भारतीय राज्यव्यवस्थेत राष्ट्रपती आणि राज्यसभेचे स्थान

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
26 May 2010 - 11:46 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,

मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत मी मिपावर बरेच लिखाण केले होते. त्यामध्ये 'भारतीय राज्यव्यवस्थेत राष्ट्रपती आणि राज्यसभेचे स्थान' हा लेख तयार केला होता. पण निवडणुक विषयक चर्चा आणि त्यानंतर पुण्यातून प्रस्थान आणि आय.आय.एम मध्ये गेलेले पहिले धावपळीचे वर्ष यात हा लेख मी लिहिला होता हेच विसरून गेलो. कालच अचानक त्याची आठवण झाली आणि संगणकावर शोधाशोध करून तो लेख मला मिळाला. सध्या मी गुरगावमध्ये समर इन्टर्नशीपसाठी आहे.माझे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे माझ्याकडे मोकळा वेळ आहे.लवकरच गुरगावहून मुंबईकडे प्रस्थान करायचे ठरवले आहे आणि अहमदाबादला परतण्यापूर्वी थोडाफार पर्यटनाचा बेत आहे. एकदा अहमदाबादला परत गेल्यानंतर मिपासाठी वेळ देता येणार नाहीच. तेव्हा हा लेख थोडेफार बदल करून मिपावर आजच लिहित आहे. मी शाळेत असताना शाळेच्या ग्रंथालयातून भारतीय राज्यघटनेवर एक पुस्तक वाचले होते. पुस्तकाचे नक्की नाव आणि लेखक लक्षात नाही. पण या लेखाची मुख्य प्रेरणा ते पुस्तक आहे. हा लेख मागच्या वर्षी मिपावर लिहिणे अधिक योग्य ठरले असते पण कधीच न लिहिण्यापेक्षा उशीरा लिहिला तरी वाईट नाही.

भारताने स्वतंत्र झाल्यानंतर राज्यघटना स्विकारली ती मुख्यत्वे ब्रिटिश आणि अमेरिकन राज्यघटनांवर आधारीत आहे. ब्रिटिश राज्यघटना लिखित स्वरूपात नाही आणि ब्रिटिश पध्दतीत परंपरा याच राज्यघटनेची कलमे असल्याप्रमाणे असतात. तेव्हा आपल्या राज्यघटनेत मुख्यत्वे ब्रिटिश परंपरा आणि अमेरिकन राज्यघटना यांचे प्रतिबिंब आहे.पुस्तकात म्हटले आहे की आपल्या राज्यघटनेवर जपान आणि आर्यलंडच्या घटनांचाही काही प्रमाणात प्रभाव आहे. तो नक्की कोणत्या स्वरूपात आहे याची मला कल्पना नाही.

१. आपल्या राज्यघटनेप्रमाणे भारताच्या राज्यव्यवस्थेचे स्वरूप 'गणराज्य' (रिपब्लिक) आहे. गणराज्य म्हणजे ज्या राष्ट्राचे प्रमुख लोकांनी प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे निवडून दिलेले असतात. यात राष्ट्राचे प्रमुख आणि सरकारचे प्रमुख यातला फरक लक्षात घ्यायला हवा. भारतात राष्ट्राचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात तर सरकारचे प्रमुख पंतप्रधान असतात.ब्रिटनच्या पध्दतीत राष्ट्राची प्रमुख राणी असते तर सरकारचे प्रमुख पंतप्रधान असतात. तर अमेरिकेत अध्यक्ष राष्ट्राचे आणि सरकारचे असे दोन्ही प्रमुख असतात. यात ब्रिटनमध्ये राष्ट्राचे प्रमुख वंशपरंपरागत असतात आणि निवडले जात नाहीत तर भारत आणि अमेरिकेत निवडून दिलेले असतात. भारतात राष्ट्राचे प्रमुख अप्रत्यक्षपणे तर अमेरिकेत प्रत्यक्षपणे निवडले जातात. म्हणजेच ब्रिटन हे गणराज्य नाही तर भारत आणि अमेरिका ही गणराज्ये आहेत.

२. ब्रिटनमध्ये भारतातल्या सारखी राज्ये नाहीत तर परगणे आहेत. तर अमेरिकेत राज्ये आहेत. ब्रिटनमधल्या परगण्यांना भारतातल्या राज्यांप्रमाणे व्यापक अधिकार नाहीत तर अमेरिकेतील राज्यांना भारतातील राज्यांपेक्षाही अधिक व्यापक अधिकार आहेत. किंबहुना अमेरिकेत परराष्ट्रधोरण, संरक्षण, अर्थ यासारखी खाती वगळता इतर सगळ्या खात्यांचा कारभार राज्ये बघतात (अर्थ खाते अर्थातच सामायिक आहे). भारतात राज्यघटनेप्रमाणे एकूण ९७ विषय असे आहेत ज्यावर केवळ केंद्र सरकार कायदे करू शकते, ६६ विषयांवर राज्य सरकारे आणि ४७ विषय सामायिक सुचीत आहेत. (माझ्या आठवणीप्रमाणे हे आकडे बरोबर आहेत पण वाचन करून बरीच वर्षे झाली असल्यामुळे त्यात काही चुका असायचा संभव आहेच). जर सामायिक सुचीतील विषयांवर केलेल्या राज्याच्या आणि केंद्राच्या कायद्यांमध्ये फरक असेल तर केंद्राचा कायदा राहतो. तसेच या विषयांव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयावर कायदे करायचा 'शेषाधिकार' केंद्र सरकारचा आहे. अमेरिकेत असे 'शेषाधिकार' राज्यांकडे आहेत. इतकेच काय तर प्रत्येक राज्याचे झेंडे, घटना स्वतंत्र आहेत.

