भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण १२ - दैनंदिन व्यावहारिक जीवन

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
16 Jun 2020 - 5:25 pm

या प्रकरणात अध्यात्मिक साधकांच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनाविषयीचे भगवान रमण महर्षींचे मार्गदर्शन आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:

हिंदू परंपरेत अध्यात्मिक साधकांसाठी आश्रम व्यवस्थेची महती सांगितली गेलेली आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमांवर आधारित असलेल्या आश्रम व्यवस्थेतून जनमानसात एक समज रूढ होत गेला; की अध्यात्मिक साधक/ साधिका गांभिर्याने आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला/ तिला प्रापंचिक जीवनाचा त्याग करून ध्यानधारणेकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी कठोर ब्रह्मचर्याचे पालन करावे लागणारे, विरक्त, खडतर आणि तप:पूत जीवनच व्यतित करावे लागेल. रमणाश्रमाला भेट देणारे अभ्यागत महर्षींना नेहेमी या अनुषंगाने प्रश्न विचारत असत. महर्षीं त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आश्रम व्यवस्थेचे समर्थन करण्यासाठी ठामपणे नकारच देत असत.

आपल्या भक्तांना व्यावहारिक जीवनशैलीचा त्याग करून किंवा प्रापंचिक जबाबदार्‍यांना तिलांजली देत व्रतस्थ जीवन व्यतित करण्याची परवानगी महर्षींकडून कधीच मिळत नसे. लौकिक दृष्ट्या कुठल्याही परिस्थितीत असलेल्या साधकांसाठी आत्मसाक्षात्कार तितक्याच सुलभतेने साध्य होण्याजोगा आहे असे ते ठामपणे आणि सातत्याने साधकांच्या मनावर बिंबवत असत. महर्षी त्यांच्या अनुयायांना नेहेमी असा उपदेश देत असत की आपले कर्तव्य तत्परतेने पार पाडत असताना किंवा नित्य नैमित्तिक कर्मे करताना प्रारब्धानुसार देहाद्वारे ती घडत आहेत; मात्र त्यांचे कर्तृत्व ओढवून घेणारा किंवा त्यांची जबाबदारी स्वीकारणारा व्यक्तिगत 'मी' अस्तित्वात नाही असे सजग भान जागृत ठेवण्याने जो अध्यात्मिक लाभ होईल, तो प्रापंचिक जीवनाचा त्याग केल्याने किंवा नाहक देह कष्टवण्याने कधीच मिळणार नाही.

अध्यात्मिक प्रगती साधण्याच्या दृष्टीने मनाची प्रवृत्ती सर्वाधिक महत्वाची असून स्थळ, काळ किंवा परिस्थिती या तुलनेने गौण गोष्टी आहेत असे महर्षी ठामपणे सांगत असत. नोकरी व्यवसायात किंवा स्थळ, काळ आणि परिस्थितीत बदल केल्याने आपली अध्यात्मिक प्रगती होईल असे कुणी सुचवले तर महर्षींना ते मान्य होत नसे. या बाबतीत किरकोळ बदल करण्यासाठी परवानगी देताना देखील ते सहजासहजी राजी होत नसत. दैनंदिन आचरणाचा विचार केला तर आहाराविषयक सवयीत सुधारणा करणे या एकमेव बदलाला मात्र महर्षी नेहेमी अनुमोदन देत असत. आपण ग्रहण केलेल्या अन्नाचा मनात उद्भवणार्‍या विचारांवर गुणात्मक तसेच संख्यात्मक परिणाम परिणाम होतो हा हिंदू धर्मात महत्वाचा मानला गेलेला सिद्धांत महर्षींना मान्य होता. (सात्विक अन्नग्रहण केल्याने चित्तशुद्धी होते. मन आणि बुद्धी सुसंवादी झाल्याने स्थैर्य, समाधान आणि आनंद अनुभवता येतो. राजस अन्नग्रहण केल्याने चंचलपणा वाढतो. मन अति सक्रिय झाल्याने तसेच मनाची सतत चलबिचल झाल्याने चित्ताचा क्षोभ होतो. तामसिक अन्नग्रहण केल्याने चित्ताचे मालिन्य, बेदरकारपणा तसेच अमानुष वृत्ती अशा दुर्गुणांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळॅ सारासार विचार करण्याची तसेच योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी होते). कुठलीही अध्यात्मिक साधना करताना शाकाहारी अन्नाचे संयत प्रमाणात सेवन करणे अत्यंत लाभदायक आहे असे महर्षी सुचवत असत.

