संवाद हा मानवी जीवनात किती महत्वाचा आहे ना! संवाद साधल्याशिवाय तुमच्या मनात काय आहे हे समोरच्या व्यक्तीला समजू शकत नाही, त्यामुळे त्याच्या कडून तुम्हाला हवी ती क्रिया घडत नाही.
पण हाच संवाद हल्लीच्या काळात किती कमी होतो आहे, आता असं म्हणायचं मुख्य कारण आहे ते टेलीव्हीजन. सध्या प्रत्येक घरात साधारणपणे हे उपकरण असतेच असते. मग काय ह्याच्या मागून येणारे फायदे आणीं तोटे देखील घरात शिरतात. ह्याचा सर्वात मोठा तोटा माझ्यामते तरी हा कि घरातील व्यक्तींमध्ये असलेला संवाद कमी होतो, मग तो संवाद कुठल्याही प्रकारातील असेल जस कि भांडण, वादावादी, प्रेमाच्या चार गोष्टी किवा अगदी सर्वसाधारण संभाषण.
टीव्ही वर सध्या असणारे खंडीभर च्यानल्स आणि त्यावर दाखवल्या जाणाऱ्या मालिका ह्यामध्ये माणूस एवढा गुरफटला आहे कि त्याला घरातील इतर व्यक्तींशी बोलायला सवडच नसते किवा इच्छा होत नाही असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही. हा अनुभव सर्व साधारणपणे सर्वांनाच थोड्याफार प्रमाणात का होईना पण आला असेल किवा नेहमी येत असेल.
मी काही टीव्हीच्या विरोधात असणारा माणूस नाही पण काय बघावं आणि काय नाही, तसेच किती प्रमाणात बघावं ह्याच्या मर्यादा मी स्वतः पाळतो. जेवा एखादी महत्वाची गोष्ट बोलायची असेल त्या वेळेस अतिशय काळजीपूर्वक बोलले पाहिजे अश्यावेळेला जर आपण किवा समोरील व्यक्ती टीव्ही मध्ये लक्ष घालून बसली असेल तर त्या विषयाचे गांभीर्य त्या व्यक्तीला कळणारच नाही . दुसरा मुद्दा महणजे खरच त्या मालिका बघून आपल्याला काही उपुक्ता माहिती मिळत असेल तर काही हरकत नाही पण तसे काहीच ह्या मालिकांमध्ये नसते, बर नुसते मनोरंजन म्हणून पहाव्यात तर त्यामध्ये कपट, राजकारण, अनैतिक संबंध तसेच अध्यात्मिक बाबींचा नको तसा वापर अश्या काही प्रमाणात केलेला असतो कि ते सर्व बघून मनोरंजन होऊ शकत असं मला तरी वाटत नाही….. अर्थात हे सर्व विचार व्यक्तिगणिक बदलूही शकतात.
नाही म्हणता तंत्रज्ञ्यानाच्या अतिरेक वापरामुळे देखील असे घडू शकते. जसे कि सध्याचे ताजे उदाहरण म्हणजे आधुनिक मोबाइल्स तसेच लेपटोप्स, ह्या उपकरणांनि तर सगळीकडे धूम माजविली आहे. विचार करा घरातील एखाद्या म्हातारया व्यक्तीला त्याच्या/तिच्या मुलांशी, नातवंडांशी काही बोलायचे असेल निव्वळ करमणुकीसाठी पण त्यांच्या बरोबर बोलायला कोणी उपलब्धच नसते. कारण अलीकडे प्रत्येकाच्या हातात आधुनिक मोबाइल्स आले असल्याने त्यांचे दुसरीकडे लक्ष जातंच नाही. मोबाइल्स काय किवा लेपटोप काय ह्यातील कुठलीही वस्तू असली कि सगळ जग आपल्या हात सामावतं. ऑफिसचे मेल्स, गेम्स, फेसबुक आणि सर्वात महत्वाचे इंटरनेट ह्या सर्व बाबतित माणूस एवढा गुरफटतो कि त्यातून त्याला घरातील व्यक्तींशी बोलायला देखील वेळ मिळत नाही. अर्थात काहीजण या सर्व गोष्टीतून वेळ काढून घरच्या मंडळींसाठी देखील थोडा वेळ राखून ठेवतात अशा व्यक्तींचं मला तरी फार कौतुक वाटतं.
