कोल्हापूर,गणपतीपुळे, मालगुंड पिकनिक करून काल म्हणजे १५ जून २०१५ ला पहाटे ४-३० ४-४५ च्या पंधराजण गणपतीपपुळ्याहून निघालो.त्यात पुरुष दोघेच त्यातले एक श्री दाभोलकर हे दोन महिन्यापूर्वी बायपास झालेलेआणि दुसरा माझा नवरा. बाकी सगळ्या वय वर्ष तीन ते अठ्ठ्याहत्तर मध्यल्या स्त्रिया.
माझी नणंद सौ. सीमा इंदुलकर हिच्या मैत्रीणी आणि त्यांचे नातेवाईक अशी ही सारी मंडळी.सीमा ठाण्याच्या सिटी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चीफ फार्मासिस्ट म्हणून काम करते .तिच्या मैत्रीणीही आरोग्य सेवेशी संबंधित क्षेत्राताल्याच.आम्ही दोधेही त्यांच्याबरोबर बऱ्याच पिकनिक केलेले.त्यांचेही दादा वहिनी.
येताना आम्ही मीरा रोडहून तर बाकी सगळ्या, कुणी अंबरनाथ कुणी बदलापूर तर कुणी शहापूरहून ठाण्याला एकत्र आल्या होत्या.तीन चार ठिकाणीची खरेदी करून आता प्रत्येकीचे एखाद् दोन बोजे वाढलेले होते.आता प्रत्येकीला घराच्या आसपास सोडत कर्जत मार्गे ठाणा आणि नंतर मिरारोड असे यायचे ठरले.यासाठी सकाळी लवकर नुसते तोंड धुवून निघयचे ठरले.त्याप्रमाणे निघालोही. आणि पालीमार्गे एक्स्प्रेस वेवर यायचे ठरवून मुंबई-गोवा महामार्गावरून पालीचे वळण घेतले.
वाकण नावाच्या गावाजवळच्या ब्रिजवर आलो आणि पुढे दहा ते पंधरा फुटावर एक सायकलस्वर डाव्या बाजूने चालला होता,त्याला काय झाले ते समजलेच नाही तो अचानक रस्त्याच्या मध्ये येऊन कोसळला.आमच्या चालकाने तातडीने ब्रेक मारून गाडी थांबवली.आमच्याशिवाय दुसरे कोणीही तेव्हा तिथे नव्हते.
आम्ही दोघे नवरा बायको बाकी कुणीही खाली उतरू नका असे सांगून खाली उतरून पहिले तर त्याच्या डोक्याला जखम झालेली,डोळे उघडे,जीभ दातातून बाहेर आलेली,त्यामुळे तोंडातून रक्तस्राव होत असलेला. रस्त्यात आडवी झालेली सायकल एव्हाना आमच्या गाडीचा जवळ आलेली पण तिचा गाडीला स्पर्श झाला नव्हता.चालक म्हणू लागला,”इधरके लोग बडे खराब होते है.हम पुलिसको खबर देके निकलते है.सब लेडीज लोग है.”
पण आम्ही पडलो जागरूक नागरिक.’आपण ह्याला घेऊन दवाखान्यात पोचू,तिथे पोलिस असतीलच.’असा विचार करून रुग्णवाहिकेसाठी १०८ला फोन लावला तो पुण्याला जाऊ लागला.इतक्यात सीमाने पाली आरोग्यकेंद्रात फोन करून तिथल्या डॉक्टराना फोन लावून अपघाताची कल्पना देऊन तयार राहायला सांगितले.यावेळपर्यंत एकदोन वाहने पसार झाली. कोणी थांबायला तयार नाही. एका गाडीताल्यानी ओरडून आम्हाला सल्ला दिला.’यहा रुको मत.निकाल जाव.’
’इतक्यात एका स्कुटीवरून दोघे आले त्यांनी अपघात पाहताच ते थांबले.आणि त्यातला एक मोबाईल वर फोटो काढू लागला तर दुसरा अपघातग्रस्त माणसाकडे पाहू लागला.तोपर्यंत फोटो काढणाऱ्याला माझ्या नवऱ्याने त्या माणसाला आरोग्यकेंद्रात नेण्यासाठी आमच्या गाडीत ठेवण्याची विंनंती केली. तो हो म्हणून पुढे आला.
