चिंता नक्को, हम हइ इद्दर!!"
"चिंता नक्को. हम हइ इद्दर!"
अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज:।
पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः।।
- कालिदास (कुमारसम्भव १/१)
आजवर बघितलेला हिमालय हा कुठेतरी काव्यात वाचलेला, सिनेमांमधून पाहिलेला, अद्भुतरम्य तरीही सुंदर. निळ्या नभाला शोभायमान करणार्या पांढर्याशुभ्र सानुंचा. निळ्याशार पाण्याच्या सरोवरांचा, असंख्य जलस्रोतांचा, अगदी गुल़जारच्या "आओ हाथ पकड़ लो मेरा, पसलियोंपे पांव रखो, ऊपर आ जाओ, आओ ठीक से चेहरा तो देखूं तुम्हारा,कैसे लगते हो।" अश्या ओळींनी अगदी आजोबांच्या प्रेमाने जवळ बोलावणारा.
पण गेल्या आठवड्यात बघायला मिळाला तो हिमालय मात्र कठोर, करारी, निर्दय, निष्ठुर वाटला. एरवी अंगाखांद्यावर नातवंडांना खेळवणार्या पांढर्या दाढीच्या आजोबांनी आपला युद्धाचा वेष चढवावा आणि त्यांच्या त्या वात्सल्यपूर्ण डोळ्यांत काळभैरवाचा आवेश दिसावा तसा. समुद्रसपाटीपासून सतरा - अठरा हजार फुटांवर जिथे गवताचं पातं दिसत नाही, दहा पावलं चाललं की धाप लागते, जिथे बिना हातमोज्यांची बोटं काही क्षणांत काळीनिळी पडायला लागतात, जिथे ऐन उन्हाळ्यात देखील ५ डिग्रीच्या वर तापमान जात नाही. जिथवर पोहोचण्याची हिंमत फक्त वार्यात आणि जिथून खाली यायची जिगर फक्त पाण्यात असू शकते अश्या हिमालयाचं उरात धडकी भरवणारं रूप बघितलं. हे हिमालय आजोबा आधी बघितलेल्या आजोबांपेक्षा खूपच वेगळे होते.
पण तिथे देखील या रौद्रभीषण आजोबांची जिगरबाज नातवंडं होतीच. काही डोळ्यांत तेल घालून गस्त घालणारी, काही शस्त्र परजून छातीचा कोट करून उभी, काही त्या भयावह भूप्रदेशात रस्ते निर्माण करणारी, काही जिवावर उदार होऊन आपल्या भावंडांना रसद पुरवणारी. ८ मद्रास, ११ गोरखा, ग्रेनेडियर्स, आर्टिलरी, बिहार रेजिमेंट, ITBP, सिक्किम स्काउट्स अश्या अनेक कुळांतली.
आम्ही आरामदायक इनोव्हामधून प्रवास करून देखील हैराण झालेलो. आतून कोणीतरी घण घालावेत तसं ठणकणारं डोकं हे "प्राणवायू" ही आपल्याला फुकट मिळणारी किती अमूल्य वस्तू आहे ह्याची जाणीव करून देत होतं. रस्त्याच्या प्रत्येक वळणाने सकाळी केलेल्या नाष्ट्याची चव पुन:पुन्हा चाखवली होती. हाडं खिळखिळी झाली होती, मान-पाठ एक झाली होती. तरी ते गुरुडोंगमार सरोवर अजून लांबच होतं. डोळ्यांसमोर येणार्या अंधारीमध्येच हिमालय आजोबांचा छद्मीपणाने हसणारा चेहरा दिसत होता. ड्रायव्हरने गाडी बाजूला घेतली. त्याच्या बोलण्यातला "चाय" इतकाच शब्द कळाला आणि खाली उतरलो. दोन-चार मिनिटं कापूर हुंगल्यावर थोडा शुद्धीत आलो. सैन्याच्या कुठल्यातरी यूनिटचा "बेस कॅम्प" असावा. पत्र्याच्या बर्याच शेडस होत्या. काही रणगाडे होते. तोफा होत्या. आर्मीच्या ट्रक्समधून सैनिकांच्या तुकड्यांच येणं जाणं चालू होत. एका खोपटीत शिरून थोडा चहा पोटात ढकलल्यावर थोडी तरतरी आली.
चहा पिऊन बाहेर आलो तर समोर पुन्हा ते छद्मीपणे हसणारे पांढरे आजोबा आणि त्यांच्या समोर त्यांचा एक धिप्पाड हसतमुख नातू. डोक्यावर जाड कानटोपी, ग्लव्ज, गमबूट्स, हातात स्वयंचलित शस्त्र, छातीवर उजव्या बाजूला लिहिलेलं त्याचं नाव "S Saravana", डाव्या बाजूला ढाल तलवारींवर असलेल्या हत्तीचं मद्रास रेजिमेंटचं चिन्ह, त्याच्या मागे एका पत्र्याच्या शेडवर लिहिलेलं घोषवाक्य "स्वधर्मे निधनं श्रेय:" आणि त्या शेडच्या मागे एका मजबूत लोखंडी खांबावर धीरोदात्त फडकणारा तिरंगा!!!
