Skip to main content

पालक होण्यामुळे झालेले बदल

लेखक खंडेराव यांनी बुधवार, 27/03/2019 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ Painter Katha मी एकेकाळी अगदी बेछूट माणूस होतो. काहीही करायचो - रात्री ९ वाजता सुरु झालेली पार्टी सकाळपर्यंत चालायची. ट्रेकला गेलो कि काहीही धाडस करायचो, शेकडो किलोमीटर मोटारसायकल वर फिरायचो. मजबूत भांडखोर होतो, गाडीत कायम एक लोखंडी कांब असायची आणि कुठेही रस्त्यावर भांडण झाले तर ती काढण्याचीही तयारी असायची. महिन्याच्या पगारातले १०० रुपयेही शिल्लक ठेवण्याची आसक्ती नसायची. लग्नानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या पण मूळ स्वभाव जवळ जवळ तसाच होता. आता, एका बाळाच्या जन्मानंतर पूर्ण बदललोय, कोणी काहीही ना सांगता.. अगदी बियरचा एक ग्लास हातात असेल तर मी उबेर बुक करतो, मोटारसायकल महिनोन महिने उभी असते. रस्त्यात लहान मुलांसोबत भिकारी दिसले कि पैसे देतो ( याची चर्चा करायला हा धागा नाही) . ट्रेक वगैरे जवळजवळ बंद झाले आहे, जो काय प्रवास करतो तो लक्सारी म्हणावा असा असतो. पीपीएफ आणि मुतुअल फंड अशा इन्वेस्टमेंटही आवर्जून करतो, टर्म इन्शुरन्स काढला आहे. बराच भावनिकही झालोय, लहान मुलांविषयी काही वाईट वाचले/ ऐकले कि डोळ्याच्या कडा ओलावतात. ( वरची कथा, आजचे ताजे उदाहरण). तुमचा स्वतःचा असा अनुभव आहे का? पालक बनल्यावर असे बदल होणे तुमच्या पाहण्यात आहे?

वाचने 18370
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

>>तुमचा स्वतःचा असा अनुभव आहे का? पालक बनल्यावर असे बदल होणे तुमच्या पाहण्यात आहे? पाहण्यातच नाही तर अनुभवण्यात पण आहे. बाप झाल्यानंतर मी ही बराच माणसाळला गेलो आहे. लहान मुलांचे जग हे बरेचनिराळे आणि निरागस असते. त्यात जर रूची घेत गेलात तर आपल्यालाही नवे बालपण अनुभवण्याची गंमत घेता येते.

In reply to by कानडाऊ योगेशु

हे खरे आहे. मी पण नवीन बालपण अनुभवतो आहे, पोराचे सुपरहिरो पुतळे इतके आवडले की एक दोन गायब करून ऑफिस डेस्क वर ठेवले आहेत..

त्या लोखंडी कांबीचे काय झाले ? ती अजुनही गाडीत असते काय ? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यास पुढील प्रश्न विचारायची हिंमत करायची की नाही ते ठरवता येईल :)

In reply to by प्रसाद गोडबोले

शेर केल्याबद्दल..बातमी व रिसर्च इंटरेस्टिंग आहे, आणि कनेक्ट होतोय..

बदलायचं म्हणजे काय!! ज्या सवयी चांगल्या म्हणून मुलांना सांगायच्या असतात त्या प्रथम आपल्याला सुरु कराव्या लागतात.

आधीपासूनच जबाबदारीने वागणार्‍या /नाकासमोर बघून चालणार्‍या माणसाचे मुल झाल्यावर काय होत असावे ?

In reply to by मराठी कथालेखक

बहुधा मुलांच्या वाईट सवयी पालकांना लागत असाव्या. कृ. ह. घ्या पण खरंच, कधी कधी अतिसभ्य किंवा अतिसमंजस पालकांना मुलांकडून थोडासा खेळकरपणा किंवा लेट गो ऍटिट्यूड शिकता येऊ शकतो.

In reply to by सोन्या बागलाणकर

बहुधा मुलांच्या वाईट सवयी पालकांना लागत असाव्या
शक्य आहे.. काही मित्रांच्या अनुभवाने हळूहळू कळेलच.. मी पण बर्‍यापैकी गंभीर प्रकारातलाच आहे. पण मी स्वतः काठावर उभे राहून इतरांची गंमत बघण्याचा (विनापत्य राहण्याचा) निर्णय घेतलेला आहे पण इतर पालकांचे निरिक्षण करायला /त्यांचे अनुभव ऐकायला आवडते.

In reply to by मराठी कथालेखक

हा प्रश्न मी एका सरळमार्गी मित्राला विचारला - तो म्हणतोय तो आता तो थोडा बिन्धास झालाय, कायम प्रोसेस किंवा नियमानुसार गेलेच पाहिजे असे त्याला आता वाटत नाही..

भाजीतले टमॅटो न काढता भाजी संपवतो आजकाल, न आवडणार्‍या भाज्या 'वा...वा' म्हणत खाऊ लागलोय :-)

In reply to by आदिजोशी

पण कधीतरी स्वतः स्वयंपाक सुरु केल्यावर ( कॉलेजला असतांना) माझे भाज्या खाणे सुरु झाले - एकेकाळी मी वेलवर्गीय भाज्यांना हात नाही लावायचो, आता सर्वच खातो!