या दोन मुद्द्यांवर भारतीय राज्यघटना ब्रिटिश पध्दती आणि अमेरिकन पध्दतींचे मिश्रण आहे पण भारतीय परिस्थितीनुसार त्यात बदल केले आहेत.

वर उल्लेख केल्याप्रमाणे भारतात राष्ट्रपती हे राष्ट्राचे प्रमुख असतात.पण त्यांना अमेरिकेच्या अध्यक्षांप्रमाणे व्यापक अधिकार नाहीत.तर ब्रिटनच्या राष्ट्रप्रमुखांप्रमाणे भारताचे राष्ट्रप्रमुख हे नामधारी असतात आणि देशाचा कारभार सरकार राष्ट्रप्रमुखांच्या नावाने चालवते. तरीही राष्ट्रपतींचे काही विशेषाधिकार आहेत्.त्यात निवडणुकीनंतर किंवा सत्तेत असलेले सरकार काही कारणाने सत्तेतून बाहेर गेल्यास नवे सरकार स्थापन करायला कोणाला आमंत्रित करावे हा सर्वात महत्वाचा विशेषाधिकार आहे. आपल्या राज्यघटनेत 'राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतात आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात' असे म्हटले आहे. पंतप्रधान म्हणून कोणाला नियुक्त करावे याबाबत इतर कोणतेही उल्लेख राज्यघटनेत नाहीत. राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून लोकसभेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्यालाच आमंत्रित करतील असे बहुदा घटनासमितीने गृहित धरले असावे. पण पूर्णपणे घटनात्मक विचार केला तर राष्ट्रपती कोणालाही पंतप्रधान म्हणून सरकार बनवायला आमंत्रित करून शपथ देऊ शकतात. अर्थातच असे सरकार लोकसभेत बहुमताअभावी लवकरच गडगडणार हे स्पष्टच आहे पण सरकारची स्थापना व्हायला काही अडचण येऊ नये.दुसरा विशेषाधिकार म्हणजे राष्ट्रपतींनी शपथ दिल्याशिवाय तांत्रिकदृष्ट्या कोणी मंत्री बनू शकत नाही.म्हणजे समजा एखादी व्यक्ती मंत्री बनायला योग्य नाही असे राष्ट्रपतींचे मत असेल आणि त्या कारणाने त्यांनी त्या व्यक्तीस मंत्रीपदाची शपथ द्यायला नकार दिला तर मात्र पेचप्रसंग उभा राहू शकतो. अशा प्रसंगी मार्ग काढायला सर्वोच्च न्यायालयाकडेच धाव घ्यावी लागेल. राष्ट्रपतींनी ठरविले तर ते सरकारची स्थापना होतानाच घटनात्मकदृष्ट्या मोडता घालू शकतात. उदाहरणार्थ २००९ च्या निवडणुकांनंतर राष्ट्रपती प्रतिभा पाटिल यांनी मनमोहन सिंह यांना पंतप्रधान म्हणून सरकार स्थापन करायला आमंत्रित केलेच नसते तर? किंवा 'मनमोहन सिंह माझ्यामते पंतप्रधान व्हायला योग्य नाहीत म्हणून मी त्यांना शपथ देणार नाही' असे म्हटले असते तर?

सुदैवाने भारतात अजूनपर्यंत अशी परिस्थिती आलेली नाही.

बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपतींसंदर्भात घटनासमितीपुढे बोलताना ३० डिसेंबर १९४८ रोजी म्हटले : "Under a Parliamentary system of government, there are only two prerogatives which the King or the head of State may exercise. One is the appointment of the Prime Minister and the other is the dissolution of Parliament. With regard to the Prime Minister, it is not possible to avoid vesting the discretion in the President."

यात लोकसभा विसर्जित करायचा राष्ट्रपतींचा विशेषाधिकार अमर्यादित नाही. म्हणजे उद्या राष्ट्रपतींच्या मनात आले तर त्या अचानक १५ वी लोकसभा केंद्रिय मंत्रीमंडळाच्या सल्ल्याशिवाय विसर्जित करू शकणार नाहीत. याचे कारण आपल्या पध्दतीमध्ये केंद्रिय मंत्रीमंडळ (सरकार) राष्ट्रपतींच्या नावे कारभार बघते. आणि एकदा सरकारची स्थापना झाल्यावर राष्ट्रपती केंद्रिय मंत्रीमंडळाच्या शिफारसीशिवाय स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. याविषयी अधिक याच लेखात लिहिणार आहे.

