प्रवास (भाग 7)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
12 Feb 2021 - 11:19 pm

प्रवास

भाग 7

"काय वाटतं पवार... काय रहस्य असणार या वाड्याचं?" वाड्याच्या दिशेने निघाल्या नंतर राठींनी पावरला विचारलं.

पवार देखील तोच विचार करत होता. रस्त्यावरची नजर ढळू न देता तो बोलायला लागला;"साहेब, काही कळत नाही. तो आनंद एकटा आला नव्हता हे नक्की. त्याच्या गाडीतल्या सॅक्स वरूनच ते कळतं. त्यात गर्ल फ्रेंड असताना थर्टीफस्टला कोणी एकटं का येईल? पण पाच जण होते... म्हणजे एकटं जोडपं नाही. याचा अर्थ जोडप्यामध्ये होणारी भांडणं झालेली नाहीत. मग मित्र कोण होते? सिनेमावाले असतील की अजून कोणी? दिनू म्हणाला कोणीतरी मुलगी... याचा अर्थ आनंदची मैत्रीण सिनेमावाली नाही. नाहीतर दिनूने ओळखली असतीचं. जर मैत्रीण दुसरी कोणीतरी तर मग सोबत आलेले सगळे सिनेमावले नसणार. जर तसं असेल तर हे जुने मित्र-मैत्रिणी पूर्वी पण आले असतील कदाचित. दिनूला लक्षात आलं नसेल.... जुने मित्र म्हणजे जुन्या विषयांवर भांडणं असू शकतात न साहेब. त्यावरून त्या आनंदला मुद्दाम अपघात घडवला. आणि बाकी पळून गेले. असं तर नसेल न झालं?"

पावरचं बोलणं राठी शांतपणे ऐकत होते. त्याच्या खांद्यावर थोपटत ते म्हणाले;"पवार, आजकाल तुझी लिंक चांगली लागते आहे. पाच जण होते. त्यातला एक आनंद स्वतः... दुसरी त्याची गर्ल फ्रेंड. म्हणजे अजून तीन जण. सिनेमावले नाहीत हे तुझं लॉजिक देखील लागू होतं. जुने मित्र म्हणजे जुनी भांडणं हे पण बरोबर. पण अरे आनंदला मारण्याचा त्यांचा प्लॅन असेल तर स्वतःच्या बॅग्स त्याच गाडीत ते कसे सोडतील? त्यात त्याची गर्ल फ्रेंड देखील असणार. तीच जर मारण्याचा प्लॅन करणारी असेल तर गोष्ट वेगळी... पण जर तिचं खरं प्रेम वगैरे असेल आनंदवर तर ती विरोध करेलच न? सर्वात मुख्य मुद्दा हा की गाडीचा अपघात झाला आहे. याचा अर्थ आलेल्या लोकांनी मारलेl नाही आनंदला. पण काहीतरी गडबड नक्की आहे."

राठींचं बोलणं ऐकून पवारने मान डोलावली आणि म्हणाला;"बरोबर साहेब. पण मग जर अपघातच आहे तर मग पुढे काय?"

त्यावर पवारच्या डोक्यात टप्पल मारत राठी म्हणाले;"अरे भाड्या.... पाच सॅक्सचं कोडं आहे ना अजून!"

डोक्यावर चोळत पवार म्हणाला;"हा ते ही खरंच साहेब. आणि त्या निमित्ताने त्या रंभा उर्वशी बद्दल पण कळलंय न. ते देखील समजून घ्यावं लागेल न."

विचार करत राठी म्हणाले;"पवार, खरी गोम तिथेच आहे. ती रंभा... तो भिकू... तो मकरंद आणि आनंद..... यात खरं गौडबंगाल आहे. बरं मला एक सांग; हे इतकं मोठं प्रकरण आहे या गावातलं आणि तुला काहीच कसं माहीत नाही? साल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या खबरा तुला तुझ्या पणज्या पासूनच्या माहीत आणि इथली माहिती नाही असं होऊच शकत नाही."