प्रश्नः नोकरीचा राजीनामा द्यावा आणि सतत श्री भगवानांच्या सान्निध्यात रहावे अशी प्रबळ ईच्छा मला नेहेमी होत असते.
रमण महर्षी: भगवान सतत तुमच्या सोबतच आहेत. ते तुमच्या अंतर्यामीच आहेत. खरे सांगायचे तर तुम्ही स्वत:च भगवान आहात. हा साक्षात्कार होण्यासाठी नोकरीचा राजीनामा देण्याची किंवा घरदार सोडून पळून जाण्याची मुळीच गरज नाही. वैराग्य या संकल्पनेचा अर्थ घर सोडणे, प्रापंचिक नात्यांना तिलांजली देणे किंवा वरपांगी वस्त्रप्रावरणांमधे बदल करणे असा होत नाही. माया, ममत्व आणि वासनांचा त्याग केल्यानेच अंगी खरेखुरे वैराग्य बाणवता येते. जी ईश्वरी सत्ता सगळ्या जगाचा भार वाहते, तुम्ही स्वतःला तिच्या स्वाधीन केलेत, तर नोकरीचा राजीनामा देण्याची तुम्हाला गरजच वाटणार नाही. वासनांचा त्याग केलेली व्यक्ती खरोखरच विश्वात्मक देवाशी इतकी समरस होऊन जाते, की सगळ्या अस्तित्वाला आपल्या कवेत घेईल इतका तिच्या प्रेमाचा परिघ व्यापक होतो. देवाच्या निस्सीम भक्ताचे वर्णन करताना तो विरक्त, त्यागी किंवा साक्षीभावाने राहणारा आहे या सारख्या रूक्ष संकल्पना थिट्या पडतात. ज्याच्या/ जिच्या प्रेमभावनेचा आणि करूणेचा जगाला व्यापून दशांगुळे उरेल इतका विस्तार झालेला असतो तोच खरा ईश्वर भक्त ही संकल्पनाच अधिक संयुक्तिक आहे. अशी व्यक्ती प्रापंचिक नात्यांमधे गुंतून पडलेली नाही असे भासत असले; तरी वास्तविक पाहता जात, पंथ, धर्म, वंश या सारख्या सीमांना ओलांडून "जीवो ब्रह्मैव नापरः" या न्यायाने अशा व्यक्तीने फक्त मानव समाजच नव्हे तर सगळ्या पशुपक्ष्यांनाही आपले सगेसोयरे मानलेले असते. आपल्या घरादाराचा आणि वस्त्रप्रावरणांचा त्याग करून एखादी व्यक्ती जर खर्‍या अर्थाने संन्यस्त झालेली असेल, तर आपल्या प्रेमाचा आणि करूणेचा परिघ व्यापक झाल्यानेच ती संन्यस्त झालेली असते . प्रापंचिक नातेसंबंधांमधील ताणतणावांचा किंवा कर्मकटकटींचा उबग आल्याने नव्हे! चित्ताची अशी उन्नत अवस्था साधलेल्या कित्येक भक्तांना आपल्या प्रापंचिक जीवनापासून पलायन करावे असे देखील वाटत नाही. असा भक्त वरपांगी प्रपंचातच रमलेला दिसला, तरी पिकलेले फळ झाडावरून अलगद खाली पडावे तशी त्याची प्रापंचिक वृत्ती मात्र अलगद गळून पडलेली असते. जोवर हे घडत नाही तोवर आपल्या प्रपंचाचा किंवा नोकरी व्यवसायाचा त्याग करणे ही एक प्रकारची आत्मवंचनाच ठरेल.

