भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती: प्रकरण 7 - भक्ती आणि समर्पण

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
11 Jun 2020 - 4:27 pm

भक्ती आणि समर्पणभावविषयक भगवान श्री रमण महर्षींचा उपदेशाचा आपण या प्रकरणात गोषवारा घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांचा प्रस्तावनेतील सारांश असा आहे:

जगभरच्या धार्मिक परंपरांमधे व्यक्तिगत 'मी' च्या पलीकडे जाण्यासाठीचा एक उपाय या दृष्टीने परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाण्याविषयीचे प्रतिपादन केलेले दिसते. श्री रमण महर्षींना या मार्गाची वैधता पूर्णपणे मान्य होती आणि ते नेहेमी असे म्हणत असत की शरणागती ही साधनाप्रणाली देखील आत्मविचाराइतकीच परिणामकारक आहे. परंपरेने समर्पणाच्या मार्गाची सांगड नेहेमी उपास्य आणि उपासक अशा द्वैतभावावर आधारलेल्या भक्तीभाव आणि उपासनापद्धतींशी घातलेली दिसते. श्री रमण महर्षींंच्या दृष्टीने पाहताना मात्र अशा उपासनापद्धतींना नेहेमीच दुय्यम स्थान दिलेले दिसते. खरी शरणागती ईश्वराची उपासना करताना अंगीकारलेल्या उपास्य आणि उपासक या नात्यापलीकडे जाते हे दाखवण्यावर महर्षींचा भर असल्याचे दिसते, कारण आपण उपास्यापेक्षा वेगळे आहोत अशी कल्पना करून घेतलेल्या उपासकाचे स्वायत्त अस्तित्वच जेव्हा विलीन होऊन जाते तेव्हाच शरणागती सुफळ संपूर्ण होते.

शरणागती हे ईप्सित साध्य होण्यासाठी श्री रमण महर्षी दोन वेगवेगळ्या साधनापद्धतींची शिफारस करत असत:

१. 'मी आहे' या अहंस्फुरणेशी आपण ईश्वरापेक्षा पृथकतेने नांदतो आहोत अशा भ्रमात असलेला तथाकथित 'मी' नाहीसा होईपर्यंत सतत अनुसंधान राखणे

२. आपल्या आयुष्याविषयीचे सारे उत्तरदायित्व ईश्वरचरणी किंवा निजस्वरूपाच्या ठायी पूर्णपणे समर्पित करणे. आत्मसमर्पण परिणामकारक ठरावे या साठी साधकाला स्वत:चे संकल्प विकल्प आणि वासना नसणे तसेच ईश्वरी सत्तेपासून वेगळे असलेले संकल्प पूर्तीस नेण्याची क्षमता बाळगणारे स्वतंत्र व्यक्तिमत्व अस्तित्वात असल्याचा भ्रम पूर्णपणे नाहीसा होणे अनिवार्य असते.

वरील पैकी पहिली पद्धत भक्तीचा मुखवटा धारण केलेला 'आत्मविचार'च आहे हे स्पष्टपणे दिसून येते. रमण महर्षी नेहेमी आत्मविचार आणि समर्पणभाव यांची तुलना करताना एक तर असे सांगत की एकाच प्रक्रियेला दिलेली ही दोन वेगवेगळी नावे आहेत, किंवा आत्मसाक्षात्कारी स्थिती प्राप्त करण्याचे फक्त हे दोनच परिणामकारक मार्ग आहेत. रमण महर्षींनी त्यांच्या भक्तांना भक्तीमार्गी उपासना करण्यापासून कधीच परावृत्त केले नाही, मात्र ते सातत्याने असे निदर्शनास आणून देत असत की ईश्वराबरोबरचे कुठलेही नाते (अंश, भक्त, उपासक, दास, सखी इत्यादि) हे काल्पनिक आहे कारण वास्तवात फक्त ईश्वरच अस्तित्वात आहे. महर्षी सांगत असत की आपल्या खरोखरच्या स्वरूपात स्थित राहणे, आपण आणि ईश्वर यातले द्वैतात्मक नाते संपुष्टात येईल इतके त्या चैतन्याशी तदाकार होऊन किंवा समरस होऊन जाणे हीच खरी भक्ती आहे.

