सांगा

लेखनविषय:
काव्यरस
बंधने झुगारणे माझ्याच हाती मानणे ना मानणे माझ्याच हाती कापलेले पंख किती उडणार सांगा प्रगतीची वाटचाल कशी करणार सांगा दूर चाललेले ध्येय कधी गाठणार सांगा वेग मोकळा कसा मी सोडणार सांगा छत्र पित्याचे हरवले कसे सांगणार सांगा रांगणाऱ्या बालकाला कशी समजावणार सांगा जीवनाला ऊत आला , भोवताली काळ माजला हरवलेले सर्वस्व तिला कसे मिळणार सांगा

अध्यात्माची महती

लेखनविषय:
काव्यरस
आम्ही बरे भोगी योग नको तुमचा चौकट ज्याची असे अध्यात्माची योग, अध्यात्माचा जगी नित्य असे दणका देह भोगणारा तळमळतसे अजूनही शमली नाही वासनाही अध्यात्माची शाल का पांघरावी ? अध्यात्म अवघे बजबजले अनंती उपयोग शून्य त्याचा व्यवहारामधी कुणी म्हणे शांतीसाठी कुणी म्हणे साठीसाठी अद्यात्माचा दवा अतिउत्तम तुम्हा सांगतो ऐका गोष्ट अध्यात्माची नशा नाही उतरत सर्वदाही मदिरेच्या नशेला काळाचे बंधन अध्यात्माची नशा नुतरे कधीही देवादिक असती त्याच्या सभोवताली आम्हीच रंगविले हवे तसे रोजचीच मारामारी जगणे झाले अशक्य अध्यात्म सांभाळिता लुळे पडलो सहिष्णुता भिनली विनाकारण अंगी दाबणारा दाबी हवा तसा अध्यात्म धरूनी हो

" तू "

लेखनविषय:
काव्यरस
येताच तू, किनारा शब्दात व्यक्त होतो बेभान लाट होते वारा अनर्थ करतो पदरावरी तुझ्या ग फुलती फुले अनेक संध्येस धुंदी येते गंधात स्पर्श फिरतो डोळ्यातले तुझे ते निः शब्द भाव भोळे उर्मीत भावनांच्या ओठात शब्द घसरे चढतो असाच कैफ जाणीव भ्रष्ट होते लहरीत भावनांच्या मजसी भुरळ पडते तो काळही थबकतो अंधार पेट घेतो लाजूनी सागरही ओहोटीत मंद हसतो.

वादळ उगा निमाले..

लेखनविषय:
छंदात मांडते ती, शब्दार्थ जाणीवेचा.. कवितेस ना कळाले, "स्व"-रूपात काय होते! जागून शब्द गेले..लिंपून आस गेली.. ते दग्ध वासनांचे उसनेच पाय होते.. आक्रंदतात सारे, जड-सोबती जीवाचे.. जन्मांतरी न तुटले, ते पाश काय होते? वादळ उगा निमाले पणतीस पाहण्यासी.. आता फिरून उठणे, कष्ट:प्राय होते..! -- माझ्यासवेच होते, मय-विश्व कल्पनांचे.. पण प्रेरणा कुणाची? ते भाव काय होते?? राघव

ती पहा पडली गझल...

लेखनविषय:
काव्यरस
ती पहा पडली गझल ती,जीव गेल्यासारखी दादही यावी इथे,तर..लाच देल्यासारखी!? पावसाचे थेंब..वणवा,तू नको काही लिहू... जाणिवांची जाग मेल्याहून मेल्यासारखी! कोपऱ्यावरती गुलाबी पिंक कोणी टाकते रंगते मैफील इथली पान-ठेल्यासारखी! हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच मी जिंदगी जल्लोष करते,बाद केल्यासारखी! काय मी जगलो जरासा!जिंदगी वेडावली लागली मागेच माझ्या,ती झमेल्यासारखी! —सत्यजित

शब्द. ..

लेखनविषय:
सगळे शब्द कधी कधी साथ सोडून निघून जातात दूर दूर रानात एकटे पळून जातात.. मन घिरट्या घालत रहातं वटवाघळांसारखं पटकन फांदि न मिळणाय्रा.. प्रयत्न करतो मी खूप. शब्दांना पुन्हापुन्हा माझ्या दावणीला बांधायचा. पण ते गेले एकदा,की जातातच. पुन्हा परत भेटेपर्यंत! शब्दांचा हा पाठशिवणीचा खेळ. हेच माझं अटळ प्राक्तन आहे की काय असं वाटेपर्यंत... ते त्याच खेळाचा भाग म्हणून मला करवंदीच्या जाळीअडून डोकावणाय्रा उनाड पोरासारखे लांबून हळूच बघायला लागतात. मी म्हणतो त्यांना "साल्यांनो, या की लवकर माझ्या गळाभेटीला? का असे दुष्टपणे बघता माझ्याकडे.. लांबून.. अगंतूकासारखे?

सर एक श्रावणाची बरसून काय गेली!

लेखनविषय:
काव्यरस
सर एक श्रावणाची बरसून काय गेली गळत्या घरी गरीबी पसरुन पाय गेली! आता कळून चुकले,पाण्यात पीठ होते आई मला म्हणाली,करपून साय गेली!

कसे या मनाला कसे जोजवावे?

लेखनविषय:
काव्यरस
कसे या मनाला कसे जोजवावे? जरा दुःखही शांत व्हावे,निजावे! कुठे भागते आपलेही खरेतर? सुखांनी सुखांना कितीदा गुणावे! किनारा कधी सांगतो का कुणाला? किती सागराने दिले हेलकावे!

ख्रिस्त

लेखनविषय:
काव्यरस
शांततेचे गात गाणे अवतरलासी तू भूवरी या पिचलेल्या गरिबांचा क्रूस वाहिलास खांद्यावरी या प्रेम दिधले तू जगाला वेदना पचवूनीया का न समजली दयार्द्रता तुझी तुला खिळवणाऱ्या राक्षसांना अजूनही संहार होतो भाविकांचा प्रेमळ जनांचा क्रूरपणे गिळता तयांना दिसेल का क्रोध लाजताना नसती जरी सगळेच प्रेषित तुझ्यापरी देवाचे सुत का प्रयत्नांना आज त्यांच्या कुचेष्टेचे बिरुद लाभे हात मी निढळावरी लावुनी उभा इथे शतकानुशतके वाट तुझी पाहताना देह पंचत्वी विलीन होतसे
Subscribe to कविता