बरेच दिवस झाले होते कुठेतरी ट्रेकींग ला जाण्याचा प्लान चालू होता .थोडावेळ विचार झाला आणि ठिकाण ठरलं माहुली गड हे नाव आमचा मित्र बाबू ने सुचवलं होत तो आधी तिथे गेला होता पण ट्रेकींग पूर्ण करता नाही आल त्यांना कारण ते रस्ता चुकले होते म्हणून तो म्हणाला आपण तिचेच जाऊ मग ठरलं आमचं ऑक्टोबर च्या १६ तारखेला शनिवारी जायचंच. माहुलीगड हा ठाणे जिल्ह्यात असून आसनगाव रेल्वे स्टेशन पासून साधारण ८-१० कि.मी .अंतरावर आहे.
ठरल्या प्रमाणे सगळे सकाळी ६ वाजता तयार होऊन निघालो ते थेट नाशिक हायवेवर डीझेल भरायला थांबलो तिथून मग आम्ही मध्ये गडावर खाण्यासाठी म्हणून वडेपाव घेतले आणि गडाच्या पाय्थाशी गेलो तिथे एक शंकराच मंदिर आहे. आतमध्ये गडाचा आणि बाजूच्या प्रदेशाचा नकाशा आहे तो पहिला आणि मग पुढे एका घराजवळ आलो त्याचं दुकान पण होत आणि तिथे जेवणाची व नाश्त्याची सोय होती आम्ही कांदेपोहे घेतले .खाता -खाता आम्ही गडाची चौकशी करत होतो . मी सहज त्यांना विचारलं इथे प्राणी वगैरे आहेत का ? ते म्हणाले " हो आहेत ना ! तसं ते जंगलच होतं त्यामुळे प्राणी तर तिथे असणारच मी पुढे मुद्दाम विचारलं वाघ आहेत का हो ? तशी त्यांची बायको अगदी सहज म्हणाली "हो आहेत की ह्ये काय कालच आमच्या एका कुत्र्याला नेलं बिबट्याने " हे ऐकून खाताना आमची तोंड उघडीच राहिली . आता हे एकून आम्ही काय माघार तर घेणार नव्हतोच त्यामुळे आम्ही गडावर जायला निघालो .
माहुली गड हा फारसा कुणाला माहित नसला तरी शिवाजी महाराजांच्या काळात त्याला महत्त्व होते. आदिलशहा पासून छोट्या निजामाला वाचवण्यासाठी शहाजी राजे शिवबा आणि जिजाऊ ना घेऊन ह्याच किल्ल्यावर आले होते तेव्हा शिवाजी फक्त ६ वर्षांचे होते . पुढे आदिलशहाचा सरदार कार्तलब खान ने २ महिने माहुलीला वेढा दिला होता , नंतर वाटाघाटी ने मार्ग सुटला . माहुलीच्या बाजूलाच पळसगड आणि भंडारगड आहेत . हे खूप विस्तीर्ण असा जंगल आहे .
(हे जरूर वाचा)
पुरंदरच्या तहात माहुली पण मुघलांकडे गेला होता पण अवघ्या २ वर्षात महाराजांनी २३ किल्ल्यांसकट २५० किल्ले जिंकले त्यात माहुलीगड ही होता. ठाणे जिल्ह्यातला हा सर्वात उंच किल्ला आहे आणि ह्याची उंची २८०० फूट इतकी आहे
गड चढताना आमची चांगलीच दमछाक झाली होती . आणि धुकं सुद्धा खूप होत त्यात डोक्यापेक्षा हि वर वाढलेलं जंगल त्यातून आम्ही चालत होतो . गडावर आमच्या व्यतिरिक्त कोणीही गावकरी किंवा ट्रेकर आम्हांला दिसले नाही. त्या जंगलातून जाताना सेफ्टी म्हणून आम्ही फक्त काठी तेवढी घेतली, माझ्या हातात तर कॅमेरा होता, त्यामुळे मला काठी घेण शक्य नव्हत काही ठिकाणी तर चढण खूप सरळ होती
आमच्या एका मित्राने मनीष ने तळलेले चणे आणले होते. ते खात खात आणि वाटेत दिसतील तेवढे खेकडे पकडत आम्ही चालत होतो त्या खेकड्यांचे फोटो काढून पुन्हा सोडून द्यायचो.
