भाग १
------------------------
आजचा आपला भारत देश म्हणजे ब्रिटीशांच्या अखत्यारीतला संपूर्ण भूभाग नाही. ब्रिटीशांच्या अमलाखालील भारताची एकदा रद्द केलेली आणि तीनदा सर्वमान्य झालेली विभागणी / फाळणी झाली. १९०५ सालची बंगालची फाळणी ही पहिली फाळणी. ती लोकक्षोभामुळे ब्रिटीशांनी मागे घेतली. मग १९१९ साली दुसरी फाळणी झाली, ती जुन्या भारतीय संस्कृतीचा भाग असलेला सुदूर उत्तर-पश्चिमेच्या एक मोठ्या भागाने स्वतःला ब्रिटीश साम्राज्यापासून स्वतंत्र घोषित केल्याने. हा भाग होता प्राचीन भारतातला, ‘गांधार’. रामायणकालीन भरताने जिंकलेला गांधार. (भरताच्या तक्ष या पुत्रावरून तक्षशीला आणि पुष्कल या पुत्रावरून पुष्कलावती या शहरांची नावे पडली असे मानतात. प्रसिद्ध इतिहासतज्ञ दामोदर कोसंबींनी, तक्षक या नागाचे शहर म्हणून तक्षशीला अशीही व्युत्पत्ती सांगितली आहे.) बामियानच्या बुद्धमूर्तींची भूमी असलेला गांधार, मगधाधीपती धनानंदाकडून अपमानीत होऊन मगध सोडून विद्यार्जन आणि विद्यादान ही दोनही कामे आयुष्याच्या मोठ्या कालावधीसाठी आचार्य चाणक्यांनी जिथल्या विद्यापीठात पूर्ण केली त्या तक्षशिलेचा गांधार. म्हणजेच आजचा अफगाणिस्तान.