प्रवास (भाग 8) (शेवटचा)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
19 Feb 2021 - 9:59 pm

प्रवास

भाग 8

पोलीस स्टेशनमध्ये शिरताच राठींनी भिकुला लॉक अप मध्ये टाकले आणि अनघा-मनाली-मंदार-नवीन यांना घेऊन ते त्यांच्या केबिनमध्ये आले. त्यांनी एका हवालदाराला या मुलांसाठी पाणी आणायला संगितले आणि त्यांना समोर बसवत म्हणाले;"तुम्हाला जे माहीत आहे ते सगळं सांगा आता."

नवीन बोलायला सुरवात करणार होता; इतक्यात अनघाने इन्स्पेक्टर राठींना विचारलं;"इन्स्पेक्टर, आनंद कुठे आहे? मला एकदा त्याला बघायचं आहे."

राठी शांतपणे म्हणाले;"तुम्ही अनघा न? आनंद...."

राठींना बोलू न देता मनाली एकदम म्हणाली;"इन्स्पेक्टर, त्यानेच तुम्हाला पाठवलं नं आमच्यासाठी. मला वाटलंच. त्याला आम्ही झोपडीतून सोडवून आणलं तेव्हाच माझ्या मनात आलं होतं की हा भिकूच ते सगळं घडवत होता. म्हणूनच मी सारखी घाई करत होते निघायची. पण आम्ही सगळे दुपार नंतर उठलो होतो आणि एका मागोमाग एक असं इतकं काही घडलं की आम्हाला निघायला उशीरच होत गेला. खरंतर माझा आनंदवर देखील काडी इतका विश्वास उरलेला नाही. पण...."

तिचं वाक्य तोडत नवीन म्हणाला;"मनाली, उगाच काहीतरी बोलू नकोस."

त्यावर नविनकडे रागाने बघत मनाली म्हणाली;"उगाच काहीतरी बोलते आहे का मी नवीन? अरे तो गेले दोन दिवस जे काही वागत होता ते काय फार नॉर्मल होतं का? मध्येच बोलणं बंद करून फक्त निरीक्षण करणं; अनघाकडे दुर्लक्ष करणं.... अगोदर कोल्हेकुई झाली होती तेव्हा तो देखील घाबरला होता आपल्यासारखा. पण मग दुसऱ्या वेळी किती थंड होतं त्याचं वागणं. नवीन.... तुला अनघा आवडते हे बाजूला ठेवलंस तरी देखील तू मान्य करशील की आनंदचं वागणं विचित्र होतं."

मनालीच्या शेवटच्या वाक्याने अनघा एकदम कणकोंडी झाली आणि नवीन देखील एकदम बावचळला. एकूण परिस्थिती लक्षात येऊन मंदारने सगळी सूत्र हातात घेतली आणि मनालीला म्हणाला;"हे बघ मनाली; पोलिसांना आपण काय घटना घडल्या ते सांगायचं असतं आणि जर त्यांनी विचारलं तरच आपलं मत द्यायचं असतं. पोलिसांना पूर्वग्रहदूषित राहून चालत नाही. त्यामुळे तुला काय वाटतं यापेक्षा काय काय झालं ते त्यांना सांगणं योग्य."

मनालीला मंदारचं म्हणणं पटलं. मान डोलवत ती म्हणाली;"You are right. तूच सांग मंदार सगळ्याच घटना. कोणीतरी एकानेच सांगितलेलं बरं. त्यात तू अगदी योग्य आहेस. कारण अनघा आणि नवीनमध्ये काही नसून काहीतरी आहे.... आणि मला काही माझी मतं न सांगता घटना सांगता येणार नाहीत."

अनघाला ती जे बोलली ते आवडलं नव्हतं. पण ती काहीही बोलली नाही. मंदारने एकदा नविनकडे बघितलं आणि बोलायला सुरवात केली.

"इन्स्पेक्टर, आम्ही पाचही जण कॉलेज पासूनचे मित्र-मैत्रिणी आहोत. मी माझ्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करतो. नवीन आणि मनाली नोकरी करतात. अनघा अजून तरी काही करत नाही. अर्थात नोकरी करायची तिची इच्छा नाही सध्या म्हणून. नाहीतर ती आमच्या कॉलेज मधली सर्वात हुशार आणि सर्वात सुंदर मुलगी होती आणि अजूनही आहे. आनंद बद्दल मी वेगळं काही सांगायला नकोच. तुम्ही त्याला भेटलाच आहात. त्यात तो ऍक्टर आहे त्यामुळे तसाही माहितीतला चेहेरा आहे त्याचा. तर... आम्ही सगळेच कॉलेज नंतर खूप बिझी झालो होतो. त्यात या लॉक डाऊन काळात तर अजिबातच भेटणं झालं नव्हतं. सतत विडिओ कॉल्स करून कंटाळलो होतो. मुंबईत भेटायचं तर अजूनही नियम कडक आहेत. अकरा नंतर बाहेर पडायला परवानगी नाही. हॉटेल्स पण बंद होणार. म्हणून मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आनंदच्या लोणावळ्याच्या वाड्यावर जायचं. आम्ही इथे यायला निघालो ते आनंदच्याच गाडीतून. अनघा आणि आनंदने आम्हाला पिक-अप केलं आणि आम्ही वाड्यावर आलो.

इथे थोडी वेगळी माहिती देतो मी इन्स्पेक्टर साहेब, आनंदला अनघा आवडते. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. लॉक डाऊनच्या काळात आनंदने मला अनेकदा फोन केला होता. आम्ही एक-दोन वेळा भेटलो देखील होतो. त्याला अनघाला प्रपोज करायचं होतं. काय करावं-कसं करावं याची चर्चा तो माझ्याशी करत होता. अर्थात आम्ही यात नविनला सामील केलं नाही; कारण आनंदचं मत होतं की नविनला देखील अनघा आवडते. त्यामुळे उगाच हा विषय त्याच्याशी नको बोलायला.

