उमेश कुलकर्णी यांची विहीर - काही प्रश्न, काही उत्तरे
या धाग्याचे स्वरूप मुख्यतः पाषाणभेद यांच्या पूर्वीच्या एका धाग्यावरच्या काही प्रश्नांना प्रतिसाद असे आहे, पण प्रतिसाद जरा लांबल्यामुळे त्याचा स्वतंत्र धागा केला आहे. कथानक वगैरे इथे पुन्हा दिलेले नाही. बरेचसे प्रश्न पाषाणभेद यांचे आहेत, पण काही इतर प्रतिसादांमधले आहेत. इथे म्हटले आहे, ते ब्रह्मवाक्य नाही; ते आम्हांस चित्रपट पाहताना जाणवलेले (म्हणजे आमचे रसग्रहण) आहे. वाचकांना त्यात एक सुसंगती दिसेल, अशी आशा आहे.
१) मेंढपाळाचं जीव असलेलं व हरवलेलं कोकरू त्याला कोणत्या शक्तीने परत मिळते? तिच शक्ती तो सम्याला कशी काय देतो? (या ठिकाणी मी जेथे चित्रपट पाहीला तेथे तो कापलेला वाटला. आत्ताच्या डिजीटल चित्रपट दाखविण्याच्या तंत्रात चित्रपट कापता येतो का?)चित्रपट हा अमानवी शक्तीविषयी बोलत नसून मानवी नातेसंबंध, मृत्यू, किंवा अधिक व्यापक अर्थाने जिवलगांचा विरह/दूर जाणं आणि त्यातून निर्माण होणारा शोक आणि अस्तित्ववादी प्रश्न (मी का जगायचं? कुणीही का जगावं?) अशा गोष्टींबद्दल बोलतो. दूर गेलेल्या जीवाबद्दल शोक होतो खरा, पण त्यानं दूर गेलेला जीव परतत नाही. याविषयीचं काही तत्त्वज्ञान धनगर मांडतो. ते समीरला कळतं. हे अलगद होतं; मराठी चित्रपटाच्या नेहमीच्या ठाशीवपणानं नाही. कारण चित्रपटाची शैलीच तशी नाही. त्यामुळे काय होतंय ते कळता-कळताच ते निसटून जातं. त्यामुळे ते कापलेलं वाटण्याचा संभव आहे. पण यात एक गंमत आहे. काहींना ते त्यामुळे काव्यात्म वाटेल, तर काहींना ते अनाकलनीय वाटेल. त्याला इलाज नाही, कारण चित्रपटाची शैलीच तशी अलगद, तलम आहे.
२)सम्याला विहीरीवर नचादादा परत भेटतो, ते दोघे परत फोहोतात. सम्याला तसा भास का होतो?वर उल्लेख केलेल्या तत्त्वज्ञानाशी याचा संबंध आहे. नचिकेत परत भेटणं ही प्रत्यक्ष घडणारी घटना नाही. तशीच ती परालौकिक वगैरेही नाही. चित्रपटात अनेकदा नचिकेत गूढ वाटेलसं बोलतो. धनगरही वरवर पाहाता सोपं (आणि लौकिक) काहीतरी सांगता सांगता काही तत्त्वज्ञान मांडतो. जे हातून लौकिक अर्थाने निसटलं असं वाटतं (उदा. मेलेला नचिकेत, हरवलेलं कोकरू), ते जर नीट, खर्या अर्थानं उमजलं तर ते आपल्यातच राहातं. मग ते प्रत्यक्षात दुरावलं असेल, किंवा नाहीसं झालं असेल, तरी काही बिघडत नाही. जेव्हा हे कळतं, तेव्हा समीरला नचिकेत 'भेटतो'. मग तो समीरमध्येच आयुष्यभर राहाणार असतो. त्यामुळे तो मेल्याचा शोक संपतो. हे थोडंसं जातक कथेतल्यासारखं आहे - एका स्त्रीचं मूल मरतं, ती बुध्दाकडे जाते आणि मुलाला पुन्हा जिवंत कर असा हट्ट धरते, ... ३)नचादादा पुर्ण चित्रपटभर हातात दांडकं घेवून का वावरतो? याचा संबंध धनगराशी लावता येईल. जड, लौकिक जगात वावरत असताना ज्यांना तात्त्विक, गहन, अस्तित्ववादी प्रश्न पडतात आणि मग ते कदाचित कधीतरी सुटतील, अशी शक्यता निर्माण होते, अशी ही दोन माणसं आहेत. नचिकेत उत्तरं मिळण्याअगोदर मेला, पण धनगर (फणसासारखा?) पिकून जाणता झाला. धनगर जसा आपल्या चंचल मेंढरांना हाकायला काठी हातात घेतो, तशी प्रश्न पडणारी माणसं आपोआप इतरांना रस्ता दाखवू शकतात, मार्गावर आणतात. नचिकेत तसा असतो, म्हणून समीर त्याकडे ओढला जातो. तसाच धनगरही असतो, म्हणून तो त्याच्याकडेही ओढला जातो.
