अप त्यम् परिपन्थिनम् मुषीवाणम् हुरःचितम् ।
दूरम् अधि स्रुतेः अज॥
(ऋ.१/४२/३)
आपल्या मनातील मूषक प्रवृती म्हणजे दुर्विचार. बिना कष्ट करता दुसर्यांच्या वस्तु हडपण्याची इच्छा ठेवणे आणि त्यासाठी कपट कारस्थान रचणे, दुसर्यांना धोका देणे, चोरी,डाका, रिश्वत घेऊन कार्य करणे, इत्यादि-इत्यादि. या ऋचेत ऋषि आपल्या मनातील मूषक वृतीला दूर करण्याची प्रार्थना परमेश्वराला करत आहे. आपल्याला माहीत आहे उंदीर सदा कुरतडत राहतो. तो शेतातील, घरातील अन्न-धान्य कागद, कपडे इत्यादि काहीही सोडत नाही. सर्व काही तो त्याच्या बिळात सतत एकत्र करत राहतो. दुसर्यांची संपती हडपण्याची त्याची हाव कधीच संपत नाही. परिणाम उंदीराचा शेवट पिंजर्यात होतो किंवा विषाक्त पदार्थ खाऊन तो मरतो. समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात:
नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे
अति स्वार्थ बुद्धीन रे पाप सांचे.
घडे भोगणे पाप तें कर्म खोटे
न होतां मनासारिखें दु:ख मोठें.
अति स्वार्थ बुद्धीने प्रेरित होऊन सदा सर्वकाळ दुसर्यांच्या द्रव्याची अर्थात जे आपल्या कष्टाचे नाही, हाव धरण्याने पापांचा संचय होत राहतो. अखेर अश्या खोट्या कर्मांचे वाईट परिणाम भोगावे लागतात आणि मनाला त्याचे मोठे दु:ख होते.
आजकाल संपूर्ण समाज या मूषक वृतीने ग्रसित आहे. काही काम न करता वीज, पाणी, जेवण सर्व फुकट पाहिजे ही मनोवृती समाजात बळावत आहे. व्होट बँक साठी अनेक राजनेता जनतेच्या मूषक प्रवृतीला खत-पाणी घालत आहे. देशातील अधिकान्श जनतेला फुकटाची सवय लागली तर कष्ट करून पोट भरण्याचा उद्यम कुणीच करणारा नाही. परिणाम स्वरूप या खोट्या कर्मांचे फळ समस्त समाजाला भोगावे लागेल. भूक, अराजकता आणि हिंसेने जनता त्रस्त होईल. अजूनही वेळ गेलेली नाही स्वत:ची आणि समाजाच्या मूषक प्रवृतीला आळा घालण्याची गरज आहे. असो.
प्रतिक्रिया
20 Mar 2023 - 3:47 pm | राजेंद्र मेहेंदळे
व्होट बँक साठी
यु हिट बुल्स आय!! आम्ही सगळे भाऊ भाऊ, आम्ही सगळे मिळुन खाऊ!!
रच्याकने----शेतकर्यांचे सरकार- हा पण असाच एक पॉप्युलर जार्गन आहे व्होट बँक साठी
25 Mar 2023 - 11:16 am | कर्नलतपस्वी
छान लग.
29 Mar 2023 - 3:43 pm | साहना
> व्होट बँक साठी अनेक राजनेता जनतेच्या मूषक प्रवृतीला खत-पाणी घालत आहे.
इथे राजनेता मंडळींची चूक नाही. जनता आधीपासूनच मूषक वृत्तीची आहेत. फुकटे, आळशी आणि मिळेल ते ओरबाडायचे हि संस्कृतीच आहे. माझे ते माझे आणि दुसऱ्याचे ते सुद्धा शक्य झाल्यास माझे अशी प्रवृत्ती आधीपासूनच जनतेची आहे. राजकारणी मंडळी फक्त त्याचा फायदा घेतात.
> देशातील अधिकान्श जनतेला फुकटाची सवय लागली तर कष्ट करून पोट भरण्याचा उद्यम कुणीच करणारा नाही.
बहुसंख्य भारतीय सरकारी नोकरीच्या मागे का लागले आहेत ? हेच कारण आहे. फुकटे !