आम्ही वाड्यावर येताना मध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो त्यावेळी मी आनंदला विचारलं देखील होतं की त्याने प्रपोज करण्याबद्दल काय विचार केला आहे. पण त्याने मला काहीच उत्तर दिलं नाही. एरव्ही सतत याविषयी बोलणारा आनंद एकदम गप होता तेव्हा. आम्ही गाडीकडे निघालो पण त्यावेळी आनंद आमच्या सोबत नव्हता. त्याला शोधण्याच्या नादात अनघा धडपडली. तसं थोडं तिला लागलं देखील होतं. पण आनंदने काहीसा बेफिकीरीपणा दाखवला होता त्याविषयी तेव्हा."

मंदार एक एक प्रसंग शांतपणे सांगत होता. अचानक त्याचं बोलणं तोडत अनघा म्हणाली;"मंदार, विषय भिकुचं वागणं हा आहे. तू हे काय संगतो आहेस? यासगळ्याचा काय संबंध?"

त्यावर इन्स्पेक्टर राठी म्हणाले;"हे बघा मॅडम, मंदार अगदी योग्य करतो आहे. तुम्ही थोडं शांत राहा. इथे कोणालाही वाईट वाटावं म्हणून किंवा दुखवावं म्हणून तो बोलत नाही आहे. तर आम्हाला सगळं समजावं; जेणे करून आम्ही तुमची सर्वांची मदत करू शकू; म्हणून तो बोलतो आहे. बोल मंदार!"

राठींचं बोलणं ऐकून अनघा शांत झाली. मंदारने एकदा अनघाकडे बघत खुणेनेच सॉरी म्हंटलं आणि तो परत बोलायला लागला.

"आम्ही वाड्यावर पोहोचलो. गाडीतून आम्ही उतरलो तर आनंद म्हणाला आपण मधल्या दाराने घरात जाऊया. त्यावर अनघा त्याला म्हणाली की 'तुला तो दरवाजा उघडलेला आवडत नाही न.' त्यावर हसत त्याने म्हंटलं की आता असल्या अंधश्रद्धांवर त्याचा विश्वास नाही. त्यामुळे तो दरवाजाच काय तिथल्या दोन खोल्या; ज्या त्याने बंद ठेवल्या होत्या; त्या देखील त्याने उघडून वापरायला सुरवात केली होती. आम्ही कोणीही यावर काही बोललो नाही. आत शरताच आनंद एकदम मोठ्याने ओरडला 'मी आलो' असं. मनालीने त्याला विचारलं 'कोणाला सांगतो आहेस? वाडा तर रिकामा आहे न?' त्यावर तो म्हणाला 'You never know.' त्याच्या या बोलण्याने मनाली थोडी नाराज झाली. कारण तिला नवीन जागेविषयी थोडी भीती आहे. आम्ही सगळेच आत आलो. तसे आम्ही सगळेच पूर्वी देखील वाड्यावर गेलो होतो त्यामुळे आम्हाला वाडा नवीन नव्हता. आम्ही कोणती खोली वापरू ते देखील काहीसं ठरलेलं होतं. पण आत आल्यावर आनंदने समोरची खोली स्वतःसाठी घेणार असल्याचं सांगितलं. खरं तर आजवर ती खोली त्याने कधीच वापरली नव्हती. पण अर्थात तो वाडाच त्याचा आहे म्हंटल्यावर तो कोणीही खोली घेऊ शकणार होता. त्याच्या शेजारची खोली मी आणि नविनने घेतली आणि अनघा आणि मनाली थोड्या पलीकडच्या खोलीत शिरल्या. आम्ही सगळेच आरामात दुपारी उठलो. अनघा आणि मनालीने भिकुला जाऊन रात्रीच्या जेवणाबद्दल सांगितलं आणि मग आम्ही सगळे पत्ते खेळत बसलो.

किती वेळ गेला ते कोणालाच कळलं नाही. अचानक भिकुची हाक आली ऐकू. तो जेवण घेऊन आला होता. आम्ही बिअरच्या बाटल्या उघडल्या आणि मस्त गप्पा मारत जेवलो. जेवणं आटपली आणि आम्ही सगळेच बाहेर पुढच्या अंगणात गप्पा मारत बसलो. कसं कोणजाणे पण गप्पा भुताच्या विषयावर वळल्या. अचानक घरातून काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि आम्हाला थांबायला सांगून आनंद आत गेला. तेवढ्यात वीज पण गेली आणि एकदम अंधार जास्तच जाणवायला लागला. आम्हाला तर भास व्हायला लागला की कोणीतरी येतं आहे गेटकडून चालत. पण मग एकदम दिवे आले आणि आनंद फुगा फोडत HAPPY NEW YEAR ओरडला. सगळेच हसलो आणि मग घरात गेलो. पण आनंद आमच्या सोबत नाही आला. नवीन सगळ्यात शेवटी आत आला होता. त्याचा चेहेरा देखील काहीसा अस्वस्थ होता. पण कारण नाही कळलं आम्हाला. आनंद आला नव्हता म्हणून अनघा परत बाहेर निघाली तर नविनने तिला थांबवलं. अचानक त्याचवेळी कोल्हेकुई सुरू झाली. आम्ही सगळेच एकदम घाबरून गेलो. त्याचवेळी आनंद देखील बाहेरून धावत आत आला. तो आणि अनघा एकमेकांवर धडकले आणि घरात पडले. त्याचवेळी तो आवाज देखील बंद झाला.

