टिळक कि दाते

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
28 Oct 2010 - 9:42 am
गाभा: 

टिळक कि दाते
फार पुर्वि महाराष्ट्रात दिवाळी दोन वेळा साजरी व्हायची..एक टिळक पंचांगा प्रमाणे..व एक दाते सोलापुरकर पंचांगा प्रमाणे.
अर्थात बहुसंख्य लोक दाते सोलापुरकर पंचांगा प्रमाणे दिवाळी साजरी करतात..
आपल्या समुहात टिळक पंचांगा प्रमाणे दिवाळी साजरी करणारे सभासद वा आपल्या माहितीचे कुणी आहेत का?

प्रतिक्रिया

ए.चंद्रशेखर's picture

28 Oct 2010 - 9:59 am | ए.चंद्रशेखर

टिळक पंचांग व दाते पंचांग यात थोडासा जो फरक पडतो तो नववर्षदिनामुळे (पाडवा) पडतो. दाते पंचागाप्रमाणे चित्रेच्या तार्‍यापासून बरोबर १८० अंशावर सूर्य आला की नव्या वर्षाची कालगणना सुरू होते. टिळक पंचांगाप्रमाणे हीच कालगणना सूर्य झीटा पिशियम तार्‍यापाशी आला की सुरू होते. या दोन्ही स्थानांमधे ४ ते ५ अंशाचा फरक असल्याने टिळक पंचांग व दाते पंचांग यात काही दिवसांचा फरक पडतो.
अर्थात दोन्ही नववर्षदिन तसे Arbitrary असल्याने कोणतेही पंचांग वापरले तरी फरक काहीच पडत नाही.
पूर्वी टिळक पंचांग वापरणे हे देशभक्तीचे द्योतक समजले जात असे. आता कोणाची तशी वृत्ती राहिली असेल असे वाटत नाही.

पिवळा डांबिस's picture

28 Oct 2010 - 10:44 am | पिवळा डांबिस

सिरियसली!
आज पहिल्यांदाच दाते आणि टिळक पंचांगातला नेमका फरक कुणी ध्यानी आणून दिला त्याबद्दल अनेक धन्यवाद!!

(बाकी झीटा पिशीयम हा मस्त आयडी आहे, पुढल्या संकेतस्थळावर वापरायला हवा!!!)
:)

बेसनलाडू's picture

28 Oct 2010 - 10:58 am | बेसनलाडू

काही सेंद्रिय संयुगे, जीवाणू-विषाणू, फुले-फळे यांची शास्त्रीय नावेसुद्धा सदस्यनामे म्हणून घेता येतील.
जसे - २-२ डायक्लोरो डायफ्लोरो प्रोपेन, प्लाज्मोडिअम वायवॅक्स, लॅक्टोबॅसिलस अ‍ॅसिडोफिलस इ. ;)
(वैज्ञानिक)बेसनलाडू

पिवळा डांबिस's picture

28 Oct 2010 - 11:01 am | पिवळा डांबिस

ती तू घे...
आमी झीटा पिशियम हेच नांव घेणार!!!
हट्टी पिडां

बाकी हा प्रतिसाद अवांतर ठरु नये म्हणून...
चित्रा तार्‍याचे इंग्रजी नांव काय आहे?

ए.चंद्रशेखर's picture

28 Oct 2010 - 11:08 am | ए.चंद्रशेखर

चित्रा तार्‍याचे इंग्रजी नाव Spica हे आहे.

पिवळा डांबिस's picture

28 Oct 2010 - 11:22 am | पिवळा डांबिस

चित्रा = स्पायका
नक्की लक्षात ठेवीन!!

(उद्या उपाशीपोटी बॉस्टनला लोगन एयरपोर्टवर येऊन पडलो तर उपयोगी येईल!! वेळ काय सांगून येते!!)
;)

चित्रा's picture

29 Oct 2010 - 4:16 am | चित्रा

जेवायला घालणारी कोणी स्पायका आहे का?!

चित्रा हे नाव लक्षात असले तरी चालेल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Oct 2010 - 11:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

झीटा पिशीयम हे नाव Pisces (मीन रास) या तारकासमूहातल्या ६ व्या क्रमांकाच्या तेजस्वी तार्‍याचं नाव. (पहिल्या क्रमांकाच्या तेजस्वी तार्‍याला अल्फा पिशीयम म्हणतात. अल्फा सेंटॉरी हा सूर्याला सगळ्यात जवळचा तारा म्हणजे सेंटॉरस अथवा तारकासमूहातला सर्वात तेजस्वी तारा.)

टिळक आणि दाते पंचांगातला हा फरक आहे तो पृथ्वीच्या परांचन गतीमुळे. भोवरा स्वतःभोवरी फिरायचा वेग थोडा कमी झाला की त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा आस डोलायला लागतो. पृथ्वीलाही तशीच गती आहे, त्यामुळे पृथ्वीचा ध्रुव तारा बदलत रहातो. हे एक वर्तुळ पूर्ण व्हायला २६ हजार वर्ष लागतात.

खगोलीय विचार करता टिळक पंचांग जास्त योग्य आहे कारण लोकमान्यांनी या परांचन गतीचा अभ्यास करून त्याप्रमाणे वसंतसंपात बिंदू (२१ मार्चला सूर्य उगवतो ती आकाशातली दिशा) 'हलवून' पुढचं ग्रहगणित केलं.

पिवळा डांबिस's picture

28 Oct 2010 - 11:14 am | पिवळा डांबिस

चित्रा तार्‍याचं इंग्रजी नांव काय ते सांग!!
उगाच फापटपसारा कशाला?
:)
टू लेट!
मिळालं!!
श्री चंद्रशेखर यांनी दिलं!!!

अच्छा! असा फरक आहे तर!
टिळक पंचांग वापरावे असे वाटते आहे.
माझा पुढचा आयडी अल्फा सेंटॉरी असणार आहे.