रमण महर्षी स्वतः प्रांजळपणे हे मान्य करत असत की या दोन्ही पद्धतींनी अहंतेचे पूर्णपणे आणि तत्क्षणी विसर्जन करणे हे ध्येय बहुतेक सगळ्याच साधकांसाठी अशक्य कोटीतली बाब आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेत महर्षी अशा अनुयायांना ज्याने भक्तीभाव दृढ होईल आणि मनावर ताबा मिळवता येईल अशा काही प्राथमिक इयत्तेतल्या साधनपद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला देत असत. या पैकी बहुतांशी साधनपद्धतींमधे ईश्वर (इष्टदैवत) किंवा सद्गुरूंशी सतत नामस्मरण करत अनुसंधान राखणे किंवा त्यांचे सगुण रूप आठवून मानसपूजेच्या स्वरूपात त्यांचे ध्यान करण्याचा अंतर्भाव असे. महर्षी भक्तांना असा निर्वाळा देत असत की नियमीतपणे प्रेम आणि भक्तीने ओतप्रोत होऊन कुठलेही साधन केले तरी त्या योगे टिपकागदाने एखादे द्रव्य टिपून घ्यावे तसे साधकाचे मन विनासायास उपास्यदेवतेत विलीन व्हायला लागेल. हे एकदा साध्य झाले की अनन्य भावाने शरणागत होण्यापर्यंतचा प्रवास सुकर होऊन जाईल.

पुरवणी: स्वामी स्वरूपानंद (पावस) कृत अमृतधारेतील एक वेचा -

मी-माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी, तरिच तत्वता क्षणात हाता येते सहज-समाधि |
सहज-समाधी संतत साधी न लगे साधन अन्य, सुटुनी आधि-व्याधि-उपाधि होते जीवन धन्य |
'मी' 'मी' म्हणसी परी जाणसी काय खरा 'मी' कोण? असे 'काय' मी 'मन', 'बुद्धी' वा 'प्राण' पहा निरखोन

प्रश्नः अनन्य शरणागती कशी असते?
रमण महर्षी: एखादी व्यक्ती अनन्य भावाने शरणागत झाली तर मग ज्याने शंका उपस्थित कराव्या किंवा ज्याच्या बाबतीत काळजी करावी असे मागे कुणीच उरत नाही. एक तर 'मी आहे' या सगळ्या विचारांच्या मूळ उगमस्थानाला पकडून ठेवणे किंवा कुठलीशी अट न ठेवता ईश्वरी शक्तीला सर्वभावे शरण जाण्याने विचारांचा पगडा नष्ट होत जातो. आत्मसाक्षात्कार घडावा हे फक्त या दोन मार्गांनीच घडू शकते.

प्रश्नः अनन्य किंवा संपूर्ण शरणागती मधे साधकाला मुक्तीची किंवा ईश्वरप्राप्तीची देखील वासना शिल्लक न राहणे अनिवार्य आहे का?
रमण महर्षी: अनन्य शरणागतीमधे तुमची स्वत:ची अशी कुठली वासना असू नये हे अनिवार्यच आहे. परमेश्वर तुम्हाला जे काही देतो त्यातच संतुष्ट असणे क्रमप्राप्त आहे. या संतुष्ट असण्याचा किंवा समाधानी वृत्तीचा दुसरा पैलू हा आहे की साधकावरचा व्यक्तिगत वासनांचा पगडा पूर्णपणे नाहीसा झालेला असतो.

प्रश्नः मला शरणागती सोपी वाटते. मला त्या मार्गाचा स्वीकार करायचा आहे.
रमणं महर्षी: तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, तुम्हाला त्या 'एकात' स्वतःला विसर्जित करावे लागेल. तुम्ही जेव्हा 'तूच (ईश्वर) सर्व काही आहेस' आणि 'फक्त तुझाच (ईश्वराचा) आदेश पाळला जाईल' ('दाय विल बी डन') अशी स्थिती प्राप्त कराल तेव्हाच शरणागती पूर्णत्वाला जाते. ही स्थिती ज्ञानापेक्षा वेगळी नसते.

