'असल उत्तर'! भाग-३

मुशाफिर's picture
मुशाफिर in जनातलं, मनातलं
10 Sep 2010 - 1:31 am

आधीच्या भागात म्हटल्याप्रमाणे, पाकिस्तानी सैन्याने (११ वी डिव्हिजन) खेमकरण जवळचा काही भाग ताब्यात घेउन भारतीय भूभागात प्रवेश केला होता (अशाप्रकारे ताब्यात घेतलेल्या भागाला बहुतेकदा 'ब्रिजहेड' असा शब्द वापरतात, जिथे सैन्याची जमवाजमव करून पुढे हल्ला केला जातो). पाकिस्तानच्या ताब्यात साधारणतः ३०-४० चौ. कि. मी. एव्हढा भाग आला होता. पण यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा भूभाग बरेच कालवे, नद्या आणि ओढे ह्यांनी बर्‍यापैकी वेढलेला होता. ह्या भौगोलिक परिस्थितीचा भारतीय सैन्याने अतिशय योग्य असा वापर 'असल उत्तर' च्या लढाईत करून घेतला. भारतीय सैन्याने ठिकठिकाणी कालवे फोडून आसपासच्या भागात पाणी सोडून दिलं, ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याला हालचाल करणं कठीण होउन बसावं. ('बहुगुणीं'नी मागच्या भागाला लिहिलेल्या प्रतिसादात ह्या संदर्भातल्या विडिओची लिंक दिलेली असल्याने पुन्हा इथे देत नाही).

पाकिस्तानी चिलखती दलाच्या १ल्या डिव्हिजनच्या ५ ब्रिगेडनी केलेल्या हल्ल्याने 'असल उत्तर' च्या लढाईला सुरूवात झाली. भारताच्या ४थ्या माउंटन डिव्हिजनच्या मदतीला आता २ र्‍या चिलखती ब्रिगेडच्या २ रेजिमेंट (१ AMX-13 आणि १ 'सेंचुरियन' रणगाडा रेजिमेंट) आल्या होत्या. तर पाकिस्तानच्या १ ल्या चिलखती डिव्हिजनबरोबरच ११ वी इन्फ्रन्ट्री डिव्हिजनही ह्याच भागात होती.

भौगोलिक परिस्थीती जरी बरिचशी भारतीय सैन्याला अनुकूल असली, तरी भारतीय सैन्याची युद्धसामग्री पाकिस्तानचा पराभव करण्याएव्हढी नक्कीच सक्षम नव्हती. शेरमन रणगाड्यानी लांबून डागलेले तोफगोळे 'पॅटन' रणगाड्यांच चिलखती संरक्षक कवच भेदण्यास असमर्थ होते (बहुतेकदा ते चिलखती कवचाला आपटून खाली पडत. त्याच इंग्रजीत केलेलं वर्णन म्हणजे "At longer ranges Indian shot simply bounced off the Pattons" ). भारतीय सैन्याकडे असलेले AMX-13 हे रणगाडेही फार फार तर टेहळणी करण्याकरता वापरता येण्यासारखे होते. चिलखती कवच असलेली एक गाडी यापेक्षा जास्त त्यांचा उपयोग (एकूण परिस्थिती संदर्भात) नव्हता, असे ह्या लढाईचे अभ्यासक मानतात. भारताकडे असलेल्या 'सेंचुरियन' रणगाड्यांची अवस्थाही 'शेरमन' पेक्षा फार वेगळी नव्हती. आधीच्या भागात म्हटल्याप्रमाणे भारतीय सैन्याकडे असलेल्या तोफांची संख्या आणि क्षमता फारच मर्यादित होती. एकूण पाहता ह्या लढाईत पाकिस्तानकडे असलेल्या रणगाड्यांच संख्याबळ हे ३:१ अस होत. दोन्ही बाजूंकडे असलेलं एकूण मनुष्यबळातही (संख्याबळाच्या दृष्टीने) फार फरक नव्हता. 'पॅटन' रणगाडे भेदण्यासाठी त्यांच्यावर फार जवळून मारा करणं हा एकच मार्ग होता. अशा परिस्थितीत पाकिस्तानी रणगाड्याना रोखणं जवळपास अशक्य होतं.

