भारत व इंग्लंड यांच्यात इंग्लंड येथे २६ जून २०१४ ते ७ सप्टेंबर या दरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.
या मालिकेत भारत इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाविरूद्ध ५ कसोटी सामने, ५ एकदिवसीय सामने व एक २० षटकांचा सामना खेळेल. तसेच स्थानिक संघांविरूद्ध दोन ३-दिवसीय सामने व १ एकदिवसीय सामना आयोजित केलेला आहे.
भारत २६ जून पासून लिस्टरशायर विरूद्ध ३ दिवसांच्या सामन्याने मालिकेचा शुभारंभ करेल व ७ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या २० षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्याने मालिकेची सांगता होईल. एकूण ७४ दिवसांचा प्रदीर्घ दौरा आहे.
प्रदीर्घ कालावधीनंतर भारत ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यापूर्वी भारत ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका १९९१-९२ मध्ये खेळला होता. त्यानंतर बहुतेक सर्व मालिका २, ३ किंवा जास्तीत जास्त ४ कसोटींच्या होत्या.
भारताचा कसोटी संघ असा आहे.
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), वरूण एरॉन, रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, गौतम गंभीर, रविंद्र जडेजा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईश्वर पांडे, पंकज सिंग, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, ईशांत शर्मा, रोहीत शर्मा, मुरली विजय
दौर्याचे वेळापत्रक
सराव सामने
२६ जून - २८ जून वि. लिस्टरशायर
१ जुलै - ३ जुलै वि. डर्बीशायर
कसोटी सामने (सर्व सामने भा.प्र.वे. नुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होतील)
पहिला कसोटी सामना : ९ जुलै - १३ जुलै (स्थळ - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम)
दुसरा कसोटी सामना : १७ जुलै - २१ जुलै (स्थळ - लॉर्ड्स, लंडन)
तिसरा कसोटी सामना : २७ जुलै - ३१ जुलै (स्थळ - रोझ बाऊल, सदम्पटन)
चौथा कसोटी सामना : ७ ऑगस्ट - ११ ऑगस्ट (स्थळ - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर)
पाचवा कसोटी सामना : १५ ऑगस्ट - १९ ऑगस्ट (स्थळ - केनिंग्टन ओव्हल, लंडन)
एकदिवसीय सराव सामना
२२ ऑगस्ट - वि. मिडलसेक्स
५० षटकांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (सर्व सामने भा.प्र.वे. नुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होतील)
(१) २५ ऑगस्ट (ब्रिस्टल)
(२) २७ ऑगस्ट (कार्डिफ)
(३) ३० ऑगस्ट (ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम)
(३) ०२ सप्टेंबर (एजबॅस्टन, बर्मिंगहॅम)
(३) ०५ सप्टेंबर (हेडिंग्ले, लीड्स)
आंतरराष्ट्रीय ट-२० सामना (भा.प्र.वे. नुसार संध्याकाळी ७:३० वाजता)
(१) ०७ सप्टेंबर (एजबॅस्टन, बर्मिंगहॅम)
भारतीय संघात एकूण ६ मध्यमगती गोलंदाज आहेत (वरूण एरॉन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, पंकज सिंग, ईश्वर पांडे, ईशांत शर्मा). या व्यतिरिक्त स्टुअर्ट बिन्नी हा देखील मध्यमगती गोलंदाजी टाकतो. अश्विन व जडेजा हे दोनच फिरकी गोलंदाज संघात आहेत. रोहीत शर्मा देखील कामचलाऊ फिरकी गोलंदाजी करतो आणि विराट कोहलीच्या गोलंदाजीत काहीही दम नसला तरी धोनी त्याला प्रत्येक सामन्यात काही षटके तरी गोलंदाजी करायला लावतो. स्वतः धोनीसुद्धा रनअप् घेऊन गोलंदाजी टाकू शकतो.
संघात धोनीव्यतिरिक्त वृद्धिमान साहा व अजिंक्य रहाणे असे दोन यष्टीरक्षक आहेत. जडेजा व काही प्रमाणात अश्विन हे अष्टपैलू खेळाडू आहेत. उरलेले सर्व निखळ फलंदाज आहेत.
गौतम गंभीरचे पुनरागमन झाले आहे. परंतु मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी इ. ची निवड धक्कादायक आहे. मुरली विजय परदेशात फारसा यशस्वी ठरलेला नाही. रोहीत शर्मा देखील परदेशात फारसा यशस्वी नाही. ईशांत शर्मा बैलासारखी मट्ठपणे गोलंदाजी करतो. परंतु नुकत्याच संपलेल्या न्यूझीलँड विरूद्धच्या मालिकेत त्याने परदेशात २ वेळा एका डावात ६ बळी मिळविल्याने त्याची वर्णी लागली असावी. महाराष्ट्राच्या केदार जाधवने रणजी स्पर्धेत धावांचा रतीब ओतला होता. पण त्याला कसोटी संघात न घेता नुकत्याच संपलेल्या बांगलादेश विरूद्ध झालेल्या एकदिवसीय संघात घेतले व एकही सामन्यात न खेळविता परत आणले. मुरली विजयऐवजी तो चालला असता. तसेच अजून एखादा फिरकी गोलंदाज हवा होता (अमित मिश्रा, हरभजन सिंग किंवा अक्षर पटेल). अश्विन हा भारतीय खेळपट्ट्यांवरचा वाघ आहे. त्याने आतापर्यंत मिळविलेल्या बळींपैकी ८० टक्क्यांहून अधिक बळी भारतात मिळविलेले आहेत. परदेशात तो चालत नाही. नुकत्याच संपलेल्या न्यूझीलँडमधील मालिकेत ५ एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त २ बळी मिळविले होते. कसोटी सामन्यात देखील तो निष्प्रभ ठरला होता. एकंदरीत मुरली विजय, शिखर धवन, रोहीत शर्मा, अश्विन, जडेजा इ. मंडळी भारताबाहेर अनेकवेळा निष्प्रभ ठरलेली आहेत. मध्यमगती गोलंदाजात विनयकुमारला संधी हवी होती. पण त्याला, मोहीत शर्माला व उमेश यादवला संधी मिळालेली नाही. विनयकुमारने रणजी स्पर्धेत त्याने चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्याऐवजी तब्बल ५ महिने क्रिकेट न खेळलेल्या ईशांत शर्माला घेऊन निवडसमितीने काय मिळविले खुदा जाने.
कसोटीत साधारणपणे खालील संघ असेल असे वाटते.
गंभीर, धवन/मुरली विजय, पुजारा, कोहली, रहाणे, धोनी, जडेजा, अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरूण एरॉन्/ईशांत शर्मा.
इंग्लंड सध्या वाईट अवस्थेतून जात आहे. ६ महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला मायदेशात ५-० असा सपाटून मार दिला. त्यानंतर न्यूझीलँड मध्ये इंग्लंडला न्यूझीलँडला हरविण्यात यश आले नाही. कालच संपलेल्या मायदेशातील श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत श्रीलंकेने इंग्लंडला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-२ व कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी मात दिली. इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा फारच वाईट ठरला. ०-५ असा मानहानिकारक पराभव झाला. पण त्याबरोबर अपयशामुळे व नैराश्यामुळे जोनाथन ट्रॉट दौरा अर्धवट सोडून परतला, तर ग्रॅमी स्वॅनने अकाली निवृत्ती घेतली. कुक गेल्या ९ कसोटी सामन्यात बहुतेक डावात अपयशी ठरला आहे. तर ऑस्ट्रेलियातील अपयशामुळे केव्हिन पीटरसनला डच्चू देण्यात आला. अँडरसन व ब्रॉडला मायदेशी खेळत असूनही गोलंदाजीत फारसे काही करून दाखविता आलेले नाही. सध्या फक्त इयान बेल व काही प्रमाणात जो रूट सातत्य टिकवून आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरविण्याची भारताला सुवर्णसंधी आहे.
२०११ व २०१२ च्या कटू आठवणी अजून ताज्या आहेत. इंग्लंडमधील २०११ च्या मालिकेत भारत सर्व म्हणजे ४ कसोटी सामने हरला होता. ५ एकदिवसीय सामन्यांपैकी भारत ३ सामने हरला होता, एक बरोबरीत सुटला होता व एक पावसामुळे रद्द झाला होता. त्या संघातील फारच थोडे खेळाडू आताच्या संघात आहेत. धोनी, अश्विन, गंभीर, जडेजा, कोहली, ईशांत शर्मा वगळता इतर खेळाडू आताच्या संघात नाहीत. त्यानंतर २०१२ मधील भारतातील मालिकेत इंग्लंडने भारताला २-१ अशी मात दिली होती. सध्या भारताच्या फलंदाजीची मदार फक्त पुजारा, कोहली व काही प्रमाणात रहाणे यांच्यावर आहे. बाकीच्यांची अजिबात खात्री नाही. गोलंदाजीत फक्त भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी हेच काहीतरी करून दाखवतील. इतर फारसे प्रभावी पडतील असे वाटत नाही. फिरकी गोलंदाजांचा तर आनंदच आहे.
या कटू आठवणींच्या पार्श्वभूमीवर २०१४ मध्ये भारत विजयी व्हावा हीच अपेक्षा आणि सदिच्छा!
प्रतिक्रिया
25 Jun 2014 - 1:22 pm | एस
बीसीसीआयच्या संघाला हरवून पुन्हा फॉर्मात येण्याची इंग्लंडच्या संघाला सुवर्णसंधी आहे. :-|
25 Jun 2014 - 1:51 pm | अनुप ढेरे
कुक नक्की फॉर्ममध्ये येणार. ओपनिंगला विजय/धवन ऐवजी शर्माही चालेल. गंभीरही फार दिवे लावेल असं वाटत नाही. पण वर म्हटलं तसं, ब्याटिंगची भिस्त ३-४-५, कोहलीम पुजारा आणि रहाणेवर आहे. नॉटिंगहममध्ये पहिली मॅच आहे हे पाहून झहीरची आठवण झाली. बॉलिंग मध्ये झहीर असायला पाहिजे होता. झहीर, भुवनेश्वर आणि शर्मा.
प्रॅक्टिस म्याचेस आहेत २ ते चांगलं आहे. मागच्या वेळेला हार झाल्याचं कमी प्रॅक्टीस मॅचेस हे एक कारण होतं.
18 Aug 2014 - 6:52 pm | एस
चला, बीसीसीआयच्या संघाला पुनरेकवार हरल्याबद्दल किंचित सहानुभूती आणि इंग्लंडच्या संघाचं विजयाबद्दल जोरदार अभिनंदन. आगामी भारत दौर्यातही इंग्लंडला अशाच सुवर्णसंधी पुन्हापुन्हा देत रहा बरं का रे.
(इथून पुढचं जाहीर लिहिण्यासारखं नसल्याने फक्त मनातल्या मनात. कसंय, तुम्हांला जरी लाजीरवाण्या पद्धतीनं हरल्याबद्दल शब्दशः लाज वाटत नसली तरी आम्हांला अपशब्द जाहीरपणे वापरायची लोकलाज अजूनही वाटते.)
25 Jun 2014 - 2:10 pm | आदूबाळ
अश्विन आणि जडेजा फुलटाईम गोलंदाज नाहीयेत.
25 Jun 2014 - 2:18 pm | सौंदाळा
याऐवजी मी ईशांत शर्मा भारतात बैलासारखी मट्ठपणे गोलंदाजी करतो. असे म्हणेन.
मागच्या ईग्लंड दौर्यावर (तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण असताना आपण सपाटुन हारलो होतो तो दौरा) ईशांतने चांगली गोलंदाजी केली होती.
बाकी कालची कसोटी थरारक झाली. अंडरसन एक चेंडु शिल्लक असताना आउट झाला. आणि हीच स्थिती श्रीलंकेची पहील्या कसोटीला होती आणि त्यांनी सामना अनिर्णयीत ठेवण्यात यश मिळवले.
25 Jun 2014 - 4:51 pm | श्रीगुरुजी
>>> बाकी कालची कसोटी थरारक झाली.
