मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२१ : पुस्तक-दीप

अनुराधा काळे · · दिवाळी अंक
जुलै २०१७, पहिला आठवडा. दुपारी दारावरची बेल वाजली. दार उघडले तर पोस्टमनकाका! "रजिस्टर आहे तुमचं. घ्या, सही करा." रजिस्टर्ड पत्र कोणाचे असेल हे पाहतच मी सही केली. आमच्या सानेसरांचे पत्र! पण रजिस्टर्ड कशाला? अशा विचारातच मी पत्र उघडले. बाप रे! १ लाख रुपयांचा चेक? हो, हो, अक्षरी एक लाख रुपयांचा चेक! जोडीला सविस्तर पत्र. आमचे सानेसर म्हणजे आम्ही पार्ले टिळक विद्यालयात शिकत असताना आम्हाला ८वीपासून मराठी गद्य शिकवणारे सर! गांगलसर पद्य शिकवीत. साने-गा़ंगल गद्य-पद्य अशी उत्साही जोडी! त्या वेळी बरेच नवीन शिक्षक आले, ते व पूर्वीचे शिक्षक ह्यांच्यात फरक होता. दोन्ही उत्तम शिकवायचे. पण पोषाख! पूर्वी सगळे टोपी, कोट-शर्ट, धोतर, पायात वहाणा शिस्तीचे अगदी कडक! कपाळाला गंधाचा टिळा! नवीन सर छान भांग, काळे केस, बुशशर्ट हाफ किंवा फुल. पँट, पायात सँडल्स किंवा बूटमोजे. शिस्त होती, पण कडकपणा नव्हता. आम्ही १९५७ साली अकरावी एस,एस.सी. परीक्षा देऊन बाहेर पडलो, पण आमचा शिक्षकवर्गाशी व सहाध्यायांशी संपर्क होता. इतका की आम्हाला एस.एस.सी. होऊन ५० वर्षे झाली, तेव्हा आम्ही शाळेत सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले. जवळजवळ सगळे शिक्षक होते, त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत वैदिक मंत्र म्हणून पगडी व स्त्री शिक्षिकांना साडी देऊन सत्कार केला. कार्यक्रम सादर केला. त्यामुळे सानेसरांशी आमचा इतक्या वर्षांनंतरही संपर्क होता गेली काही वर्षे श्री. सानेसर हे हराळी गाव, तालुका नळदुर्ग, जिल्हा सोलापूर इथे ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या निवासी गृहात वास्तव्य करून होते. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेची ही हराळीची शाखा! किल्लारी भूकंपात हराळी गाव उद्ध्वस्त झाले होते. तिथे आज नावाला साजेल अशी शाळा आहे. शाळेने सरांना आपले मानले. सरांनी पत्रात १४ नोव्हेंबर २०१७ रोजी असणाऱ्या 'बालदिना'साठी एक संकल्पना मांडली. मुलांच्या वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी इयत्ता ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वाचनक्षेत्र विस्तृत करण्यासाठी पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त पुस्तके खरेदी करायची. त्यासाठी त्यांनी एक लाख रुपये (१,००,०००₹) धनादेशाने मला पाठवले होते. आम्हा तिघींवर ही जबाबदारी सोपवली होती. आम्ही तिघी म्हणजे सरांच्या खारच्या शाळेतील सहशिक्षिका सुमती फाटक, पार्ले टिळक विद्यालयातील माझी पहिली ते अकरावी वर्गमैत्रीण शोभना कलबाग (आता बिजूर) आणि मी आशा लिमये (आता अनुराधा काळे), सर्व जणी आता पुणेकर! आम्ही भेटलो आणि चर्चा करून सारे ठरवले. सानेसरांनी आम्हाला 'भरपूर निधी व अवधी' दिलेला. सुमती फाटक यांनी पाचवी ते सातवी आणि आम्ही दोघींनी आठवी ते दहावी व शिक्षकांसाठी पुस्तके खरेदी करायची असे ठरवले. 'पुणे तिथे काय उणे?' आम्ही ग्रंथविक्री दालनांना भेट देऊन आमचा खरेदी उद्देश सांगत असू. आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. जास्तीत जास्त सवलत दिली, त्यामुळे आम्ही जास्त खरेदी करू शकलो. तीन-चार तास आम्ही चर्चा, पुस्तके वाचणे, शोधणे ह्यात गुंग होत असू. ती मंडळीसुद्धा सुचवत नवीन लेखक, प्रकाशन. जोडीला गरम गरम चहा! आमचे घर मध्यवर्ती भागात, त्यामुळे घरपोच पुस्तके येत. पुस्तके निवडताना मुलांचे वय, आवाका, आवड, विषयांची विविधता, ज्ञान, मनोरंजन असे अनेक पैलू लक्षात घेऊन निवड केली, तसेच विषय, लेखक, नवनवीन लेखक. शिक्षकांसाठी जास्तकरून विविध क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींची वैचारिक,. मार्गदर्शक, आत्मचरित्रपर, काही भाषांतरित गाजलेली पुस्तके घेतली. नाटके, कविता, संतसाहित्य.. जेवढे विविध विषय, त्यांचा समावेश केला. सर्व खरेदी झाल्यावर शोभनाच्या घरी एकत्रित केली एक खोली जणू ग्रंथालय! आता दुसरा टप्पा! तुळशीबाग!! तिथून छान भक्कम पण आकर्षक बॅगा खरेदी केल्या. पुस्तके वर्गीकरण करून त्यात ठेवली. वरती छान लेबल्स लावली. प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक वर्गाचे दोन प्रतिनिधी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका प्रतिनिधी यांना देण्यासाठी छान वेष्टनात नोंद