त्यातच पाकिस्तानच्या सैनिकी दलाचे प्रमुख (चीफ ऑफ जनरल स्टाफ) स्वतः युद्धभूमीवर येवून त्यांच्या सैन्याला आदेश देत होते (काही अभ्यासकांच्या मते ही कृती पाकिस्तानसाठी घातक ठरली, पण त्यातून पाकिस्तानने 'असल उत्तर' जिंकण्यासाठी किती जोर लावला होता, हेही दिसून येतं).

इथे भारतीय सैन्याच्या धाडसाच आणि व्युव्हरचनेच कौतुक करावं तेव्हढ थोडं आहे. नुकत्याच तयार झालेल्या ऊसाच्या शेतात भारतीय सैन्याने आपले रणगाडे लपवून ठेवले आणि आपली जागा शत्रू सैन्याला कळू नये म्हणून पाकिस्तानी सैन्य ५००-८०० मी. पर्यंत जवळ आल्यावर प्रतिहल्ल्याला सुरूवात केली. घोड्याच्या नालेच्या आकारात केलेल्या संरक्षक रचनेमुळे पाकिस्तानच्या रणगाडे चांगलेच सापळ्यात अडकले. आणि त्याच्यांवर ३ बाजूंनी हल्ला झाला.

ह्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आणि नक्की कोणत्या बाजूने हल्ला होतोय? हेच न कळल्यामुळे पाकिस्तानचं आघाडीवरच सैन्य पूर्णपणे गोंधळून गेलं. त्यातच भारतीय सैन्याने कालवे फोडून पाणी सोडून दिलं असल्याने जमीनही फार भूसभूशीत झाली होती, त्यामुळे पाकिस्तानी सैन्य रणगाडे आणि इतर सामग्रीही नीट हाताळू शकतं नव्हतं. पाकिस्तानी सैन्याची पुरती दाणादाण उडाली.

लढायचं सोडून बरेचसं पाकिस्तानी सैन्य अक्षरशः पळत सुटलं ते थेट सीमेपलिकडे पाकिस्तानी भूभागात पोहोचेपर्यंत थांबलच नाही. त्यातच काही पाकिस्तानी अधिकार्‍यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी मारले गेल्यावर पुढील जबाबदारी स्विकारायलाच नकार दिला. ह्यातून ह्या पराभवामुळे हल्ला करणार्‍या पाकिस्तानी सैन्याच मनोबल किती खलावलं होतं, हे दिसून येत. एकूण ९७ 'पॅटन' रणगाडे ह्या एकाच लढाईत पाकिस्तानने गमावले (भारताने फक्त ८ रणगाडे गमावले होते). युद्धानंतर ह्या भागाला 'पॅटन नगर', 'पॅटन रणगाड्यांच कब्रस्तान' अशी बरीच नावं दिली गेली.

भारतीय सैन्याच्या दृष्टीने हा एक मोठा विजय होता कारण पाकिस्तानी सैन्याचा अभिमान असलेली त्यांची १ ली चिलखती डिव्हिजन ७ ते १० सप्टेंबर दरम्यान अक्षरश: निकालात निघाली. १० सप्टेंबर १९६५, म्हणजे आजच्याच दिवशी, 'असल उत्तर' ची लढाई आपल्या सैन्याने जिंकली.

अवांतरः हे तीनही लेख मी जालावर उपलब्ध असलेल्या लेखांच्या आणि पुस्तकांच्या काही भागातून मिळालेल्या माहितीच्या आधारे लिहीले आहेत. त्यात अजूनही काही रंजक माहिती हाती लागली आहे, ती सगळीच इथे देता येणं शक्य नाही. पण पुढे कधीतरी शक्य झाल्यास त्याबद्दलही लिहावं, असा विचार आहे. नाहीतर, ही लेखमाला इथेच समाप्त.

अतिअवांतरः 'असल उत्तर' विषयी वाचतानाच अचानकपणे १९६२ च्या भारत-चीन युद्धाविषयीही थोडी फार माहीती हाती आली. त्यातल्या 'रेझांग ला' विषयी पुन्हा कधीतरी.

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

नि३'s picture

10 Sep 2010 - 1:36 am | नि३

जबरदस्त..

