समाजकारण ( माझे मित्र ज्याला थट्टेने राजकारण ही म्हणतात ) करताना बरेच कटु- गोड , चांगले वाईट प्रसंग येतात माझ्यावर! त्यातले काही मनात दाट ठसा उमटवून जातात, कधी मन खुश असते, कधी खुप आतून हेलावला जातो, मानसिक कुचबंणा होते, कधी या समाजरचने चा, त्या मध्ये असलेल्या विकृत प्रवृत्तींचा प्रचंड राग येतो, पण त्या क्षणी मात्र दाखवता येत नाही. आणि दाखविण्यापुरता वेळ ही नसतो, झटापट निर्णय घ्यावे लागतात कारण तिथे मी लीडर आहे, ज्याला नेता ही म्हणतात. गर्दी आपल्या बाजुने असते, माझा त्या क्षणी जर निर्णय चुकला, एखादा शब्द चुकीचा गेला तर त्या गर्दीचा संयम सुटु शकतो. अर्थात हे काही मी एका दिवसात शिकलो नाही. काही मित्र विचारतात, तु च का असतोस तिथे, माझ उत्तर असते, दुसर कोण नव्हत म्हणुन!
अशी मानसिक कुचंबणा झाली की सांगता येत नसे पण म्हणुन मी मूक कधीच नव्हतो, सांगायचो, शेयर करायचो, एका मित्रा बरोबर! दोन वर्षा पुर्वी, एक दिवस तो ही सोडुन गेला मला, आदल्या दिवशी सकाळी साडे-आठ पासुन ते रात्री दिड पर्यंत सोबत होता माझ्या, दुसर्या दिवशी दुपारी साडे-बाराच्या सुमारास येरवड्याच्या विद्युत- दाहिनीत जळत होता माझ्या समोर, त्याची कथा( नव्हे व्यथा) लिहायला घेतली पण कधीच पुर्ण करु शकलो नाही, कारण शेवटचा भाग लिहायला घेतला की तो शेवटचा दिवस माझ्या समोर उभा राहतो आणि मन पुन्हा भावनिक होते, कसा-बसा त्यातुन सावरलो (पुरता नाही!), पण गेले काही दिवसांत घडलेल्या दोन प्रसंगामुळे मला नीटशी झोप लागत नाही.....
जानेवारी महिन्यातील कुठल्याश्या तरी तारखेला ,सकाळी साधारण साडे-दहाची वेळ, बेरोजगारी मुळे आलेली मरगळ झटकण्याकरिता म्हणुन कुठे तरी लांबवर हिंडुन यावे असे वाटत होते, घरात ही विशेष असे काही काम नव्हते. गाडी ला किक मारावी तेव्हढ्यात फोन वाजला, फोनवर श्रीकांत! आपल्या चौकी ला हवालदार आहे. राम-राम, नमस्कार करेपर्यंत देखील वेळ नसावा वाटत, कारण पटदिशी आवाज च आला " चौकीवर ये " तशीच गाडी वळवली आणि चौकीत गेलो. श्रीकांत बाहेरच पडत होता. " आज येव्हढ्या सकाळी? " मी टोमणा मारला, माझ्या इथ चौकी ला सहसा १२-१ पर्यंत कोणीच येत नाही, ते ही रविवारचा बाजार असला तर. अर्थात कमी संख्या-बळ आणि रात्रीचे राउंड पण त्याला कारणीभूत आहेतच.
' चल '
' कुठे ? '
' खांदवे मन्या ने आत्महत्या केली !! '
शॉक लागला, खांदवे मनोहर! माझ्या ईथल बडं प्रस्थ, गुंठामंत्री!! ढिगाने जमीनीचा पैसा आणि गावातल्या चार बे-कायदा बार पैंकी एकाचा मालक!!! गोंडस चेहर्याची पण तितकीच तोंडाळ बायको आणि पाच महिन्यांची तान्हुली!!!! सुशिक्षित पण जुगाराला आणि तमाशाला नादवलेलं, एक, गोरं-चिट्ट, रांगड, तरणं-ताठ पोरगं!!!!
बाईक, श्रीकांतच्या मागे-मागे चेस केल्यागत नेली. वडगांव शिंदे रोड ला, रस्त्यालगत चार-पाच एकराची अजून न विकलेली, शेती होती मन्याची!! शाळु लावलेला होता, पली कडच्या कडेला एक बाभळीच झाड होत. त्याच झाडाला त्याच प्रेत लटकत होत, गळफास आवळलेला!
