काळाच्या घावाने
फरफटत जावे,
धडपडून उठावे
मन म्हणते आहे !!
ती सोनेरी क्षणे
जिवास ओलावे,
डोळ्यात गुंतावे
मन म्हणते आहे !!
जे राहिले चित्र कोरे
काही रंग भरावे,
कुंचल्यास उचलावे
मन म्हणते आहे !!
तुला शौक सुगंधाचा
विश्व गंधाळुनी यावे,
चंदनासवे झिजावे
मन म्हणते आहे !!
भ्रमराचे ओठ अन
कळीने खुलावे,
गीत होऊन जगावे
मन म्हणते आहे !!
रात्रीस धास्तावले ते
तुझ्या नजरेचे काजवे,
पहाट बनून जावे
मन म्हणते आहे !!
- साजीद यासीन पठाण
(९९७०५७५७६६)
मु : दह्यारी. तालुका : पलूस,
जिल्हा : सांगली ( महाराष्ट्र )
प्रतिक्रिया
2 Nov 2013 - 1:13 am | पैसा
खूपच छान लिहिता आहात!
2 Nov 2013 - 4:52 am | चौकटराजा
मला आवडली कविता . फार बरे वाटले वाचून .
पहाटच्या प्रहरी
बोचरी असे थंडी
उब साजिद्च्या कवितेची
मन म्हणते आहे !
2 Nov 2013 - 8:59 pm | मुक्त विहारि
गीत होऊन जगावे
मन म्हणते आहे !!
2 Nov 2013 - 11:32 pm | प्यारे१
मस्त कविता.
अवांतरः कराड कुंडल रस्त्यावरची ही भन्नाट नावांची गावं गावांची नावं दुधारी, दह्यारी, ताकारी, लोण्यारी, तुपारी...
(ताकारीला काका असतात, कुंडलला दुसरे काका. वडलांचे मावसभाऊ)
7 Nov 2013 - 12:04 pm | psajid
सर्वांच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
प्यारे जी यांच्या अवांतरवर - तुमचं अगदी खरं आहे सांगली जिल्ह्यात कराड - तासगाव रोड वरती ह्या दुधारी, ताकारी, तुपारी, दह्यारी, घोगाव आणि लागुनच दुधोंडी या नावाची गावे आहेत. मला माझ्या आजी ने त्याविषयी एक इतिहास सांगितला होता तो साधारण असा आहे कि, आमच्या गावाच्या उत्तरेला महादेवाचे अर्थात सागरेश्वराचे तीर्थस्थान आहे पूर्वी इथे एक योगपुरुष साधू राहत होते त्या साधू महाराजांना वरील गावातील लोकांनी कुणी दुधाचा कुणी तुपाचा कुणी दह्याचा कुणी ताकाचा अभिषेक घातला त्यामुळे त्या गावांची नावे अशी वैशिष्टपूर्ण पडली आहेत.
11 Nov 2013 - 3:24 am | इन्दुसुता
आवडली कविता.
जे राहिले चित्र कोरे
काही रंग भरावे,
कुंचल्यास उचलावे
मन म्हणते आहे !!
हे सर्वात आवडले.