+१
जबरदस्त कसोटी झाली. इंग्लंडने पराभव टाळण्याचा जीवापाड प्रयत्न करूनसुद्धा कसोटीतला फक्त १ चेंडू शिल्लक असताना त्यांना हार पत्करावी लागली. पहिल्या डावात १०८ धावांनी मागे असताना सुद्धा श्रीलंकेने झुंझून विजय मिळविला.
25 Jun 2014 - 2:37 pm | कपिलमुनी
फार फार दिवसांनी क्रिकेटवर मोठा लेख आला.. प्रत्येक पिढीचे आवडते हीरो असतात.. ते रीटायर झाले की आवड कमी होते .. तसाच कहीसा झाला आहे. सध्याच्या टीम मधे अजून तरी फार इंटरेस्ट नाहिये..
बादवे ते ष्टकार नावाचा पाक्षिक मिळता का अजून ?
25 Jun 2014 - 4:12 pm | पामर
ह्याच दौ-यात अजुन एक आकर्षण म्हणजे ५ जुलै रोजी क्रिकेट पंढरी-लॉर्ड्सला तब्बल २०० वर्ष पुर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने 'मेलबर्न क्रिकेट क्लब (MCC)वि.Rest of the world XI' असा एक प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला आहे. MCC च्या संघात -सचिन तेंडुलकर (कर्णधार),ब्रायन लारा, राहुल द्रवीड,ब्रेट ली,शिवनारायण चंद्रपॉल व इतर खेळाडु आहेत तर उर्वरीत जगाच्या संघात- शेन वॉर्न (कर्णधार),अॅडम गिलख्रिस्ट, मुथैया मुरलीधरन,शाहीद आफ्रिदी,केवीन पिटर्सन ,युवराज सिंग वगैरे खेळाडु आहेत.भारतात स्टार चॅनल वर हा सामना दा़खवणार आहेत. *clapping*
25 Jun 2014 - 4:34 pm | असंका
मेलबर्न असा उच्चार आहे का? मला वाटायचे मेरिलबोन (Marylebone)!!
25 Jun 2014 - 5:04 pm | श्रीगुरुजी
भारताविरूद्धच्या मालिकेसाठी बहुतेक मधूसुदन पानसरेला (आणि रवि बोपाराला) पाचारण करतील असं वाटतंय. केव्हिन पीटरसनलाही परत बोलावतील का? (तो परत यावा अशी इच्छा आहे)
26 Jun 2014 - 9:36 am | फारएन्ड
झहीर ला का डच्चू दिला काही कल्पना आहे का? रोहित शर्मा ला मागच्या वेळेस झेपले नव्हते इंग्लंड. सध्या फॉर्मात असताना काय करतो बघू. स्विंग सपोर्ट असताना मुनाफ ला ही संधी द्यायला हवी होती.
सध्या इरफान पठाण कोठे गायब आहे?
गंभीर ला तोंडदेखले घेतले असावे असे वाटते. धोनीशी त्याचे बरे आहे असे वाटत नाही. "खुद धोनी" सोडला तर गांगुलीच्या काळात आलेले बरेच लोक आता बाहेर आहेत. गंभीर शेवटचा बहुधा.
26 Jun 2014 - 12:28 pm | श्रीगुरुजी
>>> झहीर ला का डच्चू दिला काही कल्पना आहे का?
झहीर हा २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे ब्रह्मास्त्र होता. त्याने ९ सामन्यात २१ बळी घेऊन जवळपास प्रत्येक सामन्यात भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला होता. आता तो संघात नाही त्याची ३ कारणे आहेत.
१) झहीर २०११ च्या विश्वचषकानंतर त्याचा फॉर्म हरपला आहे. आजतगायत त्याला फॉर्म परत मिळविता आलेला नाही. ज्या मोजक्याच सामन्यात तो खेळला, त्यात तो निष्प्रभ ठरला. आयपीएल मध्ये सुद्धा तो चमकलेला नाही.
२) त्याला तंदुरूस्तीची तीव्र समस्या आहे. १-२ सलग सामने खेळले की तो मोडतो आणि नंतर ५-६ महिने दुखापतीमुळे संघाबाहेर असतो.
३) तंदुरूस्तीमुळे त्याला पुरेसा सराव मिळत नाही व त्यामुळे तो ज्या सामन्यात खेळतो त्यात चमकत नाही.
>>> रोहित शर्मा ला मागच्या वेळेस झेपले नव्हते इंग्लंड. सध्या फॉर्मात असताना काय करतो बघू.
रोहीत शर्मा २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगला खेळला होता. परंतु एकंदरीत तो अपवाद वगळता परदेशात तो बहुतेक वेळा अपयशी ठरलेला आहे. तो, अश्विन आणि ईशांत शर्मा हे धोनीचे लाडके असावेत असं वाटतंय, कारण अनेकवेळा अपयशी ठरल्यानंतर ते परत परत संघात दिसतात.
>>> स्विंग सपोर्ट असताना मुनाफ ला ही संधी द्यायला हवी होती.
मुनाफ २०११ च्या विश्वचषकानंतर पूर्णपणे निष्प्रभ आहे. त्याला नाही घेतलं तेच बरं केलं.
>>>> सध्या इरफान पठाण कोठे गायब आहे?
इरफान पठाणला गेल्या ३-४ वर्षात अजिबात प्रभाव पाडता आलेला नाही. २०१२ मध्ये बांगला देशात झालेल्या आशिया करंडक स्पर्धेत बांगला देश विरूध्द त्याने व प्रवीणकुमारने अत्यंत सुमार गोलंदाजी करून तब्बल २९० धावांचे लक्ष्य बांगलाला सहज पार करून दिले होते.
>>> गंभीर ला तोंडदेखले घेतले असावे असे वाटते. धोनीशी त्याचे बरे आहे असे वाटत नाही. "खुद धोनी" सोडला तर गांगुलीच्या काळात आलेले बरेच लोक आता बाहेर आहेत. गंभीर शेवटचा बहुधा.
सहमत! धोनीला आपल्या कर्णधारपदाच्या सुरूवातीच्या कालखंडात वरीष्ठ खेळाडूंची सतत भीति वाटायची. आपण थोडेसे अपयशी ठरलो तर आपल्याकडून कर्णधारपद हिसकावले जाऊन कोणत्यातरी वरीष्ठ खेळाडूच्या हातात नेतृत्वाची धुरा जाईल या दडपणामुळे त्याने वरीष्ठ खेळाडूंना सतत बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. २००७ च्या ट-२० च्या विश्वचषकात सुद्धा त्याने वरीष्ठ खेळाडूंना ने घेण्याच्या अटीवर कर्णधारपद स्वीकारले होते. गंभीर, सेहवाग, सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, झहीर, हरभजन आणि कुंबळे या वरीष्ठ खेळाडूंपैकी ५ जण निवृत्त झाले असून उरलेले ४ जण अजून खेळत आहेत. त्यापैकी तिघेजण संघात नाहीत. त्यामुळे धोनीला फारशी भीति नाही.
26 Jun 2014 - 4:39 pm | अनुप ढेरे
पठाण बद्दल सहमत. प्रवीण कुमार चालला असता. मागच्या दौर्यात जीव तोडून बोलिंग केली होती.
26 Jun 2014 - 11:17 am | नाखु
पण ते चेन्नई सुपर किंग मध्ये आहेत हे जास्त महत्वाचे निवडीसाठी.मोहीत शर्माला पण संधी त्यामुळेच मिळाली.
खरे खोटे "श्री" जाणे!
आप्ण गुमान पहाणे!
26 Jun 2014 - 3:08 pm | तुषार काळभोर
म्हटले, की जून ९६ चा "तो" दौरा आठवतो...
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी!
26 Jun 2014 - 10:33 pm | श्रीगुरुजी
सुरूवात तर चांगली झाली. आजच्या पहिल्याच सराव सामन्यात पहिल्या दिवशी भारताने ४० षटकांत ४ बाद ३३३ अशी चांगली कामगिरी केली. त्यातल्या मुरली विजय (२०) व कोहली (२९) वगळता इतरांनी चांगल्या धावा केल्या. गंभीर, धवन व पुजाराने अर्धशतक केले.
29 Jun 2014 - 9:00 pm | पैसा
इथे येऊन शिव्या घालायला बरं आहे! *biggrin*
29 Jun 2014 - 9:10 pm | श्रीगुरुजी
पहिला सराव सामना पावसामुळे फक्त २ दिवस चालला. भारतीय फलंदाजांनी बर्यापैकी फलंदाजी केली. गोलंदाजांनी मात्र सपाटून मार खाल्ला. भारतीय गोलंदाजांना दिवसभरात फक्त ३ फलंदाज बाद करता आले. असो. या सामन्याच्या निमित्ताने थोडा सराव तरी झाला. अजून एक सराव सामना बाकी आहे. नंतर ९ जुलैला पहिला कसोटी सामना सुरू होईल. सध्या विश्वचषक फूटबॉल फिव्हरमध्ये आणि त्याचवेळी विम्बल्डन सुरू असताना क्रिकेट थोडे निस्तेज झाले आहे. विंडीज वि किवीज आणि इंग्लंड वि. लंका या सामन्यांच्या बातम्या सुद्धा वृत्तपत्रात येत नव्हत्या. साधारणपणे १५ जुलैनंतर क्रिकेटला परत चांगले दिवस येतील.
30 Jun 2014 - 11:42 am | अनुज०९९०
This is very useful information shared here. I am really thankful for this.
http://www.99th.co.in
2 Jul 2014 - 12:43 pm | श्रीगुरुजी
कालपासून भारताचा दुसरा सराव सामना डर्बीशायर विरूद्ध सुरू झाला. आधीच्या सामन्याप्रमाणेच भारतीय गोलंदाजांची चांगलीच पिटाई झाली. भारतीय गोलंदाजांना दिवसभरात फक्त ५ फलंदाज बाद करता आले. दोन्ही सामन्यात मिळून एकूण २ दिवसांच्या गोलंदाजीत भारतीय गोलंदाजांना जवळपास ६६५ धावांच्या मोबदल्यात फक्त ८ गडी बाद करता आले आहेत. एकंदरीत गोलंदाजांचे या दौर्यावर हाल होतील असं वाटतंय.
4 Jul 2014 - 12:46 pm | श्रीगुरुजी
दुसरा सराव सामना भारताने जिंकला. पहिल्या दोन्ही सराव सामन्यात भारताची फलंदाजी बर्यापैकी झाली. पण गोलंदाजांनी बराच मार खाल्ला. स्थानिक संघाविरूद्ध त्यांना फारसे बळी मिळविता आले नाहीत. अर्थात हे नेहमीचंच रडगांणं आहे. आता ९ जुलैपासून पहिला कसोटी सामना सुरू होत आहे. बघूया काय होतंय ते. सलामीला मुरली विजयला न घेता गंभीरला घेतील असं वाटतंय. रहाणे देखील आत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित रोहीत शर्माला बाहेर बसावं लागेल. गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, जडेजा आणि ईशांत शर्मा नक्की आत येतील.
5 Jul 2014 - 3:25 pm | पैसा
तो १४/१६ च्या टीममधे कसा काय येतो परत परत??? मग ११ त आला तर खरेतर आश्चर्याच्या धक्क्याने आम्ही मरायलाच पाहिजे!
6 Jul 2014 - 2:07 pm | श्रीगुरुजी
कितीही खराब खेळले तरी शर्मा बंधू (रोहीत आणि ईशांत) हे कायम १६ जणांच्या चमूत असतात. रोहीत शर्माला २०१२ मध्ये एकूण १४ एकदिवसीय सामन्यात खेळविले होते. त्यात त्याने एकूण १६८ धावा केल्या होत्या. त्यापैकी एका सामन्यात ८३ व उर्वरीत १३ सामन्यात एकूण ८५ धावा होत्या. तरीसुद्धा त्याला संघातून एकदाही वगळले नव्हते. श्रीलंकेत त्याच वर्षी झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने एकूण १४ धावा केल्या होत्या (सर्वाधिक ८). इतका खराब खेळ करूनसुद्धा त्याच मालिकेतल्या ट-२० सामन्यात त्याला निवडले होते. त्याच्यामुळे मागील ३-४ वर्षे रहाणे संघात असून त्याला फारशी संधी मिळालेली नाही. तीच गोष्ट ईशांत शर्माची. अत्यंत खराब गोलंदाजी करूनसुद्धा तो परत परत खेळताना दिसतो. निवडसमितीत किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळात किंवा दोन्हीकडे त्यांचा कोणीतरी प्रभावशाली गॉडफादर असावा.
