सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in क्रिडा जगत
27 Mar 2011 - 2:48 pm

सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज

परवा विकास-जींच्या लेखातील मॅच पहाताना "करायच्या-न करायच्या" गोष्टींमुळे होणार्‍या शकुन-अपशकुनाबद्दलचे उल्लेख वाचून गंमत वाटली आणि हा लेख लिहायची स्फूर्ती झाली. (अर्थात सचिन खेळत असताना "करायच्या-न करायच्या" गोष्टीची माझीही यादी आहेच!)
एक (गैर)समज असाही आहे (किंवा सचिनच्या हितशत्रूंनी तो रचला आहे) कीं त्याने शतकी खेळी केली कीं भारत तो सामना हरतो. सध्या जोरात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतसुद्धा सचिनने दोन शतके ठोकली-एक इंग्लंडविरुद्ध व एक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध! पहिल्या सामन्यात धावांची बरोबरी झाली तर दुसर्‍यात दक्षिण आफ्रिकेऐवजी आपणच 'गुदमरलो' आणि २९ धावात ९ बळी देऊन विजयाच्या जबड्यातून पराजयाला खेचून आणले! तसे पहिले तर सचिन तर वारंवार शतकी खेळी करतो, मग आपण सगळे सामने धडाधड हरतो कीं काय? आकडे काय बोलतात याबद्दल?
नुकताच "क्रिकबझ्झ" या संस्थळावर नेमक्या याच विषयावर एक मस्त लेख प्रसिद्ध झाला. लेखक आहेत गोकुळ गोपाळ. त्यांनी दिलेली आकडेवारी आणखीच कांहीं सांगून जाते. सध्या विश्वचषक स्पर्धेचा हंगाम असल्याने त्यानी या लेखात फक्त एकदिवशीय सामन्यांचाच विचार केलेला असावा. पण आमचे "आनंदजी डोसां" (माझे सहकारी श्री नाफडे) यांच्याकडे कसोटीची आकडेवारीही आहे. पणे तिकडे हा हंगाम झाल्यानंतर वळू.
सचिनचे हितशत्रू साधारणपणे "सचिनने शतक = भारताची हार" असे वाक्य समीकरणच असल्याच्या आविर्भावात 'सोडून' देतात! पण आकडे कांहीं दुसरीच हकीकत सांगतात! सचिनच्या एकूण ४८ एकदिवशीय सामन्यांतील शतकात फक्त तेरा वेळा भारत हरला आहे. तर चक्क ३३ वेळा त्याला विजय प्राप्त झाला आहे. २००२ मध्ये झालेल्या एका सामन्याचा निकाल लागला नाहीं तर अलीकडचा इंग्लंडबरोबरचा सामना बरोबरीत संपला. म्हणजे विजय-पराजयाचे प्रमाण जवळ जवळ ३:१ किंवा अगदी समीकरणाच्या भाषेत सांगायचे तर भारताचे विजय = ३(भारताची हार)!

(४८व्या 'एकदिवशीय' शतकानंतर प्रेक्षकांना अभिवादन करताना सचिन)
आता जरा खोलात जाऊन पाहू!