इतक्यात अपघातग्रस्त माणसाची ओळख पटल्याने दुसरा तोंडाने अर्वाच्य शिव्या देत,गाडीवर लाथाबुक्क्याने हाणू लागला, चालकाला मारू लागला.फोटो काढणारही आम्हाला मदत करायची सोडून त्याच्या मदतीला धावला. इथे आमच्यातल्या सीमा, सुषमा, शोभा, निमा ,राजश्री अशा चौघी-पाचजणी खाली उतल्या. माझा नवरा त्यांना आवरण्यासाठी,”अरे,अरे ऐका तरी ,आमच्या गाडीने त्यांना अपघात झाला नाही.ते सायकल चालवता चालवता चक्कर येऊन पडले.म्हणून आम्ही मदत करायला थांबलो.’त्यावर ते दोघे माझ्या नवऱ्याच्या अंगावर धावून आले.,”हां,फिट आली सांगतोय भे****.” माझी नणंद सीमा आणि तिची मैत्रीण सुषमा चटकन मध्ये घुसल्या आणि नवऱ्याला बसमध्ये घेऊन गेल्या.इतक्यात काही दुचाकी गाड्या विरुद्ध दिशेने आल्या.इतकी गडबड पाहून त्यांचा वेग मंदावला आणि दुसऱ्याने त्यावर बसलेल्या लोकाना हाक मारून उतरवले.
“ए विलास,ए ललित थांब रे..काकाला उडवला यांनी.”ते उतरले आणि चालकावर धावून आले. गाडीवर, गाडीच्या काचांवर हाणूलागले.जमाव वाढू लागला.जो येत होता तो चालक आणि गाडीवर हाथ धुवून घेत होता.परत काही जणींनी मध्ये पडून चालकाला गाडीत नेले”.गाडीची चावी काढून घ्यारे.”कोणीतरी फर्मावले.आता मात्र मी संतापून त्यांना आवाज दिला,”तुम्हाला या माणसाचा जीव वाचवण्यात इंतरेस्ट आहे की नाही?त्या माणसाला उचलून गाडीत ठेवा नाहीतर मीच तुमच्यावर तुम्ही उशीर करता आहात म्हणून पोलिसात तक्रार दाखल करेन.”तोपर्यंत त्या जखमी माणसाची बायको तिथे आली होती.ती गहिवर घालून रडू लागली.मी त्या तिलाच सांगितले.हे तुमचे नातेवाईक फक्त मारामारी करताहेत तर त्यांना यांना उचलून गाडीत घालायला सांगा.”तीही यांच्या विनवण्या करू लागली.शेवटी एकदाचे त्या जखमी गृहस्थाना उचलून आमच्या गाडीत घालून पाली आरोग्य केंद्रात घेऊन आलो.पण मोलाचा अर्धातास वाया गेला होता.
तिथेही सगळे आमच्यामागोमाग तिथे पोचले.तिथेही जमाव होताच.अगोदर रुग्णवाहिका का नाही आली म्हणून तिथे वाद सुरु करून डॉक्टरला मारहाण करण्यात आली.त्यातही काही वेळ गेला.पण तिथे काही स्वयंघोषित नेते आले त्याच्याशी बोलल्यावर रुग्णावर उपचाराला सुरूवात झाली.सीमा आत जाऊन डॉक्टरांशी बोलली.
रुग्णाला प्रथमोपचार करून पुढे अलिबागला पाठवावे लागेल कारण येथे बाकी काही सोयी नाहीत.काहीतरी रस्त्याच्या कामामुळे पाण्याची लाईन फुटल्यामुळे तिथे पाणीही नव्हते.हे कळल्यावर सीमाने अलिबाग सिव्हील सर्जनना फोन करून कल्पना दिली.रुग्णाच्या पत्नीला रक्ताने भरलेले हात धुवायलाही पाणी नव्हते.स्पिरीटच्या बोळ्याने त्यांचे हात स्वच्छ करावे लागले.तिला धीर देउन अलिबागला न्यावे लागेल असे सांगितले एव्हाना तीही जनमावाच्या नावाने बोटे मोडू लागली होती.
