नाही. सबब, वादी क ला त्याच्या बालपणापासून कधीही कोणतीही गोष्ट खेळावयांस मिळाली नाही याला अ आणि ब चा काहीही इलाज नाही/ अ आणि ब कडे याचे उत्तरदायित्व जात नाही..
उप-न्यायनिवाडा २ - वरील खंडनानुसार क कडे बासरीचा ताबा जाऊ शकत नाही..
वादी ब -
ब चे म्हणणे असे आहे : मी सोडून अन्य कोणांसही ती सुमधुररीत्या अथवा कशीही वाजवितां येतच नाही.
न्यायमूर्तींचा युक्तिवाद -
ब ला जी बासरी वाजवता येते ती बासरी फक्त अ लाच तयार करता येते. याचा अर्थ अ ने तयार केलेली बासरी ब च्या हाती एकदा तरी आलीच असणार. आता प्रश्न असा आहे की,
अ ने तयार केलेली बासरी ही ब च्या हातात कशी आली?
ती अ ने ब ला फक्त वाजवायला दिली? फुकट देऊन टाकली? विकत दिली? की ब ने ती अ कडून चोरली आणि नंतर ब च्या हातूनही ती गहाळ झाली आणि बेवासररित्या रस्त्यावर आली? आणि वाजवण्याकरता म्हणून हाती आलेली बासरी ब ने स्वत:कडेच का नाही ठेवली? पुन्हा त्या बासरीची बेवारस स्थिती कशी झाली?
याची प्रश्नांची उत्तरे न्यायालयास माहीत नाहीत. तूर्तास तरी ती बासरी बनवणार्याच्या म्हणजे अ च्याही ताब्यात नाही, आणि वाजवणार्याच्या म्हणजे ब च्याही ताब्यात नसून बेवारस पडली आहे ही वस्तुस्थिती आहे.
अंतीम न्यायनिवाडा -
वरील उप न्यायनिवाड्यांनुसार बासरीचा ताबा अ, ब, क यापैकी कुणाकडेच देता येणार नाही असा न्यायनिवाडा हे न्यायलय करत आहे.
आपला,
न्यायमूर्ती तात्या अभ्यंकर.
28 Sep 2009 - 8:40 am | JAGOMOHANPYARE
डोळ्यासमोर भिकबाळे चमकले !
:)
28 Sep 2009 - 11:01 am | मिसळभोक्ता
बासरीचा आकार आणि हवेशीरपणा बघता, कुणालाही देऊ नये.
काय करतील तिचे कुणास ठाऊक...
- (कर्स्टन प्रभूं चा शिष्य)
-- मिसळभोक्ता
28 Sep 2009 - 8:44 pm | हैयो हैयैयो
न्याय आणि अन्याय
श्री. धनंजयांनी म्हटल्याप्रमाणे, सामाजिक न्यायासंबंधी काही मूलभूत सिद्धांत किंवा गृहीतक असतांत का, असल्यास ती काय असावीत ह्या विचारांतून श्री. अमर्त्यांचा मूळ प्रश्न सिद्ध झालेला आहे. श्री. अमर्त्यांनी आक्स्फर्ड् येथे दिलेल्या व्याख्यानामध्येसुद्धा हा प्रश्न मांडून विधीक्षेत्रातील जाणकार लोकांची भली भंबेरी उडविली होती. ह्या प्रश्नावर चर्चा करतांना अनेक न्यायशास्त्राभ्यासकांनी आणि इतर समाजशास्त्राभ्यासकांनी ’तिघांना मान्य होईल असा न्याय करणे केवळ अशक्य आहे’. असाच निर्णय केला आहे. वास्तविक पाहता, ह्या प्रश्नांतील प्रत्येक व्यक्ति अमुक वस्तुवरील आपापले हक्क सिद्ध करण्यांत यशस्वी झालेली आहेत असे एका अर्थाने म्हणतां येत असूनदेखील त्या वस्तुवरील स्वामित्त्व कोणाचे हा वाद सोडविण्यात अनेक विधीअभ्यासकांनी असामर्थ्य व्यक्त केले आहे. आपल्या येथील अनेक सुज्ञ वाचकांचा निर्णयही ह्या निर्णयाशी जुळतो.
