मिर्जा गालिब हे शायरी मधलं एक अजरामर नाव. गालिबची "हजारो ख्वाहिशे ऐसी" हि गझल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. कितीतरी लोकांनी याचं रसग्रहण आपापल्या शब्दात केलं आहे त्यात माझीही एक भर घालतो.
"हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमाँ , लेकिन फिर भी कम निकले"
यामध्ये गालिबने माणसाच्या कधीही न संपणाऱ्या इच्छा आकांक्षांचं वर्णन अगदी अचूक शब्दात केलं आहे. एक एक इच्छा पूर्ण करताना जन्म संपेल अशा हजारो इच्छा आहेत. तशा माझ्या बऱ्याच इच्छा पूर्ण झाल्या आहेत, पण तरीही कमीच झाल्या आहेत.
"डरे क्यों मेरा कातिल क्या रहेगा उसकी गर्दन पर
वो खून जो चश्म-ऐ-तर से उम्र भर यूं दम-ब-दम निकले"
माझ्या डोळ्यातून जे अश्रू समान रक्त वाहत आहे त्यासाठी माझ्या कातिल (प्रियसी) ला घाबरण्याची काही गरज नाही, याबद्दल त्याला कोणी शिक्षा देणार नाही.
"निकलना खुल्द से आदम का सुनते आये हैं लेकिन
बहुत बे-आबरू होकर तेरे कूचे से हम निकले"
या ओळींचा अर्थ कळण्यासाठी 'आदम' ची गोष्ट माहिती असायला हवी. आदम हा मूळपुरुष खुल्द म्हणजे स्वर्गात राहत होता. त्याने खुदाची आज्ञा मोडल्यामुळे त्याला स्वर्गातुन हाकलून दिल गेलं. गालिबने येथे त्याची स्वतःशी तुलना केली आहे. स्वर्गातुन आदमला हाकलून दिलेलं आत्तापर्यंत ऐकलं होत पण त्यापेक्षाही बेअब्रू होऊन तुझ्या गल्लीतून मी निघालो.
"भ्रम खुल जाये जालीम तेरे कामत कि दराजी का
अगर इस तुर्रा-ए-पुरपेच-ओ-खम का पेच-ओ-खम निकले"
तुझ्या उंचीचा भ्रम क्षणात विरून जाईल जर डोक्यावरील पगडीतून कुरळे केस बाहेर आले तर
"मगर लिखवाये कोई उसको खत तो हमसे लिखवाये
हुई सुबह और घर से कान पर रखकर कलम निकले"
जर कुणाला तिला पत्र लिहायचं असेल तर माझ्या कडून लिहून घ्यावं. मी तर सकाळ झाली कि लगेच लेखणी कानाला लाऊन घराबाहेर पडतो.
"हुई इस दौर में मनसूब मुझसे बादा-आशामी
फिर आया वो जमाना जो जहाँ से जाम-ए-जम निकले"
या दरम्यान माझं मदिरेशी नात जुळलं. आणि मग प्रत्येक प्याल्यात मला तिचेच रूप दिसू लागलं. 'जाम-ए-जम' म्हणजे असं जादुई भांड किंवा प्याला ज्यामध्ये आपल्याला हवी ती व्यक्ती किंवा गोष्ट दिसते.
"हुई जिनसे तव्वको खस्तगी की दाद पाने की
वो हमसे भी ज्यादा खस्ता-ए-तेग-ए-सितम निकले"
मला ज्यांच्या कडून ( माझ्या या अवस्थे बद्दल) सांत्वनाची अपेक्षा होती ते तर माझ्या पेक्षाही वाईट अवस्थेत होते.
"मुहब्बत में नहीं है फ़र्क जीने और मरने का
उसी को देख कर जीते हैं जिस काफिर पे दम निकले"
प्रेमामध्ये जगण्यात आणि मरण्यात फारसा फरक नसतो. ज्या व्यक्तीवर आपण मरत असतो त्या व्यक्तीकडे बघूनच जगतो.