ए.चंद्रशेखर's picture

28 Oct 2010 - 11:22 am | ए.चंद्रशेखर

भारतीय पंचांग तार्‍यांच्या स्थानावर आधारित असल्याने या पंचांगाने सांगितलेला नववर्षदिन व वसंतसंपात दिन यांचे नाते कधीच जुळले नाही. परांचन गतीमुळे वसंतसंपात दिन दर वर्षी नववर्षदिनापासून थोडा थोडा लांब जात राहतो. सध्या वसंतसंपात दिन सूर्य उत्तर भाद्रपदा नक्षत्रात असताना येतो.
टिळक पंचांग सुद्धा तार्‍यांच्या स्थानावर आधारितच आहे त्यामुळे ते खगोलिय दृष्ट्या जास्त योग्य आहे हे म्हणणे सयुक्तिक वाटत नाही. ऋतू आणि भारतीय पंचांगे यांचा यामुळेच काही संबंध नसतो. सध्याचे आपले रूढ पंचांग (दाते) हे इ.स.१००० च्या आसपास रूढ झाले. त्यावेळी वसंतसंपात दिन आणि नववर्षदिन एकत्र येत होते परंतु आता त्यात फरक स्वाभाविकपणेच पडला आहे. भारतीय पंचांगे या कारणामुळेच फारशी उपयुक्त ठरत नाहीत व आपल्याला इंग्रजी महिन्यांचा आधार घ्यावा लागतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Oct 2010 - 12:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

टिळक पंचांग दाते पंचांगापेक्षा जास्त योग्य आहे, अर्थातच टिळकांनी केलेल्या गणितानंतरही परांचन गतीप्रमाणे पृथ्वीच्या आसाची वर्तुळाकार गती सुरू असल्यामुळे ते ही १००% योग्य नसणारच (टिळक पंचांगात दरवर्षी परांचन गतीची गणितं होत असतील तर माझं विधान मागे!). दाते पंचांगात पृथ्वीच्या परांचन गतीचा अजिबात विचार नाही (अशी माझी ऐकीव माहिती आहे.)

नववर्षदिन वसंतसंपातदिनीच येतो (किंवा यावा) का नाही हे मला माहित नाही. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा मराठी लोकांचा नववर्षदिन असतो, पण इतर भारतीयांचा नववर्षदिन वेगवेगळ्या महिन्यांमधे येतो. भारतीय (का मराठी?) पंचांगे अव्यवहारी ठरतात ते चंद्राच्या "मनमानी" कलांमुळे; सूर्य उगवला की नवा दिवस हे गणित चंद्राच्या कलांपेक्षा जास्त सोपं आणि नियमित (रेग्युलर) आहे. सौर कालगणना सोपी आहे म्हणून ती चटकन स्वीकारली गेली. चार दिवसांची दिवाळी या वर्षी दोनच दिवसांची आहे यात 'दिवस' सौर कालगणनेप्रमाणे मोजले जातात; ग्रेगोरियन कालमापन सौर पद्धतीने होतं म्हणून ते वापरलं जातं.

विकास's picture

28 Oct 2010 - 4:51 pm | विकास

फारच रोचक आणि माहितीपूर्वक चर्चा!

टिळक असोत वा दाते अथवा अजून कोणी - या लोकांनी त्या वेळेस ही निरिक्षणे कशी केली? झिटा पिशियम वगैरे त्यांना कसे माहिती? विशेष करून लो. टिळकांनी जर टिळक पंचांगाचे मूळ गणित मांडले असले (पंचाग चालू केले का नाही हा माझ्या दृष्टीने विषय नाही) तर त्यांना नक्की असा वेळ, संदर्भ कुठे कसे मिळाले? हे प्रश्न केवळ उत्सुकतेपोटी पडलेल्या प्रश्नांना उत्तरे मिळावीत या अपेक्षेनेच विचारत आहे, आमचे पूर्वज वगैरे या अर्थाने नाही...

बाकी अजून एक प्रश्न (अवांतर ही नाही आणि व्यक्तिगतही नाही ;) ): भारतीय खगोलशास्त्रात चित्रा हे तार्‍याचे नाव आहे का नक्षत्राचे? का दोन्हीचे?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Oct 2010 - 7:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पंचांग, ग्रहगणित वगैरे विषयांची मला फारशी माहिती नाही.
झिटा पिशीयम हा तारा डोळ्यांना दिसतो.
सोफिस्टीकेटेड फोटोग्राफी आणि दुर्बिणींशिवाय ही निरीक्षणं कशी केली आणि वसंतसंपात बिंदू नक्की कुठे आहे अशा प्रकारची 'हवेतली' अनुमानं कशी काढली हा प्रश्न मलाही पडला आहे.

अवांतर आणि व्यक्तीगत नसणार्‍या प्रश्नाचं उत्तरः चित्रा तारा हा त्या तारकासमूहातला सर्वात ठळक तारा आणि त्या तारकासमूहाचं मराठी नावही चित्राच! आकाशात सप्तर्षी माहित असतील तर त्यांचा आकार प्रश्नचिन्ह किंवा डावासारखा दिसतो. ते प्रश्नचिन्ह आकाशात वाढवत नेलं की पांढरा, तेजस्वी तारा दिसतो तो चित्रा आणि पुढे त्यापेक्षा किंचित कमी तेजस्वी, थोडा लालसर तारा दिसतो तो स्वाती.
(आता खरंच अवांतरः तो चित्रा आणि तो स्वाती असं लिहायला फार गंमत वाटली!) ;-)

इन्द्र्राज पवार's picture

28 Oct 2010 - 7:46 pm | इन्द्र्राज पवार

".....(आता खरंच अवांतरः तो चित्रा आणि तो स्वाती असं लिहायला फार गंमत वाटली!)....."