एकदा राठी साहेबांकडे बघून परत नजर रस्त्याकडे वळवत पवार म्हणाला;"साहेब, सगळं माहीत आहे मला. पण दिन्या म्हणाला ते खरं आहे. त्या वाड्याबद्दल बोललं तरी आपल्या घरावर बालंट येतं असं माझी आई बोलायची. अर्थात आता मी तुम्हाला सगळं सांगितलंच असतं; पण दिन्या बोलत होता तर म्हंटलं त्याला काय ते सांगू दे; जर त्याच्याकडून काही राहिलं तर आपण सांगूच. पण साहेब त्याने जे सांगितलं मला देखील तितकंच माहीत आहे. मी पण विचार करायचो की आनंद आला की मकरंद का गायब होतो? आणि गायब होतोच तर तो कुठे जातो? एरवी कोणालाही उभा न करणारा तो भिकू आनंदला का घाबरतो? काहीतरी रहस्य आहे त्या वाड्याचं. चला आता या निमित्ताने कळणार आपल्याला."

राठींनी एकदा पवारकडे बघितलं आणि परत ते रस्त्याकडे बघायला लागले. वाडा फारसा दूर नसल्याने त्यांची गाडी लगेच पोहोचलीच. वाडा एकदम अंधारात होता. त्यामुळे आता काय करावं असा प्रश्न राठींना पडला. एक पिस्तुल आणि लाठी घेतलेला हवालदार इतक्या तयारीने जावं का वाड्याकडे असा प्रश्न पडला राठींना पडला होता. पवार देखील राठी साहेबांच्या मनातलं वाचल्या सारखं तेच म्हणाला;"साहेब, आपण दोघेच जायचं का? म्हणजे मी भीत नाही... पण पूर्ण अंधार आहे वाड्यावर. भिकू देखील वाड्यावर नसतो... त्याचं झोपडं कुठेतरी मागे आहे असं म्हणतात. पण मला ते देखील माहीत नाही."

थोडा विचार करून राठी म्हणाले;"परत जाऊ पवार आणि सगळ्यांना घेऊनच येऊ." पवारने मान डोलावली आणि गाडी चालू करून यु टर्न घेतला. पवार गाडी पुढे काढणार एवढ्यात राठींना बाजूच्या झाडीमधून कोणीतरी पळत असताना दिसलं आणि पवारच्या लक्षात यायच्या अगोदरच राठी गाडीतून उतरून त्या व्यक्तीच्या आज धावले होते.

गाडी बंद करून गाडीला वळसा घालून त्या झाडीपर्यंत पवार पोहचला तोपर्यंत राठी दिसेनासे झाले होते. पवार देखील झाडीत शिरणार होता. पण तो थबकला. त्याच्या मानत विचार आला की साहेब निदान रिव्हॉल्वर घेऊन आहेत. आपल्याकडे काहीच नाही. त्यात साहेबांनी काहीतरी बघितलंय. आपल्याला तर माहीत देखील नाही कशाच्या मागे धावायचं आहे. तेव्हा शहाणपणा यात आहे की लगेच कुमक मागवून सगळ्यांच्या सोबत या रानात शिरावं. हा विचार मनात येताच पवार मागे वळला आणि त्याने मोबाईल हातात घेतला. गाडीत बसत त्याने पोलीस स्टेशनवर फोन लावला. नीट रेंज नसल्याने फोन कोणी उचलला आहे ते पवारला कळेना. तो ओरडून ओरडून सांगायला लागला...

अरे मी आणि राठी साहेब भूतिया वाड्याकडे आहोत. हो हो... भूतिया वाड्याबद्दलच बोलतो आहे रे. आं... काय बोलतो आहेस तू ते कळत नाही. तुझं सोड. सगळी कुमक घेऊन या इथे तांबडतोप. राठी साहेब गायब झालेत. अबे.... तुला जे सांगतो आहे ते कर. हो! सगळे या... लगेच! मी इथेच थांबतो आहे. साल्या मला नको अक्कल शिकवूस. गाडीजवळ आहे मी. या लवकर."

असं म्हणून पवारने फोन बंद केला. परत एकदा गाडीतून उतरावं असा विचार पवारच्या मनात आला. पण अचानक त्याला कोल्हेकुई ऐकू यायला लागली. थोडं नीट लक्ष दिल्यावर गाडीच्या मागून आवाज जवळ येतो आहे असा भास झाला पवारला. त्याला एकदम जोराची लागली आणि काहीही विचार करायच्या अगोदर त्याने गाडी चालू करून फुल्ल स्पीडमध्ये तिथून पळ काढला. पवारची गाडी गेली आणि कोल्हेकुई बंद झाली.