"जरा कर जोर सिने पर कि तीर-ऐ-पुरसितम निकले
जो वो निकले तो दिल निकले, जो दिल निकले तो दम निकले"
जरा माझ्या छातीवर जोर देऊन आतमध्ये घुसलेला बाण काढा कुणीतरी. बाण बाहेर आला कि त्याबरोबर माझं हृदयही बाहेर येईल आणि त्याबरोबर माझे प्राणही!
"खुदा के बासते पर्दा ना काबे से उठा जालिम
कहीं ऐसा न हो याँ भी वही काफिर सनम निकले"
कृपा करून पडदा बाजूला करू नका, कदचित इथे तीच माझी प्रियसी असेल.
"कहाँ मयखाने का दरवाजा ' गालिब' और कहाँ वाइज़
पर इतना जानते हैं , कल वो जाता था के हम निकले"
कुठे मदिरालयाचा दरवाजा आणि कुठे 'वाइज' म्हणजे धर्माचा उपदेशक! पण मला एवढ नक्की माहिती आहे कि मी मदिरालयातुन बाहेर पडलो कि तो आत जातो!
यावरून मला 'कूछ तो लोग कहेंगे' या गाण्यातील ओळी आठवल्या.
"हमको जो ताने देते है, हम खोये है रंगरलियों में,
हमने खुद उनको भी आते देखा है इन गलीयोमे"
गालिबची शायरीची एक वेगळीच शैली होती. तो दुःखद गोष्ट सुद्धा काही वेळा विनोदी पद्धतीने मांडत असे. त्याची प्रतिभाशक्ती तर अप्रतिमच होती. जगजीत सिंग यांच्या आवाजात गालिबची हि गझल म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. तुमच्या संग्रहात जर हि गझल असेल तर या निमित्ताने पुन्हा एकदा जरुर ऐका.
प्रतिक्रिया
12 Oct 2016 - 9:46 am | पैसा
भावार्थ आवडला!
12 Oct 2016 - 12:14 pm | विचित्रा
सुंदर रसग्रहण
12 Oct 2016 - 5:53 pm | निर्धार
कृपया याचा अर्थ सांगाल का?
13 Oct 2016 - 12:08 am | चांदणे संदीप
कारागीर / मिस्त्री डोळ्यासमोर आला... ;)
रच्याकने, लेखकाला wow आहे! (मराठीतला, अभ्यासासाठी!)
Sandy
13 Oct 2016 - 3:59 pm | घायाळ
तसेच आहे ते
13 Oct 2016 - 11:08 pm | रातराणी
हे हे भारी होता जोक ;)
14 Oct 2016 - 11:34 am | निर्धार
हा हा...
13 Oct 2016 - 3:58 pm | घायाळ
पूर्वी लिहू-वाचू शकणारे लोक कमी असत.मग कुणाला पत्र लिहायचे तर ते लिहिता-वाचता येणा-या माणसाकडून लिहून घेणे क्रमप्राप्त असे. लिहिता येणारे काही लोक मग उदरनिर्वाहासाठी हेच काम करायचे.
आता शायरमहोदयांची प्रेयसी म्हणजे अद्वितीयच असणार ना. मग तिच्या प्रेमात सारा गावच.
मग ज्यांना लिहिता येत नाही त्यांना प्रेमपत्र आपले शायर लिहून देणार. त्यायोगे आपण लिहिलेले पत्र आपली प्रिया वाचणार यातच शायरला आनंद. आणि ह्याच कामासाठी शायर सकाळी सकाळी कानाला लेखणी अडकवून बाहेर पडताहेत.त्यांनी जणू काही प्रियेला पत्रं लिहायला मिळावीत म्हणूनच हा व्यवसाय निवडला आहे
14 Oct 2016 - 11:33 am | निर्धार
आभारी आहे
12 Oct 2016 - 6:34 pm | गंम्बा
मला माहिती असलेला जाम-ए-जम चा अर्थ जाम-ए-जमशेद असा आहे. म्हणजे जमशेदचा दारु प्यायचा प्याला. जमशेद म्हणजे पर्शिया ( आजचा इराण ) चा प्रसिद्ध राजा. त्याचा दारु प्यायचा प्याला मोठा असायचा म्हणे.
ह्या शेर मधे प्रेयसी चा संबंध आहे असे वाटत नाही, प्लेन गमंतशीर केलेले दारु प्यायचे वर्णन आहे.
12 Oct 2016 - 6:37 pm | गंम्बा
हा ही अर्थ गंडलाय असे वाटते.
अश्रुरुपातुन रक्तच वाहुन गेल्यामुळे गळा कापला तर रक्त येणार नाही ( क्या रहेगा उसकी गर्दन पर ). त्यामुळे मान कलम करताना घाबरायची किंवा विचार करायची गरज नाही.
13 Oct 2016 - 4:18 pm | घायाळ
प्रियेच्या विरहात नायक आयष्यभर रड रडला. आता विरहातले अश्रू म्हणजे रक्तापासूनच बनलेले.त्यामुळे आयुष्यभराच्या रडण्याने नायकाच्या शरीरात रक्तच नाही उरलेले. आणि उर्दु काव्यातली प्रिया खंजर लेकर आशिकचा कत्ल करण्यास सदैव टपलेलीच असते
खंजर चालवताना एरवी जी उडाली असती ती रक्ताची चिळकांडी आता काही तुझ्या मानेवर उडणार नाही. त्यामुळे माझ्या खुनाचा आळ तुझ्यावर यायचा काही प्रश्न नाही. गालिब प्रियेला सांगतोय तेव्हा तू बिनधास्त माझी मान कलम कर घाबरायची काही आवश्यकता नाही,
15 Oct 2016 - 4:51 am | साहना
जबर! हि गझल कुणी आठवून द्यावी म्हणजे चाकू घेऊन हृदयावरील जखम खोल करण्या सारखे आहे.
"रंजीश हि सही.." च्या तोडीची हि गजल. माझा मते उषा उत्थुप ह्यांनीच ह्या गझलेला गायनाने न्याय दिलाय https://www.youtube.com/watch?v=42FPgmlLskk
त्या चित्रपटाची कथा सुद्धा अप्रतिम होती.
जगजीतसिंग गजल किंग असले (आणि मला पितृतुल्य असले) तरी ह्या गजलेला त्यांनी फारच दुःखी बनवले आहे. गालिबने ह्या ओळी लिहिताना कदाचित दुःख भावनाच मनात ठेवली होती. पण हि दुःख भावना नेहमीची विरह भावना किंवा वैफल्य भावना नाही. ह्यांत रावण रचित "शिव तांडव स्तोत्रा" ची दुःख भावना आहे. हातांतून रेती सुटत जाते त्याप्रमाणे वेळ निघून जातो आणि त्याच प्रमाणे आपली अनेक स्वप्ने, अपूर्ण इछा कधीही पूर्ण होणार नाहीत हि भावना अधिकाधिक प्रखरतेने पुढे येत राहते. एका वेगळ्या पातळी वरचे हे दुःख आहे. किमान माझ्या मता प्रमाणे जगण्याची क्षणभंगुरता ह्यातून कवीला सांगायची आहे.
शिव तांडव स्तोत्राची आठवण ह्या साठी झाली कि :
कदा निलिम्पनिर्झरीनिकुञ्जकोटरे वसन्
विमुक्तदुर्मतिः सदा शिरः स्थमञ्जलिं वहन् |
विलोललोललोचनो ललामभाललग्नकः
शिवेति मंत्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम्
ह्या ओळींत सुद्धा रावण "मी कधी सुखी होईन ? कधी माझ्या वाईट विचारापासून मुक्ती प्राप्त करेन ? " असा प्रश्न विचारतो त्यांतील हतबलता आणि वरील गझल मधील हतबलता मला एकाच पातळी वरील वाटते.