राजमाची : काजवे (जंगलातले आणि डोळ्यांपुढचे)

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in भटकंती
14 Jun 2014 - 4:08 pm

'अजून किती वेळ लागेल लोणावळ्याला पोहोचायला?' अंदाजे पन्नास वेळा पन्नास जणांना विचारून झालेला हा प्रश्न स्वानंदने आणखी एका काकांना विचारला आणि त्यांच्या `दोन तास लागतील' या काळजाचा थरकाप उडवणा-या उत्तरानंतर स्वानंदची झालेली भावमुद्रा बघून आम्हाला हसू आवरणं केवळ अशक्य होतं. ट्रेकचा पूर्वार्ध काजव्यांनी गाजवला असला तरी उत्तरार्ध मात्र स्वानंदच्या नावे झाला.
a
राजमाची, काजवे, जंगलातून मातीच्या रस्त्यावरून चालणं, मग दिसणारा नजारा हे सगळं खरं तर गेल्या वर्षीपासूनच डोक्यात होतं. पण गेल्या वर्षी हुकलेला हा ट्रेक या वेळी अखेर घडलाच. लक्ष काजव्यांच्या कल्पनेने, गूगलवरील त्या काजव्यांच्या फोटोंनी आमच्या ‘डोक्यात’ आगोदर काजवे चमकले आणि मग ते प्रत्यक्षात बघण्यासाठी आम्ही या ट्रेकचा प्लॅन आखला. आंतरजालावरून माहिती जमवली. विशेष उल्लेखनीय म्हणजे मिपाकर `वल्ली' यांनी केलेलं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरलं. तिथे राहण्याची व जेवणाची सोय त्यांनी सुचवलेल्या ठिकाणी उत्तम झाली. त्यामुळे त्यांचे जाहीर आभार आणि मनापासून धन्यवाद.
a
राजमाची गावात सुरेश जानोरे (९८५०१ ०४१९१) साहेबांना फोन लावला. त्यांच्याकडे रहाण्याची जेवणाची उत्तम सोय होते. त्यांचं असं म्हणणं पडलं की आम्ही केलेला बेत आणि योजलेली वेळ अगदी योग्य असून आणखी वेळ केल्यास कदाचित काजवे दिसणार नाहीत. त्यामुळे ९-१० जून तारीखच मुकर्रर केली. दर ट्रेक प्रमाणे येणा-यांची संख्या वर खाली झाली आणि मग शिवभक्त अनिकेत, अचानक डायलॉग फेम सौरभ, रॉकपॅचचा राजा स्वानंद, नवा गडी दुष्यंत, आणि मी अशी पंचमहाभूतं काजवे बघायला निघाली.
aa
डावीकडून मी, स्वानंद, अनिकेत, दुष्यंत, सौरभ