नवऱ्याने गाडीत बसून काही ओळखीच्या लोकांना फोन केले.लोक बाहेरून त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होते.ज्याने जखमीला ओळखून मारहाण सुरु केली होती तो त्यांचा पुतण्या असल्याचे समजले तो तिथेही लोकभावना भडकावत होता. त्याचे नाव होते राहुल ठोंबरे.”तो ढापणी आहे न,तो आय*** सांगतोय की फिट आली म्हणून त्याला काढा बाहेर.”त्यातले दहापैकी पाच लोकांच्या तोंडाला दारूचचा वास येत होता.माझ्या पोटात गोळाच आला होता.पण माझ्या आजीची शिकवण आहे की,पोटात कितीही भीती असली तरी ती तोंडावर दिसत कामा नये,तुम्ही घाबरला आहात हे समोरच्याला समजत नाही तोपर्यंत तोही टरकून असतो.मी पुन्हा राहुलला सांगितलं,”ए भ**.तू माझ्या नवऱ्याला जी शिवी दिली त्याचा अर्थ कळतो का तुला? तू तुझ्या आईची इज्जत काढतोयसआणि मग माझा नवरा तुझा बाप लागतो.तो काय भित्रा आहे म्हणून आत बसला नाहीये. तू जर आता गडबड केलीस तर मी तुला खुनाचा प्रयत्न केला म्हणून पकडून देईन.आणि तुझी पण मेडिकल करायला लावते बघ आता. तो ललित ,विलास आणि तू तुम्हा तिघांचीही मी नावानिशी तक्रार करते आता.” तसे काही लोक मागे सरकले.
माझी नणंद आत अडकली होती.नवऱ्याला लोक गाडीबाहेर ओढू पाहत होते.त्याचा जीव ते मला किंवा सीमाला काहीतरी करतील म्हणून तळमळत होता.पण मी त्याला शपथ घातली.”तू काही झालं ना तरी खाली उतरू नकोस.या सगळ्या मुलींची जबाबदारी तुझ्यावर आहे.माझं मरण इथेच असाल तर ते इथे येईल. पण मला मी बाईमाणूस आहे म्हणून तरी ते हात लावणार नाहीत.” माझ्या नवऱ्याचे सहकारी असलेल्या एका अधिकाऱ्यांनी यांनी पाली पोलिस स्टेशनला फोन करून जमाव हिंसक झाल्याची खबर दिल्यावर पोलिस अपघातस्थळी रवाना झाले होते पण आम्ही तिथे नव्हतोच.आम्ही इथे अडकलो होतो.मी सगळ्यांना गाडी लॉक करून आत बसा. मी सीमाला घेऊन येते.” त्या मॅडम कुठे आहेत.?अलिबाग सिव्हील सर्जनना फोन करताहेत त्या ,”असे मोठ्याने बोलत मी आत शिरले.लोकही बाजूला सरकत होते.सीमाला अगदी आतल्या खोलीत ठेवल्याचे सांगितले.मी तिथे जाऊन तिला हाक मारली.तशी तीही दार उघडून बाहेर आली.तिचा हात धरून मी मी पुन्हा बसमध्ये येऊन बसले. आता मात्र आम्हाला कोणीही अडवले नवहते
.
बसमध्ये बघते तरचालकाला जास्त मारहाण झाल्याचे कळले.कोणीतरी त्याला पोलीस ठाण्यावर जाऊन वर्दी दे असं सांगितल्याने तो तिथे जात असता पुन्हा बाईक तिघांनी वरून जाऊन त्याला मजबूत मारला होता.त्याच्या डोक्यात काठी घातली होती.पण आता आम्ही सर्व एकत्र होतो.नवऱ्याचा एक बालमित्र मुंबई पोलिसात आहे.त्यानेही पोलीस ठाण्याशी संपर्क साधला होता.अदिती दामोदर या सीमाच्या मैत्रीणीच्या राजश्रीच्या मुलीचे सासर पाली हेच असल्याने तिनेही त्याच्याशी संपर्क साधला होता.तिथूनही काही ओळखीच्या लोकांशी संपर्क साधण्यात आला होता.
