बहार पुरवणी भाग ६ दैनिक पुढारी रविवार, १५ सप्टेंबर २०१९

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
15 Sep 2019 - 10:20 am
गाभा: 

बहार पुरवणी भाग ६ दैनिक पुढारी रविवार, १५ सप्टेंबर २०१९

भाग 6
1

सिद्दी मसूदच्या हालचाली

2

सिवाला इथवर घेऊन आलेले वाटाडे पकडल्यावर त्यांच्या तोंडून देखील जर सांगतायत की सिवा कासारी नदीच्या पात्रात लपला आहे तर आणखी पुढे न जाता याच नदीच्या पात्रात उतरून सिवाला पकडून किंवा मारून नेता येईल असा आपापसात विचार करून घोडदळातील सैन्याला खाली पात्रात उतरले.

सिद्दी मसूदने बरोबर आणलेल्या वाटाड्यांच्या सोबत काही मराठ्यांची पथके बरोबर होती. पहाट झाल्यावर वाटेवरच्या वस्त्यातील लोकांशी ते गावच्या भाषेत संपर्क करून ते मजल दर मजल करत पुढे येत राहिले. अशा लोकांना पैसे देऊन नंतर त्याच वाटेवरून येणाऱ्या सैन्याला आम्ही गजापूरच्या बाजूला गेल्याची बातमी व वाट सांगा म्हणून तयार केले गेले.
सिद्दीचा जावई मसूद विशाळगडावर सिवा पोचलाच तर तिथे त्याला पकडायला हवा म्हणून त्यांच्या पथकामागाऊन येणारे बरेच मोठे घोडदळाचे व पायदळाचे सैन्य एकत्र जाण्यासाठी वाट पहावी असे ठरवून होता. पुढे सरकताना त्याच्या सरदारांना वाटेत जखमी पडलेले मावळे सापडले. त्यांची दमलेली व जखमी हालत पाहून ते जे सांगतायत त्यावर विसंबून राहावे असे वाटले. त्या शिवाय त्यांनी सिवाला इथवर आणले ते वाटाडे पकडल्यावर त्यांच्या तोंडून देखील जर ते सांगतायत की सिवा कासारी नदीच्या पात्रात लपला आहे तर आणखी पुढे न जाता याच नदीच्या पात्रात उतरून शिवाजीला पकडून किंवा मारून नेता येईल असा आपापसात विचार करून सिद्दीने आपल्या घोडदळातील सैन्याला पात्रात खाली उतरवले. मागावून निघालेली पायदळाची आणखी कुमक २ ते ३ तासाच्या नंतर तिथे पोहोचली तोवर दुपारचे १२ वाजून गेले.
लढाईची वेळ आली आहे. आता आपली उपयुक्तता संपली आहे. जर आपण त्यात सापडलो तर जीवंत राहायची खात्री नाही असा असा रागरंग पाहून उरलेल्या वाटाड्यांनी, संधी साधून जंगलाच्या झाडीतून पसार व्हायला सुरवात केली.
शिवाजीमहाराजांनी उपलब्ध वाटाड्यांच्या माहितीवरून त्यांच्या सैन्याचे २-३ भाग करून आपल्याबरोबरच्या भागाला नदीच्या उगमापासूनच्या भागातून जंगलातील वाट काढत पळून गेले असावे असा तर्क निघेल अशी बतावणी करणारी परिस्थिती उभी केली. त्यानुसार सिद्दीचे सैन्य घाटदार वळणांतून पुढे खोल- खोल होत जाणाऱ्या चिंचोळ्या दरडीतून पुढे जात असताना बाजी प्रभूंच्या नेतृत्वाखालील सैनिक घळीत दोन्ही बाजूला लपून बसले. सिद्दीचे सैनिक सतत पडणाऱ्या पावसात नदीच्या पाण्याच्या धारदार प्रवाहात स्वतःला वाचवत शोघायला जात असताना गोफणीच्या दगड धोंड्यांच्या माऱ्याने ते हैराण होऊन नामोहरम होत होते. अशा शिपायांना भाले-तलवारींनी जखमी करून मावळ्यांनी मारून टाकले. पात्रात उतरलेला कोणी एकही परत येऊन किती सैनिक असावेत? शिवाजी घळीत खरच लपला आहे कि नाही? एकून काय परिस्थिती आहे हे सांगायला वर येईना! अशी दुर्दशा पाहून मसूद थांबला. नदीच्या पात्रात उतरले की परत येणे शक्य का होत नाही हे लक्षांत घेऊन त्याने आपली सैन्य रचना बदलायला सुरवात केली. पन्हाळ्याहून नंतर निघालेल्या घोडदळाच्या तुकड्यातून ठासणी बंदुका, गन पावडर, ती चालवणारे सैनिक जेंव्हा येऊन मिळायला लागले तेंव्हा मग त्यांनी नदी पात्राच्या दरी न उतरता पहाडांच्या अगदी वरून जाऊन, पात्राच्या