" उतरवल का नाही अजून ? "
" नाही उतरवल, कोणी हात च लावेना, माझी पण हिम्मत होत नाहीये, अग्नीशामक बोलावले आहे, तास झाला तरी पत्ता नाही."
झाडा भोवती थोडी गर्दी होती, पोलीस दिसल्यावर जरा पांगा-पांग झाली, आम्ही हळु-हळु झाडापाशी आलो आणि तस-तस चित्र अधिक स्पष्ट होवु लागले, झाडापाशी रम चा अर्धा खंबा पडलेला होता. लटकलेल्या शवाकडे लक्ष गेले आणि मला कळुन चुकले की कोणी हात का लावेना ? प्रेताला मुंग्या लागल्या होत्या , काळ्या, लाल!! डोळ्याच्या खोबणीतुन, झाकलेल्या पापण्यांमधुन मुंग्या बाहेर येत होत्या, माझ्या शेजारी उभ्या असलेल्या एका माणसाला तिथच उबळ आली पाहुन !! धावत उलटा मागे गेला.
मी तिथे आल्या पासुन अर्धा तास उलटुन गेला, बरीच लोकं येत होती-जात होती, पण कोणाला काहीच सुचेना, सरते शेवटी मी एक प्रयत्न म्हणुन म्हणालो , शवाखाली खाली थोडी आग पेटवुन बघु , मुंग्या हटल्या तर हटल्या !! मग खाली घमेल्यात थोडी आग पेटविली, पुन्हा सुचलं की मशाल पेटवु या , मग मशाल आणि घोडा घेवुन, एकाला झाडाच्या फांदी पर्यंत जिथ दोर बांधलेली होती तिथ पोचवल, मशाली मुळे मुंग्याची पांगापांग झाली आणि दोरी हळु-हळु सोडली, खालची आग काढुन घेतली , आम्ही चार चौघानी शव चादरी त लपेटुन घेतल आणी खाली आणल. अॅम्बुलन्स पर्यंत नेल.
मी रहातो ते गाव ,तुकाराम महाराजांच जन्मस्थान असल्याने पवित्र मानल जात. गाव तस चांगल आहे,( की होत ? ) . जमीनी विकल्या गेल्या आणि लोकांच्या खिशात पैसा खुळखुळायला लागला, नव्हे, ओसंडुन वहायला लागला, लक्ष्मी चंचल बनविते म्हणतात , पैसा आला त्या बरोबर चंचलता ही. गावात पाच वर्षापुर्वी केवळ एक देशी दारुच दुकान होत, आणि महाराजांच्या याच गावात आता चार बियर शॉपी, सहा-सात बे-कायदा बार, प्रायव्हेट तमाशाची बैठक, आणि बोटावर न मोजता येण्या-इतपत जुगारीचे धंदे आहेत. याच एका जुगारीच्या धंद्यावर त्या दिवशी रात्री मन्याबरोबर..................
संध्याकाळी चार वाजेपर्यंत मन्या बैठकीत होता.( चंचलतेमुळे होणार्या खर्चाची कल्पना यावी म्हणुन सांगतो, एका तासाच्या, प्रायव्हेट बारीचे ३०००/- रु. आणि वर उडविले जाणारे वेगळे !! ) तिथ त्याने थोडीशी घेतलेली होती, मग त्याच्या स्वताच्या बार मधे बसुन क्वार्टर पिला आणि थेट जुगारीच्या धंद्यावर गेला. पत्ते खेळता-खेळता अजुन एक घेतली, त्यात हारत होता. खिशातले संपले, तिथल्या चार चौघांनी उसनवारी ची थट्टा केली, गडी पेटला, घरी आला. बायकोच्या कपाटातले दिड-एक लाख रु. , तिच्याशी भांडत काढले, गाडी खाली लावलेली होती, निघताना बायकोने बाल्कनीतुनच शिव्या घातल्या. " घरी ये मग दाखवते " म्हणुन तावा-तावाने आत निघुन गेली. ईकडं रात्री तुन हा ते पैसै पण हारला, नशा ही उतरली, वैतागलेल्या बायकोना दरवाजा उघडला नाही, पश्चातापदग्ध अवस्थेत तो निघुन गेला.....कायमचा .......
