सध्या उन्हाळी शिबिरांचे खूप च फॅड आहे (आपण लहान असताना नव्हते असले काही शिबीर वगैरे म्हणून म्हणाले फॅड) .
माझा मुलगा तीन वर्षाचा आहे , तर त्याला या उन्हाळी शिबिरांमध्ये घालावे कि न घालावे हा मोठा प्रश्न आहे , बाकी चे लोक घालत आहे म्हणून आपण पण घालावे कि ती सध्या गरज आहे हेच कळत नहिये.
बर्याच ठिकाणी अशी हि परिस्थिती आहे कि आई वडील दोघे हि नोकरी करणारे असल्याने मुलां कडे सुट्ट्यांमध्ये कोण लक्ष देणार म्हणून त्याला पर्याय उन्हाळी शिबिरे.
उन्हाळी शिबिरांमध्ये खूप नवीन गोष्टी शिकवल्या जातात , रचनात्मक नवीन वस्तू निर्मिती वगैरे वगैरे … पण खरेच हे गरजेचे आहे का …कि मुलांनी प्रत्येक वेळेस काही तरी शिकायलाच हवे .
सुट्ट्यांमध्ये सुद्धा त्यांनी शिस्त पाळावी, शिबिरांमधील उपक्रम जो घरी पूर्ण करण्यासाठी दिला आहे(जसा शाळेतील होमवर्क ) तो पूर्ण करावा.
मुलांनी मनमोकळे पणे खेळावे , कोणाचेही कसलेही बंधन नसावे , सुट्टीचा मनमुराद आनंद लुटावा असे पालकांना वाटत नाही का ? प्रत्येक गोष्टीत स्पर्धेचा विचार का करावा , तुझ्या वर्गातल्या मुलांनी अमका क्लास लावला , मग तू पण जा त्या क्लासला , तमक्याने पोहण्याचा क्लास लावला मग तू पण जा पोहायला . त्याने बघ चित्रकलेचा क्लास लावला होता मागच्या उन्हाळ्यात तर या वर्षी त्याला शाळेत चित्रकलेमध्ये बक्षीस मिळाले, मग तू हि या वर्षी सुट्ट्यांमध्ये जा क्लासला . अशा मानसिकतेने मुलांना शिबिरात पाठवणे किती योग्य आहे ?
माझे तर असे मत आहे कि मुलांना त्यांच्या मर्जीने खेळू द्यावे . बाहेर ऊन आहे म्हणून संगणक वर गेम न खेळू देता काही बैठे खेळ आपण त्यांच्याबरोबर खेळावे. मुलांची खरे च काही नवीन शिकायची इच्छा असेल तर जरूर अशा क्लासेस ला घालावे पण जबरदस्तीने नव्हे, कारण वर्षभर शाळा , शाळेतील अभ्यास , लावला असेन तर ट्युशन या मध्ये ते आपल्या आवडीचा क्लास नाही करू शकत , अश्या परिस्थितीत सुट्ट्यांमध्ये हे साध्य करता येईल . काही ठिकाणी तर हे शिबीर तर फक्त पैसा मिळवण्याचे साधन झाले आहे आणि काही पालकांची तर अशी हि मानसिकता बनत चालली आहे कि त्यांची मुले उन्हाळी शिबिरात जातात हे एक मोठे स्टेटस आहे. काही पालकांची अशी हि स्थिती आहे कि पाल्य घरी बसून टीव्ही पाहणार किंवा मग संगणकावर गेम खेळणार त्यामुळे डोळे बिघडणार त्यापेक्षा शिबिराला पैसे गेले तरी चालेन पण आपले पाल्य तिथेच अडकलेले बरे . जर अशी परिस्थिती असेल तर पालकांचा शिबिरात घालण्याचा हा निर्णय बरोबर कि चूक ? या वर कृपया मार्गदर्शन करा .
काही ठिकाणी अशीही परिस्थिती आहे कि , पालकांना वाटते कि अमका जातोय त्या क्लासला , मग आपले पाल्य मागे पडेन ,अशा वेळी काही पालक तर शिबिराचे शुल्क जास्त असूनही आपल्या पाल्यांना शिबिरात घालतात , हा खर्च अनाठायी नाही का ?