काठावरून घळीत लपलेल्या शिवसैनिकांना सावधपणे टिपून मारायला चालू केले. पण सर्दलेली गन पावडर, पावसात ओली होणारी ठासणीची बंदूक, कपारीत लपायला जागा, हिरवी गर्द झाडी यामुळे मारा प्रभावी होत नव्हता. दुपारची वेळ टळल्यानंतर मसूदने अनेक वेगवेगळ्या ठिकाणी घळीत वरून उतरवायाला सैनिकांना पाठवले. काहींनी मावळ्यांना मारून “अल्ला हो अकबर, दीन दीन” अशा आरोळ्या देऊन उत्साह वाढवला. पण कोणाला नक्की माहित नसावे की शिवाजी या नदीच्या पात्रात कुठे लपलेला आहे किंवा तो विशाळगडाला आधीच सटकला आहे?
त्यामुळे सर्व सैनिकांना इथेच कामाला लावले तरी हरकत नाही पण आता पुन्हा “शिवाजी सापडला नाही” अशी नामुश्की नको असे वाटून सिद्दी मसूदचे दळ तिथेच शोध घेत राहिले. कासारी नदी पात्राची घळ संपते तिथे सपाट भागात बाजी आपल्या पथकाला दांडपट्ट्यांना घळीच्या बाजूने येणारे व डोंगर पार करून आलेल्यांना सपासप वार करून मारुन टाकत होते. पठाणी सैनिक बाजींच्यासोबतच्या दांडपट्ट्याने सिद्ध प्लाटूनच्या आवाक्याबाहेर राहून प्रतिकार करायला धजत नव्हते. हळूहळू सिद्दीच्या बंदुकबाजांची प्लाटून्स दुरून नेम धरून मारायला लागली.
सिवा या घळीत असेल तर आता तो पळून जाऊ शकत नाही आणि नसेल तर तो विशाळगडावर पोहोचू शकणार नाही कारण सुर्व व दळवी यांचे सैन्य तिथे तळ ठेकून आहे. ते त्याला गडापर्यंत पोहोचू देणार नाहीत. अशा दोन्ही शक्यता धरून खिंडीतच लक्ष केंद्रित केले गेले. वेळ कितीही लागला तरी त्यांची पर्वा नाही असा पवित्रा घेतला गेला. जशी सध्या देखील दहशतवादी हल्लेखोरांना पकडून मारायची सेनेची कारवाई बराच वेळ चालते. तशी साधारण सकाळच्या १0-११ पासून सुरू झालेली ही कारवाई दुपारनंतरही ४ नंतर पर्यंत हळू हळू चालत राहिली.
गोळ्यांच्या घावाने जखमी होत एक एक करून बाजींच्या तलवारबाजांचे धैर्य कमी कमी होत होते. स्वतः जखमी असून देखील पुन्हा पुन्हा आवेशाने उठून समोरच्याला वारांने मारत सुटत होते. बाजींना तोफांच्या आवाजांची आतुरता होती. महाराजांना सुखरूप विशाळगडावर जाण्यात या खटाटोपाला सार्थकता होती. घळीच्यावरून बंदुकीचा मारा अन् घळीत उतरून आलेल्या पठाण सैनिकांनी आता बाजींच्या मावळ्यांना दोन्ही बाजूंनी घेरले. पठाणांच्या तलवारबाज तुकड्यांनी घळीच्यावरून येऊन एकदम चढाई करायची चाल रचली गेली. बाजीं सभोवती रिंगण करून आता अनेक तोडीचे तलवारबाज समोरासमोर ठाकले. दोन्ही हाताने सळसळणाऱ्या पात्यांचे वलय समोरच्यांची मुंडकी उडवत होते. क्षणांत कोणाची हातासकट तलवार गळून पडत होती. हा एक वीर आटपत नाही असे पाहून दुरून नेम धरून बंदूकबाजांनी नेम घरला पण क्षणाक्षणाला बदलत्या हातचालींमुळे त्यांचे नेम चुकत होते. बंदुकीच्या बारांच्या आवाजाचा कोलाहल आसमंतात माजला असताना विशाळगडाकडून तोफेच्या बाराकडे बाजींचे लक्ष होते. उरलेल्या सैनिकांना म्हणत होते, हर हर महादेव...गड्यांनो कळा सोसा... महाराजांना सुखरूप गडावर पोचवल्याशिवाय आता विश्राम नाही...
वरून नेम धरून बसलेल्यांच्या गोळ्यांचा वर्षाव सुरु झाला. एक एक टिपून मारले जात राहिले... बाजींच्या थकलेल्या जखमी देहाला मावळ्यांनी आडोशाला नेऊन ठेवले. तेवढ्यात एकामागून एक तोफांच्या दमदार आवाजांनी महाराज गडावर सुखरूप पोचल्याची बातमी दिली.... रक्त स्त्रावाने भिजलेल्या बाजींच्या शरीराने आपण धन्याचे कामी आलो याची धन्यता वाटून शुद्ध गमावली... अन् प्राण ज्योत निमाली...

