प्राचार्य अद्वयानंद गळतगे, भोज-५९१२६३ जि. बेळगाव (कर्नाटक),भ्र. ०९९०२००२५८५
‘प्रज्ञालोक' अंक २४२ मधील ‘संचित व प्रारब्ध कर्म' या विषयीच्या प्रा. के. वा. आपटे यांच्या काही शंकांचे निरसन करणारा माझा लेख ‘प्रज्ञालोक'च्या २४४ व्या अंकात ‘प्रतिक्रियेच्या सदराखाली प्रसिद्ध झाला आहे. तो वाचून आचार्या सौ. उषा गडकरी यांनी मला काही प्रश्न दूरभाषवर विचारले आहेत. त्यांचा
पहिला प्रश्न असा - ‘माणूस प्रथम जन्माला आला तेव्हा त्याला पूर्वकर्म नव्हते. अशावेळी काही माणसे दुष्ट कशी झाली व काही माणसे सृष्टी कशी झाली ? दुस-या शब्दात पूर्वकर्माअभावी माणसामाणसात भेद कसा निर्माण झाला ?' हा प्रश्न मी माझ्या शब्दात मांडून त्यांचा कर्म सिद्धांताविषयीचा आक्षेप व्यक्त केला आहे. त्यांचे मूळ शब्द कोणते होते हे मला आता आठवत नाही. पण त्यांच्या आक्षेपाचा आशय नेमका कोणता आहे हे मी माझ्या वरील शब्दात व्यक्त केला आहे. (कारण एके काळी मला स्वतःलाच हा प्रश्न पडला होता) पुढे त्यांनी विचारले आहे की काही लोक भ्रष्ट व अन्याय्य मार्गाने पैसे मिळवून श्रीमंत बनतात आणि पैशाच्या जोरावर दुष्कृत्ये करून ती पचवतात, प्रतिष्ठित म्हणून मिरवतात व सुखात जगतात. उलट नीतीने वागणारी माणसे कष्टात व दुःखात जीवन जगतात. हे वेगवेगळे जीवन त्यांच्या कोणत्या पूर्वकर्मामुळे त्यांच्या वाट्याला आले हे कोण सांगायला येते ? त्यांच्या या प्रश्नाचा रोख असा की कोणत्या पूर्वकर्मामुळे हे जीवन त्यांच्या वाट्याला आले हे कोणीही सांगू शकत नसल्यामुळे ते जीवन त्यांच्या पूर्वकर्मामुळे त्यांच्या वाट्याला आले या म्हणण्याला काय आधार ? पुढे त्यांनी कुत्र्याचे उदाहरण देऊन विचारले आहे की एक कुत्रा लूत (खरूज) लागलेला असतो तर दुसरा निरोगी असतो. हे त्यांच्या कोणत्या पूर्वकर्मामुळे ? पुन्हा दगडाचे उदाहरण देऊन त्या विचारतात की एक दगड पायरी बनून सतत तुडवला जातो, तर दुसरा दगड मूर्ती (देव) बनून सतत पूजिला जातो. हे त्यांच्या कोणत्या पूर्वकर्मामुळे ? हे प्रश्न विचारून त्यांनी याचे उत्तर देण्याचे मला आवाहन केले आहे. पहिल्या प्रश्नाच्या बाबतीत मी वर म्हटले आहे की हा प्रश्न मला स्वतःलाच एके काळी पडला होता. पण त्या प्रश्नाचे उत्तर मला कोणत्याही ग्रंथात मिळालेले नाही, आणि ते कोणालाही मिळणार नाही. ते का मिळत नाही याचे उत्तर गीतेने दिले आहे. 