विपश्यना ध्यान शिबिरात भुताटकी ?

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in दिवाळी अंक
11 Nov 2012 - 12:16 pm

header

नुकतेच कोल्हापूरच्या विपश्यना केंद्रात शिबिर साधनेला जाणे झाले. त्या काळातील काही आठवणींवर आधारित लेख.
दहा दिवसांकरिता मौन व्रत. संतुलित मित आहार. पहाटे चार ते रात्री नऊपर्यंत ठरावीक आखीव कार्यक्रम. साधनेतून आपल्या विचारावर लक्ष साधून नंतर सर्व शरीरातून एक संवेदनेची लहर उत्पन्न करायचे तंत्र शिकणे, हा या शिबिराचा उद्देश होता. त्या वेळच्या घटनात मौनाने आणखी गुंतागुंत वाढली...
ती रात्र होती सहाव्या दिवसाची...
साधनेच्या कार्याला आता जारीने सुरुवात झाली होती. पूज्य गोएंकांच्या मधुर वाणीतून व साधनेतील खाचाखोचा सांगितल्या जात होत्या.
पाली वाणीतून ते अनेक श्लोक व अभंग सादर करत. आता पाली भाषेतील 'अनिच्छ' म्हणजेच 'अनित्य'. 'सव्व' म्हणजे 'सर्व', अशा शब्दांशी जवळीक साधली जात होती. 'क्षणोक्षणी घडून संपणारे हे जग अनित्य आहे. मग सुख व दुःखदेखील असेच अनित्य आहे, तर असा अनित्य जीवन प्रवास शरीराद्वारे होतो. त्यातून निघणार्‍या संवेदनाही अशाच अनित्य आहे, याची जाणीव क्षणोक्षणी होऊन काही केल्या झोप येत नव्हती...
...एरव्ही न सुचणार्‍या अनेक विचारांचे काहूर माजले होते. पहाटे पहाटे जरा झापड आली असावी. इतक्यात... इतक्यात एकदम जोरात ओरडल्याचा आवाज झाला... काय असावे? असे क्षणभर वाटले. पण नंतर सामसूम होती. म्हणून मी जरा साशंकपणे काय झाले असेल की मलाच आभास झाला असावा, असा विचार करत असता, पुन्हा जोरात ओरडल्याचा आवाज झाला. आता खात्रीच झाली की आवाजाचा आभास नाहीत... नक्कीच कोणीतरी मदतीची हाक देत आहे. मी मच्छरदाणीतून बाहेर आलो. बॅटरी हातात घेऊन माझ्या खोलीचे दार उघडून बाहेर आलो. खरे तर माझ्याबरोबर खोलीत राहणार्‍यालाही उठवावे काय, असे वाटले, पण मौनाचे बंधन होते. मग कशाला उठवा, असे मनात म्हणत मी शेजारच्या खोलीच्या पायर्‍या चढून दरवाज्याशी थांबलो. एकदा वाटले की जर कोणी साप किंवा असे काही कॉटखाली लपून जाताना पाहून ओरडले असेल तर त्याला मदत हवी. पण आवाज केला तर ते पळून जाईल म्हणून, आतला आवाज शांत असावा...