भारतात आणिबाणीदरम्यान इंदिरा गांधींच्या सरकारने ४२ वी घटनादुरूस्ती संसदेकडून मंजूर करून घेतली. त्यापूर्वी राष्ट्रपतींवर केंद्रिय मंत्रीमंडळाची शिफारस मान्य केलीच पाहिजे याचे बंधन नव्हते.राष्ट्रपती जरी स्वतंत्रपणे काही करू शकत नसले तरी केंद्रिय मंत्रीमंडळाची शिफारस अमान्य करायचा त्यांना अधिकार होता. पण ४२ व्या घटनादुरूस्तीप्रमाणे ती शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केलीच पाहिजे असे बंधन राष्ट्रपतींवर टाकण्यात आले. थोडक्यात राष्ट्रपतींचा रबरी शिक्का बनविण्यात आला. पुढे जनता सरकारने १९७८ मध्ये ४४ वी घटनादुरूस्ती करून राष्ट्रपती केंद्रिय मंत्रीमंडळाची शिफारस एकदा पुनर्विचारासाठी केंद्रिय मंत्रीमंडळाकडे परत पाठवू शकतात पण मंत्रीमंडळाने तिच शिफारस पुन्हा केल्यास ती मान्य करायचे बंधन राष्ट्रपतींवर घातले. आजपर्यंत तीन वेळा राष्ट्रपतींनी अशी शिफारस मंत्रीमंडळाकडे पुनर्विचारासाठी पाठवली आहे. राष्ट्रपती नारायणन यांनी १९९७ मध्ये उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट आणायची गुजराल सरकारची शिफारस तर १९९८ मध्ये बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट आणायची वाजपेयी सरकारची शिफारस परत पाठवली होती. वाजपेयी सरकारने फेब्रुवारी १९९९ मध्ये बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट आणायची तीच शिफारस परत राष्ट्रपतींना केल्यानंतर ती नारायणन यांना मान्य करावी लागली. तसेच 'लाभाचे पद' संबंधीचा कायदा राष्ट्रपती कलाम यांनी मनमोहन सिंह सरकारकडे परत पाठवला.

तरीही राष्ट्रपतींवर अशी शिफारस मान्य करायची कालमर्यादा राज्यघटनेत नाही. राष्ट्रपतींनी सरकारला त्रास द्यायचे ठरविले तर त्यांनी अशा शिफारसीवर काहीही निर्णय न घेता ती पाडून ठेवली तर सरकारने संसदेतून पास करून घेतलेले कोणतेच विधेयक कायदा होऊ शकणार नाही आणि सरकारला कारभार करणे कठिण होईल.

सरकारची अशीच अडचण राज्यसभा स्वतंत्रपणे आणि राष्ट्रपती आणि राज्यसभा मिळून करू शकतात. राज्यसभेच्या सभासदांची निवड राज्य विधानसभांचे सदस्य करतात. पूर्वी राजीव गांधी आणि वाजपेयी पंतप्रधान असताना केंद्रात सत्ताधारी असलेल्या पक्षांचा विविध राज्यांमध्ये एकामागोमाग एक पराभव झाले. राजीव गांधींच्या पक्षाचा १९८५ मध्ये पंजाब आणि आसाम, १९८७ मध्ये हरियाणा, केरळ आणि पश्चिम बंगाल तर १९८९ मध्ये तामिळनाडूत पराभव झाला. तर वाजपेयी सरकारचा १९९८-९९ च्या पहिल्या इनिन्गमध्ये त्यांच्या पक्षाचा दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये तर १९९९-२००४ च्या इनिन्गमध्ये २००० साली बिहारमध्ये, २००१ मध्ये तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये तर २००२ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये पराभव झाला. आता अशा विरोधी पक्षांचे प्राबल्य असलेल्या राज्य विधानसभांमधून अर्थातच विरोधी पक्षाचे सदस्य राज्यसभेवर अधिक प्रमाणात निवडून जातील. अशा वेळी सत्ताधारी पक्षाचे लोकसभेत बहुमत आणि राज्यसभेत विरोधी पक्षांचे बहुमत अशी परिस्थिती येऊ शकते. सरकार लोकसभेला जबाबदार असते राज्यसभेला नाही त्यामुळे राज्यसभेत सरकारचा पराभव झाला तरी सरकारवर राजीनाम्याचे बंधन नाही.

राज्यसभा सरकारवर अविश्वासाचा ठराव पास करू शकत नाही.तसेच अर्थविधेयकावर केवळ लोकसभेची मंजुरी आवश्यक असते. पण या दोन गोष्टी सोडल्या तर राज्यसभा लोकसभेइतकीच बलिष्ठ आहे.कारण सरकारने आणलेले अर्थविधेयक वगळता इतर कोणतेही विधेयक लोकसभेबरोबरच राज्यसभेत मंजूर व्हावे लागते. उदाहरणाच्या सोयीसाठी लोकसभेत ५४० (५४५ ऐवजी) सदस्य आहेत असे समजू. राज्यसभेत २५० सदस्य आहेतच. समजा सत्ताधारी पक्षाला लोकसभेत काठावरचे बहुमत आहे-- सत्ताधारी पक्षाचे लोकसभेत २७२ तर विरोधी पक्षाचे २६८ सदस्य आहेत. तसेच राज्यसभेच्या २५० पैकी सत्ताधारी पक्षाचे १०० तर विरोधी पक्षाचे १५० सदस्य आहेत असे समजू. अशी परिस्थिती सत्ताधारी पक्षाचा विविध राज्यांमध्ये पराभव झाला तर येऊ शकते. आता विरोधी पक्षांनी आडमुठेपणा केल्यास लोकसभेत सरकारने आणलेले विधेयक मंजुर झाले तरी राज्यसभेत मात्र नामंजूर होईल. यावर उपाय म्हणजे दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक घेणे आणि त्यात ते विधेयक मंजुर करून घ्यायचा प्रयत्न करणे. अशा संयुक्त बैठकीत सत्ताधारी पक्षाचे ३७२ तर विरोधी पक्षाचे ४१८ सदस्य असतील. म्हणजे अशा संयुक्त बैठकीतही ते विधेयक नामंजूर होणार! म्हणजेच अर्थ विधेयक सोडून प्रत्येक विधेयकाची राज्यसभा वासलात लावू शकेल आणि सरकारला कारभार करणे कठिण होईल(हे त्या पुस्तकातील शब्द आहेत).

