माझी आई खूप धार्मिक होती. त्याउलट वडील तर्क कठोर. आई देवाची पूजा रोज मनोभावे करायची. तिला वेळ नसेल तर मोठा भाऊ करायचा. आई सर्व व्रतवैकल्ये,श्रावणातले उपास, गौरी गणपती, नागपंचमी, गोकुळाष्टमी, दसरा, पाडवा सगळं, सगळं करायची. शिवाय विनायकी आणि अंगारकी करायची. जिवतीची पूजा करायची.
वडील म्हणायचे,"या हल्लीच्या काळात जिवतीएवढी मुलं परवडणार आहेत का? शिवाय जिवतीचा कागद चिकटवून काय होणार आहे? मुलांवर विज्ञाननिष्ठ संस्कार करणं हे आईवडिलांचं कर्तव्य."
दोघांचेही विचार ऐकून माझी द्विधावस्था व्हायची. आईवर माझं फार प्रेम होतं. म्हणून ती सांगते म्हणून मी शुभंकरोती म्हणायची.