एक गृहस्थ आहेत. "पोलीस" ह्या "खात्यात" कामाला आहेत. शारीरिक उंची ५.३, बौद्धिक (तुम्ही ठरवा वाचून झाल्यावर)....वय ५०-५२ असेल, रंग ना काळा ना गोरा असा जो असतो तो, सरळ नाक, कुरळे केस, नाकावर चष्मा वगैरे. माणूस वागा बोलायला एकदम सोफ्ट. कायद्याचे विद्यापीठ असल्यागत बरीच कलमे मुखोद्गत. कसलेही व्यसन नाही
इमारतीमध्ये 'ए' विंग ते 'बी' विंग पर्यंत पसरलेली सदनिका इमारतीमध्ये सर्वांशी संबंध चांगले (मेंटेनन्स थकलेला नाही,गणपतीला भरपूर वर्गणी, एखादा शेलीब्रेटी आणून कार्यक्रम करणे,अक्कलकोट, शिर्डी चालूच असते वगैरे) आणि त्याही पेक्षा आज गुरुचरित्राचे पारायण संपून उद्यापन आहे जे दरवर्षी ना चुकता तो करतो. सगळे लालदिवे, कनिष्ठ वरिष्ठ हजेरी लावतात. प्रचंड कौतुक करतात सगळ्या कुटुंबाचे आणि जातात. गेली अनेक वर्ष हे चालू आहे.
वर वर बघता हे साधे सोपे त्यात काय मोठी ष्टोरी नाय. पण ह्या भाऊकडे प्रचंड पैसा आहे (ब्युटी पार्लर्स आहेत, भाड्याने दिलेल्या सदनिका आहेत, शेअर्स आहेत बरेच काही आहे.)ज्ञात सोर्स आणि ज्ञात संपत्ती ह्यात प्रचंड तफावत आहे.
१)गेल्या कित्येक वर्षात बदली नाही.
२)मुले शिकता आहेत हुशार आहेत, काही वाईट अजून तरी ऐकू आले नाही.
३)घरात एक मारुती गाडी आहे.
४)धार्मिक कार्य जोरात असतात.
५)अडल्या-नडल्याला मदत होतेय. पंचक्रोशीत भला माणूस हाये पण माया लई जमवली बघा त्यांनी असे ऐकू येते.
आता प्रश्न असे आहेत कि इतक्या भ्रष्ट माणसाचे पाठीराखे कोण?
१) त्याचे स्वतःचे खाते?
२) त्याचा जनसंपर्क?
३) त्याचे धार्मिक-अध्यात्मिक कार्यक्रम? (गणपती, दत्त माउली )किंवा ३३ कोटींपैकी ज्यांना रोजचा नैवेद्य जातो ते?
४) की जगात फक्त दोनच प्रकाराची माणसे असतात जी जन्मतःच चांगली आणि वाईट असतात असे म्हणून हा माणूस चांगला असल्याने त्याचे बरे चालले आहे.
हा आपला एक मला पडलेला प्रश्न आहे. चला, मलाही आमंत्रण आहे तीर्थ प्रसादाला जायला हवे......
प्रतिक्रिया
16 Dec 2013 - 6:13 pm | प्रकाश घाटपांडे
थोडक्यात त्याचे उपद्रव मूल्य व उपयुक्तता मूल्य हे दोन्ही चांगले आहे. प्रत्येक जण विचार करतो कि माणुस आपल्याशी कसा आहे? चांगला आहे ना? मग झाले तर! मग तो भ्रष्ट असो वा तत्वनिष्ठ सदगृहस्थ असो.
16 Dec 2013 - 6:16 pm | ज्ञानव
मग आपणही त्याचे अनुकरण करून(भ्रष्ट तर भ्रष्ट)तसे वागावे की काय?
16 Dec 2013 - 6:23 pm | प्रकाश घाटपांडे
तुम्ही जर सदगृहस्थ असाल तर तुमची सदसदविवेकबुद्धी तुम्हाला तसे करु देणार नाही. यात तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही आपण छक्के पंजे न करणारी पापभीरु माणस. बर्याचदा गैर मार्गाने पैसा कमावणारी माणसे त्यांची टोचणी कमी करण्यासाठी दान धर्म वा धार्मिक कार्यक्रम करतात.
