मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२१ : भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट कसोटी संघ

श्रीगुरुजी · · दिवाळी अंक


भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट कसोटी संघ


२५ जून - २८ जून १९३२ या कालावधीत भारत लॉर्ड्सवर आपला सर्वात पहिला कसोटी सामना खेळला. त्यानंतर भारत आजतागायत ५५५ कसोटी सामने खेळलाय. त्यातील १६४ जिंकलेत, १७१ हरलेत, १ बरोबरीत सुटलाय व २१९ अनिर्णित राहिलेत. या ८९+ वर्षांच्या कालखंडात एकूण ३०२ भारतीय खेळाडू कसोटी सामने खेळले व त्यात आपले कौशल्य दाखविले. यात काही जणांनी फलंदाजी, गोलंदाजी, यष्टिरक्षण, क्षेत्ररक्षण अशा क्षेत्रांत अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केले.

या सर्व ३०२ खेळाडूंमधून नेमके ११ सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडून भारताचा सार्वकालीन सर्वोत्कृष्ट क्रिकेट संघ बनविला, तर त्यात कोण कोण असेल?

या संघात १ यष्टिरक्षक, ३ गोलंदाज, १-२ अष्टपैलू आणि उर्वरित फलंदाज असायला हवे.

_________________________________________________________________________

सर्वप्रथम यष्टिरक्षक निवडू. मागील ८९+ वर्षात एकूण ३६ खेळाडूंनी कसोटी सामन्यात यष्टिरक्षण केलेय. यात अगदी पहिल्या कसोटीत यष्टिरक्षण केलेला जनार्दन नवले आहे व सध्याचा यष्टिरक्षक ऋषभ पंतसुद्धा आहे. या ३६पैकी फक्त १३ जणांनी १०+ कसोटी सामने खेळलेत. ७ जणांनी तर फक्त १ सामन्यापुरते यष्टिरक्षणाचे काम केलंय. ५०+ कसोटी सामने खेळलेले फक्त २ खेळाडू आहेत. त्यामुळे मला वाटते या बाबतीत फारशी स्पर्धा नाही.

या ३६ जणांतील गाजलेले यष्टिरक्षक आहेत फारूख इंजीनिअर, सय्यद किरमाणी आणि महेंद्रसिंग धोनी. ४६ कसोटीत ६६ झेल व १६ यष्टिचित करणारा इंजिनिअर, ८८ कसोटीत १६० झेल व ३८ यष्टिचित करणारा किरमाणी आणि ९० कसोटीत २५६ झेल व ३८ यष्टिचित करणारा धोनी या तिघात धोनीच उजवा ठरतो. इंजिनिअर यष्टिरक्षणाबरोबरच तडाखेबंद फलंदाजी करायचा. एकदा उपाहारापूर्वीच शतक करण्याची त्याची संधी केवळ ६ धावांनी हुकली होती. किरमाणी बऱ्यापैकी फलंदाजी करायचा व विशेषतः त्याचे यष्टिचित करण्याचे कौशल्य अप्रतिम होते. धोनी खूप चांगला फलंदाज होता व त्याचे यष्टिरक्षण कौशल्य अत्यंत चपळ होते. ९० कसोटीत प्रतिडाव ३८.०९ धावांच्या सरासरीने त्याने ४८७६ धावा केल्या असून त्यात ६ शतके व ३३ अर्धशतके आहेत. त्यामुळे भारताच्या सर्वकालीन सर्वोत्कृष्ट संघाचा यष्टिरक्षक फक्त धोनीच असू शकतो.

किरण मोरे (४९ कसोटी सामन्यांत ११० झेल व २० यष्टिचित) आणि नयन मोंगिया (४४ कसोटीत ९९ झेल व ८ यष्टिचित) यांचीही कामगिरी उल्लेखनीय आहे.

_________________________________________________________________________

फलंदाज निवडीत खूप स्पर्धा आहे. तरीसुद्धा त्यातूनच ५ सर्वोत्कृष्ट फलंदाज निवडावे लागतील. यातील काही फलंदाज सर्वकालीन सर्वोत्कृष्ट संघात असणे अगदी स्वाभाविक आहे.