प्रश्नः आपले व्यावहारिक कर्तव्य पार पाडण्यात व्यग्र असताना समाधी अवस्थेचा आनंद लुटणे शक्य असते का?
रमण महर्षी: 'मी कर्म करतो' हा कर्ताभावच त्यात सगळ्यात मोठा अडथळा आहे. स्वत:ला प्रश्न विचारा, "कर्म कोण करतो आहे?" आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे स्मरण करा. इतकेच साध्य करता आले तरी तुमचे काम आपोआप आणि सुरळित सुरू राहूनही त्यातून कर्मबंध निर्माण होणार नाही. संकल्प आणि विकल्प या दोन्हीं गोष्टींना थारा देऊ नका, कारण संकल्पविकल्पात्मक प्रयत्नच कर्मबंध निर्माण होण्याचे मूळ कारण असतात. तुमच्या प्रारब्धात जे असेल ते घडत राहील. तुमच्या प्रारब्धात काम करणे नसेल, तर तुम्ही कितीही शोधाशोध केली तरी तुम्हाला काम मिळणार नाही. प्रारब्धवशात तुमच्याकडून एखादे काम व्हायचे असेल, तर तुम्ही ते टाळण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला तेच काम हाती घेण्यासाठी बाध्य केले जाईल. ते काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न तुमच्या हातून करवून घेतले जातील. काय करावे आणि करू नये हे तुमच्या मर्जीने घडत नसल्याने तो भार ईश्वरावर सोडून तुम्ही स्वस्थचित्त राहिलात तर तुमच्या हातून कित्येक कृत्ये घडताना दिसली तरी तुमची सहज स्थिती (सहज समाधी) भंग होणार नाही.

प्रश्नः एखाद्याने निरंतर आपल्या स्वरूपाचे स्मरण ठेवणे साध्य केले, तर अशा व्यक्तीकडून घडलेले प्रत्येक कृत्य योग्यच असते का?
रमण महर्षी: खचितच तसे असते. मात्र अशा व्यक्तीला आपण केलेले कृत्य बरोबर आहे की चूक याची फिकीर नसते. अशा व्यक्तीने केलेले प्रत्येक कृत्य हे (तिच्या माध्यमातून) परमेश्वरानेच केलेले असते आणि त्यामुळे ते योग्यच असते.

प्रश्नः आत्मविचार करण्यासाठी एकांताची आवश्यकता असते का?
रमण महर्षी: एकांत सगळीकडेच आहे. एकांत सतत तुमच्या सोबत असतो. मी उल्लेख करत असलेल्या एकांताचा शोध बाह्य जगतात न घेता तो अंतर्यामी घेण्याचे काम मात्र प्रत्येकाला स्वतःच करावे लागते. एकांत माणसाच्या मनातच दडलेला आहे. बाहेरच्या जगात कितीही कोलाहल सुरू असला तरी एखाद्याने चित्ताची प्रसन्नता भंग होऊ दिली नाही, तर अशी व्यक्ती एकांतातच असते. उलटपक्षी सर्वसंगपरित्याग करून जंगलात जाऊन बसलेल्या एखाद्या व्यक्तीचा आपल्या विचारांवर ताबा नसल्याने तिचे चित्त अस्थिर असेल, तर ती व्यक्ती एकांतात आहे असे म्हणता येत नाही. एकांत ही मनाचीच एक प्रवृत्ती आहे. विकार आणि वासनांनी लडबडलेली व्यक्ती कुठेही असली तरी तिला एकांत मिळवता येत नाही. अंगी वैराग्य बांणवलेला साधक जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी तो कायम एकांतातच असतो.