४)पुर्ण चित्रपट समिर नचादादाचा असतांना गावातील घरातील काही दृष्यांमध्ये खुपच बारकाई का दाखविली? (जसे सम्याची आई दळण कांडतांनाचे संवाद) जे न दाखवले असते तरी चित्रपटात काही अडथळा नसता आला. मान्य आहे की बारकाईच्या द्रूष्यांत दिग्दर्शनाचे अंग आहे पण त्याचा कथेशी काही संबंध नसल्यासारखा वाटतो.कथेतल्या कुटुंबकबिल्याचा कथेच्या गाभ्याशी अगदीच संबंध नाही असे नाही. कुटुंबातले बहुतेक सर्वजण दु:खानं होरपळलेले, जगण्याच्या ओझ्यापायी दमलेले आणि म्हणून स्वच्छ, व्यवहारी शहाणपण आणि ठार वेड याच्या दरम्यान कुठेतरी आहेत. आजी (ज्योती सुभाष) आपल्या कर्मठ नवर्याबरोबर सुखी नाही. तरीही त्याचा संसार रेटते आहे आणि अभक्ष्यभक्षणासारखी (नवर्याला अमान्य असलेली) स्वतःची हौसही पुरवून घेते आहे. हे एक व्यावहारिक शहाणपण आहे, पण त्यातून तिच्या मुला-मुलींचे प्रश्न सुटावे, इतपत कस त्या शहाणपणाला नाही. एका मुलीचा संसार (दफ्तरदार - नचिकेताची आई) दारुड्या नवर्यामुळे उध्वस्त झाला आहे. एका मुलीचं (वीणा जामकर) मर्जीविरुध्द लग्न होत आहे. एक मुलगा (गिरीश कुलकर्णी) कुचकामाचा आहे. संगीत ऐकणे, दारू पिणे याशिवाय तो काही करत नाही. तो प्रेमळ, संवेदनशील आहे. पण त्याला आयुष्यातल्या अस्तित्ववादी प्रश्नांची उत्तरं सापडली नाहीत, त्यामुळे त्याचं संतुलन ढळलेलं आहे. त्याची बायको (अमृता सुभाष) आपल्या मुलातच मग्न आहे - अगदी एखाद्या आत्ममग्न (autist) मुलासारखी. सुलभा देशपांडे तर लौकिकार्थानं वेडी आहे. नचिकेतही संवेदनशील आहे - त्यामुळे अस्तित्ववादी प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत, तर त्याचाही तोल ढळू शकतो. कदाचित तो ढळलाही आहे - कारण त्याचा मृत्यू अपघाती नसून ती बहुतेक आत्महत्या आहे. त्याच्या मृत्यूच्या अनाकलनीयतेखाली दबलेला समीरही आपलं संतुलन ढळण्याच्या मार्गावर आहे, पण तसं व्हायचं टळतं. कारण हळूहळू त्याला उत्तर गवसतं. अशी ही पात्रांची वीण आहे.