सचिनने शतक केले तरी भारत हरला असे सामने
धावा धावगती विरुद्ध मैदान कधी?
१३७ १०० लंका दिल्ली मार्च ९६ *१
१०० ९० पाक सिंगा. एप्रि. ९६ *२
११० ८० लंका कोलंबो ऑग ९६ *३
१४३ १०९ ऑस्ट्रे. शारजा एप्रि ९८ *४
१०१ ७२ लंका शारजा ऑक्ट०० *५
१४६ ९५ झिंबा. जोध. डिसें ०० *६
१०१ ७८ द. आ. जो.बर्ग ऑक्टो०१ *७
१४१ १०४ पाक रा.पिंडी मार्च ०४ *८
१२३ ९५ पाक अहमदा. एप्रि ०५ *९
१०० ८८ पाक पेशावर फेब्रू. ०६ *१०
१४१* ९५ विंडीज क्वाला सप्टे. ०६ *११
१७५ १२४ ऑस्ट्रे. हैद्राबाद नोव्हे०९ *१२
१११ १०१ द.आ. नागपूर मार्च ११ *१३
या १३ पराजयातल्या शतकाखेरीजच्या उर्वरित ३५ शतकात भारताने ३३ सामने जिंकले, एक अनिर्णित राहिला व एकात बरोबरी झाली हे आपण वर पाहिले आहेच.
आता या १३ सामन्यांत इतर फलंदाजांच्या "पराक्रमा"कडे एक नजर टाकू!
*१: या श्रीलंकेविरुद्धच्या ९६च्या विश्वचषक स्पर्धेतील 'लीग' सामन्यात भारताच्या ५० षटकांतल्या २७१ धावांत सचिनने १००च्या धावगतीने १३७ चेंडूंत १३७ धावा काढल्या होत्या. फक्त अझारुद्दीनने अर्धशतक केले. श्रीलंकेने आपल्या धावसंख्येचा पाठलाग करीत ४९व्या षटकात २७२ धावा केल्या. या सामन्यावरील अनुभवावरून अझारुद्दिनने नाणेफेक जिंकूनही क्षेत्ररक्षण निवडल्याचा उल्लेख माझ्या "पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-४: ईडन गार्डन्सला झालेले भारताचे पानीपत!" या लेखात आला आहेच.
*२ पाकिस्तानविरुद्ध सिंगापूरला झालेल्या एप्रिल ९६च्या या सामन्यात भारताचे सर्व फलंदाज ४८व्या षटकात २२६ धावात गारद झाले त्यात सचिन बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या होती १८६/४. त्यानंतरच्या पराक्रमींनी मिळून ३८ धावा केल्या यात आश्चर्य ते काय? कारण त्यात ३ खेळाडू 'मॅच-फिक्सिंग'वाले होते.
*३ श्रीलंकेविरुद्धच्या ऑगस्ट ९६च्या या सामन्यात भारताच्या एकूण २२६-५ धावांपैकी सचिनने ८०च्या धावगतीने (त्याच्या नेहमीच्या मानाने अंमळ मंदगतीने) १३८ चेंडूंत ११० धावा केल्या. फक्त अझारुद्दीनने ९९ चेंडूत ५८ धावा काढल्या होत्या (धावगती ५९). शिवाय गोलंदाजीतही सचिनने ६ षटकात २९ धावा देऊन श्रीलंकेचा एकुलता एक बळी घेतला (श्रीलंकेने १ बळीच्या मोबदल्यात २२६ धावा केल्या होत्या.) श्रीनाथच्या गोलंदाजीनंतर 'काटकसरी' गोलंदाजीतही सचिन दुसरा होता.
*४ शारजाला झालेल्या या अविस्मरणीय 'लीग'मधील दिवस-रात्र सामन्यात प्रकाशझोतात खेळत सचिनने १३१ चेंडूत १४३ धावा केल्या. सचिन बाद झाला तेंव्हां भारताची धावसंख्या होती ५ बाद २४२. ४३ षटके झाली होती. उरलेल्या ३ षटकात ३२ धावांचे लक्ष्य पार करताना भारताच्या इतर फलंदाजांनी फक्त ८ धावा केल्या (२५०-५)