राज्यसभेचे सदस्य लोकसभेच्या सदस्यांबरोबरच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करतात. वरील परिस्थितीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचा उमेदवार निवडून यायची शक्यता आहेच. असे राष्ट्रपती आणि राज्यसभेतील बहुमतवाला पक्ष यांचे सख्य झाले तर ते सरकारसाठी मोठी डोकेदुखी निर्माण करू शकतात (पुस्तकातील शब्द). त्यातून सरकारात असलेल्या पक्षाने राष्ट्रपतींविरूध्द महाभियोग आणून त्यांना पदावरून दूर करायचा प्रयत्न केला तर त्यातही राज्यसभेच्या सदस्यांना मतदान करायचा अधिकार असल्यामुळे राष्ट्रपतींना पदावरून हटविणेही सरकारात असलेल्या पक्षाला शक्य होणार नाही.

हे सगळे कल्पनारंजन वाटू शकते. पण गेल्या काही वर्षांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील तेढ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. २००२ मध्ये एन.डी.ए चा एकामागोमाग एक राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव होत होता तेव्हा ही परिस्थिती सत्यात उतरणार की काय असे मला वाटले होते. २००२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी एन.डी.ए कडे मोठ्या राज्यांमध्ये (आणि म्हणून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अधिक वजन असलेल्या) केवळ आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, हरियाणा आणि ओरिसा विधानसभांमध्ये बहुमत होते.तसेच हिमाचल प्रदेश आणि गोवा विधानसभांमध्ये काठावरचे बहुमत होते. पण तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तिसगड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि पंजाब या मोठ्या प्रदेशात विधानसभांमध्ये विरोधी पक्षांचे प्राबल्य होते.त्यावेळी एन.डी.ए ने कलामसाहेबांसारखा ’विरोध करता न येण्याजोगा’ उमेदवार आणला म्हणून ठिक झाले नाहीतर राष्ट्रपतीपदाची निवडणुक अटीतटीची होऊन एन.डी.ए च्या उमेदवाराचा पराभव होणे अशक्य नव्हते. त्यावेळी वर उल्लेख केलेली परिस्थिती यायचा संभव होताच.नशीबाने ते तसे झाले नाही. पण भविष्यात तसे होणारच नाही असे खात्रीने सांगता येणार नाही.

तेव्हा या लेखाचा उद्देश म्हणजे भविष्यात चुकूनमाकून अशी वेळ आली तर क्लिंटनचा लेख लक्षात ठेवा ही विनंती ;) आणि दुसरे म्हणजे अशा पळवाटा प्रत्येक पध्दतीत निघू शकतात आणि कोणतीच पध्दत दोषांपासून मुक्त नाही. तेव्हा देशातील राजकारणाचा अभ्यास करताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आंबेडकरांनी म्हटले होते की नुसती राज्यघटना चांगली असून उपयोग नाही. ती राबविणारे लोक जर परिपक्व नसतील तर ते सर्वोत्कृष्ट राज्यघटनेचा पराभव करू शकतात. असो.

विल्यम जेफरसन क्लिंटन

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

26 May 2010 - 12:45 pm | Dhananjay Borgaonkar

माहितीपुर्ण लेख. बर्‍याच नवीन गोष्टी कळाल्या.
धन्यवाद.
धनंजय बोरगांवकर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 May 2010 - 12:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इतर 'क्लिंटन-लेखां'सारखा आणखी एक महितीपूर्ण लेख!

अदिती

ऋषिकेश's picture

26 May 2010 - 2:04 pm | ऋषिकेश

लेख छान.
घटनेत कुठून काय मिळवले आहे याच्या माहितीसाठी "एक ऐतिहासिक घटना भाग -१" सुचवतो.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

अमोल नागपूरकर's picture

26 May 2010 - 2:50 pm | अमोल नागपूरकर

तसेच 'लाभाचे पद' संबंधीचा कायदा राष्ट्रपती नारायणन यांनी मनमोहन सिंह सरकारकडे परत पाठवला.
हा कायदा राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांनी मनमोहन सिंह सरकारकडे परत पाठवला होता.

