सध्या २०२१-२२ वर्षासाठी सगळीकडे नर्सरी प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे.या वर्षी covid च्या पार्श्वभूमीवर बहुतेक सगळ्याच शाळांनी सुदैवाने online प्रवेश प्रक्रियेचा घाट घातला आहे.नाहीतर आदल्यादिवशी पासूनच पालकांनी फॉर्म च्या रांगेत उभे राहावे लगत होते.यंदा माझ्या मुलाचा देखील प्रवेश घ्यायचा असल्यामुळे ह्या अनुभवातून जावे लागत आहे.आणि आत्ता प्रवेश घेतल्यावर १० पर्यंत चिंता नाही त्यामुळे पालक म्हणून देखील प्रवेशा चा गांभीर्याने विचार करत आहे.
पुण्यातल्या एका नामांकित शाळेचा माझा अनुभव आणि व्यथा इथे मांडत आहे.
शाळेत एकूण १२० जागा भरायच्या होत्या,त्यातल्या ३० जागा आधीपासूनच (RTE - Right to education ) साठी आरक्षित होत्या.३० जागा सिबलिंग कोटा म्हणजे आता जी मुले शाळेत शिकत आहेत त्यांच्या सक्ख्या भावंडांसाठी राखीव,म्हणजे उरलेल्या ६० जागांसाठी ५८० अर्ज आले होते.
शाळेने आधीच जाहीर केले होते कि ऍडमिशन साठी पालक व मुलांची कोणत्याही प्रकारची मुलाखत नसेल व निवड पूर्णपणे रँडम असेल.
तरीही शाळेने पालांचा 'प्रिन्सिपॉल ऍड्रेस' च्या नावाखाली विनाकारण वेळ घालवला (फक्त शाळेची माहिती द्यायला - या वेळेस तुमची ऍडमिशन झालेली नसते).
आणि नर्सरी च्या ऍडमिशन साठी शाळेपासून मुलाच्या राहत्या घराचे अंतर लक्षात न घेता रँडम लिस्ट काढली.
मला पडलेले प्रश्न :-
-जर रँडम ऍडमिशन देणार आहात तर पालकांचा वेळ का घालवता ? डायरेक्ट लिस्ट काढून मोकळे का नाही होत ?
-शाळा लिस्ट काढताना अंतर का लक्षात घेत नाहीत.जवळ राहणाऱ्या मुलांनी लांब शाळेत जायच आणि लांब राहणाऱ्यांना पण दूरच जायच.
म्हणजे दोन्ही केसेस मध्ये त्रास आहेच.
जाणकारांनीं आपले विचार मांडावेत !
प्रतिक्रिया
17 Dec 2020 - 5:13 pm | खेडूत
अमुक शाळा हवी ही पालकांची गरज आहे, तोच शाळेचा मोठा फायदा आहे.. RTE मधल्या मुलांचा तथाकथित खर्च काढायला फी वाढवावी लागते. Random प्रवेश ही धूळफेक असते. आतून सगळे सेटिंग झालेले असते.
चांगली मुले आणि शिक्षक मिळून शाळेला मोठे करतात. एरवी शाळा एकटीच मोठी नसते.
17 Dec 2020 - 6:48 pm | स्वतन्त्र
कोणतीही शाळा वाईट कधीच नसते.एक विद्यार्थी म्हणून आपण ज्या शाळेत जातो ती आपल्याला नक्कीच प्रिय असते.
'सेटिंग' बद्दल हळू हळू सहमत होत आहे.
फक्त लोंकांचा फुकट वेळ शाळां प्रशासनाने घालवू नये !
शाळा कोणतीही चालेल पण घराजवळ असावी हीच अपेक्षा आहे.
घरापासून २-४ कि मी अंतरावर जवळ पास ५ शाळा आहेत,पण एकही शाळेत अजूनही नंबर लागलेला नाही.
लांब राहणाऱ्या पालकांच्या हट्टामुळे जवळच्या मुलांना प्रवेश मिळत नाही अशी परिस्थिती आहे.
17 Dec 2020 - 5:14 pm | सामान्यनागरिक
जे काही वर्णन वाचलं त्यावरुन ही शाळा तथाकथित ईंग्रजी माध्यम शिकवणारी मिशनरी शाळा असावी.
शेवटी आपल्याला सुद्धा जवळच्या दुसऱ्या कुठल्या शाळेत जायचा पर्याय आहेच. असे पालक काहीही झालं तरी आपल्या पाल्याला याच शाळेत घालावं म्हणून अट्टाहास करतात. भरपूर पैसे मोजायला तयार असतात म्हणुनच तर त्यांचे फ़ावते.