पुष्करिणी's picture

10 Sep 2010 - 1:44 am | पुष्करिणी

मस्त झाली लेखमाला. चिनी युद्धावर जरूर लिहा

पुष्करिणी's picture

10 Sep 2010 - 1:46 am | पुष्करिणी

प्रकाटाआ

छान आहे.
तुम्हाला सापडलेले लेख किंवा इतर संदर्भ यांचे दुवे देता का?

आणि रेझांग ला - शैतानसिंगची गोष्ट मला फार आवडते. वारंवार हल्ले करूनही त्याची चौकी चिन्यांना जिंकता आली नाही. मग ते ठाणे तसेच सोडून आजूबाजूची ठाणे त्यांनी जिंकून घेतली. शेवटी सगळीकडून घेरले गेल्यावर सतत ४८ का ७२ तास लढून तो जेव्हा बेशुद्ध पडला तेव्हा कुठे तिथे चिन्यांचे निशाण लागले ( तो एकटाच उरला होता)

मुशाफिर's picture

10 Sep 2010 - 2:48 am | मुशाफिर

पाकिस्तानी बाजूने लिहिलेली पण बरीच चांगली माहीती देणारी ही एक लिंक आहे: http://www.defencejournal.com/may98/thewayitwas4.htm

मुशाफिर.

जबरदस्त! मस्तच झाली लेखमाला. अजून येऊ द्या! :)

नंदन's picture

10 Sep 2010 - 2:58 am | नंदन

असेच म्हणतो. 'रेझांग ला'बद्दल वाचण्यास उत्सुक.

स्वप्निल..'s picture

10 Sep 2010 - 7:56 pm | स्वप्निल..

रेझांग बद्दल लिहाच! वाचायला आवडेल!

येस्स! जरुर लिहा.
काही ठराविक चवितचर्वणी लेखांपेक्षा हे लिखाण खूप अस्सल आहे!

सुनील's picture

10 Sep 2010 - 3:14 am | सुनील

छान. असेच येऊदे इतर लढायांबद्दल!

अर्धवटराव's picture

10 Sep 2010 - 4:00 am | अर्धवटराव

आता आपल्याकडुन नव्या लेखमालेची वाट बघतोय !!

अर्धवटराव

या युद्धाच्या संदर्भातील काही महत्वाच्या नोंदी:

१: पाकिस्तानच्या First Armoured division चा तरूण लेफ्टनंट होता - परवेझ मुशर्रफ

२: भारताच्या शेरमन रणगाडे घेऊन लढणार्‍या 9th Deccan Horse Division चं नेतृत्व होतं तेंव्हा लेफ्टनंट कर्नल असलेल्यानरल अरूणकुमार वैद्य यांचं.

एका हाती recoil-less gun ने तीन पॅटन रणगाडे निकामी करीत शहीद झालेल्या अब्दूल हमीदविषयी इथे वाचायला मिळेल.

या युद्धात पॅटन रणगाड्यांचं शिरकाण कसं झालं त्याची छायाचित्रे इथे पहायला मिळतील.

वरील आधिकृत दुव्यावरच भारताचे ८ नव्हे तर ३२ रणगाडे (बहुतांशी शेरमन) निकामी झाल्याचा उल्लेख आहे, त्यांपैकी १५ पाकिस्तान्यांनी ताब्यात घेतले होते. भारतीय सैन्याने ९७ पाकिस्तानी रणगाडे (७२ पॅटन आणि २५ शेरमन/चॅफी) ताब्यात घेतले, यांपैकी २८ पॅटन रणगाड्यांसह ३२ रणगाडे भारताने चालू स्थितीत ताब्यात घेतले. [यांपैकी एका पॅटन रणगाड्याच्या टरेट वर चढून अभिमानाने फोटो काढून घेतलेला मला आठवतो, ज्याच्या मुळे हा रणगाडा पहाणं शक्य झालं तो माझा मामा Military Engineering Services मध्ये गॅरिसन एंजिनीअर होता आणि १९७१ च्या युद्धात त्याच्या पथकाने महत्वाची कामगिरी बजावली होती याचा खूप अभिमान आहे!]