प्रश्नः सतत या ना त्या कामात गुंतवून ठेवत असलेली प्रापंचिक कर्तव्ये निभावून नेत असतानाच आम्हाला नैष्कर्म्य स्थिती आणि मानसिक शांती कशी मिळवता येईल?
रमण महर्षी: (पारमार्थिक) शहाणपण मिळवलेली व्यक्ती काम करते आहे असे फक्त इतरांना दिसत असते, त्या व्यक्तीला मात्र तशी जाणीव नसते. असे असल्याने इतरेजनांना ज्ञानी व्यक्ती कधी कष्टाचे डोंगर उपसताना किंवा कधी अवघड गोष्टी साध्य करताना दिसत असली, तरी प्रत्यक्षात ती काहीच करत नसते. अशा व्यक्तीच्या हातून घडणारे कार्यकलाप तिच्या नैष्कर्म्य स्थिती किंवा मन:शांतीमधे अडसर निर्माण करू शकत नाहीत. ज्ञान्याला हे माहित असते की कर्ता करविता तो नसून त्याच्या निव्वळ उपस्थितीत सगळे कार्य घडून येते आहे, तो मात्र सदैव पूर्णपणे निर्लेप आणि निश्चळ अवस्थेतच आहे. अवतीभोवती घडत असलेल्या घडामोडींबद्दलची ज्ञान्याची भूमिका किंवा आंतरिक स्थिती मौन आणि साक्षीभावाचीच असते.

प्रश्नः पाश्चात्य जीवनशैलीचा अवलंब करत असलेल्या साधकांना वृत्ती अंतर्मुख करणे अधिक कष्टप्रद असते का?
रमण महर्षी: होय, तसे आहे खरे. पाश्चात्य जीवनशैलीचा अवलंब करत असलेली व्यक्ती रजोगुणी असते. अशा व्यक्तीचा स्वभाव बहुधा बहिर्मुखी असतो. आपण आपल्या स्वरूपाचे सतत स्मरण ठेवले, अंतर्यामी शांत राहिलो, तर मग बाहेरच्या जगात आपण हवे तितके कार्यरत राहू शकतो. रंगमंचावर स्त्री पात्र साकार करत असलेला अभिनेता आपण पुरूष आहोत हे विसरून जातो का? तद्वतच जगाच्या या रंगमंचावर आपल्याला स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार आपापली भूमिका वठवावी लागते. आपापल्या भूमिका वठवत असताना आपली मूळ ओळख विसरून त्या भूमिकांशी तादात्म्य न पावणे हाच अध्यात्मिक प्रगतीचा राजमार्ग आहे.

प्रश्नः पारमार्थिक प्रगती साधण्यातील चालढकल दूर करण्यात इतरेजनांना आपल्याला मदत कशी करता येईल ?
रमण महर्षी: तुम्ही स्वत: हे साध्य केलेले आहे का? तुमच्या सगळा प्रश्नांना आणि उर्जेला स्वरूपबोधाकडे वळवा. तुमच्या अंतर्यामी शक्ती जागृत झाली, तर तिचा परिणाम तुम्ही म्हणता त्या इतरेजनांवर आपोआप होतो.

प्रश्नः आपण ब्रह्मचर्य पालनाला मान्यता देता का?
रमण महर्षी: खरा ब्रह्मचारी तोच असतो ज्याची ब्राह्मी स्थिती कधीच भंग होत नाही. अशा व्यक्तीच्या बाबतीत विकार आणि वासनांचा पगडा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

प्रश्नः योगी अरविंदांच्या आश्रमात विवाहीत जोडप्यांना आश्रमात वास्तव्य करायचे असेल तर ब्रह्मचर्याचे पालन केलेच पाहिजे असा कडक नियम आहे.
रमण महर्षी: त्याचा काय उपयोग आहे? ज्या वासना मनात जागृत आहेत, त्यांचे लोकांना सक्तीने दमन करायला भाग पाडण्याने काय साध्य होणार आहे?

प्रश्नः मी क्षणिक वासनांना बळी पडून बरीच पापकर्मे केली आहेत.
रमण महर्षी: आपण असे गृहीत धरू या की हे खरे आहे. तुम्ही जर सतत मनातल्या मनात त्याच त्या गोष्टींची उजळणी करत बसणे थांबवले, तर त्यांचे उपद्रव मूल्य आपोआप शून्य होऊन जाईल. आत्मस्वरूपामधे कुठल्याही पापकर्माची जाणीव नसते. लक्षात घ्या की वासनांचा त्याग हा आतून करावा लागतो. आपल्या वर्तनात वरपांगी बदल करण्याने फारसा लाभ होत नाही.