गंमत म्हणजे आपल्याकडे लोक अश्या " इण्टरनॅशनल " शाळेत मुलांना टाकायला जीवाचा आटापिटा करतात. पण उत्तम ईन्टरनॅशनल शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेचा शिक्षक पारितोषिक मिळवतो. ते ही अश्या शाळांतील शिक्षक स्पर्धेत असतांना !
धन्य त्या शाळा आणि धन्य ते शिक्षक !
17 Dec 2020 - 6:43 pm | स्वतन्त्र
कोणतीही शाळा वाईट कधीच नसते.आणि इंटरनॅशनल स्कूल किंवा अमुक बोर्डाचंही अट्टहास नाहीये.
अपेक्षा इतकीच आहे कि शाळा घराजवळ हवी.
आणि सादर शाळा हि मिशनरी नसून मराठी लोकांनी चालवलेली शाळा आहे.
18 Dec 2020 - 9:54 am | Bhakti
मला तर मुलीला सध्या online /Offline अभ्यास कर म्हणावच वाटत नाही..२-३ महिने अजून मनसोक्त खेळ म्हणाव वाटत!!पण शाळेत समाजात वावरण्याच बाळकडू मिळत.मित्र मैत्रिणी मिळतात ना! :)
18 Dec 2020 - 12:40 pm | साहना
मिशनरी शाळांना RTE लागू होत नाही. RTE च काय पण इतर कुठलाही शिक्षण विषयक कायदा लागू होत नाही. तसेच ह्या शाळा वाट्टेल तो निकष लावून ऍडमिशन देऊ शकतात. त्यामुळे हि शाळा मिशनरी शाळा नाही, हिंदू लोकांनी चालवलेली असावी.
> पण उत्तम ईन्टरनॅशनल शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेचा शिक्षक पारितोषिक मिळवतो. ते ही अश्या शाळांतील शिक्षक स्पर्धेत असतांना !
उगाच ठाऊक नसताना लोकांना नवे ठेवू नयेत. एक कुठल्या शिक्षकाला पारितोषिक मिळाले म्हणून सर्वच जिल्हापरिषदेच्या शाळा चांगल्या असतात किंवा सर्वच शिक्षक चांगले असतात असे नाही. तसेच लोकांना उगाच पैसे मोजायची हौस सुद्धा नसते. बहुतेक पालकांना शाळेचा विनाकारण मनस्ताप नको असतो. एक १० हजार जास्त मोजावे लागले असले तरी रांगेत उभे राहा, फॉर्म भर असल्या फंदात पडायचे नसते. पालक त्यामुळे जवळची शाळा, कमी मनस्ताप असलेली शाळा आणि ज्याशाळेंत आपल्या सामाजिक आणि आर्थिक स्थरातील मुले जातात अश्या शाळांत मुलांना पाठवतात. सर्व पालक मूर्ख आहेत आणि निव्वळ हौस म्हणून इंटरनॅशनल शाळांना प्राधान्य देतात हा आपला गैरसमज आहे.
पालकांना पारितोषिक प्राप्त शिक्षक नको आहेत. शाळा जवळ असावी, प्रवास आणि शालेय वातावरण सुरक्षित असावे, फी परवडणारी असावी आणि काही तरी विद्या मुलांच्या पदरात पदवी इतकीच माफक अपेक्षा असते. बाकी मुलाची बुद्धिमत्ता पाहून नंतर ट्युशन वगैरे लावले जाऊ शकते. बहुतेक वेळा जिल्हा परिषदेच्या शाळा हि अपेक्षा सुद्धा पूर्ण करू शकत नाहीत. शाळा दूर असते, शिक्षक येत नाहीत, कारभार गलथान असतो, गुन्हेगारी प्रवृत्तीची मुले, शिक्षक आणि पालक असतात, प्रिन्सिपॉल साधी शिस्त सुद्धा ठेवू शकत नाहीत आणि शाळेचे छप्पर पावसांत गळते अशी परिस्थिती असते.
RTE कायद्याने शाळा आणि समाज ह्यांचे नाते कायमचे तोडून ठेवले आहे. समजा सदर शाळा लेखकाच्या आजोबानी सुरु केली होती किंवा लेखकाचे स्वतःचे वडील इथे प्रिन्सिपॉल होते किंवा लेखकाने १० वर्षे आधी शाळेला १० लाखांची देणगी दिली होती, तरी सुद्धा शाळेला लेखकाच्या पाल्याला ऍडमिशन देणे कायद्याचे उल्लंघन ठरते. त्यामुळे कुठलाही शहाणा माणूस आजुबाजुंच्या शाळांत आर्थिक किंवा भावनिक गुंतवणूक करायच्या भानगडीत पडत नाही. पण इंटरनॅशनल स्कुल जे बहुतेक वेळा "अल्पसंख्यांक" चालवतात त्यांना RTE लागू होत नाही त्यामुळे इथे अश्या प्रकारची गुंतवणूक फायदेशीर ठरते.