'सोहम' ची सुरूवात द्वैतातून होते तर शरणागती अद्वैतावर आधारलेली आहे. पण सत्य हेच आहे की अंततः जो 'तत्वमसि' बोध उरतो त्यात द्वैत आणि अद्वैत दोन्ही अस्ताला गेलेले असतात. शरणागती वरपांगी सोपी वाटते, कारण लोक तिचा असा अर्थ लावतात की फक्त एकदा 'मी शरणागत आहे' असे शब्द उच्चारले आणि आपला सारा भार देवावर टाकून मोकळे झाले की मग आपल्याला हवी तशी मनमानी करता येईल. वस्तुस्थिती मात्र या पेक्षा वेगळीच आहे, ती अशी की तुम्ही शरणागती पत्करली की मग तुम्हाला व्यक्तिगत आवड नावड असू शकत नाही. तुमचे संकल्प विकल्प पूर्णपणे लयाला जागात आणि त्यांची जागा ईश्वरेच्छा (ईश्वरी आदेश) घेते. या मार्गाने अहंतेचा अंत घडवता आला तर त्या योगे साधकला जी आंतरिक स्थिती प्राप्त होते तीअध्यात्मिक ज्ञानप्राप्तीपेक्षा कणमात्रही वेगळी नसते. याचाच मतितार्थ असा, की तुम्ही कुठल्याही मार्गाने गेलात तरी शेवटी तुम्हाला ज्ञानाकडे किंवा या एकात्मभावाकडेच येणे भाग पडते.

प्रश्नः कृपाप्रसादाने साधकाला अशी क्षमता लवकर प्राप्त करण्यात मदत मिळते का?
रमण महर्षी: तुम्ही ते देवावर (सद्गुरूंवर किंवा ईष्टदेवतेवर) सोडा. तुम्ही सर्वभावे कुठल्याही अटी न घालता शरण जा. पुढील दोनपैकी एक गोष्ट करावीच लागेल - एक तर आपली क्षमता मर्यादित आहे आणि आपल्याला ईश्वरी कृपेची गरज आहे हे मनोमन मान्य करून शरणागत व्हा, किंवा सगळ्या पाप, ताप आणि दैन्यामागच्या मूळ कारणाचा छ्डा लावत त्याच्या उगमस्थानाकडे जा आणि आपल्या सच्चिदानंद निजस्वरूपात लीन होऊन जा. या पैकी कुठल्याही मार्गाने गेलात तर तुमची दुर्दशा कायमची संपून जाईल. खात्री बाळगा की शरणागत झालेल्या भक्ताचा भार वाहणे ईश्वराने सोडून द्यावे असे कधीच घडू शकत नाही.

प्रश्नः आम्ही प्रापंचिक बुद्धी असलेली सामान्य माणसे असल्याने या ना त्या कारणाने आम्ही व्यथित होत राहतो, आणि या दु:खद परिस्थितीवर कशी मात करावी हे आमच्या लक्षात येत नाही. आम्ही देवाची कितीही करूणा भाकली तरी त्या योगे आमच्या समस्यांचे समाधान प्राप्त होत नाही. अशा वेळी आम्ही काय करावे?
रमण महर्षी: ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवा.

प्रश्नः आम्ही शरण जातो, तरीही आम्हाला कुठलीच मदत मिळत नाही.
रमण महर्षी: मी समजू शकतो. पण तुम्ही जर खरोखर शरणागत झालेले असाल तर 'ईश्वरेच्छा बलियसी' अशा दृढभावनेने तुम्हाला जगता आले पाहिजे आणि तुम्हाला आनंददायी किंवा सोयीच्या वाटत नाहीत अशा गोष्टींबद्दलचा तुमचा तक्रारीचा सूर निवळला पाहिजे. तुम्ही वरवर पाहता त्या पेक्षा सगळ्या गोष्टी आणि घटना वेगळेच वळण घेत आहेत असे देखील कित्येक वेळा कालांतराने का होईना तुमच्या ध्यानात येईल. दु:खार्त भावनाच कित्येक वेळा इष्टापत्ती ठरते कारण तीच ईश्वरभक्ती दृढ होण्यात परिणत होते.

