भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती: प्रकरण ६ - आत्मविचार (काही गैरसमज आणि त्यांचे निराकरण)

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
11 Jun 2020 - 12:31 pm

या प्रकरणात आत्मविचारासंबंधीचे काही गैरसमज तसेच त्यांचे निराकरण यांचा समावेश आहे.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांशः

'अद्वैत वेदांत' या भारतीय दर्शनशास्त्रातील सैद्धांतिक प्रणालीचा आजमितीला अंदाजे एका सहस्त्रकापेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी सातत्याने उत्कर्षच होत आलेला आहे. रमण महर्षींनी वेळोवेळी ज्या तात्विक सिद्धांतांचे प्रतिपादन केले, त्यांचे अद्वैत वेदांताच्या अनुयायांनी अंगीकारलेल्या भूमिकेशी कमालीचे साधर्म्य असल्याचे दिसते. रमण महर्षी आणि अद्वैत वेदांताचे उपासक यांच्या वैचारिक भूमिकेत बहुतांशी सर्वच बाबतीत एकवाक्यता असल्याचे दिसत असले, तरी तदनुषंगिक बाबी आचरणात आणण्याविषयीच्या त्यांच्या भूमिका मात्र पूर्णपणे वेगळ्या असल्याचे दिसून येते. अद्वैत मताचे गुरूजन बहुधा 'स्वरूप' ही एकमेव वस्तुस्थिती आहे असे मनावर वारंवार ठसवण्यावर आधारित असलेल्या ध्यानपद्धतींचा पुरस्कार करत असले, तरी रमण महर्षींनी मात्र आत्मविचाराचेच ठामपणे प्रतिपादन केलेले दिसते. 'मी ब्रह्म आहे' किंवा 'तो (ईश्वर) मीच आहे' अशी ठाम खात्री देत असलेल्या विधानांचा मंत्रासारखा वापर करणे किंवा क्वचितप्रसंगी अशा महावाक्यांविषयी चिंतन मनन करणे आणि त्यातला गर्भितार्थ अनुभवण्याचा प्रयत्न करणे या पेक्षा आत्मविचार ही वेगळी साधनाप्रणाली आहे.

आत्मविचाराची सुरूवात 'मी कोण आहे?' या प्रश्नाने होत असल्याने अद्वैतमताचे पारंपारिक अनुयायी असे गृहीत धरताना दिसतात की 'अहं ब्रह्मास्मि' हे या प्रश्नाचे उत्तर आहे. काही अद्वैत मताचे साधक आपल्या मनाला या वैचारिक उत्तराची सतत घोकंपट्टी करण्यात गुंतवून टाकत असल्याचेही दिसते. महर्षी मात्र या खटाटोपाबद्दल स्पष्टपणे असहमती दाखवताना असे स्पष्टीकरण देत असत की 'मी कोण आहे' या प्रश्नाचे तार्किक उत्तर शोधण्यात किंवा एखाद्या तर्कनिष्पत्तीच्या स्वरूपात गवसलेल्या उत्तराची यांत्रिक घोकंपट्टी करण्यात सतत गुंतलेले मन त्याच्या उगमस्थानी बुडून जाण्याची आणि त्याचा लय होण्याची अशा खटाटोपात शक्यताच उरत नाही. याच कारणामुळे 'मी कोण आहे?" या प्रश्नाचा मंत्रवत उपयोग करण्याबद्दलही ते ठामपणे असहमती दाखवत असत. त्यांचे असे ठाम मत होते की या दोन्ही चुकीच्या दृष्टीकोनांमुळे आत्मविचारामागचा मूळ हेतूच साधकाच्या हातून निसटून जातो. महर्षी असे सांगत असत की 'मी कोण आहे' हा प्रश्न मनाचे विश्लेषण करून त्याच्या स्वरूपाविषयी बौद्धिक निष्कर्ष काढण्यासाठी दिलेले आमंत्रण नाही, तसेच तो एखादा सूत्रस्वरूपात गोवलेला मंत्रही नाही. साधकाच्या हाती असलेले ते एक सहज सुलभ साधन आहे, जे बाह्य वस्तुंविषयीचे विचार, वासना आणि आकलन यात गुंतलेल्या चित्ताच्या अवधानाला तेथून परावृत्त करून विचारक किंवा अनुभोक्त्याकडे परत वळवण्यात मोलाची मदत करते. 'मी कोण आहे' या प्रश्नाचे खरे उत्तर मनाच्या अंतरंगात किंवा मनाद्वारे शोधता येत नाही, कारण त्याचे एकमेव खरे उत्तर हे उन्मनी स्थितीची अनुभूतीच आहे असे रमण महर्षींचे ठाम मत होते.