ट्रेन ने जावं, की गाडी काढावी, की बस... असे पर्याय असताना शेवटी आम्हा प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली येश्टी आम्ही ठाण्याहून पकडली आणि रवाना झालो. महिला वाहक ताईंनी `मी सांगेन तिथे उतरा, बरोबर जाल’ असं बजावलेलं असूनही घाई, गडबड, संभ्रम या कारणांमुळे आम्ही खंडाळा एक्झिटलाच उतरलो. समोर रिक्षा स्टँड होता. तिथले दोन रिक्षावाले आमचे संभ्रमित चेहरे बघून देवासारखे(?) मदतीला आले आणि आम्हाला कुन्हे गावापर्यंत सोडायला तयार झाले (म्हणजे त्यांनी आम्हाला भरीस पाडलं). कामत मधे पोटं भरू आणि मग जाऊ असं म्हटलं तर ते तिथेही आमच्यासाठी थांबायला तयार झाले. इतकंच नव्हे तर आम्ही ४०० चा भाव ३५० वर आणला याचा आनंदही त्यांनी आम्हाला मिळू दिला. मग आम्ही पोटपूजा केली, चहा प्यायला, आणि निघालो रिक्षाने राजमाचीला. रिक्षावाल्यांच्या म्हणण्यानुसार आमचं सहा किलोमीटर चालणं वाचणार होतं. हे ऐकून आमचा उत्साह लगेच द्विगुणित झाला. संध्याकाळची वेळ, वारा, आकाशातले पक्षी, यामुळे प्रफुल्लितही वाटत होतं. अशात आमच्या रिक्षा एका ठिकाणी येऊन थांबल्या. 'इथून पुढे सर....ळ चालत जायचं' असं त्या रिक्षावाल्याने सांगितलं. आमच्याकडे नकाशे होते तेही तसंच सांगत होते.
a
सुरु झालं... `पाऊले चालती!’. वेळ ५:४०. वाटेत डेल्ला अ‍ॅडव्हेन्चर लागलं. नटून थटून आलेली, इतर वेळी सोफे आणि गाद्या झिजवणारी, सर्वत्र गाडीने फिरणारी अशी उच्चभ्रू लोकं अ‍ॅडव्हेन्चर च्या शोधात आलेली बघून विशेष हसू आलं. हसत, गप्पा मारत आम्ही पुढे चालत राहिलो. पुढे सातच्या सुमारास सूर्य क्षितिजाकडे सरकू लागला. हीच ती वेळ हाच तो क्षण...फोटू टाईम. अधून मधून गावातील मंडळी एम एटी, स्प्लेंडर सारख्या तगड्या बाईक्स घेऊन त्या उंचसखल मातीच्या रस्त्यावरून टिबलसीट वगैरे जात होती. पण ट्रेकला आलेला एकही ग्रूप आम्हाला दिसला नाही त्यामुळे गर्दी नसणार याचा आनंद होत होता.
a
a
aa
चालता चालता दुष्यंत एकदम ए.... असं ओरडला. आम्ही दचकून मागे फिरलो. हा कुठेतरी झाडाकडे बोट दाखवून म्हणाला `तो पक्षी बघ! वेगळाच आहे’ `एवढंच ना...अरे मग केवढ्याने ओरडतोस!’ आम्ही चौघांनी एकससुरात म्हटलं. पुन्हा काही वेळाने असंच. दुष्यंत आमच्याबरोबर पहिल्यांदाच येत होता त्यामुळे त्याच्या या सवयीची आम्हाला सवय नव्हती. पण याच सवयीमुळे पुढे जाऊन आम्हाला काही दुर्मिळ जीव दिसले, काही चांगले फोटो मिळाले हे मात्र खरं. त्याला यानिमित्त आम्ही आमच्या ग्रूप चा सलीम अली ही पदवी बहाल केली.
aa
aa
हळूहळू अंधार दाटत गेला. आता मिट्ट काळोख झाला होता. आमच्या एव्हरेडीच्या विजे-या बाहेर निघाल्या होत्या. आता एकमेकांतील अंतर कमी ठेवून आम्ही चालत होतो. इतक्यात... `ए.....’ दबकी हाक ....`काजवे....’ समोरच्या झाडावर विरळसे काजवे चमकत होते. ट्रेकचा हेतू साध्य होणार अशी आमची आशा बळावली. आणखी जरा पुढे चालल्यावर दाट जंगल होतं. तिथे जाऊन जो नजारा, जे दृश्य आम्हाला दिसलंय, त्याचं वर्णन अशक्य आहे. दिवाळीचं लायटिंग केल्यागत, आकाशात जाऊन फुटणा-या फटाक्याप्रमाणे चकचकचकचक करून एक झाडच्या झाड चमकत होतं. एका विशिष्ट लयीत. आम्ही विजे-या बंद करून त्याकडे स्तब्धपणे बघत होतो. झाड बघून चकित होतो न होतो तो बाजूच्या विस्तीर्ण जंगलाकडे लक्ष गेलं. अख्खं जंगल जणू दिवाळी असल्यासारखं लखलखंत होतं. केवळ अवर्णनीय ! काही वेळ डोळ्यांचं पारणं फिटेपर्यंत तिथेच उभे राहिलो. निसर्गाचा तो आविष्कार बघत राहिलो. डोळे तृप्त झाल्यावर मग कॅसमेरे बाहेर काढले. काजव्यांना फोटो, व्हिडियोत टिपण्याचे अनेक दुबळे प्रयत्न करत आम्ही मार्गक्रमण चालू ठेवलं. साधारण १० च्या सुमारास आम्ही राजमाचीच्या पायथ्याशी सुरेश जानोरे यांच्याकडे पोचलो.
a
मावळी जेवण, या संज्ञेविषयी आम्ही जे जे आडाखे बांधले होते, ते चुकीचे ठरवणारं, पण तरीही अतिशय चविष्ट असं जेवण आमची वाट बघत होतं. शेणाने सारवलेल्या घरात, मांड्या ठोकून आम्ही त्याचा आस्वाद घेतला. भाक-या तर इतक्या सुरेख होत्या की काय विचारा. आणि वांगं बटाटा भाजी व ठेचा - दी बेस्ट. ‘आमटी घे अजून थोडी... ठेचा देऊ का.. भात हवा? भाकरी घे अजून’ घरातल्या आजी अगदी प्रेमाने वाढत होत्या. अशी आपुलकी केवळ या गावातल्या मंडळींकडेच असते आणि त्यांनीच ती बाळगावी. शहरातल्या लोकांना ती जमतही नाही आणि शोभतही नाही. तिथे तुटकपणाचीच संस्कृती. असो. पाणी पिऊन कपडे बदलून झोपायची तयारी केली. जेवल्यावर पुन्हा काजवे बघायला जायच्या प्लॅन वर फुली मारली.