आम्ही सगळेच परत एकदा दिवाणखान्यात बसून गप्पा मारायला लागलो. भिकूने आम्हाला बिअर आणून दिली. त्याला बघून अनघाला आश्चर्य वाटलं. तिने आनंदला विचारलं 'तू थांबवलं आहेस का भिकुला?' तर तो 'हो' म्हणाला. तसे आम्ही सगळे बसलो होतो एकत्र; पण सगळ्यांच्या मनात काही ना काही चालू होतं. त्यामुळे गप्पा अशा होत नव्हत्या. अचानक आनंदने बोलायला सुरवात केली...."

असं म्हणून मंदार क्षणभर थांबला आणि मग म्हणाला;

"इन्स्पेक्टर साहेब, मी खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे फक्त घडलेले प्रसंग सांगायचा. पण इथे मात्र मी जे सांगणार आहे ते माझं मत आहे... आणि माझी खात्री आहे की ते या तिघांचं देखील नक्कीच आहे."

त्याचं बोलणं ऐकून राठींच्या कपाळावर आठ्या आल्या. ते पाहून मंदार पटकन म्हणाला;

तसं काही नाही साहेब; पण आम्ही सगळेच काही ना काही विचार करत होतो आणि अचानक आनंद बोलायला लागला ते आम्ही जो विचार करत होतो त्याला अनुसरूनच होतं. जसं काही त्याने आमच्या मनातले विचार वाचले होते. थोडं विचित्र वाटलं ते मला. अर्थात आम्ही कोणीही याविषयी एकमेकांकडे बोललो नाही. पण सगळ्यांच्या चेहेऱ्यावरचे बदलते भाव मी बघत होतो; आणि अर्थात माझा स्वतःचा अनुभव. यावरून मी हे सांगतो आहे.

मंदारचं म्हणणं ऐकल्यावर राठींनी अनघा, मनाली आणि नविनकडे बघितलं. त्यासर्वांनीच मानेने होकार दिला. त्यावर मान डोलावत राठींनी मंदारला पुढे बोलायची खूण केली. एकदा सगळ्यांकडे बघून मंदार पुढे बोलायला लागला;

"साहेब, आम्ही सगळेच झोपायला म्हणून उठलो आणि आमच्या खोल्यांकडे गेलो. तर अचानक परत एकदा कोल्हेकुई ऐकू यायला लागली. साहेब, तो वाडाच एकूण जंगलात आहे. आम्ही पूर्वी गेलो आहोत; पण तरीही सगळं नवीनच की हो आमच्यासाठी. त्यामुळे आम्ही सगळेच घाबरलो आणि धावत बाहेर आलो. दिवाणखान्यात येऊन बघतो तर आनंद शांतपणे बिअर पीत होता. थोड्याच वेळापूर्वी कोल्हेकुई सुरू झाल्यावर बाहेरून धावत आलेला आनंद आणि समोर बसलेला आनंद दोन टोकं होती साहेब वागण्यात. त्याचं ते वागणं बघून अनघा वैतागली आणि त्याच्यावर ओरडायला लागली. पण तरीही तो तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. त्यामुळे अनघा चिडून किंवा वाईट वाटून घेऊन खोलीत गेली. नवीन तिची समजूत काढायला तिच्या मागे गेला. ते दोघे गेले आणि आनंद देखील त्याच्या खोलीत गेला. मी आणि मनाली दोघेच होतो दिवाणखान्यात. त्यावेळी मनालीने मला सांगितलं की आनंदने अनघाला वाड्यातच नुकतंच प्रपोज केलं होतं. ते ऐकून मला इतका राग आला आनंदचा... तो मला सतत भेटून कसं प्रपोज करू म्हणून एकीकडे विचारत होता आणि एकीकडे त्याने अनघाला प्रपोज करून देखील टाकलं होतं. अर्थात तो त्याचा प्रश्न! पण किमान मला सांगावं की नाही त्याने... हा विचार माझ्या मनात आला. त्याचवेळी आनंद परत बाहेर आला. त्याला बघून मनाली तिच्या खोलीकडे गेली. पण नवीन अजूनही आत होता; त्यामुळे ती तिथेच बाहेर थांबली. मी मात्र आनंदला जाब विचारण्यासाठी त्याच्या जवळ गेलो............. साहेब; त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दुपारी... म्हणजे 1 जानेवारीला जागा झालो.... "

मंदारच्या शेवटच्या वाक्याचा धागा पकडत नविनने बोलायला सुरवात केली. तो राठींकडे वळला आणि म्हणाला;

साहेब, मी खोलीतून बाहेर आलो आणि मनाली आत गेली. मनालीकडे बघताच मला लक्षात आलं होतं की मी अनघाशी जे बोललो ते तिने ऐकलं होतं. पण मुळात मला त्यात काहीच लपवण्यासारखं वाटलं नाही. त्यामुळे तिने ऐकलं तरी माझी हरकत नव्हती. मी बाहेर आलो तर आनंद समोरच उभा होता. तो अनघाशी इतका बेफिकीरीने का वागतो आहे; याचा जाब विचारण्यासाठी मी त्याच्या समोर जाऊन उभा राहिलो.... आणि साहेब, माझी देखील आठवण इथेच थांबते. त्यानंतर मंदार म्हणतो आहे तसा मी देखील त्याच्या सोबत जागा झालो. ते देखील मुलींनी हाका मारल्या म्हणून."