मौनाचा भंग न व्हावा, पण मी बाहेर मदतीला आहे असे सूचित करायला मी खाकरून दरवाज्यावर हळुवार टकटक केली व वाट पाहत राहिलो. तो एकदम अचानक आतून दरवाजा झटकन उघडला गेला... “कोण? ... कोण आहे?...” असे म्हणत, अर्ध्या चड्डीतील तेथील साधक एकदम बाहेर आला. बॅटरीच्या प्रकाशात पाहत मला म्हणाला, “छे!, छे! कुठे काय? सर्व ठीक आहे!”
तो जागा झाला आहे व घाबरलेला नाही असे पाहून त्याला खालच्या स्वरात मी म्हटले, “आपल्याला काही आवाज आला का? कारण मला या खोलीतून दोनदा ओरडल्याचा आवाज आला, म्हणून विचारायला आलोय.”
असे म्हणत, आश्चर्य करत मला विचारले,
“किती वाजलेत?” त्याच्या एकंदरीत आवेशावरून कदाचित त्याला वाटले असावे की, मी काही कारणाने घाबरून गेल्यामुळे, धास्तावल्याने जरा तंद्रीत आहे. मला जरा ताळ्य़ावर आणायला त्याने विचारले असावे. “किती वाजले?”
चारला काही मिनिटे कमी आहेत असे मी म्हणता, ‘जागे आहेत बरं का' याची खात्री वाटून ते म्हणाले, “बरं! बरं!”
त्यांनी पटकन दार बंद करायच्या आधी मी त्यांच्या खोलीतील दुसर्‍या साथीदाराच्या कॉटकडे पाहत होतो. त्यावर ते म्हणाले, “ते काय झोपलेत ना”
“ठीक आहे” असे म्हणत मी पुन्हा रूमवर आलो व खोलीत येऊन जरा आडवा झालो तोवर...
टंण्ण... टंण्ण.... थाळावर पहाटे चारचे टोल वाजायला लागले व डोळ्यावरील झापड उतरवत साधकांची हालचाल सगळीकडे व्हायला लागली. 'किण किण... किण किण' .... बारीक आवाजाची घंटा त्या नीरव शांततेत आपले अस्तित्व दाखवून दुर्लक्ष करून पुन्हा जरा पांघरुणात घुसलेल्यांना सताड जागे करायला पुरेशी होती.
तो आवाज व ती घटना मी नंतर विसरलो होतो. पण ते प्रकरण तसे थांबणारे नव्हते! शिवाय मलाही त्या प्रकरणाचा तलास लावायची उत्सुकता होतीच.