ज्या क्षेत्रात मुलांना आवड आहे तिथे खर्च करण्यास काहीच हरकत नाही पण प्रत्येक गोष्टीत स्पर्धेचा विचार करून किंवा शेजार्याने घातले शिबिरात किंवा कार्यालयातील सहकार्यांनी पण घातलेय शिबिरात मग मी का नको घालू या हेतूने केलेला खर्च किती रास्त आहे.
कृपया जर माझे काही मुद्दे पटले नसतील तर त्यावर जरा प्रकाश टाका आणि मार्गदर्शन हि करा .
प्रतिक्रिया
17 Apr 2015 - 10:37 am | सुबोध खरे
तीन वर्षाच्या मुलाला कसले शिबीर लावता आहात. या शिबिरातून आईबापाना मानसिक समाधान सोडले तर काही फायदा होत नाही असे मला वाटते. (चार पैसे खर्च केले म्हणजे मुलासाठी काही तरी केल्याचे समाधान.)
त्याच पैशात त्याला हॉट व्हील्स, टेबल टेनिसची, BADMINTON ची रैकेट सारखी खेळणी आणून द्या. आजूबाजूच्या मुलांना जमवून खेळू द्या.
17 Apr 2015 - 10:50 am | स्वीत स्वाति
पण मी फक्त माझ्या मुलासाठी न विचारता जनरली मते मागितली आहे.
17 Apr 2015 - 10:38 am | जेपी
.
17 Apr 2015 - 10:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
बालमानसशास्त्राचा तुमच्या एवढा सखोल अभ्यास नसल्यानी प्रतिक्रिया देणे टाळतो. आपला सल्ला योग्यचं असेल.
17 Apr 2015 - 11:17 am | स्वीत स्वाति
ते चुकीचेही असू शकते त्या बद्दल मार्गदर्शन करावे हि विनंती .
17 Apr 2015 - 11:35 am | टवाळ कार्टा
मग "ञ" करा ;)
17 Apr 2015 - 11:30 am | टवाळ कार्टा
अर्रे जेपीची पियच्चडी हाये त्येत ;)
17 Apr 2015 - 11:55 am | स्वीत स्वाति
:-))
17 Apr 2015 - 10:59 am | अजया
हे सर्व माहिती असूनही तुम्हाला मुलाला शिबिराला का पाठवायचा विचार करता आहात? तीन वर्ष म्हणजे तर फार लहान मूल आहे.
माझ्या मुलाला चौथीत असताना त्याने स्वतःहुन नाट्यशिबिराला जायचा हट्ट केला होता.पुण्याच्या बालभवनमध्ये त्याच्या एका भावाबरोबर जाऊन त्याने पाहिले होते.ते अावडल्याने तो मागे लागला होता.पंधरा दिवसाचे शिबिर त्याने आनंदाने पूर्ण केले.मात्र त्याचवेळी पोहोण्याचा क्लास लावलेला मात्र पूरा केला नाही,इन्स्ट्रक्टर उड्या मारायला सांगायचा आणि न मारणार्याची सगळे मिळुन गंमत बघत.त्याला घाबरुन! त्यापुढच्या सुट्टीत मग मीच त्याला रोज नेऊन पोहायला शिकवले.
तात्पर्य एवढेच की जरा मोठा झाला की तोच सांगेल मला जावंसं वाटतं तिथे पाठवा.जबरदस्तीने आपल्याला वाटतं म्हणून नकोच शिबिरं.
17 Apr 2015 - 11:14 am | स्वीत स्वाति
उपयुक्त सल्ला..
17 Apr 2015 - 11:13 am | स्वीत स्वाति
माझी अशी अपेक्षा आहे कि शिबिरांचे काही चांगले फायदे हि असतील जे मला माहित नाही, कारण अनुभव नाही तर ज्यांना चांगले अनुभव आले असतील त्यांनी ते शेअर करावे आणि माझ्या लेखात ज्या गोष्टींचा विचार केला गेला नाही त्या गोष्टींवर प्रकाश टाकावा .