नंतर एका उंचीपुरी व्यक्ती बस मध्ये शिरली.”तुम्ही काय कारताय?पोलीसठाण्यात येणार का?”आम्ही सगळ्यानी एका सुरात होकार दिला”.ठीक आहे तिथे यायला तयार आहात तर मी तुमची जबाबदारी घेतो घेतो.”असे आम्हाला सांगून ते खाली उतरले.आम्हाला आधी ते त्यांच्यापैकीच वाटले पण ते होते पाली पोलीसठाण्याचे हेड कॉन्स्टेबल.एका बाईकवाल्याला आम्हाला रस्ता दाखवायला सांगून ते निघून गेले.
सगळा जमाव आमच्या मागोमाग पोलीस ठाण्यात घुसला.नवरा आणि मी चालकाला घेऊन आत शिरलो.एक लेडी पी. एस. आय. आणि एक लेडी कॉन्स्टेबल यांनी खास पोलिसी आवाजात त्यांनी सांगितले की, ‘साहेब,तुम्ही बसा. मॅडम तुम्हीपण बसा.बाकीच्यांनी बाहेर व्हा,ज्यांनी अपघात पाहिलाय त्यांनीही बाहेर थांबा.पंचनाम्यावर सही करणार असतील त्यांनीच थांबा. फक्त फिर्यादी आत येतील.’एक एक करून सगळे गायब.चालकाला ए तू तिकडे बस.असे सांगितले.
फिर्यादीने आमच्या गाडीनेच अपघातग्रस्त माणसाला उडवल्याची फिर्याद दिली.माझे व नवऱ्याचे जबाब घेतेवेलळी मी जेव्हा नावासहित कोणी कोणी मारहाण केली ते सांगितल्यावर, तुम्ही यांना ओळखत नाही मग नावे कशीसांगू शकता?असा प्रश्न विचारला.तेव्हा मी राहुलने त्यांना हाक मारून थांबवून घेतले.म्हणून नावे कळली.आणि ते जखमींना मदत न करत मारहाण करण्यातच धन्यता मानत असल्याने लक्षात राहितेत व आमच्या गाडीतील लोकांनी त्यांचे छायाचित्रण केल्याचे सांगितले.ज्यांनी फिर्याद दिली होती तेही गडबडल्याचे दिसून येत होते.
अलिबागहून रुग्णाला मुंबईला पाठवण्यात आले आहे आणि अजून गंभीर अवस्थेत आहेत तर चालकाला सोडणार नाही कारण तो मालक नाहीय.आणि आता त्याला सुरक्षेच्या कारणामुळे सोडू शकत नाही.शिवाय गाडी सोडणार नाही आता आर.टी,ओ.ने पाहिल्याशिवाय ,असे समजले. वचालकाकडे मूळ कागदपत्रे नसल्याने मालकाशी संपर्क साधण्यात आला.गाडी नवी असल्याने कागदपत्र बँकेत असल्याचे संगीताले व मी उदया तिथे पोचेन असे सांगितले.त्या गृहस्थांची सायकाळी पोलीसठाण्यात आणली होती.तीच एक स्पोकही वाकडा झाला नव्हता,त्यावरूनच समजत होते की आमच्या गाडीने अपघात केला नव्हता पण स्थानिकांचे दडपण पोलिसांना लघेच झुगारून देता येत नव्हते आणि निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकही ठाण्यात नव्हते, ते अलिबाग येथे क्राईम मीटिंगसाठी गेले होते.
इतक्यात एक वार्ताहर तिथे आले.गावातल्या लोकांचे ऐकून त्यानीहि अपघात आमच्याच गाडीने केल्याचे गृहीत धरले होते.आणि बातमी लिहायला ते तिथे आले होते.त्यांच्याशी आम्ही बोललो मग त्यांनी गाडी व सायकलचे निरीक्षण केले आणि गेले.