घरी गेल्यावर कुटुंबियांशी संवाद साधण्यात किती आनंद वाटतो हे काही मी तुमच्यासारख्या सुजाण वाचकांना सांगायची गरज आहे असे वाटत नाही. काही झाल तरी मानव हा सामाजिक प्राणी (प्राणी म्हटल्याबद्दल माफी असावी) आहे, त्यामुळे प्रत्येकाला दुसऱ्या व्यक्तीशी बोलण्याची गरज भासते, स्वतःचे विचार, अडचणी, भावना व्यक्त केल्याशिवाय मानवाला हायसं वाटत नाही. संवाद साधणे हि देखील एक कला आहे, कधीही बघा मार्केटिंग क्षेत्रातील माणस हि बडबड्या स्वभावाची असतात म्हणूनच ती माणसे आपली वस्तू व त्याचा उपयोग समोरच्याला पटवून देण्यात यशस्वी ठरतात, पण हेच कौशल्य सर्वांकडे असेलच असे नाही. अगदी भिकारी देखील त्याचे संवाद कौशल्य वापरून थोडेफार पैसे स्वतःच्या पदरात पाडून घेतोच कि नाही?
हल्ली तर पर्सनलीटी डेव्हलपमेंट सारख्या कोर्सेस मधूनदेखील संवाद साधण्याचे ट्रेनिंग दिले जाते, पण खरच अश्या कोर्सेस मधून संवाद साधण्याची कला विकसित होऊ शकते का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.म्हणूनच संवाद हा मानवी जीवनातील अनिवार्य असा घटक आहे, त्यामुळे कारण काहीही कसलेही असो मानवाने सदैव संवाद साधण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे असं मला तरी प्रामाणिकपणे वाटतं.....
असो माझ्या बुद्धीला झेपलं तेवढं आणि मला जे काही विचार मांडायचे होते तेवढं खरडलं आहे, ह्यावर मि.पा कार आपली मते मांडतीलच ह्यात शंकाच नाही.....
प्रतिक्रिया
2 Jan 2013 - 10:21 pm | चित्रगुप्त
या लेखात मांडलेली जवळजवळ सर्वच निरिक्षणे ही अनेकांच्या अनुभवातील आहेत हे खरेच, परंतु समोरासमोर बसून प्रत्यक्ष बोलणे, हे संवादाचे मूळ स्वरूप हळूहळू बदलत आता मोबाईल, व्हिडियो चॅटिंग, वगैरे वर येऊन पहुचले आहे, ही वस्तुस्थिती स्वीकारणे भागच आहे. आंतरजालाच्या प्रसारामुळे पूर्वी कधीही शक्य नसणार्या गोष्टीही आता शक्य होत आहेत, ही एक फार मोठी भाग्याचीच गोष्ट म्हणायला हवी.
3 Jan 2013 - 1:35 pm | ऋषिकेश
नात्यांना टिकवण्यासाठी समोरासमोरचा संवाद (मग तो मुक्याने का असेना) आवश्यक आहे. अजिबात शक्य नाही / अजिबात वेळ नाही वगैरे म्हणणे पळवाटा वाटतात. त्या त्या नात्याला तितके महत्त्व आणि वेळ दिलाच पाहिजे.
3 Jan 2013 - 1:53 pm | गवि
कोणताही बायस न ठेवता उलट दिशेने विचार करुन पाहू. त्यासाठी सर्व पूर्वग्रह आणि अंदाज बाजूला ठेवून निरीक्षण मांडू:
"पूर्वी" म्हणजे सुमारे ७०-८० च्या दशकातला काळ मानू.
"हल्ली" म्हणजे मोबाईल क्रांती / केबल क्रांती / डीटीएच आणि त्यानंतरचा काळ (सुमारे साल २००० ते आजपर्यंत)
निरीक्षण १. "पूर्वी" इतक्या मोठ्या प्रमाणात टीव्ही आणि खंडीभर चॅनेल्स उपलब्ध नव्हते आणि "हल्ली" ते झाले आहेत.
