"माझा मराठाचि बोलु कवतुके, परि तो अमृतातेहि पैजा जिंके|" असं ज्या मर्हाटीचं वर्णन ज्ञानोबामाऊलींनी केलं त्या मायमराठीला तिच्या ज्ञात अज्ञात लेकरांनी असंख्य लेणी चढवली. पूर्वापार म्हणी, वाक्प्रचार, लावणी, पोवाडे, आर्या, गण-गौळण, गोंधळ, भारुड, बतावणी, अभंग, भजने, कटाव, फटके एक ना अनेक. त्यात एक महत्त्वाचे लेणे म्हणजे स्त्रीगीते.
मर्हाटमोळ्या स्त्रियांच्या कष्टाचा उद्गार या स्त्रीगीतांतून नानापरीने व्यक्त झाला आहे. ज्ञानदेवांच्याही पूर्वी महानुभावी पंथातील धवळे रचणारी महदांबा ही पहिली ज्ञात मराठी कवयित्री मानायला हरकत नसावी.