एव्हाना समीर काळभोर यांनी पर्यायी बसची व्यवस्था केली होती.स्थानिक चालक नौशाद यांनीही खूप मदत केली.चालकाची मेडिकल आणि जबाब झाल्यावर आम्ही निघालो. कारण चालक तमिळ होता.त्याला मराठी येत नव्हते. आम्ही तिथून निघालो. तेव्हा पाच वाजून गेले होते.अपघात सव्वाबाराला झाला होता..तसेच पारोसे देवळात जाऊन दर्शन घेऊन प्रवास पुढे सुरु झाला.आज गाडी मालक जाऊन त्याला घेऊन आले आहेत.
दरम्यान यापुढे अपघातग्रस्त व्यक्तीला मी मदत करू धजेन का?याचा विचार मला पडला आहे..
प्रतिक्रिया
17 Jun 2015 - 8:18 pm | अभिजित - १
आणि हे common आहे . भारतीय लोक असेच आहेत. शहरातले पण .. व्यक्ती पूजक ..
17 Jun 2015 - 3:16 pm | सतोंष महाजन
या आशाच मनोवृत्तीच्या लोकामुळे कुणी मदत करायला धजत नाही.
17 Jun 2015 - 3:58 pm | काळा पहाड
खिक. तुम्ही आयडी घेण्यासाठी मोजींचा सल्ला घेतला होता की काय?
17 Jun 2015 - 4:01 pm | टवाळ कार्टा
ठ्ठो =))
17 Jun 2015 - 9:31 pm | मनिमौ
छान प्रसंगावधान दाखवल.बाकी खेडवळ लोक डांबरट असतात हे पुन्हा सिद्ध झाले.
18 Jun 2015 - 12:10 am | ससन्दीप
रत्नागिरीच्या माझ्या काकांचा रस्ता ओलांडत असताना अपघात झाला.
दहा ते पंधरा मिनीटे रक्ताच्या थारोळ्यात तळमळत पडले होते.
इस्पितळ अगदी हाकेच्या अंतरावरच होते. पण बघ्यांनी त्यांना तिथल्या इस्पितळात नेण्याची तसदी घेतली नाही, ते बघ्यांच्या भूमिकेतच राहिले. कदाचित त्यांना 'नको त्या भानगडीत' पडायचे नसेल.
18 Jun 2015 - 1:59 pm | मनिष
तुमच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल, हे अगदी नीट समजू शकतो. स्थनिकांच्या गुंडगिरीमुळे किंवा ओळखींमुळे खुपदा वेगळीच तक्रार नोंदवली जाते. एक 'न केलेल्या अपघाताची' खूप मोठी कहाणी माझ्याकडेही आहे, जमेल तेंव्हा सविस्तर लिहायची खूप इच्छा आहे, कधी योग येतोय कुणास ठाऊक?
18 Jun 2015 - 2:55 pm | झकासराव
बाबौ!!!!
जास्त पुरुष मंडळी असती तर त्यांना जमावाने फारच त्रास दिला असता.
परिस्थिती चांगली हॅन्डल केलीत. तरी त्यावेळचा ताणतणाव आणि चुक नसताना झालेला त्रास हा वाइटच की.
18 Jun 2015 - 3:01 pm | टवाळ कार्टा
+११११११११
18 Jun 2015 - 4:21 pm | इरसाल
शंभरावा
19 Jun 2015 - 3:29 pm | कौशिकी०२५
अशा जखमी माणसाला आपण मदत केलीत हे तुमच्या संवेदनशीलतेचे उदाहरण आहे. ____/\_____. अन्यथा अशा वेळी वैद्यकीय मदत न मिळाल्याने पेशंट्ची परिस्थिती चिघळू शकते. अर्थात तुम्हाला आलेला अनुभव संतापजनकच आहे. पण अशावेळी आपला एक फोनदेखिल एखाद्याचे प्राण वाचवू शकतो.
माझ्या नात्यातल्या काही व्यक्ती वाहन अपघातात जबर जखमी झाल्या होत्या. पैकी एका घटनेत तर एका बड्या धेंडाने अपघात केल्याने पोलिसांनीही आम्हालाच मिटवुन घेण्यासाठी दमदाटी केली होती. :(
19 Jun 2015 - 4:27 pm | सानिकास्वप्निल
ओह्ह!! कठीण आहे :(
भयंकर अनुभव आहे हा सुरंगीताई.