16 Dec 2013 - 6:18 pm | अनिरुद्ध प
धाग्याचे नाव वाचुन उघडला,वाटले होते श्रीदत्तजयन्ती निमित्ताने,काही माहिती असेल पण खूपच भ्रमनिरास झाला.
16 Dec 2013 - 6:23 pm | मुक्त विहारि
एका सेवेकरी खात्यातल्या सेवेकराबद्दल अशा शंका काढणे उचित नाही....
असो....
16 Dec 2013 - 6:32 pm | कवितानागेश
वेलेवर चांगल्या इन्व्हेस्ट्मेन्ट्स केल्या तर पैसा वाढणं कठीण नाही.
आणि हे असं दानधर्म वगरै केले की लगेच लोकांच्या डोळ्यावर येतंच.
तो पैसा 'काळा'च असेल असे नक्की सांगता येत नाही.
असो.
त्यांना अजून चांगली कामं सुचवा. :)
अवांतरः तसाही प्रसादासाठी फार पैसेलागत नाहीत. आम्ही सोसायटीमध्ये होणार्या पूजेत मध्ये काही वर्षे ३-४ किलोचा सत्यनारायणाचा शिरा करुन देत होतो! लोक काय काय बोलतात आमच्याबद्दल याचा एकदा शोध घ्यायला हवा. ;)
16 Dec 2013 - 7:38 pm | ज्ञानव
पैसा 'काळा'च आहे. (ह्या हून जास्त काही सांगता येणार नाही.)
पण घटना व्यक्तीशः न घेता मर्म जाणून घेणे अपेक्षित आहे.
एक भ्रष्ट माणूस आणि एक पापभिरू माणूस ह्यापैकी आज भीत भीत जगणार कोण आहे आणि का?
भ्रष्ट माणसाच्या मागे त्याचा जनसंपर्क, त्याचा देव की त्याचे चांगले असणे काय आहे जे त्याला शासन होऊ देत नाहीये आणि पापभीरु माणूस घाबरून राहतोय.
16 Dec 2013 - 8:11 pm | प्रभाकर पेठकर
भ्रष्ट माणूस बाहेरच्या जगासमोर आपण बिनधास्त आणि अतिशय सुखात असल्याचा आभास निर्माण करत असतो. कदाचित तो स्वतःलाही फसवत असतो. पण तो कधीच सुरक्षित नसतो. स्वतःच्या भ्रमात जगत असतो आणि आपण सुरक्षित आहोत ह्या भ्रामक भावनेत सुरक्षितता शोधत असतो.
तो एकटाच नाही तर, सुबुद्ध असतील तर, त्याच्या आजूबाजूचेही फरफटले जात असतात. त्यांचा कांही दोष नसताना दहशतीखाली जगत असतात.
पापभीरू माणूस भीत भीत कशाकरता जगेल? तो, पापभीरू म्हणजे, फक्त पापाला भीत असतो. ते (पाप) टाळून तो भ्रष्ट व्यक्तीपेक्षा जास्त निर्धास्त जगत असतो.
ऐहिक सुखासाठी नितीमुल्यांचा बळी देऊन कोणी क्षणैक सुखाचा धनी होत असेलही पण दीर्घकालीन समस्यांना त्याला आज न उद्या सामोरे जावेच लागते. मी आजपर्यंत पाहिलेल्या बहुतेक केसेस मध्ये भ्रष्ट माणूस शारीरिक व्याधींनी ग्रस्त तर असतोच पण मनाची शांतताही त्याला लाभत नाही. रात्री अपरात्री दारावरची बेल वाजली तरी त्याच्या काळजात धस्स्स होते.
पापभीरू माणूस एकवेळ गरीबीत जगेल, आपल्याजवळ 'माया' नाही ह्याने कधी कधी खंतावतही असेल पण त्याचं मन शांत असतं. कर नाही त्याला डर कशाला? ह्या भावनेचं बळ त्याच्या जवळ असतं.
योग्य अयोग्याच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्यावेगळ्या असतात. ही माझी व्याख्या आहे.