अमोल नागपूरकर's picture

26 May 2010 - 2:59 pm | अमोल नागपूरकर

तसेच राज्यसभेचे वैशिष्ट्य म्हणजे ते कायम सभाग्रुह आहे. राज्यसभा कोणीच आणि कधीही भंग करू शकत नाही.
तसेच माझ्या माहितीप्रमाणे दहशतवादविरोधी विधेयक पोटा हे वाजपेयी सरकारच्या काळात लोकसभेत मन्जूर झाले होते. पण राज्यसभेत सरकारला बहुमत नसल्याने ते नामन्जूर झाले. तेव्हा एन डी ए सरकारने दोन्ही सभाग्रुहान्ची संयुक्त बैठक बोलावून ते मन्जूर करून घेतले. अर्थात उभय सभाग्रुहे मिळून त्याना पुरेसे बहुमत असल्यानेच ते शक्य झाले.

स्वाती२'s picture

26 May 2010 - 8:11 pm | स्वाती२

माहितीपूर्ण लेख आवडला.

भारद्वाज's picture

26 May 2010 - 9:28 pm | भारद्वाज

एवढ्या माहितीपूर्ण लेखासाठी धन्यवाद.
जय हिंद जय महाराष्ट्र

सुमीत भातखंडे's picture

26 May 2010 - 9:41 pm | सुमीत भातखंडे

महितीपुर्ण लेखाबद्दल धन्यवाद

क्लिंटन's picture

26 May 2010 - 9:55 pm | क्लिंटन

लेख आवडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. मिपाकरांचे अनुकूल प्रतिसाद नेहमीच उत्साह वाढवणारे असतात.

ऋषिकेश आपण दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद. तो दुवा आता वाचतोच. तसेच अमोल, लेखातील चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. नारायणन १९९७ ते २००२ दरम्यान राष्ट्रपती होते आणि मनमोहन सिंह २००४ पासून पंतप्रधान आहेत. तेव्हा नारायणन राष्ट्रपती असताना मनमोहन सिंह पंतप्रधान नव्हते. आवश्यक बदल करत आहे.

सर्वांना धन्यवाद.

विल्यम जेफरसन क्लिंटन

शिल्पा ब's picture

26 May 2010 - 11:19 pm | शिल्पा ब

माहितीपूर्ण लेख...यातील खुपश्या गोष्टी माहिती नव्हत्या...धन्यवाद.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

हुप्प्या's picture

27 May 2010 - 2:20 am | हुप्प्या

माझ्या मते राष्ट्रपती हे पद हे एक अनावश्यक पांढरा हत्ती आहे. अफाट खर्च, आलिशान राहणी, दौरे, सुरक्षा, पेन्शने ह्या कारणांकरता अब्जावधी रुपये खर्च होतात. त्या मानाने काम अगदीच नगण्य असते.
कायदेशीर बदल करून हे नामधारी, भपकेबाज पद नष्ट करून त्याचा अधिकार सुप्रिम कोर्टाचा न्यायाधीश वा अन्य कुठल्या पदाला देता येणार नाही का?

अब्दुल कलामांसारखे कुठलेतरी क्षेत्र गाजवून आलेले राष्ट्रपती एक वेळ चालतील पण प्रतिभा पाटील, झैलसिंग, नीलम संजीव रेड्डी, नारायण ह्या प्रकारची अतिसामान्य मंडळी उत्तम रबरस्टँप आहेत म्हणून राष्ट्रपती बनली.

असल्या पदाची खरोखर गरज आहे का? मला वाटते नाही.

Manoj Katwe's picture

27 May 2010 - 6:12 am | Manoj Katwe

प्रतिभा पाटील यांच्याकडे बघून तर हे पद म्हणजे सत्कार, समारंभ, उद्घाटन करण्याचेच जास्त वाटते. हे स्त्री खरच ह्या पदाला लायक आहे का ? आज पण ती बेजिंग मध्ये उद्घाटन करायला गेली आहे. आणि काय तर तिथे जाऊन हिंदी चीनी भाई भाई ह्या गप्पा मारणार आहे. मागे कधीतरी तिने सुखोई मधून हवाई प्रवास केला होता आणि त्यावेळेस पुण्यात आली होती २-३ दिवसांसाठी, काय एकशे एक बातम्या, नातवंडे काय, जेवायला पुरण पोळी काय.
ह्या पदावर नेहमीच असले पळपुचाट बसवितात हेच खरे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2010 - 12:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सॉरी. प्रतिभा पाटील दर २-३ महिन्यांनी पुण्यात येतात, पुण्याच्या रस्त्यावरून प्रवास करतात आणि आम्हां पुण्यात रहाणार्‍या सामान्यांना दरवेळी वेठीस धरतात. सोन्याच्या पिंजर्‍यातून राष्ट्रपतींनी बाहेर येऊ नये आणि बाहेर आलेच तर 'रस्त्यावर येऊ नये' असा कायदा का करत नाहीत?

अदिती

नितिन थत्ते's picture

27 May 2010 - 7:35 am | नितिन थत्ते

>>पद नष्ट करून त्याचा अधिकार सुप्रिम कोर्टाचा न्यायाधीश वा अन्य कुठल्या पदाला देता येणार नाही का

राष्ट्रप्रमुख हे पद सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशासारख्या 'निवडून न येणार्‍या' व्यक्तीकडे असणे चुकीचेच आहे.

कुठले तरी क्षेत्र गाजवलेला माणूस चांगला राष्ट्रपती होत नाही. अब्दुल कलाम यांनीही राष्ट्रपती म्हणून काही भरीव कार्य केल्याचे ऐकिवात नाही. (कोणत्याही कृतीचे पाठबळ नसलेली 'असे करता येईल- असे करायला हवे' या सारखी इन्स्पिरेशनल भाषणे करणे याला मी भरीव कार्य समजत नाही).