राठींनी नविनवरची नजर उचलून अनघाकडे बघितलं आणि अनघाच्या लक्षात आलं की पुढे काय झालं ते तिने सांगावं अशी राठींची इच्छा आहे. त्यामुळे तिने मान डोलावली आणि बोलायला सुरवात केली;

"सर, सकाळी... म्हणजे जवळ जवळ दुपारीच आम्हाला जाग आली. मनाली सगळ्यात अगोदर उठली होती. तिने मला उठवलं आणि आम्ही दोघींनी मंदार आणि नविनला हाका मारल्या. वाड्यावरची वीज गेली होती. त्यामुळे आमचे सगळ्यांचे मोबाईल बंद पडले होते. खरं तर रात्री बराचवेळ कोल्हेकुई होत होती. त्यामुळे आम्हाला दोघींना झोप नव्हती. पण त्याबद्दल या दोघांना आम्ही सांगितलं तर त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी कोल्हेकुई ऐकलीच नव्हती. ते थोडं विचित्र होतं. पण मंदार आणि नवीन आमच्याशी खोटं बोलणार नाहीत याची मला खात्री होती. ते दोघे उठले आणि फ्रेश होत होते त्यावेळी आम्ही दोघी स्वयंपाकघराकडे गेलो. आम्ही चहा घेऊन आलो तर मंदार, नवीन आणि आनंद दिवाणखान्यात बसले होते. आम्ही सगळ्यांनी चहा घेतला. मी म्हंटलं भिकुला जेवण करायला सांगते; आपण जेऊ आणि लगेच निघू. तर आनंद म्हणाला भिकू दारू पिऊन टाईट होऊन पडला असेल. त्यामुळे तोच बाहेर जाऊन काहीतरी घेऊन येईल. ते खाऊन तयारी करून निघू. सगळ्यांनाच हा प्लॅन पटला आणि आनंद घराबाहेर पडला.

आनंद गेला आणि भिकू मागच्या दाराने आत आला. तो कसा काय आला ते आम्हाला कोणालाही कळलं नाही. पण त्याचा रागरंग सरळ नव्हता वाटत. मात्र तो माझं ऐकतो. त्यामुळे मी त्याला सांगितलं की मालक नाहीत... तो आनंदचा उल्लेख कायम फक्त मालक म्हणूनच करतो.... म्हणूनच मी देखील त्याच्याशी बोलताना आनंदचा उल्लेख मालक म्हणून करते. तर मी त्याला संगीतलं की मालक नाहीत. तू नंतर ये.

सर, इथे मला थोडी माहिती द्यायची आहे. खरंतर आनंदला भिकू फारसा आवडायचा नाही. हे खरं आहे की भिकुचं लग्न आनंदने लावून दिलं. पण तरीही आनंदला तो फार पटायचा नाही; हे मला माहीत आहे. त्यामुळे आदल्या रात्री भिकू आम्हाला जेवण आणून देत होता; बिअर देत होता; आम्ही गप्पा मारत असताना घरात काहीतरी पडलं तर आनंद आत गेला; त्यावेळी माझ्या मनात देखील आलं की भिकू आत आहे... आता आनंद अजून वैतागेल. पण तसं काहीच झालं नाही. या ट्रिप दरम्यात माझ्या लक्षात आलं की आनंद आणि भिकुमध्ये काहीतरी बदललं आहे. अर्थात; हे माझं मत झालं.

माझं आणि भिकुचं मात्र पटायचं पहिल्यापासून. तो मला अनेकदा म्हणाला आहे... तुम्ही वेगळ्या आहात ताई; तिच्यासारख्या! पण कोणासारखी ते विचारलं तर कधी सांगितलं नाही. अर्थात, सर, ही देखील एक माहिती आहे तुमच्यासाठी. तर...

भिकुला मी म्हंटलं तू नंतर ये. त्याने ते मान्य केलं आणि तो परत जायला निघाला. पण अचानक असं काय घडलं माहीत नाही; तो मागे फिरला आणि मंदारच्या अंगावर धावून गेला. आम्ही सगळेच तिथेच होतो. त्यामुळे आम्ही चौघांनी मिळून त्याला थोपवला. एकूण झटापटीमध्ये आम्हाला तर लागलंच; पण भिकू बेशुद्ध पडला. आम्ही ठरवलं की त्याला त्याच्या झोपडीत नेऊन टाकायचं आणि आनंद आला की लगेच निघायचं. त्याप्रमाणे आम्ही भिकुला घेऊन त्याच्या झोपडीत गेलो; तर आम्हाला तिथे आनंद दिसला. भिकूने त्याला बांधून ठेवलं होतं. हे खरंच अशक्य होतं माझ्या दृष्टीने. कारण एक तर भिकुला आनंद बद्दल एक आदरपूर्ण भीती होती. तो कधीच आनंदकडे डोळे उचलून देखील बघायचा नाही. आनंद समोर त्याच्या तोंडून मोठ्या आवाजात एकही शब्द बाहेर पडलेला मी बघितला नव्हता. अशा भिकूने आनंदला बांधून ठेवलं होतं. आनंदने आम्हाला सांगितलं की तो जेवण आणायला निघाला होता; इतक्यात भिकूने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला झोपडीत आणून बांधून ठेवलं होतं. आमचा त्यावर लगेच विश्वास बसला. कारण भिकूने आमच्यावर देखील कारण नसताना हल्ला केलाच होता. त्यामुळे आम्ही भिकुला तिथे बांधून ठेवलं आणि आनंदला घेऊन बाहेर पडलो झोपडीच्या.

आम्ही वाड्यावर आलो आणि सगळ्यांनी लगेच निघायची तयारी केली. एक एक करत आम्ही गाडीजवळ पोहोचत होतो. पण आमच्याही नकळत त्या भिकूने आम्हाला सगळ्यांना झाडांमध्ये ओढून घेतलं अचानक आणि त्याच्या झोपडीत नेऊन बांधून ठेवलं. सर, त्याने असं का केलं आम्हाला माहीत नाही. त्याने तर या तिघांची तोंडं पण बांधून ठेवली होती. मला का नव्हतं तसं केलं कोण जाणे. पण तो माझ्याशी बोलत होता. बोलत काय होता... सारखा म्हणत होता की आनंद सैतान आहे..... त्याच्यापासून वाचवण्यासाठीच त्याने आम्हाला त्याच्या झोपडीत आणून ठेवलं होतं. अर्थात आमचा त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. मुख्य म्हणजे आनंद बाहेर मोकळा होता. त्यामुळे आम्हाला धीराने घेऊन भिकू कोणतीही भयंकर हालचाल करणार नाही याची काळजी घ्यायची होती. आमची सगळ्यांचीच खात्री होती की आनंद नक्की मदत घेऊन येणार होता आम्हाला सोडवायला... आणि झालं देखील तसंच! तुम्ही आलातच नं आम्हाला सोडवायला.