*५ शारजाला २००० साली झालेल्या या सामन्यात भारताच्या २२४-८च्या धावांपैकी सचिनने ७२च्या धावगतीने १४० चेंडूंत १०१ धावा केल्या. इतर कुणीही अर्धशतकाचा पल्लाही ओलांडला नाही. श्रीलंकेने ४४व्या षटकात २२५-४ धाव करून सामना जिंकला. सचिनने ५ षटकात २२ धावा देत काटकसरी गोलंदाजीही केली. त्याच्यापेक्षा जास्त काटकसरी गोलंदाजी फक्त श्रीनाथची होती.
*६ डिसेंबर २००० साली झिंबाब्वेविरुद्ध जोधपूरला झालेल्या या सामन्यात भारताच्या २८३-८ या धावसंख्येत सचिनच्या १५५ चंडूंत १४६ धावा होत्या. तो बाद झाला त्यावेळी साडेशेहेचाळीस षटके झाली होती. उरलेल्या साडेतीन षटकात आगरकर व जहीर या जोडीने ४८ धावा फटकारल्या. साडेशेहेचाळीस षटकात सचिनने २३५ पैकी १४६ धावा केल्या होत्या. मग इतरांनी काय पराक्रम केला असेल ते लक्षात येईलच. सचिनच्या पाठोपाठ जास्तीत जास्त धावा केल्या होत्या जहीरने (३२). सचिनने ६ षटकात ३५ धावा देत १ बळी घेतला. झिंबाब्वेने शेवटच्या षटकात २८४ धावा करत सामना जिंकला.
*७ द. आफ्रिकेविरुद्ध ऑक्टो २००१ च्या या सामन्यात भारताच्या २७९-५ च्या धावसंख्येत गांगुलीने १२६ चेंडूंत १२७ धावा केल्या होत्या तो बाद झाला तेंव्हा धावसंख्या होती १९३-१. सचिन २६३च्या धावसंख्येवर ७८च्या धावगतीने १०१ धावा काढून सर्वात शेवटी बाद झाला. द. आफ्रिकेने २८० धावा करत हा सामना जिंकला.
*८ मार्च २००४ मध्ये रावळपिंडीला झालेल्या या सामन्यात भारत पाकिस्तानची ३२९ ची धावसंख्या ओलांडू पहात होता पण ४९व्या षटकात ३१७ धावांवर भारताचा डाव आटोपला. सचिनने १३५ चेंडूंत १४१ धावा केल्या व तो बाद झाला तेंव्हां भारताची धावसंख्या होती ३८.४ षटकात २४५-४. ६८ चेंडूंत ८५ धावा करायचे हे आव्हान ६ फलंदाज हातात असूनही भारताला पेलले नाहीं. इतर कुणीही अर्धशतकही केले नाही!
*९ एप्रिल २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादला झालेल्या ४८ षटकांच्या या सामन्यात भारताने ३१५-६ अशी धावसंख्या रचली. त्यात सचिनचा वाटा होता १३० चेंडूंत १२३ धावा. त्यानंतरच्या दोन सर्वोच्च धावसंख्या होत्या ६४ चेंडूत ४७ धावा (धोनी) आणि अवांतर धावा ३९! पाकिस्तानने ४८ षटकात ३१९ धावा केल्या. बालाजी, नेहरा आणि जहीर या तीन शीघ्रगती गोलंदाजांनी २६ षटकांत १८८ धावा दिल्या आणि केवळ २ बळी घेतले. सचिनच्या गोलंदाजीचे पृथःकरण होते ६-०-३६-१.