सलामीच्या जोडीचा विचार केला, तर लगेच सुनील गावसकरचे नाव डोळ्यासमोर येते. वीरेंद्र सेहवाग, कृष्णम्माचारी श्रीकांत, फारूख इंजीनिअर, अंशुमन गायकवाड, चेतन चौहान, पंकज रॉय, गौतम गंभीर, शिखर धवन, नवज्योत सिंग सिद्धू, मुरली विजय, रवी शास्त्री, विनू मंकड असे अनेक खेळाडू भारताचे नियमित सलामीवीर होते. अनेक खेळाडूंनी १-२ सामन्यापुरती सलामीवीराची भूमिका बजावलेली आहे.

सलामीच्या जोडीचा विचार करताना सुनील गावसकरला वगळून चालणारच नाही. १२५ कसोटीत ३४ शतके (त्यात ४ द्विशतके) व १०,०००+ धावा करणारा गावसकर हा तंत्रशुद्ध फलंदाजीचा आदर्श होता. वेस्ट इंडीजच्या तोफखान्याला समर्थपणे तोंड देताना त्याने १३ शतके केली आहेत.

त्याचा साथीदार निवडणे सोपे नाही. पंकज रॉय व विनू मंकड या जोडीने न्यूझीलंडविरुद्ध सलामीला येऊन ४१३ धावांची भागीदारी केली होती. अत्यंत तडाखेबंद फलंदाजी करणारा व दोन त्रिशतके करणारा वीरेंद्र सेहवाग, गावसकरबरोबर १० शतकी भागीदारी करणारा चेतन चौहान, शैलीदार डावखोरा गौतम गंभीर, वेस्ट इंडीजची शरीरवेधी गोलंदाजी अंगावर झेलणारा अंशुमन गायकवाड, स्फोटक फलंदाजी करणारे श्रीकांत व इंजीनिअर, पदार्पणातच १८७ धावांचा डाव खेळणारा शिखर धवन अशांची तुलना केली तर सलामीच्या जोडीसाठी गावसकरचा साथीदार म्हणून सेहवागच योग्य ठरतो. १०४ कसोटी सामन्यांत ४९.३४ सरासरीने ८५३४ धावा करताना २३ शतके (त्यात २ त्रिशतके व एकदा २९३) करणारा स्फोटक फलंदाज सेहवागच तंत्रशुद्ध फलंदाजी करणाऱ्या गावसकरचा सलामीचा सर्वोत्कृष्ट साथीदार असेल.

_________________________________________________________________________

मधल्या फळीतील तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांचा एकत्रित विचार व्हायला हवा, कारण बरेच फलंदाज कधी ना कधी या तिन्ही क्रमांकांवर खेळले आहेत. त्यामुळे मधल्या फळीतील हे तीन सर्वोत्कृष्ट फलंदाज निवडणे हेच सर्वात कठीण काम आहे.

आधी मधल्या फळीतील सर्वोत्कृष्ट फलंदाजांची नावे पाहू.

या क्रमांकासाठी किमान ३० कसोटी सामने खेळलेल्या फलंदाजांचा विचार केला आहे.

यात आहेत विजय हजारे, पॉली उम्रीगर, विजय मांजरेकर, चंदू बोर्डे, दिलीप सरदेसाई, पतौडी, गुंडाप्पा विश्वनाथ, मोहिंदर अमरनाथ, दिलीप वेंगसरकर, अझरुद्दीन, संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, लक्ष्मण, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे.

३० कसोटी सामन्यात ४७.६५ धावांच्या सरासरीने २१९२ धावा (त्यात ९ शतके व ७ अर्धशतके) करणारे विजय हजारे महान फलंदाज होते. त्यांनी २० फलंदाजसुद्धा बात केले होते. तंत्रशुद्ध फलंदाज ही त्यांची ओळख होती. १९४७-४८मध्ये अ‍ॅडलेड येथील कसोटी सामन्यात त्यांनी दोन्ही डावात शतक केले होते. त्याच दौर्‍यावर त्यांनी ब्रॅडमनला दोन वेळा त्रिफळा बाद केले होते.