नीलम संजीव रेड्डी हे रबरस्टँप राष्ट्रपती नव्हते. उलट त्यांना डावलून इंदिरा गांधिंनी वी वी गिरी यांना राष्ट्रपती बनवले होते. रेड्डी हे जनता सरकारच्या काळात राष्ट्रपती झाले होते.

नितिन थत्ते

हुप्प्या's picture

27 May 2010 - 7:51 pm | हुप्प्या

नीलम संजीव रेड्डीनी काय भरीव काम केले आहे म्हणे?
अब्दुल कलामांनी भारताकरता बरेच काही केले आहे. ते करून राष्ट्रपती बनून स्फूर्तीदायक भाषणे केली तर काही हरकत नाही. उगाच कुणीतरी थोपवून ह्या पदावर बसवले आणि लागले भाषणे द्यायला यापेक्षा हे बरे.

एकंदरीत ह्या पदाला ठोस काही करायला वावच नाही. अडचणीचा प्रसंग आला तरच काही. पण तोही अगदी क्वचित.

चार पाच वर्षातून एकदा काहीतरी काम आहे म्हणून आलिशन घर, अफाट सुरक्षा, परदेशी दौरे, जन्मभर पेन्शन असे सगळे थाटमाट करणॅ योग्य आहे का? एखाद्या खाजगी कंपनीत असे होते का? लोकशाही आणि पंतप्रधानपद असणार्‍या सर्व देशात असले खुळचट, दिखाऊ, खर्चिक पद असते का?

ऋषिकेश's picture

27 May 2010 - 11:32 pm | ऋषिकेश

एखाद्या खाजगी कंपनीत असे होते का?

मुळात राष्ट्रपतीची खाजगी कंपनी मालकांशी तुलनाच चुक वाटली. तरीही अंबानी घ्या अथवा बिल गेट्स .. खाजगी कंपन्यांच्या प्रमुखाचे असे लाड होतात बॉ

लोकशाही आणि पंतप्रधानपद असणार्‍या सर्व देशात असले खुळचट, दिखाऊ, खर्चिक पद असते का?

पद खुळचट वगैरे किती दे वैयक्तीक मत झालं. त्याबद्दल बोलु शकत नाहि. मात्र काहि देशांत असे पद दिसते. जसे ब्रिटनमधे राणीला प्रमुख मानतात.. पण गंमत अशी की कॅनडा व ऑस्ट्रेलिया बरोबर एकूण १६ देश अजूनही ब्रिटनच्या राणीलाच राष्ट्रप्रमुख मानतात व तत्सम पद त्यांच्याकडे आहे.
थोडी अधिक माहिती इथे मिळेल

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

हुप्प्या's picture

28 May 2010 - 12:19 am | हुप्प्या

फारसे काही काम न करता अफाट पगार, सोयी सुविधा मिळतात हे बिल गेट्स आणि अंबानीबद्दल लागू होत नाही. त्यांच्या अफाट संपत्तीबरोबर अफाट जबाबदार्‍याही येतात. दोघांनी आपापल्या कंपन्याना यशाच्या शिखरावर नेले आहे.
इथे प्रतिभाताई पाटलांनी भारताकरता काय केले?

खाजगी कंपनीची तुलना याकरता केली की जबाबदारी आणि मोबदला, सन्मान यांचे प्रमाण इतके व्यस्त असणे देशाला तोट्याचे आहे. देश कुण्या व्यक्तीला पोसत असेल तर त्याचे देशाला मिळणारे योगदान प्रमाणात आहे हे विचारण्यात काहीही गैर नाही.

इस्रायलमधे असे पद आहे का? फ्रान्स? इटली? तुर्की? इंग्लंडमधले राणीचे खूळही हळूहळू कमी होत आहे असे वाटते. उदा. राणीला कर भरावा लागतो.
पूर्वी नव्हता.
कॅनडा, ऑस्ट्रेलिया हे देश कागदोपत्री राणीला प्रमुख मानत असतील. पण ते तिला, तिच्या राजवाड्याला आणि अन्य लव्याजम्याला आपले पैसे देऊन पोसतात का?

ऋषिकेश's picture

28 May 2010 - 4:58 pm | ऋषिकेश

इथे प्रतिभाताई पाटलांनी भारताकरता काय केले?

इथे व्यक्तीनिष्ठ चर्चा नसून राष्ट्रपती काय करतात असा प्रश्न हवा असे वाटते.
बाकी प्रत्येक देशाची आपली एक पद्धत असते. आणि प्रत्येक पद्धतीत स्वतःचे फायदे-तोटे असतात. एका देशाची अमुक पद्धत आहे यावरून आपल्या देशाची पद्धत ठरवण्यात काय हशील?
आपली राज्यघटना ठरवताना प्रत्येक प्रश्नावर सविस्तर उहापोह झाला आहे. प्रत्येक छोटा मुद्दा चर्चिला गेला आहे आणि मग घटना समिती नी हे पद निर्मिले आहे. तेव्हा फक्त पटत नाहि म्हणून "खुळचट" ठरवण्याआधी ते का केले आहे याचा शोध घेतला असतात व मग मत मांडले असते तर तुमच्या मताला आपोआप बळ मिळाले असते.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

विकास's picture

28 May 2010 - 7:36 am | विकास

सर्वप्रथम चांगला लेख.