बरीच चढण चढल्यावर आम्ही एका टोकावर येऊन पोहचलो बाबू पाहिल्यावेळेस आला होता तेव्हा इतक्या वर आला नव्हता त्यामुळे आता किल्ला कोणत्या बाजूला आहे हे त्याला माहित नव्हत पण प्रतापगडावर ध्वजरोहाणाची जागा आहे तसाच आम्हांला एक आकार दिसला पण धुक्यांमुळे तो नीट दिसत नव्हता हाच किल्ला असणार असा समजून आम्ही तिथेच गेलो . आपण चुकलोय हे आम्हांला तिथे गेल्यावर कळल पण तिथून खालचं दिसणारं विहंगमय दृश्य पाहून चुकलो ते बरचं झाल अस वाटलं
(ह्याच्या दोन्ही बाजूंना दरी होती फक्त फोटो काढण्यासाठी आम्ही तिथे उभे होतो )
ह्या चुकलेल्या वाटेवरून आम्ही परत आलो बरोबर असणाऱ्या वाटेने चालू लागलो पुढे एकदम सरळ उभी दगडं होती आणि त्यावरून चढण्यासाठी एक लोखंडी शिडी होती पण ती वरच्या बाजूला बांधलेली आणि खाल च्या बाजूने हवेत लटकत होती , आधी तर कोणी जायला तयार नव्हतं कारण वर चढताना शिडी पडली तर काय होईल म्हणून ; पण नंतर लगेच तयार झाले वर चढायला वर आम्ही गेलो तिथे पाण्याचं टाके होते तिथून पुढे गेलो,खूप पुढे गेलो पण किल्ला काही दिसत नव्हता वैतागून एका जागी बसलो. आणि म्हणालो आता काय नाही किल्ला बिल्ला इथेच खाऊया आणि जाऊया घरी तेव्हा जेवण्या आधी हात धुवायला आमचा एक मित्र सुरज डोंगराच्या किनारी गेला आणि तो तिथूनच ओरडला "अरे हा बघ किल्ला तर इथे आहे" आम्हाला वाटला हा आता मस्करी करतोय पण खरचं किल्ला तिथे होता त्याला तिथून खाली किल्ल्याची दगडं दिसली होती.मग जेवणाचा बेत रद्द करून तडक आम्ही किल्ल्याकडे गेलो.
नकाशात पाहिलं तसं शंकराची पिंडी होती, आणि भग्न अवस्थेतल्या देवड्या आणि तिथेच एक पिण्याच्या पाण्याचं टाके होते मात्र पाणी थोडं दुषित होत.आणि एक महादरवाजा सगळं पाहून झाल्यावर तिथेच भोजनाचा कार्यक्रम आटोपला
मग विचार केला, की इथून भंडारगड सुद्धा जवळच आहे तो पण पाहून येऊ, म्हणून पुन्हा आमची पायपीट सुरु झाली पण नुकताच पावसाळा संपला होता त्यामुळे रान खूप वाढले होते.आणि आम्हाला वाट सापडत नव्हती त्यामुळे ती फुकटची पायपीट करून सगळ्यांना कंटाळा आला होता पण गडावर खूप मस्त वातावरण होतं आणि फोटोग्राफी साठी तर एकदम मस्तच लोकेशन होतं त्यामुळे तिथे फोटो काढण्यात जरा वेळ आम्ही रमलो
आम्हाला काळोख व्हायच्या आत खाली उतरायचे होते मग आम्ही परतीची वाट धरली येताना मात्र सर्वजण पटापट उतरत होते.सगळ्यांना खूप क्षीण आला होता तेव्हा लवकर खाली जाऊन पाण्यात मजा करायची होती
पाण्यात मजा करून झाल्यावर आम्ही निघालो, माहुलीगड ते हायवे ला जाताना प्रसिध्द असा मानस मंदिर लागतं तिथे जाऊन मग आम्ही घरी गेलो
(टीप : आम्ही येथे १६/१०/२०१० साली गेलो होतो आता कदाचित तेथे बदल झाले असतील )
फोटो पाहण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा :http://mahuligad.blogspot.in/
प्रतिक्रिया
17 Feb 2013 - 2:33 pm | आदूबाळ
फटू?