माझ्या लेखनात मी केलेला ८ रणगाड्यांचा उल्लेख मी पूर्वी एकदा वाचलेल्या लेखातील होता. पण बहुदा तो लेख फक्त 'असल उत्तर' च्या जवळ झालेल्या १० सप्टेंबरला लढाईतल्या पहिल्या हल्ल्याविषयी होता. 'असल उत्तर' भागात ८ ते १० सप्टेंबर च्या ३ दिवसात एकूण ९ हल्ले झाले असा अधिकृत आकडा (चू.भू.द्या.घ्या.) आहे. त्यामुळे, चुकीची माहिती लिहीली गेल्याचा दोष माझाचं आहे. तसचं पाकिस्तानचे एकूण ९७ रणगाडे निकामी झाले (भारताने नष्ट केले किंवा ताब्यात घेतले) ते खेमकरण परिसरात (खेमकरण सेक्टर) फक्त 'असल उत्तर' मध्ये म्हणणं हे पूर्णत: योग्य नाही. आणि निकामी झालेले रणगाडे हे सगळेच 'पॅटन' रणगाडे नव्हते, हेही नमूद करायला हवं.

बहुगुणीजी, तुम्ही दिलेली माहिती ही अधिक योग्य आहे. यापुढील लेखनात विदा शक्य तेव्हढा पडताळून पाहूनच लिहीण्याचा प्रयत्न करेन.

संपादकांनी कृपया लेखात हे बदल करावेत. तसदीबद्दल दिलगीर आहे.

मुशाफिर.

सहज's picture

10 Sep 2010 - 6:30 am | सहज

छान लेखमाला.

अजुन येउ दे!

बेसनलाडू's picture

10 Sep 2010 - 6:38 am | बेसनलाडू

तीनही भाग एकमार्गी वाचले. आवडले. आणखी असेच लेखन वाचायला आवडेल.
(वाचक)बेसनलाडू

प्रभो's picture

10 Sep 2010 - 8:58 am | प्रभो

लेखमाला आवडली...पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत.. :)

अब् क's picture

10 Sep 2010 - 12:50 pm | अब् क

पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत..

अनामिक's picture

10 Sep 2010 - 6:03 pm | अनामिक

तिनही भाग आवडले.

विलासराव's picture

10 Sep 2010 - 6:48 pm | विलासराव

'रेझांग ला' विषयी उत्सुकता आहेच.

धमाल मुलगा's picture

10 Sep 2010 - 7:04 pm | धमाल मुलगा

सायबा,
मस्त लिहिलंय. आवडलं. पण एक सांगू? फारच घाईघाईत उरकुन टाकल्यासारखं वाटलं बुवा. आणखीही माहिती दिली असती तर उत्तम झालं असतं असं मला आपलं वाटतं बघा. :)

त्यात अजूनही काही रंजक माहिती हाती लागली आहे, ती सगळीच इथे देता येणं शक्य नाही. पण पुढे कधीतरी शक्य झाल्यास त्याबद्दलही लिहावं, असा विचार आहे.

अगदी वाट पाहतो आहे. नक्की लिहा.

आता 'चलो रेझांग ला' :)

मुशाफिर's picture

10 Sep 2010 - 7:52 pm | मुशाफिर

पण सध्या काही वैयक्तिक कारणाने लिखाणाला फार वेळ मिळू शकत नाही . त्यामुळे शक्य झालं तसं गेले ३ दिवस लिहीत गेलो. अजून बरीच माहिती टंकाविशी वाटत होती पण ते शक्य झालं नाही (म्हणूनच तर ती अवांतर टीप टाकली आहे आणि समाप्त लिहिलं नाही:)). बघुया अजून काही माहिती कधी लिहिता येते ते.

मुशाफिर.

धमाल मुलगा's picture

10 Sep 2010 - 8:53 pm | धमाल मुलगा

हरकत नाही देवा,
त्यात काय एव्हढं? टेक युअर ओन टाईम :)

आम्हाला मेजवानी मिळतेय ना? नो कंप्लेंट :)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Sep 2010 - 9:12 am | घाशीराम कोतवाल १.२

आम्हाला मेजवानी मिळतेय ना? नो कंप्लेंट
पण भाड्या आमच्या मेजवाणीच काय ?
शिकार कथा भाग ३ कधी येतोय ?
पोकळवाडीच्या चमत्काराच काय झाल?

धमाल मुलगा's picture

13 Sep 2010 - 3:34 pm | धमाल मुलगा

घाश्या मेल्या, गप की..का माझा पॅटन रणगाडा करुन ठेवतोयस?