प्रश्नः आहाराविषयी आपले काय मत आहे?
रमण महर्षी: अन्नाचा मनावर परिणाम होतो. कुठल्याही प्रकारची योगसाधना करायची असेल तर शाकाहाराचा स्वीकार करणे अतिशय हितकारक आहे. सात्विक शाकाहारी अन्नग्रहण केल्याने चित्तशुद्धी होण्यात आणि मन स्थिर होण्यात मदत होते.

प्रश्नः आहारात मांसाहाराचा समावेश करणारी व्यक्ती आत्मसाक्षात्कारी होऊ शकते का?
रमण महर्षी: होय, ते अशक्य नाही. तुम्ही स्वतः मात्र हळूहळू मांसाहाराचा त्याग करत सात्विक शाकाहारी अन्नग्रहण करण्याची सवय करून घ्या. या बाबतीत मला एक महत्वाची बाब अवश्य नमूद करायची आहे, ती अशी की एकदा ज्ञानप्राप्ती झाली की मग तुम्ही काय खाता याने फारसा फरक पडत नाही. ज्ञानाग्निचा वणवा इतका प्रदिप्त असतो की तुम्ही त्यात कुठलेही इंधन घातले तरी त्याने तिळमात्रही फरक पडत नाही.

प्रश्नः (साधकांनी) मद्यपान आणि मांसाशनाचा पूर्णपणे त्याग करण्याची शिफारस आपण करता का?
रमण महर्षी: साधनेच्या प्रारंभिक अवस्थेत या गोष्टींचा पूर्णपणे त्याग करणेच साधकांच्या हिताचे आहे. गतानुगतिकपणे काही सवयी आपल्या अंगी अगदी हाडीमाशी मुरलेल्या असतात. जिभेचे चोचले पुरवण्याची चटक लागल्यानेच त्या सवयी सोडताना त्रास होतो, त्यांची आपल्या देहाला खरोखरची आवश्यकता असल्याने नव्हे!

प्रश्नः ढोबळमानाने पाहता अध्यात्मिक साधकांनी सरसकट पाळावेत असे आचरणविषयक नियम काय आहेत?
रमण महर्षी: संयत आहार, संयत निद्रा आणि संयत संभाषण.

धर्मआस्वाद

प्रतिक्रिया

मूकवाचक's picture

16 Jun 2020 - 5:27 pm | मूकवाचक
शाम भागवत's picture

16 Jun 2020 - 6:28 pm | शाम भागवत

छान.
पुलेशु

कोहंसोहं१०'s picture

16 Jun 2020 - 7:34 pm | कोहंसोहं१०

हा भागही मस्त झालाय.

आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे स्मरण करा. इतकेच साध्य करता आले तरी तुमचे काम आपोआप आणि सुरळित सुरू राहूनही त्यातून कर्मबंध निर्माण होणार नाही >>>> स्वरूपाचे स्मरण म्हणजे नक्की काय आणि कसे करायचे यावर अधिक महर्षींचे विवेचन कोठे वाचावयास मिळेल का?

मूकवाचक's picture

16 Jun 2020 - 8:14 pm | मूकवाचक

भागवत जी आणि कोहंसोहं१० मन:पूर्वक धन्यवाद.

@कोहंसोहं१० - स्वरूपाचे स्मरण ... या विषयी मायकेल जेम्स यांनी त्यांच्या ब्लॉगवर चांगले विवेचन केलेले आहे - Self awareness

मूकवाचक's picture

17 Jun 2020 - 5:31 pm | मूकवाचक

नको निराहार नको सेवू फार
सदा मिताहार असो द्यावा

नको अति झोप नको जागरण
असावे प्रमाण निद्रेमाजी

नको बोलू फार नको धरू मौन
करावे भाषण परिमित

संयमी जीवन बाणता सहज
स्वामी म्हणे तुज योग-सिद्धी

- प. पू. स्वामी स्वरूपानंद (पावस)

शाम भागवत's picture

17 Jun 2020 - 6:36 pm | शाम भागवत

_/\_