4 Jul 2014 - 1:11 pm | सौंदाळा
अवांतर : उद्या MCC 11 vs Rest of world असा एक दिवसीय सामना असुन सचिन, द्रविड, शेन वॉर्न, सेह्वाग, आफिदी, लारा वगैरे दिग्गज त्यात खेळणार आहेत.
संघांची लिंक
4 Jul 2014 - 3:40 pm | कपिलमुनी
कुठल्या चॅनेलवर थेट प्रक्षेपण आहे का?
4 Jul 2014 - 5:12 pm | सौंदाळा
स्टार स्पोर्ट्स १/२/३ वर असावे.
जाहीरात त्याच्यावरच पाहीली होती.
4 Jul 2014 - 8:41 pm | श्रीगुरुजी
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व भारतातील क्रिकेट मालिका बहुतेकवेळा 'स्टार' वर असतात. वेस्ट इंडिज, दुबई/शारजा, द. आफ्रिका व न्यूझीलॅंड येथील मालिका टेन क्रिकेट किंवा सोनी सिक्सवर असतात. पूर्वी या मालिका 'निओ'वर असायच्या. पण आता 'निओ' क्रिकेट प्रक्षेपणातून बाहेर पडलेलं दिसतंय आणि त्यांची जागा सोनी सिक्सने घेतलेली दिसतेय.
4 Jul 2014 - 10:44 pm | स्पार्टाकस
आफ्रीदीसारखा वाचाळ आणि टिनपाट खेळाडू दिग्गज कधीपासून झाला ??
केवळ अंदाधुंद बॅटींग (जीदेखील गेली काही वर्षे चालत नाही) आणि कामचलाऊ बॉलींग करणारा महान झाला?
5 Jul 2014 - 12:54 pm | श्रीगुरुजी
+१
आफ्रिदीप्रमाणेच विश्व संघात टिनो बेस्ट, सिड्ल्, तमीम इक्बाल इ. "महान आणि दिग्गज" खेळाडू आहेत.
तर एम सी सी च्या संघात उमर गुल, शॉन टेट, व्हिटोरी, एरॉन फिंच, रीड असे "महान आणि दिग्गज" खेळाडू आहेत.
5 Jul 2014 - 5:48 pm | तुमचा अभिषेक
हरो किंवा जिंको, पण संध्याकाळी घरी आल्यावर ईंग्लंडच्या वातावरणातील कसोटी सामने बघणे नेत्रसुखद अनुभव असतो.
फक्त दादा, सचिन, द्रविड आणि हो, वीरूही नसल्याने ती मजा यंदा कितपत येईल हा प्रश्नच आहे.
9 Jul 2014 - 4:24 pm | बाळ सप्रे
पहिली कसोटी सुरु झालीय.. बिन्नीला संधी मिळालीय..
9 Jul 2014 - 4:25 pm | बाळ सप्रे
पहिली कसोटी सुरु झालीय.. बिन्नीला संधी मिळालीय..
9 Jul 2014 - 8:47 pm | श्रीगुरुजी
पहिल्या कसोटीत आतापर्यंत बरी फलंदाजी झाली आहे. कोहली व धवन अपयशी ठरले, तर पुजारा आणि रहाणे स्थिरावल्यावर बाद झाले. एकटा मुरली विजय किल्ला लढवतोय. भारताने किमान ४०० धावा करायला हव्यात.
10 Jul 2014 - 5:40 pm | सौंदाळा
दुसरा दिवस, जेवण ३४२/५.
चांगल्या धावा झाल्या आहेत. अजुन किमान एक सेशन तरी भारताने खेळायला पाहीजे म्हणजे सामन्यावर पकड घेण्याची संधी मिळेल.
10 Jul 2014 - 6:02 pm | थॉर माणूस
धोनी उपखंडाबाहेरचं पहिलं शतक मारेल का याची उत्सुकता आहे... काय ते कळेलच पुढच्याच सेशनमधे. त्यानंतर (किंवा धोनी बाद झाला तर) डाव घोषित करतील बहुतेक.
10 Jul 2014 - 11:45 pm | स्पार्टाकस
भुवनेश्वर आणि शमीने इंग्लंडवर बॅटींगमध्ये गिलेस्पी-मॅकग्राथ प्रयोग केला आहे!
(गिलेस्पी आणि मॅकग्राथ यांनी न्यूझीलंडविरुध्द १००+ ची पार्टनरशीप केली होती. मॅकग्राथने चक्क ६३ रन्स काढल्या होत्या!)
अॅलीस्टर कूकला पुन्हा एकदा सस्त्यात गाशा गुंडाळावा लागला आहे. जाडेजा कदाचीत धोकादायक ठरु शकेल. एकून टेस्ट बोअरींग होणार नाही अशी अपेक्षा आहे.
11 Jul 2014 - 9:58 am | श्रीगुरुजी
भारताला हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. आज इंग्लंडच्या उर्वरीत फलंदाजांना बाद करून किमान १५० धावांची भक्कम आघाडी घेतली पाहिजे. इयान बेल (आणि कदाचित मॅट प्रॉयर) हाच मोठा अडथळा आहे. उर्वरीत फलंदाज नवे आहेत.
11 Jul 2014 - 10:46 am | बाळ सप्रे
टू अर्ली टु से थिस.. खेळपट्टी खूपच निर्जीव आहे. आणि भारतीय गोलंदाजीची अवस्था फार काही चांगली नाहिये.. हाय स्कोरींग ड्रॉची शक्यता जास्त आहे..
12 Jul 2014 - 5:39 pm | आतिवास
दोन्ही संघांच्या तळातल्या फलंदाजांनी (अर्थात रूट काही तळातला फलंदाज नाही म्हणा) जो खेळ केला, त्यावरून क्रिकेट मध्ये किती अनिश्चितता असते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला!
12 Jul 2014 - 8:53 pm | श्रीगुरुजी
भारतीय गोलंदाज विशेषत: इशांत शर्माने आज पुन्हा एकदा मठ्ठ बैलासारखी गोलंदाजी केली. इंद्रसेन (अॅण्डर्सन) मागील ३-४ डावात उसळत्या चेंडूवर बाद झाला होता. २९८/९ असताना तो खेळायला आल्यावर त्याला बाद करण्यासाठी शर्मा व इतरांनी त्याला सातत्याने फक्त उसळते चेंडू टाकले. पडणारा प्रत्येक चेंडू हा उसळताच असेल हे गृहीत धरून अशा चेंडूचा सामना करण्यासाठी तो आधीच तयार असायचा आणि असे सर्व चेंडू त्याने सहजगत्या खेळून काढले व भरपूर धावा करून गोलंदाजांना रडविले. उसळता चेंडू अनपेक्षितरित्या अंगावर आला तर बाद होण्याची शक्यता असते. पण येणारा प्रत्येक चेंडू हा छाती किंवा खांद्यापर्यंत उसळणार आहे हे जेव्हा लक्षात येते तेव्हा असे चेंडू खेळण्याच्या तयारीनेच फलंदाज उभा असतो. इंद्रसेनला सातत्याने उसळते चेंडू टाकण्याऐवजी यॉर्कर, स्लोअर वन, आत/बाहेर जाणारे चेंडू अशी विविधता आणली असती तर तो लवकर बाद झाला असतो.
असो. भारताने सुरवातीला २०२/७ व नंतर २९८/९ अशा उत्तम परिस्थितीतून मोठी आघाडी घ्यायची संधी आपल्या करंटेपणाने घालविली. आता सामना अनिर्णित होण्याचीच शक्यता आहे.
13 Jul 2014 - 11:47 am | चौकटराजा
मला वाटते अधिकृत कसोटी सामने झाल्या पासून बहुदा हा एकच सामना असावा ज्यात दोन्ही बाजूच्या शेवटच्या भागीदारीसाठी १०० पेक्षा जास्त धावा झाल्या असाव्यात. क्रिकेट हा खेळ किती विचित्र आहे !
13 Jul 2014 - 12:34 pm | आतिवास
११ व्या फलंदाजाबद्दल हा एक चांगला लेख.
13 Jul 2014 - 5:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज्यो रूट आणि अँडरसनने भारतीय गोलंदाजाच्या नाकात दम आणला अतिशय निष्प्रभ गोलंदाजी. १९५ धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि कसोटीने अनिर्नित अवस्थेकडे प्रयाण केले. शेवटच्या विकेटसाठी इतकी भागीदारी व्हावी अतिशय लज्जास्पद आहे भारतीय गोलंदाजीसाठी.
बाकी, विश्वचषक फूटबॉल संपला की इकडे हजर होत राहीन. :)
-दिलीप बिरुटे
13 Jul 2014 - 8:41 pm | प्रचेतस
मी तरी नाय हजर होणार ब्वा इकडे.
मायला जडेजा, धोनी अन् बिन्नीसाठी काय सामने बघायचे... *boredom* *sorry2* *fool*
13 Jul 2014 - 8:34 pm | श्रीगुरुजी
सामना अनिर्णित होणार हे नक्की. दुसर्या डावात चहापानाला भारत ३४७/८. उर्वरीत वेळात भारताचे उर्वरीत फलंदाज बाद करून सामना जिंकणे इंग्लंडला अशक्य आहे. पहिले ३ दिवस भारताने वर्चस्व राखले होते. आज ५ व्या दिवशी ३९ धावांनी मागे पडलेल्या भारताची अचानक ६ बाद १८४ अशी अवस्था झाली तेव्हा भारताकडे फक्त १४५ धावांची आघाडी होती व दिवसातली किमान ७७ षटके शिल्लक होती. अचानक इंग्लंडला विजयाची संधी निर्माण झाली. परंतु बिन्नी, जडेजा व भुवनेश्वर कुमार यांनी उत्तम फलंदाजी करून भारताला पराभवापासून खूप लांब नेले आणि आता उर्वरीत ३१ षटकात सामन्याचा निकाल लागणे अशक्य आहे.
एकंदरीत या सामन्यात कोहली (व काही प्रमाणात धवन) वगळता इतर सर्वांनी किमान एका डावात फलंदाजीत चांगले योगदान दिले. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, शमी व शर्माने बर्यापैकी गोलंदाजी केली. अर्थात शेपटाने त्रास देण्याची परंपरा याही कसोटीत सुरू राहिली. तळाच्या २-३ फलंदाजांना बाद करणे हे भारतीय गोलंदाजांसाठी अवघड काम होऊन बसले आहे.
असो. पुढील कसोटीत हाच संघ कायम राहील असे वाटते. अश्विन किंवा वरूण एरॉनला आत यायची संधी दिसत नाही.
दुसरा कसोटी सामना गुरूवारी १७ जुलैला लॉर्ड्स वर सुरू होईल.
17 Jul 2014 - 11:48 am | श्रीगुरुजी
आजपासून दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरू होतोय. खेळपट्टी हिरवीगार असण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचा टिकाव लागतोय का याचीच उत्सुकता आहे.
17 Jul 2014 - 11:55 am | स्पा
जडेजा ऐवजी, अश्विनला खेळवून पाहावे
कारण जादेजापेक्षा अश्विनचे फलंदाजीचे तंत्र जास्त चांगले आहे, शिवाय त्याने शतकही झळकावलेले आहे
17 Jul 2014 - 1:13 pm | चौकटराजा
सहमत. अर्थात दोघेही फिरकी तिथे काय करणार कप्पाळ पण ब्याटींगला अश्व्या बराय !
17 Jul 2014 - 2:45 pm | श्रीगुरुजी
- जडेजा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. अश्विनचे क्षेत्ररक्षण अत्यंत भिकार आहे.