[~ हा प्रतिसाद थोडासा विषयाशी फटकून होईल याची जाणिव आहे, तरीही अदितीने "चित्रा व स्वाती" चा उल्लेख केल्यामुळे राहवत नाही, म्हणून देत आहे.]

दोन मित्रांनी मिळून मागे मला "ऋषिकेश मुखर्जी स्पेशल" असा डिव्हीडी चा एक सेट प्रेझेंट दिला आहे. त्यात ऋषिदांचा 'सत्यकाम' नावाचा चित्रपट आहे. तो एकदा पाहताना या चित्रा आणि स्वाती भेटल्या होत्या. धर्मेन्द्र आणि संजीवकुमार दोघेही इंजिनिअरिंगचे शेवटच्या वर्षातील विद्यार्थी आणि कॉलेज हॉस्टेलमधील त्यांचा तो शेवटचा दिवस असतो...दोन्ही मित्र रात्रीच्यावेळी टेरेसवर गप्पा मारत बसतात. त्यावेळी नरेन्द्र (संजीव) वियोगाच्या दु:खाने व्याकुळ होऊन सत्यप्रियला (धर्मेन्द्र) सांगतो, 'सत्य... आता उद्यापासून कुठून ही मैत्री?....तू एकीकडे जाणार, मी दुसरीकडे....मग कशी राहणार ही मैत्री?" वगैरे.

यावर सत्यप्रिय त्याला सांगतो, "अरे नरेन्, असा का विचार करतोस, तू ? आपण कुठेही गेलो तर या आकाशाखालीच असणार ना? याच टिमटिमणार्‍या तार्‍यांच्या संगतीने आपण फिरणार आहोत. वर बघ...आकाशात ती पश्चिमेकडे एक तेजस्वी चांदणी दिसते ना....तिचे नाव आहे 'स्वाती...' ~ आणि एक रहस्य सांगू तुला..? मी स्वातीच्या प्रेमात पडलोय....तिला जेव्हाही मी पाहतो त्यावेळी मनोमनी म्हणतो की लग्न झाल्यावर माझ्या पत्नीचे नाव मी स्वाती ठेवणार..... नरेन...चित्राच्या शेजारी आणखीन एक लुकलुकणारी चांदणी पाहिलील? तिचे नाव आहे "चित्रा".... तू चित्राला ठेवून घे....मग पुढे आपण कुठेही गेलो, तरी ज्यावेळी चित्रा आणि स्वातीला आकाशात पाहू त्यावेळी एकमेकाची आठवण काढू !"

टिपिकल ऋषिकेश मुखर्जी !!

इन्द्रा

इन्द्र्राज पवार's picture

28 Oct 2010 - 11:48 am | इन्द्र्राज पवार

प्रभावी अभ्यास आहे श्री.चंद्रशेखर यांचा, कारण जरी मला या दोन्ही पंचांगाचे अस्तित्व माहिती होते तर आज प्रथमच हे समजले की "टिळक पंचांग" वापरने हे देशभक्तीचे द्योतक समजत. असो.

एक शंका : दोन्ही नववर्षदिन तसे Arbitrary असल्याने .... ~ इथे Arbitrary चा वापर illogical या अर्थाने आहे की random ? कारण जर इल्लॉजीकल असेल तर counting मध्ये पडत जाणारा दिवसाचा फरक मोजण्याचे प्रयोजनच काय?

जर शक्य असेल तर Gregorian Calender वर सर्वसामान्यांना समजेल असा एखादा लेख इथे द्यावा अशी विनंती करीत आहे. कारण जगभर जरी हीच कॅलेंडर प्रणाली असली तरी तिचे नेमके Formation कसे झाले हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

इन्द्रा

ए.चंद्रशेखर's picture

28 Oct 2010 - 12:31 pm | ए.चंद्रशेखर

इथे Arbitrary चा वापर illogical या अर्थानेही नाही किंवा random या अर्थानेही नाही. भारतीय पंचांगे अतिशय तर्कशुद्धपणे व गणिताचा आधार घेऊन बनवलेली आहेत. त्यात काहीही या दोन्ही अर्थांनी Arbitrary नाही.
पृथ्वीवरून जेंव्हा आपण आकाशात बघतो तेंव्हा सूर्यमालेतील सूर्य किंवा चंद्र हे आपल्यापासून मैलात मोजण्याएवढ्या अंतरावर आहेत. परंतु तारे हे प्रकाशवर्षात मोजता येतील एवढ्या अंतरावर आहेत. सूर्याभोवती पृथ्वी व चंद्र हे फिरत असतात. तार्‍यांचा या फिरण्याशी कोणताही संबंध असू शकत नाही.
त्यामुळे नववर्षकाल ठरवताना सूर्यमालेतील सूर्य व त्याच्याशी कोणत्याही पद्धतीने नाते न जोडता येणारा एक तारा हे पृथ्वीवरून बघताना एकमेकाच्या जवळ दिसतात म्हणून त्यांचा एकमेकाशी संबंध जोडून त्यावरून नववर्षकाल ठरवणे याला
मी Arbitrary म्हटले आहे.

यशोधरा's picture

28 Oct 2010 - 12:31 pm | यशोधरा

ह्या माहितीबद्दल धन्यवाद.

रेवती's picture

28 Oct 2010 - 10:22 am | रेवती

माझे काही नातेवाईक टिळक पंचांगाप्रमाणे दिवाळी साजरी करतात.
सगळी दुनिया अजून "आली बरं का दिवाळी जवळ!" असे म्हणत असते तेंव्हा या पंचांगाप्रमाणे फटाके उडवून झालेले असतात.;) बाकि काही फरक नसावा.