भाग 6 समाप्त. पुढील अंतिम भागात

शिवाजी महाराजांची विशाळगडावर चाल...

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

15 Sep 2019 - 12:46 pm | जॉनविक्क

पहिल्यांदाच इतके सविस्तर व प्रक्टिकल असे या विषयावर वाचायला मिळाले. पन्हाळा व विशाळगड परिसर ऐन पावसात फिरलो असल्याने दृश्ये अगदी डोळ्यासमोर जीवन्त झाली.

निव्वळ भावनिक मर्दुमकीपेक्षा अजून बरेच काही असावे लागते अशी युध्दे निभावून न्हेण्यासाठी.

_/\_

सुरेख विश्लेषण.

पुढील लेखात ज्याच्यासाठी ही धावाधाव करावी लागली त्या विशाळगडावरील दरवाजे कसे उघडले गेले...
जे सिद्दीच्या५० हजारापेक्षा जास्त सैन्यबळाला चार महिने लढून जमले नाही ते महाराजांनी काही तासात कदाचित चार तासात कसे शक्य करून दाखवले यावर आधारित पुढील भाग आहे.
ता.क.
गिरिजी दुधाट या तरुणीने शस्त्रवेध नामक पुस्तक लिहिले आहे त्याची प्रत मागवून वाचली. तिने सादर केलेल्या माहितीतून अनेक शस्त्रांबाबत उलगडा व्हायला मदत होते.

शशिकांत ओक's picture

15 Sep 2019 - 1:43 pm | शशिकांत ओक

निवेदन-
आत्ताच शस्त्र संग्राहक गिरीश जाधव, जयसिंगपूरयांच्याशी संपर्क केला. त्यांनी खालील प्रस्तावावर विचार करून सांगतो असे म्हटले.
त्यांना असे सुचवले आहे माना की...
आपणासारख्या मिपाकरांनी महाराजांच्या वतीने गिरीश जाधवजी आणि त्यांच्यासारखे आणखी जितके शस्त्रसंकलक आणि कला प्रवीण तज्ज्ञ आहेत त्यांना महाराजांच्या एका लष्करी मोहिमेत सहभागी व्हायला बोलावणे केले आहे.
कारण ते आणि त्यांच्या सारखे स्वतःचे सैन्य बाळगणारे शिलेदार सरदार महाराजांच्या काळातील होते. ते खडे सैन्य, शस्त्रांचा संभार, लढाईसाठीच्या जनावरांचा ताफा बाळगून असत. असे जे सरदार आहेत ते सैन्य मोहिमेची पुर्व तयारी कशी करतील?...

मुक्त विहारि's picture

20 Dec 2019 - 9:18 pm | मुक्त विहारि

7 व्या भागाची वाट पहात आहे. ...

शशिकांत ओक's picture

21 Dec 2019 - 2:38 am | शशिकांत ओक

आठवण करून दिल्याबद्दल...
लवकरच सादर करेन.