केली. तत्पूर्वी रजिस्टर्स बनवली - इयत्ता, पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकाशन, कितवी आवृत्ती, विषय, केव्हा प्रकाशन झाले.. थोडक्यात परीक्षण. मुलांसाठी वह्या, त्यात मुलांनी नोंद ठेवायची. पुस्तकाचे नाव, विषय, आवडले असल्यास अभिप्राय. ह्या कार्यात आमचीच शाळेतील मैत्रीण मालती पातकर हिची खूप मदत झाली. शोभनाच्या घरून हराळी ज्ञान प्रबोधिनी इथे पुस्तकपेट्या व्यवस्थितपणे व वेळेवर पोहोचवण्याची मोठी जबाबदारी ज्ञान प्रबोधिनी पुणे ह्यांनी उत्तम पार पाडली. ठरल्याप्रमाणे आम्ही तिघी आणि विलेपार्ले येथील काही शाळेतल्या मैत्रिणी बालदिनाच्या दोन दिवस आधी पोहोचलो. सानेसरांनी पुस्तकपेट्या प्रदान कार्यक्रम रूपरेषा आम्हाला सांगितली. आमचे खूप कौतुक केले. गप्पागोष्टी तर सुरूच होत्या. तिथे आमचीही राहणे, जेवणखाण, नाश्ता सगळी सोय उत्तम होती. सरांबद्दल माया, आत्मीयता आम्हाला पूर्वीच्या भेटीतही जाणवली होतीच तेथील सगळ्यांची! बालदिन, १४ नोव्हेंबर २०१७. सकाळी १० वाजता. ज्ञान प्रबोधिनी हराळी सभागृह छान सजवलेले. सभागृहात मान्यवर मुख्य मूर्ती सानेसर, समस्त शिक्षक-शिक्षिका व सहकारी विद्यार्थी-विद्यार्थिनी आम्ही सारेच उत्सुक! अतिशय प्रेरणादायक मंगलमय प्रार्थनेने कार्यक्रम सुरू झाला. सूत्रसंचालन करणाऱ्याने प्रथमच सांगितले की आज उपस्थित मान्यवरांनी आधीच सांगितले आहे की त्यांची भाषणे नको. आज फक्त उत्सवमूर्ती सानेसर काय म्हणतात आणि पुस्तकपेट्या प्रदान कार्यक्रम!! आम्हाला तिघींना मनोगत व्यक्त करायला सांगितले. "आमच्यावर इतका विश्वास ठेवून ही पुस्तक खरेदी जबाबदारी सरांनी सोपवली. खरेदी, अनुभव, विचार, वाचनसंस्कृती हे ऋणानुबंध असे थोडक्यात सांगितले. आमचे गुरुवर्य वय वर्षे ९२ पूर्ण आणि आम्ही विद्यार्थिनी वय वर्षे ७५ - अमृतमहोत्सवी वर्षांत! हा एक अपूर्व योग. आम्ही भाग्यशाली आहोत." सरांनी खुर्चीवर बसूनच भाषण करावे अशी अपेक्षा होती, पण सरांनी पोडियमच्या मागे उभे राहून खणखणीत आवाजात मनोगत व्यक्त केले. वयानुसार एरव्ही सर थोडे थरथरत, पण मानसिक शक्ती बळ देते ते असे. "पुस्तके किंवा ग्रंथ म्हणजे काय? मुखपृष्ठ व मलपृष्ठ ह्यात सामावलेले ज्ञान, विज्ञान, मनोरंजन, काव्य, भक्तिभाव, इतिहास, भूगोल, चित्रे, प्रतीके, कथा अशा विविध गोष्टींचा समावेश असलेली पृष्ठे म्हणजे पाने! मग ती काही पानांची पुस्तिका असेल किंवा ग्रंथ." ही व्याख्या ऐकून सगळ्यांनी खूप टाळ्या वाजवल्या. सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचली. सरांनी आपला शिक्षणक्षेत्रातील प्रवास थोडक्यात सांगितला. 'वाचाल तर वाचाल', 'ग्रंथ आपले गुरू', 'पुस्तके आपले मित्र, सतत आपली सातारा देतात' ही वचने सरांनी 'पुस्तक पेटी संकल्पने'ने सार्थ केली. ठरल्याप्रमाणे वर्गप्रतिनिधी व शिक्षक प्रतिनिधी यांना सुंदर वेष्टनात बांधलेली पुस्तके भेट दिली. आम्हाला सरांनी डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे पुस्तक व हराळीच्या बागेतील फुलांचा सुंदर गुच्छ देऊन आमचे परत कौतुक केले. डॉ. रघुनाथ माशेलकर यांची पुस्तके आणू नका असे सरांनी का सांगितले, ते आत्ता कळले. डॉ. रघुनाथ माशेलकर हराळी ज्ञान प्रबोधिनी भेटीला आले असतानाच सरांनी त्यांच्याकडून आम्हाला देण्यासाठी व पुस्तकपेटीसाठी प्रती घेऊन ठेवल्या होत्या. राष्ट्रगीताने एका सुंदर नेटक्या कार्यक्रमाची सांगता झाली. सभागृहाच्या शेजारी सर्व पुस्तक पेट्या मांडून ठेवल्या होत्या. मुले व शिक्षक तिकडेच वळले. दुसऱ्या दिवशी दहा वाजण्याच्या सुमारास दहा बारा मुलामुलींचा घोळका सरांच्या खोलीबाहेर उभा! प्रत्येकाच्या हातात वही अन् पेन! पुस्तक वाचून कोणी एक प्रकरण, तर कोणी धावता आढावा, तर कोणी सबंध पुस्तकाचा फडशा पाडला होता. कोणी कविता, तर कोणी काय वाटले, तर कोणी खूप आवडले लिहिले होते. सरांना सगळे तिथे 'आप्पा' म्हणत. सगळ्यांनी आप्पांना धन्यवाद दिले होते. आप्पांची स्वाक्षरी घेण्यासाठी हट्टच धरला. आनंद-समाधानाचे ते क्षण, आम्ही साक्षीदार होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला परतणार. एकीकडे सरांशी खूप गप्पा चालल्या होत्याच. सगळे जण वय जणू विसरून गेले होते. आमच्या मनाला जे समाधान, आनंद मिळाला, तो कितीही मोठ्या मॉलमध्ये कितीही किंमत मोजून मिळाला नसता. असा तो १४नोव्हेंबर २०१७चा बालदिन!! असे आमचे गुरुवर्य!! अनुराधा काळे 9930499598