नितिन थत्ते's picture

28 Oct 2010 - 11:02 am | नितिन थत्ते

होय. आमच्या चिपळूणच्या घरी टिळक पंचांग वापरीत. आजोबांच्या मृत्यूनंतर काकांनी जुने पंचांग वापरायला सुरुवात केली.

इतर लोकांची सर्वपित्री असताना त्यांचे लक्ष्मीपूजन असे. :)
अर्थात ही गंमत ज्या वर्षी अधिक महिना असे त्याच वर्षी होई.

आम्ही दोन्ही पंचागाप्रमाणे साजरी करतो !

परिकथेतील राजकुमार's picture

28 Oct 2010 - 11:07 am | परिकथेतील राजकुमार

श्या !

राजकुमाराला कसले आले दिवाळीचे कौतुक ? आमच्याकडे रोजच दसरा आणि रोजच दिवाळी.

रेवती's picture

28 Oct 2010 - 11:11 am | रेवती

हा हा!
मस्तच!

चिंतामणी's picture

28 Oct 2010 - 11:34 am | चिंतामणी

:D

:D

:D

=))

Dhananjay Borgaonkar's picture

28 Oct 2010 - 11:47 am | Dhananjay Borgaonkar

परा..म्हणजे तुला रोजच दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला हव्यात :P

स्पंदना's picture

28 Oct 2010 - 11:20 am | स्पंदना

फारसा विचार न करता इतरांप्रमाणे दिवाळी साजरी करतो आम्ही(अर्थात दाते) , पण माहीती बद्दल धन्यवाद.

अस्मी's picture

28 Oct 2010 - 11:27 am | अस्मी

आमच्या घरी टिळक पंचांगच वापरतात. पण दिवाळी दरवर्षी वेगवेगळी येते असं नाही..जर अधिक महिना वेगळा असेल किंवा तिथीत फरक असेल तरच दिवाळी वेगळी येते.

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Oct 2010 - 11:34 am | llपुण्याचे पेशवेll

बरोबर.. टिळक पंचांगाप्रमाणे एका वर्षी अधिक महीना अश्विन कार्तिकाच्या मधे आला होता. तेव्हा टिळक पंचांगानुसार नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आधी आणि नंतर १ महीन्यानी बलिप्रतिपदा, यमद्वितीया असे काहीतरी आले होते ते आठवले. तेव्हा आमच्या शेजारी राहणारे पेंडसे कुटुंब टिळ्क पंचांगावरून दाते पंचांगावर शिफ्ट झाले. बाकी 'निर्णयसागर' नावाचेही एक पंचांग होते. त्याचे काय झाले? कोण वापरते का ते? पूर्वी कोकणात बर्‍यापैकी वापरात असे ते.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Oct 2010 - 11:37 am | परिकथेतील राजकुमार

निर्णयसागर नावाची प्रेस होती किंवा आहे ना ? त्या प्रेसनी प्रकाशित केलेले पंचांग म्हणजे निर्णयसागर का?

रामदास's picture

28 Oct 2010 - 1:01 pm | रामदास

प्रेस आहे अजून. निर्णयसागर पंचांग नियमीत .गिरगावात कोलभाट लेनमध्ये निर्णयसागर मार्केट नावाची इमारत आहे.ते त्यांचे हेड ऑफीस. माझ्या माहीतीप्रमाणे निर्णयसागरची मालकी आता प्रतापराव जाधव (पुढारी चे मालक/संपादक.)यांच्याकडे आहे.असो.
आमच्या घरी आम्ही टिळक पंचांग वापरत होतो. अधिक मासात फार पंचाईत व्हायची.उदा: गणपती आधी यायचा.मूर्ती मिळायची नाही. दिवाळी आधी यायची ,फटाके आणायला महम्म्द अली रोडला इसाभाईकडे जावं लागायचं.त्याखेरीज शेजारी पाजार्‍यांचा एक चर्चेचा विषय व्हायचा.मला अंमळ आम्ही वेड** असल्याचं फिलींग यायचं.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Oct 2010 - 1:08 pm | परिकथेतील राजकुमार

माहितीबद्दल धन्यु काका :)

Dhananjay Borgaonkar's picture

28 Oct 2010 - 1:22 pm | Dhananjay Borgaonkar

हो ही गणपती मधील गम्मत मी सुद्धा ऐकुन आहे. आमचे एक ओळखीचे आहेत. ते अजुन सुद्धा टिळक पंचांगाप्रमाणे गणपती व ईतर सण साजरे करतात. त्यांची पण अशीच पंचाईत व्हायची.

इन्द्र्राज पवार's picture

28 Oct 2010 - 1:30 pm | इन्द्र्राज पवार

"....माझ्या माहीतीप्रमाणे निर्णयसागरची मालकी आता प्रतापराव जाधव ...."

~ होय. कोल्हापुरचे श्री.प्रतापसिंह जाधव हे निर्णयसागरचे "जावई". तेच प्रेस चालवितात, व्यवहार पाहतात. पंचांग पूर्वीप्रमाणे प्रसिध्द होत असले तरी साळगावकरांच्या 'कालनिर्णय' ने या क्षेत्रात मारलेल्या मुसंडीमुळे तेच नाव सर्वत्र घेतले जाते. बदलत्या परिस्थितीशी दाते काय, निर्णयसागर काय यानी जुळवून न घेता घटिका-पळे यांचाच लेखाजोखा करत पंचांगे प्रसिद्ध केली तिला यशस्वी छेद दिला तो साळगावकरानी ज्यानी तिथ्यांचा हिशोब मिनिटा-सेकंदात मांडून सर्वसामान्यांना समजेल अशी पानांची मांडणी (अन् तिही अतिशक आकर्षकरित्या...) केल्याने लोक साहजिकच तिकडे वळले आहेत.

इन्द्रा

चित्रा's picture

29 Oct 2010 - 3:52 am | चित्रा

आणि सहज लक्षात राहणार्‍या जाहिराती.