लेख वाचताना नीलम संजीव रेड्डी आणि व्हि व्हि गिरींच्या मधे झालेल्या चुरशीच्या लढतीची आठवण झाली. ज्या मधे इंदिरा गांधींनी व्हि व्हि गिरींना (अनधिकृत उमेदवारास) निवडून आणून दिले. बर्‍याच अंशी ही भारताच्या राजकीय आणि काँग्रेस पक्षाच्या अजूनच र्‍हासाची सुरवात होती. वाचनावरून आठवते त्याप्रमाणे, यशवंतरावांनी तेंव्हा बाईंना त्यांच्या बाजूने मत देईन म्हणून शब्द दिला आणि तो पाळला नाही. बाईंनी आयुष्यभर त्यांच्यावर त्यावरून डूग धरला आणि कधीच आपले समजले नाही....याच गिरीसाहेबांच्या जिंकण्यावरून आणि त्यांच्या ११ मुलांवरून आचार्य अत्र्यांनी दुसर्‍या दिवशीच्या पेपरात संपूर्ण कुटूंबाचा फोटो देत "व्हि व्हि गिरींची कामगिरी" असे शिर्षक दिले होते. ;)

नंतरच्या फक्रुद्दिन अली अहमद यांना बळजबरीने आणिबाणी जाहीर करायला लावली असे आरोप वाचले होते. अर्थात त्यांचे त्याच काळात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने बरेच काही बोलले जायचे... पण तो दुसरा भाग होता जेंव्हा राष्ट्रपती रबरस्टँप झाले. ते वर लेखात क्लिंटन यांनी विस्तॄत सांगितलेले आहेच.

बाकी वर हुप्प्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर आहे, "इस्त्रायलमध्ये पण राष्ट्रपती पद अशाच प्रकारचे आहे." अर्थात ते इतरत्र आहे का नाही यावर आपण ठेवावे का नाही हे अवलंबून नसावे. आपल्यासाठीची उपयुक्तता आपणच ठरवून आपल्याला योग्य निर्णय आपण घ्यावेत असे वाटते. त्या अर्थाने तो एक वेगळ्या चर्चेचा विषय ठरेल, ज्यात बाजूने आणि विरुद्ध विचार करता येऊ शकतील. ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

क्लिंटन's picture

28 May 2010 - 11:41 am | क्लिंटन

चर्चेत भाग घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. हुप्प्या, विकास, ऋषिकेश यांनी काही मुद्दे मांडले आहेत त्यावर माझा प्रतिसाद.

सर्वप्रथम हे स्पष्ट केले पाहिजे की हा लेख राज्यघटनेतील तरतुदी आहेत त्यावर आहे. काय व्हायला हवे किंवा काय योग्य ठरेल यापेक्षा सध्याच्या राज्यघटनेत काय आहे हा मूळ लेखाचा उद्देश आहे.

हुप्प्या यांनी म्हटले आहे की राष्ट्रपतीपद हे पैशाचा अपव्यय आहे. नुसता दिखाऊपणा, भपका यावर इतके पैसे खर्च करायची काय गरज आहे. त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशासच राष्ट्रपती पाच वर्षांनी एकदा वापर करतात ते अधिकार द्यायला काय हरकत आहे!

कोणत्याही लोकशाही पध्दतीत योग्य ते checks and balances असावे लागतात. मला वाटते आपल्या पध्दतीत ते योग्य प्रकारे आहेत. संसद, सरकार आणि न्यायव्यवस्था ही तीन महत्वाची अंगे आहेत आणि त्यांचा एकमेकांवर control असतो.

१. संसदेचे लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती (तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रपती हे संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसले तरी संसदेचा भाग समजले जातात) हे तीन घटक आहेत.

सरकार लोकसभेला जबाबदार असते आणि सरकारवर अविश्वास प्रस्ताव मान्य करून लोकसभा सरकारला सत्तेतून बाहेर करू शकते. मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे राज्यसभेलाही बरेच अधिकार आहेतच्. सरकारने केलेल्या कोणत्याही विधेयकाचे राष्ट्रपतींनी सही केली नाही तर कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही तसेच पंतप्रधानांची नियुक्ती हा राष्ट्रपतींचा विशेषाधिकार असतो. त्या अर्थी संसदेची दोन्ही सभागृहे आणि राष्ट्रपती सरकारवर नियंत्रण ठेवतात.

राज्यांमधील उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. तसेच उच्च न्यायालयातील आणि सर्वोच्च न्यायालयातील कोणाही न्यायाधीशाविरूध्द संसदेची दोन्ही सभागृहे महाभियोग पास करून त्यांना पदावरून हटवू शकतात. अशाप्रकारे संसदेचे (दोन सभागृहे आणि राष्ट्रपती) यांचे न्यायव्यवस्थेवर नियंत्रण असते.

२. सर्वोच्च न्यायालय सरकारने आणलेला कोणताही कायदा घटनेच्या तत्वांना धरून नसेल तर तो रद्दबादल करू शकते. आणि त्यासाठी इतर कोणी मागणी केली नाही तरी न्यायालय स्वतःहून दखल घेऊन (suo moto) अशी कारवाई करू शकते. अशाप्रकारे न्यायव्यवस्थेचे सरकारवर नियंत्रण असते.