मी फक्त माझे मत मांडलेले आहे , ते चुकीचेही असू शकते त्या बद्दल मार्गदर्शन करावे हि विनंती .
17 Apr 2015 - 11:23 am | कंजूस
फार विचार करता आहात.पहिली ते सातवी एका उन्हाळी सुट्टीत पाठवा दरवर्षी नको.पूर्वी मामा मावशांकडे मुले राहून दंगामस्ती करायचीच ना?मला एकासुद्धा शिबिराला पाठवले नाही असे मुलाने म्हणायला नको आणि अमुक मार्कस पडले तरच पाठवेन हा अट्टाहास कशाला ?हा एक नवीन मुद्दाही घ्या.कोणत्या शिबिरास कितव्या वयास पाठवावे अशी चर्चा अधिक संयुक्तिक वाटते मला आताच्या काळात.आहेत पैसे आणि चिमटा तर बसत नाहीये ना?
17 Apr 2015 - 11:59 am | अद्द्या
फक्त ३ वर्षाच्या मुलाला कसलं शिबीर?
आणि एकुणातच फक्त "मी शिबिरासाठी इतके पैसे खर्च केले" या पलीकडे त्यातून काही साध्य होईल असं वाटत नाही (यालाही काही अपवाद असतील . माझ्या आले नाहीत ) .
त्यापेक्षा त्यांना मस्त एखाद्या गावी फिरायला घेऊन जा . आणि अगदीच त्याला /तिला काही शिकवायची हौस असेल तर चांगला गुरु पकडून तिथे पाठवा . मग ते खेळायला असलं तरी चालेल . तुम्ही नक्की कोणत्या गावात आहात नाही माहित . पण माझ्या मते तरी त्याला मस्त आराम एकदा शाळा सुरु झाली कि आहेच परत दिवसभर रगडगाडा
17 Apr 2015 - 12:07 pm | कैलासवासी सोन्याबापु
नका हो नका!!! सोळा वर्षांची होइस्तोवर पोरांना कश्याला "परफॉरमेंस" चे लोढ़णे गळ्यात अडकवावे ? हे माझे वैयक्तिक मत आहे!, अहो फुलपाखरे ती बागडु द्या त्यांना , धड़पड़ीतुन शिकु द्या, ते गुण कायमचे अंगी बाणवले जातील
असे एकंदरीत माझे मत पड़ते आहे
17 Apr 2015 - 12:23 pm | पिलीयन रायडर
अजिबात लावु नका.. मलाही ३ वर्षाचा मुलगा आहे. एकतर दिवसभर काय वाटेल ते करु देत.. मुलांना फार आवडतं ते..
आणि दुसरं म्हणजे मी तरी त्याला मस्त पैकी दोन्ही आजी-आजोबा, जमल्यास काका-काकु ज्यांची भेट होत नाही आणि त्यांना लहान मुलही आहे वगैरे नातेवाईकांकडे पाठवणारे. रहातो तो. आजी-आजोबांकडे एकटाही राहिल २ दिवस.. बाकी नातेवाईकांना आपण भेटुन यायच किंवा त्यांच्या मुलांना आपल्याकडे सोडा म्हणायचं.. सगळी मुलं एकत्र आली तर २ दिवस रहातात. आम्ही पण लहानपणी सुट्टी लागली की त्याच रात्री आजोळी जायचो.. संपुर्ण सुट्टिभर सगळ्या नातेवाईकांकडे फिरत रहायचो.. मग शाळा सुरु व्हायच्या आदल्या दिवशी नाईलाजाने घरी यायचो.. सुट्टी असतेच काका- आत्या- मामा-मावशीकडे जाण्यासाठी... तेव्हा नाही गेलो तर कधी जाणार?