आता प्रश्न होता पडवीत झोपायचं की घराच्या आत. घरात पंखा नव्हता, पडवीत वारा होता. पडवीत काहीही येऊ शकतं, घरात ती शक्यता कमी. `जंगलात हायत की प्राणी, बिबट्या, रानडुकर असतं. पण बिबट्या माणसाला काही करत न्हाय’ जानोरेंची वाक्य ताजी होतीच. काहीही असो. पडवीत झोपण्याची मजा काही औरच असते. आणि तसंही बिबट्या माणसाला काही करत नाही. त्यामुळे आम्ही अंथरुणं पडवीतच अंथरून झोपी गेलो. वरच्या शेडच्या कोप-यांतून एखाद दोन काजवे चमकून अजूनही त्या जंगलातल्या दृश्याची आठवण करून देत होते. झोप म्हणावी तितकी भारी लागली नाही, पण लागली. मधूनच एखादं चिलट, एखादा किडा कानानाकाशी खेळून झोप उडवत होता. मग पाच वाजता कोंबड्यांनी कोरस मधे आरवायला सुरुवात केली. खरी जाग मात्र आणली ती स्वानंद ने. सव्वापाचच्या आसपास मोठ्याने दचकण्याचा आवाज आला. उठून बघतो तर स्वानंद भेदरलेल्या अवस्थेत होता आणि दुष्यंतचा पाय त्याच्या अंगावर होता. दुस-या दिवसाची सुरुवात झाली होती.
a
भैरोबाचं देऊळ
a
आम्ही आवरून गडफेरीला निघालो. गावातून किल्ल्यांकडे जाताना आधी भैरोबाचं देऊळ लागतं. तिथून त्याच्या एका बाजूला श्रीवर्धन तर एका बाजूला मनरंजन असे दोन किल्ले आहेत. त्यांना एकत्रितपणे राजमाची म्हणतात. किल्ल्यावर जाण्याच्या वाटा छोट्या आहेत व चुकायची शक्यता कमी आहे. श्रीवर्धन किल्ला मोठा आहे, मनरंजन तुलनेने छोटा. श्रीवर्धन आधी करू म्हणून आम्ही श्रीवर्धन कडे निघालो. समोर एक माकडांची टोळी होती आणि आमच्या हातात खाण्यापिण्याची एक कॅरीबॅग. डेंजर सिचुएशन. आम्ही अशी युक्ती काढली की आपण कॅरीबॅग देवळात खुंटीला टांगू, खाली आल्यावर खाऊ पिऊ, तसाही जास्त वेळ लागणार नाही. आम्ही तसं केलं, आणि किल्ल्यावर गेलो. श्रीवर्धन किल्ला सुरेख आहे. वरून दिसणारं दृश्य अतिशय सुंदर होतं. पावसाळ्यात त्याची रंगत अजून वेगळी असेल हे सांगायला नको. चिलखती बुरुज, टाकी आणि सर्वोच्च टोकावरचा भगवा बघून उतरताना डाव्या हाताला खाली असलेल्या बुरुजावर गेलो. तिथून मिनी कोकण कडा दिसतो. या मिनी कोकण कड्यावरून पावसाळ्यात धबधबा कोसळत असतो. बघायलाच हवा असा हा ‘स्पॉट’ आहे. श्रीवर्धन वर असतानाच ठरवलं होतं की मनरंजन ला जायला नको, तिथे फारसं काही नाही. श्रीवर्धनच आरामात बघू. त्यामुळे फोटो काढत, आरामात खाली आलो. भैरोबाच्या देवळासमोर लिंबूसरबत प्यायलं आणि आत पिशवी आणायला गेलो तर पिशवी गायब. जरा विचारल्यावर कळलं, ज्या माकडांना टाळण्यासाठी आम्ही ही युक्ती केली ती लई स्मार्ट होती. त्यांनी देवळाच्या आत येऊन आमची पिशवी लंपास केलेली होती.
a