६) विहीर च्या ऑफिशीयल संस्थळावर हे लिहीले आहे: "Samir’s search leads him towards the experience of oneness where he can unite with Nachiket again!" समिर एकटा पडूनही तो नचिकेत शी (किंवा त्याच्या भासमान अस्तित्वाशी) कसा एकरूप होतो? तो पुढील आयुष्य सरळ जगतो का?आधी सांगितलेल्याशीच याचा संबंध आहे. समीरला नचिकेत उमजतो. मग तो मेला आहे, याचा शोक संपतो, कारण आता तो समीरपाशी आहे (लौकिकार्थानं नाही, तर 'कळला' या अर्थानं). धनगराच्या मेंढ्या जशा हरवेनाशा झाल्या (लौकिकार्थानं नव्हे, तर आता मेंढ्या चांगल्या उमजल्या, त्यामुळे हरवत नाहीत; तरीही कधीतरी एखादी मेंढी हरवली, तर तिचं एवढं दु:ख नाही अशा अर्थानं), तसंच समीरला आता काहीतरी शाश्वत गवसलेलं आहे. अशा रीतीनं त्याचा तिढा आणि शोक संपल्यानं तो लौकिक आयुष्याला सामोरा जायला पुन्हा (पण अधिक डोळसपणे, समंजसपणे) सरसावतो. हे सरळ आयुष्य असेलच असं नाही. पण इतरांपेक्षा समृध्द मात्र असेल.
छपरातुन पाणी खालील भांड्यात पडत आहे, म्हणजे काय?टपटप पाणी पडत राहाणं मेंदूचा भुगा होत असल्याचं सुचवतं. कैद्यांचा वा आरोपींचा छळ करण्यासाठी अशा गोष्टींचा वापर (पोलीस, सैनिक वगैरे) करतात. समीर राहातो, ती इमारत अर्धीमुर्धी, नीट न बांधलेली, गळकी अशी असणं हे ही सूचक आहे. समीर अजून कच्चाच आहे. अशा वयातला आघात (नचिकेताचा मृत्यू) त्याला उध्वस्त करू शकेल. पण अर्धीमुर्धी इमारत नीट बांधून मजबूत करता येते. ती शक्यता तिच्यात असते. धनगर भेटल्यानं ते होतं. पण त्याचसाठी तिथून दूर जाणं भाग आहे. स्वतःत (आणि आपल्या शोकात) गुंगण्याऐवजी थोडं अलिप्त झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. आतल्याआत राहून सुलभा देशपांडेसारखं वेडं व्हायचा धोका असतो.
समीर ट्रेन मध्ये बसतो पण तो नक्की कोणत्या दिशेने प्रवास का करतो. हे अगदी प्रेक्षकांवर लादलय कि तुम्ही समंजस आहात आता समीर पळून गेलेला आहे असा समजून घ्यासमीरचं भरकटणं दिशाहीनच असू शकतं. कारण तो काय शोधतो आहे, हे त्याचं त्यालाच ठाऊक नाही. ही तर भारतात फार जुनी परंपरा आहे. भीमसेन जोशी घरातून पळाले नसते, तर ते आज एवढे मोठे गायक नसते. गो. नी. दांडेकरांची भ्रमणगाथा ही दिशाहीनच आहे. अगदी पाश्चिमात्य साहित्यातही युलिसीस घरातून निघतो, तेव्हा आपल्यापुढे काय वाढून ठेवलेलं आहे, याची त्याला कल्पना नसते. मात्र तो परततो, तो शहाणा होऊन.