राठी.............. कोणाला बघून धावले होते राठी? कोल्हेकुई कुठून सुरू झाली होती अचानक? गाडी पुढच्या वळणावर थांबवून पवार विचार करत होता. आता परत एकदा एकट्याने मागे वाड्यावर जायची त्याची हिम्मत नव्हती. त्यामुळे इतर सगळे येइपर्यंत तिथेच थांबायचा निर्णय त्याने घेतला. त्याच्या अंदाज बरोबर होता. पोलीस स्टेशनमधले सगळेच दोन तीन जिप्स काढून निघाले आणि त्याच्या गाडीजवळ येऊन थांबले. त्यांना बघताच पवारच्या जीवात जीव आला आणि दोघा-तिघांना स्वतःच्या गाडीत घेत त्याने सगळ्यांना खूण केली आणि गाडी परत वाड्याकडे वळवली.

आता पोलिसांचा मोठा सायरन वाजवत जास्तीचे फ्लड लाईट्स लावलेल्या सगळ्या गाड्या वाड्याकडे पोहोचल्या आणि.....

गाड्यांच्या समोरच राठी साहेब दोन मुली आणि दोन मुलांसोबत उभे होते. बाजूलाच आडदांड भिकू जमिनीवर बसला होता.

तो प्रकार बघून पवार गोंधळून गेला. गाडीतून उतरत तो राठींकडे धावला आणि त्यांच्या पायावर लोळण घेत म्हणाला;"साहेब... मला माफ करा साहेब. मी तुमच्या मागे येणारच होतो. पण... साहेब... कबूल करतो... मी खूप घाबरलो. एकतर हा वाडा... कधी चांगलं नाही ऐकलं या वाड्याबद्दल. त्यात इतका अंधार... तुम्ही दिसतसुद्धा नव्हता... एक लाठी घेऊन मी कुठे शिरणार होतो त्या रानात. म्हणून मी आपल्या लोकांना बोलावलं आणि आता तुमच्या मागावरच येणार होतो. साहेब.... " पवार रडत होता आणि राठींचे पाय सोडत नव्हता.

त्याला खांद्याला धरून उठवत राठी म्हणाले;"पवार, अरे... आवर स्वतःला. माझं काहीही म्हणणं नाही. मी खरंच समजू शकतो. अरे तुला कल्पना न देताच मी गाडीबाहेर पडलो आणि पळालो. तुला काही कळायच्या आत सगळं घडलं होतं. तू योग्यच केलं आहेस. तुझ्याकडे कोणताही दोष जात नाही. त्यामुळे हे रडणं आवर आणि या पोरांना गाडीत घालून गाडी स्टेशनकडे घे. भिकुला देखील सोबत घे.... दुसऱ्या गाडीतून." अस म्हणून राठी सब इन्स्पेक्टरकडे वळले आणि म्हणाले;"हे बघ दिघे, मी पोलीस स्टेशनकडे जातो आहे. तू वाड्याची पूर्ण तलाशी घे. प्रत्येक कोपरा नीट बघ तू स्वतः आणि आता नीट ऐक! वाड्याच्या मागल्या अंगाला विहिरीच्या बाजूने पुढे गेलास की भिकुचं झोपडं आहे. तिथे एक डेड बॉडी आहे. ती पोस्टमार्टेमला पाठवायची सोय कर. आणि मगच पोलीस स्टेशनकडे ये."

त्या पोरांना गाडीमध्ये बसवत असलेल्या पवारने राठी साहेबांचं शेवटचं वाक्य ऐकलं आणि तो एकदम गर्रकन वळला. "साहेब? डेड बॉडी? कोणाची? या भिक्याच्या झोपड्यात? कोणाला मारलं आहे या राक्षसाने?"

एकदा भिकुकडे बघून मग पवारकडे बघत राठी म्हणाले;"पवार स्टेशनकडे घे गाडी. सगळं कळेल तुला."