भविष्य, मेनू, आरोग्य, ज्ञान
उपयुक्त साहित्य प्रत्येक पान
पंचांग सोपे सुमंगल स्वभावे*
भिंतीवरी कालनिर्णय असावे.

*(का असेच काहीतरी)

अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद आले आहेत. धन्यवाद.

इन्द्र्राज पवार's picture

29 Oct 2010 - 9:23 am | इन्द्र्राज पवार

"....पंचांग सोपे सुमंगल स्वभावे*...."

~ ओळ बरोबर आहे....आणि होय, केवळ वर्तमानपत्रातूनच नव्हे तर रेडिओ आणि त्यानंतर दूरदर्शनवरदेखील एका कॅलेण्डर्+पंचांगाची जाहिरात होते ते लोकांनी पाहिले आणि ते केले "कालनिर्णय" च्या साळगांवकर कुटुंबियांनी. मला वाटते 'ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर' ही कल्पना त्यांनी राबविली होती. कविता लाड, प्रशांत दामले आणि अजय वढावकर ही तीन ठळक नावे तर आठवतात (रेणुका शहाणे आणि पल्लवी जोशी होत्या असा कयास आहे, विदा नाही). विशेषतः दिवाळीच्या आगेमागे महाराष्ट्रीयन कुटुंबात जणू काही नैसर्गिकरित्याच आनंदाचे वातावरण भारून गेलेले असते आणि नेमका याच मनःस्थितीचा 'कालनिर्णय' ने अचूक फायदा उठवून 'कॅलेण्डर' ही विकत घेण्याची आणि गरजेची गोष्ट आहे हे ठसविले. आज १७ भाषातून प्रसिद्ध होणार्‍या कालनिर्णयच्या यशाचा आलेख थक्क करणारा आहे.

"पाठीमागील पान" हे देखील एक वैशिष्ठ्यपूर्ण बनले. पु.ल., व.पु. पासून ते थेट अनिल अवचट, गौतम राजाध्यक्ष यासारख्या लेखकांना त्यानी 'कॅलेण्डर' साठी लिहिते केले, हे विशेष.

(माझी माहिती जर बरोबर असेल तर 'कालनिर्णय' या शीर्षकाची अक्षररचना 'कमल शेडगे' यानी केली होती.)

इन्द्रा

अमोल केळकर's picture

28 Oct 2010 - 11:37 am | अमोल केळकर

सध्याचे कालनिर्णय पंचांग टिळकांच्या जवळचे की दात्यांच्या ?

अमोल केळकर

Dhananjay Borgaonkar's picture

28 Oct 2010 - 11:42 am | Dhananjay Borgaonkar

बहुतेक दाते. टिळक पंचांग आजकाल खुप कमी लोक वापरतात.

नितिन थत्ते's picture

28 Oct 2010 - 12:34 pm | नितिन थत्ते

आमचे थोर सर्वज्ञ पूर्वज चुकले होते असे मान्य करण्यापेक्षा टिळकांना फाट्यावर मारणे सोयीचे ठरले असावे.

अवलिया's picture

28 Oct 2010 - 12:47 pm | अवलिया

टिळक पंचांग टिळकांनी चालु केले असते तर तुमचे वाक्य योग्य होते. पण ते टिळकांनी चालु केलेले नव्हते त्यामुळे तुमचे वाक्य फक्त टिळकांच्या दुस्वासातुन आले आहे. धन्यवाद

नितिन थत्ते's picture

28 Oct 2010 - 12:51 pm | नितिन थत्ते

तसे काय नाय बॉ.

आर्य भारताबाहेरून आले हे मत मांडणार्‍या टिळकांचा आम्ही कशाला दुस्वास करू? :)

असो टिळक पंचांग टिळकांनी सुरू केले नाही ही माहिती सुद्धा रोचक आहे.

अच्छा म्हणजे आर्य इथलेच असे म्हणणार्‍यांचा तुम्ही दुस्वास करता तर ! ;)

रोचक माहिती नक्कीच आहे. आणि तुमचा अभ्यास कमी पडतो हे आकलन सुद्धा रोचकच ! ;)

पुढील चर्चा खवतुन... आर्य वगैरे फाटे फोडल्याबद्दल धन्यवाद.

नितिन थत्ते's picture

28 Oct 2010 - 1:09 pm | नितिन थत्ते

फाटा मी फोडला नाही. टिळक पंचांग मागे पडण्याचे एक संभाव्य कारण सांगितले. त्यावर मी टिळकांचा दुस्वास करतो असा कयास तुम्ही बांधला.

तुमचा परिचय आजचा नाही थत्ते मिया !

इन्द्र्राज पवार's picture

28 Oct 2010 - 1:11 pm | इन्द्र्राज पवार

"....टिळक पंचांग टिळकांनी सुरू केले नाही ही माहिती सुद्धा रोचक आहे...."

~ नितिनजी....थोडा गोंधळ होतोय असे वाटते. तुमच्या वाक्याने "टिळक पंचांग" लोकमान्यांनी सुरू केले असा होतोय. पण मग वर श्री.चंद्रशेखर यांचे 'ते' पंचांग वापरणे देशभक्तीचे द्योतक समजले जात..." असे जे एक वाक्य आहे त्याची तर्कसंगती लागत नाही.

शिवाय खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक व पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांचे ‘गणिती टिळक’ या विषयावर एक व्याख्यान माहित आहे, त्यात त्यांनी टिळक पंचांग व टिळकांच्या अन्य समग्र साहित्याच्या अभ्यासपूर्ण विवेचनातून त्यांनी उपस्थितांना लोकमान्य टिळक कसे गणितज्ज्ञ ठरतात, हे पटवून दिले होते.

हे जर सत्य असेल तर 'लोकमान्य' च टिळक पंचांगाचे जनक ठरतात ना?