शिवाय इथे आम्ही फ्लॅट मध्ये रहातो.. पण गावी बंगले (स्वतंत्र घरं) आहेत सगळ्यांचे.. त्याची मजा वेगळी असते.. कॉलनी, अंगण, आपली प्रायव्हेट गच्ची, घरातली झाडं.. त्यावर चढणं.. मावशीकडे तर मागे विहीर पण आहे.. हे सगळं पुण्यात नाही मिळणार माझ्या मुलाला.. मग तो आजी कडॅ जाउण दिवसभर कॉलनीतल्या पोरांसोबत खेलतो.. कुणाकडेही जातो.. जेवतो.. आईबद्दल चकार शब्द काढत नाही.. ४-४ दिवस..!!! उन्हाळी शिबिर किस झाड की पत्ती ह्या आनंदा समोर!!
17 Apr 2015 - 1:38 pm | खेडूत
असेच म्हणतो.
खास आवड असलेल्या गोष्टीसाठी तसा क्लास शोधून काढावा. सर्व खेळ आणि कलांसाठी सिंगल विंडो सोल्युशन नको.
कधी कधी पालकांना मुलांसाठी वेळ नसतो. त्यातून येणाऱ्या अपराधीपणामुळे पालक त्याना शिबिरात पाठवतात. शिबिरे त्यांच्यासाठीच डिझाईन केलीत असं वाटतं.
वर्षभर सुट्ट्या साठवून मुलांच्या सुट्टीत आपण घ्याव्यात. दोघे नोकरी करत असतील तर वेगळ्या काळात सुट्ट्या घ्याव्यात आणि जास्तीजास्त दिवस मुलांबरोबर भरपूर वेळ घालवावा. कुठे फिरायला जायचं असेल तर एकत्र सुट्टी घेऊन जाता येते.
मुलांना नाती- नातेवाइक कळण्यासाठी जवळच्या नात्यातील लोकांकडे सुट्टीत काही काळ घालवणे उपयुक्त ठरते.
17 Apr 2015 - 1:33 pm | अत्रन्गि पाउस
मुलांनी मनमोकळे पणे खेळावे , कोणाचेही कसलेही बंधन नसावे , सुट्टीचा मनमुराद आनंद लुटावा असे पालकांना वाटत नाही का ? प्रत्येक गोष्टीत स्पर्धेचा विचार का करावा
प्रचंड पटलेले आहेच
मुलांनी आणि पालकांनी हे २ शब्द वगळून सुद्धा वरील ओळ वाचावी
17 Apr 2015 - 1:48 pm | वेल्लाभट
पहिल्यात पहिले म्हणजे तीन वर्ष हे शिबिरात वगैरे पाठवायचं वय नाही. (माझ्या मते)
योग्य वय झालं, की चांगल्या शिबिरात काही दिवस पाठवायला काहीच हरकत नाही. स्वेच्छेने असेल तर उत्तम. मी सहावी ते आठवी तीनही वर्ष विवेकानंद केंद्राच्या शिबिरांना गेलो होतो. एक आठवड्याची निवासी व्यक्तिमत्व विकास शिबिरं. नवे मित्र होतात, गोष्टी कळतात, एकटं स्वतःचं सगळं करायला लागतं. अनुभव म्हणून मला प्रचंड आवडला. सो मला काही हरकत नाही वाटत.
पैसेकाढू संस्थांपासून बाकी सावधान रहा बरं का. काळ बदललाय आता.
17 Apr 2015 - 1:50 pm | वेल्लाभट
आणि हो.....
अमूक एक करतो म्हणून आपल्यानेही करावं..... असा विचार भयंकर घातक असतो.
17 Apr 2015 - 2:00 pm | स्वप्नांची राणी
मुलगा आणि त्याचा चुलत भाऊ, दोघेही ८ वर्षांचे असतांना एकदा ही उन्हाळी शिबीराला पाठवायची घोडचुक करुन झालीय. दोघेही प्रचंड कंटाळवाण्या चेहेर्याने, छळछावणीत जात असल्यासारखे जायचे. आल्यावर तिथे काय झालं हे सांगायला सुद्धा तयार नसायचे.