एकदा भिकुकडे बघून मग मान हलवत पवारने त्या पोरांना गाडीत बसवलं. अजून दोन हवालदार देखील गाडीत बसले. बाकी सगळे वाड्याच्या दिशेने गेले. पवारने गाडी चालू केली आणि पोलीस स्टेशनच्या दिशेने वळवली.

पवारच्या मनात अनेक प्रश्न होते; पण आत्ता काहीही बोलणं योग्य नाही हे माहीत असल्याने तो शांतपणे पण जितक्या फास्ट जमेल तितक्या फास्ट गाडी पोलीस स्टेशनकडे पळवत होता. गाडीमध्ये एक विचित्र शांतता होती.

अनघा-मनाली-नवीन आणि मंदार!!! चौघेही एकमेकांकडे बघत अस्वस्थपणे गाडीमध्ये बसले होते.

राठींची नजर रस्त्यावर स्थिरावली होती. पण त्यांच्या मनात नुकतेच घडलेले प्रसंग एखाद्या सिनेमप्रमाणे झरझर जात होते.....

***

हालचाल जाणवल्यामुळे गाडीतून झटकन उतरून राठी झाडीकडे धावले होते. जी कोणी व्यक्ती होती ती भलतीच वेगात धावत होती. पण राठींनी त्याची पाठ सोडली नाही. एका क्षणी मात्र समोर कोणीही नव्हते आणि अचानक राठींना समोर एक झोपडं दिसलं. अर्थात तिथे झोपड्यासारखं काहीतरी आहे; हे लक्षात आलं तेच मुळी आतमधल्या मिणमिणत्या दिव्यामुळे. राठींनी क्षणभर थांबून एक दीर्घ श्वास घेतला आणि धपापणारी छाती शांत करून ते सावकाश त्या झोपड्याकडे गेले. राठींना आतून बोलण्याचे आवाज येत होते....

"माझ्यावर विश्वास ठेवा पोरांनो... तुम्हाला वाचवलं आहे मी त्याच्या विळख्यातून. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचं काही खरं नाही. तुम्ही कुठेही पळा... तो येणार तुमच्या मागावर. माणूस नाही समंध आहे तो. अरे माझ्यासारखा माणूस जर त्याला घाबरतो तर त्याच्यात काहीतरी असेल न? अरे.... तुम्हाला वाचवलं आहे मी त्याच्यापासून. कसं कळत नाही तुम्हाला?"

कोण बोलत होतं ते राठींना कळलं नाही. पण त्याचं सांगणं पोटतिडकीचं होतं हे जाणवत होतं. राठी पुढे जाणार होते इतक्यात एका मुलीचा आवाज आला त्यांना आणि ते थबकले.

"भिकू.... काय बोलतो आहेस तू? तुझे मालक ना ते? अरे तुला राहायला छत दिलं... तुझं लग्न लावून दिलं... त्यांच्या जीवावर जगतो आहेस आणि असं काहीतरी बोलतो आहेस? बरं तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा आम्ही? हे असं बांधून ठेवलं आहेस आम्हाला. यांच्या सगळ्यांच्या तोंडात बोळे कोंबले आहेस. मला काय ते बोलू देतो आहेस....."

"अनघा ताई.... तो येणार! नक्की येणार.... यांना बांधलं आहे ते त्यांच्या भल्यासाठी. नाहीतर ते धावत सुटतील आणि त्याच्या हातात आयते पडतील. अनघा ताई मला समजून घ्या. तुमच्यासाठीच सांगतो आहे मी."

"भिकू... अरे हे काय अचानक लावलं आहेस तू? तो जर असा कोणीतरी भयंकर आहे तर मला कधीच कसं कळलं नाही? अरे त्याच्या सोबतच आहे मी गेले अनेक महिने. मुख्य म्हणजे तो जर असा कोणीतरी आहे तर तू मला याअगोदर कधीच कसं काही बोलला नाहीस?"

"ताई... कितीतरी प्रयत्न केले मी तुम्हाला सांगायचे. पण तो तुम्हाला एकटं सोडायचा नाही आणि तुम्ही त्याची पाठ सोडायचा नाहीत."

"भिकू.... अरे असं काय केलंय त्याने? बरं त्याने जे केलं ते केलं... तू हे असं आम्हाला बांधून काय मिळवतो आहेस? सोडव रे आम्हाला."