- फलंदाजीत अश्विनच्या तुलनेत जडेजाने फारश्या धावा केलेल्या नाहीत.
- भारताबाहेर दोघेही निष्प्रभ गोलंदाज आहेत.
एकंदरीत दोघांपैकी कोणालाही घेतले तरी फारसा फरक पडत नाही.
17 Jul 2014 - 3:16 pm | स्पा
कसोटीत क्षेत्र रक्षण टी२० किंवा एकदिवसीय सामान्यैतके महत्वाचे दिसून येत नाही, कारण अगदी एक एक धावा वाचवताना कोणी दिसत नाही अर्थात अपवाद असेलच
भारतभर दोघेही कुचकामी ठरलेले असले तरी आत्ताच्या इंग्लंड च्या पिचेस आणि माग्च्या दौर्यातल्या पिचेस ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे
17 Jul 2014 - 3:27 pm | प्रचेतस
तेंडुलकरांच्या सचिनला पण परत खेळण्यासाठी आवताण द्यावे.
इथल्या काही मिपाकरांना(मी नव्हे) त्याच्याशिवाय करमत नाही.
17 Jul 2014 - 3:16 pm | स्पा
भारताची फलंदाजी
17 Jul 2014 - 5:24 pm | तुषार काळभोर
शिखर धवनला पुढच्या कसोटीत घेतील, असे वाटत नाही.
त्याची ३ डावातील कामगिरी पाहून गंभीरला आनंद झाला असेल.
18 Jul 2014 - 1:05 pm | श्रीगुरुजी
रहाणे काल मस्त खेळला. त्याला बरेच दिवस कुजवले होते. पण मागील वर्षापासून कसोटीत संधी मिळताच त्याने आपली गुणवत्ता दाखवून दिली (आतापर्यंत ७ कसोटीत ३ अर्धशतके व २ शतके). धवन पूर्ण अयशस्वी ठरतोय. पुढच्या डावात त्याने धावा केल्या नाहीत तर गंभीर नक्की आत येईल. पुढच्या कसोटीत जडेजा किंवा बिन्नीऐवजी अश्विन नक्की आत येणार. कोहलीला साधारणपणे मालिकेच्या उत्तरार्धात सूर सापडतो. तो बहुतेक तिसर्या कसोटीपासून फॉर्मात येईल. सध्या फक्त भुवनेश्वरकुमारनेच फलंदाजीत सातत्य दाखविले आहे.
18 Jul 2014 - 2:44 pm | तुषार काळभोर
***सध्या फक्त भुवनेश्वरकुमारनेच फलंदाजीत सातत्य दाखविले आहे.
-त्याचा इरफान पठाण होऊ नये, ही सदीच्छा!!
18 Jul 2014 - 5:02 pm | तुषार काळभोर
कूक का क्या होगा?
18 Jul 2014 - 8:46 pm | श्रीगुरुजी
जर कुकची कामगिरी सुधारली नाही किंवा जर इंग्लंडला ही मालिका जिंकण्यात अपयश आले तर कुकची कर्णधारपदावरून हकालपट्टी होऊन (कदाचित संघातूनही हकालपट्टी होऊ शकते), इयान बेल कर्णधार होऊ शकतो. कदाचित ही मालिका संपण्यापूर्वीच हा निर्णय होऊ शकेल.
19 Jul 2014 - 9:22 pm | श्रीगुरुजी
सामना चांगल्या अवस्थेत आहे. तिसर्या दिवशी दोन्ही संघाचे डाव संपून भारत २४ धावांनी मागे आहे. पण दुसर्या डावात आतापर्यंत भारत १ बाद १०७ अशा उत्तम स्थितीत आहे. सामना निर्णायक होण्याची दाट शक्यता आहे. आज दिवसअखेर भारताकडे अंदाजे १६० धावांची आघाडी असेल. उद्या ४ थ्या दिवशी भारताने चहापानानंतर १ तास खेळून अंदाजे ३७५ धावांचे आव्हान दिले तर ५ व्या दिवशी इंग्लंडला हिरव्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूप अवघड जाणार आहे.
इंग्लंडतर्फे अॅण्डरसन (आतापर्यंत ३ डावात ९ बळी व २ डावात १०० धावा) व भारतातर्फे भुवनेश्वर कुमार (आतापर्यंत २ डावात ११ बळी व ३ डावात १५७ धावा) जबरदस्त कामगिरी करत आहेत.
20 Jul 2014 - 8:21 pm | श्रीगुरुजी
मस्त सामना चाललाय. इंग्लंडला आजच्या उर्वरीत २ तासात व उद्या ५ व्या दिवशी विजयासाठी आवश्यक असलेल्या ३१९ धावा करणे अवघड आहे. भारताला सामना जिंकून मालिकेत सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. भुवनेश्वर पुन्हा एकदा चमकला. २ कसोटीत ४ डावात २०० हून अधिक धावा (त्यात ३ अर्धशतके) आणि आतापर्यंत ११ बळी ही जबरदस्त अष्टपैलू कामगिरी आहे. मुरली विजय सुद्धा उत्तम खेळतोय. कोहली अजून अयशस्वी आहे (अनुष्काचा पायगुण ?). परंतु मालिकेच्या उत्तरार्धात तो नक्की भरात येईल.
21 Jul 2014 - 7:58 pm | सौंदाळा
भारताचा इंग्लंड्वर अद्भुत, संस्मरणीय विजय.
जबरदस्त झाली कसोटी
21 Jul 2014 - 9:32 pm | श्रीगुरुजी
मस्त जिंकलो. कालच लिहिल्याप्रमाणे आज भारताला चांगलीच संधी होती. अनपेक्षितरित्या इशांत शर्माने जबरी गोलंदाजी केली. भारतीय संघाचे अभिनंदन!
21 Jul 2014 - 9:48 pm | असंका
आणि मग-
धन्य!!
अनपेक्षित फक्त तुम्हाला....कारण इशांतने चौथ्या दिवशीसुद्धा इंग्लंडच्या चारपैकी दोन विकेट काढल्या होत्या! त्यामुळे तो चांगले खेळणार अशी अपेक्षा ठेवणेच योग्य होते.
22 Jul 2014 - 1:25 pm | श्रीगुरुजी
काल ईशांतने चांगली गोलंदाजी केली हे मान्य आहे. परंतु गेली काही वर्षे तो अत्यंत खराब गोलंदाजी करत होता हे सुद्धा सत्य आहे. त्याला कालच्या विजयाचे क्रेडीट आहेच. त्याच्याबरोबरीने भुवनेश्वर कुमारलाही (४४ आणि ५२ धावा आणि पहिल्या डावात ५ बळी) सामनावीर पुरस्कार द्यायला हवा होता. पहिल्या कसोटीतही भुवनेश्वरला डावलून जेम्स अॅण्डरसनला सामनावीर पुरस्कार दिला होता (भुवनेश्वर ५८ आणि नाबाद ६३ धावा आणि पहिल्या डावात ६ बळी).
>>> >>> अनपेक्षित फक्त तुम्हाला....कारण इशांतने चौथ्या दिवशीसुद्धा इंग्लंडच्या चारपैकी दोन विकेट काढल्या होत्या! त्यामुळे तो चांगले खेळणार अशी अपेक्षा ठेवणेच योग्य होते.
काल भुवनेश्वर कुमार खूप बळी मिळवेल असे वाटत होते. प्रत्यक्षात त्याला एकही बळी मिळाला नाही.
22 Jul 2014 - 1:39 pm | बाळ सप्रे
सहमत..
कालचा विजय त्याच्या कारकीर्दीतला टर्निंग पॉइंट ठरो .. आणि याआधीचा "तो" ईशांत परत न येवो!! :-)
23 Jul 2014 - 12:08 am | अत्रुप्त आत्मा
सहमत. *good*
24 Jul 2014 - 11:27 am | नाखु
त्याची "केस" फारच डोळ्यावर आणी हाताबहेर झाली होती आता "सावरून" जाग्यावर येईल अशी अपेक्षा.
पण काही करा भुवीचा "पठाण" करू नका!!
25 Jul 2014 - 7:35 pm | असंका
बर्याच लोकांना धक्का बसला आहे म्हणे इशांतच्या खेळण्याचा! त्याने पाँटिंगची काय भंबेरी उडवली होती ती तरी आठवायची!
25 Jul 2014 - 8:51 pm | श्रीगुरुजी
त्याने पॉंटिंगची एकाच डावात भंबेरी उडविली होती आणि ती सुद्धा जानेवारी २००८ मध्ये (म्हणजे तब्बल साडेसहा वर्षांपूर्वी). त्यानंतर किमान २०१३ अखेरीपर्यंत तो फारसा चमकला नाही. काही सामने तर त्याच्या खराब गोलंदाजीमुळे आपण हरलो. उदाहरणार्थ नोव्हेंबर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतात ७ एकदिवसीय सामन्यांची मालिका झाली होती. त्यातल्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी शेवटच्या ३ षटकात तब्बल ४७ धावा हव्या होत्या व त्यांचे ६ खेळाडू बाद झाले होते. दुसर्या कोणत्याही संघाने इतका हातात आलेला सामना क्वचितच घालविला असता. त्या सामन्यात इशांत शर्माने ४८ वे षटक टाकताना सर्व चेंडू लेगस्टंपवर आखूड टप्प्याचे किंवा फुल्टॉस या प्रकारचे टाकले. त्यात १ नोबॉलही होता ज्यावर फ्रीहिट सुद्धा मिळाली. समोर फॉकनर होता. त्याने त्या षटकात तब्बल ३४ धावा चोपून उर्वरीत २ षटकांत फक्त १३ धावा अशी सोपी परिस्थिती निर्माण करून शेवटी जवळपास पूर्ण हरलेला सामना जिंकून दाखविला.
इशांतची कामगिरी जानेवारी २००८ नंतर फारशी चांगली नव्हती. अर्थात २०१४ मध्ये तो सुधारल्यासारखा वाटतोय. जानेवारी २०१४ मध्ये द. आफ्रिकेत त्याने पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ४ बळी व दुसर्या डावात १ बळी अशी चांगली गोलंदाजी केली. नंतर न्यूझीलँडमध्ये दोन्ही कसोटीतल्या एकेका डावात ६-६ बळी मिळवून २ सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक १६ बळी मिळविले. आणि सध्याच्या मालिकेत पहिल्या कसोटीत ३ व दुसर्या कसोटीत ७ बळी मिळवून "सामनावीर" झाला. एकंदरीत तब्बल ६ वर्षांनी परदेशात त्याला बळी मिळायला लागलेत. त्याचा हाच फॉर्म कायम रहावा हीच सदिच्छा!
29 Jul 2014 - 2:20 pm | असंका
फॉर्म इज टेंपररी, क्लास इज परमनंट
21 Jul 2014 - 9:52 pm | स्वाती दिनेश
लॉर्डस वर जिंकले..
अच्छे दिन !
स्वाती
22 Jul 2014 - 1:32 pm | श्रीगुरुजी
पंचांचे काही निर्णय भारताविरूद्ध गेले नसते तर अजून सहज व लवकर सामना जिंकला नसता. दुसर्या डावात रहाणेच्या आर्म गार्डला लागून उडालेल्या चेंडूवर त्याला चुकीचे बाद दिले गेले. इंग्लंडच्या दुसर्या डावात ४ थ्या दिवशी मोईन अली जडेजाच्या गोलंदाजीवर अगदी अचूक पायचित झाला होता. पायावर चेंडू बसला तेव्हा तो क्रीजच्या आतच होता आणि रिप्लेमध्ये तो चेंडू मधल्या यष्टीवर आदळत असल्याचे स्पष्ट दिसले. तरीसुद्धा धर्मसेनाने त्याला बाद दिला नव्हता. त्याच मोईन अलीने पुढे तब्बल २ तास खेळून १०१ धावांची भागीदारी करून सामना इंग्लंडच्या दिशेने न्यायला सुरूवात केली होती.