इन्द्रा

नितिन थत्ते's picture

28 Oct 2010 - 1:18 pm | नितिन थत्ते

टिळक पंचांग कोणी सुरू केले याबाबत खरेच मला माहिती नाही. ते टिळकांनी सुरू केले (म्हणजे टिळकांनी पंचांग छापण्याची प्रेस काढली असे मला म्हणायचे नाही, त्याचे गणित टिळकांनी तयार केले) अशी माझी समजूत होती. ते तसे नसल्याचे इथल्या प्रतिसादांवरून वाटले. म्हणून "रोचक माहिती" असा प्रतिसाद दिला.

विकास's picture

28 Oct 2010 - 9:11 pm | विकास

पृथ्वी गोल असल्याकारणाने येथे टिळक पंचांगावर टिपण्णी मिळाली. :) त्यातील काही वाक्ये खाली उर्धृत करत आहे: (केवळ काही गोष्टी मी अधोरेखीत केल्या आहेत)

जुन्या आणि टिळक पंचांगामध्ये यात फरक येण्याचे कारण यांच्या सूर्यसंक्रांतीच्या वेळेस येणारे सुमारे चार दिवसांचे अंतर हे आहे.

हे अंतर दोघांनी राशीचक्रारंभस्थान वेगवेगळे मानल्याने येते. लोकमान्य टिळकांनी खरे भारतीय पंचांग जाणलेले होते. शून्य अयनांश शकवर्ष ४५० दरम्यानच हवा याबद्दल ते आग्रही होते.

त्यानुसार सर्व भारतभर एकच पंचांग प्रसारित व्हावे याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यांचे गुरू प्रो. केरो लक्ष्मण छत्रे यांच्या पटवर्धनी पंचांगाचा पुरस्कार केला. जे आज टिळक पंचांग म्हणून ओळखले जाते.

कोकणात विशेषत: कोकणस्थ ब्राह्मणांच्यात टिळक पंचांग वापरात आहे. याची कारणे म्हणजे त्या पंचांगात असणारी अचूकता व लोकमान्यांबद्दल असलेला आदरभाव हे होय.

पण हल्ली दोन वेगवेगळ्या अधिक मासांमुळे होणारा फरक, या कारणास्तव काही मंडळी टिळकपंचांगाचा त्याग करून इतर पंचांगे वापरू लागली आहेत.

बाकी दातेपंचांगाच्या संस्थळावर चांगला इतिहास वाचता आला. त्यात दिलेल्या माहितीनुसार थोडक्यातः भारतात मुख्यत्वे ५-६ पंचागे प्रसिद्ध होत असत. मात्र त्यातील गणिते ही ग्रहतार्‍यांची स्थिती बदलली असली तरी हजार आणि अधिक वर्षांपुर्विच्या सुर्यसिद्धांत आणि ग्रहलाघवा पद्धतीने होत असत. सर्व पंचांगांमधे समानता आणि अधुनिकता आणण्यासाठी लो. टिळकांनी अखिल भारतीय ज्योतिष मंडळाची सभा १९०६ साली घेयला लावली. (स्वगतः ही माणसे तेंव्हा कुठलिही फॅन्सी साधने नसताना काय काय करत असत! आणि मग आपण वेळ नाही म्हणत काहीच का करत नाही?) . त्यात त्यांनी दृकप्रत्ययी म्हणजे जसे दिसते त्यावर आधारीत खगोलगणित आधारणे सुचवले. अर्थातच ते अनेकांना मान्य झाले नाही कारण ते त्यांच्या लेखी धर्मशास्त्रात बसणारे नव्हते. आणि टिळकांचे मत होते यात धर्मशास्त्र नसून गणित आहे. त्यात लिहीलेले नाही पण जे काही टिळकांवर वाचले आहे त्यावरून वाटते की टिळकांनी त्यांना भाव न देता त्यांना गणितीअर्थाने योग्य पंचांग वाटते ते प्रकाशीत केलेच. पुढे स्व. श्री. लक्ष्मणशास्त्री दाते यांच्या लक्षात आले की ग्रहस्थितीचा आणि धर्मशास्त्राचा काहीच संबंध नाही. म्हणून त्यांनी तत्कालीन विद्वान सोमणशास्त्री यांच्याशी सल्लामसलत करून दाते पंचांग तयार केले ज्यासाठी त्यांनी टिळकांनी सुचवलेलीच दृकप्रत्ययी पद्धतच अंगिकारीली.

--------------------

अतिअवांतरः पुल बिग्री ते मॅट्रीकमधे (गंमतीत) म्हणाले होते की गोखल्यांच्या अंकगणिताला कंटाळून लोक टिळकांचे अनुयायी झाले असतील. तेच पुढे रेटत आता (गंमतीतच) म्हणावेसे वाटते की टिळक पंचांगात असलेल्या सणावारांच्या वेगळ्या वेळांना वैतागून अनेकजण गांधीजींचे अनुयायी झाले असावेत. ;)

Dhananjay Borgaonkar's picture

28 Oct 2010 - 1:18 pm | Dhananjay Borgaonkar

+१

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Oct 2010 - 4:28 pm | llपुण्याचे पेशवेll

आर्य भारताबाहेरून आले हे मत प्रतिपादन करण्याची चूक त्यांनी केली तशीच ही एक नवीन चूक असे म्हणूया हवं तर.

अवलिया's picture

28 Oct 2010 - 12:25 pm | अवलिया

चला एकंदर इतर सर्व भारतीय माणसे, वस्तु, कथा, प्रतिके, तत्वज्ञान याप्रमाणेच भारतीय पंचांगांची उपयुक्तता काहीच नाही असे एकंदर दिसते खरे !! :)

नितिन थत्ते's picture

28 Oct 2010 - 12:29 pm | नितिन थत्ते

काल्पनिक भीती ......