मी, त्याच्या बायकोला , त्या तान्हुलीला येता-जाता कधे-मधे बघतो त्याच बाल्कनीत , मन्याची बायको तान्हुलीला खेळवायचा आणि उसनवारी च हसु आणुन, ओळख द्यायचा प्रयत्न करते, पण दोघांच्या ही चेहर्यावरचे हास्य केव्हाच मावळले आहे, पश्चाताप तर आहेच. जर त्या माय-माऊली ला कल्पना असती की तिच्या तोंडाळ वक्त्यव्याने असे काही होईल तर मला नाही वाटत की तिने त्या पाच महिन्याच्या तान्हुलीला पोरके आणि स्वताला विधवा केले असते. अर्थात चुक मन्या ची पण, पण नेमकी मन्याची की , त्याच्या उसन वारीची थट्टा करणार्यांची, की त्या ओंथबुन वाहणार्या पैशामुळे आलेल्या माजाची, माहीत नाही, करून घ्यायचे नाही. सहसा असाच कधीतरी त्याच्या हॉटेलात शिरल्यावर, पांढर्या शुभ्र वेषात, दमदार आवाजात ' अरेss , राsम - राsम मालक !! ' असे आवेशात स्वागत करणारा, जुजबी का असेना, ओळख असणारा मन्या गेला आणि त्या दिवसापासुन माझ्या डोळ्यामधुन शिरलेल्या कित्येक मुंग्या माझा मेंदू पोखरत आहेत....
क्रमश ..
प्रतिक्रिया
28 Mar 2012 - 1:27 pm | प्रचेतस
तुझे लेख नेहमीच अंतर्मुख करून जातात रे.
28 Mar 2012 - 1:27 pm | सांजसंध्या
........................
28 Mar 2012 - 1:28 pm | जाई.
...
28 Mar 2012 - 1:29 pm | परिकथेतील राजकुमार
चंचलता...
लिखाण आणि अनुभववर्णन नेहमीप्रमाणेच दाहक. तू लिहितोस असे कधी वाटतच नाही, समोर प्रसंग साकार करत असतोस.
28 Mar 2012 - 1:54 pm | गणपा
अगदी असेच म्हणतो.
:(
28 Mar 2012 - 5:45 pm | पांथस्थ
सहमत.
सुहासचे अनुभव आणी सांगायची शैली दोन्ही अप्रतिम.
28 Mar 2012 - 1:35 pm | प्रकाश घाटपांडे
व्यक्तिचित्र रंगवण्याची उत्तम होतोटी! आता क्रमशः पुर्ण कर म्हणजे झालं!
28 Mar 2012 - 2:01 pm | सर्वसाक्षी
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
28 Mar 2012 - 1:38 pm | मन१
अरेरे
28 Mar 2012 - 2:04 pm | पैसा
जबरदस्त! पुढचा भाग लवकरच येऊ दे!
28 Mar 2012 - 2:11 pm | समीरसूर
सुन्न वाटते आहे. लिखाण खूप प्रभावी आहे. प्रसंग अगदी जसेच्या तसे डोळ्यासमोर घडतायेत असे वाटले.
यात मनोहरच्या पत्नीची काही चूक आहे असे अजिबात वाटत नाही. तिने सावरायचा प्रयत्न केला. पैसा उधळण्याची चटक लागलेले प्रेमाच्या भाषेने सरळ रस्त्यावर आणण्यापलिकडे गेलेले असतात. त्यांच्यासाठी थोडी कडक भाषाच वापरावी लागते. मनोहर केवळ स्वत:च्या बेताल आणि अतिरेकी वागण्यामुळे गेला असे वाटते.
बेकायदा धंदे करून येणारा पैसा, विनासायास लॉटरी लागल्यासारखा मिळालेला महामूर पैसा, आणि सारासार विचार करण्याच्या क्षमतेचा अभाव हे फार जहरी काँबिनेशन आहे. माणसाला जहरी दंश करून आयुष्यातून उठविण्यासाठी यापेक्षा घातक काँम्बिनेशन असू शकत नाही.
काही काही लोकांना आपसूक येणारे सुख लाथाडून स्वतःहून विनाशाच्या मार्गावर जीवघेण्या वेगाने झोकात दौडायला खूप आवडते. मनोहर त्यातलाच एक. आत्महत्या नसती केली तर काही वर्षांनी कफल्लक होऊन फिरला असता आणि बायको पोरीच्या डोक्याला मनःस्ताप ठरला असता किंवा कुठल्यातरी तुरुंगात खितपत पडला असता किंवा काळोखात लपलेल्या उपद्रवी उंदरासारखा राजकारणाच्या किळसवाण्या आडोशाला लपून नामचीन गुंड म्हणून पांढरे कपडे घालून उजळ माथ्याने फिरला असता. समोर लोकांनी सलाम ठोकला असता पण मागे शिव्यांची लाखोली वाहिली असती. विनाशाच्या वाटेवर उधळलेल्यांचा अंत करुण वाटत असला तरी तो त्यांनी फक्त स्वतःच्या हाताने ओढवलेला असतो हे विसरता कामा नये.