या सामन्या साठी डी आर एस प्रणाली असती तर भारताला खूप फायदा झाला असता. जगात फक्त भारताचा डी आर एस ला विरोध आहे. या विरोधाचे कारण अनाकलनीय आहे.
22 Jul 2014 - 2:38 pm | तुषार काळभोर
कूक- फॉर्म परत येतोय बहुतेक.... (संघातील स्थान राहील, कर्णधारपद जाऊ शकते, पण सध्यातरी इंग्लंडकडे दुसरा कर्णधार दिसत नाहिये.)
धवन-दुसर्या डावातील मोजक्या धावांचा फार उपयोग होईल असे वाटत नाही, गंभीर वाट पाहतोय.
बिन्नी-सध्या फक्त ३ पूर्ण गोलंदाज (भुवनेश्वर, शमी, इशांत), अन् २ 'फलंदाज-गोलंदाज' किंवा 'गोलंदाज-फलंदाज' (जडेजा अन् बिन्नी) आहेत. बहुतेक बिन्नी/जडेजा पैकी एकाला बसवून अश्विनला अंतिम संघात घेतील. (तो बर्यापैकी फलंदाजी सुद्धा करू शकतो.) भुवनेश्वरसुद्धा अडीनडीला उपयोगी पडू शकतो.
22 Jul 2014 - 9:26 pm | श्रीगुरुजी
धवनला अजून एका कसोटीत संधी मिळेल. त्यातही तो अपयशी झाला तर गंभीर नक्की आत येईल.
तिसर्या कसोटीत बिन्नीच्या जागी अश्विन आत यायची शक्यता आहे.
इंग्लंडची तिसर्या कसोटीआधीच एक विकेट पडली आहे. तिसर्या कसोटीसाठी मॅट प्रॉयर च्या जागी जॉस बटलर ला यष्टीरक्षक म्हणून घेतले आहे. बेन स्टोक्स च्या जागी ख्रिस जॉर्डन किंवा ख्रिस वोक्स येण्याची देखील शक्यता आहे.
इंग्लंडने खरं तर केव्हिन पीटरसन व जोनाथन ट्रॉट ला परत बोलवायला पाहिजे. जमल्यास ग्रॅमी स्वानला देखील निवृत्ती रद्द करून परत बोलवावे. भारताविरूद्ध मधुसुदन पानसरेला का घेतले नाही याचे अजून आश्चर्य वाटत आहे.
23 Jul 2014 - 10:45 am | सौंदाळा
त्याचेदेखिल ट्रॉट्प्रमाणे संतुलन बिघडले आहे (पबमधे दारु पिऊन बांउसर्सवर मुतणे).
त्यातच हल्लीच त्याचा घटस्फोट झाल्यामुळे तो संघनिवडीसाठी उपलब्ध नव्हता असे मित्राकडुन ऐकले होते.
23 Jul 2014 - 12:41 pm | श्रीगुरुजी
>>> त्याचेदेखिल ट्रॉट्प्रमाणे संतुलन बिघडले आहे (पबमधे दारु पिऊन बांउसर्सवर मुतणे).
लघुशंका हे कारण नसावे कारण अॅण्डरसन, पीटरसन आणि अजून एक खेळाडू या तिघांनी देखील रात्री मैदानात जाऊन खेळपट्टीवर लघुशंका केली होती. त्यातला अॅण्डरसन अजूनही संघात आहे. बहुतेक पानसरे फॉर्मात नसावा. अन्यथा भारताविरूद्ध त्याला नक्की घेतले असते.
23 Jul 2014 - 12:48 pm | प्यारे१
एक शंका: खेळपट्टी आणि पबातला बाऊन्सर. काही फरक करत नाही का आपण? ;)
23 Jul 2014 - 12:53 pm | श्रीगुरुजी
दारूच्या नशेत खेळपट्टीवर केलेली लघुशंका असो वा दारूच्या नशेत वरच्या मजल्यावरून सोडलेली धार असो (एका बाऊन्सरच्या दुर्दैवाने तो नेमका त्याच धारखाली सापडला), दोन्ही कृती सारख्याच किळसवाण्या आहेत.
28 Jul 2014 - 9:06 pm | श्रीगुरुजी
तिसर्या कसोटीसाठी इंग्लंडने परत पाटा खेळपट्टी बनविली. इंग्लंड बहुतेक ५५० च्या आसपास डाव घोषित करेल असं वाटतंय. बिन्नीच्या जागी अश्विनला न घेता रोहीत शर्माला घेण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. अश्विन व रोहीत च्या फलंदाजीत फार फरक नाही, पण गोलंदाजीत खूप फरक आहे.
पंकज सिंगचं दुर्दैव. त्याच्या गोलंदाजीवर दोन झेल सुटले व एक अत्यंत स्पष्ट असलेला पायचितचा निर्णय पंचांनी नाकारला. डी आर् एस् असती तर पायचित चा निर्णय भारताच्या बाजूने लागला असता. भारताचा डी आर् एस् असलेला विरोध अनाकलनीय आहे. तंत्रज्ञान हाताशी असून वापरायचे नाही या निर्णयामागे काहीच तर्कशुद्ध कारण नाही. आयुष्यात कधीही क्रिकेट न खेळलेले श्रीनिवासन्, राजीव शुक्ला इ. मंडळी बीसीसीआय वर नागोबा सारखी वेटोळे घालून बसलेली आहेत. बीसीसीआय ची सूत्रे क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंच्या हातात असती तर असे अनाकलनीय निर्णय झाले नसते आणि कदाचित भ्रष्टाचारही कमी झाला असता. असो.
29 Jul 2014 - 8:44 pm | श्रीगुरुजी
पाटा खेळपट्टीवर भारताची वाट लागलेली दिसतेय (आतापर्यंत ५ बाद २१७). एकटा रहाणे अर्धशतक काढून खिंड लढवतोय. मुरली विजय, पुजारा, कोहली आणि रोहीत शर्मा एक तासापेक्षा अधिक वेळ खेळून आणि प्रत्येक जण किमान ५२ चेंडू खेळून स्थिरावल्यावर मोठी धावसंख्या न करता बाद झाले. धवन पुन्हा एकदा अपयशी ठरला. ऑफ किंवा मधल्या यष्टीवर पडून बाहेर जाणारे चेंडू खेळणे त्याला अशक्य होताना दिसतंय. पुढच्या डावात काही केलं नाही तर गंभीर नक्कीच आत येणार.
एकंदरीत परिस्थिती कठीण आहे.
29 Jul 2014 - 8:46 pm | श्रीगुरुजी
रहाणे पण गेला.
30 Jul 2014 - 8:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कालच्या विकेटा टाकण्याची शैली पाहता आज फॉलॉअन नक्की.
-दिलीप बिरुटे
30 Jul 2014 - 12:45 pm | श्रीगुरुजी
फॉलोऑनची परिस्थिती असली तरी इंग्लंड फॉलोऑन न देता अंदाजे ३ तास फलंदाजी करून १६०-१७० धावा करून डाव घोषित करेल व दुसर्या डावात अंदाजे ८ तासाच्या खेळात भारतापुढे ३७५-४०० धावांचे आव्हान ठेवेल.
२००१ मध्ये कलकत्त्यात दुसर्या कसोटीत स्टीव्ह वॉ ने भारताला फॉलोऑन दिला होता आणि नंतर भारताने लक्ष्मण-द्रविडच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर ५ व्या दिवशी १ तासानंतर डाव घोषित करून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३००+ धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर भज्जीच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यासारखा कोसळून भारताला ऐतिहासिक विजय मिळाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया व इतर सर्व देश फॉलोऑन देणे शक्य असूनही ५ व्या दिवशी खराब झालेल्या खेळपट्टीवर फलंदाजी टाळण्यासाठी फॉलोऑन न देता फलंदाजी करतात.
30 Jul 2014 - 1:00 pm | तुषार काळभोर
२००८ च्या चेन्नई कसोटित भारताने चौथ्या डावात ३८० चं आव्हान आरामात पार केलं होतं. (सेहवागमुळे ते शक्य झाले होते)
त्यामुळे इंग्लंड ४५० पेक्षा कमी आव्हान ठेवील असे वाटत नाही.
30 Jul 2014 - 1:18 pm | श्रीगुरुजी
तेव्हा फॉलोऑनची परिस्थिती नव्हती. इंग्लंडने अंदाजे ७ तासात भारताला ३७५ धावांचे आव्हान दिले तेव्हा भारताला ५ व्या दिवशी फलंदाजी करणे अवघड जाईल असाच इंग्लंडचा अंदाज होता.
तसेच भारत हे आव्हान न स्वीकारता बचावात्मक खेळ करून सामना अनिर्णित ठेवायचा प्रयत्न करेल असाही इंग्लंडचा अंदाज होता. त्याला कारणही तसेच होते कारण भारताने भूतकाळात फक्त ४ वेळा ४ थ्या डावात ५ व्या दिवशी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. (१९७६ मध्ये विंडीजमध्ये तिसर्या कसोटीत ४०४ धावांच्या आव्हानाचा भारताने यशस्वी पाठलाग केला होता. त्यात गावसकर व विश्वनाथचे शतक, मोहिंदरचे अर्धशतक व ब्रिजेश पटेलच्या नाबाद ४९ धावांचा वाटा होता. नंतर १९७७-७८ मध्ये ऑस्ट्रेलियात भारताने ५ व्या कसोटीत ४७६ धावांचा पाठलाग करताना सर्वबाद ४५० धावा केल्या होत्या. नंतर १९७९ मध्ये इंग्लंडमध्ये भारताने ४ थ्या कसोटीत ४३९ धावांचा पाठलाग करताना ८ बाद ४२९ पर्यंत मजल मारली होती. त्यानंतर १९८६ मध्ये भारतात मद्रासमध्ये तिसर्या कसोटीत भारताने ३४८ धावांचा पाठलाग करताना सर्वबाद ३४७ धावा करून इतिहासातला केवळ दुसरा कसोटी सामना बरोबरीत सोडविला होता.)
मात्र इतर प्रसंगी भारताने कच खाऊन ५ व्या दिवशी बचावात्मक खेळ करून सामना न हरण्याची दक्षता घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. (उदा. १९८६ मध्ये इंग्लंडमधील ३ रा कसोटी सामना, १९९३ मध्ये आफ्रिकेतील ४ था कसोटी सामना, नंतर २०११ मध्ये आफ्रिकेविरूद्ध आफ्रिकेतील ३ रा कसोटी सामना, २०११ मध्येच विंडीजविरूद्ध विंडीजमधील ३ रा कसोटी सामना इ.).
त्यामुळेच कदाचित भारत ५ व्या दिवशी धावांचा पाठलाग करण्याचे धाडस करणार नाही असे गृहीत धरून स्ट्रॉसने डाव घोषित करून आव्हान दिले होते. पण सेहवागच्या ५८ चेंडूत ८५ धावा व सचिनचे नाबाद शतक यामुळे भारताने ३७५ धावांचे आव्हान लीलया पार करून सामना जिंकला. अर्थात त्या सामन्यात खेळपट्टी पाटा होती हे सुद्धा विसरून चालणार नाही.
30 Jul 2014 - 8:47 pm | श्रीगुरुजी
जिंकायला ४४५ करायच्यात. अत्यंत अवघड लक्ष्य आहे. जवळपास १२० षटके ८ तासात खेळायची आहेत. जिंकणे जवळपास अशक्य आहे. सामना वाचविण्याची शक्यता देखील बरीच कमी आहे. चांगले तंत्र असलेल्या रहाणे, पुजारा व कोहलीवरच सगळी मदार आहे. इतरांची खात्री नाही.
अर्थात माझे अंदाज खोटे ठरो हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!
30 Jul 2014 - 10:52 pm | मंदार कात्रे
चार जण गेलेदेखील !
31 Jul 2014 - 9:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पराभवापासून फक्त देवच वाचवू शकतो.
-दिलीप बिरुटे
31 Jul 2014 - 2:15 pm | श्रीगुरुजी
देव मागील वर्षीच निवृत्त झाल्याने आता पराभवापासून कोणीच वाचवू शकत नाही !