a
भग्नावस्थेतला महादरवाजा - श्रीवर्धन

a
महादरवाज्याच्या आतील देवड्यांचे खांब - मेल-फीमेल जॉईंट ची रचना - अजूनही पुन्हा उभारता यावेत अशा स्थितीत

a
चिलखती बुरूज

a
a
a
a
a

a
हा तो स्पॉट जिथून मिनी कोकणकडा दिसतो.

मग टपरवेअर च्या बाटल्या गेल्याच्या दु:खात आम्ही परतपावली जानोरेंकडे आलो. तिथे एक अतरंगी ग्रूप आला होता. केस वाढलेली, सिगारेटी पिणारी, चित्रविचित्र हसणारी धेंडं त्या पडवीत पहुडली होती. आम्ही आमची जागा करून घेतली, चहा पोहे खाल्ले आणि ती मंडळी पांगल्यावर मग जानोरेंशी गप्पा मारत बसलो. अशा थिल्लर लोकांचं किल्ल्यांवर येणं, तमाशे करणं, किल्ले, शिवाजी महाराज, गोनीदा, बाबासाहेब पुरंदरे असं करत करत विषय राजकारणावर गेला. मस्त गप्पा झाल्या. साडेबारा कधी वाजले कळलंच नाही. मग मात्र पटापट आवरून एक गटचित्र काढून परतीच्या प्रवासाला लागलो.

aa
मिनी कोकण कडा

निघता निघता जानोरे म्हणाले की काल आलात तो खरा लांबचा रस्ता होता. त्यात तीन एक किमी जास्त पडतात. आता सरळ तुंगार्लीमार्गे जा. अंतर कमी आहे ते. झालं ना ! काल `तो' रस्ता कमी अंतराचा आहे समजून चाललो, आता `हा' रस्ता कमी आहे असं मानून चालायचं होतं. आता खरी मजा होती. ऊन डोक्यावर होतं, पावसाचा येण्याचा मूड नव्हता, वारा सुद्धा झोपलेला होता. अशात आम्ही चालत होतो. थांबत थांबत, पाणी पित पित, कालपेक्षा अंमळ कमी गप्पा मारत पावलं उचलत होतो. स्वानंद हळू हळू अधिकाधिक कुरकूर करू लागला. `किती अंतर आहे? किती वेळ लागेल' असा जानो-यांना पहिल्यांदा विचारलेला प्रश्न तो रस्त्यात जवळजवळ प्रत्येकाला विचारत होता. तोच नाही, आम्हीही विचारत होतो, पण तो जास्त. तेही असं व्हायचं की एका माणसाला आम्ही पाच जण (पुढेमागे चालत असल्याने) एकच प्रश्न विचारायचो. त्यातही गंमत म्हणजे प्रत्येक जण आधीच्या माणसाच्या उत्तराशी कमालीचं विसंगत उत्तर देत होता. त्यामुळे आम्हाला शेवटपर्यंत कळत नव्हतं की अजून किती चालायचंय आणि किती वेळ लागणार आहे. इतकं खिळवून ठेवणारा एखादा सिनेमाही मी आजवर बघितला नाही.