17 Feb 2013 - 3:46 pm | स्पंदना
शहाजी महाराजांच्या काळातला इतिहास आवडला.
अनिकेत छान लिहिल आहे पन जरा इथले बाकिचे धागे वाचा भटकंतीचे. नाही काय आहे आम्हाला आता फोटो सकट कुठे गेला होता, कोण कोण होतं, ते सारं पहायचं असत. बघा जमल तर नाही तर जे आहे त्यात खुष आहोतच.
17 Feb 2013 - 4:26 pm | पैसा
सहमत आहे.
18 Feb 2013 - 8:27 am | अनिकेतदळवी
फोटो more than 1 Mb आहेत म्हणून अपलोड नाही करता आले. शेवटी जी लिंक ठेवली आहे
तिथे फोटो बघायला मिळतील.
आणि तुमच्या प्रतिसाद बद्दल आभारी आहे
17 Feb 2013 - 9:40 pm | प्रचेतस
लेखन आवडले.
फोटोंनी अजून बहार आणली असती.
17 Feb 2013 - 10:31 pm | जेनी...
दळ्वी काका ... मला मनिष आणि तो जेवणाआधी हात धुवायला गेलाला मित्र पहायचे आहेत.
त्यांचे फोटो लवकरात लवकर टाका .. बाकिचे सावकाश आले तरि चालतिल :)
बाकि लेखात नाजुक साजुक गोष्टिंचे उल्लेख खुसखुशित करता आले असते असं
आपलं उगाच वाटुन गेलं ..
पूढील लेखनकार्यास शुभेच्छा .
18 Feb 2013 - 8:28 am | अनिकेतदळवी
फोटो more than 1 Mb आहेत म्हणून अपलोड नाही करता आले. शेवटी जी लिंक ठेवली आहे
तिथे फोटो बघायला मिळतील.
आणि तुमच्या प्रतिसाद बद्दल आभारी आहे
19 Feb 2013 - 12:47 pm | वेल्लाभट
अनिकेत, नमस्कार
२ वर्षांपूर्वी माहुलीला जाऊन अर्ध्या पाऊण चढाईनंतर परत आलो होतो. लवकरच पुन्हा जायचे आहे. तुझ्या या पोस्ट चा फायदा होईल नक्कीच. त्या दुकान वाल्या व्यक्तीचं नाव व फोन असेल तर शेअर करशील का?
बाकी फोटो छान आहेत.
धन्यवाद.
20 Feb 2013 - 9:47 am | अनिकेतदळवी
नाही त्यांचा फोन नंबर तर नाही पण तुम्ही weekend किंवा holiday ला गेलात तर नाश्त्याची सोय होते. आणि तिथे गेल्यावर त्यांना सांगून जेवणाची सोय पण होते. साधारण 70 रु. थाळी आहे unlimited
20 Feb 2013 - 12:21 pm | वेल्लाभट
ओक्के ! थँक्स !
20 Feb 2013 - 3:00 pm | सुहास झेले
माहुली...
ह्म्म्म... सिंहगडासारखं एक प्रेक्षणीय स्थळ. किल्ला उंचावर असल्याने हौशी तरुणाई विकेंड सेलेब्रेट करायला किल्ल्याच्या देवड्यांमध्ये मुक्कामाला असतात. किल्ल्याच्या महादरवाज्याला प्रचंड घाणीने विद्रूप केलंय... असो अजून काही बोलणे नाही. :( :(
इथला धबधबा खूप प्रसिद्ध आहे. आम्ही इथे रॅपलिंग केले होते २००८ साली
21 Feb 2013 - 9:46 am | अनिकेतदळवी
खुप मस्त आता हा धबधबा पाहिल्यावर पावसाळ्यात पुन्हा जावसं वाटतयं