पॉली उम्रीगर (५९ कसोटीत ३६३१ धावा आणि ३५ बळी), विजय मांजरेकर (५५ कसोटीत ३२०८ धावा), चंदू बोर्डे (५५ कसोटीत ३०६१ धावा व ५२ बळी), दिलीप सरदेसाई (३० कसोटीत २००१ धावा), पतौडी (४६ कसोटीत २७९३ धावा), गुंडप्पा विश्वनाथ (९१ कसोटीत ६०८० धावा), मोहिंदर अमरनाथ (६९ कसोटीत ४३७८ धावा आणि ३२ बळी), वेंगरसरकर (११६ कसोटीत ६८६८ धावा), अझरुद्दीन (९९ कसोटीत ६२१५ धावा), संजय मांजरेकर (३७ कसोटीत २०४३ धावा) हे काही जुन्या काळातील चांगले मधल्या फळीतील फलंदाज. यातील काही जण अष्टपैलू होते.

अलीकडच्या काळातील मधल्या फळीतील काही चांगले खेळाडू आहेत सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, लक्ष्मण, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे.

या सर्वांमधून ३ सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडणे खूप अवघड आहे.

अर्थात मधल्या फळीतील तिघांमध्ये ४थ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर असायलाच हवा. २०० कसोटीत १५०००हून अधिक धावा, ५१ शतके, ५० बळी, तब्बल २४ वर्षांची कसोटी कारकिर्द असलेल्या सचिनला बाहेर ठेवताच येणार नाही.

उर्वरीत खेळाडूंमधून तिसऱ्या क्रमांकावर व पाचव्या क्रमांकावर शेवटी विजय हजारे, द्रविड, पुजारा व कोहली यातूनच दोघांना निवडावे लागेल.

माझ्या मते तिसऱ्या क्रमांकावर द्रविड व पाचव्या क्रमांकावर कोहली सर्वोत्कृष्ट ठरेल. जरी कोहली चौथ्या क्रमांकावर खेळत असला, तरी या क्रमांकावरील खेळाडू या तीनपैकी कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतात.

_________________________________________________________________________

आता उर्वरीत ५ सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडायचे आहेत. यात अष्टपैलू हवे, फिरकी गोलंदाज हवे आणि मध्यमगती/वेगवान गोलंदाज हवे.

फिरकी गोलंदाजांची नावे पाहिली तर त्यात गुलाम अहमद (२२ कसोटीत ६८ बळी) सुभाष गुप्ते (३६ कसोटीत १४९ बळी), विनू मंकड (४४ कसोटीत २१०९ धावा व १६२ बळी), चंद्रशेखर (५८ कसोटीत २४२ बळी), वेंकटराघवन (५७ कसोटीत १५६ बळी), प्रसन्ना (४९ कसोटीत १८९ बळी), बेदी (६७ कसोटीत २६६ बळी), कुंबळे (१३२ कसोटीत २५०६ धावा आणि ६१९ बळी) व रविचंद्रन अश्विन (७९ कसोटीत २६८५ धावा आणि ४१३ बळी) यातूनच निवड करावी लागेल.

यातील विनू मंकड हे परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू. अत्यंत प्रभावी फिरकी गोलंदाजी करताना ते उत्कृष्ट फलंदाजीसुद्धा करायचे. एकाच मालिकेत दोन द्विशतके करण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. पंकज रॉयबरोबर सलामीला येऊन ४१३ धावांची भागीदारी करण्याचा त्यांचा विक्रम अजूनही अबाधित आहे. भारताच्या सर्वकालीन सर्वोत्कृष्ट संघात विनू मंकडला पर्याय नाही.