बर्याच गोष्टी प्रेक्षकांनी समजून घ्याव्या लागतात आणि प्रेक्षक मग त्याचे नको ते अर्थ लावतात...त्यापेक्षा चित्रपटाची लांबी थोडी वाढली असती तर चालली असती !आक्षेप अथवा मदतीची हाक म्हणून यात गैर काही नाही. पण प्रेक्षकांनाही थोडं मोठं करण्याचा चित्रपटात प्रयत्न आहे, असं समजा हवं तर. सगळं सारखं सोपं करून छोट्या छोट्या घासांत भरवत राहिलं, तर मग समीर जसा (आईच्या कुशीत राहून) कधी खर्या अर्थानं मोठा होणारच नाही, तसे ढोबळ चित्रपट पाहात आपणही खुरटतो. शिवाय, धूसर, अस्पष्ट गोष्टींमध्ये काही गंमत, काही काव्यात्मताही असते. अंमळ दीर्घकाळ मद्यप्राशनाअंतीच मदिरेची गंमत कळते. पहिला घोट कडू लागतो. पण तो टाळला तर मग ... :)
एका वाक्याशिवाय मेंढपाळ समीर ला कोणतेही तत्वाग्यान सांगत नाही...समीर ला ते लगेच कळते(मग तो आधी आणि जवळ पास एक तास का एवढा गोंधळलेला असतो ?) ज्याच्या वर अक्खा चित्रपट बेतलाय ते सगळा एका वाक्यात संपतं(अक्षरशः २ मिनिटे)कारण त्यामागे समीरचा अख्खा प्रवास आहे. त्याच्या कुटुंबातल्या लोकांचे प्रश्न त्याला हळूहळू दिसत राहतात. लग्न करायला नाखूश असणार्या मावशीला नचिकेतानं 'मग नको करूस लग्न' असं सांगणं हे नचिकेताला काही गवसत असल्याचं दाखवतं. हे समीरनं ऐकलेलं आहे, पण त्याला ते उमजलेलं नाही. मला पुण्याला यायचं नाही, असं नचिकेतानं सांगताच समीर वैतागतो, पण गणपतीच्या मिरवणुकीचा गोंगाट वगैरे मधून त्याला हळूहळू हे लक्षात येतं, की नचिकेत असं का म्हणत होता. त्याला जे शोधायचं होतं, ते इतकं तलम आहे, की ते अशा ठिकाणी गवसणारच नाही. हे समीरला जेव्हा उमजतं, तेव्हा उत्तर मिळालं नसूनही त्याला बाहेर पडायची अंत:प्रेरणा मिळते. आता तो नचिकेताच्या जवळ जाऊ शकतो. असं सगळं झाल्यामुळे त्याला धनगरही उमजतो, आणि मग त्यामुळे नचिकेताला जे शोधायचं होतं, ते ही गवसतं आणि म्हणून नचिकेतही गवसतो. @मुक्तसुनीतः
ओपन-एंडेडनेस : चित्रपट ओपन-एंडेड असावा असे दिसते. ओपन-एंडेड चित्रपटांमधे "..आणि ते सुखाने नांदू लागले" , "खुनाचा/गुन्ह्याचा शोध लागला" , "त्यांचे प्रेम/आयुष्य विफल झाले" छाप ठराविकपणा तर नसतोच.
"कॅथार्सिस" या चिरकालीन सूत्राच्या प्रवातून एक प्रेक्षक म्हणून मी सुटलो आहे असे वाटत नाही.तसा या चित्रपटाचा शेवट तितका खुलाही नाही. वर सांगितल्याप्रमाणे त्यात कॅथार्सिसही आहे. पण ते सर्व थोडे अलगद, तलम, सूचक आहे. त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला प्रेक्षक म्हणून थोडा समीरसारखाच प्रवास करावा लागतो. मुख्य प्रश्न राहातो, तो म्हणजे किमान आपण, म्हणजे सुविद्य, समंजस, सुजाण प्रेक्षकांनी तरी थोडे कष्ट त्यासाठी घ्यावे का?
प्रतिक्रिया
चिंतातुरज
विश्लेषण
एखादी
बालपण हरवणे / संक्रमण
सहमत. डायब
प्रतिसाद
चित्रपट
संगती आणि स्थल-काल एकात्मता
विहीर
मलाही आधी
अभिमान वाटतो