मंडळी तुम्ही म्हणाल, सध्या सण-वारांचे दिवस, सर्वत्र उत्साही वातावरण. थोडक्यात 'आल इझ वेल' असताना, ही कुठल्या रसाची कविता का पब्लिश केली आहे? त्याचं काय आहे की अनेक सल, जखमा, व्रण वागवत आपली वाटचाल सुरु असते. जो जिवंत आहे त्याला जगणे चुकत नाही. परंतु, काल नेट वर कहीतरी शोधत/वाचत असताना मुंबईतील हल्ल्यांचा व स्फोटांचा संदर्भ आला व त्या अनुशंगाने तेंव्हा लिहीलेली ही कविता आठवली. जखमेवरची खपली निघाली व ती जखम उघडी पडली..
तुम्हाला दु:खी करण्याचा किंवा नको त्याची आठवण करून देण्याचा मानस नक्कीच नाही. तरी तसे झालेच तर माझी दिलगिरी कबुल करावी ही विनंती !
जगत असतो आपण जगासाठी
पण आत कुठेतरी रोजचे मरण...
छोट्या छोट्या सुखांसाठी,
श्वास आपले रोजच तारण !
७:३२ गाडी आली, श्वास टाकला
पळत-धावत आत शिरलो - श्वास सोडला...
अंगाला अंग, पाठीला पाठ
न थांबणार्या घामाच्या धारा त्यात--
तरी ओठांवर हलके हसू...
बॉसच्या आधी आज जागेवर असू !!!
खुशी-खुशी ऑफ़िसात शिरलो...
लिफ्ट समोर गर्दी, चांगलाच घाबरलो...
आजच साली बंद पडायची होती___
जिन्याकडे जातानाच जणु शक्ती गळाली होती...
धपापत-धडपडत जागेवर पोहोचलो,
बॉस ला तिथे बघून, चांगलाच चपापलो!
आजची ही पण संधी गेली...
हं....., आता फाईल वर, डोकं खाली !!!
शत्रूपक्षातील मित्रांच्या गाली
तरळलं असेल कुचकट स्मित...
थोडावेळ कॅन्टिन ला जाऊन
बसावं झालं चहा पित !
असाच काहीसा लळत-लोंबत दिवस संपतो..
६:१७ पकडायला मी जीव खाऊन पळत सुटतो !!!
आज लग्नाचा वाढदिवस...
पण दिवसभर झालाच त्रास,
दिन गया बात गायी, आता-
रात्री नक्कीच करू काही खास !
मनात अशा सुंदर विचारांची साखळी
आणि....
स्टेशनात शिरता-शिरता
डोळ्यासमोरून गाडी हालली.........
बोंबला ! आजचा दिवसच नाही आपला..
म्हणंत टॅक्सीवाल्याला हात करताना..
खिसा सुद्धा तपासला....
साडी ऐवजी आता फक्त फुलांवरच भागवा...
परत डोक्यात विचारांचे चक्र-------
मंतरलेली रात्र कट --
बहुदा असणार रुसवा अन फ़ुगवा !!!!
--साब, आज़ टॅक्सी बंद है
धंदा आज़कल वैसेभी मंद है !
पता नही कैसे गुज़ारा होगा?
ऐसे तो हररोज़ ही मरना होगा !!
.........
......
.....
................
.............
तू सुखरुप घरी आलास-
यात सगळं भरून पावलं...
६:१७ च्या बॉम्ब-स्फोटात----
कोणीच नाही रे वाचलं.............
माझ्या अंगातून क्षणात एक
भितीची लहर सळसळत गेली....
आणि पापणीवरचं पाणी टिपत
तिनंही मला घट्ट मिठी मारली.................................
प्रतिक्रिया
23 Sep 2010 - 4:59 am | शुचि
थरारक
23 Sep 2010 - 5:04 am | बेसनलाडू
मुंबईचे जनजीवन, मुंबईकरांची मानसिकता वगैरे कित्येक वर्षे प्रत्यक्ष अनुभवले/स्वानुभवले आहे. त्यामुळे कवितेतील भावनांशी लगेच जवळीक निर्माण होते.
(मुंबईकर)बेसनलाडू
यावरून आठवले:
११ जुलै २००६ च्या लोकल बाँबस्फोटांनंतर माझी जी तात्काळ, संतप्त प्रतिक्रिया झाली, ती अशी -
निपचित पडलेली लेकरे माउलीची
विव्हळत भोवळली आर्तताही स्वतःशी
विनयभंग आता आणखी सोसवेना
सहनशील आम्ही! दुःख हे बोलवेना
दिवस 'सोनिया'चे, 'मोहना'चे 'विलासी'
कण्हत-कुढत सोसे आज़ मुंबापुरी ही
दहशतीस बोला, आवरावे कुणाच्या?
'कहर','तोयबा'च्या; 'लालु' की 'कायदा'च्या?
पदर फेडलेली बापडी माय माझी
शरम पण तुला ना गंज़ल्या मनगटांची
भरुन बांगड्या घे वांझ या संयमाच्या
उडव कबुतरांना पांढऱ्या-शांततेच्या!
सहनशीलता अन् षंढता भिन्न आहे
समज़ले तुला? की आणखी वेळ आहे?
धुमसत्या चितांचे कर्ज़ डोक्यावरी घे
परतफेड म्हणुनी पेटती अंतरे दे
फुकट दवडण्याला वेळ उरलाच नाही
उगव सूड आता, मागणे अन्य नाही
ज़खम खोल आहे; फ़ायदा हा, न तोटा
मलम कर तिचे अन् होउदे वार मोठा
(स्मरणशील)बेसनलाडू
23 Sep 2010 - 5:56 am | शुचि
दाहक
23 Sep 2010 - 10:58 am | अथांग
..स्वनुभवाचे असल्याने जास्त प्रखर आहेत आणि खूपच थेट. मी जे काही लिहिलय ते केवळ एका संवेदनशील जाणीवेतून, ऐकीव आणि वाचलेल्या वर्णनातून.
विव्हळत भोवळली आर्तताही स्वतःशी - फारच भिडले.
23 Sep 2010 - 3:10 pm | मेघवेडा
>> मुंबईचे जनजीवन, मुंबईकरांची मानसिकता वगैरे कित्येक वर्षे प्रत्यक्ष अनुभवले/स्वानुभवले आहे. त्यामुळे कवितेतील भावनांशी लगेच जवळीक निर्माण होते.
अगदी असेच म्हणतो.
छान! :)
23 Sep 2010 - 7:26 pm | संदीप चित्रे
विशेषतः ..> ६:१७ च्या बॉम्ब-स्फोटात----
कोणीच नाही रे वाचलं.............>> ह्या ओळींमु़ळे मिळालेली कलाटणी..
लिहिते रहा !
24 Sep 2010 - 4:24 am | अथांग
नेमकेपणा तुम्ही टिपलात, छान वाटले. या गोष्टी अशाच घडतात ना, एका क्षणात. सगळं काही सुरळीत(रोजच्या कटकटींसकट) चाललेलं असतं, आणि अचानक...असं काहीतरी घडतं की होत्याचं नव्हतं होतं. आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते.
आसो, चालायचंच.
-अथांग
24 Sep 2010 - 12:57 am | शिल्पा ब
:-(