प्रश्नः शरणागती ही अशक्यप्राय गोष्ट आहे.
रमण महर्षी: मान्य आहे. सुरूवातीलाच संपूर्ण शरणागत होणे अशक्य आहे, मात्र अंशतः का होईना शरणागत होणे हे खचितच आपल्या आवाक्यातले आहे. कालांतराने भक्तीभावच संपूर्ण शरणागतीकडे घेऊन जातो. असे पहा की शरणागती अशक्यप्राय आहे असे हेकेखोरपणे गृहीत धरून चालले, तर मग आपल्याकडे उपाय तरी काय उरतो? अशाने मनःशांतीदेखील कायमची दुरावते. फक्त समर्पणानेच ती प्राप्त करता येते. लक्षात घ्या की तुम्ही आपल्याच सामर्थ्याने मनःशांती प्राप्त करण्यात नेहेमीच असहाय्य ठरत आलेले आहात.

प्रश्नः सर्वव्यापी असलेल्या ईश्वराचे दर्शन कसे घेता येईल?
रमंण महर्षी: ईश्वराचे दर्शन घेणे आणि ईश्वर होऊन जाणे एकच आहे. ईश्वर एकांशाने अस्तित्वात आहे. ईश्वरापेक्षा वेगळे असे इथे काहीच नाही जे त्याने व्यापून टाकावे.

प्रश्नः माझा ओढा भक्तीमार्गाकडे आहे. हा ओढा आणखी वाढत रहावा असे मला वाटते. त्या पुढे साक्षात्कार किंवा मुक्ती माझ्या खिजगणतीतही नाहीत. माझा भक्तीभाव दृढ व्हावा असा आशिर्वाद द्या.
रमण महर्षी: अत्यंत उत्कट असा भक्तीभाव असेल, तर तुमची ईच्छा असो वा नसो, साक्षात्कार म्हणा किंवा मुक्ती म्हणा, ती तुमच्यावर अक्षरशः लादली जाते. तुमचा भाव इतका दृढ आणि उत्कट करा, की त्या भक्तीसागरात तुमचे मन विरघळून जावे. मन कापरासारखे असते. एकदा कापूर जळून गेला, की मागे कुठलेच अवशेष उरत नाहीत. मनाचा दृढनिश्चय झाला आणि ते मागे कणमात्रही अवशेष न ठेवता निजानंदी विलीन झाले, तर त्यालाच तर आत्मसाक्षात्कार असे म्हणतात.

प्रश्नः अध्यात्मिक साधकाने सतत ईश्वराच्या स्तुतीपर गीत गायन करण्यात तल्लीन होत जगात वावरण्याने याच जन्मात त्याला आपले ईप्सित साध्य करता येईल का? साधकाने स्थैर्य लाभण्यासाठी एकाच ठिकाणी वास्तव्य करणे आवश्यक आहे का?
रमण महर्षी: जेव्हाजेव्हा मन विचलीत व्हायला लागेल, तेव्हा नित्याचे व्यवहार पार पाडत असतानाच अंतर्यामी मात्र मनाला एकाच गोष्टीवर केंद्रित ठेवण्याचा अभ्यास करणे खचितच चांगले आहे. मनाला इतस्ततः भटकायला मोकळे सोडून निव्वळ जडदेहाला हट्टाग्रहाने एकाच ठिकाणी स्थिर आसनात बसायला भाग पाडण्याने काय साध्य होणार आहे?