16 Dec 2013 - 8:43 pm | ज्ञानव
हा मुद्दाच नाही. भ्रष्ट असणे अयोग्यच.
मुद्दा ha आहे की ह्यांचे पाठीराखे कोण ?
16 Dec 2013 - 9:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्याचे पाठीराखे "तुम्ही लिहिलेले सर्व + त्याला समाजात मान देवून त्यांच्याकडे तिर्थप्रसादला जाणारे सर्व".
समाजातला वाईटपणा "वाईट माणसे वाईटपणा करतात" यापेक्षा जास्त "चांगली माणसे तो सहजपणे स्विकारतात" यामुळे असतो.
पंचक्रोशीत भला माणूस हाये पण माया लई जमवली बघा त्यांनी असे ऐकू येते.
या वाक्यातल्या "भला माणूस" आणि "माया लई जमवली" या स्वतःच्याच शब्दांतला विरोधाभास जेव्हा लोकांच्या नीट ध्यानात येईल आणि त्याप्रमाणे चोराला चोर म्हणण्याची धमक त्यांच्यात जेव्हा येईल तेव्हाच तुम्ही या लेखातून व्यक्त केलेली तुमची गुप्त इच्छा प्रत्यक्षात आलेली दिसेल.तोपर्यंत तिर्थप्रसादावर समाधान मानावे !
16 Dec 2013 - 10:01 pm | लॉरी टांगटूंगकर
पूर्ण पटले
कोणत्या तरी पेपरमध्ये वाचलेलं एक आर्टीकल आठवतंय, सरकारी नोकऱ्यांमागचे अॅट्रॅक्शन फक्त करप्शनच असतंय का ?
तीच लिन्क सापडली नाही पण जवळपास सेमच विषय आहे इथे.
Government jobs in India attract corrupt youngsters: Study
17 Dec 2013 - 12:48 am | प्रभाकर पेठकर
'भ्रष्ट असणे हे अयोग्यच.' इतक्या ठामपणे जर हे ठाऊक असेल तर त्या भ्रष्टाचार्यांचा पाठीराखा कोण? ह्याचा 'अभ्यास' कशाकरीता? कुठल्या गोष्टीमुळे भ्रष्टाचारी 'निवांत' जगू शकतात हे जाणून घेण्याचे औत्सुक्य कशाकरीता? ज्या गावाला जायचे नाही त्या गावच्या गल्याबोळांची चौकशी करण्यात आपण आपला अमुल्य वेळ खर्ची पाडत नाही. ते शहाणपणाचे नसते.
'दरोडेखोरांची कौशल्ये ते कुठून आत्मसात करतात? पहिला खून करणार्याच्या भावना कशा उत्पन्न होतात? बेकायदेशिर व्यवसाय करणार्या वेश्येला ती स्फूर्ती कोठून येते? गैरमार्गाने कमविलेला एवढा पैसा ती कसा पचवते? एखाद्याचा गळा चिरायला जाताना ते धाडस त्या माणसात कोठून येते? त्याला कोणाचे पाठबळ असते?' अशा अनंत वांझोट्या चर्चा करण्यापेक्षा सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी प्रयत्नशील असणं जास्त महत्त्वाचं.
17 Dec 2013 - 9:22 am | llपुण्याचे पेशवेll
'दरोडेखोरांची कौशल्ये ते कुठून आत्मसात करतात? पहिला खून करणार्याच्या भावना कशा उत्पन्न होतात? बेकायदेशिर व्यवसाय करणार्या वेश्येला ती स्फूर्ती कोठून येते? गैरमार्गाने कमविलेला एवढा पैसा ती कसा पचवते? एखाद्याचा गळा चिरायला जाताना ते धाडस त्या माणसात कोठून येते? त्याला कोणाचे पाठबळ असते?' अशा अनंत वांझोट्या चर्चा करण्यापेक्षा सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी प्रयत्नशील असणं जास्त महत्त्वाचं.