"ताई.... ताई.... अहो माझ्यासारखा धटिंगण त्याला बघून गोगलगाय होतो यात सगळं नाही का आलं? अहो... तो समोर असला की माझं काय होतं तुम्ही पाहिलं आहात ना? तरीही तुम्ही असं विचारता आहात?"

"भिकू... मला कायम वाटत आलं की तुला तुझ्या मालकांबद्दल इतका आदर आहे की त्यांच्या समोर तू नजर देखील वर उचलत नाहीस."

"ताई... तो काय विचार करतो सांगता येत नाही. तो भयंकर आहे. तुम्हाला मी कधीपासून सांगतो आहे... माझ्यावर विश्वास ठेवा."

"भिकू आधी माझ्या या मित्रांना आणि मैत्रिणीला सोडव बघू. माझे बांधलेले हात देखील सोडव. अरे अंग आंबून गेलं आहे आमचं. कसं कळत नाही तुला? मी शब्द देते आम्ही कुठेही पळून जाणार नाही किंवा काहीही करणार नाही. सोडव रे आम्हाला. प्लीज."

त्या मुलीचा आवाज खूपच आर्जवी होता. आतल्या बोलण्यावरून राठींच्या लक्षात आलं की आत दोन मुली आणि कदाचित दोनपेक्षा जास्त मुलगे आहेत आणि मुख्य म्हणजे तो भिकू आहे. ही मुलं बांधलेली आहेत आणि सगळ्या नाड्या त्या भिकूच्या हातात आहेत. एकूण आतला प्रकार लक्षात आला आणि राठींनी क्षणात निर्णय घेतला.

झोपड्याचा तकलादू दरवाजा धाडकन लाथेने उघडत राठी हातातले पिस्तुल भिकुवर रोखत झोपड्यात शिरले.

अचानक झालेल्या या प्रकाराने भिकू एकदम हबकून गेला. तो मागे मागे जात भिंतीवर आदळला आणि तसाच खाली बसला. राठींनी त्याच्याकडे पिस्तुल रोखून धरत समोर असलेल्या मुलीचे हात सोडवले. हात सुटताच तिने स्वतःचे पाय सोडवून घेतले आणि ती बाजूच्या तिच्या मैत्रिणीकडे धावली. दुसरी मुलगी बंधनातून सुटताच त्या दोघींनी बाजूला असलेल्या दोन्ही मुलांचे हात पाय सोडवले. हे सगळं होत असताना राठी भिकुवर पिस्तुल रोखून उभे होते. चारही मुलं सुटलेली बघितल्यावर राठी म्हणाले;"तुम्ही नक्की कोण आहात मला माहीत नाही. पण माझ्या मताप्रमाणे तुम्ही आनंदचे मित्र आहात."

राठींचं बोलणं ऐकून चौघांनीही मान डोलावली. त्यातला एक मुलगा पुढे झाला आणि म्हणाला;"साहेब, गेले काही तास आम्ही इथे असे बांधलेल्या अवस्थेत आहोत. या भिकूने आम्हाला एकएक करत इथे आणून बांधून ठेवलं आहे. अर्थात त्याने असं का केलं आहे ते त्याचं त्यालाच माहीत. कारण आम्हाला तर बोलूच दिलं नाही त्याने. ही अनघा तेवढी बोलत होती त्याच्याशी. खरं तर आम्ही आज परत जाणार होतो मुंबईला. पण हे सगळं काहीतरीच घडून बसलं आहे."

तो मुलगा अजूनही काहीतरी बोलणार होता तेवढ्यात भिकू उभा राहायचा प्रयत्न करत म्हणाला;"तो तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. त्याला तुमचा संशय आलाय. तो मारणार तुम्हाला...." भिकुचा आवाज चढायला लागला तसा राठींनी पिस्तूलाचा मागचा चाप ओढला आणि पिस्तुल झाडायला तयार झाले. हे बघताच अनघा मध्ये पडत म्हणाली;"इन्स्पेक्टर साहेब तो फक्त दिसायला आडदांड आहे. तो काहीही करणार नाही. नाही ना रे भिकू तू काही करणार?" त्यावर तिच्याकडे बघत भिकू म्हणाला;"मी कशाला काही करायला पाहिजे. तो येणार म्हणजे येणार!"