वाचने 8216 वाचनखूण प्रतिक्रिया 15

मुक्त विहारि Wed, 11/03/2021 - 23:03
असे शिक्षक आता दुर्मिळ झाले आहेत... डोंबिवली सारख्या जागतिक केंद्रात देखील, वाचनालया पेक्षा, मदिरालये आणि ध्वनी प्रदूषण करणारी प्रार्थनास्थळेच जास्त...

चित्रगुप्त गुरुवार, 11/04/2021 - 12:44
अतिशय स्तुत्य उपक्रम. धन्य ते शिक्षक आणि धन्य त्यांचे विद्यार्थी. पैजार्बुवा म्हणतात त्याप्रमाणे काही फोटो अवश्य टाकावेत. विशेषतः साने सरांचा.

सुरिया गुरुवार, 11/04/2021 - 14:04
सुंदर काम. हृद्य आठवणी. . एक छोटीशी दुरुस्ती. मु. पो. हराळी, तालुका लोहारा, जि. उस्मानाबाद. नळदुर्ग तालुका नाही आणि जिल्हा सोलापूर पण नाही.

विनायक पाटील गुरुवार, 11/04/2021 - 18:04
खरंच पुस्तकं काही आयुष्ये दिव्याप्रमाणे उजळून टाकतात. त्यात पुस्तकांचं बोट धरायला शिकवणारे लोक आजूबाजूला असतील तर दुधात साखर! छान लेख आणि सुंदर अनुभव.

अनिंद्य Tue, 11/09/2021 - 12:25
@अनुराधा काळे, पुस्तक दीप लावलेत, उत्तम काम केले. श्री साने यांचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर संपादक मंडळाच्या मदतीने लेखात समाविष्ट करता येईल.