31 Jul 2014 - 3:11 pm | प्रचेतस
कोण देव?
31 Jul 2014 - 3:16 pm | केदार-मिसळपाव
देवपण नाही वाचवु शकला.
प्रत्येक गोष्ट देवावर नका टाकु. मागची इंग्लंड मधली कसोटी मालिका विसरलात वाटते.
31 Jul 2014 - 11:49 am | बाळ सप्रे
लॉर्ड्सवर भारतीय फास्ट बोलर्सनी बाउंसरवर विकेट काढल्या.. आणि आता ईंग्लिश पार्टटाइम स्पिनर्स स्पिन चांगल्याप्रकारे हाताळणार्या भारतीय फलंदाजांच्या विकेट्स काढतायत ते पण ईंग्लिश खेळपट्टीवर.. दोन टोकाचे परफॉरमन्सेस !!
बाकी भारत परदेशात गेल्यावर मालिकेत एकापेक्षा जास्त कसोटी सामना जिंकत नाही (अपवाद पाकवरील २-१ विजय).. आणि हा सामना तर ऑलमोस्ट हरलाच आहे.. बाकी २ ड्रॉ करण्याचीच अपेक्षा आहे आता.
31 Jul 2014 - 2:13 pm | श्रीगुरुजी
>>> बाकी भारत परदेशात गेल्यावर मालिकेत एकापेक्षा जास्त कसोटी सामना जिंकत नाही (अपवाद पाकवरील २-१ विजय)..
हे तितकेसे खरे नाही. भारताने १९६८ मध्ये न्यूझीलँड मध्ये ३-१ असा विजय मिळविला होता. १९७६-७७ मध्ये ऑस्ट्रेलियात २-३ अशी मालिका हरली होती. १९८६ मध्ये इंग्लंडमध्ये २-० असा विजय मिळविला होता. १९७६ मध्येच भारताने न्यूझीलँडला न्यूझीलँडमध्ये २-१ असे हरविले होते.
अर्थात ही तुरळक उदाहरणे आहेत. अगदी थोड्या मालिकांमध्ये भारताने एकापेक्षा जास्त कसोटी सामने जिंकले आहेत.
31 Jul 2014 - 4:45 pm | बाळ सप्रे
गेल्या दोन दशकात म्हणायचं होतं मला..
खास करुन अझरुद्दीनच्या संघाने १९९३ ला इंग्लंड्ला ३-० हरवून मायदेशात जिंकायची सवय लावल्यापासून.. त्यापूर्वी मायदेशातपण इतके जिंकत नसत..
31 Jul 2014 - 5:35 pm | नन्दादीप
हरलो आपण...
31 Jul 2014 - 5:55 pm | सौंदाळा
हम्म
जेवणापर्यंत सुध्दा दम धरला नाही आपल्या फलंदाजांनी.
धवन, रोहीत शर्मा किंवा जडेजा, शामी, पंकजसिंग यांची गछंती होऊन गंभीर, अश्विन, अरॉन किंवा इश्वर पांडे, इशांत शर्मा आत येतील असे वाटत आहे.
पुढची कसोटी ७-ऑगस्ट मँचेस्टरला होणार आहे.
1 Aug 2014 - 11:07 am | श्रीगुरुजी
पुढच्या सामन्यात धवन आणि रोहीत शर्मा गच्छंती होऊन गंभीर आणि अश्विन आत यावेत अशी इच्छा आहे. धवन नक्की बाहेर जाणार. परंतु रोहीत शर्मा हा धोनीचा 'ब्ल्यू आईड बॉय' असल्याने कितीही वाईट खेळला तरी तो संघात असतोच . त्यामुळे त्याची गच्छंती अवघड वाटतेय. (२०१२ मध्ये श्रीलंकेच्या दौर्यात ५ एकदिवसीय सामन्यात त्याने एकूण १८ धावा केल्या होत्या. तरीसुद्धा त्यानंतरच्या ट-२० मध्ये त्याला खेळवलंच. वास्तविक पहिल्या ३ एकदिवसीय सामन्यात ०, ४, ४ अशी कामगिरी केल्यावर त्याला लगेच हाकलायला हवा होता. पण धोनीचा तो लाडका असल्याने त्याला उर्वरीत सर्व सामने खेळविले. पूर्वी रवी शास्त्री असाच गावसकर व डुंगरपूर यांचा कमालीचा लाडका होता.)
पंकज सिंग दुर्दैवी ठरला. त्याच्या गोलंदाजीवर २ झेल सुटले. परंतु दुर्दैवाने त्यालाही कदाचित बाहेर काढून वरूण एरॉन/ईश्वर पांडे आत येण्याची शक्यता आहे. ५ गोलंदाज नको असेल तर बुद्धीमान साहा हा सुद्धा एक पर्याय उपलब्ध आहे.
भारत खराब फलंदाजी, खराब गोलंदाजी व अत्यंत खराब क्षेत्ररक्षणामुळे हरला हे सत्य आहे. त्याच बरोबरीने पंचांची सदोष कामगिरी देखील इंग्लंडच्या विजयाला कारणीभूत ठरली. डी आर एस पद्धत असती तर भारताला बराच फायदा होऊ शकला असता. असो.
1 Aug 2014 - 12:00 pm | श्रीगुरुजी
अजून एक बदल अपेक्षित आहे. शमीच्या जागी दुसरा मध्यमगती गोलंदाज येईल असं वाटतंय.
1 Aug 2014 - 3:31 pm | असंका
2012 नंतर एकदम 2014 आले का हो? आणि 2014 च्या आधी फक्त 2012 होते का?
आणि रोहित शर्मा एकुण किती कसोटी खेळला आहे की ज्यामुळे आपण तो लाडका असल्याचा निष्कर्ष काढला आहे?
1 Aug 2014 - 9:05 pm | श्रीगुरुजी
>>> 2012 नंतर एकदम 2014 आले का हो? आणि 2014 च्या आधी फक्त 2012 होते का?
रोहीत शर्माचे सुरवातीपासूनचे सर्व कसोटी डाव बघा (६ नोव्हेंबर २०१३ पासून आजतगायत).
१७७, १११* (दोन्ही भारतात विंडीजविरूद्ध),
१४, ६, ०, २५ (द. आफ्रिकेत द. आफ्रिकेविरूद्ध),
७२, १९, ०, ३१* (न्यूझीलँडमध्ये किवींविरूद्ध),
२८, ६ (सध्याच्या मालिकेत इंग्लंडमध्ये इंग्लंडविरूद्ध)
भारतातल्या पाटा खेळपट्टीवर विंडीजच्या अतिसामान्य गोलंदाजीसमोर तो २ डाव खेळला व दोन्ही डावात शतके केली. पण भारताबाहेर पडताक्षणी त्याच्या धावा बंद झाल्या. ७२ हा एकमेव डाव वगळता परदेशातील १० पैकी ९ डावात तो अपयशी आहे.
त्याची एकदिवसीय सामन्यातील कामगिरी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की लागोपाठ अनेक डावात अपयशी ठरूनसुद्धा तो संघात असतो.
उदा. १७ फेब्रु २००८ ते ३ जुलै २००९ या अंदाजे साडेसोळा महिन्यांच्या कालावधीत तो एकूण ३१ एकदिवसीय सामने खेळला. त्यात फक्त २ अर्धशतके (५८ आणि ६६)आणि एकदा ४३ व एकदा ३२ धावा केल्या होत्या. उर्वरीत २७ सामन्यात त्याने ० ते २८ च्या दरम्यान धावा केल्या होत्या. त्यात १५ वेळा त्याने एकेरी आकड्यात धावा केल्या आहेत (३१ पैकी १५ सामन्यात एकेरी धावा आणि त्यात ३ वेळा ०). तरीसुद्धा तो संघात टिकला.
२०१० मध्ये त्याने तुलनेने काहीशी कामगिरी सुधारली. नंतर ११ डिसेंबर २०११ ते ३० डिसेंबर २०१२ या अंदाजे साडेबारा महिन्यात तो एकूण १५ सामने खेळला. त्यात फक्त १ अर्धशतक (६८ धावा) होते. उर्वरीत १४ डाव तो ० ते ३३ या दरम्यान बाद झाला. त्यात १५ पैकी ८ डावात त्याने एकेरी धावा केल्या (त्यात ३ वेळा ०). जुलै २०१२ मध्ये श्रीलंकेत झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याला पाचही सामन्यात खेळविले होते आणि त्याची कामगिरी होती ५, ०, ०, ४, ४. आश्चर्य म्हणजे या मालिकेपाठोपाठ लगेचच शेवटचा ट-२० सामना होता. ५ सामन्यात अपयशी ठरल्यावर निदान ट-२० मध्ये तरी त्याच्याऐवजी दुसर्या फलंदाजाला संधी द्यायला हवी होती. परंतु तो धोनीचा लाडका असल्याने या सामन्यात पण त्यालाच संधी मिळाली. त्याची कामगिरी बघता तो अनेकवेळा लागोपाठ अनेक सामने अपयशी ठरून सुद्धा त्याला वारंवार संधी मिळाल्याचे स्पष्ट आहे. त्याच्यामुळेच रहाणेसारखा गुणी खेळाडू अनेक वर्षे संघाबाहेर राहिला होता.
4 Aug 2014 - 12:54 am | असंका
सचिन आणि युवराजनंतर सर्वात शैलीदार फलंदाज आज रोहित शर्मा आहे. तो भरात असताना त्याचा खेळ ज्यांनी कुणी बघितला आहे ते हे अमान्य करू शकत नाहीत.
मनोरंजन हा जर क्रिकेट बघण्याचा उद्देश आसेल तर रोहित एवढं मनोरंजन करणारा आज आपल्याकडे कुणीच नाही.
पण हे माझं मत झालं. जसं रहाणे हा गुणी खेळाडू असल्याचं आपलं मत आहे तसंच.
आपण आपली मतं स्वतंत्रपणे का मांडत नाही? माझ्या प्रश्नांच्या खालीच आपण आपली मतं मांडल्यामुळे माझा असा गैरसमज झाला की ही माझ्या प्रश्नांना आपली उत्तरे आहेत.
आपल्या सोइसाठी माझे प्रश्न सोपे करुन सांगतो-
1. 2013 साली रोहितने किती सामन्यात किती धावा केल्या?
2. 2011 साली रोहितने किती सामन्यात किती धावा केल्या
3. रोहित हा आजपर्यंत सगळे मिळून एकूण किती कसोटी सामने खेळला आहे की ज्या आधाराने तो लाडका आहे असे दिसून येते?
4 Aug 2014 - 12:50 pm | श्रीगुरुजी
रोहीतच्या कसोटी डावांची माहिती आधीच्या प्रतिसादात दिली आहे. त्याची पुनरावृत्ती इथे करत नाही.
त्याची २०११ मधील एकदिवसीय सामन्यातील कामगिरी अशी होती. (१२/१/२०११ ते ११/१२/२०११)
(द. आफ्रिकेत) ११, ९, २३, १, ५,
(वेस्ट इंडीजमध्ये) ६८*, ७*, ८६*, ३९, ५७,
(इंग्लंडमध्ये) ०*,
(भारतात विंडीजविरूद्ध) ७२, ९०*, ९५, २७, २१
ही कामगिरी अतिशय बोलकी आहे. परदेशात, विशेषतः आफ्रिकेत, तो कायमच अपयशी ठरताना दिसतो. ५ सामन्यांच्या मालिकेत पहिले ३ सामने अपयशी ठरूनही त्याला उर्वरीत सर्व सामने खेळविले जातात (११, ९, २३, १, ५). नंतर २०१२ मध्येही श्रीलंकेत पहिल्या ३ एकदिवसीय सामन्यात ५, ०, ० अशी कामगिरी करूनसुद्धा त्याला वगळले जात नाही व उर्वरीत सर्व सामने खेळविले जातात (५,०,०,४,४). यावरून तो कर्णधाराच्या मर्जीतला आहे हे सिद्ध होतं.