अवलिया's picture

28 Oct 2010 - 12:48 pm | अवलिया

हॅ हॅ हॅ

भारतीय पंचांगांची उपयुक्तता काहीच नाही
तसं नाही नाना!
मला अजूनही पंचांगाची जरूरी भासते.
आजचा दिवस शुभ कि अशुभ असे रोज काही बघितले जात नाही पण मोठी खरेदी असेल तर जरूर बघते.
कोणी अंधश्रद्धा वगैरे म्हटले तरी चालेल पण ती सवय झालिये. अतिरेक होणार नाही एवढे पाहिले म्हणजे झाले.
आता तर कारमध्ये ठेवायचे छोटे पंचांग बाजारा आले आहे.
दोन तीन वर्षापूर्वी एका ओळखीच्या काकांनी भेट म्हणून दिले होते.

५० फक्त's picture

28 Oct 2010 - 1:14 pm | ५० फक्त

आम्ही २३ वर्षे प्रत्यक्ष पंचांगकर्ते दातेंचे सख्खे शेजारी होतो, पण सोलापुरात पण माझे काही मित्र ज्यातले बरेच ब्राम्हण सोनार होते ते टिळक पंचांग वापरायचे. लहानपणी हि दोन्ही पंचांग घेउन काय कुठे मागं पुढं आहे हे पाहायचा खेळ खेळायचो त्याची आठवण झाली.

अवलिया's picture

28 Oct 2010 - 1:19 pm | अवलिया

http://misalpav.com/node/5590#comment-83116 इथे दिलेला प्रतिसाद परत देत आहे. त्यातला काही अंश देत आहे.

पृथ्वीची स्वतःभोवतीची फिरण्याची गती खुप मोठी असल्याने भोवरा जसा गुंगत असतो तसेच पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती गुंगते, फिरते. हा साधारणतः २६००० वर्षाचा एक चक्र असा कालावधी आहे. यालाच विलोम अथवा परांचन गती असे म्हणतात. त्यामुळे आज असलेला धृव तारा सतत बदलत असतो. ह्या परांचन गतीमुळे वसंत संपात बिंदू हा दर वर्षी ५०.२ विकला इतका क्रांतीवृत्तावर मागे मागे जातो. तीच अयनांश गती होय.

मेष रास ही अश्विनी नक्षत्रापासुन सुरु होते. अश्विनी नक्षत्रातील ज्या स्थिर ता-यापासुन सुरु होते तिला अश्विन्यारंभ बिंदू असे म्हणतात. ह्याच बिंदूजवळ जेव्हा पूर्वी वसंत संपात बिंदू होता ते शून्य अयनांश वर्ष मानले आहे. परंतु अश्विन्यारंभ बिंदूबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. शून्य अयनांश वर्ष हे शके २०० ते शके ५०० यादरम्यान असावे. याच वेळेस केवळ नक्षत्रावर आधारीत ज्योतिष गणितामधे, पश्चिमेकडुन आलेला राशी विचार बसवला गेला.

या काळात केवळ निरिक्षणावर आधारुन ही अयनांश गती ५८ ते ६० विकला मानून गणित केले जात असे. (३६० अंश पूर्ण वर्तुळ, एक अंश म्हणजे ६० कला, एक कला म्हणजे ६० विकला). यापद्धतीत ग्रहांचे भोग नीट येत असत, ग्रहण कालात मात्र प्रत्यक्ष आणि गणितात दोन मिनिटे ते २० मिनिटे (त्याकाळी घटका पळे) फरक पडु लागला. परंतु निरिक्षणाला अनुभव आणि गणिताची जोड देवुन दुरुस्ती केली जात असे. पूढे पूढे काही अपरिहार्य कारणांमुळे देशभरातील ज्योतिर्विदांचा एकमेकांशी संपर्क तुटला. तरी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने गणिते मांडुन, निरिक्षणांची जोड देवुन कालमापन करत असे.

सन १९१७ साली सांगलीला लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिर्विदांची सभा झाली. त्यात अयनांश गती ५०.२ विकला निश्वित केली. जी आजही मान्य आहे. पुण्यातील विद्वान ज्योतिषी रघुनाथशास्त्री पटवर्धन यांनी 'शुद्ध टिळक पंचांग' चालु केले. शून्य अयनांश वर्ष शके ४९६ मानुन त्यांनी गणित केले. टिळक पंचांग टिळकांनी चालु केले नाही. सोलापुरचे दाते शास्त्री यांनी याच सभेनंतर अयनांश गती ५०.२ विकला मानुन पंचांग आणले, जे आजही सर्वमान्य असुन दाते पंचांग या नावाने प्रख्यात आहे. दाते व टिळक पंचांग यात ४ अंशांचा फरक आहे. लाहिरी (उत्तरेकडे प्रचलित असलेले) व दाते यांचे अयनांश समान आहेत. तर कृष्णमुर्ती (केपी पद्धतीचे जनक) यांच्यात आणि दाते यांच्या अयनांशात सहा कलांचा फरक आहे. टिळकानी याविषयीची विस्तृत चर्चा आर्क्टिक होम ऑफ वेदाज आणि ओरायन या ग्रंथांमधे केली आहे.

सायन मेष रास ही वसंत संपात बिंदूपासुन सुरु होते व ३० अंशावर संपते. तिथुन पुढे वृषभ वगैरे. निरयन मेष रास ही अश्विनि आरंभ बिंदू पासुन होते. तेथून पुढे प्रत्येकी सव्वादोन नक्षत्रे. रॉफेल एफिमेरीज मधे अयनांश मिळवले की निरयन राशी भोग मिळतात. अन्यथा नक्षत्रभोग दोन्हिकडे समान आहेत.