17 Dec 2020 - 7:37 pm | Rajesh188
शाळेला देणगी ही देणे बंधनकारक आहे पण कायदेशीर मार्गाने नाही आताच्या नियम नुसार.
मुल हुशार नसतील तरी चालेल पण पालक सक्षम आहेत का ह्याचा अंदाज घेण्यासाठी पालकांना बोलवले जाते.
17 Dec 2020 - 8:02 pm | चौकटराजा
माझ्या पालकाना ( मी ६७ पूर्ण आहे )चांगली शाळा वाईट शाळा असे काही पहाण्याचे सुचले नाही ! मुलगा घरी नाही शाळेत कोणत्या तरी यत्तेत शिकत आहे याचे समाधान त्याना होते. इतक्या वर्षाच्या अनुभवातून एक गोष्ट नक्की सान्गतो चांगल्या शाळेत वाईट विद्यार्थी हीअसतात व जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्तम विधार्थीही असतात !ज्याचात एकलव्य बनण्याची आकांक्षा व पात्रता आहे तो कुठूनही ज्ञान मिळवत जातो. चांगल्या शाळेची फार तर व्याख्या अशी करता येईल जिथे वाचायला भरपूर काही आहे ! उत्तम प्रतोगशाळा आहे व अगदीच फालतू शिक्षक नाहीत ! बाकी इमारत ,मैदान याना काही अर्थ नाही ! एक शंभर टक्के सत्य आहे की वाचनाची आवड,संशोधनाची आवड,पालकांशी संवाद करण्याची आवड ही दैववशात देणगी आहे ! तिचा कुठे मॉल नाही ! माझ्या एका तरूण मित्राने मुलीला शाळेत न पाठवता स्वतः च तिचा विकास करायचा अगदी वेगळ्या पद्धतीने असे ठरवले आहे ! मला हवे ते मला शिकायचे आहे सरकार व राजकीय पक्षाना हवे ते नाही हा खर्या शिक्षणाचा गाभा आहे ! न न म य य गणानी मालिनी व्रुत्त होते याचा मला आयुष्यात विकसाच्या सन्दर्भात काही फायदा झाला नाही कारण ते शिक्षण सरकारने माझ्यावर लादलेले होते !
18 Dec 2020 - 9:56 am | Bhakti
पण शाळा पाहिजेच..
18 Dec 2020 - 12:44 pm | साहना
आपल्या काळाची परिस्थिती वेगळी होती. दारिद्र्यांत पिचणाऱ्या देशांत काहीही संधी उपलब्ध नव्हत्या त्यामुळे चांगल्या व्यक्ती शिक्षक बनल्या आज काल त्या बुद्धिमत्तेचे लोक अभियंते आणि डॉक्टर होतात. अश्या शाळांत बसायला बाकडा नसेल तर सुद्धा शाळा चालते. त्याशिवाय फक्त काहीच लोक शिक्षण ह्या विषयाला गाम्भीर्यने घेत होते त्यामुळे अश्या लोकांचीच मुले शाळेत जात होती. मेट्रिक होऊन सरकारी नोकरी मिळाली तर बास होते. लिहायला वाचायला आले तर पुरेसे होते आणि शिक्षकाने कानशिलात लावली तर घरी आणखी दोन खायला मिळायच्या.
आज काळ बदलला आहे. प्रचंड लोकसंख्येमुळे शिक्षणाला खूप डिमांड आहे आणि वरून प्रचंड सरकारी नियंत्रण ह्यामुळे गुंड किंवा निर्ल्लज किंवा मिशनरी शाळाच आज देशांत शिक्षण देत आहेत. अश्या स्थितीत चांगली शाळा आणि वाईट शाळा हा फरक दुर्दैवाने करावाच लागतो.
18 Dec 2020 - 1:05 pm | चौकटराजा
चांगली शाळा व वाईट शाळा फरक जरूर करावा पण आपला पाल्य चांगला ,जिज्ञासू ,अभ्यासू , संवेदनशील विद्यार्थी नसेल तर चांगली शाळा ही एक डेड इन्वेस्टमेन्ट आहे हे पक्के ध्यानात असू द्या ! कारण चांगल्या शाळेतील वाईट विद्यार्थ्याचा अनुभव मी स्वतः अगदी जवळून घेतला आहे !!!