a

तुंगार्लीचा रस्ता छोटा होता की मोठा ते माहीत नाही, पण आम्ही मात्र येताना जास्त दमलो. पावलं दुखत होती, पाठ दुखत होती, पण ट्रेक मस्त झाल्याचा आनंद होता. काजवे जंगलातच नाही, आमच्या डोळ्यांपुढेही चमकले होते. गोष्ट इथेच संपत नाही. त्या दिवशी फेसबुकावर कुणी आक्षेपार्ह मजकूर टाकला म्हणे त्यामुळे लोणावळा बंद होतं. आली ना पंचाईत ! बस स्टँड वर मिसळ खाताना आम्हाला ही कल्पना नव्हती की घरी पोचेपर्यंत आम्हाला प्रचंड मोठा द्राविडी प्राणायाम करायचा आहे.

a

एकही बस मिळेना, मग शेवटी एका खोपोली बस मधे बसलो. तिने खोपोली फाट्याला गेलो. तिथून रिक्षाने खोपोली स्टेशनला गेलो. तिथून ट्रेनने कर्जत. तिथून धावत तिकिट काढून पुन्हा ट्रेनने ठाणे. सौरभचं एम-इंडिकेटर नसतं तर हे शक्य झालं नसतं. कारण बाकी मोबाईल गळपटलेले होते. ट्रेन मधून येताना पुढच्या ट्रेकचे बेत आखले.... नाहीत; कारण त्राणच नव्हते. झाल्या ट्रेकबद्दल मात्र ब-याच गप्पा मारल्या. शेवटपर्यंत हॅपनिंग झालेला हा ट्रेक नक्कीच अविस्मरणीय होता.

a

डायलॉग ऑफ द ट्रेक: परतीच्या वाटेवर प्रचंड दमलेल्या अवस्थेत आयोजकांच्या नावे खडे फोडून झाल्यावर स्वानंदचा हा मौलिक डायलॉग: ट्रेक ठीक आहे रे सौरभ, त्याचं काही नाही, मी आत्ता सुद्धा पुन्हा श्रीवर्धन चढून येईन कळलं का? ट्रेक ठीक आहे, दमणं ठीक आहे, चालणं पण ठीक आहे; पण ऊन रे ऊन ! ऊन खरा प्रॉब्लेम आहे. (इथे चेह-यावर तिरस्काराचे भाव)

काय खुपले?
राजमाचीची ’धिंगाणा करायचं एक ठिकाण अशी झालेली ओळख’ लोकं गाड्या घेऊन येतात, तलावाच्या काठी मोठ्याने गाणी लावून नाचतात दारू पितात. आणि अर्थात नेहमीप्रमाणेच:
kachra

प्रतिक्रिया

चांगलं लिहिलं आहे. फोटो घरुन पाहीन.

चौकटराजा's picture

14 Jun 2014 - 6:23 pm | चौकटराजा

फोटो व वर्णन दोन्ही सुरेख ! पण हा दमविणारा मामला दिसतो. तरीच मला म्हातार्‍याला वल्ली तिकडं घेऊन जायला तयार नाहीये. सनसेट तसेच सुरूवातीचे पाच फोटो खास आलेयत. शेवटचा " गुमनाम है,,,,,,,कोई " स्टाईलचा फटू ही चांगलाय !
बाकी भाकरी , वांगे बटाट्याची भाजी व ठेचा यांचा फटू न टाकल्याबाद्द्ल खादाड ( व इनोभक्त ) मिपाकर नाराज होणार आहेत याची दखल घ्यावी .

मुक्त विहारि's picture

14 Jun 2014 - 7:53 pm | मुक्त विहारि

"भाकरी , वांगे बटाट्याची भाजी व ठेचा यांचा फटू न टाकल्याबद्दल,"

त्रिवार निषेध....

मुक्त विहारि's picture

14 Jun 2014 - 7:48 pm | मुक्त विहारि

आवडला..

संजय क्षीरसागर's picture

14 Jun 2014 - 9:16 pm | संजय क्षीरसागर

पोस्ट आवडली.

फोटू व ट्रेकचे वर्णन आवडले. सूर्यास्ताचे फोटू सुरेख आलेत.

मस्तच रे.....फोटो तर जबराच

माझा हा ट्रेक कितीतरी वेळा प्लान करुन हुकलेला आहे, बघुयात कवा मुहुर्त मिळतोय

मुक्त विहारि's picture

14 Jun 2014 - 11:31 pm | मुक्त विहारि

होते असे कधी कधी...