अश्विन्यारंभ बिंदुविषयीचे प्रमुख पक्ष सध्या दोन आहेत. झिटा पेशियम (जयंती तारा) हा आरंभबिंदु मानणारा झिटा पक्ष आणि १४ व्या नक्षत्रातील (चित्रा मधील ) ता-यापासुन १८० अंशावर आरंभ बिंदु मानणारा चित्रा पक्ष. भारत सरकार मान्य अयनांश( तसेच दाते + लाहिरि) हे चित्रापक्षीय आहेत. १ जाने २००८ ला हे २३।५८।१६, १ जाने २००९ ला २३।५९।११ तर १जाने २०१०ला २४।००।०४ असे आहेत.

चांद्रमास २९.५ दिवसांचा असतो. चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे असते. पौर्णिमेस चंद्र ज्या नक्षत्रात असतो ( १० पैकी ९ वेळा) त्यानुसार त्यामहिन्याला नाव पडले आहे. जसे चित्रा नक्षत्रात असतो तो महिना चैत्र, श्रवण नक्षत्रात असतो तो श्रावण वगैरे. प्रत्येक चांद्र महिन्यात रवि दुस-या (पुढल्या) राशीत प्रवेश करतो. ज्या चंद्रमासात रवी दुस-या राशीत प्रवेश करणार नाही तो महिना अधिक मास म्हणुन गणला जातो. गणिताने हे आधीच काढता येते. सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यात सुमारे ११ दिवसांचा फरक पडतो. तो अधिक मासामुळे भरुन काढला जातो. त्यामुळे आपली दिवाळी साधारणतः आक्टोबर ते नोव्हेंबर याच दरम्यान असते. जर असे केले नसते तर दिवाळी दरवर्षी एक महिना मागे आली असती. आणि सण आणि ॠतु यांचा सुयोग्य ताळमेळ राहिला नसता. गणिताने फाल्गुन ते अश्विन हेच मास अधिक मास होतात. ज्या महिन्यात रविच्या दोन राशी प्रवेश होतो तो क्षय मास होतो. कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष हेच केवळ क्षयमास होतात. हा क्षयमास १९, ११९, १४४ वर्षानी येतो. हे सुद्धा गणितानेच काढले जाते. माघ मास कधीही क्षय किंवा अधिक मास होत नाही.

--अवलिया

Dhananjay Borgaonkar's picture

28 Oct 2010 - 1:25 pm | Dhananjay Borgaonkar

धन्यवाद साहेब..बरीच माहिती मिळाली.

धमाल मुलगा's picture

28 Oct 2010 - 4:04 pm | धमाल मुलगा

हॅट्स ऑफ...हॅट्स ऑफ...हॅट्स ऑफ!!!

उत्तम माहिती नाना. धन्यवाद.
काय साला, अस्सं डिट्टेलिंग पाहिजे ह्या विषयांवर. इतर विषयांवर भरपूर काही सापडते इकडं तिकडं गुगलागुगली केली तर. पण अशा विषयांवर संकल्पनेचा मुळ गाभा काय आहे, त्याचा वापर कसा केला जातो, तो तसा का केला जातो इत्यादी गोष्टी फारशा समोर येत नाहीत. मुळात त्यसाठी अशा गोष्टींचा अनुभव/अभ्यास असणंही गरजेचं आहेच म्हणा.
नाना, अशीच मौलिक माहिती आम्हाला देत रहावे ही विनंती. :)

बाकी, आम्ही दाते पंचांगच वापरतो. (बहुतेक रामदासकाका म्हणतात तसं शेजारपाजारचे 'काय अमंळ वेड** आहेत हे लोक' असं म्हणू नये म्हणून असेल किंवा समाजासोबत चालण्याची म्हणजेच समाजाशी समरस होण्याची उपजत सवय अस्ल्याने असेल कदाचित. :) )

मृत्युन्जय's picture

28 Oct 2010 - 2:35 pm | मृत्युन्जय

आम्ही तर ब्वॉ कालनिर्णय पंचांग वापरतो. :D

अमोल केळकर's picture

28 Oct 2010 - 3:24 pm | अमोल केळकर

आजकाल जोतिष क्लासमधे पण ' कालनिर्णय पंचाग ' असेल तरच प्रवेश मिळतो असे ऐकले आहे . :)

अमोल केळकर

सोलापुरचा असल्याने सोलापुरी दाते पंचांग....... प्रश्नच नाही.. :)

लग्गेच भाव खायला सुरुवात.

अडगळ's picture

28 Oct 2010 - 7:19 pm | अडगळ

आमच्या घरी हे वापरतात.

अमंळ वेड** (अडगळ)

म्हणून उत्तर भारतीय पंचांग बघा किंवा गुजराती पंचांग (उदा: जन्मभूमीचे पंचांग)बघा .
गणिताचे श्रेय सोलापूरकर दात्यांना दिलेले दिसेल.

अवलिया आणि चंद्रशेखर साहेब, छान माहिती दिलीत.
कुलकर्णी साहेब , तुम्ही हा धागा काढल्याने खूपच नवीन माहिती मिळाली, धन्यवाद.
एकोळी का असेनात पण चांगल्या चर्चेला तोंड फुटत असेल तर अशा धाग्यांचे स्वागतच आहे.

पंचांग आणि कॅलेंडर वेगवेगळे का?

विकास's picture

29 Oct 2010 - 4:55 am | विकास

पाश्चिमात्य कॅलेंडर हे दिवस-रात्र यावर अवलंबून असते आणि दिवस (वार), महीना आणि वर्ष यावर ठरते.

पंचांग म्हणजे पाच अंगांचे: तिथी, वार, नक्षत्र, (सूर्य-चंद्र) योग आणि कारण (अर्ध तिथी, म्हणजे काय ते माहीत नाही!) यावर गणिते करून तयार केलेला "कालनिर्णय" (प्रकाशन नाही) असतो.