निरीक्षण २. "पूर्वी"इतका संवाद घरातल्या व्यक्तींमधे "हल्ली" राहिला नाही.
निरीक्षण ३. लोक टीव्ही आणि मोबाईलवर फारच जास्त वेळ गुंतलेले असतात.
आता, हल्ली घरातल्या घरात दोन व्यक्तींमधे संवाद कमी झाला असेल हे खरं. पण तो टीव्हीच्या वाढीव उपलब्धतेमुळे झाला की टीव्ही हे अधिक मनोरंजक साधन उपलब्ध झाल्यामुळे पूर्वीच्या विसंवादाला किंवा कंटाळवाण्या संवादांना एक अधिक मनोरंजक पर्याय मिळाला?
जर घरातल्या व्यक्तींशी संवादाचं महत्व इतकं आहे, आणि सर्वांना त्याची ओढ आहे, त्याचे फायदे माहीत आहेत, तर, स्वतःवर "संयम" ठेवून टीव्ही/मोबाईल/आंतरजाल का मर्यादित ठेवावं लागतंय.. ? म्हणजेच टीव्ही इत्यादि पर्याय या संवादापेक्ष काहीतरी जास्त पुरवताहेत आणि त्याची आपल्याला भूक आहे.
वृद्ध लोकांशी कोणीच न बोलणं किंवा कटु, नकोसेपणा दाखवणारं बोललं जाण्यपेक्षा, या सुखांनो या, किंवा तत्सम सीरियलमधे इन्व्हॉल्व होऊन त्यांचा वेळ उत्तम जात असेल तर त्यात काय टाळण्यासारखं आहे?
स्वतःच्या पतीशी बोलण्यात असलेल्या रसापेक्षा जर "अफसर बिटिया" जास्त रोचक वाटत असेल तर त्यात टीव्हीला नावं कशाला ठेवायची? केवळ तो आल्टर्नेट म्हणून उपलब्ध झाला म्हणून?
इथे टीकेचा रोख टीव्ही किंवा तत्सम मनोरंजनातल्या दर्जावर दिसला नाही, तर केवळ तो आल्टर्नेट कसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे आणि त्याने परस्परातला संवाद नष्ट केला आहे अशी इल्लॉजिकल मांडणी वाटली. पती सवतीकडे जातो म्हणून सवतीला दोष देण्यातला हा प्रकार वाटतो, आणि तो सगळीकडे कॉमन झाला आहे "हल्ली".
आपण आहोत तसे ठीक आहोत असा आनंद मानण्याऐवजी आपण हळूहळू काहीतरी हरवून बसतो आहोत अशा विचारात रहायला आपल्याला का आवडायला लागलं आहे बुवा? कायम फेसबुकावर पडलेले लोक "मी दात घासले", "आउच माझा पाय मुरगळला" हे जर कोल्हापुरातून ऑस्ट्रेलियातल्या आणि नॉर्वेतल्या कोणाशी शेअर करत असतील, तर तो संवाद निकृष्ट म्हणायचा का? घरच्यांशी आपण याहून काय उच्च प्रतीच्या घटना आणि विचार शेअर करत होतो?
4 Jan 2013 - 12:18 pm | वामन देशमुख
+१००
3 Jan 2013 - 6:05 pm | मेघनाद
गवि साहेब: आपण मांडलेली बाजू नक्कीच पटली.....त्यामुळे माझ्या विचारांना देखील एक नवी दिशा मिळाल्या सारखे वाटतेय.
3 Jan 2013 - 6:18 pm | मेघनाद
चित्रगुप्त: वस्तुस्थिती स्वीकारावीच लागणार आहे हे बाकी खरंच आहे. कारण जो काळाप्रमाणे बदलत नाही त्याचा नाश होतो अस ऐकलय. माझ म्हणण एवढंच आहे जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आधुनिक उपकरणं बाजूला ठेवून समोरच्याशी आजू-बाजूला बसून संवाद साधण्यात एक प्रकारचा जिवंतपणा आहे तो ह्या उपकरणांमध्ये जाणवत नाही.
3 Jan 2013 - 6:19 pm | मेघनाद
अगदि सहमत....
3 Jan 2013 - 10:42 pm | परिकथेतील राजकुमार
ओक्के !
लक्ष्मण.