त्याचं ते असंबंध बोलणं ऐकून राठी वैतागले. हे लक्षात येऊन परत एकदा मध्ये पडत अनघा म्हणाली;"इन्स्पेक्टर साहेब, हवं तर आपण याला बांधू. पण कृपा करून गोळी नका चालवू. तो खरंच काही करणार नाही." असं म्हणत ती तिच्या मित्रांकडे वळली आणि म्हणाली;"नवीन-मंदार मला मदत करा. आपण भिकुला बंधुया." असं म्हणून ती भिकुकडे वळत म्हणाली;"भिकू त्रास न देता तू बांधून घे स्वतःला. ते तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी देखील चांगलं आहे. तुला जे काही सांगायचं आहे ते सांग. तुझं तोंड कोणीही बांधत नाही आहे. पण तुझ्याकडे बघून तुला आवरता येईल असं वाटत नाही. त्यामुळे तुला बांधणं आवश्यक आहे."

अनघाचं बोलणं ऐकून भिकूने मान हलवली आणि नवीन-मंदारने भिकुला बांधलं. त्याला बंधताक्षणी मनालीने तोंड उघडलं आणि म्हणाली;"इन्स्पेक्टर साहेब, हा माणूस वेडा आहे. याने आम्हाला सगळ्यांना अचानक झाडीत खेचून बांधून या झोपड्यात आणून टाकलं. आमचा मित्र आनंद.... तो आम्हाला शोधत असेल. हा राक्षस मात्र आम्हाला इथून हलू देत नव्हता. आम्हाला बांधून तोंडात बोळे घालून ठेवलं होतं... का तर म्हणे आम्हाला आनंदपासून वाचवायला. अहो... हा धटिंगण आमच्यावर चालून आला होता आज दुपारी. आम्ही चौघेही एकत्र होतो म्हणून स्वतःला कसतरी वाचवू शकलो. त्या हाणामारीत तो बेशुद्ध पडला तेव्हा त्याला घेऊन आम्ही इथे आलो.... तर.... तर.... साहेब, इथे आनंदला बांधून ठेवलं होतं याने. आम्ही सोडवलं आनंदला.... आता हा म्हणतो आहे की ज्या आनंदला याने बांधून ठेवलं होतं तोच आम्हाला मारायचा प्लॅन करतो आहे. कसा विश्वास ठेवणार आम्ही याच्यावर?"

राठींनी तिचं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि मग प्रश्नार्थक नजरेने अनघाकडे बघितलं. अनघाच्या लक्षात आलं की इन्स्पेक्टरला काहीही कळलेलं नाही. त्यामुळे तिने मनालीला शांत करत बोलायला सुरवात केली;

"इन्स्पेक्टर साहेब, आम्ही पाच जण... म्हणजे मी... अनघा, ही मनाली, नवीन, मंदार आणि आमचा मित्र आनंद... जो या समोरच्या वाड्याचा मालक आहे... आम्ही जुने कॉलेजचे मित्र-मैत्रिणी आहोत. आम्ही इथे थर्टीफस्टसाठी आलो होतो. इथे आल्यापासूनच काही ना काही विचित्र घटना घडत होत्या. त्यामुळे आम्ही तसे सगळेच मनातून धास्तावलेले आणि अस्वस्थ होतो. आम्ही आज परत निघणार होतो...

दुपारी आमचा मित्र आनंद आमच्यासाठी जेवण आणायला गेला असताना अचानक हा भिकू वाड्यावर आला आणि त्याने आमच्यावर हल्ला केला. खरं तर हा दिसायला तसा धटिंगण असला तरी असा अचानक कधीच कोणावरही जात नाही. मला हे माहीत आहे कारण मी आनंद बरोबर या वाड्यावर याअगोदर देखील आले आहे. फक्त मी आणि आनंद असे इथे एखाद-दोन दिवस राहिले देखील आहोत. त्यावेळी हा भिकुच सगळं करायचा आमच्यासाठी.... पण हे देखील खरं की याने आमच्यावर हल्ला केला आज दुपारी. आम्ही सेल्फ डिफेन्समध्ये त्याच्यावर उलट हल्ला केला. त्यात तो बेशुद्ध पडला. त्याला घेऊन आम्ही इथे आलो त्याच्या झोपड्यात. तर आमच्यासाठी जेवण घ्यायला गेलेला आनंद इथे बांधून पडलेला दिसला आम्हाला. आम्ही पूर्ण चक्रावले होतो. भिकू बेशुद्ध होता. आम्ही आनंदला सोडवला. त्याने आम्हाला सांगितलं की भिकूने त्याला गाडीतून खेचून आणून इथे बांधून ठेवलं होतं. आम्हाला ते खरंच वाटलं. मग आनंदच्या सांगण्यावरून आम्ही भिकुला बेशुद्ध अवस्थेतच बांधून ठेवलं आणि लगेच वाडा सोडायचं ठरवलं.