*१० फेब्रूवारी २००६मध्ये पेशावरला झालेल्या या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या सर्व बाद ३२८ धावांपैकी सचिनने ११३ चेंडूंत १०० धावा केल्या. पठाण आणि धोनी यांनीही प्रत्येकी ६० धावा केल्या. ४५ षटकांनंतर सचिन ३०५-५ या धावसंख्येवर बाद झाला त्यानंतर इतरांनी ५ षटकात केवळ २३ धावा केल्या. सामना ४७ षटकात संपवावा लागला व ३११-७ या धावसंख्येवर डकवर्थ-लुईस कायदा वापरून या अत्यंत चुरशीच्या सामन्यात पाक विजयी झाला.
*११ सप्टेंबर २००६मध्ये क्वाला लुंपूर येथे विंडीजविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारताने ५० षटकात ३०९-५ अशी धावसंख्या रचली. सचिन नाबाद राहिला, पण सचिनच्या १४९ चेंडूत १४१च्या डावानंतर फक्त पठाणचेच अर्धशतक होते, विंडीजला फक्त २० षटके मिळाली व त्यात १४१-२ अशा धावा करून डकवर्थ-लुईस कायद्यानुसार या अत्यंत चुरशीच्या सामन्यात वींडिज विजयी झाला.
*१२ नोव्हेंबर २००९मध्ये हैद्राबादला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात भारताला ३५१ धावा करायच्या होत्या. सचिनने केवळ १४१ चेंडूंत १७५ धावा केल्या. भारत तीन धावांनी सामना हरला. सचिनखेरीज ५९ धावा करत फक्त रैना चांगला खेळला. बाकीच्यांनी चैन केली!
*१३ २०११च्या विश्चचषक स्पर्धेतील १२ मार्चला झालेल्या या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सचिनने १०१ चेंडूंत १११ धावा काढल्या. तो बाद झाला त्यावेळी १ बाद २६७ या धावसंख्येवर सचिन बाद झाला. त्यानंतरच्या फलंदाजांनी फक्त २९ धावा केल्या व भारताची धावसंख्या झाली सर्व बाद २९६! दक्षिण आफ्रिकेने नेहराच्या शेवटच्या षटकात चार चेंडूंत १४ धावा फटकावत आपली धावसंख्या पार करून सामना जिंकला!
सचिनच्या शतकी खेळीने भारताला पराजयापेक्षा विजयच जास्त मिळवून दिले आहेत हेच वरील आकडेवारीवरून स्पष्ट होते. आता सचिनने अर्धशतक साजरे केलेल्या पण शतकापर्यंत न पोचलेल्या खेळींत काय झाले ते पाहू.
आजपर्यंत सचिनने ९३ वेळा सचिनने अर्धशतक साजरे केले आहे त्यापैकी ५६ वेळा भारताला विजय मिळाला असून ३५ वेळा त्याचा पराजय झालेला आहे. दोन सामन्यात निकाल लागू शकला नव्हता. याहून अधीक खोलात जाऊन अभ्यास केल्यास त्याने ७० ते ९९ धावा काढलेल्या खेळींत २८ वेळी भारत जिंकला आहे असे लक्षात येईल.
आता इतर शतकवीरांबरोबर सचिनच्या शतकांची तूलना आणि किती फलंदाजांच्या शतकी खेळींचे विजयात परिवर्तन झाले आहे हे पाहू. इथेही तेंडुलकर आपल्या टीकाकारांची तोंडे बंद करून टाकतो. कारण सगळ्यात जास्त विजय मिळवून देणारा शतकवीरही सचिनच आहे. खाली जी यादी दिलेली आहे ती आहे विजय किती वेळा मिळविला आणि किती शतके केली याची! शिवाय आपला संघाला विजयी करून खेळीत जास्तीत जास्त वेळा नाबाद राहिलेला फलंदाजही सचिनच आहे!