अष्टपैलू विनू मंकड

परंतु दुसरा फिरकी गोलंदाज नक्की करणे अत्यंत अवघड आहे, कारण सुभाष गुप्ते, चंद्रशेखर, बेदी, प्रसन्ना, कुंबळे व अश्विन यातून निवड करणे जवळपास अशक्य आहे. तरीसुद्धा या सर्वांमध्ये सुभाष गुप्ते सर्वाधिक योग्य वाटतो. १९५२-५३मध्ये आपल्या फसव्या उंचीच्या लेगब्रेक व गुगली गोलंदाजीवर वेस्ट इंडीजमधील फलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्यांवर त्याने मालिकेत २७ फलंदाज बाद केले होते. नंतर पाकिस्तानमधील मालिकेत २१ बळी व नंतर न्यूझीलंडविरुद्ध ४ कसोटींच्या मालिकेत ३४ बळी अशी त्याची कामगिरी होती. आपल्या अखेरच्या कसोटीतही त्याने ३ षटकांत ६ धावांत ४ फलंदाज बाद केले होते.


सुभाष गुप्ते

त्यामुळे विनू मंकड व सुभाष गुप्ते हे फिरकी गोलंदाज नक्की झाले.

_________________________________________________________________________

आता उरले ३ मध्यमगती गोलंदाज. यात कपिलदेव हा अष्टपैलू हवाच. उत्कृष्ट स्विंग गोलंदाजी आणि तडाखेबंद फलंदाजी ही त्याची वैशिष्ट्ये. १३१ कसोटीत ४३४ बळी आणि ५०००हून अधिक धावा कपिलने केल्या आहेत.

भारतात वेगवान गोलंदाजांचे पर्व खऱ्या अर्थाने कपिलच्या आगमनानंतर सुरू झाले. पूर्वी रमाकांत देसाई, अबिद अली, रूसी सुर्ती वगैरे मध्यमगती गोलंदाज फक्त चेंडूची चकाकी जाईपर्यंत गोलंदाजी करायचे आणि नंतर लगेच फिरकी गोलंदाजांकडे चेंडू जायचा.

१९७४-७५च्या सुमारास आधी घावरी आला, मग मदनलाल आला व १९७८च्या सुमाराला कपिल आला आणि हे चित्र पालटायला सुरुवात झाली. नंतर लगेच बिन्नी, मनोज प्रभाकर, चेतन शर्मा, बलविंदरसिंग संधू वगैरे मध्यमगती गोलंदाज उदयाला आले.

१९९२पासून श्रीनाथ हा वेगवान गोलंदाज संघात आला. त्याच्याबरोबर वेंकटेश प्रसाद, आगरकर, झहीर खान, नेहरा, रुद्र प्रताप सिंह, बालाजी, इरफान पठाण, प्रवीण कुमार, मुनाफ पटेल, श्रीशांत, महंमद शमी, बुमराह असे अनेक नवीन वेगवान गोलंदाज संघात येत राहिले. यातील अनेक जण मध्यमगती नसून चांगलेच वेगवान होते.

१९३२मध्ये भारताने खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात महमंद निस्सार व अमरसिंग हे वेगवान गोलंदाज होते व ते चांगलेच वेगवान होते असे वाचले आहे. नंतर काही काळ दत्तू फडकर व रमाकांत देसाई हे मध्यमगती गोलंदाज भारताला मिळाले. रमाकांत देसाईने १९५९मध्ये पदार्पण केले व १९६८पर्यंत २८ कसोटीत त्याने ७४ फलंदाज बाद केले. त्याच्यानंतर अबिद अली, रूसी सुर्ती असे अर्धवेळ मध्यमगती गोलंदाज वगळता भारताला चांगला मध्यमगती/वेगवान गोलंदाज मिळायला १९७६पर्यंत वाट पाहावी लागली. १९७४-७५मध्ये मदनलाल व करसन घावरी हे दोन बर्‍यापैकी गोलंदाजी करणारे मध्यमगती गोलंदाज उदयाला आले. परंतु या सर्व गोलंदाजांची कारकिर्द फारशी मोठी नव्हती. मदनलाल व घावरी हे दोघेही ३९ कसोटी सामने खेळले.