18 Dec 2020 - 1:49 pm | साहना
अगदी मान्य !
मुलींच्या बाबतीत आजकाल सेफ्टी ह्या विषयाला खूपच महत्व आले आहे.
18 Dec 2020 - 8:22 pm | चौकटराजा
वाईट विद्यार्थी हा वाईट चालीचा विद्यार्थी असे मी म्हणालो नाही तो अभ्यासू नसणे , जिज्ञासू नसणे ,सन्वेदन्शील नसणे ,पालकाशी मुक्त संवाद साधणारा नसणे हा माझ्या व्याख्येत वाईट विधार्थी आहे त्यात विद्यार्थीनीही आल्या ! वाईट चालीचा वा चालीची म्हण्जे नक्की कसावा कशी ते कायदा ठरवतोच की ! विद्यार्थी वरील गुण असतील व जरा गबाळा असेल तर तो माझ्या नजरेत उत्तम विद्यार्थीच असेल !
17 Dec 2020 - 10:31 pm | आनन्दा
आमच्या कन्येची पण अॅदमिशन आहे यावर्षी, पण आम्ही बहुतेक सिबलिन्ङ कोट्यात जाउ असे वटतेय..
बघुया.
शाला - गोळवलकर
18 Dec 2020 - 9:58 am | Bhakti
छान शाळा.. आमच्याकडे अशी एकही शाळा नाही.. :(
18 Dec 2020 - 12:44 pm | स्वतन्त्र
प्रश्नच मिटला !
18 Dec 2020 - 12:28 pm | साहना
मला पडलेले प्रश्न :-
> -जर रँडम ऍडमिशन देणार आहात तर पालकांचा वेळ का घालवता ? डायरेक्ट लिस्ट काढून मोकळे का नाही होत ?
रँडम लिस्ट काढायला शाळेला अजिबात इंटरेस्ट नसतो. पदरचे पैसे खर्चून शाळा काढायची वर ३०% सीट्स फुकट सरकारला द्यायची. मग त्या ३० सीट्स चा खर्च ७०% मुलांकडून वसूल करायचा असतो. मग हि ७०% मुले गरीब असली तरी मग शाळा चालवायची कशी ? रँडम ऍडमिशनला म्हणून अर्थ नाही पण RTE अंतर्गत हिंदू लोकांची चालवलेल्या शाळांना फक्त रँडम पद्धतीने ऍडमिशन द्यायचा अधिकार आहे. मला वाटते "प्रिन्सिपॉल ऍड्रेस" ह्या गोष्टी कुठला पालक खरोखर सिरीयस आहे हे पाहण्यासाठी करतात आणि नंतर गुपचूप आपल्याला हवे त्याला ऍडमिशन देतात. अर्थांत इथे शाळांची चूक नाही. बिचार्यांना हा देखावा करावाच लागतो.
> शाळा लिस्ट काढताना अंतर का लक्षात घेत नाहीत.जवळ राहणाऱ्या मुलांनी लांब शाळेत जायच आणि लांब राहणाऱ्यांना पण दूरच जायच.
म्हणजे दोन्ही केसेस मध्ये त्रास आहेच.
माझ्या माहितीप्रमाणे शाळा हिंदू लोकांनी चालवली असेल तर असा निकष RTE अंतर्गत बेकायदेशीर ठरतो. (का हे विचारू नका).
फक्त अंतर ह्या निकषावर दाखल द्यायचा असता तर पालकांनी वाट्टेल तो पत्ता टाकला असता. मग त्या पत्याचे वेरिफिकेशन करायची जबाबदारी शाळेवर आली असती.
मिशनरी शाळा आहे तर पहा जवळपास, किमान मनस्ताप तरी वाचेल.
18 Dec 2020 - 12:43 pm | स्वतन्त्र
ऍड्रेस वेरिफिकेशन साठी शाळेने राहत्या घराची टॅक्स पावती,आधार कार्ड,वीज बिल घेतलेले आहे.त्यामुळे शाळांना वेगळे वेरिफिकेशन करण्याची गरज नसावी !
18 Dec 2020 - 1:47 pm | साहना
हो पण त्यावरून अंतर काढून सॉर्टींग करायचे असेल तर वेगळा पुरावा लागेल. त्याशिवाय पत्त्याला इतके महत्व असेल तर मग खोटी कागदपत्रे करून देणारे एजेंट लोक सुद्धा आपोआप तयार होतील. बेंगलोर मध्ये हे सर्रास चालू आहे.