आयुर्हित's picture

15 Jun 2014 - 12:55 am | आयुर्हित

छान व माहितीपूर्ण लेख. सुंदर सफर घडवली आमची!

सर्वच छान .वर्णन ,फोटो मस्तच .काजव्यांचे डाईनॉसोर होणार का अशी मला शंका येऊ लागली आहे .आमच्या लहानपणी इतके काजवे अंबरनाथला होते आता फक्त डोंगरांत राहिले .
मी पण जानोरेकडेच पोहे खातो परंतू त्याच्या नाचणीच्या भाकऱ्या एकदा कच्च्या वाटल्यापासून जेवत नाही .तिथे राहत नाही .भैरवनाथाची ओसरी गाठतो .पावसाऴयात फारच हुल्लडबाजी ग्रुप येतात तेव्हा श्रीवर्धनची गुहा रिकामीच असते आणि पर्वत कस्तुराचे शिळ वाजवणे चालूच असते .

वर्णन आणि फोटो, दोन्हीही छान !!

यशोधरा's picture

15 Jun 2014 - 9:30 am | यशोधरा

फोटो पहायचे राहिले होते. सुरेख!

प्रचेतस's picture

15 Jun 2014 - 10:52 am | प्रचेतस

छान लिहिलंय.
राजमाची नितांतसुंदर किल्ला आहे. कुठल्याही ऋतूत जा.
तुम्ही उढेवाडीच्या खालचे बाजूस असलेला यादवकालीन शिवमंदिर आणि बांधीव तलाव पाहिलेला दिसत नाही. मस्त जागा आहे ती.
बाकी पांगळोली तुंगार्ली मार्गे येणारा रस्ता कुणे मार्गापेक्षा जवळचाच आहे. मात्र तुम्ही लोणावळ्याला उलट येण्यापेक्षा घाट उतरून कोंदिवडेला जायला हवे होते. अर्थात नवीन असलात त्या रस्त्यासाठी वाटाड्याची गरज भासते.

वेल्लाभट's picture

15 Jun 2014 - 3:29 pm | वेल्लाभट

होय. वाटाड्या हवा, शिवाय वाट उतरंडीची, घसरगुंड्या होण्याची शक्यता आणि मिळालेले सल्ले गृहीत धरून आम्ही ती वाट न घेण्याचा निर्णय घेतला.

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jun 2014 - 6:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

हा ट्रेक मी कर्जत आणि लोणावळा (तुंगार्लीमार्गे) असा दोन्हीकडुन केलाय...कर्जतला उतरायला तुम्हाला मजा आली असती...असो नेक्स्ट टाईम

भाते's picture

15 Jun 2014 - 1:34 pm | भाते

फोटो छानच आले आहेत. विस्तृत माहिती आवडली.

वेल्लाभट's picture

15 Jun 2014 - 3:28 pm | वेल्लाभट

धन्यवाद :) :)

मदनबाण's picture

15 Jun 2014 - 4:15 pm | मदनबाण

लयं भारी ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरे Dil Ka तुमसे Hai केहना... ;) { Armaan }

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jun 2014 - 10:08 pm | अत्रुप्त आत्मा

*i-m_so_happy*

किसन शिंदे's picture

16 Jun 2014 - 1:14 am | किसन शिंदे

फोटो आणि वृत्तांत दोन्ही आवडले.

सूड's picture

16 Jun 2014 - 11:34 am | सूड

मस्त !!

सस्नेह's picture

18 Jun 2014 - 11:21 am | सस्नेह

सुंदर फोटो अन खुसखुशीत वर्णन !

जागु's picture

18 Jun 2014 - 3:22 pm | जागु

मस्तच.

आभार सूड स्नेहांकिता आणि जागु !

प्रमोद देर्देकर's picture

17 Feb 2015 - 12:54 pm | प्रमोद देर्देकर

आवडलं

कपिलमुनी's picture

17 Feb 2015 - 1:07 pm | कपिलमुनी

फोटो आणि वृतांत छान !

>>शहरातल्या लोकांना ती जमतही नाही आणि शोभतही नाही. तिथे तुटकपणाचीच संस्कृती.
तरीपण हा खडा लागलाच !

वृतांत मस्त विनोदी शैलीने लिहिलेला आहे आवडला, फोटो पण एकदम झकास