आत्मविचाराविषयीचा आणखी एक सर्वदूर पसरलेला गैरसमज हिंदूंच्या एका धारणेवर आधारलेला आहे, तो असा की आपल्याला अनुभवता येत असलेल्या सगळ्या विचारांचा आणि अनुभवांचा जाणीवपूर्वक बुद्धीने अव्हेर करत गेल्यास त्याची परिणती आत्मसाक्षात्कारात होते. वेदांत परंपरेत या साधनेला 'नेति नेति' असे म्हणतात. नेति नेति करणारा साधक 'मी मन नाही', 'मी देह नाही' अशा प्रकारे एक एक गोष्टीचा बौद्धिक पातळीवर अव्हेर करत जातो, या ओघातच आत्मस्वरूप आपोआप आपल्याला प्रकट करेल अशी त्याची/ तिची अपेक्षा असते. काही हिंदू ग्रंथांमधे नेति नेतिलाच 'आत्मविचार' असे नाव दिलेले आहे, त्यामुळे रमण महर्षींनी प्रतिपादन केलेला आत्मविचार आणि नेति नेति यात कित्येकांची गल्लत होताना दिसते. रमण महर्षींचे नेति नेति सारख्या काही पारंपारिक पद्धतींबद्दलचे मत पूर्णपणे प्रतिकूल होते. ते त्यांच्या अनुयायांना अशा पद्धतींचा अवलंब करण्यापासून परावृत्त करत असत. महर्षी वेळोवेळी हे बजावून सांगत असत की साधकाने हव्या तितक्या बौद्धिक कसरती केल्या तरी मनापलीकडचा प्रांत अवगत करून घेण्यासाठी त्यांचा तिळमात्रही उपयोग होण्याची सुतराम शक्यता नाही.

प्रश्नः ध्यान आत्मविचारापेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणावे का?
रमण महर्षी: ध्यानात मनोनिर्मित प्रतिमांचा अंतर्भाव असतो, तर आत्मविचार हा (सगळ्या आभासांमागे दडलेल्या) वास्तविकतेचा शोध असतो. ध्यान ही वस्तुनिष्ठ तर आत्मविचार ही व्यक्तिनिष्ठ बाब आहे.

प्रश्नः या (ध्यान, अध्यात्म वगैरे) विषयाच्या बाबतीत आपला वैज्ञानिक दृष्टीकोण असायला हवा.
रमण महर्षी: वास्तविक नसलेल्या (मिथ्या, अशाश्वत) गोष्टींचा त्याग करणे आणि वास्तविकतेचा (सत्य, शाश्वत) शोध घेणे पूर्णपणे वैज्ञानिकच आहे.

प्रश्नः मला असे सुचवायचे होते की सर्वप्रथम मन, मग बुद्धी, त्यानंतर अहंकार असे क्रमश:च नष्ट होत जात असतील.
रमण महर्षी: निजस्वरूप ही एकच गोष्ट वास्तविक सत्य आहे. त्या व्यतिरिक्त सारे आभासी आहे. तुमचे मन किंवा बुद्धी तुमच्यापेक्षा पृथकत्वाने नांदू शकत नाहीत. बायबल सांगते, "निश्चळ व्हा, आणि मी देव आहे अशी प्रचिती अनुभवा". ("बी स्टिल अँड नो दॅट आय अ‍ॅम गॉड"). आत्मा हाच परमात्मा आहे हे अनुभवण्यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे - निश्चळ असणे.

प्रश्नः मला 'मी' विषयीचे भान (आत्मभान) असते. असे असूनही माझ्या मागची पीडा काही संपत नाही.
रमण महर्षी: तुमचे 'मी' विषयीचे भान शुद्ध आत्मभान नाही. शरीर आणि ज्ञानेद्रियांशी स्वरूपाचे तादात्म्य आहे या भूमिकेतून घेतलेल्या अनुभवांची त्यात भेसळ आहे. आपण अनुभवत असलेली सारी पीडा कुणाला आहे याचा शोध घ्या. 'मी आहे' या जाणीवेभोवती सारा खेळ चाललेला आहे. या जाणीवेतच चित्त स्थिर करा. तसे केल्याने इतर विचारांचा फापटपसारा क्षीण होत जाईल.

प्रश्नः (जग मिथ्या आहे असे ठामपणे मानून आत्मविचाराने अंतर्यामी शोध घेत असताना) या गोष्टीची खात्री काय की आजवर अज्ञात असलेली कुठलीशी अनिर्वचनिय गोष्ट अंतर्यामी माझ्या स्वागतासाठी तयार असेल?
रमण महर्षी: एखादा साधक पुरेशा पक्व अवस्थेला पोचला की त्याची तशी आपोआपच खात्री होते.

प्रश्नः असा अध्यात्मिक विकास मला कसा साध्य होईल?.
रमण महर्षी: शास्त्रात याची अनेकविध उत्तरे दिलेली आहेत. मी इतकेच म्हणेन की अन्य कुठल्याही मार्गाने आधी जर काही प्रगती झालेली असेल, तर आत्मविचाराने अधिक वेगाने परिपक्वता प्राप्त होत जाते.

प्रश्नः हा विचारांचा एक वर्तुळाकार भोवरा झाला. मी जर पक्व असेन तर मी आत्मविचारासाठी पात्र असेन आणि अशी पात्रता प्राप्त करण्यासाठी मला आत्मविचारच करावा लागेल.
रमण महर्षी: मनाचा स्वभावच असा आहे की त्याच्यापुढे सतत अशा अनेक शंका आणि अडचणी उभ्या ठाकतील. मनाला स्वत:चे समाधान करून घेण्यासाठी कुठल्या ना कुठल्या सैद्धांतिक प्रणालीची नेहेमीच गरज असते. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की ज्याला गांभिर्याने आणि तळमळीने ईश्वराचा शोध घ्यायचा आहे किंवा आपल्या निजस्वरूपाचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे अशा साधकाची आंतरिक तळमळच त्या दृष्टीने पुरेशी असते. अशा पक्व साधकाला कुठल्याही सैंद्धांतिक मीमांसेची अजिबात आवश्यकता नसते.

धर्मआस्वाद