तर, सर, एकूण असं सगळं झालं आहे गेल्या दोन दिवसात. आम्ही सगळं सांगितलं आहे तुम्हाला. आता माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्याल का? माझा आनंद कुठे आहे सर? इतका वेळ आम्ही इथे आहोत; आपण बोलतो आहोत; पण तुम्ही त्याला अजून बोलावलं नाहीत. किंवा तो देखील इथे आलेला नाही. असं कसं? सर, माझा जीव कासावीस झाला आहे हो... प्लीज आनंदला बोलवा. माझी खात्री आहे तो इथेच आहे कुठेतरी आणि नीट आहे. आपण जी डेड बॉडी बघितली भिकूच्या झोपड्यात ती आनंदची नाही. असूच शकत नाही. कारण जर तो आनंद असेल आमची माहिती कळून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलातच कसे?"

अनघाचं बोलणं ऐकून राठींनी एक निश्वास सोडला. ते काहीतरी बोलणार इतक्यात केबिन बाहेर एकदम आरडाओरडा सुरू झाला. त्यामुळे राठी बाहेर धावले. त्यांच्या पाठोपाठ अनघा, मनाली, नवीन आणि मंदार देखील धावले. बाहेर येऊन बघतात तर भिकू लॉक अपच्या बाहेर येऊन उभा होता. तीन-तीन हवालदारांनी त्याला धरला होता पण त्यांच्याच्याने तो आवरत नव्हता. तो बाहेर कसा आला कोणालाही कळलं नव्हतं. पण तो मोठमोठ्याने ओरडत होता... तुम्ही कोणीही वाचणार नाही. तो येणार. मला सोडा. मला पळून जायचं आहे. सोडा ..... मला सोडा....

भिकुचं ओरडणं वाढलं आणि अचानक अनघा त्याच्या अंगावर ओरडली.

भिकू; काय लावलं आहेस हे? का ओरडतो आहेस तू? कोणाला सैतान म्हणतो आहेस? ज्याने तुला खायला घातलं आणि आजवर पोसलं त्याला? लाज नाही वाटत? गप बस् एकदम.

अनघाचा आवाज ऐकून भिकू एकदम शांत झाला. त्याने अनघाकडे एकदा बघितलं आणि तो खाली जमिनीवर एकदम फतकल घालून बसला. तो बसताच हवालदार पुढे झाले आणि त्यांनी त्याला बांधायला सुरवात केली. त्यासरशी भिकूने एकदम उसळी मारली आणि परत एकदा ओरडला; तो येणार... तो येणार!!!

अचानक राठी पुढे झाले आणि त्यांनी भिकूच्या कानशिलात एक भडकावून दिली आणि एकदम मोठ्याने ओरडले;"गप बस् मूर्खां. कोण येणार? तो आनंद? तो मेला आहे कधीच. तुझ्या झोपड्यात नाही.... गाडीच्या अपघातात. तो आता कधीच येणार नाही आहे. समजलं? तेव्हा आता एकदम गप बस्."

राठींचं बोलणं ऐकलं आणि भिकूने एकदम दचकून मान वर करून राठींकडे बघितलं. त्याच्या त्या अवस्थेचा फायदा उठवत हवालदारांनी त्याला बांधून परत एकदा लॉक-अप मध्ये टाकलं.

राठींनी मागे वळून बघितलं तर अनघा एकदम शॉकमध्ये गेली होती. मनाली तिच्या जवळ जाऊन तिला आधार देत उभी होती. मंदार आणि नवीन देखील एकदम हबकले होते. त्या सगळ्यांना तिथेच बसवून राठींनी एक खुर्ची ओढून घेतली आणि बोलायला लागले.

हे बघा. मला तुमच्या पासून काहीही लपवून ठेवायचे नाही. त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टच सांगतो आहे. आनंदचा अपघात झाला आहे हायवे जवळ. आम्हाला ही माहिती एका गाडीवाल्याने दिली. त्याने तो अपघात बघितला आणि इथे पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगितलं. अपघाताबद्दल कळल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. गाडीत एकच व्यक्ती होती. चेहेरा बघताच तो ऍक्टर आनंद आहे हे आमच्या लक्षात आलं. गाडीत अजून काही बॅग्स आहेत हे बघितल्यावर इथेच लोणावळ्यात आनंद आणि त्याच्यासोबतचे लोक आले असतील असा कयास बांधून आम्ही चौकशी करत होतो. त्यावेळी या वाड्याबद्दल आणि आनंदच वाड्याचा मालक असल्याबद्दल कळल आणि आम्ही तिथे पोहोचलो. सगळी पोलीस कुमक येईपर्यंत मी झोपदीपर्यंत पोहोचलो आणि आत जे काही चालू आहे ते ऐकलं. त्यापुढे काय घडलं ते तुम्हाला माहीतच आहे.

तर मुख्य मुद्दा आता हा राहातो की झोपदीमधली ती डेड बॉडी कोणाची? कारण चेहेरा लांबून आणि त्या अपुऱ्या उजेडात आनंद सारखाच वाटला. अर्थात आता पोस्टमार्टेम मध्ये सगळं कळेलच." राठी पुढे देखील बोलणार होते पण अचानक भिकू जेलच्या गजांकडे आला आणि अनघाकडे बघत म्हणाला, ताई अपघात आनंदचा नाही झाला....