एकदा शिबीरातला उपक्रम म्हणून एक डेंटीस्ट येणार होते, मुलांचे एकूणच दंत आरोग्य तपासायला. तर, ही मुले घरी आल्यावर मी खूप उत्सुकतेनी विचारल की, काय झालं आज. तर मुलगा म्हणाला, की डॉक्टरांनी सांगीतल की आपली कीडनी बीन्स च्या आकाराची असते.
मी: "अरे, पण डेंटीस्ट येणार होते ना?"
मुलगा (प्रचंड वैतागून): "आले होते ना, कीडनीचे डेंटीस्ट"...!!!
त्यानंतर कानाला खडा लावला...अर्थात पुढच्या समर मधे दोघांनीही आधीच, 'काहिही झालं तरी समर कँप ला जाणार नाही' असं ठामपणे जाहीर केलच.
17 Apr 2015 - 3:31 pm | कानडाऊ योगेशु
ज्यांच्याकडे मुलाला बिझी ठेवण्यासाठी मॅन/वुमन पॉवर आहे त्यांच्यासाठी शिबिराला न पाठविणे हा एक योग्य पर्याय होऊ शकतो पण केवळ नवरा बायको व मुल अशी परिस्थिती असेल तर दिवसभर मुलाला बिझी ठेवणे एक अवघड कसरत होऊ शकते. इथे बेंगलोरमध्ये इमारतीतल्या बर्याचश्या कुटुंबांनी स्वतःच्या फॅमिलिला गावी पाठवले आहे त्यामुळे माझ्या मुलीसोबत खेळायला कोणीच नाही अशी परिस्थिती होऊन बसली आहे त्यामुळे आधी नाईलाजाने शिबिराला पाठवले पण मुलीलाच ते आवडु लागले आहे. सकाळी स्वतःहुन आवरुन धिंगाणा करत ती तिथे जाते. अर्थात शिबिर फक्त १५ दिवसांसाठीच लावले आहे त्यानंतर पत्नी तिला माहेरी घेऊन गेली कि तिकडे नो शिबिर वगैरे..फुल्टु धिंगाणा.....!
17 Apr 2015 - 4:17 pm | आदूबाळ
माझ्या लहानपणीच्या शिबिराच्या आठवणी जाग्या झाल्या. "गोळेगाव" नावाच्या पसरणी घाटाखालच्या दुर्गम खेड्यात हे शिबिर होतं. तिथल्या आठवणींनी आज हसू येतं, पण तेव्हा लय वैताग आला होता. (आता आठवण काढलीच आहे तर बयाजवार लिहितो.)
17 Apr 2015 - 6:33 pm | सुनिल सुराना
स्वछन्द बागडण्याच्या वयात शिबिराला न पाठवनेच मला योग्य वाटते. पलकांना वेळ आहे काय? हे महत्त्वाचे !! खर तर मुलांच् मातिशी नात (मैदानी खेळ) बनवता आल तर खुपच चांगल !!! अर्थातच पालकंवर अवलंबून आहे हे. या वयात बच्चना चांगल वाईट कास कळणार ? हि पीढ़ी खुप हुशार आहे-नवीन तंत्र आत्मसात करण्यास. तेव्हा नव- तंत्रासाठी पाठवणार असल्यास थोड़ थांबवस् वाटत. हे माझ् आपल् मत बरका !! बाकी स्वातंत्र्य आहेच !!!
17 Apr 2015 - 7:38 pm | रेवती
शिबिराला न पाठवता दुसरी गंमत करण्याच्या सर्व प्रतिसादांशी सहमत.
17 Apr 2015 - 7:52 pm | बाबा पाटील
तिच्या कराटेच्या क्लासचे दरवर्षी पाचगणीमध्ये उन्हाळी शिबिर असते.लेक धमाल एंजॉय करते.एताना २-४ मेडल घेवुन येते मागची ३ वर्ष तिचे आजोबा तिच्याबरोबर जायचे या वर्षी तिला एकटीलाच जायचय.पोर स्वतःची स्वतः काळजी घ्यायला शिकतात हे ही नसे थोडके.