फलंदाज देश शतके नाबाद सर्वोच्च
सचिन भारत 33 13 200*
जयसूर्या लंका 24 5 189
पॉंटिंग ऑस्ट्रे. 25 8 145
सौरव भारत 18 10 183
लारा विंडीज 16 3 169
गिलख्रिस्टऑस्ट्रे. 16 1 172
डे. हेन्स विंडीज 16 10 152*
सईद पाक 16 6 194
मार्क वॉ ऑस्ट्रे. 15 4 173
ह. गिब्ज द. आ. 15 1 175
सचिनची १४ शतके दुसर्‍या डावात प्रतिस्पर्ध्यांची धावसंख्या ओलांडताना केलेली आहेत. आता त्याच्या तुलनेत इतरांची कामगिरी पाहू.

फलंदाज देश शतके
सचिन भारत १४
पॉंटिंग ऑस्ट्रे. ८
लारा विंडीज ७
इंजमाम पाक ३
रिचर्ड्स** विंडीज ३
द्रविड भारत २
(** सर व्हिवियन रिचर्ड्स)

वरील पराक्रमाबरोबरच एकदिवशीय सामन्यांत सचिनने सामनावीराचा आणि स्पर्धावीराचा सन्मान इतर कुणाहीपेक्षा जास्त वेळा मिळविलेला आहे.
या सर्व आकडेवारीवरून भारताच्या विजयात तेंडुलकरचा असामान्य हिस्सा होता हेच सिद्ध होते. भारताच्या विजयाचा तो नेहमीच एक मोठा शिल्पकार ठरलेला आहे.
त्याचे टीकाकार कांहींही म्हणोत, पण भारताच्या आणि एकंदरच क्रिकेटच्या खेळाच्या संदर्भात पहायचे झाल्यास सचिनचे योगदान अतीशय उच्च प्रतीचे आहे यात शंका नाहीं. आपल्या झंझावाती खेळाने सचिनने भारतीयांना क्वचितच मनस्ताप दिला असेल. जास्तीत जास्त वेळा त्याने भारतीय प्रेक्षकांना आनंद मिळवून दिला आहे. परवाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही हेच पुन्हा दिसून आले. तो बाद झाल्यावर बाकीचे "भले-भले शिपाई ढळाढळा रडले" हेच आपण पाहिले! पण असल्या भल्या-भल्या शिपायांच्या अपयशाचे खापर सचिनच्या डोक्यावर का फोडायचे?
जय सचिन!
ऋणनिर्देश: या लेखासाठी माहिती पुरविल्याबद्दल श्री. नाफडे व श्री. धोंगडे यांचे आभार!

क्रिकेट

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

30 Mar 2011 - 3:37 pm | चिंतामणी

शक्यता नाकारता येत नाही.

सुधीर काळे's picture

30 Mar 2011 - 11:54 pm | सुधीर काळे

झक्कास!
दुर्दैवाने आज सचिन ८५ वर बाद झाला आणि आपण मॅचही जिंकली त्यामुळे अंधश्रद्धेला बळकती येण्याची भीती आहे!
पण सचिनचा आजचा खेळ त्याच्या कीर्तीला साजेसा नव्हता हे मात्र खरे.
चला आता मुंबईत "लंकादहन" करू या!

अमोल केळकर's picture

30 Mar 2011 - 11:50 am | अमोल केळकर

सचिनला शतकासाठी आणि भारतीय संघास विजयासाठी अनेक शुभेच्छा
दोन्ही गोष्टींचा आज योग घडून येवो हीच ईच्छा

अमोल केळकर

चिंतामणी's picture

31 Mar 2011 - 12:32 am | चिंतामणी

मुंबईत सचीन १०० वे शतक करणार.
(आणि आपण World Cup जिंकणारे हे वेगळे सांगायला नको.)

विकास's picture

31 Mar 2011 - 12:59 am | विकास

"सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा समज" हा भारतीयांनी मुद्दामून पसरवला होता. हा कट होता, कॉन्स्पिरसी होती. म्हणूनच पाकीस्तानने त्याला पाच वेळेस प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जीवदान दिले.

बिचारा सचीन देखील त्या कटाला बळी पडला आणि शतक करण्याआधीच तंबूत परतला. :(

शक्यता नाकारता येत नाही. ;)

नरेशकुमार's picture

1 Apr 2011 - 9:10 am | नरेशकुमार

गैरसमज जब्र्या पद्ध्तिने दुर करवल्या गेल्याला आहे.

वपाडाव's picture

1 Apr 2011 - 3:52 pm | वपाडाव

हे माझ्याकडुन थोडेसे..

सखी's picture

3 Apr 2011 - 5:45 am | सखी

एक नंबर! मस्तच! आपण भारतीय इतके नशिबवान आहोत की तो भारतात जन्माला आलाय. पण त्याच्यावर टीका करणा-या लोकांच्या करंटेपणाला काय म्हणावे, तो कदाचित दुस-या देशात असला असता तर हेच रडत बसले असते. जाऊ दे गाढवाला गुळाची चव काय?

सुधीर काळे's picture

4 Apr 2011 - 4:20 pm | सुधीर काळे

धन्यवाद, वपाडाव-जी!