भिकूने असं म्हणताच हवालदार पवार पुढे झाला आणि गजांवर काठी आपटत म्हणाला;"ए भाड्या... गपतो का आता? आम्ही आमच्या डोळ्यांनी जे बघितलं आहे ते सांगतो आहोत. तू काय आता पोलिसांना खोटं ठरवणार का साल्या?" पवार अजून देखील काही बोलला असता पण त्याला थांबवत राठी म्हणाले;"तो आनंद नव्हता भिकू? मग तो कोण होता? तुला काय माहीत आहे? नीट बोलणार असलास तर आम्ही ऐकायला तयार आहोत."

भिकूने अनघाकडे बघितलं आणि म्हणाला;"ताई, मी का नाही बोलणार? सगळं सांगेन मी. पण तुम्ही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे.

ताई, गाडी मकरंद चालवत होता. मकरंद म्हणजे मालकांचा भाऊ. मोठ्या साहेबांचा मुलगा. पण तिच्यापासून झालेला.

पवारला अचानक उत्सुकता वाटली. त्याच्या मनात आलं मकरंद म्हणजे नक्की त्या ठेवलेल्या बाईचा मुलगा असणार. त्यामुळे त्याने न राहून विचारलं;"तिच्यापासून म्हणजे ती ठेवलेली होती तिच्यापासूनचा ना?"

भिकूने एकदा पावरकडे बघितलं आणि परत बोलायला लागला;

ताई, विश्वास ठेवा.... ठेवलेली होती ती मुंबईची. लग्न झालेली वाड्यावरची. मालकीणबाई खूप खूप सुंदर होत्या. अगदी शांत स्वभावाच्या. मनमिळावू. मोठ्या मालकांना त्यांच्या या रूपाची आणि स्वभावाची भिती होती. का कोण जाणे... पण होती. ते नेहेमी मालकीण बाईंना म्हणायचे की इतकी चांगली आहेस की खरी नाही वाटत तू. मालकीण बाईंनी लग्नानंतर त्यांच्या माहेराहून एक सोबतीण आणली होती. ती मालकांचं हे वाक्य नेहेमी ऐकायची. हळूहळू तिने मालकांच्या मनात विष कालवायला सुरुवात केली. मालकीण बाई चेटूक करतात; असं तिने त्यांच्या मनात भरून दिलं. कधीतरी मालकांनी मालकीण बाईंना मुंबईला नेणं सोडलं आणि हिलाच न्यायला लागले. ताई, मी वाड्यावरच मोठा झालो आहे. त्यामुळे खरी कोण आणि खोटी कोण मला माहीत आहे. या पवारला देखील विचारा. तो यायचा की लहानपणी मालकीण बाई गोळ्या वाटायच्या तेव्हा. पण जेव्हापासून ती जायला लागली मुंबईला आणि मालकीण बाई अडकल्या वाड्यात तेव्हापासून हे सगळं बंद झालं. वाड्याकडंचं वातावरणच बदलून गेलं.

त्यातच मालकीण बाईंना दिवस राहिले. त्या बाईने देखील मालकांकडून स्वतःला पोर करून घेतलं. दिवस जात होते. मालकीण बाईंचं मन खचत होतं. त्या त्यांच्या खोलीतून बाहेर पडत नव्हत्या. त्यांनी त्यांचं फिरणं दोन खोल्या आणि बाजूला असलेला मधला दरवाजा इतकंच करून टाकलं. पुढे पुढे तर त्यांनी मालकांना भेटणं बंद केलं. मालक त्यांच्या मोठ्या खोलीत राहायचे. ते अधून मधून मकरंदला घेऊन यायचे. मालक आले की मालकीण बाई आनंदला त्यांच्या खोल्यांमध्ये अडकवून ठेवायच्या. धाकट्या मालकांना ते आवडायचं नाही. त्यातूनच धाकटे मालक एककल्ली व्हायला लागले. हळूहळू ते क्रूर व्हायला लागले. अगदी लहान लहान वागण्यातून मी ते बघत होतो. कारण मालकांचा एकुलता एक सवंगडी मीच होतो. मालक फुलपाखरू पकडायचे आणि त्यांचे पाय कात्रीने कापून त्यांना सोडायचे. फुलपाखरं उडायची पण फुलावर बसताना कोसळायची. ते बघून धाकटे मालक मोठमोठ्याने हसायचे. धाकट्या मालकांचे खेळ असेच दुष्टपणाचे झाले होते. हे सगळं कधीतरी येणारा मकरंद बघायचा. त्यामुळे तो धाकट्या मालकांना आनंदला घाबरायचा.

अर्थात मालकीण बाई असल्याने धाकटे मालक मकरंदला काही करू शकत नसत. असेच दिवस जात होते. हळू हळू मोठ्या मालकांना खरी परिस्थिती लक्षात आली. त्यांना मालकीण बाईंची माफी मागायची होती. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मोठे मालक रोज मालकीण बाईंच्या खोलीच्या बाहेर येऊन बसायचे. ते काही बोलायचे नाहीत... आणि मालकीण बाई दार उघडायच्या नाहीत. मकरंद हे सगळं बघायचा. कधीतरी मकरंद यायचा थांबला आणि मालक मुंबईला जायचे थांबले.

धाकटे मालक हे सगळं बघत होते. त्यांनी नक्की काय केलं... कसं केलं माहीत नाही मला; पण मोठे मालक त्यांच्या खोलीतून मालकीण बाईंच्या खोलीपाशी रोज येतच राहिले. पुढे पुढे मोठ्या मालकांच्या डोळ्यात मला धाकट्या मालकांसाठी भिती दिसायला लागली होती. जर कधी मोठे मालक मालकीण बाईंच्या खोलीकडे यायला उशीर करायचे तर धाकटे मालक दिवाणखान्यात येऊन शीळ घालायचे....

ताई..... तुम्ही कोल्हेकुई ऐकलीत ना??? तीच शीळ शिकले होते धाकटे मालक. दिवस जात होते... अचानक कधीतरी मालकीण बाई बाहेर आल्या त्यांच्या खोलीतून आणि त्यांनी मालकांना मधला दरवाजा उघडून दिला. मोठे मालक त्यातून बाहेर पडले ते कधीच परत आले नाहीत. हळू हळू मालकीण बाई देखील झिजून झीजून गेल्या.

मी आणि धाकटे मालक उरलो फक्त. ताई.... तोपर्यंत मी धाकट्या मालकांच्या कह्यात गेलो होतो पुरता. घाबरायला लागलो होतो मी त्यांना. ते सांगतील ते सगळं ऐकायला लागलो होतो. त्यांनी मला वाड्यावर राहायला सांगितलं आणि ते माझ्या झोपड्यात राहायला गेले. मी दिवस दिवस वाड्याच्या बाहेर पडत नसे.

एकदिवस अचानक मकरंद आला वाड्यावर. त्याने दार उघडलं तर मी दिवणाजवळच पडलो होतो. त्याला बघितलं तर मला वाटलं धाकटे मालक आले. तो पुढे आला आणि माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला;"भिकू ना रे तू?"

मी मानेनेच होकार दिला. त्याबरोबर माझा हात धरत तो म्हणाला;"भिकू, मी देखील अडकलो आहे अचानकपणे यात. आई-बाबा गेले. मला मान्य आहे माझ्या आईच्या धोक्यामुळे त्याची आई हालहाल होऊन गेली. पण आता त्याचा सूड तो माझ्यावर घेतो आहे. भिकू... तो आता एकदम माझ्यासारखा दिसायला लागला आहे. हे कसं झालं माहीत नाही. पण तो आता मुंबईला येऊन मी जिथे जातो तिथे जायला लागला आहे. अरे त्याने तर माझ्या गर्ल फ्रेंडला देखील भेटायला सुरवात केली आहे. भिकू.... त्याच्या भितीने मी माझ्या स्वतःच्या घरात राहाणं सोडलं आहे.

पण आता मात्र पाणी डोक्यावरून जातं आहे. या लॉक डाउनच्या काळात तो अनघाला भेटला आणि त्याने तिला इथे आणलं आहे. तुला तर माहीतच आहे ते.

मी मान हलवत म्हणालो 'हो.. ताई एकदम चांगल्या आहेत. मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला. पण त्या या सगळ्यांपासून लांब असल्याने त्या माझ्याकडे बघत देखील नाहीत. किंवा त्यांना समजत देखील नाही मी काय म्हणतो ते.' मी असं म्हणताच मकरंदने मला मिठी मारली आणि रडत म्हणाला... भिकू सोडव रे मला याच्या जाळ्यातून. मला जिथे जाईन तिथे आता तोच दिसतो. मी वेडा व्हायला लागलो आहे. त्याचं अस्तित्व जाणवलं की मी माझा राहात नाही. हे म्हणजे कोणालाही सांगू शकत नाही असं दुःख आहे माझं.

मकरंद रडत होता... पण मी तरी काय करणार होतो? मी देखील त्याच्या जाळ्यातलं एक पाखरुच होतो नं. आणि मग एक दिवस तुम्ही सगळे आलात. धाकटे मालक फिरत होते सगळीकडून. पण तुम्ही सगळे आपल्याच नादात होतात. मकरंदला कळत होतं; पण तो काही करूच शकत नव्हता. मला त्याच्या थंड डोळ्यातली भिती दिसत होती. पण मी तरी काय करणार?

तुम्ही निघालात आणि धाकट्या मालकांनी मला झोपडीजवळ बोलावून घेतलं. त्यांनी मला वाड्यावर जाऊन तमाशा करायला सांगितलं आणि स्वतःला झोपडीत बंद करून घेतलं. मी वाड्यावर आलो. आपली झटापट झाली. त्यात मी बशुद्ध झालो. जेव्हा जाग आली तेव्हा मी झोपडीत होतो. माझा जीव घशापर्यंत आला. मी धपडत बाहेर आलो. तुम्ही सगळे निघायची तयारी करत होतात. काय झालं कोण जाणे... पण मी तुम्हाला सगळ्यांना एक एक करत झोपडीत आणून ठेवलं. मला खरंच तुम्हाला सगळ्यांना वाचवायचं होतं ताई.

त्यानंतर काय झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे."

भिकू बोलायचा थांबला आणि सगळेच एका स्वप्नातून जागे झाल्यासारखे झाले. राठींनी पावरकडे बघत विचारलं;"तो पोस्टमार्टेम रिपोर्ट कधी येणार पवार? त्याचं DNA आपण ज्याला आनंद म्हणायचो त्याच्याशी मॅच होतं आहे का बघितलं पाहिजे. अर्थात, कोण गाडीत होतं आणि कोण झोपडीत होतं कळणं अशक्य आहे. भिकू तू जे सांगतो आहेस त्याला तुझ्याकडे काही पुरावा असणं शक्यच नाही. त्यामुळे मी तुला असा सोडणार नाही आहे हे लक्षात घे."

त्यानंतर अनघा, मनाली, नवीन आणि मंदारकडे वळत राठी म्हणाले;"प्रायमाफेसी तुम्ही कोणीही काहीही केलेलं नाही हे सिद्ध होतं आहे. कारण भिकुचं सगळं मान्य करतो आहे. त्यामुळे तुमची सगळी माहिती द्या. त्यानंतर तुम्ही इथून निघालात तरी चालेल."