मुदलांत न्याय ह्या संकल्पनेस अनेक कंगोरे आहेत. व्यक्ति-स्थल-काल-संस्कृती-वर्तमान इत्यादि परत्वे न्यायनिर्णयात अंतर पडते. परंतु; ’न्याय’ हा केवळ मताधिक्यावर ठरत नसून, तो ज्यांच्यावर व्हावा त्यांच्या भविष्यावर तो काही विधायक परिणाम करतो की नाही किंवा कसे, आणि त्यांचे समस्यासमाधान करतो की नाही किंवा कसे ह्यावर मुख्यत्त्वेंकरून ठरतो ह्या मुद्द्यावर मात्र सर्वत्र एकमत आहे. न्यायशास्त्र हे नीतिशास्त्रापेक्षा सर्वस्वी भिन्न असल्याचे श्री. अमर्त्यांचे शास्त्राधारीत मत आहे. स्वतःची तत्त्वें ते ’न्याय’ ह्या संकल्पनेस गृहित धरून सिद्ध करतांत. येथील प्रश्नासंदर्भामध्ये अशा निर्णयास न्याय म्हणता येईल, जो निर्णय अ ब क ह्या तिघांसही जसाच्या तसा मान्य होईल. अर्थात, दिलेल्या परिस्थितीमध्ये बासरीची मालकी/ताबा हा कोण्या एका व्यक्तिकडेच राहणार. तरीही तो निर्णय तिघांस जसाच्या तसा मान्य व्हावयास हवा.
’सामाजिक न्याय’ म्हणजे नेमके काय, आणि तो असतो किंवा नाही किंवा कसे ह्या प्रश्नाच्या अभ्यासार्थ समाजशास्त्राच्या दृष्टीकोनांतून विचार करणे आवश्यक आहे असे श्री. अमर्त्य म्हणतांत, आणि ते रास्त आहे. ह्याचे कारण असे, मुळांत ते ’सामाजिक न्याय’ ह्या विषयावर बोलत आहेत, आणि दुसरे कारण असे की ज्या विधीज्ञांसमोर ते हा विचार मांडू पाहत आहेत त्यांतील बहुतांश विधीज्ञ हे 'संपूर्ण व्यक्तिवादा'चे पुरस्कर्ते आहेत. व्यक्तिवादानुसरणी न्यायव्यवस्थेमध्ये सहसा ’तुम्हाला न्याय मिळवून देवू’ असे न म्हणतां ’तुम्हाला जो अपेक्षित आहे, तसा निर्णय करवून घेण्याचा सर्वतोपरि प्रयत्न करूं’ असे सररास म्हणणे भाग पडते; त्यामुळे ज्या बाजूचा युक्तिवाद उत्कृष्ट पद्धतीने मांडला जावू शकतो, त्याचीच सरसी होते. ह्या सर्व भांगडीत स्वत: न्याय हा मोकळाच राहतो असे श्री. अमर्त्यांचे रास्त निरिक्षण आहे. ते टाळण्यासाठी आणि ’सामाजिक न्याय’ म्हणजे काय ह्याविषयी अभ्यास करण्यासाठी त्यांनी समाजशास्त्राचा दृष्टीकोन अंगिकारण्याचे सुचविले आहे. असो.
माझ्या मते, सर्व विश्लेषणांत श्री. धनंजय ह्यांचे विश्लेषण हे विशेष उल्लेखनीय ठरेल. ज्यांवर आपल्या श्रद्धा आहेत अशी मूल्ये एकमेकांशी सुसंगत नसल्यास त्या मूल्यांच्या परस्परविरोधामुळे निर्माण होणार्या समस्या ह्या केवळ तडजोडीनेच सुटतील असे त्यांचे निरिक्षण आहे. ते म्हणतांत, प्रत्येक मूल्य जमेल तितके जपावे, अन्य मूल्यावर कमीतकमी कुरघोडी करावी. इतपत तडजोड जमत असेल तर ते समस्येचे व्यवहार्य समाधान होय. त्यांच्यासारखेच मत श्री. युयुत्सु सरांचे आहे. ’स्वस्थ समाज तिघांच्या गरजा पूर्ण झाल्या तरच निर्माण होईल.’ असे श्री. युयुत्सु सर म्हणतांत आणि हेच म्हणणे न्यायशास्त्राभ्यासकांचेही असते. ’न्याय’ ह्या संकल्पनेमागील मूळ भूमिका हीदेखील थोडीअधिक अशीच आहे.
तडजोड:
मूळ उदाहरणांत:
एकदा का समस्यापूर्तीसाठी तडजोड करावयाची असे ठरले की तडजोडीचे इतर अनेक मुद्दे सापडतील. परंतु तडजोड असे म्हटले की येथेच व्यक्तिवादाचा उगम होतो. मीच काय म्हणून माघार घ्यावी अशी एक भूमिका निर्माण होण्याची शक्यता असते. ही भूमिका निर्माण तशी निर्माण होतेच, आणि तेच बर्याचशा वादाचे मूळ असते. (ह्या ठिकाणी तीनही वादींना श्री. नितिन म्हणतांत तसा कर्माचा सिद्धांत सांगता येईल, परंतु तो भाग येथे निराळा आहे.)