न्यायव्यवस्थेचे संसदेवर नियंत्रण तितके डायरेक्ट नसते. तरीही सर्व संसद सदस्य भारताचे नागरिक असतात आणि ज्याप्रकारे न्यायव्यवस्था सर्व नागरिकांवर (त्यांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केल्यास) कारवाई करू शकते त्याप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या संसद सदस्यांवरही करू शकते.

३. राष्ट्रपती न्यायाधीशांची नियुक्ती सरकारच्या सल्ल्यानेच करतात. अशा पध्दतीने सरकारचे न्यायव्यवस्थेवर नियंत्रण असते.

तसेच सरकारचे लोकसभेत बहुमत असल्यामुळे बहुतांश कायदे सरकारच्या मान्यतेशिवाय पास होऊ शकत नाहीत. तेव्हा सरकारचे संसदेवर नियंत्रण नसले तरी लोकसभेत असलेल्या पाठिंब्याचा वापर करून आपल्याला हवे ते बदल घडवून आणू शकते.

अशा पध्दतीने तीन घटक थोड्याबहुत प्रमाणावर एकमेकांवर नियंत्रण ठेवतात.

यापैकी राष्ट्रपती हा घटक संसद आणि सरकार, संसद आणि न्यायव्यवस्था आणि सरकार आणि न्यायव्यवस्था यामधील दुवा असतो हे वरील उदाहरणावरून दिसतेच. या कारणाने न्यायव्यवस्थेतीलच एखादी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून असल्यास ती व्यक्ती न्यायव्यवस्थेच्च्या बाबतीतील दुव्याची भूमिका पूर्णपणे नि:पक्षपातीपणे पार पाडणार नाही असे म्हणायला वाव आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेतील व्यक्ती त्या पदावर असतानाच राष्ट्रपती होणे योग्य नाही असे मला वाटते.

तसेच राष्ट्रपतींची भूमिका पाच वर्षांमधून एकदा असे वरकरणी वाटते. पण देशाचे घटनात्मक प्रमुख या नात्याने भारताचा अधिकृत दौरा करणारा इतर कोणत्याही देशाचा राष्ट्रप्रमुख राष्ट्रपतींची भेट घेतोच. तसेच कोणत्याही विधेयकावर सही करण्यापूर्वी राष्ट्रपती सरकारकडून अधिक माहिती मागविणे, त्यासंबंधी संबंधित मंत्र्यांच्या भेटी घेणे यासारखे प्रकार करतातच. अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना न्यायदानाविषयीची इतर कामे असताना या इतर कामांना पूर्ण वेळ देता येईल का?

तसेच आपल्या पध्दतीत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचा कार्यकाल कधीकधी १२ दिवस (के.एन. सिंग हे मुख्य न्यायाधीश १९९१ मध्ये १२ दिवस त्या पदावर होते) तर कधी ७ वर्षे (न्या.चंद्रचूड १९७८-१९८५ या काळात मुख्य न्यायाधीश होते) असतो. त्यांच्या निवृत्तीचे वय ६५ असल्यामुळे हे होते. देशाच्या घटनात्मक प्रमुखाचा कार्यकाळ ठरलेला नसेल तर ते योग्य आहे का?

राष्ट्रपतींवर इतका खर्च करणे योग्य आहे का हा मुद्दा वादाचा विषय होऊच शकत नाही. राष्ट्रपतीच काय तर मंत्री-खासदार सुध्दा जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी करत असतात. त्यावर बंधने येणे गरजेचे आहेच. पण ते पद मुळातच काढून टाकणे योग्य नाही असे मला वाटते.

Canada, Australia या देशांमध्ये इंग्लंडची राणी ही देशाचे घटनात्मक प्रमुख असली तरी गव्हर्नर जनरल हे राष्ट्रपतीला समकक्ष पद असतेच. तेव्हा संसदिय लोकशाही असलेल्या देशात हे पद या ना त्या स्वरूपात असतेच.

कलाम साहेबांनी राष्ट्रपती म्हणून मोठे भरीव कार्य केले नाही असे थत्ते साहेबांनी म्हटले आहे. मलाही तसेच वाटते. राष्ट्रपतीपदापेक्षा एक scientist म्हणून त्यांनी केलेले काम नक्कीच अधिक महत्वाचे आहे. एका क्षेत्रात भरीव काम करणारी व्यक्ती इतर क्षेत्रांमध्येही तेवढेच योगदान देऊ शकेल असे नाही. तेव्हा या दोन भूम्मिकांची सरमिसळ न केलेली चांगली. नेहरूंनी सी.व्ही.रामन यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊ केले होती असे वाचनात आले आहे. पण रामन यांनी आपण राष्ट्रपती भवनापेक्षा बंगलोरच्या Indian Institute of Science मध्ये अधिक चांगले काम करू शकू असे म्हणून उमेदवारी नाकारली. अर्थात याविषयीचा संदर्भ माझ्याकडे नाही. मागे असे वाचल्याचे मला आठवते. असो.

क्लिंटन

arunjoshi123's picture

19 May 2014 - 7:02 pm | arunjoshi123

लै भारी लेख.

नया है वह's picture

3 Nov 2015 - 2:26 pm | नया है वह

+१