21 Apr 2015 - 3:44 pm | हसरी
आपण लहान असताना नव्हते असले काही शिबीर वगैरे म्हणून म्हणाले फॅड>>> तुमच वय माहिती नाही, पण आमच्या लहानपणी होती हो शिबीरं.. शिवाजी पार्कातल्या समर्थ व्यायाम मंदिराचे 'वासांतिक जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षण शिबीर', सुधा करमरकरांचे 'बालनाट्य शिबीर', विवेकानंद केंद्राचे 'छंदवर्ग', नाशिकचा आर्मीचा कँप, ट्रेकिंगचे विविध कँप इत्यादी माझ्या बालपणीच केल्याचं माझ्या स्मरणात आहे. इतर पालकांशी स्पर्धा करू नका आणि सगळ्याच शिबिरांना सरसकट 'फॅड' म्हणू नका इतकंच.
अश्या कँपचा माझ्या लक्षात आलेला फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या नेहमीच्या परीघापासून वेगळ्या अश्या परीघात वावरता, नेहमीचे मित्र, नेहमीच्या बाई, नेहमीचे विषय यापेक्षा वेगळे मित्र, वेगळे शिक्षक, वेगळे विषय शिकायला मिळतात. निवासी शिबिरं असल्यास आई-वडिल-भावंडं-नातेवाईकांपासून दूर स्वतःच्या जबाबदारीवर राहावं लागतं. जबाबदारीची जाणीव वाढते. वेगळ्या वर्तुळात वावरायला मिळतं. वेगळे विचार कानावर पडतात, ज्याचा व्यक्तिमत्व विकासासाठी फायदा होतोच.
ही शिबिरं ३६५ दिवस २४ x ७ नसतात. दिवसातून काही तास आणि फक्त काहीच दिवस. उरलेले सुट्टीचे दिवस धुमाकूळ घालायला, स्वतःच्या मनाचे राजे बनायला मुलं मोकळी राहू शकतात. अर्थात्, वय वर्ष तीन म्हणजे तुमचं बाळ खूप लहान आहे अश्या शिबिरांसाठी. पण हस्तव्यवसाय, चित्रकला, श्रुतलेखन, गाणं, नाच इत्यादी त्याच्या वयाला साजेसे विषय असल्यास तुम्ही विचार करू शकता. अनोळखी पालकांशी तुमचीही ओळख होईल. मुलाला आवडत नाहीये असं लक्षात आल्यास शिबीर बंद करण्याचा पर्याय आहेच. इतक्या लहान मुलांसाठी शिबिरं असल्यास तिथलं व्यवस्थापनही साधारणपणे 'दोन दिवस पाठवून बघा, आवडलं तराच फी भरा' अश्या मताचं असतं.
24 Apr 2015 - 12:32 am | तळ्यात मळ्यात
हसरीशी सहमत. अगदी ३ वर्षांच्या मुलांसाठी शिबीर आवश्यक नसलं तरी ६-७+ मुलांनी जायला हरकत नाही. सुट्टीभर फक्त उंडारण्यापेक्षा दिवसातले २ तास काही वेगळं, नवीन शिकायला मुलांना आवडतं. अर्थात तो जातोय म्हणून तुही तिथेच जा असं नाही हं. आपल्या मुलाला/मुलीला ज्या विषयाची, खेळाची, कलेची आवड असेल तिथे नक्की पाठवावं. नवीन मित्र मैत्रिणी तर मिळतातच. त्यांची एनर्जी सकारात्मकरित्या वापरली जाते. सृजनाला लहानपणीच खतपाणी घालायला काय हरकत आहे!
24 Apr 2015 - 4:12 pm | स्वीत स्वाति
सर्व प्रतिसाद दात्यांना...
प्रतिसादांवर विचार करून सध्या तरी मुलाला शिबिराला घालत नाहीये
( मुळात च मला घालायचे नव्हते पण कळत नव्हते काय करू ते ),
आणि आता मस्त १० दिवसांची रजा घेऊन त्याला वेळ देणार आहे.
जमले तर गावाला नेणार , तो गावाकडे खूप छान खेळतो .
आणि शिबिराचे म्हणाल तर बघू मोठा झाल्यावर घाई कोणाला आहे.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार .