लग्न पत्रिकेतील मुलासाठी 'चिरंजीव' व मुलींसाठी 'चि.सौ.कां.' असा भेदभाव का?
सध्या लग्नांचा सिझन चालू आहे..पत्रिका छापताना मुलासाठी केवळ 'चिरंजीव' आणि मुलीसाठी चिरंजीव 'सौभाग्यकांक्षिणी' असा भेद का? चिरंजिवित्व तर प्रत्येकालाच हवं असतं हे एक वेळ मान्य केलं तर मुलीसाठी "सौभाग्यकांक्षिणी" असा वेगऴा उल्लेख का? मला कोणतीही पत्रिका वाचताना असा प्रश्न पडतो की सौभाग्याची आकांक्षा करताना ती मुलगी लग्नाआधी दुर्भागिनी असते आणि लग्नानंतर नशीबवान होते, असा काही आपल्या परंपरेला व्यक्त करायचेय का? तुम्हालाही असा प्रश्न कधीतरी पडला असेल. तसं असेल तर आईवडील आपल्या मुलीला दु:खातच ठेवतात आणि सासरचे सुखातच ठेवतात, असे म्हणण्याचे धाडस आपण करू शकू?
हे असं का, याचा थोडक्यात उहापोह करणारा हा लेख.
'सौभाग्यकांक्षिणी' या शब्दाचा भाग्य, सुख वैगेरे गोष्टींशी जया आपल्या पटकन लक्षात येतो तसा संबंध नाही..येथील सौभाग्य या शब्दाची फोड 'सु-भग' अशी आहे..'भग' या शब्दाचा अर्थ "स्त्री-जननेंद्रीय" असा आहे..भगिनी शब्दाचा जन्म यामुळेच झालाय..
सौभाग्यकांक्षिणी म्हणजे, पतिसौख्य भरपूर व शेवटपर्यंत मिळो अशी इच्छा असणारी स्त्री..त्यातून संतती निर्माण व्हावी हा त्यामागील हेतू..ही तर प्रत्येक लग्नोत्सूक मुलीची इच्छा असणे अगदी नैसर्गिक आहे..व म्हणून ती 'सौभाग्यकांक्षिणी.' त्यात ती अर्थार्जनासाठी पतीवर अवलंबून व म्हणूनही ती 'सौभाग्यकांक्षिणी'..ज्योतिष शास्त्रातील गुणमेलन वा पत्रिकेतील मंगळ या दोन गोष्टी संपूर्णपणे शरिरसंबंधांचाच-त्यातही स्त्रीच्या- विचार करतात..!!
आपल्या समाजात वेश्या ही कायमची सौभाग्यवती मानली जायची ते यामुळेच..तीला नगराची पत्नी या अर्थाने 'नगरवधू' म्हणतात..वेश्येला वैधव्य नाही..
आपल्या समाजाची रचना पाहाता पुरूषाला अशी इच्छा धरण्याची काहीच गरज नसते..तो सामाजीक व नैसर्गीक दृष्ट्या मोकळाच असतो..नवरा असणं आणि तो टिकवणं ही आपल्या समाजात स्त्रीचीच जास्त गरज होती व काही प्रमाणात आजही आहे..म्हणून तर तो व्यसनी, आजारी कसाही असला तरी स्त्री त्याची सेवा करताना दिसते त्यामागील मोठे कारण हेच असतं..आता परिस्थिती बदलतेय व या बदलामागील सर्वात महत्वाच कारण, स्त्रीचं स्वत:च्या पायावर उभं राहाणं हेच आहे..स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाली आणि तिच्यावरची बंधनं हळुहळू कमी होऊ लागली..नव-याचा धाक व गरज कमी होऊ लागली हे तीच्या शिक्षणाने व नोकरीने तिच्यात निर्माण केलेलं धैर्य..विवाहबाह्य संबंध वाढू लागले हे याचं एक बायप्राॅडक्ट..
विवाह, लग्न वैगेरे शब्द अगदी अलिकडे प्रचारात आले..पुर्वी लग्नासाठी 'शरिरसंबंध' असा रोखठोख शब्द पत्रिकेवर वापरला जायचा हे तुमच्याही वाचनात आलं असेल कुठेतरी..
..आता बदललेल्या परिस्थितीनुसार पत्रिकेवर मुलगा-मुलगी या दोघांनाही 'चिरंजीव' म्हणायला हरकत नाही. 'सौभाग्यकाक्षिणी' हा शब्द आपल्या त्यावेळच्या सामाजीक परिस्थितीचा निदर्शक आहे, त्याला तसा काहीच अर्थ आता राहीलेला नाही..पण गतकाळाची आठवण म्हणून तसा राहायलाही हरकत नाही..
खुप आहे लिहिण्यासारखं पण आता थांबतो..
-गणेश
प्रतिक्रिया
24 Apr 2015 - 12:42 pm | होबासराव
सदस्यकाळ
20 hours 32 min
24 Apr 2015 - 1:29 pm | पॉइंट ब्लँक
मांडणी आवडली. कालानुरुप होणार्या बदलाचे भान ठेवून लेख लिहला हे विशेष :)
24 Apr 2015 - 1:39 pm | काळा पहाड
बंधू आणि भगिनींनो मधल्या भगिनींनो या शब्दात कालानुरूप बदल करावा काय?
24 Apr 2015 - 1:57 pm | पॉइंट ब्लँक
प्रश्न समजला नाही? थोडं स्पष्टीकरण द्याल काय?
24 Apr 2015 - 2:01 pm | टवाळ कार्टा
ते भाईयों और उनकी बहनों या टैप चे वाक्य आहे पण आपण ते चुकीच्या अर्थाने वापरतो असे म्हणायचे आहे त्यांना
24 Apr 2015 - 2:55 pm | काळा पहाड
:-)
म्हणजे दर वेळी भगिनींनो म्हणताना जर खरा अर्थ धरायचा झाला तर तो शब्द खरं तर अशिष्ट वाटायला हवा नाही का? म्हणून.
24 Apr 2015 - 3:19 pm | पॉइंट ब्लँक
अशिष्ट ही तुम्ही कोणत्या संस्कृतीनुसार बोलतात त्यावर अवलंबून आहे . हिंदुत्ववाद दोन( कमीत कमी) प्रकारचे आहेत. एक ६०० वर्षापुर्वीचा ज्याला कशाचे वाकडे नाही आणि एक वि़क्टोरीयन (ज्याला आपण सध्या हिंदुत्व समजतो) ज्यात बर्याच गोष्टी अशिष्ट आहेत.
बाकी लेखकाचे मत जाणून घ्यायला आवडेल.
24 Apr 2015 - 2:05 pm | कविता१९७८
.नवरा असणं आणि तो टिकवणं ही आपल्या समाजात स्त्रीचीच जास्त गरज होती व काही प्रमाणात आजही आहे..म्हणून तर तो व्यसनी, आजारी कसाही असला तरी स्त्री त्याची सेवा करताना दिसते त्यामागील मोठे कारण हेच असतं..
बरोबर आहे, आजही बर्याच स्त्रिया छळ , मारहाण सहन करत राह्तात, खेड्यापाड्यात तर नवर्याने बाहेर रंग उधळले तरीही गप्प बसतात आणि बाकीच्या बायका नवर्याने इतका त्रास दिला तरी ती नवर्याला सोडुन गेली नाही अशी तिची वाहवाई करतात.
24 Apr 2015 - 2:10 pm | पैसा
मिपावर स्वागत! लिहीत रहा!
24 Apr 2015 - 2:37 pm | राही
भग म्हणजे भाग्यही.शिवाय भग म्हणजे सुदैव, कीर्ती, भरभराट, उत्कर्ष, सौंदर्य असेही अर्थ शब्दकोशात आहेत. चराति चरतो भगः ह्या वचनातला भग हा भाग्य या अर्थाने आहे. भगवान हाही शब्द तसाच. भगवान ह्या शब्दाचा अर्थ भाग्यवंत असा मानला तर त्याचे स्त्रीलिंगी रूप भगवती हेही याच अर्थाचे मानावे लागेल. केवळ स्त्रीलिंगापुरता भोक हा अर्थ घेणे व्याकरणशुद्ध नाही. मराठीमध्ये भोक हा शब्द सध्या काही प्रदेशांत जरी अशिष्ट मानला जात असला तरी काही वर्षांपूर्वी तो शिष्ट होता आणि त्याचा अर्थ कुठलेही मोठे छिद्र असा होता.काही ठिकाणी तो अजूनही खुलेपणाने वापरला जातो. शास्त्रज्ञ न्यूटनची म्हणून सांगितल्या जाणार्या 'दोन मांजरीसाठी दोन वेगवेगळी छिद्रे' या गोष्टीतही भोक हाच शब्द वाचल्याचे आठवते. भग वरूनच हा शब्द आला हे तर उघडच आहे. भगिनी मध्ये तो विशिष्ट अर्थ असू शकेल पण सौभाग्यमध्ये मात्र सुदैव, उत्कर्ष हाच अर्थ संभवतो. तसेही त्या विशिष्ट अर्थाने पाहाता वधूपेक्षा वरालाच सौभाग्यकांक्षी हे विशेषण योग्य ठरेल.
24 Apr 2015 - 2:44 pm | कैलासवासी सोन्याबापु
इतका डिटेल विचार केला नाय कधी आम्ही फ़क्त माळ घातली ! तरीही आम्ही आमच्या चिंचोक्याचा हे आपले चिसौकां चा मान ही ठेवतो!! घरच्या लक्ष्मीला धड़ वागवले नाही तर वाड्याची रया जाते ही आमच्या बापाची शिकवणी! तितकीच पाळतो अन
मस्त चालालय आमचं!!
26 Apr 2015 - 5:03 pm | माम्लेदारचा पन्खा
चिंचोका........... अरे देवा.........:-))
24 Apr 2015 - 3:05 pm | अजया
वेगळेच अर्थ कळले रोजच्या वापरातल्या शब्दाचे की किती संदर्भ बदलु शकतो!लेख आवडला.पुलेशु.
24 Apr 2015 - 3:06 pm | अजया
वेगळेच अर्थ कळले रोजच्या वापरातल्या शब्दाचे की किती संदर्भ बदलु शकतो!लेख आवडला.पुलेशु.
24 Apr 2015 - 4:00 pm | रवीराज
'भग' या शब्दाचा अर्थ "स्त्री-जननेंद्रीय" असा आहे..भगिनी शब्दाचा जन्म यामुळेच झालाय..
मग बंधू शब्दाचा जन्म कसा झाला?
24 Apr 2015 - 9:02 pm | बहुगुणी
या कालबाह्य (आणि अर्थबाह्य!) संकल्पना जितक्या झपाट्याने नष्ट होतील तितकं बरं असं वाटतं.
बाकी या निमित्ताने शोध घेतला तर काही आधिक (आणि काही मजेशीर) माहिती मिळाली.
पुराणाप्रमाणे म्हणे 'भग' हे अदिति-पुत्र १२ आदित्यगणांपैकी एकाचं नाव.
इन्द्र, धातृ, भग, त्वष्टा, मित्र, वरुण, अर्यमन्, विवस्वत्, सवितृ, पूषन्, अंशुमत्, विष्णु
'भग' याचे इतर देश/भाषांमध्येही काही अर्थ आहेत.
वरती राही यांनी म्हंटल्याप्रमाणे 'भग म्हणजे भाग्य' हाच अर्थ मला इतकी वर्षे पत्रिका पहातांना अभिप्रेत होता.
अवांतरः
"मला मजेशीर वाटलेली माहिती" म्हणजे पुराणानुसार देव, दैत्य, राक्षस ही सगळी मंडळी मूळ common उत्पत्ति असलेली होती आणि नंतर चक्क भाउबंदकी होऊन सृष्टीनिर्मिती वगैरे झाली असं या दुव्यांवरून दिसतं.
ब्रम्हाचा नातू कश्यप (मरिचीचा पुत्र) याचं लग्न प्रजापति दक्षाची एक पुत्री अदिती हिच्याशी होऊन त्यांना झालेले १२ पुत्र म्हणजे आदित्यगण. दक्षाला ५३ मुली होत्या, त्यांपैकी १० मुलींचा धर्माशी, १३ मुलींचा महर्षि कश्यपांशी (यांतील एक अदिति*), २७ मुलींचा सोम देवाशी, एकीचा पितरांशी, एकीचा अग्निशी आणि एकीचा शंकराशी असे विवाह झाले.
*अदितीच्या बहिणींपैकी दनुचे पुत्र दानव आणि दितीचे पुत्र दैत्य.
30 Apr 2015 - 5:13 pm | कपिलमुनी
हे तुमचे वैयक्तीक मतं आहे की याला काही रेफरन्स आहेत ?
30 Apr 2015 - 6:26 pm | स्वाती२
सुभग या शब्दातील भग हा शब्द भाग्य या अर्थाने येतो. पुरुषासाठी सुभग आणि स्त्री साठी सुभगा. राम जोशी यांची सुप्रसिद्ध लावणी - सांग सखे सुंदरी कुणा ग सुभगाची मदन मंजिरी.
30 Apr 2015 - 8:36 pm | सूड
भग ही पूर्वाफाल्गुनी नक्षत्राची अधिष्ठात्रीदेवता आहे म्हणे.
1 May 2015 - 12:23 am | धर्मराजमुटके
हल्ली भेदभाव शोधायची फॅशनच आलीये. तशीच भेदभाव मिटवायची देखील. जेव्हा दोन पुरुषांचं किंवा दोन स्त्रियांचं लग्न होईल तेव्हा लग्नपत्रिकेवर भेदभाव राहणार नाहि. काळजी करु नका.
हॅ ! हॅ ! हॅ ! पुर्वी मानव कपडे घालत नव्हता असेही वाचलेय हो कुठेतरी. मग काय करायचं म्हणता ?
का बरे ? चिरंजीवी का नाही ? नेहमी पुरुषवाचक शब्द का वापरायचे ?? आणि मग ब्राईड आणि ग्रुम साठीही जाता जाता काही शब्द सुचवा बरे !
1 May 2015 - 2:04 pm | तिमा
लेख अजिबात पटला नाही. विशेषतः भगिनी व सौभाग्य या शब्दांचा लेखकाने लावलेला अर्थ अनाकलनीय आहे.
याला निश्चित पुरावे असतील तर द्या , नाहीतर नुसता 'भ' शब्द जाहीरपणे उच्चारायची भीति वाटेल.