भारतात खर्‍या अर्थाने वेगवान्/मध्यमगती गोलंदाजांचे पर्व सुरू झाले ते १९७८मध्ये कपिलदेवच्या आगमनानंतर. तोपर्यंत मध्यमगती गोलंदाजांना चेंडूची लकाकी जाईपर्यंतच चेंडू मिळायचा. १९७६मध्ये इंग्लंडविरुद्ध एका कसोटीत डावाचे पहिले षटक घावरीने टाकले, दुसरे षटक चक्क सुनील गावसकरने वेगवान धाव घेऊन टाकले, तिसरे पुन्हा घावरीने टाकले व चौथ्या षटकापासून बेदीने गोलंदाजीला सुरुवात केली. कपिलने आपल्या आपल्या स्विंग गोलंदाजीने भारतीय संघात वेगवान गोलंदाजांसाठी अनिवार्य स्थान निर्माण केले. तब्बल १६ वर्षे कारकिर्द असलेल्या कपिलदेवने आपल्या स्विंग गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या उडवल्या. कपिल तडाखेबंद फलंदाजही होता. १३१ कसोटीत ६ शतकांनिशी ५२४८ धावा आणि ४३४ फलंदाज बाद करणारा कपिल परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू होता. त्याच्याशिवाय सर्वकालीन सर्वोत्कृष्ट भारतीय संघ पूर्ण होऊ शकत नाही.

इतर सर्व वेगवान गोलंदाजांचा विचार केला, तर कपिलबरोबर जवागळ श्रीनाथ (६७ कसोटीत २३६ बळी) व झहीर खान (९२ कसोटीत ३११ बळी) हे दोन वेगवान गोलंदाज सर्वकालीन सर्वोत्कृष्ट संघात योग्य वाटतात.

_________________________________________________________________________

तर माझ्या मते सर्वकालीन सर्वोत्कृष्ट भारतीय संघ असा असेल.

- सुनील गावसकर व वीरेंद्र सेहवाग (सलामीची जोडी)
- राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर व विराट कोहली (मधली फळी)
- महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक व कर्णधार)
- विनू मंकड (डावखुरा फिरकी गोलंदाज व अष्टपैलू) व कपिलदेव (मध्यमगती गोलंदाज, अष्टपैलू व उपकर्णधार)
- सुभाष गुप्ते (लेगस्पिनर)
- जवागळ श्रीनाथ व झहीर खान (दोघेही मध्यमगती गोलंदाज)

__________________________________________________________________________

या संघात मोहिंदर अमरनाथ, वेंगरसकर, विश्वनाथ, गंभीर, किरमाणी, कुंबळे, अश्विन अशा अनेक उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश करता आलेला नाही, कारण आपण जास्तीत जास्त ११ खेळाडू निवडू शकतो. या लेखात उल्लेख केलेल्या प्रत्येक खेळाडूवर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल.

मी निवडलेल्या संघाविषयी मतभेद असू शकतात. परंतु यातील काही खेळाडू (गावसकर, सचिन, कपिल आणि धोनी) हे कोणीही निवडलेल्या संघात असणार, हे नक्की.