'कर्माचे ज्ञान अगम्य आहे' (गहना कर्मणो गतिः ।) हे ते उत्तर आहे. हे उत्तर गीतेने का दिले आहे हे मी ज्ञान व कर्म यांच्या संबंधाच्या संदर्भात माझ्या उपर्युक्त लेखात स्पष्ट केले आहे. कर्मसिद्धांताच्या संदर्भात गडकरींनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा तेच (गहना कर्मणो गतिः ।), आहे, ते कसे हे विज्ञानाच्या भूमिकेतून येथे थोडक्यात स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. । कार्यकारणभावाला (कर्मसिद्धांताला) तार्किक आधार नाही. जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला आलेल्या विशिष्ट भोगांची उपपत्ती देण्यासाठी कर्मसिद्धांताचा जन्म झाला आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती सांप्रतच्या जीवनातील विशिष्ट (बऱ्यावाईट) परिस्थितीचे कारण त्या व्यक्तीच्या पूर्व जन्मातील कर्म असते असे हा सिद्धांत सांगतो. अशारीतीने हा सिद्धांत कार्यकारणभावावर आधारलेला आहे. म्हणजे तो वैज्ञानिक आहे. (कारण विज्ञान सर्व घटनांची उपपत्ती कार्यकारणभावाने देते.) [1] पण डेव्हिड ह्यूम या अनुभववादी (empiricist) स्कॉटिश तत्त्ववेत्त्याने कार्यकारणभावाला कसलाच तार्किक आधार नसल्याचे दाखवून दिले आहे. (त्याचा Treatise of Human Nature हा ग्रंथ पहा) आणि बर्ट्रांड रसेल या कट्टर बुद्धिवादी तत्त्ववेत्त्याने ह्यूमचे हे म्हणणे आजपर्यंत कोणालाही खोडून काढता आलेले नाही असे आपल्या Is Science Superstitious ? (विज्ञान ही अंधश्रद्धा आहे ?) या निबंधात म्हटले आहे. (Sceptical Essays, 1985, P- 73) याच्याही पुढे जाऊन भौत विज्ञानातील क्वाँटम सिद्धान्ताने कार्यकारणभावाचे विज्ञानातून उच्चाटनच केले आहे ! क्वाँटम सिद्धांताच्या दृष्टीने या उच्चाटनाचा अर्थ असा होतो की कोणतीही घटना स्थानिक कारणामुळे कधीच घडत नाही. म्हणजे ती स्थानिक कारणाचा स्थानिक परिणाम नसते. तिला नेहमी वैश्विक (global) संदर्भ असतो. डेव्हीड बोहम या भौतशास्त्रज्ञाने क्वाँटम सिद्धांताच्या या शोधाचा अर्थ पुढील शब्दात व्यक्त केला आहे. [2] "Ultimately the entire universe has to be understood as a single undivided whole, in which analysis into seperately and independently existent parts has no fundamental status." (Wholeness and Implicate Order, 1980, P. 174) याचा अर्थ असा - “अंतिमतः संपूर्ण विश्व एकसंध व अविभाज्य आहे असे मानले पाहिजे. त्यामध्ये स्वतंत्रपणे व वेगळेपणाने अस्तित्वात असलेले मूलभूत भाग आहेत या समजुतीला काही अर्थ नाही. कारण विश्वाचे तुकडे करता येत नाहीत.'' विश्व एकात्म आहे असा याचा अर्थ होतो आणि स्थानिक पातळीवरील कार्यकारणभावाला तार्किक (स्थानिक) आधार नाही हे ह्यूमचे म्हणणे अशारीतीने वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होते. क्वाँटम सिद्धांताची कार्यकारणभावाने उच्चाटन करणारी ही भाकिते (predictions) सूक्ष्म (subatomic) पातळीवर प्रत्यक्ष प्रयोगांनी खरी ठरली आहेत. विश्वातील सर्व घटना सूक्ष्म पातळीवर परस्पराशी संबद्ध आहेत (म्हणजे विश्व एकात्म आहे) असे यावरून ठरते. (ही गोष्ट आपले ऋषीमुनी पूर्वीपासून सांगत आले आहेत.)