बेकायदा बार चालवणे, जुगाराचे धंदे चालवणे, रात्रभर ढोसत राहणे, दारुच्या त्या अनिर्बंध आणि अंध नशेत जुगार खेळणे, बायकोच्या भावनांचा विचार न करता दीड लाख रुपये एका रात्रीत जुगारात हरणे या अतिरेकी कृत्यांचं समर्थन होऊच शकत नाही आणि म्हणूनच मनोहरच्या कुठल्याच कृत्याचंदेखील समर्थन होऊ शकत नाही. दारू पिणे आणि जुगार खेळणे हाच फक्त आयुष्याचा अर्थ आहे का? अपरात्री इरेला पेटून बायको विरोध करत असतांना दीड लाख रुपये उधळणे हीच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे का? दुर्दैवाने पुण्याच्या आसपास (किंवा गुरगांव, नोईडा) अशा मस्तवाल आणि मुजोर धनदांडग्यांनी वातावरण गढूळ करून ठेवले आहे.
एक क्ष नावाचा मुलगा. वशिला लावून, मार्क वाढवून आणि नाना तर्हेचे उपद्व्याप करून एमबीबीएस डॉक्टर झाला खरा. बरं, आता झाला कसाबसा डॉक्टर तर नीट मार्गाने चालावे ना त्याने? पण नाही, मनातली वळवळ सरळ चालू देईल तर ना. मग मेडिकल ऑफीसर म्हणून एका गावात रुजू झाल्यावर नर्सशी लफडी कर, कुणावर हात टाक, कुणाशी सलगी करण्याचा प्रयत्न कर असले प्रकार सुरु झाले. त्या गावात लोकांनी त्याला बदडून काढलं. मग क्वार्टरमध्ये दारूच्या पार्ट्या कर, रात्री-बेरात्री दारू पिऊन गोंधळ घाल, हॉस्पीटलच्या खोल्यांमध्ये, ओपीडीमध्ये बिनधास्त सिगारेटी ओढ, दिवसेंदिवस गायब रहा, लोकांशी अरेरावीने बोल, रुग्णांना तपासण्यात अक्षम्य हलगर्जीपणा कर असले प्रकार ही सुरुच होते. कुठल्यातरी गंभीर प्रकरणात त्याच्यावर इतके शेकले की शेवटी त्याला राजीनामा देऊन पळून जावे लागले. बदनामीचा डाग लागला तो कायमचाच. स्वतःची प्रॅक्टीस सुरु केल्यावर एकट्या-दुकट्या पोरींना पेशंट म्हणून पाठवणं लोकांनी बंद केलं. कित्येक लोकांनी त्याला दारातूनच कटवणं सुरु केलं. आता बोला, काय अर्थ आहे असल्या लाजिरवाण्या आयुष्यात?
तर असं आहे, आयुष्याची गाडी कुठल्या रस्त्यावर न्यायची हे ज्याचं त्याने ठरवायचं. संधी सगळ्यांनाच मिळतात पण कुणी त्या संधीचं सोनं करतो तर कुणी माती!
28 Mar 2012 - 2:17 pm | ५० फक्त
त्याच्या बायकोनं जे केलं ते उत्तम केलं, दोघंही सुटली लवकरच खेळखंडोब्यातुन.
बाकी लिखाण एकदम उत्तम, भाषा एकदम भिडणारी. पण पुन्हा तेच, हल्ली तिच्यायला मन सुन्न वगैरे होत नाही, कुणी मेलंय असं ऐकलं की , घरातल्यांना इन्सुरन्सचे कागदपत्र हुडकायचे असतात फक्त,
28 Mar 2012 - 2:29 pm | सहज
सुहासचा लेख म्हणजे वीज असते. आधी लख्ख प्रकाश दिसतो, (वाचून) थोड्या वेळाने कडाडतो.
पुढचा भाग येउ दे लवकर.
28 Mar 2012 - 2:39 pm | मी-सौरभ
पूर्ण सहमत
28 Mar 2012 - 2:45 pm | प्यारे१
आयच्चं ह्या वाशाच्या....
लिहीत नाही तेव्हा का लिहीत नाही म्हणून प्रश्न आणि लिहील्यावर का लिहीलं म्हणून....
चोच्या, वाईट आहेस रे फार.... :(
28 Mar 2012 - 2:53 pm | निश
सुहास साहेब खरच जबरदस्त लेख.
एकदम कट्यार काळजात घुसावी तसा लेख झाला आहे.
खरच जबरदस्त.
28 Mar 2012 - 2:58 pm | मदनबाण
पैसा,सत्ता आणि ज्ञान ह्याची हवा मनुष्य प्राण्याच्या डोक्यात गेली की ती उतरच नाही.