प्रश्नः अहेतुक भक्ती करणे सामान्य जनांना शक्य आहे का?
रमण महर्षी: होय, ते शक्य आहे. अमुक एक गोष्ट मिळावी या हेतूने केलेली भक्ती ही ईश्वर भक्ती नसून ती प्राप्य वस्तूचीच भक्ती ठरते. शिवस्वरूप होण्याची अभिप्सा ज्याच्या मनी आहे अशा साधकासाठी ईश्वरी उपासना करताना त्या योगे आपल्याला अमुक एक गोष्ट हवी आहे अशा प्रकारच्या वासनेला पूरक असा एकही विचार तरंग मनात उमटू नये यासाठी पूर्वाभ्यास करणे अनिवार्य आहे.

[एका आगंतुकाने त्याचा प्रश्न लिहून आणलेली चिठ्ठी रमण महर्षींना दिली]

प्रश्नः असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीने पूर्णपणे आणि अनन्यभावाने आपल्याला ईश्वराचाच काय तो आश्रय आहे असा निश्चय केला आणि ईश्वराव्यतिरिक्त अन्य कुठलाही विचार देखील मनात उमटू दिला नाही, तर अशा व्यक्तीचे सारे मनोरथ (ईश्वरकृपेने) पूर्ण होतात. याचा अर्थ असा होतो का, की एकाच ठिकाणी स्थिर आसनात बसून रहावे, सदासर्वकाळ फक्त ईश्वरी चिंतन करावे, अन्य विचारांचा त्याग करावा - ज्यात देहधारणेसाठी आवश्यक असलेल्या अन्न, जल इत्यादिंच्या विचारांचा देखील त्याग करायला हवा का? याचाच अर्थ असा देखील होतो का, की साधक आजारी पडला तर त्याने औषध किंवा उपचार यांचा विचार न करता आपले निरामय असणे किंवा रोगग्रस्त असणे हे देखील पूर्णपणे प्रारब्धावर किंवा ईश्वरावर सोडून द्यावे? मी भगवद्गीता अध्याय २ श्लोक ७१ च्या अनुषंगाने हा प्रश्न विचारतो आहे. थोडक्यात बोलायचे झाले तर सारे काही ईश्वरावर सोडून द्यावे, की आपण देखील थोडेफार प्रयत्न करावे? भगवानांनी कृपा करून शरणागतीविषयीच्या या शंकेचे निरसन करावे.

संदर्भः भगवद्गीत २.७१ - निष्कामत्वे जगी वावरे जो नि:स्पृह निरूपाधी, निरहंकारी निर्मम नर तो परम शांती संपादी (स्वामी स्वरूपानंद कृत भावार्थ गीता)
रमण महर्षी: [चिठ्ठी वाचून झाल्यावर महर्षींनी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच संबोधित केले]
अनन्य शरणागतीचा अर्थ कुठल्याही विचाराने लिप्त न होणे असा होतो या बद्दल शंकाच नाही. पण याचा अर्थ देहधारणेसाठी आवश्यक असलेल्या अन्न किंवा जल याबद्दलच्या विचारांचा देखील अव्हेर करावा असा होतो का? खचितच नाही. तुम्ही असे विचारता आहात, "ईश्वरी कृपेने न मागताच मला जर काही मिळाले, तर तेच अन्न मी ग्रहण करावे का? की त्या साठी थोडे प्रयत्न देखील करणे आवश्यक आहे?" ठीक आहे. आता क्षणभर असे गृहीत धरू या की आपल्यासाठी आवश्यक ते अन्न आपोआप पुढ्यात येते आहे. पण तसे घडले, तरी त्याचा घास कुणी घ्यायचा? आता त्या पुढे एक पाऊल जात असे समजा की अगदी कुणीतरी तुम्हाला घास भरवला, तो गिळण्यासाठीचे सायास तरी तुम्हीच करणार आहात ना? तो प्रयत्नच ठरत नाही का? तुम्ही पुढे असे विचारता, "मी आजारी पडतो तर औषध घ्यावे की आपल्या प्रकृतीची सारी काळजी देवावर सोडून तसेच निमूटपणे बसून रहावे?" शंकराचार्यांनी साधना पंचकम मधे लिहीले आहे, की क्षुधा नामक आजार झाला तर भिक्षेत मिळालेल्या अन्नाचे औषधवत ग्रहण करावे. पण यातही संन्यासाने भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी बाहेर पडण्याचे तरी किमान प्रयत्न करणे गृहीतच धरलेले आहे. जर सगळ्यानीच असे ठरवले की आम्ही डोळे मिटून ध्यानस्थ बसून राहू आणि पुढ्यात येईल तेच अन्न ग्रहण करू, तर जगाचे रहाटगाडगे सुरू राहील तरी कसे? त्यामुळे आपल्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक ते विहित कर्म जसे आपले (मानव समाजाचे) पूर्वज पार पाडत आलेले आहेत तसेच काळानुसार बदलत्या स्वरूपात जे आपल्या पुढे कर्तब्य या स्वरूपात आले आहे, ते प्रत्येकाने जबाबदारीने पार पाडायलाच हवे. फक्त ते पार पाडताना 'मी कर्म करतो आहे' या विचारापासून मात्र साधकाने मुक्त असायला हवे. 'मी अमुक एक गोष्ट आपल्या सामर्थ्याने करतो आहे' अशी भावना मनात येणे हेच बंधन आहे. त्यामुळेच कर्तेपणाच्या भावनेच्या आधीन होऊ नये अशी एखादी साधनपद्धती शोधणे आणि तिचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.