पुढे जे. एस. बेल् या शास्त्रज्ञाने क्वाँटम सिद्धांताची भाकिते स्थूल पातळीवरसुद्धा खरी ठरतात का या गोष्टीच्या तपासणीसाठी एक प्रमेय मांडले. (ते बेलचे प्रमेय' म्हणून भौतविज्ञानात प्रसिद्ध आहे) आईन्स्टाइन यांनी पूर्वी सुचविलेला एक प्रयोग या प्रमेयानुसार करता येत असल्यामुळे तो प्रयोग अॅस्पेक्ट आणि त्याच्या सहका-यांनी १९८२ साली पॅरिस येथे यशस्वीरित्या केला आणि त्या प्रयोगांनी स्थूल पातळीवरसुद्धा क्वाँटम सिद्धांताची भाकिते खरी ठरली. (या शोधाचे वर्णन हेनरी स्टॅप या भौतशास्त्रज्ञाने ‘भौतशास्त्रातील सर्वात अगाध शोध' 'most profound discovery' असे केले आहे.) स्वतः या प्रमेयाच्या शोधाचा जनक * जे एस बेल याने क्वाँटम सिद्धांतातील या शोधाचा अर्थ पुढीलप्रमाणे सांगितला आहे. “One of the ways of understanding (this discovery of quantum mechanics) is to say that the world is superdeterministic. That not only is inanimate nature deterministic, but we, the experimenters who imagine we can choose to do one experiment rather than another, are also determined." (The Ghost In the Atom, 1986, ed. PC.W. Davies and J.R. Brownp.47)*in याचा अर्थ असा - “विश्वातील सर्व घटना अगोदरच ठरून गेलेल्या आहेत (असे क्वाँटम सिद्धांत सांगतो) असे एका अर्थाने म्हणता येईल. हा अर्थ असा की जड (निर्जीव) वस्तूनाच नव्हे, तर कोणताही प्रयोग करण्यास आम्ही पूर्ण स्वतंत्र आहोत असे समजणाच्या आम्हा (मानवी) प्रयोगकर्यानासुद्धा (वास्तविक) कसलेच स्वातंत्र्य नाही. (म्हणजे) आम्ही काय करावे (करतो) हे अगोदरच ठरून गेले आहे. जे अगोदरच ठरून गेले आहे त्याला 'नियती' (predestination) म्हणतात. सर्व काही अगोदरच ठरवून दिल्याप्रमाणे ज्यामध्ये घडते त्यालाच 'नाटक' ही म्हणतात. कारण नाटकाचे कथानक (script) सर्व तपशीलासह अगोदरच लिहून ठेवलेले असते व त्याप्रमाणे रंगभूमीवर ते नाटक जसेच्या तसे रंगवले जाते (अमलात आणले जाते) अशा रीतीने संपूर्ण (सजीवनिर्जीव) विश्व हे एक नाटक आहे, असे क्वाँटम सिद्धांतातील या शोधावरून ठरते. वर दिलेल्या बेलच्या उद्धरणात superdeterministic हा जो शब्द त्याने वापरला आहे त्याचा अर्थ ‘सर्व काही अगोदर ठरवून दिल्याप्रमाणे घडते' असा आहे, हे तर झालेच. पण हा अर्थ deterministic या शब्दाच्या अर्थाहन वेगळा आहे हे लक्षात ठेवावे. deterministic या शब्दाचा अर्थ ‘अगोदर ठरल्याप्रमाणे घडते' असाच असला तरी त्यामध्ये ‘वेगळे ठरविले असते तर वेगळे घडले असते' असा अर्थ अध्याहृत आहे. यांच्याउलट superdeterministic या शब्दात ‘वेगळे ठरवताच येत नाही, प्रत्यक्ष जसे घडताना दिसते तसेच घडणे ठरून गेले आहे' हा अर्थ दडला आहे. [3GaryZukav, p. 318) (The Dancing Wu Li Masters, 1980)
विश्वाचा इतिहास अगोदरच घडलेला आहे