एकदम रागावलेल्या स्वरात कोणी बोलतेय की काय, असे परतायच्या अगदी एक दिवस आधी वाटायला लागले. आता तर दिवसा हा आवाज! तोही मलाच फक्त येतोय की काय? असे वाटून मी सावधपणे त्यावर लक्ष ठेवायला लागलो, तर तो आवाज वाढतच होता. एकाचे दोन आवाज झालेले... आता दोन आवाज येतायत. बापरे ... पण मग आधीचा पहिला आवाज जरा मऊ झालेला आहे, त्याला कारुण्याची झाक आहे, असे वाटायला लागले. बुद्धाच्या भूमीतील साधना शिवारातील भुतेपण कारुण्यभावनेने ओथंबलेली असतात की काय, असे वाटून मी आश्चर्य करीत होतो व पूज्य सत्यनारायण गोएंकाजींच्या प्रभावी वाणीने भुतांचा स्वरही कातर झाल्याचे वाटून मला भगवान गौतम बुद्धांबद्दल आदर दुणावला!
आवाजाचे हे गूढ आता मला फार आव्हानात्मक झाले. काय आहे त्याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे, असे वाटून मी खोलीच्या बाहेर आलो. अन पाहतो तो काय! पांढर्‍या रंगाचा एक दांडगा रानबोका आपली शेपटी ताठ करून, त्यावरी सर्व केस फिस्कारून भलताच रोमँटिक मूडमध्ये होता! उदी रंगाच्या मैत्रिणीशी जवळीक करायच्या बेतात असावा! त्या वेळी मी नेमका पोहोचल्याने त्याने मला पाहून असा काही तीव्र आवाज काढला अन डोळे फाडून पाहत जणू काही म्हणाला, 'समझता नही क्या बे? चल भाग जा! असा रागीट सुरात सल्ला देऊन शेपटीचा पिसारा झाडून तिच्या कातर आवाजाला साद द्यायला लागला.
'हा हंत हंत! ... नाही नाही, चालू देत तुमचे! असे मी उगीचच पुटपुटत खोलीत वळलो व हसून त्या आवाजाच्या रहस्याचा असा पर्दाफाश झाला असे म्हणून हवाईदलातील विमाने शत्रुपक्षाच्या नरडीचा घोट घेऊन परतताना जे समाधान व्यक्त करतात, तसे उगीचच वाटले खरे....
तरीही हे प्रकरण तसे संपलेले नव्हते! कारण जो साधक ओरडला असे मला उगीचच वाटत होते, त्याला सत्य परिस्थिती सांगणे महत्त्वाचे होते. दहावा दिवस झाला तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की मौन व्रत आता फक्त शांती पठारावर व शून्यागारातील व धम्महॉल क्रमांक २मध्ये लागू राहील, अन्य ठिकाणी तुम्हाला सकाळी १०नंतर बोलायला परवानगी आहे. दहा वाजले अन सर्वांना कंठ फुटला. मीही घसा साफ करून घेतला. तेवढ्यात शेजारच्या खोलीतील ती व्यक्ती दिसली. पांढरा शर्ट व खाली लेंगा, दहा दिवसाची दाढी वाढलेली जरा गावठीपणाची झाक... त्यांना तो आवाज बोक्यांचा होता असे हसून म्हटल्यावर, “असं का? बरं, बरं” म्हणून थंडा प्रतिसाद दिला व ते गेले. त्यानंतर आपापले सामान, सेलफोन, पैसे, पर्सेस, गोळा करायची धांदल झाली. नंतर अचानक शेजारच्या खोलीतील त्या ग्रहस्थांच्या बरोबर राहणार्‍या व्यक्तीची ओळख झाली.
ते म्हणाले, “मी आपल्याशी बोलायला आलोय.” त्यांनी केलेला खुलासा ऐकून मी थक्क झालो. नंतर विचार करत राहिलो की नक्की खरे काय? ...
.... नंतर अकराव्या दिवशी ते, - ज्यांचे नाव पुढे, “मी दिलीप आठवले” म्हणून त्यांनी सांगितले - आणखी एक वयस्कर साधक अन मी, एकाच ट्रेनमधून समोरासमोर बसून गप्पा मारत होतो. त्या वेळी त्यांनी आम्हाला पुन्हा सविस्तर सांगायला सुरुवात केली, ते दिलीप आठवले म्हणाले, “सर, पहाटेच्या वेळी काढलेला आवाज बोक्यांचा आवाज होता असे तुम्ही ज्याला म्हणालात, तो बोक्यांचा आवाज नव्हता! तो त्याच साधकाचा - माणसाचा - होता! अहो काय सांगू! मी शिबिरात उशिरा दाखल झालो. तोवर मौनाला सुरुवात झाली होती. मला फक्त किल्ली, पांघरुणे व खोली क्रमांक सांगितला गेला. मीही गुपचूप गेले दहा दिवस काढले. पण अहो, सुरुवातीला माझी अशी काही बोबडी वळली की काही विचारू नका! रात्रीच्या वेळी आसपासच्या जंगलातील विविध प्राण्यांच्या कळपांच्या आवाजांनी मनात धडधड व्हायची! अहो, अगदी त्या निरुपद्रवी मोरांच्या केकाटणार्‍या आवाजाने भीती वाटायची राव! अहो, पहिले काही दिवस मी या शिबिरात कुठून आलो, असे कोसत होतो. नेमके मलाच का या माणसाशेजारी राहायला दिले गेले? त्यातही ही इमारत शेवटची! त्यात माझी खोली शेवटची! नंतर कुंपणापल्याड सर्व जंगल!
त्यात काही डाव होता की काय? त्यात सोबतीला दिला गेलेला असा साधक! चोर दरोडेखोरांनादेखील शिबिरातून साधना करायला देतात, म्हणून ऐकलं होतं. बहुतेक अशाच कोणा एकाला या कोपर्‍यातल्या खोलीत ठेवलेले असावे असा माझा पक्का संशय झाला होता! त्यांचे नाव मला काल कळले. ते होते शिरोटे म्हणून! पहिल्या रात्री झोपल्यावर ते असे काही आवाज काढायला लागले! मला आधी कळेना की, कोण आवाज काढतंय ते! पलीकडून आपणच ते काढताय की काय असे मला कधीकधी वाटले! बरं, सांगायची सोय नाही! मौनाचा खाक्या! धम्मसेवकांना सांगावे काय, असे वाटून दोन दिवस तग धरली. ते काय आवाज काढतायत ते कळत नसे, पण ते ओरडून काही बोलत असावेत! मग पुढे मला हळूहळू लक्षात आले की हा 'उखने उठणे' म्हणजे झोपेत बोलणारे व कधी चालणारे म्हणून जो प्रकार असतो, तसा यांचा प्रकार आहे. आमच्या गावाकडं आमचं एक पावणं असेच गाव चाव़डीवर जे काही दिवसा घडे, ते रात्री झोपेत मोठ्याने बडब़डत असत. तुम्ही असे का करता आम्हाला भ्या वाटतं, म्हणून त्यासनी सांगितलं तर त्यांचा विश्वास बसत नसं. “म्या कुठं आसं करतोय?” ते म्हणत. तसाच यांचा प्रकार असावा, असे मला लक्षात आले. एकदा हे आमचे पावऩे लग्नाला म्हणून मुंबईला गेले. परतताना रात्री टेंपोच्या ड्रायवरनी म्हटलं, “आता रातचं दोन वाजल्यात. मला झ्वाप येतिया. वाईच झोपतो मग जाऊ पहाटेच्या येळला गावाकड. त्या तासाभरात आमच्या पावन्याला उखनं उठलं अन् ते झालं गायब. बिना परवान्याचा चालक पहाट व्हायला लागली तसा वऱ्हाडाला घेऊन सोलापूरला परतला. घरची दोन लोक नंतर तीन दिवसांनी पावऩ्यांना पकडून यश्टींने घेऊन आले. अशीच तऱ्हा त्यांची.
मग मी जरा सरावलो. पण तुम्ही ज्या दिवशी बॅटरी घेऊन आलात, तेव्हा मात्र कहर झाला! फारच जोरात ते ओरडले होते! जे आवाज तुम्ही ऐकलेत तो मीही ऐकले! डोक्यावर पांघरूण घेऊन, डोळे किलकिले करून मी ते पाहत होतो! तुम्ही आल्यागेल्याचे, बोलल्याचे मी ऐकत होतो. नंतर तुम्ही बोक्याचे ते आवाज होते म्हणून त्यांना सांगितल्यावर ते बरं बरं म्हणाले, तेही मी ऐकले. पण तो खरा प्रकार असा होता!
विपश्यना शिबिरातील भुताटकीवरील तुमचा किस्सा एका लेखातून सुनवेन, असे मित्र दिलीप आठवल्यांना पुण्यात स्टेशनवर निरोप घेताना म्हटले होते. ते आज मिसळपाववर दिवाळी अंकातून साकार झाले.
“पण सर, तो शिबिरातील आत्महत्या करायला जाणार्‍याचा किस्सा सांगायचा राहिलाय बरं का”
असे त्यांनी हात हालवत नजरेआड व्हायच्या आधी म्हटले. मी म्हणालो, “वो किस्सा फिर कहीं, फिर कभी.”

footer

प्रतिक्रिया

आनंदी गोपाळ's picture

14 Nov 2012 - 10:29 pm | आनंदी गोपाळ

दिवाळी अंकातल्या प्रत्येक लेखास प्रतिसाद होते. यालाच नव्हता. म्हणुन दिला. विपस्सना केल्याबद्दल हबिनन्दण!

शशिकांत ओक's picture

16 Nov 2012 - 1:15 am | शशिकांत ओक

विपस्यना तर चुपचाप होत होती असे किस्से घडले म्हणून ध्यान केंद्र लक्षात राहीले...

एक गोपाळ असतो. तो आनंदी असतो!

आनंदी असतो तो प्रत्येक गोपाळ नसतो....

शशिकांत ओक's picture

21 Nov 2012 - 1:06 pm | शशिकांत ओक

मित्रांनो, नेहमी ओकांच्या (नाडी) वर घसरणारे एकदम शांत कसे? असे एकांनी फोन करून विचारले.... मिपाकरांवर भुताटकी तर झाली नाही ना?

नावातकायआहे's picture

22 Nov 2012 - 12:16 am | नावातकायआहे

मिपाला सुतक आहे.

पैसा's picture

21 Nov 2012 - 7:53 pm | पैसा

रानमांजरे जोरात ओरडल्यासारखा आवाज खरेच भयानक वाटतो!

शशिकांत ओक's picture

27 Mar 2014 - 2:49 am | शशिकांत ओक

या निमित्ताने दिलीप आठवले यांची मजा आठवून त्यांचे व्यक्ति चित्र समोर आले पिंपरी भागातील एका कॉलेज मधे लॅब असिस्टंट असलेले दिलीप कथालेखक, शाहीर आहेत. डी वाय पाटील साहेबांचा नजरेत यायला त्यांच्या पोवाडे गायच्या कलेमुळे शाबासकी मिळवता आली. शाहिरांच्या सध्याच्या हालाकीच्या जीवनावर अभ्यास करून कादंबरी व सिनेलेखन करायचा त्यांनी चंग बांधला आहे. शासकीय नोकरीतून दहा दिवसांसाठी खास रजा मिळते. त्या साठी शेवटच्या दिवशी बरीच झुंबड असते...