व्यक्तिवादी अभ्यासकांचे सर्वसाधारण म्हणणे असे की एकदा कां तडजोड झाली की (समस्येचे समाधान होत असले तरीही) तो न्याय होणार नाही. त्यांच्या युक्तिवादाप्रमाणे सार्वत्रिक असमतेचा नाश होणे हे न्यायास अपेक्षित असते आणि तसे होत नसेल तर ’सामाजिक न्याय’ ही संकल्पनाच मुळांत एक myth आहे. (श्री. युयुत्सु सरांनीही असे वाचल्याचे स्मरते आहे असे कळविले आहे.)
श्री. अमर्त्यांच्या विचारामुळे जी खळबळ उडाली आहे, तिचे कारण असे, की ’सामाजिक न्याय’ ह्या संकल्पनेचे अस्तित्त्व अमान्य करावयाचे झाल्यास, ज्या न्यायाने ते अस्तित्त्व अमान्य करावयाचे त्याच न्यायाने ’सामाजिक अन्याय’ ह्या संकल्पनेचे अस्तित्त्वदेखील अमान्य करावे लागेल.
न्याय - अन्याय हे काही प्रमाणांमध्ये मोजमाप करता येणारे पदार्थ नव्हेत. पूर्वी अन्याय आणि नंतर न्याय असे त्यांचे सर्वसाधारण स्वरूप असते. जर अन्यायाचाच मुळी अभाव असेल, तर न्यायाचे अस्तित्त्व ते काय? आणि अलिकडे आपल्याकडेही अनेक मंडळी न्याय वगैरे काही नसतोच अशी कुरबुर करतांना दिसतात..! पण न्याय - अन्याय ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. त्यामुळे 'न्याय नसतोच' हे प्रतिपादन खरे मानावयाचे झाल्यास 'अन्यायदेखील नसतोच' असे प्रतिपादन मान्य करणे भाग पडेल.
आणि ते मान्य करण्यास न्यायशास्त्राभ्यासक सध्या तरी तयार नाहीत.
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
28 Sep 2009 - 10:16 pm | श्रावण मोडक
विचारप्रवर्तक चर्चा. प्रस्तावकांनी चर्चा समारोपही नेमका केला आहे.
समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून बोलावयाचे झाले तर येथे 'प्रस्तावकांनी समारोपही नेमका करण्याचा प्रयत्न केला आहे,' असे म्हणावे लागेल. :)
12 Oct 2009 - 6:04 pm | विजुभाऊ
आदर्श समाजवादी चौकटीत
ती बासरी ब ला मिळु द्यावी.
कारण अ तशी बासरी पुन्हा बनवु शकेल.
ब आनि क ने अ कडे बासरी कशी बनवावी याचा क्लास लावावा
अ आणि क ने ब कडे बासरीचा क्लास लावावा बासरी वाजवता यायला लागल्यानन्तर स्वयंपूर्ण व्हावे.
आदर्श भांडवलशाही चौकटीत.
अ ने बासरी बनवावी.
ब ने ती वाजवावी
क ने त्यांचे कार्यक्रम मॅनेज करून त्या दोघानाही रोजगार द्यावा.
आदर्श भारतीय चौकटीत
बासरी कोणाला द्यावी यासाठी त्रीसदस्यीय कमिटी स्थापन करावी. त्यांच्या मिटींग्स देशभर घ्याव्यात. निकाल प्रलंबीत ठीवावेत.
\बासरीला कसर लागून तीचा भुगा झाल्यावर मुद्देमाल गायब केल्याचा कोणावरतरी ठपका ठेवावा
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
12 Oct 2009 - 8:06 pm | सूहास (not verified)
बास रे ..ओ सॉरी ..बासरी तिघांपैकी कोणालाही मिळु नये..ती तशीच बेवारस अवस्थेत , न्यायालयाच्या सीलसकट तशीच पडु द्यावी...दरम्यानच्या काळात पोलीस तपास , वा त्यासम लागणारी कागदपत्रे तयार करावीत , तोवर न्यायमुर्तींची बदली होईलच, मग पुन्हा कागदपत्रे तपासणी , सरकारी सुट्ट्या , तसेच न्यायालयीन कामकाजाची वेळ , वकीलपत्र बदल ह्यामुळे खटला अजुन थोडा काळ प्रलंबीत होउ द्या..
मग बघुया ..बासरीचे काय करायचे ते...
मॅटर खतम
१७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद..
सू हा स...
12 Oct 2009 - 9:47 pm | संजीव नाईक
अ आणि ब ला बासरी वादन करण्याचे सागणे पहिल्यादा राग मालकंस वाजवण्यास सागणे व नंतर त्याचा शिवकंस कसा होतो ते विचारणे ज्यांनी बासरी बनवली आहे त्याला शिवकंस बनवायला वेळ लागेल पण ज्यांनी बासरी बनवली नाही त्याला पटकन सुरु मिळेल कारण एक (अ)स्वःस्वार्थासाठी व दुसरा (ब) परकल्याणासाठी किंवा आत्मकल्याणासाठी त्या बासरीचा फायदा करुन घेईल.