त्याप्रमाणे आम्ही आमच्या बॅग्स भरून गाडीजवळ पोहोचलो. पण आम्हाला एकएक करत झाडीत ओढून घेत भिकूने इथे आणून बांधून ठेवलं. इथे आणल्यापासून हा एकच सांगतो आहे की त्याचा मालक एक दुष्ट माणूस आहे आणि तो आम्हाला चौघांनाही मारून टाकणार आहे. त्याच्यापासून वाचवायला त्याने आम्हाला इथे आणून ठेवलं आहे. मी त्याला अनेकदा समजावलं की आनंद असं काहीही करणार नाही. पण हा ऐकायलाच तयार नाही.

मला तर हे कळत नव्हतं की आम्ही गाडीजवळ नाही हे लक्षात आल्यानंतर आनंद अजूनही इथे कसा आलेला नाही? पण आता तुम्हाला बघितल्यावर लक्षात आलं की तो पोलिसांची मदत घ्यायला गेला होता. तुम्हाला इथली परिस्थिती समजावून घेऊन आला आहे ना तो? पण मग तो नाही का आला तुमच्या सोबत ही झोपडी दाखवायला?"

राठी अनघाचं बोलणं शांतपणे ऐकत होते. अजूनही त्यांचं पिस्तुल त्यांनी भिकुवर रोखलेलं होतं. अनघाच्या शेवटच्या प्रश्नाने त्यांची नजर थंड झाली. तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता ते म्हणाले;"हे पहा... आपण सगळे अगोदर इथून बाहेर पडुया. माझी पोलिस कुमक येईलच काही क्षणात. आपण पोलीस स्टेशनवर जाऊ आणि मग सगळं नीट बोलूया. ठीक?"

राठींचं बोलणं ऐकून भिकू उभा राहिला आणि म्हणाला;"तो मारणार यांना... तुम्हालासुद्धा.... मी म्हणतो ना तो मारणार!!! आता तर मी पण मरणार. तुम्ही आलात ना म्हणजे त्याला कळलं मी काय करतो आहे. आता आपण सगळे मरणार."

भिकुचं बोलणं ऐकून मंदार एकदम वैतागला आणि त्याच्यावर ओरडला;"ए राक्षसा गप बस्. तू आनंदला बांधून ठेवलं होतंस. जे काही केलं आहेस ते तू केलं आहेस. त्यात त्याचा काही दोष नाही. आम्हाला देखील तूच बांधून ठेवलंस आणि आळ त्याच्यावर घेतो आहेस. शेवटी त्यानेच या इन्स्पेक्टर साहेबांना पाठवलं आहे आमच्यासाठी. आनंद थोडा विचित्र वागत होता गेले दोन दिवस हे मान्य करतो मी. पण म्हणून तो आम्हाला मारेल असं मला वाटत नाही."

नवीन देखील राठींकडे वळला आणि म्हणाला;"साहेब, आनंद कुठे आहे? त्याने जर तुम्हाला पाठवलं आहे तर मग तो कुठे आहे?"

राठींनी एकदा सर्वांवरून नजर फिरवली आणि म्हणाले;"चला आपण इथून बाहेर पडुया अगोदर. मग तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या."