वाचने 8539 वाचनखूण प्रतिक्रिया 16

सौंदाळा Tue, 11/02/2021 - 10:53
उत्तम लेख गावसकर, सचिन, कपिल आणि धोनी बद्दल सहमत. सेहवाग आणि गावसकर हा सलामीचा पर्याय चांगला वाटत असला तरी अत्यंत संथ फलंदाजी करणार्‍या गावसकरबरोबर सेहवाग जास्त टिकेल असे वाटत नाही. माझे तरी असे निरिक्षण आहे की सेहवागला खूप वेळ स्ट्राईक मिळाली नाही तर तो आतताईपणा करुन खराब फटका मारुन बाद व्हायचा. माझ्या मते या संघात कोहलीला जागा नाही. त्याऐवजी गांगुली पाहिजे (फलंदाजांमधे एकही डावखुरा फंलदाज नाही) गांगुली कसोटीत देखील चांगली कामगिरी करायचा (कारकिर्दीचा शेवट सोडून) आणि उपयुक्त मध्यमगती गोलंदाजीदेखिल करायचा. जुन्या खेळाडुंची माहिती फक्त ऐकुनच आहे, त्यांचा खेळ कधी बघितला नाही किंवा त्याबद्दल जास्त वाचन पण नाही त्याबाबतीत माझा पास. क्रिकेट (आणि राजकारण) तुमचे होम पीच आहे आणि या विषयावर तुमचा लेख मस्त आणि माहितीपुर्ण असणारच याची खात्री होती.

बेकार तरुण Tue, 11/02/2021 - 12:23
लेख आवडला... खूप मेहनत करुन लिहिला आहे हे लगेच लक्षात येत आहे... बाकी ११ निवडणे हा कधी न संपणारा वाद आहे ... प्रत्येकाला आपल्या पिढीचे खेळाडु जरा जास्त आवडत असतात....

राघव Tue, 11/02/2021 - 12:25
चांगला संघ! तुम्ही सोळा जणांचा संघ निवडू शकता. अंतीम ११ कप्तान आणि कोच ठरवतील! आता सर्वोत्कृष्ट कोच कोण होऊ शकेल बरे?? बाकी कमी टेस्ट्स खेळून सुद्धा आपली छाप उमटवणारे विजय मर्चंट या संघात असणार नाहीत असं वाटत नाही. :-)

सर्व निवडींशी सहमत, माझ्या संघात मी दिलीप वेंगसरकर, अनिल कुंबळे आणि सौरव गांगुली चा समावेश केला असता पैजारबुवा,

तुषार काळभोर Wed, 11/03/2021 - 08:12
गुरुजींनी एकदम अभ्यासपूर्ण लेख लिहिलाय. कोहली सोडून इतर खेळाडूंशी बऱ्यापैकी सहमती होईल. गावस्कर, तेंडुलकर, कपिल आणि धोनी यांच्याविषयी सहमत. भारतीय कसोटी इतिहासातील हे निर्विवाद सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत. द्रविड, तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मण ही कदाचित सर्वोत्तम मधली फळी असावी. त्यामुळे या तीन जागी ही अख्खी फळी घेतली तरी चालेल. तीनच जागा आहेत, तेंडुलकर फिक्स आहे, गांगुली हवाच (आक्रमक + डावखुरा + गरजेनुसार स्विंग गोलंदाजी) या दोघांना बॅलन्स करायला द्रविड. द्रविड हा प्रचंड संयम असलेला आणि अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज होता. 'मला हा बॉल खेळायची खात्री नाही' असे सलग चाळीस वेळा म्हणून पाहिले चाळीस बॉल सोडून देणे केवळ त्यालाच जमू शकते. कित्येकवेळा सलामी फलंदाज पहिल्या षटकात बाद झाल्याने द्रविड पहिल्या षटकात खेळायला आला आहे. पाकिस्तान दौऱ्यात एकदा तो फक्त काही चेंडू मैदानाबाहेर होता. पाकिस्तानच्या दोन्ही डावांत पूर्णवेळ मैदानावर आणि भारतीय डावाच्या सुरुवातीलाच खेळायला येऊन तो नाबाद राहिला होता. शिवाय यष्टिरक्षकाला विश्रांती देताना द्रविड दोन पूर्ण डाव यष्टिरक्षण करू शकतो. तात्पर्य : ३-४-५ जागी द्रविड-तेंडुलकर-गांगुली यांना पर्याय नाही. येथे लक्ष्मण केवळ दुर्दैवाने बाहेर राहतोय. जर अष्टपैलू खेळाडू म्हणून (सेहवाग+सचिन+गांगुली) यांची (त्यांच्या सुरुवातीच्या काळातील) गोलंदाजी चालणार असेल तर मधल्या फळीत लक्ष्मण घेता येईल. चार गोलंदाज : गोलंदाजांची वीस बळी घेण्याची क्षमता हवीच. ती क्षमता मागील पंचवीस तीस वर्षातच जास्त दिसली आहे. एक डावखुरा जलदगती - जहीर खान अर्थातच भारताचा सर्वोत्तम आहे. एक जलदगती/स्विंग : कपिल. एक फिरकी - आकडे तत्कालीन परिस्थितीशी जुळवल्यास गुप्ते नक्कीच सरस वाटतात. चौथा गोलंदाज खेळपट्टीनुसार - आगरकर किंवा कुंबळे. चौदा खेळाडूंचा संघ निवडताना - गंभीर, मोहिंदर अमरनाथ आणि श्रीनाथ प्रशिक्षक - जॉन राईट :) चौदा खेळाडूंत आठ खेळाडू २०००-२०१० वर्षात खेळले आहेत. म्हणजे भारतीय कसोटी क्रिकेटचा तो सुवर्णकाळ म्हणता येईल. आणि आताचा कोणी नसल्याने कसोटी क्रिकेट संपलं, असं म्हणता येईल का? तसं नसेल तर लक्ष्मणच्या जागी कोहलीला घेता येईल.

श्रीगुरुजींनी लिहिलाय तर लेख चांगलाच असेल. क्रिकेट मध्ये काहीही इंटरेस्ट नसल्याने लेख आणी प्रतिक्रिया स्कीप करून प्रतिक्रिया देऊन कल्टी मारतो.

प्रचेतस गुरुवार, 11/04/2021 - 05:18
मस्त एकदम. कोहलीच्या जागी मधल्या फळीत गांगुली, विजय हजारे, सरदेसाई, वेंगसरकर आदी कुणीही चाललं असतं असं वाटतं फक्त.

मित्रहो Sat, 11/06/2021 - 22:55
मेहनत घेतली आहे. धोनी हवा आणि कॅप्टन म्हणून हवा. गावसकरच्या सोबतीला सेहवाग उत्तम. द्रविडशिवाय कसोटी क्रिकेट शक्य नाही. कपिल, तेंडुलकर हवेच. लक्षृमण हवा. बुमराह सुद्धा हवा.

श्रीगुरुजी Mon, 11/08/2021 - 14:22
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद! फक्त ११च खेळाडू निवडायचे असल्याने व त्यात गावसकर, सचिन, धोनी व कपिल यांची जागा नक्की असल्याने अनेक गुणी खेळाडूंमधून फक्त ७ खेळाडू निवडणे खूप अवघड आहे. त्यात सुद्धा एक सलामीचा फलंदाज, दोन मधल्या फळीतील खेळाडू, दोन फिरकी गोलंदाज व दोन मध्यमगती गोलंदाज अशा पद्धतीनेच उर्वरीत सात खेळाडू निवडता येतील. भारतात अनेक गुणी मधल्या फळीतील फलंदाज व अनेक नामवंत फिरकी गोलंदाज असल्याने हे चार खेळाडू निवडणे सर्वात जास्त आव्हानात्मक आहे. त्यामुळेच लक्ष्मण, गांगुली, मोहिंदर अमरनाथ, विश्वनाथ, वेंगसरकर, विजय हजारे, पुजारा, रहाणे, विजय मांजरेकर, दिलीप सरदेसाई अशा अनेक नामवंत फलंदाजांना निवडता आले नाही. तसेच बेदी, चंद्रशेखर, प्रसन्ना, वेंकटराघवन, हिरवाणी, कुंबळे, हरभजन, अश्विन असे नामवंत फिरकी गोलंदाज निवडता आले नाही. त्या तुलनेत दोन मध्यमगती गोलंदाज निवडणे फारसे कठीण नाही कारण कपिलपासूनच भारतात खऱ्या अर्थाने मध्यमगती गोलंदाज निर्माण झाले. बुमराह खूपच कमी कसोटी सामने खेळल्याने त्याचा विचार केला नाही.