क्वाँटम सिद्धांताच्या या निष्कर्षाला आइन्स्टाइनचा सापेक्षता सिद्धांतही बळकटी देतो. सापेक्षता सिद्धांतानुसार स्थलकालाचा आकृतिबंध अगोदरच ठरून गेलेला (निश्चित) आहे. म्हणजे कालाचा प्रवाह भूतकाळाकडून भविष्याकडे ‘वाहत नाही. म्हणजे घटना घडत नाहीत. त्या अगोदरच घडलेल्या असतात. त्यांना आपण फक्त ‘भेटत असतो. म्हणजे कालप्रवाह हा आमचा भ्रम आहे. (According to Relativity) the entire spacetime must indeed be definite. There can be no 'uncertian' future. The whole of space-time is fixed without any scope of uncertainy... There is no flow of time at all." "It is not just a matter of the future being determined by the past, the entire history of the universe is fixed for all time." [4]Roger Penrose, pp. 304, 342) याचा भावार्थ असा की ‘कालप्रवाह' खोटा आहे व स्थलकाल निश्चित आहे. त्यात घडणा-या घटना म्हणजे विश्वाचा इतिहास अगोदरच ठरलेला (घडलेला) आहे. (The Emperor's New Mind, 1987,
अशा रीतीने भौतिक विज्ञानातील मुलभूत सिद्धांतानुसार विश्वात घडणाच्या सर्व घटना म्हणजे विश्वाचा संपूर्ण इतिहास अगोदरच ठरलेला (घडलेला) असल्याने कोणता दगड पायरी बनून तुडवला जाणार व कोणता दगड मूर्ती बनून पूजिला जाणार, कोणत्या कुत्र्याला लूत (खरूज) लागणार व कोणता कुत्रा निरोगी राहणार, कोणता माणूस भ्रष्ट बनून सुखी असणार व कोणता माणूस भीतिमान बनून कष्टाचे जीवन जगणार हे सर्व अगोदरच उरलेले आहे. हे विश्वाचे 'कर्म' आहे. म्हणजे विश्वरूपी नाटककाराचेच हे 'कर्म' आहे. विश्वातील सर्व घटना कार्यकारणभावानुसार (causality तत्त्वानुसार) घडत असल्याच्या दिसत असल्या तरी ह्यूमने दाखवून दिल्याप्रमाणे त्या कार्यकारणभावाला कसलाच तार्किक आधार नाही. तर्कबुद्धी कार्यकारणसंबंध (कर्मसिद्धांत) स्थानिक पातळीवर म्हणजे विश्वाचे तुकडे करून समजावून घेण्याचा प्रयत्न करते. पण क्वाँटम सिद्धांतानुसार विश्वाचे तुकडे करता येत नाहीत. त्यामुळे कार्यकारण संबंध (कर्मसिद्धांत) तर्क बुद्धीला स्थानिक पातळीवर कळणे अशक्य आहे. त्यासाठी तर्कबुद्धीला (स्वतःसकट) संपूर्ण विश्वाचे ज्ञान करून घ्यावे लागेल. आणि हे अशक्य आहे. त्यामुळे कार्यकारणसंबंध (कर्मसिद्धांत) तर्कबुद्धीला अगम्य आहे. (गहना कर्मणो गतिः ।)
प्रतिक्रिया
14 Oct 2018 - 7:42 pm | गामा पैलवान
शशिकांत ओक,
लेख पटला. मात्र विश्वाचा इतिहास जरी अगोदर ठरलेला असला तरी माझा स्वत:चा इतिहास (सुधरवणं वा बिघडवणं) फक्त माझ्याच हातात आहे.
शिवाय आजूनेक आक्षेप नोंदवावासा वाटतो तो लेखातल्या या वाक्यावर :
माझ्या मते विज्ञानाचं असं काहीही प्रतिपादन नसतं. जे काही प्रतिपादन आहे ते माणसाचं असतं. मात्र अर्थात, या आक्षेपामुळे लेखातल्या मूळ मुद्द्यास बाधा येत नाही.
आ.न.,
-गा.पै.
14 Oct 2018 - 9:26 pm | प्रकाश घाटपांडे
कोणता माणूस भ्रष्ट बनून सुखी असणार व कोणता माणूस भीतिमान बनून कष्टाचे जीवन जगणार हे सर्व अगोदरच उरलेले आहे.>>>> नीतिमान म्हणायच आहे का?
15 Oct 2018 - 12:20 am | शशिकांत ओक
"आपली मते व्यक्त करायला आता गळचेपी होते आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून भारत तेरे टुकडे होंगे म्हणायला 'आझादी' नाही. अशा बुद्धिवादी लोकांना कष्टाचे जीवन जगायची पाळी आली आहे!" नीती ऐवजी भीती टाईप होणे आधीच ठरून गेले असल्याने त्यात सुधारणा करूनही फारसे बिघडलेले नाही असे वाटते...
आपल्याला काय वाटते?
16 Oct 2018 - 3:44 pm | प्रकाश घाटपांडे
भीतीमान बनुन का होईना नीतीमान झाला तर काय अडचण नाय!पण पुढे विवेकी बनुन नीतीमान व्हावे :)
14 Oct 2018 - 10:01 pm | कंजूस
मोठे लोक सांगताहेत म्हणजे खरेच असणार. आपल्या कर्मात नाही ते होणारच नाही.