राठींचं बोलणं ऐकून पवार पुढे झाला. त्याने त्या चौघांनाही खूण केली आणि बाहेर नेलं. पवारने एकेकाला समोर बसवत त्याची सगळी माहिती लिहून घेतली.

अनघा, मनाली, नवीन आणि मंदार पोलीस स्टेशन बाहेर आले त्यावेळी चांगलंच उजाडलं होतं. अनघाचे डोळे रडून रडून सुजले होते. मनाली पूर्णपणे सुन्न झाली होती. मंदार आणि नवीन देखील फारच वाईट मनस्थितीत होते. चौघेही हळूहळू चालत थोडे पुढे गेले आणि समोरच एक टपरी दिसली तिथे एकमेकांना न सांगताच थांबले.

नविनने पुढे होऊन चहासाठी ऑर्डर दिली आणि तो मागे वळला. मंदारने खुणेने त्याला जवळ बोलावलं आणि बोलायला लागला....

हे बघा... जे काही झालं ते फारच वाईट होतं. असं काही असेल आणि आनंद... मकरंद... जो कोणी होता तो आपला मित्र होता की नव्हता त कळायला मार्ग नाही. मकरंदने आनंदचं नाव का घेतलं होतं? आनंद झोपडीत कसा गेला? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत... पण मला वाटतं आपण सगळ्यांनी याविषयी फार विचार न करता आपलं आयुष्य पुढे सुरू केलं पाहिजे. सर्वात जास्त अनघाला ते अवघड जाणार आहे. पण अनघा आम्ही तुझ्या सोबत आहोत; हे विसरू नकोस."

मंदार बोलत असताना चहा आला. तो सगळ्यांनी घेतला. नविननेच पुढे होत कोपऱ्यावर एका टॅक्सीला हात केला आणि चौघेही न बोलता टॅक्सीमध्ये बसून मुंबईच्या दिशेने निघाले. त्यांच्या मागावर असलेल्या पवारने पोलीस स्टेशनला येऊन ते चौघे गेल्याची माहिती राठींना दिली.

****

राठींनी भिकुला लॉक अप मधून बाहेर काढलं आणि समोर उभं केलं. त्याला एकदा वरपासून खालपर्यंत निरखून राठींनी पावरला हाक मारली आणि म्हणाले;"सोडून ये याला वाड्यावर. तो तिथेच चांगला." आणि मागे वळून ते केबिनमध्ये गेले.

पवारने भिकुला गाडीत बसवलं आणि गाडी वाड्याकडे वळवली.

भिकू गाडीतून उतरत असताना पवार म्हणाला;"बाकी सगळे सुटणार भिकू.... तुझं तू बघ. कारण जोपर्यंत तू अडकला आहेस; तोपर्यंत ते चौघे सेफ आहेत."

पवारने गाडी वळवली आणि निघून गेला.

वाड्याच्या दिशेने पाऊल उचलत भिकू म्हणाला;"धाकटे मालक.... तुम्ही आणि मी!!!!! आलो मी......"

समाप्त

कथा

प्रतिक्रिया

मास्टरमाईन्ड's picture

19 Feb 2021 - 11:21 pm | मास्टरमाईन्ड

गडबडीत संपवल्यासारखा वाटला.
बरेच प्रश्न अनुत्तरित राहिलेत असं वाटतंय.

नीलस्वप्निल's picture

20 Feb 2021 - 12:15 am | नीलस्वप्निल

गडबडीत संपवल्यासारखा वाटला.

तुषार काळभोर's picture

20 Feb 2021 - 10:04 am | तुषार काळभोर

:(

काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय. त्यामुळे गोष्ट संपल्याचं समाधान नाही मिळालं.

ज्योति अळवणी's picture

20 Feb 2021 - 11:36 am | ज्योति अळवणी

तर मला वाटायला लागलं होतं की वाचक कंटाळतील. म्हणून उरकली कथा. थोडं चुकलंच! अजूनही खुलवायची इच्छा होती

शाम भागवत's picture

20 Feb 2021 - 11:54 am | शाम भागवत

च्च् च्च्

ज्योति अळवणी's picture

20 Feb 2021 - 11:36 am | ज्योति अळवणी

तर मला वाटायला लागलं होतं की वाचक कंटाळतील. म्हणून उरकली कथा. थोडं चुकलंच! अजूनही खुलवायची इच्छा होती

शाम भागवत's picture

20 Feb 2021 - 11:55 am | शाम भागवत

अजूनही खुलवू शकता.
हा भाग अप्रकाशित करायला सांगा.
फक्त २११ वाचने झाली आहेत.

ज्योति अळवणी's picture

20 Feb 2021 - 1:07 pm | ज्योति अळवणी

मला वाटतं अनेकांची इच्छा आहे की कथा पूर्ण आहे असं वाटावं. त्यामुळे पुढे नक्की लिहिते आहे. हा भाग क्रमशः असं आपण म्हणू

तुषार काळभोर's picture

20 Feb 2021 - 1:51 pm | तुषार काळभोर

आवडेल.

शाम भागवत's picture

20 Feb 2021 - 2:23 pm | शाम भागवत

👌

नीलस्वप्निल's picture

20 Feb 2021 - 8:54 pm | नीलस्वप्निल

अस समजा कि हा भाग कुणी वाचलाच नाही. :)

राजाभाउ's picture

22 Feb 2021 - 12:51 pm | राजाभाउ

येस !!!

खरच, हा भाग काढुन टाका आणि पुन्हा नविन लिहा. पुढच्या शुक्रवारी नविन भागाची वाट पहाते.

ज्योति अळवणी's picture

22 Feb 2021 - 9:26 am | ज्योति अळवणी

तरीही खुलेलंच कथा. मला खात्री आहे