सत्य या शब्दाशी आपण सगळेच अवगत आहोत. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील इतकंच. आपल्या राजमुद्रेवर 'सत्यमेव जयते' लिहिलेलं आपण नित्य पाहतो, वाचतो. पण नेमकं हेच वाक्य का निवडलं असेल? कदाचित सत्यान्वेशी विचारच जगण्याचे सम्यक सूत्र असल्याचे निवडकर्त्यांना अभिप्रेत असेल का? मग, ज्यांच्या राजमुद्रेवरच सत्याचा साक्षात्कार प्रतित होतो, तेथे असत्याला आश्रय कसा असू शकतो? असा प्रश्न कुणाच्या मनात कधी आला असेल का? माहीत नाही. पण माणसांच्या जगण्याचे प्रवाह नीतिसंमत मार्गाने वाहते राहावेत, अशी अपेक्षा सर्वकाळी अन् सर्वस्थळी राहिली आहे हेही तेवढंच खरं. पण खरं हेही आहे की, माणसे सुविचारांनी सुधारतीलच असे नाही.