यावर सर्वांनीच मान डोलावली आणि सगळे बाहेर पडायला लागले. राठींनी एकदा झोपड्यावर नजर फिरवली. त्यांच्या लक्षात आलं की झोपडीला अजून एक खोली आहे. बाहेर पडण्याअगोदर एकदा आतल्या खोलीत डोकावावं असं त्यांच्या मनात आलं आणि ते आतल्या खोलीमध्ये गेले. आत मिणमिणत्या दिव्यामध्ये एका बाजूला घोंगडीवर कोणीतरी होतं. ते पाहाताच राठींनी परत एकदा त्यांची पिस्तुल त्या व्यक्तीवर रोखली आणि ते मोठ्याने म्हणाले;"हे इथे कोण झोपलं आहे ते तुमच्यापैकी कोणाला माहीत आहे का?"

इन्स्पेक्टरच्या आवाजाने बाहेर पडणारे सगळेच मागे वळले आणि आतल्या खोलीत दाखल झाले. थोडं पुढे होत मंदारने घोंगड्यावरच्या व्यक्तीकडे निरखून बघितलं आणि तो धडपडत मागे सरकला. त्याच्या चेहेऱ्याकडे बघून नविनच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. तो पुढे झाला आणि त्याने देखील झोपलेल्या व्यक्तीकडे बघितलं....

घोंगड्यावर आनंद होता!!!! आनंद??? नवीन सोबत अनघा आणि मनाली देखील पुढे सरकल्या होत्या. तिथे आनंदला बघून त्या दोघीही एकदम किंचाळल्या. हात-पाय बांधलेल्या अवस्थेतील बाहेरच्या खोलीतला भिकू पुटपुटत होता...

"तो मारणार सगळ्यांना!!! तुम्हाला आणि मला देखील."

परिस्थिती हाताबाहेर जाते आहे हे लक्षात येऊन राठींनी चौघांनाही त्या खोलीतून बाहेर आणलं आणि म्हणाले;"हे बघा.... तो आनंद नाही. तो जो कोणी आहे... तो जिवंत देखील नाही. त्यामुळे आता आपण सगळे इथून अगोदर बाहेर पडू आणि मग काय करायचं ते मी बघतो."

अनघा, मनाली, नवीन आणि मंदार चौघांच्याही शरीरातले प्राण आता संपले होते. त्यामुळे राठी जे म्हणतील ते ऐकण्यापलीकडे त्यांना काही सुचणे शक्य नव्हते.

सगळे बाहेर आले आणि वाड्याच्या पुढच्या बाजूला पोहोचले. त्याचवेळी पवार देखील सगळ्यांना घेऊन पोहोचला होता.

राठींनी भूतकाळातून बाहेर येत परत एकदा रस्त्यावर नजर वळवली. गाडी पोलीस स्टेशनमध्ये शिरत होती.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

नीलस्वप्निल's picture

12 Feb 2021 - 11:54 pm | नीलस्वप्निल

हा भाग पण छान... पण पट्कन सम्पल्या सारखा वाटला

सुसदा's picture

13 Feb 2021 - 4:13 am | सुसदा

नेहमी प्रमाणे हा ही भाग खिळवून ठेवणारा.

तुषार काळभोर's picture

13 Feb 2021 - 1:46 pm | तुषार काळभोर

दुष्ट दुष्ट लेखिका!

मास्टरमाईन्ड's picture

13 Feb 2021 - 8:04 pm | मास्टरमाईन्ड

पण छोटा का वाटला?
कदाचित उत्कंठावर्धक असल्यानं असेल.
कमीत कमी दोन भाग तरी अजून असतील नां?

मनस्विता's picture

13 Feb 2021 - 8:10 pm | मनस्विता

भारी चाललंय कथानक! आत्तापर्यंतचे सगळे भाग वाचले आहेत. आता परत पुढील भागासाठी अजून एका आठवड्याची वाट बघणे नको वाटत आहे.

राजाभाउ's picture

15 Feb 2021 - 2:12 pm | राजाभाउ

आयला हे नविनच वळण. हे इकड होते तर गाडीत कोण बसल होत ? झोपडीत कोण होत आनंद की मकरंद ? सगळ शेवटी जुळवून आणायला अवघड पडणारे हां

ज्योति अळवणी's picture

16 Feb 2021 - 11:58 pm | ज्योति अळवणी

अवघड तर नक्कीच आहे.

पण जमेल असं वाटतंय. नाहीतर अगदीच फसू शकतो हा प्रयत्न. बघू माझी लेखणी काय म्हणते