सहमत. पाठीराखे कोण ते कळले तर त्या पाठीराख्यांना वश करून तुम्ही पण तसे करणार आहात का? आणि तसे नसेल तर तुम्ही जाऊन त्यांच्या काळ्या पैशा विरौद्ध तुम्ही मोहीम उघडणार आहात का? नसेल तर कमीत कमी तो माणूस भला नाही पक्का चोर आहे. मी त्याच्याशी कोणताही व्यवहार करणार नाही आणि संबंध ठेवणार नाही असे म्हणण्याची हिंमत दाखवणार आहात का? नसेल तर पेठकरकाकांनी म्हटल्या सारख्या या वांझोट्या चर्चा करण्यात काय अर्थ.
आणि बर आपण असं म्हणू की या भ्रष्टाचारी माणसाचं संरक्षण साईबाबा, दत्त, बालाजी अन्य सगळे देव करतात कारण कदाचित त्या देवांची तितकी अनन्य भक्ती करतही असेल. काय चूक आहे त्यात?
शेवटी ज्यानी रामाला या जगात आणले त्यानेच रावणालाही आणले होते हे लक्षात ठेवले म्हणजे झाले. जेव्हा साईबाबा, दत्त, बालाजी यांची इच्छा होईल तेव्हा पडेल त्याचं पितळ उघडं.
16 Dec 2013 - 9:32 pm | ज्ञानव
सुंदर आणि मार्मिक
तुम्ही मर्म अचूक पकडलेत....
16 Dec 2013 - 10:02 pm | प्यारे१
>>> त्याचे धार्मिक-अध्यात्मिक कार्यक्रम? (गणपती, दत्त माउली )किंवा ३३ कोटींपैकी ज्यांना रोजचा नैवेद्य जातो ते?
ह्याचा अज्जिबात संबंध नाही असं वाटतं. वरचे ३३ कोटी (कोटी म्हणजे १०० लाख नव्हे, कोटी म्हणजे श्रेणी) नि त्यांचे नंतरचे रुपांतर केले गेलेले/बदललेले देव हे पोलिसाच्याच पातळीवरचे देवाणी घेवाणीवर विश्वास ठेवणारे असत नाहीत.
'आधी कधीतरी' केलेल्या चांगल्या कामचं फळ म्हणून आज त्या व्यक्तीला चांगले दिवस (आर्थिक सुबत्तेच्या रुपात) तुम्हाला दिसत आहेत. खूप पैसा असेल म्हणून खूप सुखी असेल हे आपलं समीकरण इतरांच्या बाबत.
चांगल्या कामाचं चांगलं नि वाईट कामाचं वाईट असंच फळ असतं. कधी ते दिसतं कधी दिसत नाही. :)
17 Dec 2013 - 7:41 am | कंजूस
मला असं सांगा की तुम्हाला वाटतंय तो भ्रष्टमार्गाने पैसे कमावतोय तर त्याच्या आमंत्रणाला कसे जायचे .तुम्ही प्रत्येक वेळी गेला नाहित तर काय कारण देणार ?तुमचे त्याने काय बिघडवले .
मला लहानपणापासून भरपूर प्रसाद देणाऱ्या देवळांत जायला आवडते .माटुंगा स्टेशनच्या बाहेर जो सार्वजनिक गणपति बसतो तिकडे मुलांना ओंजळभरून उकडलेले चणे प्रसाद द्यायचे .हा गणपती नंतर कळले 'वरदा' दादाचा होता .
देव त्याचे भले करो असेच सर्वजण म्हणायचे .
असो .
फार मनावर घेऊ नका ज्ञानवदादा ,प्रसाद खा आणि तोंडभरून भले चिंता .
17 Dec 2013 - 8:25 am | ज्ञानव
विचार करत आहेत.
पण नेपोलीयनचे एक वाक्य आहे
त्या धर्तीवर ही घटना बेतलेली आहे.
समाज कसा विचार करतो ते वरील प्रतिसादांमधून दिसतेच आहे.