शेळपट बनण्याची खरी सुरुवात लग्न ठरल्या पासूनच होते आणि एखादे मुल झाले की पुरुष एकदम शेळीच बनतो. लग्ना आधी मी पण टायगर होतो, भांडणे करायला अजिबात घाबरायचो नाही, कोणी आरे म्हटले की आपण कारे म्हटलेच पाहिजे असे ठरलेलेच होते. आता सगळे बदलले आहे, दहा बारा दिवसांपूर्वी एका लग्नाला निघालो होतो अचानक एक पांढरी स्कॉर्पियो नो एन्ट्री मधुन घुसून माझ्या कार समोर उभी राहिली. रस्ता अरुंद होता आणि त्यात दोन्ही बाजूना पार्किंग होते त्यामूळे साईडने गाडी घेण्याचा काही चान्स नव्हता. तो माजुरडा ड्रायव्हर मलाच जोरात हॉर्न वाजवून दाखवत होता. माझ्या कार मधे माझे आई, बाबा, बायको आणि मुली होत्या म्हणून डोके थंड ठेउन एक शब्दही न बोलता सगळ्यांना गाडीतुन उतरायला सांगितले. गाडी लॉक केली आणि तिकडून निघून जायला लागलो. बाबा चिडून भांडायला जात होते त्यांना पण शांत करुन बाजुला घेतले. मला न भांडता जाताना पाहून स्कॉर्पिओचा पेशन्स संपला. पांढरी सफारी घातलेला ड्रायव्हर कम भाई आणि त्याचे पंटर गाडीतुन उतरुन मला धमक्या द्यायला लागले. मीच गाडी मागे घेतली पाहिजे असा त्यांचा हट्ट होता. गाडी फोडून टाकू, जाळुन टाकू, बघून घेउ अशी भाषा सुरु झाली. मी हात जोडून त्यांना म्हणालो "तुम्ही मोठी माणसे तुम्ही काहीही करु शकता. म्हणूनच माझी फॅमेली गाडीतुन उतरवली. आता तुम्ही माझ्या गाडीला काहिही करा मला चिंता नाही." त्यांच्यातला एक पंटर समजूतदार पणाचा आव आणुन मला म्हणत होता कशाला साहेबांच्या नादी लागता, मला गाडीची चावी द्या मी तुमची गाडी मागे घेतो. मी त्यालाही ठाम नकार दिला. आणि तशीही माझ्या गाडीच्या मागे आणखी चार पाच कार आणि दहा पंधरा बाईकची रांग लागलेली होती. पन्नास शंभर लोक जमले कोणी त्यांना समजावत होते कोणी मला. शेवटी वैतागून पब्लिक ला त्रास होतो आहे म्हणून, पब्लिकच्या विनंतीला मान देउन (माझ्यासाठी नाही बरका!), साहेब गाडीत बसले. धमक्या सुरुच होत्या. तो पर्यंत मी त्यांना त्यांच्या गाडीची आणि त्यांची कुंडली माझ्या मोबाईल वरुन शोधून ऐकवली. साहेब अजूनच थंड झाले. आणि मग त्यांची गाडी मागे झाल्यावर त्यांना टाटा करुन आम्ही सगळे मार्गस्थ झालो. हेच लग्नाच्या आधी झाले असते तर तिकडे ऑन द स्पॉट मारामारी करायला मी अजिबात घाबरलो नसतो. समोरच्या गाडीची काच तर नक्कीच फोडली असती. अर्थात तेव्हा माझ्या कडे कार नव्हती, त्या मुळे असला प्रसंग कधी ओढवला नाही. पण एकदा लोणावळा एसटी स्टँड वर चिक्कीवाल्याच्या डोक्यात घालायला भला मोठा दगड उचलला होता. कंडक्टर मधे पडला म्हणुन तो चिक्कीवाला वाचला होता. असो गेले ते दिवस आणि राहिल्या ता आठवणी पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

लई भारी ! यापुढची पायरी म्हणून, समोरच्याला त्या प्रसंगावरची एक शीघ्र कविता ऐकवा आणि बघा काय होते ते ! :) अर्थातच, तुमच्या जबाबदारीवर ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

खबरदार जर नो एन्ट्रीतुन याल पुढे आडवे, काढेन भर रस्त्यात वाभाडे, आपण मोठे स्कॉर्पिओ वाले असा गुंठा मंत्री की, आपली लायकी आम्हा ठावकी, हा रस्ता आपल्या बापाचा ही नसे, त्यावर आमचाही थोडा हक्क असे, आम्ही घेतले नियम पाळण्याचे वसे म्हणुन पुन्हा सांगतो, खबरदार जर नो एन्ट्रीतुन याल पुढे आडवे, काढेन भर रस्त्यात वाभाडे पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पण
तो पर्यंत मी त्यांना त्यांच्या गाडीची आणि त्यांची कुंडली माझ्या मोबाईल वरुन शोधून ऐकवली.
कळलं नाही.

In reply to by दादा कोंडके

गाडीच्या नंबर वरुन त्याचे नाव शोधले आणि मग नावावरुन फेसबुक अकाउंट, त्यात त्याच्या गाडीवर घड्याळाचा स्टीकर लावलेला होता त्याने काम अजूनच सोपे झाले. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सही जिरवलीत... मारामारी न करता समोरच्याची जिरवणे कधीही योग्यच.. आपली बाजू वरचढ राहते

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मस्त आणि तुमचा स्टॅन्ड हि छान! यामुळे तुमच्या मुलींनाही असे प्रसंग हाताळण्याचा योग्य पर्याय बघायला मिळाला..ठाम राहणे खूप महत्वाचे. माझ्या स्वतःच्या आई वडिलांविषयी ज्या आठवणी आहेत त्यात ते ठाम राहून कसे वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे गेले त्यांची वेगळीच जागा आहे.

पालक बनल्यावर असे बदल होणे तुमच्या पाहण्यात आहे? हॄदय बदलते ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैजनिया... :- Fraud Saiyaan | 4K |