आजारी पडल्यावर औषध घ्यावे का किंवा भूक लागली असता अन्नग्रहण करावे का या सारख्या शंका उपस्थित करण्यापेक्षा कर्ताभाव लोपावा या साठी साधना करणेच श्रेयस्कर आहे. अशा शंका उपस्थित कराल तर त्यांना अंत नसतो. कारण उच्छवासानंतर श्वास घ्यावा का, वेदना झाल्यावर कण्हावे का या सारख्या शंका देखील तुम्हाला पडू शकतात. तुम्ही ईश्वर म्हणा किंवा कर्मगती म्हणा किंवा प्रारब्ध म्हणा, कुणी एक अनामिक शक्ती प्रत्येक व्यक्तीची जडणघडण लक्षात घेत या जगातल्या सगळ्या कार्यकलापांचे सूत्रसंचालन करत राहील. या दिव्य शक्तीवर सारी जबाबदारी सोपवली, तर सगळ्या गोष्टी स्वयंचलित यंत्राप्रमाणे सुरळित सुरू राहतील.

आपण रोज जमीनीवरून चालतो. तसे करत असताना प्रत्येक पावलावर आपण आता कुठला पाय आधी उचलावा, तो खाली कधी टेकवावा असा विचार करत बसतो का? चालणे आपोआप होते, नाही का? तीच गोष्ट श्वास घेण्याबद्दलही खरी आहे. आपल्याला श्वासोच्छवास करण्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागत नाहीत. या जीवनाचीही तीच कथा आहे. आपली मर्जी आहे म्हणून आपण एखादी गोष्ट सोडू शकतो का, किंवा मन मानेल तसे वागू शकतो का? निसर्गतःच अशा कित्येक गोष्टी अव्याहतपणे सुरू असतात ज्यांच्याविषयी आपल्याला सजग असे भानही नसते. ईश्वराला पूर्णपणे शरण जाणे याचा अर्थ असा आहे नानाविध मन:कल्पनांनी विचलीत न होता मन ईश्वराच्या स्मरणात स्थिर करणे. हा निदीध्यास दृढ होत गेला की विचारांचा पगडा आपोआप कमी होत जातो. मन, वाचा आणि देहाद्वारे केले गेलेले प्रत्येक कर्म जर ईश्वरी अनुसंधानात मिसळून गेले, तर आपल्या जीवनाचा सारा भार ईश्वरावर आपोआप पडतो. अशा भक्तांच्या योगक्षेमाची चिंताही ईश्वरच वाहतो.

तळटीप:
'बी अ‍ॅज यू आर' हे डेव्हिड गॉडमन यांचे पुस्तक आता यूट्युबवर 'ऑडिओ बूक' स्वरूपात उपलब्ध आहे:

धर्मआस्वाद