17 Dec 2013 - 2:52 pm | प्रभाकर पेठकर
'समाज' व्यक्तिसमुदायातून बनत असतो. त्या समुदायातील प्रत्येक 'व्यक्ती'च्या विचारधारेतून एक सामुदायिक सामाजिक विचारधारा तयार होते. प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवरच आचार आणि विचार शुचिता बाळगली तर 'समाजसौष्ठव' वाखाणण्याजोगे असेल. त्यामुळे ह्याने भ्रष्टाचार करू नये (आणि करून पचविल्यास त्याची 'बलस्थाने' शोधण्यापेक्षा) असा विचार करण्यापेक्षा मी भ्रष्टाचार करणार नाही. जे अनैतिक आहे, बेकायदेशिर आहे ते करून पचविण्याचे सुलभ मार्गही शोधणार नाही असा वैचारिक मार्ग प्रत्येकाने अंगिकारीला तर किती बरं होईल.
पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. कुठल्याही मार्गाने पैसा मिळविलेल्या व्यक्तीबद्दल आदरयुक्त कुतुहूल वाटतं. त्याच्या नकारात्मक हुशारीचं कौतुक वाटतं. हीच समाजाच्या अधःपतनाची सुरुवात आहे.
17 Dec 2013 - 10:02 am | मारकुटे
दत्तोबा काय म्हणतात याविषयावर?
17 Dec 2013 - 10:07 am | llपुण्याचे पेशवेll
भक्ताची परिक्षा घ्यायला गेले असतील. ती घेऊन झाली की येऊन सांगतील.
17 Dec 2013 - 10:09 am | मारकुटे
तोवर निळा केशरी रंगीत कागदं वाचतो.. तेवढंच मौजेचे दोन क्षण दुर्मिळ झालेल्या आजच्या जीवनात विरंगुळा.
17 Dec 2013 - 10:09 am | ऋषिकेश
दिलेल्या माहितीवरून सदर गृहस्थास भ्रष्ट ठरवायसारखे काहीही आढळले नाही.
याहुन अधिकची माहिती तुमच्याकडे नसेल तर सांगोवांगीवरून त्याला भ्रष्ट ठरवू नका.
17 Dec 2013 - 11:23 am | जेपी
शारीरिक उंची ५.३,
आणि पोलिस खाते ?
17 Dec 2013 - 11:57 am | ज्ञानव
पण पोलिसच आहेत हे पक्के.
17 Dec 2013 - 12:05 pm | कंजूस
निष्फळ वाद चालू ठेवूया का ?
17 Dec 2013 - 3:36 pm | म्हैस
अनिरुद्ध प आणि प्यारे१ च्या मताशी सहमत आहे . १ तर लेख वाचून भ्रमनिरास झाला . दुसर म्हणजे आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माची फलं आपल्यासमोर आपली दुखं किवा सुखं बनून आपल्या पुढे उभी ठाकतात . तिथे देवाचा हस्तक्षेप नसतो . आधी केलेल्या चंगल्या कर्माच फळ म्हणून तो माणूस इतका श्रीमंत झाला असेल. पण आत्ता करत असलेल्या वाईट कर्मांच फळ सुधा त्याला मिळेलच . महत्वाची गोष्ट हि आहे कि तो माणूस खरच भ्रष्ट आहे ह्याची तुम्हाला खात्री आहे का?
त्याची वडिलोपार्जित संपत्तीच तेवढी असेल किवा त्याने खरच प्रामाणिक पाने काम करून पैसा मिळवला असेल . नाही तर त्याच्या ऐवजी तुम्हालाच पाप लागायचं
19 Dec 2013 - 5:15 pm | पैसा
दुसरा काय करतो याचा विचार करण्यापेक्षा आपण काय करतो याचा विचार करावा माणसाने. तुम्ही म्हणता तसे लोक सगळ्या बाजूंनी बोलणारे असतातच. एका भ्रष्ट मंत्र्याने लोकांना वैयक्तिक बरीच मदत केली. पण त्याचबरोबर पैसेही खूप खाल्ले. नंतर त्याचा एकुलता एक मुलगा अपघातात मरण पावला तेव्हा लोक म्हणाले की बरं झालं. लोकांचे पैसे खाल्लेले पचत नाहीत. कसा तरी त्रास होतोच. तेव्हा जग हे असं आहे. नक्की एकाच गोष्टीचा परिणाम अमूकच होईल असं काही नसतं.