त्या एका दृश्यानी दिवास्वप्नात हरवलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकांच्या सणसणीत चपराकीने जमिनीवर आणावं तसं मला ताळ्यावर आणलं. खडबडून जागा झालो.
"जय हिंद सर्वना" - मी म्हणालो.
"जय हिंद सर" - सर्वनाचं हसतमुखाने उत्तर.
"Can I take a picture with you?"
"Sorry sir, no photography allowed here."
"आप कहाँसे हो सर्वना?"
"सेलम. टमिलनाड"
"How old are you brother?"
"आइ एम ट्वन्टी एईट सर"
"कबसे हो यहाँ?"
"वन मन्थ रोटेशन में होता है" - सर्वना अर्थातच तपशील सांगणार नव्हता.
हे सगळं माझ्यासाठी अनाकलनीय होतं. सर्वना अर्थातच सुशिक्षित होता. दोन वेळची भाजी भाकरी आणि त्यापलिकडची ऐहिक सुखं ही त्याला सेलमच्या आसपास काहीही कामंधामं करून सहज मिळाली असती. त्याच्या घरी त्याचे आई-बाप, भावंड असतील. कदाचित बायको-मुलं देखील. एक बर्यापैकी नोकरी करून तो सहज सुखात राहिला असता. पण तरीही सेलमच्या असह्य उकाड्यात वाढलेला सर्वना घरापासून जवळपास पावणेतीन हजार किलोमीटरवर असलेल्या रक्त गोठवणार्या थंडीच्या प्रदेशात, जीवघेण्या परिस्थितीत आपल्या मातृभूमीचं संरक्षण करत उभा होता. क्रूर शत्रू किंवा क्रूर निसर्ग - कोण, कधी आणि कसा घात करेल याचा नेम नाही. मग तरीही काय विचाराने सर्वना सैन्यात भरती झाला असेल? अशी कुठली गोष्ट असेल जी त्याला त्या वातावरणात शत्रूशी दोन हात करायला सज्ज राहायला प्रवृत्त करत असेल? काय पुण्य केलं की मिळतात असे सैनिक? कोणता नवस बोलला की जन्मतात अशी मुलं? कुठल्या मुशीतून घडतात अशी लोकं? कुठून आणतात हा अभिमान, ही स्फूर्ती, ही जिगर, हे चैतन्य?
काहीतरी फुटकळ इच्छा - आकांक्षांना कवटाळून, त्यांच्या पूर्तीत समाधान आणि यश मानणार्या माझ्या मनावरची पुटं सर्वना झटकत होता. अप्रेझल मनासारखं झालं नाही तर निराश होणार्या माझ्या डोळ्यांत सेलमच्या त्या युवकानं झणझणीत अंजन घातलं.
भारावून जाण्याच्याही पलिकडे गेलेलो मी, न राहवून त्याला विचारलं, "Is there anything I can do for you brother?"
तसा त्या विराट पांढर्या आजोबांचा तो निडर नातू माझ्या खांद्यावर हात ठेऊन हसत म्हणाला,
"देसमें जाके बोलो, चिंता नक्को, हम हइ इद्दर!!"
S Saravana, तू आणि तुझ्यासारखे हजारो सर्वना आहेत म्हणून बाहेरच्या शत्रूची काळजीच नाही रे. पण आम्हीच कुठेतरी चुकतोय. नक्की काय चुकतोय हे देखील आता उमगतंय पण ह्या भाजी भाकरीच्या व्यापात कृती करणं थोडं मागे पडतंय. माझ्या उजव्या खांद्यावर तुझा तो स्पर्श कुठेतरी एक जबाबदारी ठेऊन गेला आहे. आता तरी इतकंच सांगू शकतो की ती पेलायचा आम्ही मनापासून प्रयत्न करू. एक दिवस आम्ही देखील तुझ्यासारख्या सर्वनांना सांगू शकू - "चिंता नक्को. हम हइ इद्दर!"
© - जे.पी.मॉर्गन
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सारे सैनिक हे अगदी वेगळ्या
कमाल लेख!!
फारच आवड्ला लेख
अप्रतिम लिखाण !! डोळ्यात टचकन
पोहोचलं.
तुमचे लेखन नेहमीच आवडते... हे
खूप छान!
छान लिहिलंय .जय हिंद!
छान
खुप छान लेख.
जयहिंद
कर्नल साहेब,
लेख नेहमीप्रमाणेच छान आहे.
शब्दा शब्दाशी सहमत. आवडलं .
क - ड - क!
अतिशय हृद्य लिहिले आहे,