14 Oct 2018 - 11:21 pm | मुक्त विहारि
वाचत आहे...
16 Oct 2018 - 5:21 pm | चित्रगुप्त
एकंदरित लेख क्लिष्ट असल्याने यथायोग्य प्रतिसाद देणेही अवघडच आहे.
..... "अगोदरच ठरून गेले आहे" .... वगैरे वाक्यात 'अगोदर' म्हणजे कश्याच्या अगोदर ? आपल्या जाणिवेच्या कक्षेत येण्याच्या अगोदर का? म्हणजे समजा मी झोपलेलो असताना मला स्वप्नात आपण पाणी पीत असताना दिसले. त्यावेळी ते मला खरेच वाटत होते, म्हणजेच माझ्या जाणिवेचा एक अंश तो अनुभव प्रत्यक्षात घेत होता. परंतु जाग आल्यावर मी म्हणतो की मला (भूतकाळात) स्वप्न पडले. पण आत्ता हे जे मी म्हणत आहे, ते सुद्धा स्वप्न कश्यावरून नाही ?
कोंबडी आधी की अंडे आधी ? तर कोंबडी मधे अंडे आहे, त्या अंड्यात पुन्हा कोंबडी आहे, त्या कोंबडीत पुन्हा अंडे आहे.... अशी ही अनंत साखळी आहे, हे सर्व एकाच वेळी असते, पण त्यातील एक लहानसा अंश आपल्या सध्याच्या जाणिवेच्या कक्षेत असतो. ही कक्षा जर विस्तारित करता आली, (वा जन्मतः असली) तर आपल्याला अन्य लोकांपेक्षा पुढचे-मागचे जास्त दिसू शकले पाहिजे.
16 Oct 2018 - 6:23 pm | शशिकांत ओक
एकांची फोन वरून प्रतिक्रिया... "वाचता वाचता डोकं गरगरायला लागले हो!"
16 Oct 2018 - 5:28 pm | चित्रगुप्त
पूर्वीच्या काळी आपल्याला एकादी गोष्ट श्रोत्या/वाचकाच्या मनात ठसवून/पटवून द्यायची असेल, तर तिला वेद, गीता, उपनिषदे वगैरेंचा 'शास्त्राधार' असल्याचे सांगावे लागे (दासबोधाच्या सुरुवातीला पण समर्तांनी असे केलेले आहे) तसेच हल्ली काही सिद्धांत पटवून देण्यासाठी डी.एन.ए, क्वांटम थेअरी, आईन्स्टाईनचा सिद्धांत, वगैरेंचे दाखले द्यावे लागतात की काय, असे वाटून गेले.
16 Oct 2018 - 6:19 pm | शशिकांत ओक
सादर केले तर छान झाले. 'पटवून देऊन मानायला लावणे' असे न पाहता प्रगल्भता यावी म्हणून सादर केले आहे.
23 Oct 2018 - 8:59 am | चांदणे संदीप
जर घटना घडून गेल्या आहेत आणि आपण त्यांना फक्त 'भेटत' असतो असे असेल तर, जेव्हा ज्योतिषशास्त्र भविष्यात काय घडणार हे पाहून, (विशेषतः अमंगल) त्यावर उपाय सुचवतात. अशावेळी ते उपाय केल्यास भविष्यातल्या घटना बदलतील का? बदलल्या तर लेखातील घटना घडून गेल्या वगैरे मान्यता चूक ठरतील. नाही का?
Sandy
24 Oct 2018 - 9:05 am | शशिकांत ओक
नाडी भविष्यातील ग्रह शांती-दीक्षा पूजा यांना प्रभाव कसा काय मानावा?
ग्रह तारे मानवी जीवनावर प्रभाव टाकतात का?
यावरील उत्तर प्रा अद्वयानंद गळतगे यांनी दिले आहे. म्हणून मी देत नाही.
त्यावर वेगळा घागा काढायला हवा.
25 Oct 2018 - 4:39 am | चित्रगुप्त
प्रा. अग यांनी दिलेल्या उत्तराबद्दल वेगळा धागा काढा सरजी.