पुढच्या भागाची वाट पाहतोय !
28 Mar 2012 - 3:05 pm | बिपिन कार्यकर्ते
वाचतोय रे. बाकी, नेहमीचंच. क्रमशः मात्र पूर्ण कर.
28 Mar 2012 - 3:19 pm | श्रावण मोडक
वाचतो आहे...
28 Mar 2012 - 3:33 pm | नगरीनिरंजन
हे सत्य असेल तर कल्पिताहून सत्य अद्भुत असतं असं का म्हणतात याची खात्री पटते आणि सत्य नसेल तर तुमचे लेखन कौशल्य अद्भुत आहे असे म्हणावे लागेल!
पुढच्या भागाची वाट पाहतोय असे म्हणता येणार नाही पण टाकला तर वाचावाच लागेल हे नक्की.
28 Mar 2012 - 3:51 pm | शैलेन्द्र
लेखन म्हनुन तर छानच आहे, पण या अनुभवावर काय बोलणार?
यांच्या पुर्वजांनी हाडाची काड करुन या जमीनी यांच्या हाती दिल्या, आनी यानी गुंथेवारीत काढल्या..
28 Mar 2012 - 3:56 pm | मुक्त विहारि
सध्या एव्हढेच लिहितो...
28 Mar 2012 - 5:03 pm | पिंगू
सत्यकथन असल्याने आणि ह्या गोष्टी जवळून पाहिल्याने काही भावनिक आवेग वैगरे आला नाही. कारण पैशाची नशा माणसाला आंधळी बनवते.
बाकी सुहाश्याचे लेखन म्हणजे एक जिवंत अनुभव. उगाच काही मनाचे खेळ नसतात.
- पिंगू
28 Mar 2012 - 5:53 pm | रेवती
तुझे लेखन वाचवत नाही.
28 Mar 2012 - 7:09 pm | किसन शिंदे
त्या सत्य घटनेची दाहकता तुझ्या लिखानामुळे जास्त परिणामकारक रित्या समोर येतेय.
पुढचा भाग टाक पटकन...
28 Mar 2012 - 11:43 pm | फारएन्ड
जबरदस्त लेख आहे!
29 Mar 2012 - 4:30 am | स्पंदना
हं. आता पुरा दिवस तूझ्या डोळ्यातल्या मुंग्या आमच्या डोक्यात.
काय खर नाही आजच्या दिवसाच.
29 Mar 2012 - 5:09 am | शिल्पा ब
<<जर त्या माय-माऊली ला कल्पना असती की तिच्या तोंडाळ वक्त्यव्याने असे काही होईल तर मला नाही वाटत की तिने त्या पाच महिन्याच्या तान्हुलीला पोरके आणि स्वताला विधवा केले असते.
म्हणजे काय? तिने बिचारीने त्याला या गटारीतुन बाहेर काढायचा प्रयत्न केला असणार. तिने काय त्याला माडीवर सोडुन नाच, जुगार संपल्यावर घ्यायला जावं असं वाटलं का तुला?
शेवटी ज्याचं त्याचं नशीब.
असो...लिहिलंय छान.
31 Mar 2012 - 10:25 am | sneharani
पुढचा भाग येऊ दे पटकन!!
कसबसं झालं वाचून ...
:(
31 Mar 2012 - 12:46 pm | मृगनयनी
सुहास.. जी... खरोखर प्रसन्ग डोळ्यासमोर उभा राहिला..
प्रेताचं मुन्ग्या लागलेलं वर्णन वाचून खरंच उमळून आले.. :(
नि:शब्द.. :|
अजून येऊ द्यात....
31 Mar 2012 - 1:07 pm | मृत्युन्जय
खुप दाहक लिहितोस रे बाबा. तिसर्यांदा वाचला हा लेख परत. प्रत्येकवेळेस डोक्याला झिणझिण्या आल्या. परत वाचायचे नाही ठरवुन वाचत राहिलो.
27 Jun 2014 - 1:23 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
च्यायला...
27 Jun 2014 - 2:55 pm | म्हैस
मन्याने आत्महत्या केली तर त्यात एवढं व्यथित काय व्हायचं ? त्याची कर्मं बघितली तर त्याला योग्य ती शिक्षा झाली
28 Jun 2014 - 4:46 pm | सुहास..
त्या बाळाला ..असो
27 Jun 2014 - 10:16 pm | सस्नेह
इतक्याने सेंटी-मेंटी झालास तर जीवनाच्या रगाड्यात कसा टिकाव धरणार ?