25 Dec 2020 - 4:51 pm | स्वतन्त्र
पुण्याच्या एका कन्नड भाषिक संघाने चालवलेल्या शाळेत जिथे RTE कोटा नसल्यामुळे सीट्स जास्त होते.तिथे ऍडमिशन झालेली आहे.
26 Dec 2020 - 1:20 pm | साहना
अभिनंदन ! मराठी राज्यांत कन्नड भाषिकांनी शाळा चालविण्याबद्दल त्यांचे शतः आभार !
5 Jan 2021 - 2:43 pm | आनन्दा
हे भाषिक अल्पसंख्यांक होतात म्हणायचे का?
5 Jan 2021 - 9:16 pm | चलत मुसाफिर
शाळा केवळ शासनसंचालितच असाव्यात. बारावीपर्यंतचे शिक्षण संपूर्णपणे मोफत व सक्तीचे असावे. खाजगी शाळा, अल्पसंख्य शाळा, आंतरराष्ट्रीय शाळा अशा थेरांवर बंदी आणावी.
एक सुरुवात म्हणून सर्व सरकारी नोकरांच्या मुलांना जो शालेय शुल्काचा परतावा किंवा शिक्षण भत्ता मिळतो, तो केवळ सरकारी शाळांसाठीच मिळेल असा नियम करावा.
5 Jan 2021 - 10:05 pm | राखीव खेळाडू
एक मिनिट लेख वाचताना गेला एक महिना दोळ्यासमोर आला..
तुम्ही लिहिलेल्या दोन्ही शाळा कुठ्ल्या ते कळल्या.. माझ्या मुलीला सुद्धा कन्नड सन्घ शाळेमध्ये प्रवेश मिळाला..
13 Jan 2021 - 12:03 am | मुक्त विहारि
1. मला शाळेचा काहीही फायदा झाला नाही. मी दहावी पास झालो ते, वडीलांनी, शेवटचे 15 दिवस शिकवले म्हणून.
2. मोठ्या मुलाला, मी शिकलो त्याच शाळेत शिकायला पाठवले. SSC बोर्ड, अनुदानित शाळा. सेमी इंग्रजी. मुलगा, इंजिनियर झाला आणि सध्या नौकरी करतो.
3. धाकट्या मुलाला, माझ्या सारखीच, शालेय शिक्षणात रस न्हवता.अपेक्षा नसतांना, एका फटक्यात, दहावी पास झाला. नंतर 12वी काॅमर्स पण एका फटक्यात पास झाला. पुढच्या शिक्षणात रस न्हवता. म्हणून 2 वर्ष काहीही केले नाही. फक्त 3 गोष्टी मनापासून केल्या.
भरपूर व्यायाम...मनसोक्त खाणे आणि सिनेमा...
दोन वर्षांनी, त्याचे त्यानेच ठरवले की, फ्रेंच भाषा शिकायची. आता फ्रेंच भाषेचे क्लासेस घेतो. आणि साईड बाय साईड, Bachelor of Management Studies शिकत आहे.
तो त्याच्या पायावर उभा राहील.
4. बायको, कशीबशी BA झाली. लग्न झाल्यावर, जर्मन शिकली. आता जर्मन भाषा, घरबसल्या शिकवते.
5. माझा जिवलग मित्र, काॅपी करून दहावी झाला. 11वीला नापास झाला. पुढे काकांना व्यवसायात मदत केली आणि नंतर स्वतःचा धंदा चालू केला. वयाच्या पन्नासाव्या वर्षी, 100% निवृत्ती घेतली.
त्यामुळे, ज्याला मनापासून अभ्यास करायचा आहे, त्याच्या साठी शाळा योग्य आहे.
आमच्या सारख्या, अभ्यासात रस नसणार्या मंडळींनी, जे पटेल ते शिक्षण घेणे उत्तम.
समाजात सगळे लागतात... चपला शिवणारा पण लागतो आणि केस कापणारा पण लागतो...
13 Jan 2021 - 12:14 am | मुक्त विहारि
एकाच शाळेत शिकणारा, एकाच शिक्षकांच्या हाताखालून जाणारा एक विद्यार्थी उत्तम गूण मिळवतो तर दुसरा नापास होतो...
एकच एक फूटपट्टी, सजीवांना लागू होत नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे...
4 Mar 2021 - 11:53 am | स्वतन्त्र
सध्या शिक्षणापेक्षा व्यवहारीज्ञान आणि चातुर्य याला जास्त महत्व आहे.
4 Mar 2021 - 2:32 pm | मुक्त विहारि
व्यवहार ज्ञान आणि संभाषण कला आणि चातुर्य असेल तर, माणूस पुढे जातोच...