याच रोहीतची कामगिरी भारतात व विंडीजच्या अतिसामान्य गोलंदाजीविरूद्ध एकदम सुधारते आणि त्या भांडवलावर तो संघात स्थान टिकवितो. पण इतर देशांविरूद्ध त्याची कामगिरी एकदम ढेपाळते.
त्याने २०१२ मध्ये १३ एकदिवसीय सामन्यात एकूण १६८ धावा केल्या (त्यात फक्त एक अर्धशतक - ८३). ही अत्यंत खराब कामगिरी बघता त्याला एकदिवसीय सामन्यातून वगळायला हवे होते. पण तरीसुद्धा तो संघात होता.
त्याची २०१३ मधील एकदिवसीय सामन्यातील कामगिरी अशी होती. (२३/१/२०१३ ते ०८/१२/२०१३)
(भारतामध्ये इंग्लंडविरूद्ध) ८३, ४
(चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये) ६५, ५२, १८, ३३, ९
(वेस्ट इंडिजमध्ये) ६०, ५, ४६, ४८*, ५८
(झिंबाब्वेमध्ये) २०, १, १४, ६४*
(भारतात ऑस्ट्रेलियाविरूद्ध) ४२, १४१*, ११, ९, ७९, २०९,
(भारतात विंडीजविरूद्ध) ७२, १२, ४
(द. आफ्रिकेत) १८, १९
यावरून पुन्हा एकदा असंच दिसतंय की तो विंडीजविरूद्ध आणि बहुतेक वेळा भारतीय खेळपट्ट्यांवरच धावा करतो. इतर देशात त्याच्या धावा बहुतेक वेळा आटलेल्या दिसतात. अगदी झिंबाब्वेमध्ये सुद्धा ४ पैकी ३ डावात तो अपयशी होता. द. आफ्रिकेविरूद्ध तर तो कधीच धावा करताना दिसत नाही.
त्याची २०१४ मधील एकदिवसीय सामन्यातील कामगिरी अशी होती.
(न्यूझीलँड मध्ये) ३, २०, ३९, ७९, ४
(बांगलादेश मध्ये) २१, १३, ५६, १८*
विंडीजशिवाय इतर देशांमध्ये तो फारसा यशस्वी नसतो हे पुन्हा एकदा २०१४ वरून सिद्ध होतंय.
7 Aug 2014 - 7:21 pm | असंका
नाही हो, असं नाही. तीन वाक्यात उत्तर देता येत होतं. आपण अगोदर रोहितबद्द्ल टीका करताना कसं २०१३ मध्ये त्याने अमुक एवढे रन केले असं एका वाक्यात लिहिलं होतंत ना, तसंच.
आता तुम्ही एक काम करा. खाली मी तयार वाक्यच देतो. त्यात गाळलेल्या जागा फक्त भरा-
१. रोहित शर्माने २०१३ साली _____ सामन्यांमध्ये ______ धावा केल्या.
२. रोहित शर्माने २०११ साली ________ सामन्यांमध्ये ______ धावा केल्या.
३. रोहित शर्मा सगळ्या मिळून आत्तापर्यंत ___ कसोटी खेळला आहे, ज्यावरून असे सिद्ध होते की तो कर्णधाराचा लाडका आहे.
31 Jul 2014 - 6:13 pm | देशपांडे विनायक
जडेजाने सोडलेला CATCH आणि रोहित शर्माने पहिल्या इंनिंग ला फेकलेली विकेट
यामुळे हरण्याला पर्याय नाही असे दिसायला लागले होते ते शेवटी दिसलेच
1 Aug 2014 - 11:20 am | बाळ सप्रे
वृध्दीमान साहा भारतात परतणार आहे .. बहुतेक दुखापतीमुळे. त्याच्याजागी नमन ओझाला बोलावले आहे.
नमन ओझाने ऑस्ट्रेलियात ३ डावात १ द्विशतक आणि २ शतके केली आहेत त्यातही २ दा नाबाद. दोनही सामने ब्रिस्बेनच्या उसळत्या खेळपट्टीवर होते.
तो वेळेत पोहोचला तर त्याची वर्णी लागावी असे वाटते. इशांत चौथा सामनाही खेळु शकणार नाही हे धोणीने कालच स्पष्ट केलय. त्यामुळे बदल होणार संघात हे नक्की. पण अति बदल टाळण्यासाठी कदाचित शमीला परत संधी मिळु शकेल.
संघ असा असावा ४थ्या सामन्यासाठी असे वाटते.
विजय, ओझा/ गंभीर, पुजारा, कोहली, रहाणे, धोणी, जडेजा, अश्विन, भुवनेश्वर, शमी, पांडे/ अॅरॉन
7 Aug 2014 - 11:41 pm | भाते
दहापैकी सहा खेळाडू शुन्यावर बाद! एका कसोटी सामन्यात सर्वाधिक खेळाडू शुन्यावर बाद होण्याचा जागतिक विक्रम काय आहे?
सचिनने वयाच्या सतराव्या वर्षी इथेच आपले पहिले कसोटी शतक झळकावले होते!
8 Aug 2014 - 9:44 am | सौंदाळा
आम्ही आता प्रो-कबड्डी बघायला सुरुवात केली.
11 Aug 2014 - 12:21 pm | श्रीगुरुजी
६-७ दिवस मिपा संकेतस्थळ बंद होते. तेवढ्यात चौथा कसोटी सामना सुरू होऊन ३ दिवसांत संपलादेखील. तिसर्या दिवशी शेवटच्या केवळ एका सत्रात भारताने ९ गडी गमावून स्वतःच्या आणि इंग्लंडच्या संघाचीही विश्रांतीची सोय केली. ते सत्र खेळून काढले असते तर उगाच चौथ्या दिवशी स्टेडियममध्ये येऊन बसावे लागले असते आणि दिवसभर पावसाची दाट शक्यता असल्याने खेळही नाही आणि आउटिंग पण नाही अशी भारताची व इंग्लंडची कंटाळवाणी अवस्था झाली असती. ५ व्या दिवशीही तेच झाले असते. त्याऐवजी भारतीय खेळाडूंनी पटापट विकेट फेकून सर्वांचीच अडचणीतून मुक्तता केली. त्यामुळे विराट कोहलीला अनुष्काबरोबर फिरायला २ जास्त दिवस मिळाले. इतरांनाही फुकटचे २ दिवस पदरात पडले.
भारताच्या पहिल्या डावात तब्बल ६ खेळाडूंनी शून्य धावा करून एका जागतिक विक्रमाची बरोबरी केली. या पराभवाबरोबर धोनी आता भारताच्या क्रिकेट इतिहासातील परदेशातील सामन्यातील सर्वाधिक अयशस्वी कर्णधार ठरलेला आहे. पूर्ण फॉर्म हरविलेल्या कुक ला भारतानेच मदतीचा हात दिला. भारताचे प्रमुख फिरकी गोलंदाज बळीसाठी झगडत असताना कामचलावू फिरकी गोलंदाज मोईन अली तब्बल १९ बळी मिळवून मुख्य गोलंदाज बनण्याचे श्रेय भारताचेच आहे. आपल्या पहिल्या बळीसाठी झगडणार्या बिचार्या पंकज सिंगला शेवटी २ बळी मिळाले हीच त्यातल्या त्यात जमेची बाजू.
असो. आता ५ व्या कसोटीसाठी भारताने जास्त विचार करू नये. उर्वरीत मोकळे दिवस सराव वगैरे सारख्या फालतू गोष्टीत वाया न घालविता शॉपिंग, आउटिंग, डेटिंग, पिकनिक इ. महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरावेत. संघ निवडीच्या वेळी सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून पहिले ज्याचे नाव येईल त्याला कर्णधार करावे व उर्वरीत १० खेळाडू चिठ्ठ्या टाकून उचलावेत. कारण कोणीही संघात असले तरी काहीही फरक पडणार नाही. शेवटी पत्त्याच्या कॅटमध्ये जर सर्व ५२ पत्ते कर असले, तर कितीही वेळा पत्ते पिसले तरी काय फरक पडणार आहे?
11 Aug 2014 - 5:44 pm | सौंदाळा
लज्जास्पद पराभव.
मोईन अली विकेट काढतो, जडेजा, अश्विन मात्र रिकामेच.
लॉर्डस् वर जिंकलेला संघ हाच का असा प्रश्न पडलाय.
14 Aug 2014 - 9:09 pm | श्रीगुरुजी
उद्यापासून शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ऐतिहासिक ओव्हल मैदानावर सुरू होत आहे. सुरवातीला १-० असा आघाडीवर असणारा भारत आता १-२ असा मागे पडला आहे. भारत परदेशात लागोपाठ मालिका हरत आहे. २०११ च्या विश्वचषक विजयानंतर भारत परदेशात एकूण ५ मालिका खेळला. त्यापैकी वेस्ट इंडिजचा अपवाद वगळता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका आणि न्यूझीलँडमध्ये भारत मालिका हरला. आता ही मालिकादेखील भारत हरण्याच्या मार्गावर आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारत परदेशात खेळलेले १३ कसोटी सामने हरलेला आहे. याबाबतीत विक्रम ब्रायन लारा व स्टीफन फ्लेमिंगच्या नावावर आहे. दोघेही कर्णधार असताना परदेशात एकूण १६ कसोटी सामने हरले होते. धोनी त्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
उद्या इशांत शर्मा आत येणार हे नक्की. बहुतेक पंकजसिंग बाहेर जाईल. कदाचित जडेजाच्या जागी स्टूअर्ट बिन्नी आत येऊ शकतो. बाकी सगळे "नेहमीचेच यशस्वी कलाकार" असतील.
असो. निदान अंतिम कसोटीत तरी भारताने आपली गेलेली अब्रू काही प्रमाणात परत मिळवावी हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!
15 Aug 2014 - 8:37 pm | श्रीगुरुजी
पुन्हा एकदा तेच रडगाणं. *bad*
आता भारत ९ बाद १०० अशा दयनीय अवस्थेत आहे. *shok*
प्रत्येक कसोटीत भारताची कामगिरी अधिकाधिक खालावत आहे. *HELP*
*diablo*
19 Aug 2014 - 12:15 pm | श्रीगुरुजी
भारतीय संघाला शिव्या द्यायची पण लाज वाटतीये. शिव्या द्यायची पण यांची लायकी नाही. लागोपाठ ३ वेळा एक-दीड सेशन मध्येच ऑलआऊट झाला याची धोनी किंवा इतर कोणालाही लाज, लज्जा, खंत, शरम इ. काहीही वाटत नाही.
आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटचा सत्यानाश झाला हे उघड सत्य आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या आयपीएलचे दुष्परिणाम २०११ मध्येच दिसू लागले होते. सचिन, द्रविड इ. चे तंत्र सुद्धा शेवटी शेवटी बिघडल्याचे दिसले त्याचे कारण आयपीएलच होते. द्रविडसारखा अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाज आपल्या शेवटच्या १५-१६ डावात बहुतेक वेळा त्रिफळा बाद झाला होता तो तंत्र बिघडल्यामुळेच. भारतातल्या पाटा खेळपट्ट्यांवर फलंदाजाला अनुकूल क्षेत्ररक्षक रचनेसमोर बॅट कशीही वेडीवाकडी फिरवून १५-२० चेंडू खेळून २५-३० धावा करणारे शूर वीर कसोटीत एकत्रित ३० षटके सुद्धा टिकू शकत नाहीत हे बघणे अत्यंत क्लेशदायक होते. पूर्वी गावसकर तब्बल २-२ दिवस खेळपट्टीवर ठाण मांडून अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाजी करत असे. आताचे खेळाडू अर्धा तास सुद्धा टिकू शकत नाहीत हे अत्यंत दुर्दैव आहे. एवढी नामुष्की होऊनसुद्धा "उगाच आयपीएलवर जळू नका" असे अत्यंत निगरगट्टपणे धोनी बजावत होता.
आयुष्यात हातात कधीही चेंडूफळी न धरलेल्या पुढार्यांनी जेव्हा बीसीसीआयमध्ये शिरकाव केला तेव्हाच भारतीय क्रिकेटच्या अधोगतीला सुरूवात झाली. ज्या ज्या क्षेत्रात पुढारी घुसतात त्या सर्व क्षेत्रांचा सत्यानाश होतो. भारतीय क्रिकेट सुधारण्याचे उपाय म्हणजे सर्वप्रथम या पुढार्यांना बीसीसीआय मधून हाकलून देणे आणि आयपीएल बंद करणे. जर आयपीएल बंद करणे शक्य नसेल तर निदान आयपीएलमध्ये न खेळणार्यांनाच कसोटी संघात निवडावे व आयपीएलमध्ये खेळणार्यांना फक्त मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळवावे. आणि तेही शक्य नसेल तर भारताने कसोटी क्रिकेट खेळणे थांबवावे.
20 Aug 2014 - 8:02 pm | सौंदाळा
+१
शर्यतीचा बैल वेगळा, शेतीसाठी काम करणारा बैल वेगळा आणि 'ते' काम करणारा वळु वेगळा ;)
क्रिकेटर्सचीपण आयपील, वन डे, टेस्ट अशी वर्गवारी केली पाहीजे.
कमीत कमी कसोटी साठी तरी वेगळे खेळाडु पाहीजेतच असे वाटते.
21 Aug 2014 - 9:08 pm | श्रीगुरुजी
>>> 'ते' काम करणारा वळु वेगळा
*LOL*
>>> क्रिकेटर्सचीपण आयपील, वन डे, टेस्ट अशी वर्गवारी केली पाहीजे. कमीत कमी कसोटी साठी तरी वेगळे खेळाडु पाहीजेतच असे वाटते.
+ १
सध्या एकच बदल लगेच करता येईल. कसोटीसाठी आयपीएल खेळलेले कमीतकमी खेळाडू निवडावेत.
25 Aug 2014 - 12:24 pm | श्रीगुरुजी
आजपासून भारत वि. इंग्लंड ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत आहे. आजचा सामना ब्रिस्टलमध्ये भारतीय वेळेनुसार दु. ३ वाजता सुरू होईल. कसोटी सामन्यात माती खाल्लेल्या भारताने निदान एकदिवसीय सामन्यात तरी अब्रू राखावी. ५ सामन्यांपैकी निदान २ सामने तरी जिंकावेत. म्हणजे किमान लंगोटी तरी शाबूत राहील.
आजपासून झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिका यांच्यात झिंबाब्वेमध्ये तिरंगी एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा सुरू होत आहे. आज झिंबाब्वे वि. ऑस्ट्रेलिया हा सामना भारतीय वेळेनुसार दु. १ वाजता सुरु होईल.
आज विंडीज वि. बांगला यांच्यात देखील एकदिवसीय सामना आहे. तो सामना भा.प्र.वे. नुसार मध्यरात्री १२ वाजता सुरू होईल.
28 Aug 2014 - 12:47 pm | श्रीगुरुजी
काल चक्क जिंकलो आपण. तब्बल १३३ धावांनी जिंकलो. काही अपवाद वगळता संघातील सर्वांचीच कामगिरी उत्तम झाली. धवन आणि कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरले. कोहलीला आता काही काळ विश्रांती द्यायची वेळ आली आहे. त्याची पूर्वपुण्याई संपत आली आहे.
तिकडे झिंबाब्वेमधील तिरंगी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत तब्ब्ल ३२७ धावा करून सुद्धा पराभव पदरी पडला. द आफ्रिकच्या फाफडू आणि डी व्हीलिअर्स या दोघांनी वेगवान शतके झळकावून आफ्रिकेला विजयी केले. मागील ६-७ सामन्यात ऑस्ट्रेलियाला ३०० पेक्षा अधिक धावा करूनसुद्धा सामना हरावा लागला आहे. भारतात तर भारताने २ वेळा ३५० पेक्षा अधिक धावांचे आव्हान यशस्वीरित्या गाठून ऑस्ट्रेलियाला हरविले होते. गोलंदाजांसाठी ही धोक्याची घंटा आहे.
31 Aug 2014 - 5:07 pm | प्यारे१
>>> कोहलीला आता काही काळ विश्रांती द्यायची वेळ आली आहे.
मैदानाबाहेर खूप कष्ट करतोय काय? ;)
31 Aug 2014 - 8:13 am | बाळ सप्रे
हाच का तो संघ ३ सामने लढत न देता हरलेला ??
31 Aug 2014 - 8:47 pm | श्रीगुरुजी
सन्घ तोच आहे, पण सामन्यान्चे फॉर्मॅट बदलले आहे. हाच सन्घ कसोटी सामन्यात २ सेशन सुद्धा टिकू शकत नाही.
31 Aug 2014 - 8:47 pm | श्रीगुरुजी
सन्घ तोच आहे, पण सामन्यान्चे फॉर्मॅट बदलले आहे. हाच सन्घ कसोटी सामन्यात २ सेशन सुद्धा टिकू शकत नाही.
2 Sep 2014 - 3:39 pm | असंका
आणि ह्या इंग्लिश संघाबद्द्लही काही ? तो कसोटीत किती सेशन टिकेल?
दोघांचेही हे संघ आणि कसोटी खेळलेले संघ फारच वेगळे आहेत.
3 Sep 2014 - 2:16 pm | श्रीगुरुजी
इंग्लंडचा एकदिवसीय संघ आणि कसोटी संघ यात बरेच बदल आहेत. प्रमुख गोलंदाज ब्रॉड दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. हेल्स, मॉर्गन, गर्नी, फिन हे कसोटी मालिकेत नसलेले खेळाडू संघात आहेत.
भारताचा कसोटी संघ व एकदिवसीय संघ बराचसा सारखा आहे. रैना हा एकमेव खेळाडू (आणि ४ थ्या सामन्यात आलेला धवल कुलकर्णी) सोडला तर उर्वरीत सर्वजण कसोटी संघातलेच आहेत.
त्यामुळे या दोन संघात एकदिवसीय संघाचे खेळाडू घेऊन कसोटी मालिका झाली तर पुन्हा एकदा इंग्लंडच जिंकेल.
4 Sep 2014 - 4:25 pm | असंका
मुरली विजय आणि गौतम गंभीरने गेल्या तीनपैकी किती सामन्यात बॅटिंगची ओपनींग केली? चेतेश्वर पुजारा किती वेळा तीन/चार नंबरला आला? इशांत शर्मा, आणि वरूण आरोनने किती ओवर टाकल्या गेल्या तीन सामन्यात? एकूण पाच खेळाडू फार विचार न करता सांगता आले. मग सांगा बदल आहे की नाही?
5 Sep 2014 - 1:06 pm | श्रीगुरुजी
तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला नक्की समजले नाही. आताच्या भारताच्या एकदिवसीय संघात कसोटी संघाच्या तुलनेत बरेच बदल आहेत असा तुमचा दावा असावा. हे गृहीत धरून प्रतिसाद देत आहे.
आताचा भारताचा एकदिवसीय संघ पाहिला तर ११ पैकी ९ जण कसोटी संघात सुद्धा होते. फक्त रैना व धवल कुलकर्णी एकही कसोटी खेळले नाहीत. संघात फारसा बदल नाही. कसोटीत खेळलेला जवळपास सर्व संघच एकदिवसीय सामने खेळत आहे. परंतु संघाची कामगिरी अचानक सुधारली आहे. या ११ पैकी सर्वजण व कसोटी खेळलेले सर्वजण आयपीएल मध्ये नियमित खेळतात. एकंदरीत हा संघ मर्यादित षटकांच्या सामन्यांकरिता जास्त योग्य आहे. या संघातील बहुतेक जण कसोटी सामन्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे निवड समितीने विचार करून कसोटी सामन्यांसाठी पूर्ण वेगळा संघ निवडावा. कसोटी संघात स्थानिक स्पर्धा खेळलेलेच खेळाडू असावेत. आयपीएल मधील खेळाडूंना कसोटी सामन्यात खेळणे अवघड जात आहे. त्यामुळे आयपीएल मधील खेळाडूंचा कसोटी साठी विचार करू नये.
5 Sep 2014 - 1:57 pm | असंका
माझा काहीही दावा नाहिये. आपण मात्र दावा करत आहात की हा संघ कसोटीत एक सेशन पण टिकणार नाही. त्यावर माझा आपल्याला असा प्रश्न होता की मग इंग्लंडचा हा संघ किती सेशन टिकेल? कारण माझ्या मते अशी तुलना योग्य होणार नाही. कारण माझ्या मते, दोन्ही देशांचे हे संघ आणि कसोटी खेळलेले संघ वेगळे होते.
इंग्लंडने बदललेले खेळाडू आपल्याला माहित असावे कारण आपण यादी दिली आहेच. भारतानेही असे अनुरूप बदल केले आहेत. कोण कोण वगळले ते मी वर सांगितले आहेच. परत सांगतो- मुरली विजय, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, वरूण आरोन.
मग आता वन डे स्पेशालिस्ट संघ - तोही विजयी संघ; कसोटीत कसा खेळेल, यावर टिप्पणीचे प्रयोजन काय?
5 Sep 2014 - 8:43 pm | श्रीगुरुजी
हा संघ कसोटीत पुन्हा एकदा अपयशी ठरेल हे उघडच आहे कारण नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत खेळलेल्या संघातले बहुतेक सर्व खेळाडू एकदिवसीय संघात कायम ठेवण्यात आले आहेत. जे नवीन आले आहेत त्यापैकी सुरेश रैना हा कसोटीत बर्याच वेळा अपयशी ठरलेला आहे. म्हणजे तो येऊनही फारसा फायदा नाही. धवल कुलकर्णी अजून कसोटी खेळलेलाच नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल अंदाज करण्यात अर्थ नाही.
या दोन्ही संघांच्या एकदिवसीय संघामध्ये जर कसोटी सामना झाला तर पुन्हा एकदा इंग्लंडच जिंकेल कारण भारतीय संघात फारसे बदल नाहीत आणि इंग्लंड संघात काही बदल असले तरी कसोटीत भारताचा कर्दनकाळ ठरलेले कुक, रूट, अॅण्डरसन, अली, बटलर इ. मंडळी एकदिवसीय संघात आहेतच.
खरं सांगायचं तर भारताने कसोटीसाठी एकदिवसीय सामन्यांसाठी योग्य असलेला संघ खेळविला आणि इंग्लंडने एकदिवसीय सामन्यांसाठी कसोटीसाठी योग्य असलेला संघ खेळविला. त्याचे परीणाम दोन्ही संघांना भोगावे लागले आहेत.
2 Sep 2014 - 3:42 pm | असंका
चौथी वन्डे- भुवनेश्वर कुमार आत्तापर्यंत- ५-३-३-२
3 Sep 2014 - 2:19 pm | श्रीगुरुजी
भारताने लागोपाठ ३ रा सामना जिंकून एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली. २०११ च्या तुलनेत एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी झाली. इंग्लिश संघ एकदिवसीय सामन्यात पारच ढेपाळलेला दिसतोय. पीटरसनला काढून त्यांनी मोठी चूक केलेली आहे. बोपारा व ब्रेस्ननला बाहेर ठेवणे हीदेखील मोठी चूक आहे.
3 Sep 2014 - 2:39 pm | स्पा
ओक्के श्रीगुरुजी
6 Sep 2014 - 2:36 pm | श्रीगुरुजी
शेवटचा सामना हरून भारताने एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यशाची संधी घालविली. बहुतेक वेळा असे दिसून आले आहे की मालिका जिंकल्यानंतर उर्वरीत सामन्यात भारतीय संघ एकदम शिथिल पडतो. या मालिकेतही तसेच झाले. खरं तर शेवटच्या सामन्यात स्वतः धोनीने विश्रांती घेऊन संजू सॅमसनला खेळवायला हवे होते. तसेच स्टुअर्ट बिन्नी, कर्ण शर्मा यांनादेखील संधी हवी होती. थकलेल्या भुवनेश्वरकुमारला खेळविण्यात अर्थ नव्हता. असो. आता उद्या दौर्यातला शेवटचा ट-२० सामना आहे. तो जिंकून शेवट गोड करावा.